8 Sept 2022

*प.पू.ताई दामले पुण्यतिथी*



आपल्या साधनेवर अत्यंत दृढ निष्ठा, सर्व प्रसंगी श्रीगुरुचरणीं अनन्य शरणागतिपूर्वक पक्का निर्धार आणि पराक्रम या गुणांच्या साहाय्यानेच परमार्थ करावा लागतो. लेच्यापेच्या माणसांचे ते कामच नव्हे. प्रपंचाची आसक्ती सोडून देणे व परमार्थाचे प्रेम हृदयात दृढ धारण करणे हे वाटते तितके सोपे काम नाही, त्यासाठी खरोखर धैर्य आणि पराक्रमच अंगी असावा लागतो. आधी आपले मन व मग प्रपंच, म्हणजे आपल्या भोवतीचा माणसांचा गोतावळा व आपली कर्मे, यांमध्ये न गुंतण्याची पराकाष्ठा केल्याशिवाय परमार्थ अंगात मुरतच नाही. संतांच्या चरित्रांमधले हेच महत्त्वाचे भाग तर आपण नीट समजून घ्यायचे असतात. ते सोडून आपण फक्त त्यातले चमत्कार पाहतो; आणि साधनेचे, तपश्चर्येचे कोणतेही कष्ट न करता ते चमत्कारच आपल्याबाबतीत कसे घडतील याचाच विचार करीत वेळ वाया घालवतो. आणि म्हणूनच आपण जिथे असतो तिथेच जन्मभर राहतो, परमार्थात पुढे जातच नाही !

सर्वच संतांची चरित्रे अत्यंत अलौकिक व बोधप्रद असतात. तरीही प्रत्येक संतचरित्राचा काही ना काही विशेष असतोच. *प्रपंचातील सर्व कर्तव्ये पार पाडत असतानाही परमार्थ कसा साधावा ? प्रारब्धाने कोणतीही कर्मे समोर आली तरी ती भगवद् इच्छा मानून शांतपणे भोगून कशी संपवावीत ? आणि कोणत्याही परिस्थितीत आपले भगवद् अनुसंधान कसे टिकवावे ? या परमार्थातील मूलभूत प्रश्नांची अतिशय नेमकी उकल करून घ्यायची असेल तर; श्रीस्वामीतनया प.पू.पार्वतीदेवी देशपांडे, प.पू.कलावती आई व प.पू.ताई दामले या तीन अधिकारी विभूतींची चरित्रे आपण जन्मभर कायमच वाचन-मननात ठेवायला हवीत.*

या स्वनामधन्य संतत्रिमूर्तींपैकी, आज भाद्रपद शुद्ध त्रयोदशी दिनी, श्रीसंत प.पू.ताई दामले यांची ३९ वी पुण्यतिथी आहे. आजच्या तिथीला, दि.२० सप्टेंबर १९८३ रोजी पहाटे ३.५५ मिनिटांनी त्यांनी नश्वर देहाची खोळ सांडली होती. त्यांच्या देहाला इंद्रायणीच्या काठी अग्नी देण्यात आला. तिथेच आता त्यांची समाधी बांधलेली आहे. प.पू.ताई दामले यांच्या पावन श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!

प.पू.ताई दामले यांचे चरित्र अतिशय मार्मिक व बोधप्रद आहे. तुम्हां-आम्हां सर्वसामान्य माणसांना त्यातून परमार्थाची फार मोठी ऊर्जा व प्रेरणा मिळते. याच उद्देशाने योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांनी स्वत: आज्ञा करून सौ.नीलाताई जोशी यांना पू.ताईंचे चरित्र लिहायला सांगितले होते. *"कृष्णा काठ ते इंद्रायणी घाट"* या नावाचे ते चरित्र आजमितीस उपलब्ध नाही, पण काही जुन्या ग्रंथालयांमध्ये नक्कीच ते वाचायला मिळू शकेल. त्या चरित्रातील काही महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक भाग खालील लिंक वरील लेखात घेतलेला आहे. तो लेख आवर्जून वाचावा ही विनंती.

*श्रीसंत प.पू.ताई दामले*

https://rohanupalekar.blogspot.com/2019/09/blog-post_11.html?m=1

योगिराज प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज प.पू.ताईंना आपली बहीण मानीत असत. दोघांनाही एकमेकांबद्दल अतीव प्रेमादर होता. प.पू.ताई दामले यांना प.पू.श्री.मामांच्या ठायी त्यांच्या मूळ रूपाचे अर्थात् प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांचे साक्षात् दर्शन लाभलेले होते. माझ्या *"सद्गुणरत्नाकर; प.पू.श्री.मामा"* या ग्रंथातील 'तुझा महिमा अलौकिक' या लेखात सविस्तर वर्णिलेला तो प्रसंग, आजच्या पावन दिनी आपण थोडक्यात पाहून प.पू.ताईंच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊ या.

प.पू.ताई दामले यांना बालपणापासून डोळ्यांची व्याधी होती. त्यासाठी उपाय म्हणून त्यांना श्रीदत्तप्रभूंनी दृष्टांत देऊन चरणतीर्थ घालायला सांगितले होते. त्यांनी श्रीनृसिंहवाडी मुक्कामात प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्याच चरणांचे तीर्थ डोळ्यांत घातल्याने ती व्याधी पुढे फार वाढली नाही. कृष्णेच्या घाटावर उमटलेल्या प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या ओल्या पावलांचे पाणी पदराने टिपून घेऊन, त्यांच्या नकळत त्यांनी ते तीर्थ म्हणून उपयोगात आणलेले होते. म्हणून श्रीस्वामी महाराजांना ते लौकिक अर्थाने माहीत असायचा प्रश्नच नव्हता. पण श्रीस्वामी महाराज तर सर्वज्ञच होते.

पुढे पुण्यात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची व प.पू.ताईंची भेट झाली. त्यावेळी प.पू.ताईंनी दारात प.पू.श्री.मामांच्या चरणांवर दूध-पाणी घालून त्यांचे स्वागत केले. प.पू.श्री.मामा घरात आले व एकदम मागे वळून प.पू.ताईंना म्हणाले, "आता ते पाणी पदराने टिपून घ्यायची आपल्याला गरज नाही बरे. आपले काम झाले आहे !" या वाक्याचा संदर्भ केवळ प.पू.ताईंनाच समजला, बाकी उपस्थित कोणालाही समजला नाही. त्याचवेळी प.पू.ताईंना प.पू.श्री.मामांच्या जागी साक्षात् प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे दिव्य दर्शनही झाले होते. महात्म्यांच्या अशा लीला खरोखर अद्भुत व अनाकलनीयच असतात.

सामान्यजनांना स्वत:च्या उदाहरणाने उत्तम बोध करणाऱ्या व आजन्म भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची आणि श्री ज्ञानेश्वरीची सेवा करणाऱ्या श्रीसंत प.पू.ताई दामले यांच्या श्रीचरणीं ३९ व्या पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग दंडवत !!