24 Dec 2019

योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज

आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी, श्रीज्ञानेश्वरबंधू सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांचा समाधिदिन, श्रीसंत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी आणि सद्गुरु योगिराज श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांची जयंती ! या तिन्ही संतश्रेष्ठांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !!
मनापासून व प्रेमाने केलेले संतांचे स्मरण हे पूर्वीच्या पापाचा तर नाश करतेच ; पण त्याचबरोबर आपल्या अंत:करणात त्या महात्म्यांच्या कृपेची एक लहानशी ज्योतही लावते.  सद्बुद्धीची ही लहानगी ज्योत देखील उभे आयुष्य उजळून काढण्यास पुरेशी असते ; म्हणूनच तिला कधीच कमी लेखू नये, असे सद्गुरु भगवान श्री माउलींनी म्हटलेले आहे. याच उदात्त भूमिकेने आपणही वारंवार संतांच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या अलौकिक चरित्र व कार्याचा यथाशक्य आस्वाद घेऊन त्याद्वारे मनोभावे त्यांचे स्मरणही करीत असतो.
संतांवर श्रीभगवंतांचे अमर्याद प्रेम असल्याने त्यांचे स्मरण, पूजन, वंदन, सेवन आणि त्यांच्या बोधाचे व चरित्रलीलांचे मनन-चिंतन करणाऱ्या, त्यानुसार वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या भक्तावर आपोआपच श्रीभगवंतांची असीम दयाकृपा होत असते. हा या स्मरणाचा महालाभच म्हणायला हवा. एरवी कोणाही जोगा नसलेला, कशालाही बांधील नसलेला परमात्मा, संतांच्या सेवेने मात्र त्वरित आपलासा होतो, हे वैश्विक सत्य आपण कधीच विसरता कामा नये.
याच मनोभूमिकेने आजच्या पावन दिनाचे औचित्य असणाऱ्या या तिन्ही महात्म्यांच्या चरित्र व कार्यावर प्रकाश टाकणारा लेख खालील लिंकवर जाऊन आवर्जून वाचावा व आपल्या परमार्थप्रेमी सख्या-सुहृदांनाही वाचायला द्यावा ही विनंती.
योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराज हे साक्षात् भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच होते. त्यांच्या अतीव भावपूर्ण अशा दोन छोट्याच पण हृद्य लीला खालील लेखात कथन केलेल्या आहेत. आजच्या पुण्यदिनी त्यांचे वाचन करून त्यांच्या श्रीचरणीं प्रेमपुष्पांजली समर्पावी ही प्रार्थना !!
गुरुवरा ओवाळू आरती
https://rohanupalekar.blogspot.com/2017/12/blog-post_15.html?m=1
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

23 Dec 2019

स्वामी श्री स्वरूपानंद महाराज

आज मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपापरंपरेतील थोर सत्पुरुष, पावस येथील स्वामी श्री स्वरूपानंद महाराज यांची आज जयंती !
सद्गुरु श्री माउलींच्या कृपेने बहरलेले सारस्वत वैभव म्हणजे स्वामी स्वरूपानंद महाराज होत. म्हणूनच त्यांची वाङ्मयसंपदा ही अतिशय अलौकिक व सुरेख आहे. त्यांच्यावरील श्री माउलींचा वरदहस्त ठायी ठायी जाणवतोच.
श्रीसद्गुरुकृपेने लाभलेल्या आत्मानंदात, अद्वितीय सोऽहं बोधात नित्य निमग्न असणारा हा 'स्वरूपहंस' खरोखरीच आत्मतृप्त होता. त्याच बोधवृत्तीचे पावन अनुकार म्हणजे त्यांचे सुरेख वाङ्मय होय. साधकांसाठी त्या वाङ्मयाचे महत्त्व आणि माहात्म्य म्हणूनच अनन्यसाधारण आहे !!
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज, प.पू.सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराज व प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज या आमच्या तिन्ही परमादर्शांचे स्वामी श्री स्वरूपानंद महाराजांशी अतिशय हृद्य संबंध होते. परस्परांवर यांचे निरतिशय प्रेम होते. म्हणूनच आजच्या पावन दिनी स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या चरणीं सादर साष्टांग दंडवत करतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

