25 Jul 2020

श्रीसंत दासराम महाराज केळकर पुण्यतिथी



आज दि.२५ जुलै, श्रावण शुद्ध षष्ठी ; याच तिथी आणि तारखेला एकोणीस वर्षांपूर्वी सांगली येथील थोर अधिकारी महात्मे, चिमड संप्रदायातील ज्ञानी सत्पुरुष प.पू.श्री.रामराय गोविंद तथा प.पू.श्री.दासराम महाराज केळकर यांनी आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली. त्याही दिवशी सूर्योदयाला नागपंचमी असून संध्याकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी, त्यांच्या देहत्यागसमयी षष्ठी लागलेली होती. आज त्यांच्या एकोणिसाव्या पुण्यतिथीला तेच सर्व योग जुळून आलेले आहेत. शिवाय अजून एक विशेष योग म्हणजे, यंदाचे वर्ष हे श्रीसंत दासराम महाराजांचे जन्मशताब्दीचे वर्ष आहे.
श्रीसंत दासराम महाराजांच्या 'चैतन्याचा महामेरू' या जन्मशताब्दी गौरवग्रंथातील 'तत्त्वार्थींचा देखणा पायाळू' या आपल्या सर्वांगसुंदर लेखात, श्रीसंत दासराम महाराजांचा गौरव करताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे म्हणतात, "वेळोवेळी घडून आलेल्या सर्व दर्शनभेटींमधून प.पू.श्री.दादांचे संतत्व, चित्तावर नि:संशयपणे वज्रलेपासारखे ठसत गेले. त्या सर्व मंगलस्मृतींनी आजही सात्त्विक भाव अंत:करणात दाटून येतात. प.पू.श्री.दादांचे सारे व्यक्तिमत्व हे शास्त्रोक्त 'संतपदवी'चेच एक मूर्तिमंत उदाहरण होते. ते उत्तम कवी, लेखक, वक्ते होते. अनेक सद्गुण त्यांच्या ठायी दाटीवाटीने वस्तीला राहिलेले होते. आत्यंतिक साधेपणा, आत्यंतिक विनम्रता आणि अपार सद्गुरुप्रेम, भगवत्प्रेम यांनी ते नखशिखांत विनटलेले असत. त्यांचा सहवास भाविकाला शांत, तृप्त करून सोडणारा असे ; मग भले ते त्याच्याशी काही बोलोत अगर न बोलोत. त्यांची दृष्टी नेहमी अंतर्मुख असे. देहाच्या अस्तित्वाची त्यांना जाणीव नसे. आपल्याच आनंदात ते जेव्हा मधूनच हसत, तेव्हा त्या हास्यातूनही त्यांच्या अंत:करणातील  भगवत्प्रेम बाहेर पाझरत असे. त्यांची सगळी देहबोलीच ज्ञानी भगवद्भक्ताची होती. खरोखरीच असे महात्मे दुर्मिळ ; हल्ली तर दृष्टीस पडणेही कठीण !
प.पू.श्री.दादांनी आयुष्यभर सर्वभावे सद्गुरुसेवा केली. त्याचबरोबर निष्ठापूर्वक सद्गुरुप्रदत्त साधनाही केली. त्यामुळे श्रीमहाभारतात म्हटल्याप्रमाणे 'ज्ञान' आणि 'शांती' या दोहोंची सहजप्राप्ती त्यांना झालेली होती.  प.पू.श्री.दादा महाराजांनी सद्गुरुआज्ञेनुसार सांगली नगरीत ज्ञानगंगा अखंड प्रवाहित ठेवून या नगरीला पुण्यभूमी केलेले आहे. अनेक श्रांतांना, क्लांतांना प्रेमाचा आधार देऊन शांतविले आहे. आपल्या अखंड, सप्रेम कीर्तनसेवेने सद्गुरुपरंपरेला व श्रीभगवंतांना तोषविले आहे. प.पू.श्री.दादा हे आधुनिक काळातील ज्ञानोत्तर भक्तीचे श्रेष्ठ, सर्वज्ञ, सामर्थ्यसंपन्न असे आचार्यच होते !"
