25 Feb 2020

दया पांघुरवी माते विश्वमूर्ते



आज २५ फेब्रुवारी २०२०.
परमाराध्या प.पू.मातु:श्री सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे यांना देहत्याग करून आज तारखेने एक वर्ष पूर्ण झाले. दिवस किती भरभर जातात हे त्या ओघात कळतच नाही, पण नंतर त्या गेलेल्या दिवसांची जाणीव झाली की कसेसेच होते.
प.पू.सौ.ताईंनी पूर्वसूचना देऊन २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली. महात्मे देहात असतानाच भगवत्स्वरूप झालेले असल्याने, देह सोडल्यावर उलट त्या देहाच्या सर्व मर्यादांचा त्याग करून विश्वरूप होतात. देहात असताना त्यांना आपले कर्तुमकर्तुम् सामर्थ्य प्रकटपणे वापरता येत नाही, पण तेच देहाची खोळ सांडल्यावर अधिक वेगाने व पूर्ण प्रभावाने त्यांच्या कार्याला सुरुवात होते. हा शास्त्रांचा नियमच असल्याने, प.पू.सौ.ताईंच्या बाबतीतही हेच पाहायला मिळाले. 
प.पू.सौ.ताईंचे लोभस व्यक्तिमत्व इतके प्रभावी व जबरदस्त होते की, त्यांच्या स्मरणाशिवाय एकही दिवस जात नाही. पदोपदी त्यांची आठवण येतेच आणि मनातले काहूर अजून दाटून येते. लौकिकातल्या त्यांच्या पावन सहवासाला अंतरल्याची दुखरी जाणीव आतून फार क्लेश देते. 
संतांचे चिन्मय अस्तित्व हे त्यांच्या वाङ्मयातून आणि स्मरणातून, त्यांच्या लीलाकथांमधून अजरामर झालेले असतेच. "न तस्य प्राणा: उत्क्रामन्ति ।" हे उपनिषद् वचन खरेच आहे. त्या भगवत्स्वरूप झालेल्या महात्म्यांचे प्राण उत्क्रान्त होत नाहीत. कारण त्यांचे प्राण देहत्यागापूर्वीच त्या प्राणांचे जन्मस्थान असलेल्या भगवती शक्तीमध्ये विलीन झालेले असतात. म्हणूनच, प.पू.सौ.ताईंच्या नुसत्या स्मरणानेही अनेकांचे अष्टसात्त्विक भाव जागे होतात, अचानक दिव्य सुगंधाची अनुभूती येऊ लागते, आतूनच आनंदाच्या अविरत ऊर्मी येऊ लागतात आणि बरेच काही अनुभव येतात. असे दिव्य अनुभव गेल्या वर्षभरात जगभरातील असंख्य भाविकभक्तांनी घेतलेले आहेत. हीच प.पू.सौ.ताईंच्या चिन्मय अस्तित्वाची जागती प्रचिती आहे !
आज पू.सौ.ताईंच्या तारखेने प्रथम स्मृतिदिनानिमित्त, आपणही त्यांच्या पावन स्मरणगंगेत प्रेमपूर्वक अवगाहन करू या, त्यांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक दया-प्रार्थना करू या आणि त्यांच्या श्रीचरणांच्या सादर स्मरणाने, सप्रेम वंदनाने पावन होऊ या !

[ प.पू.सौ.ताईंच्या प्रथम पुण्यतिथी दिनी, माघ कृष्ण सप्तमीला, त्यांच्यावर लिहिलेला जय जय वो प्रेमळे हा लेख खालील लिंकवर वाचता येईल. ज्यांनी तो आधी वाचलेला नाही, त्यांनी आवर्जून वाचावा ही विनंती.
जय जय वो प्रेमळे

आमच्या अमृतबोध मासिकाचा फेब्रुवारी २०२०चा अंक हा 'प.पू.सद्गुरु.सौ.शकुंतलाताई आगटे प्रथम पुण्यतिथी विशेषांक' म्हणून प्रकाशित झालेला आहे. या सर्वांगसुंगदर अंकाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रस्तुत अंकात प.पू.सौ.ताईंच्या अप्रतिम बोधावर आधारलेला एक लघुलेख मी लिहिला आहे. तो "संस्कारांची शिदोरी" हा लघुलेख आजच्या पुण्यदिनी आपल्यासोबत शेयर करीत आहे. हा संपूर्ण अंक तर उत्तम आहेच, पण एकूणच अमृतबोध मासिक हे भाविकभक्तांनी सदैव मनन-चिंतनात ठेवावे असे वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे आहे.

*** *संस्कारांची शिदोरी* ***
श्रीक्षेत्र दत्तधाम येथे प.पू.सद्गुरु सौ.ताई असतानाचा प्रसंग आहे. दिवसभराची सेवा झाल्यावर सगळे स्वयंसेवक प.पू.सौ.ताईंच्या समवेत चहापानासाठी जमले होते. हे रोजचे चहापान हा अनौपचारिक असे शंकासमाधानच असायचे. त्याद्वारे प.पू.सौ.ताई व प.पू.श्री.दादा सर्वांच्या मनावर विविध प्रसंगांच्या माध्यमातून, संतांच्या कथांच्या माध्यमातून साधनेचे महत्त्व ठसवत असत.
एकदा 'मुलांवर संस्कार कसे करायचे ?' असा विषय चालू होता. प.पू.सौ.ताई म्हणाल्या, "संस्कार हे प्रयत्नपूर्वक वेगळे करायची गरज नाही. आपण एखादी गोष्ट निष्ठेने, मनापासून व सातत्याने करीत राहिलो की, आपल्या मुलांवर आपोआपच त्याचे उत्तम संस्कार होतात आणि असे झालेले संस्कारच पुढे टिकूनही राहतात. 
तुम्हांला मी एक घडलेले उदाहरणच सांगते. एकदा एका अमेरिकेतील साधकभगिनींनी मला प्रश्न विचारला, "अहो ताई, मी माझ्या मुलालाही परमार्थाचे प्रेम लागावे यासाठी काय प्रयत्न करू ?" त्यावर मी तिला सांगितले की, अशी जबरदस्ती करून कधीच संस्कार होत नाहीत. त्यापेक्षा तू न चुकता व प्रेमाने स्वत: परमार्थ करीत राहा, आपोआपच त्याच्यावर ते संस्कार होतील. 
तिला प्रथमत: माझे म्हणणे पटले नसावे, पण तिने मी सांगितले ते निष्ठेन पाळले. ती रोज न चुकता देवांची पूजा व साधना करीत असे. पुढे तिचा मुलगा मोठा झाल्यावर दुसरीकडे राहायला गेला. तो त्या घरी जाताना आईकडे आला व म्हणाला, "आई, तू रोज पूजा करतेस ती श्रीगणपतींची मूर्ती मला देशील का ? मी पण नव्या घरी तुझ्यासारखीच त्या मूर्तीची रोज पूजा करीत जाईन." 
मुलाचे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यांत पाणी आले, तिनेही आनंदाने ती मूर्ती त्याला दिली. त्यानंतर तिने मला फोन करून हा सर्व प्रसंग सांगितला व म्हणाली, "ताई, तुम्ही जसे म्हणाला होतात तसेच घडले. मी तुमच्या सांगण्यानुसार रोज प्रेमाने पूजा करीत असे. त्याचा सुयोग्य संस्कार, काहीही न बोलता व कसलेही वेगळे प्रयत्न न करता माझ्या मुलावरही बरोबर झाला आणि आता तोही रोज पूजा करू लागला आहे. मनापासून धन्यवाद ताई !"
पाहा, संस्कार हे असे होत असतात. ते काही मारून-मुटकून करायचे नसतात. आपण प्रेमाने एखादी गोष्ट करीत राहिलो की आपले पाहून पुढे आपली मुलेही तसेच करतात. आपल्याच उपासनेतल्या सातत्याचा, आळस न करता केलेल्या साधनेचा असे संस्कार हाच सुपरिणाम असतो !" 
प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या या मौलिक उपदेशाने, समोर उपस्थित आम्हां सर्वांच्या अंत:करणात संस्कारांच्या शिदोरीची एक सुखद अनुभूती निर्माण झालेली होती ! 
प.पू.सौ.ताईंचे अद्भुत वाङ्मय हे त्यांचे अपररूपच आहे आणि तेही त्यांच्याच इतके वात्सल्यपूर्ण आहे. जो त्यांच्या या दैवी कृपावैभवसंपन्न वाङ्मयरूपाला अनन्य शरणागत होईल, त्याचा सर्वार्थाने सांभाळ करण्यासाठी हे मातृप्रेमरूप वाङ्मय कटिबद्ध आहेच. वानवा आहे ती अनन्य शरणागत भक्तांचीच. आता ती अनन्यता आपल्याला कशी साधेल, हे मात्र आपणच पाहायला हवे आणि त्यासाठीच सतत प्रयत्नशील राहायला हवे. 
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातु:श्री सौ.शकुंतलाताई की जय ।
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