स्वामी श्री स्वरूपानंद महाराजांचे चरित्र व कार्य, तसेच या महात्म्यांच्याशी असलेल्या हृद्य संबंधांवरील अल्पसे चिंतन, खालील लिंकवरील लेख उघडून आवर्जून वाचावे ही विनंती.
स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन
https://rohanupalekar.blogspot.com/2016/12/blog-post_25.html?m=1

9 Dec 2019

वाङ्मयी भगवन्मूर्ती भगवती श्री गीता

आज सूर्यसिद्धांत पंचांगानुसार मोक्षदा एकादशी, श्रीगीता जयंती !!
परिपूर्ण परब्रह्म भगवान श्रीकृष्णांनी भक्तराज अर्जुनाच्या मोहाचे निराकरण करण्यासाठी जो परमामृतमय उपदेश केला तोच भगवती श्री गीता होय. श्री गीतेला आजवरच्या सर्व आचार्यांनी, महात्म्यांनी व संतांनी परमश्रेष्ठ मानून गौरविलेले आहे. भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली तर श्री ज्ञानेश्वरीत ठायी ठायी गीतेची अलौकिक स्तुती करतात ; आणि तेच यथार्थही आहे.
"गीता गीता गीता असे नुसते तीनदा जरी म्हटले तरी त्या जीवावर भगवत्कृपा होते", असे श्रीसंत नामदेवराय म्हणतात. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत की, "गीता गीता गीता असे सलग म्हटले की 'त्याग त्याग त्याग' असे त्यातून ध्वनित होते व तोच गीतेचा खरा अर्थ आहे !" पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी आपल्या सांप्रदायिकांना घालून दिलेल्या दैनंदिन उपासनेत श्री गीतेचा आवर्जून समावेश केलेला आहे. श्री गीतेचे महत्त्व असे अनन्यसाधारण आहेच !
श्रीभगवंतांनी गीतेतून विविध मार्ग सुचवून मोक्षाची साधनेच आपल्यासमोर ठेवलेली आहेत, ज्याला जो रुचेल, पचेल, त्याने तो मार्ग अवलंबावा व मोक्षाप्रत जावे. म्हणून भगवती श्री गीतेचे अनुसंधान, चिंतन-मनन, पठण, पूजन, प्रदक्षिणा, लेखन, सेवन अशा विविध प्रकारे आपण दररोज श्री गीतेची सेवा केली पाहिजे. यातच आपले हित आहे.
आजच्याच पावन तिथीला, चतुर्थ श्रीदत्तावतार प.पू.सद्गुरु श्री माणिकप्रभू महाराजांनी हुमणाबाद येथे समाधी घेतली. श्रीसंत माणिकप्रभू महाराजांच्या सर्व रचना अतिशय प्रासादिक व भगवद्भक्तीचा परमोच्च आदर्श सांगणाऱ्या आहेत. त्यांचे चरित्रही फार विलक्षण आहे. सद्गुरु श्रीसंत माणिकप्रभू महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींनी वर्णिलेला श्री गीता महिमा खालील लिंकवरील लेखात थोडक्यात मांडलेला आहे. कृपया त्याचे वाचन-मनन करून श्रीभगवंतांचे शब्दमय स्वरूप असणाऱ्या भगवती श्री गीतेस मनोभावे दंडवत घालून, जसे जमेल तसे श्री गीता चिंतन करण्याचा, श्री गीतेचे यथाशक्य पठण, पूजन, वाचन करण्याचा आपण सर्वांनी निर्धार करू या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
गीता जाणा वाङ्मयी श्रीमूर्ति प्रभूची