सांगलीच्या केळकर घराण्यात पूर्वापार भगवद्भक्तीचा आणि संतसेवेचा उत्तम वसा जोपासलेला आहे. पू.श्री.दासराम महाराजांचे आजोबा श्री.अंताजीपंत केळकर परमशिवभक्त होते. त्यांना श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी प्रसाद म्हणून दिलेला रुपया आजही केळकरांच्या देवघरात पूजिला जातो. तर आजी सौ.लक्ष्मीबाई केळकर या श्रीसंत ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अनुगृहीत होत्या. पू.श्री.दासराम महाराजांचे वडील, पू.श्री.गोविंदराव तथा पू.मामामहाराज केळकर हे चिमड संप्रदायातील आदरणीय सत्पुरुष होते. सांगलीतील श्रीसंत तात्यासाहेब कोटणीस महाराजांकडील अखंड कीर्तनसेवेने प्रभावीत होऊन, पू.श्री.मामा केळकरांनीही १९२४ साली अखंड कीर्तनसेवेचा वसा घेतला. ईशकृपेने तो आज ९५ वर्षे झाली केळकरांच्या तीन पिढ्यांनी अव्याहत चालू ठेवलेला आहे. 
पू.श्री.मामा महाराज केळकर व पू.सौ.इंदिराबाई या दांपत्याच्या पोटी अधिक श्रावण कृष्ण षष्ठी, दि.६ ऑगस्ट १९२० रोजी कुरुंडवाड मुक्कामी पू.श्री.दासराम महाराजांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या चौदाव्या दिवशी श्रीसंत तात्यासाहेब कोटणीस महाराजांनी मांडीवर घेऊन या लहानग्या बाळाच्या मस्तकावर हस्तस्पर्श करून आपल्या कृपेची छाया घातली. "हा बाळ आमचाच असून लहानपणापासूनच कीर्तन करील. याचे नाव 'राम' ठेवा !" असा आशीर्वादही बाळाला मिळाला. 
लहानग्या रामरायाची दिव्य लक्षणे सर्वांना लवकरच पाहायला मिळाली. वयाच्या पाचव्या वर्षापासून रामराया कीर्तनसेवा करू लागले. सातव्या वर्षी त्यांना काव्यस्फूर्ती होऊ लागली. नवव्या वर्षी 'रामदासबोध' नावाचा १३ समास व १६९ ओव्यांचा लघुग्रंथ त्यांच्याकडून निर्माण झाला. पुढे मग आयुष्यात त्यांच्याकडून असंख्य आरत्या, संतचरित्रे, पदे व अभंग रचले गेले. 'श्रीदासराम गाथा' या ग्रंथात अशा विविध प्रसंगी त्यांच्याकडून रचल्या गेलेल्या १९५२ रचना प्रकाशित झाल्या आहेत. याशिवाय अनेक ओवीबद्ध ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.
पू.श्री.दासराम महाराजांच्या बालपणीचा एक प्रसंग फारच बोलका आहे. लहानगा रामराया आपल्या वडिलांना एकदा म्हणाला की, "मला रामरायाचे दर्शन घडवा !" पू.श्री.मामा महाराज म्हणाले, "येत्या शनिवारी रामदर्शन घडेल !" हे ऐकल्यावर रामराया एकदम खूश झाला व त्याने 'रामप्रभू येणार' म्हणून सगळे घर सजवायला घेतले. शनिवारी एक वानर दारात आले. त्याला पाहून पू.मामा म्हणाले, "वानरसेना आली, आता रामराया पण येणार". आणि खरोखर पू.श्री.मामामहाराजांनी बाल रामरायाला आकाशात श्रीरामदर्शन करविले. आपल्या वडिलांच्या शब्दावर विश्वासून बाल रामरायाने श्रीरामदर्शनाच्या उत्कंठेने सगळी तयारी सुद्धा केली होती. मग श्रीरामप्रभू का बरे मागे राहतील ? निष्ठेचे फळ त्यांनीही मग प्रेमाने प्रदान केले. संत हे असे सुरुवातीपासूनच अलौकिक असतात.
पू.श्री.दासराम महाराजांवर भगवान श्री निंबरगीकर महाराजांचा विशेष कृपालोभ होता. श्रीगुरुलिंगजंगम निंबरगी महाराजांनी विविध प्रसंगी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन ; कानडी, संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषेतील अभंग, आरत्या, श्लोक तसेच पदे अशा माध्यमातून बोध केला होता. ही सर्व पदे श्री.दासराम महाराजांना 'श्रुत' झाली, म्हणजे ऐकावयास मिळाली. १९८५ पर्यंत ह्या पदांची एकूण संख्या २२८ एवढी झाली. ती सर्व पदे 'श्रीगुरुलिंगगीता' या नावाने प्रकाशित झालेली आहेत. निंबरगी संप्रदायाच्या मूल तत्त्वज्ञानचे समग्र दर्शन त्यातून होते.