17 Feb 2020

श्रीदासनवमी



आज श्रीदासनवमी ! 
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांची ३३८ वी पुण्यतिथी. 
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज हे आपले परमादर्श आहेत. विवेक विचाराच्या साहाय्याने नेटका प्रपंच करीतच, आतून मात्र परमार्थाची भूमिका पक्की करण्याचा मोलाचा उपदेश त्यांनी केला. आपल्या या बोधानुसार वर्तन करणाऱ्या महंतांची व शिष्यांची मोठी फौज तयार करून समाजात सद्धर्माची स्थापना केली. मोगलांच्या अत्याचारांनी पिडलेल्या जनतेला स्वराज्याचे महत्त्व पटवून दिले आणि त्याचवेळी रामकथेचा कल्लोळही केला. प्रत्येक कार्याला श्रीभगवंतांचे अधिष्ठान हवेच, हेही सर्वांना पटवून दिले. किती वैविध्यपूर्ण कार्य केले आहे श्री समर्थांनी. खरोखर त्यांच्यासारखे तेच, अद्वितीय !
_'स्वत:बरोबरच इतरांचेही कल्याण साधण्यास तत्पर असणाऱ्या जागृत तरुणांस समर्थ श्री रामदासादि संतांनी केलेल्या मार्मिक बोधाचे विवेचन'_ करणाऱ्या माझ्या 'जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा' या ग्रंथाच्या 'प्राक्कथना'त प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "महाराष्ट्राच्या संतमांदियाळीत समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचे स्वत:चे असे एक स्वतंत्र, वैशिष्ट्यपूर्ण आणि स्फूर्तिदायक स्थान आहे. शिवकालापासून आजपर्यंत होऊन गेलेल्या प्रत्येक पिढीला त्यांच्या ओजस्वी विचारांनी प्रभावित केलेले आहे. त्यांच्या इतके अचूक, व्यावहारिक बाजूंनीही नेटके असे कालोचित मार्गदर्शन परमार्थाच्या प्रांतात क्वचितच बघायला  मिळते. आजच्या काळातही त्यांच्या तेजस्वी विचारांची, प्रखर ध्येयवादाची आणि राष्ट्रकेंद्रित चळवळीची योग्य दिशा दाखविणाऱ्या सर्वांगीण चिंतनाची युवावर्गाला तेवढीच गरज आहे. श्री समर्थांचा तळमळीचा उपदेश हे सर्वार्थांनी 'यत्नोपनिषद'च आहे. श्री समर्थांच्या वाङ्मय महासागरातून असंख्य तेजोमय विचाररत्ने अभ्यासकांच्या हाती येऊ शकतात, त्यांचे वाङ्मय हे आयुष्याच्या यथायोग्य, मजबूत आणि सुसंस्कृत जडणघडणीला सर्व बाजूंनी साह्य करू शकते !"
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे वर सांगतात त्याप्रमाणे, समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांच्या मौलिक उपदेशानुसार आपण सदैव चाललो, वागलो तर ; 
मनाची शतें ऐकतां दोष जाती ।
मतीमंद ते साधना योग्य होती ।
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगीं 
म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ॥२०५॥
ही श्री मनोबोधाची फलश्रुती आपल्याही बाबतीत सत्य ठरेल आणि आपलाही जन्म धन्य होईल !
आज सद्गुरु श्री समर्थांना श्रीदासनवमीच्या पुण्य पर्वावर मनोभावे सादर दंडवत घालून त्यांच्या श्रीचरणीं, "आम्हांला सद्गुरुप्रदत्त साधनेसाठी सामर्थ्य प्रदान करावे", अशी कळकळीची प्रार्थना करू या आणि सद्गुरुस्मरणात झडझडून प्रयत्नांना लागू या !!
सद्गुरु श्री समर्थांच्या चरित्र आणि कार्यावरील अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे. त्या लिंकवर जाऊन प्रस्तुत लेख आजच्या पावन दिनी आवर्जून वाचावा ही प्रार्थना !!
राम तोचि रामदास
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