https://rohanupalekar.blogspot.com/2016/12/blog-post_10.html?m=1

4 Dec 2019

श्रीस्वामीतनया - प.पू.सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे

अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या कृपापरंपरेतील महान विभूतिमत्व म्हणजे प.पू.सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे ; साक्षात् श्रीस्वामीतनया !!
राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामी महाराजांच्या मांडीवर बसून खेळण्याचे, त्यांच्याकडून प्रेमभराने कुरवाळून घेण्याचे व त्यांचा अमोघ कृपाहस्त शिरी मिरवण्याचे देवदुर्लभ सौभाग्य प्रेमादराने मिरवणारी ही त्यांची लाडकी लेक खरोखरीच अत्यंत अद्भुत आहे ! सद्गुरुकृपेने सदैव ब्रह्मभावातच विचरण करणाऱ्या मातु:श्री, श्री ज्ञानेश्वरीची ओवी न् ओवी अक्षरश: जगल्या. लौकिक अर्थाने लिहायलाही न येणाऱ्या मातु:श्रींच्या सर्वांगी भगवती ज्ञानदेवीच भरून राहिलेली होती, त्यांचे जीवनसर्वस्व झालेली होती. श्री ज्ञानदेवीची अलौकिक ज्ञानमयता त्यांचे पूर्ण अस्तित्वच व्यापून वर दशांगुळे उरलेली होती. त्यामुळेच त्यांनी अगदी साध्या साध्या उदाहरणांनी व सोप्या शब्दांत केलेला बोध उपनिषदांप्रमाणे श्रेष्ठतेला पावलेला आहे, आजही हजारो साधकांना अचूक मार्गदर्शन करीत आहे.
सद्गुरु श्री माउलींच्या, "जो अंतरीं दृढ । परमात्मरूपीं गूढ । बाह्य तरी रूढ । लौकिक जैसा ॥ज्ञाने.३.७.६८॥" या अमृतवचनाचे आरस्पानी नितळ आणि तेजस्वी प्रतिबिंब प.पू.मातु:श्रींच्या चरित्रात मूर्तिमान झालेले आपल्याला दिसून येते. सद्गुरु श्रीस्वामी महाराजांच्या कृपापरंपरेचे शांभव अद्वयानंदवैभवच प.पू.मातु:श्रींच्या रूपाने परिपूर्णतेने सगुणसाकार झाले होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अपरंपार सद्गुरुशरणागतीचा पुण्यपावन आविष्कार प.पू.मातु:श्रींच्या ठायी समग्रतेने झालेला होता. त्यांचे दिव्य चरित्रच याचे प्रत्यक्ष द्योतक आहे ; आणि म्हणूनच ते सर्व साधकांसाठी सतत प्रेरणादायी आहे, साधनेच्या मार्गावर दृढतेने अग्रेसर करणारे आहे. श्रद्धेने रोज त्याचे थोडे जरी परिशीलन केले, तरी साधनेतील समस्त विघ्नांचा आपोआप नाश होतो, अशी असंख्य साधकांची रोकडी प्रचिती आहे.
आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी, प.पू.मातु:श्री पार्वतीदेवींची ७८ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त या महान विभूतिमत्वाचे श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत प्रणाम !
प.पू.मातु:श्रींच्या पावन चरित्राचा मी स्वत: अनुभवलेला एक विलक्षण प्रत्यय व साधकांनी सदैव चिंतनात ठेवाव्यात अशा त्यांच्या चरित्रातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा ऊहापोह खालील लिंकवरील लेखात केलेला आहे. आजच्या पावन दिनी सर्वांनी त्याचे चिंतन करून प.पू.मातु:श्रींच्या श्रीचरणीं श्रद्धासुमने समर्पावीत ही मन:पूर्वक प्रार्थना.
खरोखरीच, या लेखात वर्णन केल्याप्रमाणे, श्री.कुलकर्णी यांच्यासारखीच प.पू.मातु:श्रींच्या करुणेची, अमोघ कृपेची प्रचिती आपल्यालाही आली, तर तो आपल्या परमार्थ-साधनेसाठी अत्यंत दिव्य अनुभवच ठरेल यात शंका नाही !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
प्रसन्न कृपाछाया 'श्रीस्वामीतनया'