पू.श्री.दासराम महाराजांना सगळे 'दादा' म्हणत असत. त्यांच्या स्वभावात अपार मार्दव होते, ते कधीच कोणावर चिडत नसत. सदैव आपल्याच आनंदात रममाण होऊन राहात असत. ते पूर्ण निरहंकार महात्मे होते. त्यांच्याठायी अनन्य गुरुभक्ती आणि अलौकिक नम्रता पूर्ण पैसावलेली होती. त्यांना संतसेवेची फार आवडी होती. त्यांच्या 'श्रीरामनिकेतन' या वास्तूत कोणी साधुसंत आले की ते स्वत: प्रेमार्द्र होऊन, "साधु गृहाप्रति आले । भले सार्थक झाले ॥" हा अभंग म्हणून त्यांचे स्वागत करीत असत. 
आमच्या प.पू.श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे व प.पू.श्री.दासराम महाराजांचे अगदी सख्ख्या बंधूंसारखे प्रेमसंबंध होते. पू.श्री.मामा सांगलीला जाणाऱ्या आपल्या शिष्यांना आवर्जून पू.श्री.दासराम महाराजांचे दर्शन घेऊन यायला सांगत असत. तसेच पू.श्री.दासराम महाराजही आपल्या शिष्यांना पुण्याला पू.श्री.मामांकडे पाठवीत असत. पू.श्री.दासराम महाराजांनी पू.श्री.मामांवर रचलेली "आरती श्रीपादा, जयजया प्रसिद्धा । दत्तप्रभू जन्म घेती, नवल हे बहुसिद्धा ॥" ही सुंदर आरती आमच्या श्रीपाद सेवा मंडळाच्या 'नित्यउपासनाक्रमा'त समाविष्ट केलेली आहे.
माझे पणजोबा, प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांबद्दलही पू.श्री.दासराम महाराजांना फार प्रेमादराची भावना होती. मी १९९७ साली सांगलीला पू.श्री.दासराम महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो. तेव्हा पू.श्री.गोविंदकाकांचा पणतू म्हणून त्यांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून मला भरभरून आशीर्वाद दिले होते. त्यावेळी गहिवरून येऊन, अतीव प्रेमादराने ते प.पू.श्री.काकांविषयी दोन शब्द बोललेही होते.
पू.श्री.दासराम महाराजांचे पन्नासच्या वर प्रकाशित झालेले ग्रंथ सांगलीच्या त्यांच्या निवासस्थानी उपलब्ध आहेत. www.dasram.org या संकेतस्थळावर त्यातले काही ग्रंथ आपण पाहू शकता. आत्मानुभूतीचा प्रसन्न आविष्कार असणारे हे सर्व ग्रंथ साधकांना परमार्थाचे मौलिक मार्गदर्शन करणारे दीपस्तंभच आहेत. 
दि.२५ जुलै २००१, श्रावण शुद्ध षष्ठीला सायंकाळी पू.श्री.दासराम महाराजांनी कृतार्थतेने आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली. घेतलेला कीर्तनसेवेचा वसा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मनापासून सांभाळला. आजही सांगलीच्या गांवभागातील 'श्रीराम निकेतन' या पवित्र वास्तूच्या कणाकणात त्यांचे चिन्मय अस्तित्व भरून राहिलेले आहे, भाविक-भक्तांना आपला अमोघ कृपाप्रसाद प्रेमाने प्रदान करीत आहे. 
ज्ञानोत्तरभक्तीचे थोर आचार्य असणाऱ्या श्रीसंत रामराय गोविंद तथा प.पू.श्री.दासराम महाराज केळकर यांच्या पावन श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग प्रणिपात.
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

4 Jul 2020

वै.ह.भ.प.पू.सोनोपंत तथा पू.मामासाहेब दांडेकर - पुण्यस्मरण



वारकरी संप्रदायातील अत्यंत आदरणीय व थोर विभूतिमत्व प्राचार्य श्री.शंकर वामन तथा सोनोपंत दांडेकर हे वारकरी मंडळींमध्ये सोनुमामा म्हणूनच जास्त प्रसिद्ध होते. अत्यंत नेटका वेष, तेवढीच मार्मिक व नेटकी भाषा आणि शुद्ध सात्त्विकतेने प्रफुल्लित झालेला चेहेरा ही पू.मामासाहेबांची वैशिष्ट्ये होत. ते कीर्तनाला उभे राहिले की साक्षात् श्री तुकोबारायच कीर्तन करीत अाहेत असा भास होत असे. 