15 Feb 2020

जय जय वो प्रेमळे



सोमवार दि.२५ फेब्रुवारी २०१९, माघ कृष्ण सप्तमी, श्रीशके १९४०. 
नेहमीप्रमाणे दिवस उगवला. माझ्याकडे मुख्य मंदिरातली पूजा असल्याने मी पहाटे स्नान करून मंदिरात गेलो, देवांचा जयजयकार होऊन सहा वाजता काकडेआरती सुरू झाली. भूपाळी म्हणून झाल्यावर काकडेआरती ओवाळणे चालू असताना अचानक माझ्या हातातला काकडा खाली पडून शांत झाला. गेल्या दहा वर्षात एकदाही असे कधीच घडले नव्हते. मला वाईट वाटले, पण लगेच मी तो काकडा उचलून पुन्हा पेटवला व आरती पूर्ण केली. नंतरच्या पूजेत मी ते विसरूनही गेलो. 
पूजेनंतर देवांची आरती झाल्यावर तबकातून निरांजन काढून ठेवताना, कसा कोण जाणे पण तबकाला धक्का लागला व ते निरांजन जमिनीवर पालथे पडले, दिवा शांत झाला. सकाळपासून असे काय होते आहे काहीच कळेना. मी क्षमा मागून ते निरांजन पुन्हा पेटवले व कट्ट्यावर ठेवून दिले. दोन वेळा असे विचित्र घडल्यामुळे जरा अस्वस्थ झालो होतो.
पूजेनंतरच्या नित्याच्या वाचनात, प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे ओवीबद्ध चरित्र असलेल्या 'श्रीगुरुसाहस्री'चा ओघाने नेमका शेवटचा, पंचविसावा अध्याय आला. प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या देहत्यागाचे वर्णन करणाऱ्या त्या अध्यायाने नित्य पारायणाची समाप्ती झाली.
त्या दिवशी सोमवार असल्याने श्रीक्षेत्र दत्तधामचे मंदिर दर्शनासाठी बंद होते. सकाळी ११ च्या सुमारास पुण्यातून काही लोक दर्शनासाठी आले. त्यांना बाहेरच फक्त प्रसाद दिला व त्यांच्याशी बोलत होतो. त्यातील एका भगिनींनी पू.सौ.ताईंची खूप आठवण काढली व त्यांना भेटण्याची खूप वर्षांपासून तीव्र इच्छा असल्याचे सांगितले. त्यानंतर पुण्यातील एका साधक भगिनींचा फोन आला, त्याही पू.सौ.ताईंबद्दलच बोलल्या. एकूण काय, प.पू.सौ.ताईंची आठवण त्या दिवशी सारखीच निघत होती.
या सर्व गोष्टी नक्की काही विशेष संकेतच करीत होत्या, पण माझ्या अल्पबुद्धीने तो ग्रहण केला नाही. संध्याकाळी पावणेपाच वाजता त्या संकेतांचा खुलासा झाला. प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादांचा फोन आला व त्यांनी सांगितले, "प.पू.सौ.ताईंनी चार वाजता देह ठेवला !" अंगावर वीज कोसळावी तसे झाले. एकदम सुन्नच व्हायला झाले होते.  
आज या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. काळ किती भरभर जातो ना !
भक्तवत्सल भक्ताभिमानी प.पू.सद्गुरु मातु:श्री सौ.शकुंतलाताई आगटे !!!!
प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या थोर उत्तराधिकारी, भक्तिशास्त्रातल्या साक्षात् नगाधिराज हिमालय आणि अलौकिक, अद्भुत अशा दैवी विभूतिमत्वाच्या धनी असणाऱ्या प.पू.सौ.ताई या प्रत्यक्ष चालता-बोलता चमत्कारच होत्या. महद्भाग्याने व श्रीभगवंतांच्या असीम दयाकृपेने आम्हां लेकरांना त्यांचा पावन सहवास लाभला. 
आत्मसंस्थ महात्म्यांची शास्त्र-संत-कथित सर्व दैवी लक्षणे ज्यांच्या ठायी पूर्ण बहरलेली होती अशा आमच्या प.पू.सौ.ताईंचे व्यक्तिमत्व अत्यंत लोभस होते. त्यांच्या संपर्कात एखादी व्यक्ती एकदा जरी आली तरी ती कायमचीच त्यांची होऊन जात असे. त्यांच्या विषयी प्रत्येकालाच इतका प्रेमजिव्हाळा वाटायचा की आपले आपल्यालाही त्याचे अप्रूप वाटावे. 
प्रचंड ऊर्जेने भारलेले, सतत कार्यमग्न असणारे, कधीच किंचितही नकारात्मक न होणारे, समोरच्याला सदैव आपलेसे करून वागविणारे, कोणताही आप-परभाव नसणारे, अतीव नम्र तरीही करारी असणारे, खोटेपणाला कधीच कसलाही थारा न देणारे, अखंड श्रीभगवंतांशी एकरूप होऊन वावरणारे आणि परमप्रेमाने ओसंडून वाहणारे प.पू.सौ.ताईंचे सोज्ज्वळ, सात्त्विक विभूतिमत्व अद्वितीय-उत्तमच होते !
म्हणूनच तर, पू.सौ.ताईंनी देहत्याग केल्याची बातमी ऐकून, विविध जाती-धर्मांचे, विभिन्न पंथ-संप्रदायांचे जगभरातील अक्षरश: हजारो आबालवृद्ध स्त्रीपुरुष व्याकूळ झाले, सैरभैर झाले, हमसाहमशी रडले. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली, श्रीसंत तुकाराम महाराज, समर्थ श्री रामदास स्वामी महाराज यांसारख्या थोर महात्म्यांच्या देहत्यागानंतर त्यावेळच्या भाविक लोकांची जशी स्थिती झाली असेल, अगदी तशीच स्थिती पू.सौ.ताईंच्या देहविसर्जनानंतर झाली होती. लोकांना कित्येक दिवस लागले त्यातून बाहेर पडायला. पू.सौ.ताई नेहमी एक वाक्य सांगत असत की, "पू.श्री.मामा म्हणायचे, 'आपल्या मागे लोकांना भांडायला काही ठेवू नये, रडायला ठेवावे'." पू.सौ.ताईंनी आपल्या श्रीसद्गुरूंचे हे वाक्य शब्दश: खरे करून दाखवले.
जन्मसिद्ध अवतारी महात्मे हे श्रीभगवंतांसारखे सर्व दैवी सद्गुणांनी संपन्नच असतात. श्रीभगवंतांच्याच मुखाने श्री माउली याचे रहस्य सांगताना म्हणतात, 
मी जैसा अनंतानंद । जैसाचि सत्यसंध ।
तैसेचि ते भेद । उरेचि ना ॥ज्ञाने.१४.२.५४॥
"पार्था, मी जसा अनंत आहे, अखंड आनंदस्वरूप आहे, जसा सत्यसंकल्प आहे, तसेच माझ्याशी सर्वभावे एकरूप झालेले ते महात्मेही अनंतानंदरूप व सत्यसंकल्प असतात. माझ्याशी पूर्णपणे मिसळून गेल्याने तेही परिपूर्ण होऊन ठाकलेले असतात. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कसलाच भेद उरलेला नसतो !" आमच्या प.पू.सद्गुरु सौ.ताई देखील अशा अंतर्बाह्य भगवत्स्वरूपच होत्या. म्हणून तर त्यांच्या कर्तुमकर्तुम् सामर्थ्याचे अक्षरश: लक्षावधी अनुभव पूर्वी असंख्य भक्तांनी घेतलेले आहेत, आजही घेत आहेत व उद्याही घेणार आहेतच. हे त्यांच्या ठायीच्या भगवद्-अवतारित्वाचे सम्यक दर्शनच म्हणायला हवे.
प.पू.सौ.ताईंच्या स्वभावाचा निखळ प्रेम हाच स्थायीभाव होता. त्यांना समोरच्यावर निरपेक्ष आणि अपरंपार प्रेम करणेच केवळ माहीत होते. त्यांनी जरी समोरच्या व्यक्तीचे दोष जावेत, त्याच्या परमार्थाच्या आड येणाऱ्या सवयी सुटाव्यात म्हणून क्वचित् प्रसंगी लटक्या रागाचा आविर्भाव धारण केला, तरी त्यातही मूळचा भाव प्रेमाचाच असे. सद्गुरु श्री माउली म्हणतात ना, "मातेच्या कोपी थोकले । प्रेम दिसे ॥" अगदी तसेच. आईने कृतक् कोपाने लेकराला धपाटा जरी घातला, तरी त्यात त्याचे हितच तर तिला अपेक्षित असते ना ! 
प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या दैवी प्रेमाच्या अमृतस्पर्शाने अनेकांची जीवने धन्य झाली, असंख्यांच्या परमार्थाचा मार्ग प्रशस्त झाला आणि हजारो भक्तांच्या हृदयात श्रीभगवंतांचे अधिष्ठान स्थिर झाले. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक जीव काही अंशी श्रीभगवंतांना सन्मुख झाला, श्रीभगवंतांच्या जवळ गेला हे नि:संशय. आज त्यांच्या नुसत्या आठवणीनेही भक्तांचे भगवद्-अनुसंधान वाढते आहे, यातच त्यांच्या कार्याचे अलौकिकत्व समजून येते.
प.पू.सौ.ताईंचे जीवन हा एक विलक्षण चमत्कारच आहे. फार पूर्वी एकदा त्या मला म्हणाल्या होत्या, "अरे रोहन, एखादा चमत्कार पाहायला मिळाला म्हणून त्याचे काही अप्रूप वाटून घेऊ नकोस. देवांच्या, सद्गुरूंच्या राज्यात क्षणोक्षणी असे चमत्कार घडतच असतात. त्यांची सवय लावून घे !" गेल्या वीस वर्षांच्या काळात मला लाभलेल्या त्यांच्या पावन सहवासातील प्रत्येक दिवसाला एकाहून एक भन्नाट चमत्कार आम्ही अनेकांनी समोर अनुभवलेले आहेत. केवळ आम्हीच नाही तर आमच्या श्रीक्षेत्र दत्तधामच्या कणाकणाने असे अद्भुत चमत्कार असंख्य वेळा अनुभवलेले आहेत. पू.सौ.ताईंच्या हातातच पाने फुटलेल्या कांडीपासून तयार झालेला, मंदिरामागे लावलेला कुंद त्याची साक्ष देत अजूनही भरभरून फुलतोय. हा एकच नाही, अनेक चमत्कार आहेत असे. खरोखरीच, त्यांच्या सहवासातला प्रत्येक क्षण हा एक चमत्कारच होता. हीच अनुभूती जगभरातले त्यांच्या संपर्कात आलेले लाखो लोक नेहमीच सांगतात.