https://rohanupalekar.blogspot.com/2016/12/blog-post.html?m=1

24 Nov 2019

भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी महोत्सव


आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी, परमाराध्य मायबाप भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांचा संजीवन समाधी दिन !
सद्गुरु भगवान श्री माउली हे साक्षात् भगवान श्रीकृष्ण परमात्माच आहेत. सद्गुरु श्री माउलींच्यानंतर आपल्याकडे झालेल्या आजवरच्या जवळपास प्रत्येक महात्म्याने आपल्या वाङ्मयात कुठे ना कुठे सद्गुरु श्री माउलींची स्तुती केलेलीच आहे. इतकी श्री माउलींची मोहिनी जबरदस्त आहे. जसे भगवान श्रीराम अद्वितीय, जसे भगवान श्रीकृष्ण अद्वितीय, जसे श्रीमदाद्य शंकराचार्य महाराज अद्वितीय ; तसेच सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजही एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्यासारखे तेच, अत्यंत अलौकिक व अद्भुत !
सद्गुरु श्री माउलींचे नुसते नाव जरी उच्चारले तरी आपल्या हृदयी प्रेमादराचे तरंग उठतात, त्यांच्याविषयीच्या निखळ प्रेमाचे, उत्कट श्रद्धेचे आणि अपूर्व गुरुभावाचे अनुकार आपले अंगांग व्यापून वर अष्टसात्त्विक भावांची मांदियाळी निर्माण करतात. आळंदीला कार्तिकी वारीत किंवा आषाढीच्या वारीत श्री माउलींच्या नामाचा गगनभेदी गजर जेव्हा होतो ना, तेव्हा आपण असेच अंगभर मोहरून येतो की बस ! हा अनुभव ज्याचा त्यानेच एकदातरी घ्यायला हवा. ज्यांच्या नामातच अज्ञानाचा निरास आहे, वेदान्ताचा परमअनुभव आहे आणि ज्यांच्या नामात पराभक्तीचा अपूर्व-मनोहर आविष्कार आहे, त्या कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती परमानंदकंद श्रीविठ्ठलप्राणजीवन भक्तहृदयसिंहासनविहारी अलंकापुराधिपती जगज्जीवन सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांच्या श्रीचरणीं त्यांच्याच ब्रह्मनामाच्या उच्चारात सहजतेने अापल्याला दंडवत घालता येतोय, हे तुम्हां आम्हां भाविकांचे केवढे मोठे भाग्य आहे. खरोखरीच, देवांनी आपल्याला सद्गुरु श्री माउलींच्या नंतर जन्माला घातले यातच सगळे आले ! देवदेवतांनाही दुर्लभ असे भगवान श्री माउलींचे दर्शन, त्यांचे नामस्मरण व त्यांच्या अवीट गोडीच्या सारस्वताचे अनुशीलन-अनुगमन आपण त्यामुळेच तर आज करू शकतोय. यासाठी सृष्टिकर्त्या परमात्म्याचे आपण सर्वजण जन्मजन्मांतरीचे ऋणाईत आहोत. मला आपल्या या भाग्याचा सदैव हेवा वाटतो.
सद्गुरु श्री माउलींच्या स्तुतिगायनात आज स्वर्गादि लोकांत, वैकुंठातही मोठमोठ्या महात्मांच्यात अहमहमिका लागलेली असेल, तिथे आपल्यासारख्यांनी काय मिजास मारावी हो ? पण आपण तर ही आपली मिराशी मानायला हवी, आपल्यावरचा भगवान श्रीजगन्नाथांचा हा महान उपकारच आहे की, आजच्या परमपावन दिनी आपल्याला ते सद्गुरु श्री माउलींचे स्मरण करून देत आहेत.
म्हणूनच आजच्या पावन दिनी, माझे सद्गुरुराज प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या दोन अभंगांच्या विवरणाच्या माध्यमातून मीही सद्गुरु श्री माउलींच्या सर्वार्थदायक अम्लान श्रीचरणकमलीं ही अल्पशी वाङ्मयसेवा समर्पून, आज त्यांच्याच स्मरणानंदात मौनावतो ! आपणही खालील लिंकवरील त्या लेखाचा आस्वाद घेऊन श्री माउलींच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक स्मरणसेवा समर्पावी ही प्रार्थना !
सरतेशेवटी श्रीज्ञानेश्वरकन्या सद्गुरु श्री गुलाबराव महाराजांच्या शब्दांत मायतात सद्गुरु भगवान श्री माउलींच्या चरणीं सप्रेम प्रार्थना करतो,
माझ्या समान न जनी अति पापकारी |
नाही तुम्हां समही पावन पापहारी |
यालागि पदकमले नमिते स्वभावे |
ताता तुम्हां दिसेल योग्य तसे करावे ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित

https://rohanupalekar.blogspot.com/2016/11/blog-post_27.html?m=1&fbclid=IwAR1ODJxjUixrE88dB562Bm2bxkJF8djqg6jEq537kxIHj4lEnMhdpxrJLdg



23 Nov 2019

नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा

आज कार्तिक कृष्ण एकादशी, उत्पत्ती एकादशी, भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिसोहळ्याची कार्तिकी आळंदी वारी  !!
अलं ददाति इति आलन्दि । अशी आळंदी शब्दाची फोड आहे. जी पुरे म्हणेपर्यंत देते ती आळंदी  ! अहो, भगवान श्री ज्ञानराय तर महान अवतार आहेतच, पण त्यांची पावन आळंदी नगरी देखील "जो जे वांच्छिल तो ते लाहो ।" हा श्री माउलींचाच अमृत-शब्द गेली साडेसातशे वर्षे पूर्ण करीत आलेली आहे. साक्षात् श्रीभगवंतांचेच अभिन्न स्वरूप असणाऱ्या श्री माउलींसारखेच अगाध व अचाट सामर्थ्य, त्यांचे चिरंतन अस्तित्व लाभल्याने ही अलौकिक नगरी देखील सर्वार्थाने अंगोअंगी मिरवीत आहे. प्रत्यक्ष श्री माउलींच्या एकमेवाद्वितीय संजीवन समाधीचे अधिष्ठान-माहेर लाभल्यास काय होणार नाही ? ज्यांच्या दारातला पिंपळही प्रत्यक्ष सुवर्णाचा आहे, त्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपासाम्राज्यात तर उणेपणाच कायमचा उणावलेला आहे  !!
आज आळंदीची कार्तिकी वारी. पहाटे पवमानपंचसूक्ताच्या अभिषेकाने उत्सवास सुरुवात होते. दुपारी श्री माउलींची पालखी नगर परिक्रमेस बाहेर पडते व हजेरी मारुती मंदिरात सर्व दिंड्यांच्या हजेऱ्या होऊन पालखी सोहळा पुन्हा मंदिरात परत येतो. द्वादशीला श्री माउलींची रथातून मिरवणूक निघते व गोपाळपुऱ्यापासून फिरून परत येते. त्रयोदशीला श्री माउलींचा समाधिउत्सव साजरा होतो. वारकरी संप्रदायात या उत्सवाला अतिशय महत्त्व आहे ! 
आळंदीचा व तिचे अक्षय अधिष्ठान असलेल्या श्री माउलींचा महिमा गाताना सर्व संत वेडावून जातात. श्रीसंत तुकोबाराय श्री माउलींविषयीच्या अत्यंत जिव्हाळ्याने, आळंदी क्षेत्री येऊन मनोभावे घेतलेल्या श्री माउलींच्या समाधिदर्शनाचे फल सांगताना शपथपूर्वक म्हणतात,
चला आळंदीला जाऊं ।
ज्ञानदेवा डोळां पाहूं ॥१॥
होतील संतांचिया भेटी ।
सुखाचिया सांगों गोष्टी ॥२॥
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।
मुखीं म्हणतां चुकती फेर ॥३॥
तुम्हां जन्म नाहीं एक ।
तुका म्हणे माझी भाक ॥४॥