पू.सोनुमामांचा जन्म २० एप्रिल १८९६ चा. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या नू.म.वि. मधून झाले. ते १९१७ साली बी.ए. व १९१९ साली तत्त्वज्ञान विषय घेऊन एम.ए. झाले. त्यांचे श्रीगुरु पू.विष्णुबुवा जोग महाराजांनी १९१७ साली आळंदीत वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. पू.सोनुमामा तेथील विद्यार्थ्यांना शिकवू लागले. तसेच न्यू पूना कॉलेज अर्थात् सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ते प्रोफेसर म्हणून रुजू झाले. स.प.चे प्राचार्य म्हणून १९५१ साली ते निवृत्त झाले.
वै.जोग महाराजांनी देहत्यागापूर्वी आपल्या शिष्यांना विचारले की, "माझ्या गळ्यातील नैष्ठिक ब्रह्मचाऱ्याची तुळशीमाळ कोण पुढे चालवणार ?" क्षणाचाही विलंब न लावता अवघ्या बावीस-तेवीस वर्षांच्या सोनोपंतांनी आदरपूर्वक आपले मस्तक समोर झुकवले व ती पावन माळ धारण केली. आणि आपल्या गुरूंना दिलेल्या शब्दाला जागून आजन्म नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन केले.
वै.पू.मामासाहेब दांडेकर हे पंढरीचे निष्ठावंत वारकरी होते. ते एक रुपयाही बिदागी न घेता सर्वत्र कीर्तन-प्रवचनसेवा करीत असत. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांची सार्थ ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीची सुदीर्घ प्रस्तावना आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास हे खूप मान्यता पावलेले ग्रंथ आहेत. स.के.नेऊरगावकर यांनी लिहिलेले पू.मामासाहेबांचे चरित्र अतिशय सुंदर आहे. आजच्याच तिथीला ; आषाढ कृष्ण चतुर्दशीला ; दि.९ जुलै १९६८ रोजी पू.मामासाहेब दांडेकरांनी पुण्यात देहत्याग केला. असे म्हणतात ; त्यांची अंत्ययात्रा एवढी मोठी होती की, त्यांचे पार्थिव आळंदीत पोचले तेव्हा त्या यात्रेतले शेवटचे लोक अजून पुण्यातच होते. यावरून त्यांना लाभलेला जनमानसाचा प्रचंड आदर व आधार स्पष्ट दिसून येतो.
वै.पू.मामासाहेब दांडेकरांच्या देहत्यागाचा प्रसंग त्यांच्या चरित्रात नोंदवलेला आहे. पुण्यातील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.यशवंतराव फाटक यांच्या दवाखान्यात त्यांचे देहावसान झाले. त्या प्रसंगाच्या एक साक्षीदार होत्या विश्वविख्यात संत प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या उत्तराधिकारी प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे. पू.सौ.ताईंच्याच श्रीमुखातून वै.मामासाहेब दांडेकरांच्या देहत्यागाचा विलक्षण प्रसंग आम्हांला ऐकायला मिळाला होता, तो आजच्या त्यांच्या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर आपल्याला कथन करीत आहे.
प.पू.सौ.ताई सांगत असत तो प्रसंग वै.मामांच्या चरित्रात नोंदलेला नाही. कारण प्रत्यक्षात तो प्रसंग सूक्ष्म प्रतलावर, अलौकिक स्तरावर घडलेला होता. त्यामुळे तो आपल्यासारख्या सामान्यांच्या चर्मचक्षूंना दिसण्याचा प्रश्नच येत नाही.
( https://rohanupalekar.blogsopt.com )
तेव्हा पू.वै.मामासाहेब डॉ.फाटकांच्या दवाखान्यात अॅडमिट होते. पू.सौ.शकाताईंचा लहानपणापासूनच डॉ.फाटकांशी खूप घरोबा होता. ते त्यांचे फॅमिली डॉक्टर होतेच. पुढे त्यांचे नातेही निर्माण झाले, कारण डॉ.फाटकांची धाकटी कन्या पू.सौ.ताईंच्या धाकट्या भावाची पत्नी झाली. वै.मामासाहेब अॅडमिट असताना ९ जुलैच्या सकाळी डॉ.फाटक तथा दादा पू.सौ.ताईंना म्हणाले की, "मी जरा हॉस्पिटलमध्ये राऊंडला जाऊन येतो, तोवर तू या खोलीच्या बाहेर थांब. कोणाला आत जाऊ देऊ नकोस. पू.मामासाहेब आत विश्रांती घेत आहेत !" पू.सौ.ताई 'ठीक आहे दादा' म्हणून तिथेच एका स्टुलावर बसून राहिल्या. 