ध्रुवीय प्रांतातील अतिशीत ग्रीनलँड, फिनलँड सारख्या दूरच्या देशांपासून ते पार दक्षिणेतील ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पर्यंत, तसेच संपूर्ण अमेरिका, अाफ्रिका, युरोप, जपान, सिंगापूर, दुबई, मस्कत अशा अगणित देशांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये पू.सौ.ताई निर्भयतेने वावरल्या. हजारो साधकांना त्यांनी परमार्थाचे मार्गदर्शन केले, शेकडो प्रवचनसेवा करून विशुद्ध परमार्थाचा प्रसार केला, वेळ आलेल्या जीवांना दीक्षा देऊन परमार्थपथावर अग्रेसर केले. आजमितीस जगभरातील असंख्य साधकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या पू.सौ.ताईंनी खरोखरीच लाखो लोक अत्यंत प्रेमाने जोडलेले होते. इतक्या सर्वांशी निर्मळ स्नेहसंबंध असूनही त्या कशातही गुंतलेल्या नव्हत्या, कायम अलिप्तच होत्या. कारण त्या सदैव, अखंडितपणे श्रीभगवंतांशीच जोडलेल्या होत्या, त्यांच्याशीच अंतर्बाह्य एकरूप झालेल्या होत्या.
प.पू.सौ.ताई अतिशय खिलाडू वृत्तीच्या होत्या. त्या शाळा-कॉलेजच्या काळात स्वीमिंग आणि टेनिसच्या नॅशनल चँपियन होत्या. त्यांना व्यायामाची मनस्वी आवड होती. अगदी वयाच्या पासष्ठाव्या वर्षी देखील हलासनासारखी अवघड आसने करताना मी त्यांना समक्ष पाहिलेले आहे. हीच खेळकर वृत्ती त्यांनी जन्मभर जोपासली. परमार्थ करायचा म्हणजे गंभीर असावे, तोंड पाडूनच बसावे वगैरे त्यांना कधीच मान्य नव्हते. त्यांनी स्वत: अतिशय आनंदात परमार्थ केला व तसाच इतरांनाही करायला शिकवला. त्यांचे विचार सदैव सकारात्मकच असायचे. त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्यांच्याही मनाची मरगळ तत्क्षणी निघून जात असे.
प.पू.सौ.ताईंची निरूपणशैली अत्यंत हृद्य आणि सहजसोपी आहे. त्या जड शब्द कधीही वापरत नाहीत. घरगुती, दैनंदिन जीवनातली उदाहरणे देऊन विषय समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांची आजवर प्रकाशित झालेली चौतीस पुस्तके वाचताना आपल्याला याचा उत्तम प्रत्यय येतो. त्यांच्या वाङ्मयाचा विशेष म्हणजे त्या सांगत असलेल्या 'व्रजकथा' होय ! आजवरच्या इतर कोणत्याही संतसाहित्यात या व्रजकथा आलेल्या नाहीत. त्यांनी स्वत: अनुभवलेल्या भगवान श्रीकृष्ण, भगवती श्रीराधाजी आणि गोपगोपींच्या त्या अनवट आणि मनोहर कथांमुळे पू.सौ.ताईंचे वाङ्मय अत्यंत अद्भुत व रमणीयच ठरते. शिवाय त्यांची संतवाङ्मयाचा योगार्थ, गूढार्थ विशद करण्याची हातोटी तर एकमेवाद्वितीयच म्हणावी लागेल. श्रीवामनराज प्रकाशनाने पू.सौ.ताईंचे समग्र वाङ्मय प्रकाशित करून तुम्हां-आम्हां भाविकांवर, संतवाङ्मयाच्या अभ्यासकांवर प्रचंड मोठे ऋणच केलेले आहे, यात तीळमात्र शंका नाही. परमार्थ मार्गावरील पथिकांसाठी प.पू.सौ.ताईंचे वाङ्मय ही अनुपमेय अशी संपत्तीच आहे !
प.पू.सौ.ताई म्हणजे करुणेची साक्षात् श्रीमूर्तीच होत्या. या लेखासोबत शेयर केलेले त्यांचे छायाचित्र पाहावे, त्यांच्या नेत्रांमध्ये तीच अपरंपार करुणा घनावलेली स्पष्ट दिसते. सद्गुरु श्री माउलींनी तेराव्या अध्यायात अहिंसेचे वर्णन करताना, डोळ्यांच्या माध्यमातून साकारणाऱ्या अहिंसेचे सुरेख वर्णन केले आहे. प.पू.सौ.ताईंच्या नेत्रांकडे पाहिले की मला त्या सर्व ओव्या जणू तेथे प्रत्यक्ष साकारल्या सारख्याच वाटतात. त्यांची अपरंपार करुणा आम्हां लेकरांवर भरभरून बरसली आणि यापुढेही बरसेल ह्याची मला खात्री आहे.
पू.सौ.ताई अतिशय प्रसिद्धिपराङ्मुख होत्या. त्यांनी आपल्या हयातीत कधीच स्वत:चे माहात्म्य वाढू दिले नाही. श्रीदत्तसंप्रदायाचे जगभर एवढे प्रचंड कार्य केले, पण कधीच कुठे त्याची वाच्यता केली नाही. कधी चुकून सुद्धा आपला सत्कार करून घेतला नाही की पाद्यपूजा करून घेतल्या नाहीत. सर्वकाळी श्रीसद्गुरूंचेच माहात्म्य त्यांनी वाढवले, पण स्वत:ला पूर्ण झाकूनच ठेवले. त्यांच्या महासमाधीनंतर 'श्रीवामनराज' त्रैमासिकाने व 'अमृतबोध' मासिकाने त्यांच्यावर विशेषांक प्रकाशित केले आहेत. त्या अंकांमधून आपल्याला त्यांचा अतिशय भव्य-दिव्य आणि कल्पनेतही न मावणारा मोठेपणा स्पष्टपणे जाणवतो. त्यातील एकेक प्रसंग वाचून आपण अक्षरश: विस्मयचकित होऊन नतमस्तकच होतो. खरोखर हे सर्व विशेषांक संग्रही ठेवावेत व वारंवार वाचावेत असेच अद्भुत झालेले आहेत. याहीवर्षी प.पू.सौ.ताईंवरचा अमृतबोध मासिकाचा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. तोही वाचनीय, मननीय आहे.
प.पू.सौ.ताईंनी दोन वर्षे आधीच आपल्या देहत्यागाची तारीख, वार, वेळ सांगून ठेवली होती. त्यांना श्रीसद्गुरूंचा इच्छा मरणाचा आशीर्वादच होता. त्यानुसार त्यांनी सांगितलेल्या वेळी स्वइच्छेने आपल्या नश्वर देहाचा त्याग केला व त्या विश्वरूप झाल्या. या लेखात त्यांच्याबद्दल लिहिताना क्रियापदांचे भूतकाळाचे रूप वापरताना खरंच खूप क्लेश होत आहेत. त्या देहात असतानाही भगवत्स्वरूपच होत्या, त्यामुळे देह ठेवून वेगळे काही घडलेले नाही, त्या आजही आहेतच. हे जरी सर्व खरे असले व मनाला पटत असले, तरीही त्यांचे ते सगुण रूप आज आपल्या समोर नाही, हेही दाहक वास्तवच आहे ना ! आपल्या तना-मनावर मायेची फुंकर घालणारी, कौतुकाने पाठीवरून हात फिरवणारी, काही चुकल्यास कान पकडून चूक दाखवून देणारी, हाताला धरून वेगवेगळ्या गोष्टी प्रेमाने शिकवणारी त्यांची ती अपार वात्सल्यमय मातृमूर्ती आज आपल्या पुढे नाही, ह्याची बोचरी जाणीव खूपच असह्य आहे !
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा आपल्या 'श्रीगुरुसाहस्री' ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायात म्हणतात, 
कलश जरी सुवर्णाचा । ग्रास करी कां सागराचा ।
तैसी गुरुवर्णना वाचा । पुरे केवी ॥२५.४८॥
श्रीसद्गुरूंच्या यशाचे, त्रिभुवनाला पावन करण्याऱ्या त्यांच्या गुणमाहात्म्याचे वर्णन करणे जिथे प्रत्यक्ष शब्दब्रह्मालाही शक्य नाही, तिथे आपली काय कथा ? प.पू.सौ.ताईंच्या बाबतीतही तेच पूर्णसत्य आहे. म्हणून मीही आता त्यांच्या श्रीचरणीं दंडवतपूर्वक शरण जाऊन मौनावतो !
माघ कृष्ण सप्तमी हा श्रीसंत गजानन महाराजांचा प्रकटदिन. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज ज्यांना गुरुस्थानी मानीत, त्या फलटण जवळील लाटे या गावातील महायोगिनी प.पू.आईसाहेब महाराज यांची हीच पुण्यतिथी आहे. प.पू.सौ.शकुंतलाताईंनी याच तिथीला देह विसर्जन केल्याने, माघ कृष्ण सप्तमी ही आपल्यासाठी परमश्रेष्ठ पुण्य-तिथी बनलेली आहे. 
अनुत्तरभट्टारिका महारासेश्वरी प.पू.सद्गुरु मातु:श्री सौ.शकुंतलाताई आगटे यांच्या श्रीचरणीं प्रथम पुण्यतिथी निमित्त अनंतकोटी साष्टांग दंडवत प्रणाम !! 
प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी, प.पू.सद्गुरु सौ.ताईंच्या अद्वितीय माहात्म्याचे यथायोग्य वर्णन आपल्या 'प्रेमसुमनांजली' मधून केलेले आहे. त्याच अतीव मधुर अशा रचनेने माझ्या या अल्पशा शब्दपूजेची सांगता करतो आणि प.पू.सद्गुरु.सौ.ताईंच्या श्रीचरणीं "दया पांघुरवी माते" अशीच कळकळीची प्रार्थना करतो !
जय जय वो प्रेमळे । श्रीकृष्णरस वेल्हाळे ।
निजभक्तप्रतिपाळे । मातृमूर्ते ॥१॥
जय जय वो सुधन्ये । सद्गुरुराजकन्ये ।
गोपगोपांगनामन्ये । सौख्यमूर्ते ॥२॥
जय जय वो सुखदे । परमपतिप्रमदे ।
सकलगुणसंपदे । शांतिमूर्ते ॥३॥
जय जय वो राधिके । प्रपंचभ्रमछेदिके ।
स्वात्मसुखवर्धिके । भक्तिमूर्ते ॥४॥
जय जय वो सुनंदे । श्यामरतिवरकंदे ।
परापरिश्रुतछंदे । रासमूर्ते ॥५॥
जय जय वो अमृते । गोपालहृदयस्थिते ।
दया पांघुरवी माते । विश्वमूर्ते ॥६॥
भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातु:श्री शकुंतलाताई की जय ।
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

11 Feb 2020

नमन गुरुराया स्वामी लोकनाथ सदया



नमस्कार मंडळी,
आज माघ कृष्ण तृतीया, थोर वारकरी सत्पुरुष श्रीसंत नरहरी सोनार महाराज व शक्तिपात परंपरेतील थोर विभूती, प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांची पुण्यतिथी  !!
मूळचे अभिमानी, कट्टर शैव असणाऱ्या श्रीसंत नरहरी सोनार महाराजांना भगवान श्रीपंढरीनाथांनी अलौकिक लीला करून 'हरिहरा नाही भेद' हे पूर्णत: पटवून दिले. पंढरपुरात तेही अगदी श्रीविठ्ठल मंदिराजवळ राहूनही कधीच ते श्रीपंढरीनाथांच्या दर्शनाला जात नसत. ते आपल्या घरासमोरील मंदिरातल्या भगवान श्रीमल्लिकार्जुनांची उपासना करीत. 
एकदा एका ग्राहकाला भगवान पंढरीनाथांना सोन्याचा कंबरपट्टा बनवायचा होता. त्यासाठी श्री नरहरी महाराजांनी माप घेऊन आणून द्यायला सांगितले. पण देवांनाच लीला दाखवायची असल्याने, त्या मापांचा कधीच नीट उपयोग झाला नाही. दुसऱ्याने घेतलेल्या मापांनुसार बनवलेला कंबरपट्टा घट्ट नाहीतर सैल होत असे, योग्य मापात बसतच नसे. अनेकवेळा असेच झाल्यावर, शेवटी त्यांना स्वत:ला अजिबात इच्छा नसतानाही मंदिरात माप घ्यायला जावेच लागले. "मी कट्टर शैव असल्याने विठ्ठलांचे तोंडही पाहणार नाही" , अशी त्यांची दृढ भावना होती. म्हणून मग त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून माप घेतले. पण पांडुरंगांच्या मूर्तीला स्पर्श केल्यावर त्यांना तेथे शिवपिंडच लागली. त्यांनी खसकन् डोळ्यांवरची पट्टी काढली तर समोर साजिरे गोजिरे समचरण रूप दिसले. पुन्हा पट्टी बांधून माप घेतले. हाच प्रकार दोन तीनदा झाल्यावर ते विचारात पडले. श्रीभगवंतांच्या या अद्भुत लीलेनंतर मात्र त्यांचा भेदभ्रम दूर झाला व ते विठ्ठलभक्त झाले. पुढे त्यांनी भगवान श्रीपंढरीनाथांची मोठी सेवा केली व विपुल अभंगरचनाही केली. श्रीसंत नरहरी महाराजांचे समाधी मंदिर पंढरपुरात महाद्वाराच्या समोरच चंद्रभागेकडे तोंड केल्यावर उजव्या हाताला आहे.
देवा तुझा मी सोनार ।
तुझे नामाचा व्यवहार ॥
हा नामाचे माहात्म्य सांगणारा त्यांचाच सुप्रसिद्ध अभंग आहे. नाममाहात्म्य सांगणारे त्यांचे आणखीही काही अभंग प्रसिद्ध आहेत. नाथ संप्रदायातून अनुगृहीत असलेल्या श्री नरहरी महाराजांनी (आज उपलब्ध असलेल्या त्यांच्या अगदी मोजक्याच अभंगांमधून,) सांप्रदायिक सिद्धांत व स्वत:ची गुह्य योगानुभूती फार सुंदर शब्दांमध्ये व्यक्त केलेली आहे.
आपल्या एका सुंदर अभंगातून, श्रीसद्गुरुकृपेने लाभलेली आत्मस्थिती कथन करताना ते म्हणतात,
नाशिवंत देह मनाचा निश्चय ।
सद्गुरूचे पाय हृदयीं असो ॥१॥
कलीमध्यें फार सद्गुरु हा थोर ।
नामाचा उच्चार मुखीं असो ॥२॥
भजनाचा गजर नामाचा उच्चार ।
हृदयीं निरंतर नरहरीचें ॥१७.३॥
हा देह आणि त्यासंबंधीच्या सर्व गोष्टी नाशिवंत आहेत, हा मनाचा पक्का निश्चय श्रीगुरुकृपेने आता माझ्या अंतरात ठसावला आहे ; आणि म्हणूनच मी अविनाशी असे श्रीसद्गुरुपाय हृदयी घट्ट धरून ठेवलेले आहेत. ते श्रीचरण सदैव तेथेच असोत ही प्रार्थना. या भयंकर कलियुगामध्ये श्रीसद्गुरु हे एकमेव तत्त्व सर्वश्रेष्ठ आहे, तेच तारक आहे. त्यांनी कृपावंत होऊन शक्ती-युक्तीसह दिलेले नामच माझ्या हृदयी सतत असो, मला त्याचा कधीही विसर न पडो. सदैव माझ्या मुखात तेच दिव्यनाम वसो. श्रीसद्गुरूंची व श्रीभगवंतांची प्रेमभक्ती आणि त्यांनी दिलेल्या नामाचा, त्यांनी जसा करायला सांगितला आहे तसाच गजर, त्यांच्याच कृपेने अखंडितपणे मी माझ्या हृदयगाभाऱ्यात करीत आहे !"
श्रीसंत नरहरी सोनार महाराज येथे आपल्या स्थितीचे कथन करण्याच्या मिषाने, तुम्हां-आम्हां साधकांना "काय केले असता निश्चितपणे कल्याण होते" याचे सुरेख मार्गदर्शनच करीत आहेत. "श्रीसद्गुरूंचे पाय धरून राहण्यात आणि त्यांनी जशी सांगितली आहे अगदी तशी साधना प्रेमाने करण्यातच आपले खरे हित आहे", हा त्यांच्या सांगण्याचा मथितार्थ आहे.
श्रीसंत नरहरी सोनार महाराज हे भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या प्रभावळीतले मोठे अधिकारी महात्मे होते. त्यांनी आजच्याच तिथीला, शके १२३५ म्हणजे इ.स.१३१४ साली पंढरीत समाधी घेतली. श्रीसंत नरहरी महाराजांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !
( http://rohanupalekar.blogspot.in )
आजच्याच तिथीला, दि.९ फेब्रुवारी १९५५ च्या मध्यरात्री काशी क्षेत्री प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. आज त्यांची ६५ वी पुण्यतिथी आहे. योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज ज्यांना गुरुस्थानी मानीत असत असे प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज हे शक्तिपात संप्रदायातील एक विलक्षण अधिकारी विभूतिमत्व होते. यांच्याकडूनच वेधदीक्षेची एक परंपराशाखा सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांकडे आली.
प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचा जन्म दि.८ मे १८९२ रोजी वैशाख शुद्ध द्वादशीला चक्रवर्ती या भगवती ढाकेश्वरी मातेच्या पुजारी घराण्यात, बांगलादेशाची राजधानी ढाका येथे झाला. त्यांचे नाव श्री.योगेशचंद्र चक्रवर्ती असे होते.
बालपणापासून त्यांचा ओढा परमार्थाकडेच होता. मोक्षप्राप्तीसाठी तरुणपणी घरादाराचा त्याग करून देवीने दिलेल्या दृष्टांतानुसार ते पू.आत्मप्रकाश ब्रह्मचारी यांना शरण गेले. त्यांच्याकडून ब्रह्मचर्यव्रतासह शक्तिपातदीक्षा लाभून त्यांची साधना सुरू झाली. आपल्या श्रीगुरूंनी संन्यास घेतल्यावर लगोलग, १९१४ साली वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी त्यांनीही संन्यास घेतला. त्यांचे संन्यासनाम 'श्री.चिन्मयानंद सरस्वती' असे होते. पुढे दंडग्रहणानंतर ते 'प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराज' म्हणून ओळखले जाऊ लागले. 
संन्यास नियमांच्या बाबतीत ते फार काटेकोर होते. लहान मुलासारखा सहज निर्मळ स्वभाव, तेजस्वी व तप:पूत चेहरा, मधुर बोलणे, अतीव कोमल अंत:करण आणि कडक शास्त्राचरण हे त्यांचे काही विशेष सद्गुण होते. पुण्यात प.पू.श्री.गुळवणी महाराजांकडे त्यांचे नेहमी येणे होई व बराचकाळ मुक्कामही असे. त्यांचा गळा खूप गोड होता व ते फार प्रेमाने अभंग म्हणत असत.
प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांच्या मुखावर एक विलक्षण तेज विलसत असे. कडकडीत ब्रह्मचर्याचे ते तेज होते. त्यांच्या नजरेला नजर देण्याची कोणाची हिंमत होत नसे. कोणाचाही खोटेपणा, मतलबीवृत्ती व लबाडी त्यांना खपत नसे. ते अतिशय कर्मठ तरीही ऋजू स्वभावाचे होते. त्यांना प्रवासाची आवड होती. त्यांचे हस्ताक्षर सुवाच्य आणि सुंदर होते. ते आलेल्या पत्रांना तत्परतेने उत्तरे लिहीत असत.
प.प.श्रीस्वामी महाराज अत्यंत निस्पृह होते. त्यांचे एक शिष्य श्री.शंकरराव मार्कंड यांनी त्यांना काशीमध्ये एक वास्तू बांधून दिली होती. प.प.श्रीस्वामी महाराजांची खरेतर इच्छा नव्हती, पण शंकररावांचा आग्रह पाहून त्यांनी होकार दिला. ते काशीला जात तेव्हा त्याच वास्तूमध्ये राहात असत. पण श्रीस्वामी महाराजांना त्या वास्तूचा काहीच मोह नव्हता. पुढे प्रारब्धवशात् शंकररावांची परिस्थिती खूप खालावली. ते पाहून स्वामी महाराज काशीला गेले, त्यांनी लगेच ती वास्तू विकून टाकली व आलेले सर्व पैसे श्री.शंकरराव मार्कंडांच्या स्वाधीन करून मोकळे झाले. ते पराकोटीचे निस्पृह व अनासक्त महात्मे होते.
प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांचा शास्त्राचरणावर फार कटाक्ष होता. त्यांना कोणी थोडेही शास्त्रविरुद्ध वागले-बोललेले खपत नसे. ते स्वत:ही अगदी बिनचूक वागत असत. शक्तिपात दीक्षा देण्याच्या बाबतीत ते अत्यंत कठोर होते. आधी सव्वालाख गायत्री जप करायला लावत आणि मगच ते एखाद्याचा दीक्षेसाठी विचार करीत असत. कोणतेही विधिनिषेध न बाळगता, सरसकट दीक्षा दिलेल्या त्यांना अजिबात आवडत नसत. दीक्षा ही "लेने देने की नही होने पाने की बात है ।" असे ते नेहमी म्हणत असत. शक्तीची आज्ञा असल्याशिवाय दीक्षाच होत नाही, म्हणून कोणीही आपल्याच मनाने दीक्षा देऊन चालतच नाही, असे ते वारंवार सांगत असत. "मुझे दल बढाना नहीं है । दीक्षा क्या सस्ती चीज है जो मैं बाँटता फिरू?" असे ते स्पष्ट सांगत असत.
दुर्दैवाने त्यांना मनस्वी खेद होईल असे चुकीचे वर्तन आजमितीस शक्तिपातदीक्षेच्या नावाखाली सर्वत्र बोकाळले आहे. जो उठतो तो शक्तिपात दीक्षाच द्यायला लागतो सध्या. त्यात फेसबुक व व्हॉटसपवर देखील दिवसागणिक नवनवीन दीक्षाधिकारी महाराज जन्माला यायला लागले आहेत. अशा भोंदूंकडून दीक्षा झालेल्या एकाही व्यक्तीला कसलाही पारमार्थिक अनुभव आलेला ऐकिवात नाही. केवळ मानसिक स्तरावरील भ्रमांनाच हे तथाकथित गुरु अनुभव असे गोंडस नाव देऊन भोळ्या भाबड्या साधकांची दिशाभूल करीत असतात. हा सगळा खोटारडेपणा आहे, लोकांची शुद्ध फसवणूक आहे, हे पक्के ध्यानात ठेवावे. आज श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज देहात असते तर अशा दीक्षेचा बाजार मांडणाऱ्या भोंदू मंडळींवर त्यांनी अक्षरश: कोरडे ओढले असते. कारण दीक्षेच्या बाबतीत ते अत्यंत काटेकोर व कर्मठच होते. पण शेवटी 'कालाय तस्मै नम: ।' हेच खरे.
वयाच्या बासष्ठाव्या वर्षी, माघ कृष्ण तृतीया, दि.९ फेब्रुवारी १९५५ रोजी मध्यरात्री काशीक्षेत्रामध्ये प.प.श्री.लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यांनीच पूर्वसूचना देऊन ठेवल्याप्रमाणे त्यांचे पार्थिव दगडी पेटीमध्ये घालून गंगार्पण करण्यात आले. प.प.श्री.लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचे चरित्र आणि त्यांचा उपदेश साधकजनांसाठी सदैव मार्गदर्शक आहे. म्हणून आपण त्यांच्या चरित्राचा डोळस अभ्यास करणे अगत्याचे आहे.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