थोड्याच वेळात एक खेडवळ दिसणारे पण अत्यंत तेजस्वी असे गृहस्थ जिना चढून आले व सरळ त्या खोलीत जाऊ लागले. पू.सौ.ताईंनी त्यांना अडविले व सांगितले की, आत कोणालाही सोडायचे नाही अशी डॉक्टरांची ताकीद आहे. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, "आम्हांला कधीपासून कोणाच्या परवानगीची गरज पडू लागली ?" त्यांच्या या उत्तराने चमकून पू.सौ.ताईंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि त्या एकदम आश्चर्यचकितच झाल्या. कारण ते प्रत्यक्ष भगवान श्रीपांडुरंग होते. पू.सौ.ताईंवर श्रीभगवंतांची जन्मापासूनच पूर्णकृपा असल्याने, त्यांना श्रीभगवंतांचे सतत प्रत्यक्ष दर्शन व संवाद होत असे. 
एवढे होईपर्यंत श्रीभगवंत खोलीचे दार उघडून आत गेले व त्यांनी दार लावून घेतले. पू.सौ.ताईंना आत काय घडतंय याची फारच उत्सुकता लागून राहिली होती. त्यांच्या मनाची ती घालमेल जाणून श्रीभगवंत त्यांना हळूच म्हणाले, "तुम्ही खिडकीतून पाहा हवे तर !" पू.सौ.ताईंना खूप आनंद झाला. 
श्रीभगवंत आत गेले आणि पू.मामांच्या कॉटपाशी जाऊन उभे राहिले. समोर शांतपणे डोळे मिटून झोपलेल्या वै.पू.मामासाहेबांकडे त्यांनी वात्सल्यपूर्ण नजरेने पाहिले व त्यांच्या गालांवरून प्रेमाने दोन्ही हात फिरवीत म्हणाले, "सोन्या, ऊठ, मी आलोय !" त्या स्पर्शाने आणि मधुर हाकेने पू.मामासाहेब एकदम जागे झाले आणि समोर प्रत्यक्ष आनंदकंद भगवान श्रीपांडुरंगांना पाहून त्यांना अनावर प्रेम दाटून आले. कसेबसे हात जोडून ते म्हणाले, "पांडुरंगा, देवा ! आलास. मी वाटच पाहात होतो तुझी." यावर गोड हसत देव म्हणाले, "होय, आलो बघ. चल आता, आपल्याला जायचंय !" त्यावर भारलेल्या मनाने पू.मामासाहेबांनी होकार दिला ; आणि त्याक्षणी त्यांच्या कुडीतून प्राण बाहेर पडले व श्रीभगवंतांमध्ये विलीन झाले. प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथ आपल्या लाडक्या भक्ताला न्यायला आले होते. केवढे परमभाग्य हे !! जन्मभर केलेल्या निरलस सेवेचा हा अत्यंत अलौकिक महाप्रसादच साक्षात् श्रीभगवंतांनी स्वत: येऊन वै.पू.मामासाहेब दांडेकरांना दिला होता. अक्षरश: सार्थक झाले त्यांच्या आयुष्याचे !
प.पू.सौ.शकाताई हा प्रसंग फार प्रेमाने सांगत असत. त्यांनी वै.पू.मामांची कीर्तने देखील ऐकलेली होती. त्या म्हणत की, "वै.सोनुमामा कीर्तनाला उभे राहिले की प्रत्यक्ष श्री नामदेवराय किंवा श्री तुकोबारायच कीर्तन करीत आहेत, असेच वाटत राहायचे." 
ज्यांना शेवटी न्यायला प्रत्यक्ष श्रीपंढरीनाथ भगवान आले, त्या वारकरी संप्रदायातील या अत्यंत थोर विभूतीच्या, वै.पू.मामासाहेब दांडेकर महाराजांच्या श्रीचरणीं ५२ व्या पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग दंडवत !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481