10 Feb 2020

तेचि वंदूं श्रीचरण श्रीगुरूंचें

आज श्रीगुरुप्रतिपदा !!
श्रीदत्तसंप्रदायातील एक महत्त्वाची तिथी. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची शैल्यगमन तिथी व सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराजांची जयंती.
वारकरी संप्रदायातील थोर विभूतिमत्व स्वानंदसुखनिवासी वै.श्री.विष्णुबुवा जोग महाराज यांची आज शताब्दी पुण्यतिथी. वै.श्री.मामासाहेब दांडेकर, वै.मारुतीबुवा गुरव, वै.बंकटस्वामी महाराज यांसारख्या अनेक विद्वान आणि निष्ठावंत संप्रदायधुरिणांचे आदर्श गुरु आणि मार्गदर्शक म्हणून वै.जोग महाराज सुपरिचित आहेत. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींप्रति अनन्यनिष्ठा असणारे श्री.जोग महाराज हे निष्णात कुस्तीगीर तसेच कुस्तीचे मोठे वस्तादही होते. त्यांचे चरित्र हा अनन्यनिष्ठेचा, नैष्ठिक ब्रह्मचर्याचा व आदर्श वारकरी महात्मेपणाचा वस्तुपाठच आहे. वै.श्री.जोग महाराजांच्या श्रीचरणीं शताब्दी पुण्यतिथी निमित्त सादर दंडवत. 
आजच्या पावन तिथीला श्रीसद्गुरु भगवंतांचे मनोभावे व प्रेमाने स्मरण करणे हे शिष्य म्हणून आपले आद्य कर्तव्य आणि परमभाग्य देखील आहे.
यासाठीच आपण श्रीपादुका रूपाने साकारलेल्या श्रीसद्गुरु-कृपाशक्तीच्या सगुण स्वरूपाचे माहात्म्य जाणून घेणे आवश्यक आहे. खालील लिंकवरील तेचि वंदूं श्रीचरण श्रीगुरूंचें या लेखात श्रीदत्तसंप्रदायातील तीन महत्त्वाच्या श्रीपादुकांचे माहात्म्य कथन केलेले आहे. ते पावन माहात्म्य आजच्या पुण्यदिनी आपण जाणून घेऊ या व सदैव त्याच परममंगलदायक श्रीगुरुचरणीं शरणागत राहून आपलेही जीवन धन्य करू या !!
तेचि वंदूं श्रीचरण श्रीगुरूंचें
https://rohanupalekar.blogspot.com/2017/02/blog-post_11.html?m=1
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

6 Feb 2020

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती



श्रीक्षेत्र गोंदवले !  हे नाव नुसते उच्चारले तरी डोळ्यांसमोर उभी राहते ती स्वानंदमग्न अशी गौरकाय, भव्य कपाळ, त्यावर वैष्णव गंध, हातात माळ, अंगावर लंगोटी लावलेली दिव्य आणि तेजस्वी आकृती ! आज त्याच थोर सत्पुरुष, प्रत्यक्ष श्रीमारुतिरायांचे अवतार, नामयोगी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची १७५ वी जयंती आहे !
श्रीमहाराजांनी त्याकाळी फार मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. हजारो लोकांना भगवद्भक्तीचा, रामनामाचा उपदेश करून सन्मार्गाला लावले. अक्षरशः अगणित अन्नदान करून लाखो गोर-गरीबांचा सांभाळ केला. दुष्काळात लोकोपयोगी रोजगाराची कामे काढून त्या बदल्यात पोटभर अन्न देण्याचा अभिनव उपक्रम राबविणारे श्रीमहाराज हे पहिले समाजसुधारक ! त्यांचे समग्र चरित्र अत्यंत विलक्षण घटनांनी भरलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले या गावी राहणाऱ्या श्री.रावजी व सौ.गीताबाई घुगरदरे या सात्त्विक दांपत्याच्या पोटी माघ शुद्ध द्वादशीला इ.स.१८४५ साली श्रीमहाराजांचा जन्म झाला. प्रत्यक्ष श्रीमारुतिरायांनीच हा अवतार धारण केला होता. या घराण्यात नित्याची पंढरीची वारी होतीच. भजन-कीर्तनाचे तर अखंड सत्र चालूच असे. एकादशीचा जागर संपून आरती चालूच होती, तेवढ्यात सकाळी श्रीमहाराजांचा जन्म झाला.
स्वभाव-वैशिष्ट्ये -
श्रीमहाराजांचे एक वैशिष्ट्य अगदी लहानपणापासून दिसे, ते म्हणजे ते अत्यंत मनमोहक होते. त्यांचे बोलणे, त्यांचे पाहणे समोरच्या माणसाच्या हृदयाचा ठावच घेत असे. आपल्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला सहज आपलासा करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्यापाशी होती. ते जसे अतिशय प्रेमळ आणि कोमल अंत:करणाचे  होते तसेच त्यांचे बोलणे नर्म विनोदी देखील होते. त्यांना बालपणी सगळे 'गणू' या नावाने संबोधत असत.
श्रीमहाराज लहानपणी अतिशय खेळकर होते. त्यांच्या वरकरणी भव्य, स्थूल शरीरात इतकी चपळता होती की ते वयाच्या पासष्टाव्या वर्षी देखील पळू लागले तर तरुण मुलेही सोबत पळू शकत नसत. ते खो-खो, आट्यापाट्यासारखे खेळ आवडीने खेळत, घोड्यावर बसण्याची कला त्यांना उत्तम अवगत होती. कसलेही खोडकर जनावर ते सुतासारखे सरळ आणीत. त्याचा लाडका 'बत्ताशा' नावाचा घोडा होता.
श्रीमहाराज स्वभावाने खूप सरळ होते. त्यांना क्रोध फारसा नव्हताच. कोणी त्यांच्या तोंडावर जरी त्यांची निंदा केली तरी ते कमालीचे शांत राहात. पण जर का कोणी भगवंतांविषयी, संतांविषयी किंवा नामाविषयी अनुद्गार काढले तर त्यांचे पित्त खवळत असे. मग ते हिरिरीने भांडावयास उठत.
श्रीमहाराज खूपच सुसंस्कृत होते. शास्त्रमर्यादांचे नेहमी पालन करीत. स्त्रियांविषयी आदराने बोलत. अपत्यांमध्ये मुलगा-मुलगी असा केलेला भेद त्यांना अजिबात आवडत नसे. त्यांची राहणी साधी, गरीबीची असली तरी अंत:करण राजाचेच होते. ते वागण्या बोलण्यातून कधीच कोणाचे मिंधे राहिले नाहीत. त्यांनी कायम लोकांवर उपकारच केले.
श्रीमहाराजांकडे मूळचीच श्रीमंती होती. तसाच त्यांचा हातही उदार होता. वैभव, ऐश्वर्य, अधिकार, मोठेपणा, मधुर वाणी, नम्रता, लीनता अशा असंख्य सद्गुणांचा सुरेख संगम त्यांच्याठायी होता. ते कायमच सगळ्यांशी लीनतेने वागत. त्यांनी आयुष्यात कधीही उद्धटपणाने वागणे-बोलणे केले नाही. "आपला अभिमान नष्ट होण्यासाठी लीनतेसारखे दुसरे साधन नाही. म्हणून भगवंतांच्या नामाला लीनतेची जोड द्यावी", असे ते आवर्जून सांगत असत आणि त्यांचे स्वत:चे आचरणही तसेच होते.
येहेळगांवचे श्रीसंत तुकामाई हे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या शिष्य परंपरेतील थोर सत्पुरुष होते. श्री तुकामाईंचा रामदासी परंपरेशीही हृद्य संबंध होता.  त्यांचा अनुग्रह श्री गोंदवलेकर महाराजांना बालपणीच लाभला. त्यांनी खडतर परीक्षा घेऊन या हिऱ्याला सुंदर पैलू पाडले. तुकामाईंची भेट होण्यापूर्वी लहानग्या गणुबुवांनी संपूर्ण भारतभर गुरुशोधार्थ भ्रमण केले होते. त्या दरम्यान त्यांना राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराज, श्रीसंत माणिकप्रभू महाराज, श्री रामकृष्ण परमहंस इत्यादी महान संतांची दर्शने व कृपाप्रसाद लाभला. श्री माउलींच्या कृपापरंपरेतील महायोगाचे अंतरंग साधन व रामदासी परंपरेतील उपासना यांचा सुंदर समन्वय श्री गोंदवलेकर महाराजांच्या ठायी झालेला दिसतो. श्रीमहाराज स्वत:ला प्रेमाने रामदासी म्हणवून घेत असत. ते सही 'ब्रह्मचैतन्यबुवा रामदासी' अशीच करीत असत. ते खरोखरीचे 'रामदास'च होते !
श्रीमहाराजांचा एक विलक्षण पैलू म्हणजे गोसेवा. त्यांचे गाईंवर उत्कट प्रेम होते. अगदी लहानपणापासून ते रांगत रांगत गोठ्यात जाऊन बसत असत. त्यांनी आपल्या आयुष्यात शेकडो गाईंची कसायांकडून सुटका केली. त्यांचे गोप्रेम इतके विलक्षण होते की, त्यांच्या आसपास एखाद्या गाईवर जबरदस्ती केली, मारझोड केली तर त्यांच्या घशात घास अडकत असे किंवा ते कासावीस होत. ते गोंदवल्याच्या जवळपासच्या गावांमध्ये जाऊन पैसे देऊन गाई सोडवून आणत आणि त्यांची उत्तम देखभाल करीत. महाराज समोर दिसताच सगळ्या गाई देखील दावे तोडून त्यांच्याकडे धावत येत. श्रीमहाराजांना आळसाचा आणि आळशी माणसांचा तिटकारा होता. सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत त्यांचे काम चालूच असे. "आळसाने आयुष्य फुकट जाते. आळस, दैन्यपणा आणि कपटीपणा या तीन करंटेपणाच्या खुणा आहेत. त्यांच्यापासून माणसाने दूर राहावे", असे ते आवर्जून सांगत.
सोपे तत्त्वज्ञान -
श्रीमहाराजांचे तत्त्वज्ञान अगदी सोपे ; अखंड रामनाम घ्यावे आणि भक्तवत्सल रामरायाला शरण जाऊन, आपला कर्तेपणा टाकून तो ठेवील तसे राहावे, ही त्यांची सोपी मांडणी. नाम हाच श्वास झाला पाहिजे, असे त्यांचे सांगणे होते. एखादा नाम घेतो म्हणाला तर ते त्याला हवे तसे वागत, काय पाहिजे ते देत, पण रामरायाचे प्रेमाने नाम घे असे म्हणत असत. त्यांनी भारतभर प्रचंड भ्रमंती करून अनेक मंदिरांची स्थापना केली. उपासना चालू करून दिली. त्यांनी लावलेले ते रामनामाचे सुवर्णबीज आज उभ्या जगाला सावली देणाऱ्या महाकाय वटवृक्षात परिणत झालेले आपल्याला पाहायला मिळते.
संत हेच खरे लोकशिक्षक असतात. समाजाची नाडी पारखून जसे व जेवढे रुचेल-पचेल तेवढेच ते लोकांच्या गळी उतरवतात व सहज बोलून, प्रेमाने आपलेपणा निर्माण करून  समाजाचा उद्धार करतात. श्रीमहाराज देखील असेच परिपूर्ण लोकशिक्षक होते. समर्थ श्री रामदास स्वामींना अभिप्रेत असणारी सर्व महंत लक्षणे त्यांच्याठिकाणी पूर्ण बहरलेली होती. त्यांनी प्रेमाने रूजवलेले रामनामाचे, गोरक्षणाचे आणि अन्नदानाचे रोपटे दीडशे वर्षे झाली, मोठ्या भव्य-दिव्य स्वरूपात गोंदवल्यात आजही नांदते आहे. यावरून त्यांच्या दूरदृष्टीची आणि त्यामागच्या अथक प्रयत्नांची कल्पना करता येईल.
श्रीमहाराज निरूपण फार छान करीत. त्यांची प्रेमळ वाणी रामनामाच्या अखंड अनुसंधानाने प्रभावी झालेली होती. ते अनेक मार्मिक गोष्टींची सुरेख योजना करीत करीत आपले म्हणणे श्रोत्यांच्या मनावर बिंबवत असत. सोपी भाषा वापरून आणि वेदान्ताची विद्वज्जड शब्दरचना टाळून केलेले सहज समजेल-उमजेल असे त्यांचे निरूपण विलक्षण प्रभावी ठरे. त्यांच्या अभंगरचनाही अत्यंत सुंदर आहेत. ते 'दीनदास' या नाममुद्रेने अभंगरचना करीत असत. त्यांनी आजन्म रामनामाचा आणि रामभक्तीचा प्रचार - प्रसार निरलसपणे केला.
श्रीमहाराजांची संकलित केलेली प्रवचने ही इतकी लोकप्रिय होण्याचे श्रेय त्यांच्या सोपेपणातच आहे. आज त्या ग्रंथाच्या असंख्य आवृत्त्या निघालेल्या असून सोशल मिडियावरूनही हजारो ग्रूप्स मध्ये ही प्रवचने दररोज वाचली जातात. कोणत्याही संप्रदायाचा माणूस असो, जो ही प्रवचने आवडीने वाचतो त्या प्रत्येकाला आपापल्या साधनेत व दैनंदिन जीवनात त्यांचा खूप लाभ होतो, अशीच या प्रवचनांची खासियत आहे.
( http://rohanupalekar.blogspot.in )
श्रीमहाराजांच्या चरित्राचा विशेष म्हणजे, रामरायाला पूर्ण शरणागत होऊन राहिल्यामुळे प्राप्त होणारा अद्भुत विश्वास आणि अलौकिक पारमार्थिक अधिकार यांचे साक्षात् दर्शन ! त्यांनी एवढे प्रचंड कार्य केले. लाखो लोकांना राम भजनाला लावले. अनेकांचे संसार चालवले. गोशाळा बांधल्या, मंदिरे स्थापली ; पण या कशाचेही कणभरही श्रेयही त्यांनी कधीच घेतले नाही. ही सगळी रामरायाची आणि आपले सद्गुरु श्री तुकामाईंचीच कृपा आहे, अशीच त्यांची आजन्म सप्रेम भावना होती.
काही विलक्षण हकिकती -
श्रीमहाराजांचे समग्र चरित्र अत्यंत अद्भुतच आहे. महासागरातील रत्नांची गणना कशी करणार ? पण तरीही त्या देदीप्यमान रत्नांमधील एक-दोन रत्ने पाहिली तरी समाधान तेवढेेच लाभते. या न्यायाने आपण महाराजांच्या अतिशय बोधप्रद अशा दोन हकिकती पाहूया.
एकदा महाराजांची दाढी करता करता त्यांचे नाभिक त्यांना म्हणाले, "महाराज, तुमची आठवण म्हणून ही चांदीची वाटी मला जवळ ठेवावीशी वाटते." क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी दाढीचे पाणी ठेवण्याची ती चांदीची वाटी डाव्या हातानेच उचलून त्याला देऊन टाकली. महाराजांनी वाटी डाव्या हाताने दिली याचे त्या नाभिकांना वाईट वाटले. त्यांनी नाराजी व्यक्त करताच श्रीमहाराज म्हणाले, "अरे, मनाचा भरवंसा कसा द्यावा ? डाव्या बाजूची वाटी उजव्या हाताने घेऊन देईपर्यंत जर माझ्या मनाने विचार बदलला तर ? म्हणून मी देण्याचे मनात आल्याबरोबर तात्काळ देऊन टाकली ती वाटी !" महात्म्यांचे अंतःकरण किती विलक्षण असते आणि दानशूरतेसारखे त्यांचे दैवी सद्गुुणही किती पराकोटीचे असतात, त्याचा हा फार उत्तम नमुना म्हणायला हवा.
अखंड कसलीतरी काळजी करत बसणे, हा मनुष्यस्वभावच आहे. संतांचे काम मात्र यापेक्षा वेगळे असते. त्यांचा भगवंतांवर दांडगा विश्वास असल्याने त्यांना कधीच कसलीच काळजी नसते. त्या विश्वासापायी भगवंतच त्यांची सर्व काळजी वाहत असतात. या संदर्भातच एकदा श्रीमहाराजांचे व भक्त मंडळींचे बोलणे चालू होते. शेवटी असे ठरले की, उद्या स्वयंपाक करायचाच नाही, पण शंभर जोडपी जेवायला घालायचा संकल्प सोडायचा, पाहू रामराया काय करतो ते ! महाराज या परीक्षेला लगेच तयार झाले.
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी लोक मंदिरात जमले. श्रीमहाराजांचे प्रवचन झाले, बारा वाजले, एक वाजला, लोकांची चुळबुळ सुरू झाली. महाराज निश्चिंत मनाने नामस्मरण करीत बसलेले होते. दुपारी दोनच्या सुमारास एक बैलगाडी दारासमोर येऊन थांबली व त्यातून एक भक्त उतरले. महाराजांकडे येऊन म्हणाले, "मी आपल्याला नवस केला होता की, यावेळी जर मला मुलगा झाला तर रामरायाला दोनशे माणसांचा नैवैद्य करीन. त्यानुसार मला मुलगा झाला. पण त्या आनंदात नवस फेडायचा मी विसरूनच गेलो. काल बायकोने आठवण करून दिली व आज सगळे सामान घेऊन आलो आहे. तेवढा नैवेद्य आज करायला सांगा." त्याचे बोलणे ऐकताच महाराज उठले आणि 'जानकीजीवनस्मरण जय जय राम ।' म्हणत त्यांनी रामरायाला दंडवत घातला.
लोकांनी सामान उतरवून स्वयंपाक केला आणि बोलावलेली शंभर जोडपी सुग्रास जेवली. आदल्या दिवशीची मंडळी खजील होऊन म्हणाली, "धन्य आहे तुमची आणि तुमच्या निष्ठेची, खरोखरीच रामरायालाच सगळी काळजी असते !" इतकी अनन्य निष्ठा असेल तर भगवंतच त्या भक्ताचा योगक्षेम वाहतात. भगवद् गीतेत त्यांनी तसे वचनच देऊन ठेवलेले आहे.
श्रीमहाराजांनी अखंड रामनाम घेतले आणि लाखो भक्तांना घ्यायला लावले. आजही त्यांचे ते कार्य चालूच आहे. त्यांचा जन्म नामासाठी झाला आणि त्यांनी नामच श्वास मानून त्या नामातच अखंड वास्तव्य केले. आपल्या त्या चिरंतन अस्तित्वाने ते भक्तांचा सर्वतोपरी सांभळ करीत आहेत व पुढेही करीत राहतीलच. आपले भगवत्प्रदत्त कार्य करून, मार्गशीर्ष कृष्ण दशमी, दि.२२ डिसेंबर १९१३ रोजी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी, "जेथे नाम तेथे माझे प्राण ।" असे म्हणून या अलौकिक अवतारी विभूतिमत्वाने आपला देह ठेवला. लौकिक देहत्यागानंतरही त्यांचे भक्तोद्धाराचे कार्य अक्षुण्णपणे आजही चालू आहे व पुढेही चालू राहीलच.
आमच्या परंपरेतील सर्व महात्म्यांना ; प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज, प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज, प.पू.सद्गुरु सौ.शकाताई आगटे आणि प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे या सर्वांना सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराजांबद्दल अतीव प्रेमादराची भावना आहे. प.पू.श्री.मामा प्रतिवर्षी महाराजांच्या पुण्यतिथीला गोंदवल्याला दर्शनाला जात असत. पू.श्री.मामांनी देहत्याग केल्यानंतरही ते दर्शनाला गेल्याची विलक्षण हकिकत 'स्मृतिप्रसंग' ग्रंथात नोंदवलेली आहे. प.पू.सौ.शकाताईंना श्रीमहाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिले होते, दहिवडीपर्यंत बसमधून सोबत प्रवासही केला होता. ही रोमांचकारी हकिकत पू.सौ.ताईंच्याच श्रीमुखाने आम्ही काहीजणांनी ऐकलेली आहे. हा प्रसंग 'अमृतबोध' मासिकातून पूर्वी प्रकाशितही झालेला आहे. या सर्व महात्म्यांच्या प्रवचनसेवांमध्ये वारंवार श्रीमहाराजांच्या कथा सांगितल्या गेलेल्या आहेत.
सद्गुरु श्रीसंत गोंदवलेकर महाराजांच्या श्रीचरणीं आजच्या या जयंतीदिनी अनंत दंडवत प्रणाम !!
जयाचा जनीं जन्म नामार्थ झाला ।
जयाने सदा वास नामात केला ।
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

5 Feb 2020

माघी वारी : श्री हरिबुवा एकादशी


आज माघ शुद्ध एकादशी, पंढरपूरची माघी वारी !
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज ज्यांना गुरुस्थानी मानत असत, त्या फलटण नगरीच् भूषण महायोगी श्रीसंत हरिबाबा महाराजांची आज १२२ वी पुण्यतिथी ! 
श्रीसंत हरिबाबा महाराज हे अवलिया सत्पुरुष होते. त्यांच्या जन्मापासूनचे पूर्ववृत्त काहीच माहीत नाही. इ.स.१८७५ साली अाश्विन महिन्याच्या शुद्ध द्वादशीला ते फलटणच्या उघड्या मारुती मंदिरात प्रथम प्रकटले. त्याआधी काही काळ ते नातेपुते, शिखरशिंगणापूर, माळेगाव, पणदरे इत्यादी गावांमधून राहात होते. मात्र इ.स.१८७५ पासून त्यांचे २४ वर्षे याच पुण्यभूमीत वास्तव्य झाले. त्यांच्या चरित्रातील हकिकती अत्यंत अलौकिक असून भक्तांची श्रद्धा वाढविणाऱ्या आहेत. आजही श्रीसंत हरिबुवा महाराजांच्या कृपेचे अद्भुत अनुभव भाविकांना येत असतात. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी श्रीहरिबाबांचे "विभूती" नावाने अप्रतिम चरित्र लिहिलेले आहे. त्याची लिंक खाली देत आहे. हे सुरेख चरित्र सर्वांनी आवर्जून वाचावे ही विनंती. 
श्रीसंत हरिबाबा महाराजांनी इ.स.१८९८ मध्ये आजच्या तिथीला समाधी घेतली. त्यांचे भव्य समाधी मंदिर फलटणला बाणगंगा नदीच्या काठावर उभे आहे. प.पू.श्री.काका दररोज या मंदिरात दर्शनाला जात असत व आपल्याकडे आलेल्या सर्व भक्तांनाही आवर्जून श्री हरिबुवा महाराजांच्या दर्शनाला पाठवीत असत. प.पू.श्री.काकांनी श्रीसंत हरिबुवा महाराजांची सुरेख पितळी मूर्ती बनवून घेऊन त्यांच्या समाधीच्या मागे तिची स्वहस्ते स्थापना केलेली आहे. लेखासोबतच्या फोटोमध्ये त्याच श्रीमूर्तीचे आपल्याला दर्शन होत आहे.
आजच्या एकादशीला फलटण पंचक्रोशीत मोठ्या आदराने "हरिबुवांची एकादशी" असे संबोधले जाते. त्यांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी आज प्रचंड गर्दी असते. राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य परंपरेतील महान अवधूत विभूतिमत्व श्रीसंत हरिबाबा यांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
'विभूती' चरित्राची लिंक'
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481