अशा या परमपावन आळंदी तीर्थक्षेत्राचे आजचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण साक्षात् भगवान श्रीपांडुरंगांनीच स्वमुखे नामदेवरायांना सांगितले आहे की, "कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कृष्ण एकादशी ज्ञानोबांची. आम्ही कार्तिकात या एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबांच्या सोबतच असू !" श्रीभगवंतांचे हे अलौकिक माउली-प्रेम पाहून श्री नामदेवराय हर्षोत्फुल्ल होऊन धन्योद्गार काढतात,
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार ।
धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागीरथी मनकर्णिका वोघा ।
आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग ।
मिळालें तें सांग अलंकापुरी ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हें संत ।
झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥

"कार्तिक कृष्ण अष्टमीपासून ते त्रयोदशीपर्यंत जो कोणी माझ्या परमप्रिय श्री ज्ञानराज माउलींचे स्मरण, वंदन, पूजन, भजन, नमन, चरित्रगायन व नामस्मरण करेल, त्याच्यावर मी प्रसन्न होईन !" असा प्रत्यक्ष आनंदकंद भगवान श्रीपंढरीनाथांचाच आशीर्वाद आहे. म्हणूनच आजपासून त्रयोदशीपर्यंत सद्गुरु भगवान श्री माउलींच्या संजीवन समाधीस वारंवार साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचे प्रेमभावे स्मरण करू या. 
सद्गुरु श्री माउलींचे प्रिय भक्त प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी रचलेल्या 'श्रीज्ञानदेवाष्टका'मध्ये त्यांनी मोठ्या प्रेमादराने श्री माउलींचे चरित्र गायिलेले आहे. त्या प्रासादिक स्तोत्राचे प्रेमपूर्वक वाचन, चिंतन करून आपणही भगवान श्रीपंढरीश परमात्म्याचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घेऊ या व धन्य होऊ या  !!
॥ श्रीज्ञानदेवाष्टकम् ॥
महिंद्रायणीचे तटी जे आळंदी ।
दुजी पंढरीक्षेत्र लोकी प्रसिद्धी ।
असा घेतला तेथ जेणे विसावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥१॥
पिता विठ्ठल विख्यात रुक्माई माता ।
दयाशील दांपत्य नाही अहंता ।
तये पोटी न कां जन्म हा घ्यावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥२॥
कलीमाजी तारावया भाविकांना ।
सुविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ केला ।
समाधान जो देई गीतार्थ जीवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥३॥
चमत्कार नाना जगी दावियेले ।
पशूच्या मुखे वेदही बोलविले ।
असे थोर आश्चर्य वाटेचि जीवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥४॥
द्विजाच्या घरी श्राद्धकाळी जिवंत ।
करी जेववी पूर्वजाते समस्त ।
मुखी घालती अंगुली लोक तेव्हा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥५॥
अगा व्याघ्रयाने वृथा खेळताहे ।
पहा भिंत निर्जीव ही चालताहे ।
असे दाखवी लाजवी चांगदेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥६॥
नसे द्वैतबुद्धी दया सर्वभूती ।
अशी देखिली ती संतमूर्ती ।
नसे साम्य लोकी जयाच्या प्रभावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥७॥
महायोगी लोकी ऐसी प्रसिद्धी ।
आळंदीपुरी तोचि घेई समाधी ।
अशा ते न कां विश्वरूपी म्हणावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥८॥
वदे भक्तीने नित्य या भाविकांसी ।
भवाब्धि भये बाधिती ना तयासी ।
म्हणे दास गोविंद विश्वास ठेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥९॥
इति सद्गुरु श्री गोविंदकाका उपळेकर महाराज विरचितम् श्रीज्ञानदेवाष्टकम् संपूर्णम् ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )


18 Nov 2019

श्री शिवचिदंबर महास्वामी


आज कार्तिक कृष्ण षष्ठी,
शिवावतार भगवान श्री चिदंबर महास्वामींची जयंती !
सद्गुरु भगवान श्री चिदंबर महास्वामी हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप असे साक्षात् अवतारच होते. राजाधिराज भगवान सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम होते. श्री महास्वामींच्या लीला खरोखर विलक्षण आहेत. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या श्रीचरणीं साष्टांग दंडवतपूर्वक वंदन !
श्री चिदंबर महास्वामींच्या चरित्र व लीलांवरील अल्पसे चिंतन, खालील लिंकवर जाऊन आजच्या पावन दिनी आपण आवर्जून वाचावे ही विनंती.
शिवचिदंबर पाहि माम्
https://rohanupalekar.blogspot.com/2018/11/blog-post_28.html

12 Nov 2019

त्रिपुरान्तकाय नम: शिवाय

नमस्कार !!
आज त्रिपुरारि पौर्णिमा !
भगवान श्रीशिवांनी आजच्याच दिवशी अत्यंत मायावी अशा त्रिपुरासुराचा अनोख्या पद्धतीने वध केला होता. म्हणून आजच्या पौर्णिमेला 'त्रिपुरारि पौर्णिमा' असे नाव पडले.
या त्रिपुरासुराला भगवान ब्रह्मदेवांनी वर देऊन तीन नगरे प्रदान केली होती. ही नगरे स्वयंपूर्ण तर होतीच पण मायावी सुद्धा होती. ती कोणताही आकार घेऊ शकत, अदृश्य होत, आकाशातही उडू शकत असत. लोखंड, तांबे व सोन्याची ती तीन पुरे त्याच्या मालकीची असल्यामुळेच त्याला 'त्रिपुरासुर' हे नाव पडले. तो त्यांच्या बळावर अत्यंत माजला होता. मुळातच तो राक्षस असल्याने अहंकारी, विकृत तसेच दुष्टही होताच. त्याने साऱ्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग मात्र भगवान श्रीशिवांनी अत्यंत क्रोधाविष्ट होऊन विलक्षण सामग्री वापरून त्याचा वध केला.
त्यासाठी भगवान श्रीशिवशंकरांनी पृथ्वीचा रथ केला, त्याला सूर्य चंद्रांची दोन चाके होती.  भगवान ब्रह्मदेव त्याचे सारथी झाले. मेरू पर्वताचे धनुष्य व साक्षात् भगवान श्रीविष्णूंचा बाण केला व त्या एकाच बाणात तिन्ही नगरांसह त्रिपुरासुराचा वध केला. कारण एकाच बाणात ही तिन्ही पुरे नष्ट करावी लागतील असाच वर त्याने मिळवलेला होता.
तेव्हापासून त्रिपुरी पौर्णिमेला शिवपूजन करतात व शिवमंदिरात साडेसातशे त्रिपुरवाती लावून उपासना करतात. अनेक ठिकाणी या आनंदाप्रीत्यर्थ दीपोत्सवही साजरा केला जातो.
त्रिपुरीचा दीपोत्सव नुसता पाहिल्यानेही पाप नष्ट होऊन विशेष पुण्य लाभते असे म्हणतात. कांचीचे परमाचार्य श्रीमद् जगद्गुरु श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितले आहे की, "आजचा त्रिपुरी दीपोत्सव ज्यांच्या ज्यांच्या दृष्टीस पडतो, त्या त्या कृमी-कीटक-प्राणी-पक्षी-वनस्पती व मनुष्यादी सर्व जीवांचे पाप नष्ट होते असे शास्त्र आहे." म्हणून आज आपणही आवर्जून श्रीभगवंतांसमोर यथाशक्य दीप लावून त्या दीपोत्सवाचे दर्शन घ्यावे किंवा मंदिरात जिथे कुठे दीपोत्सव असेल तिथे आवर्जून जाऊन ते नयनरम्य दर्शन घ्यावे ही विनंती.
( http://rohanupalekar.blogspot.in )
श्रीगुरुचरित्राच्या त्रेचाळिसाव्या अध्यायात भक्तराज तंतुकांची कथा आलेली आहे. त्यात श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचे माहात्म्य सांगताना भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज विमर्षण राजाची कथा सांगतात. एक कुत्रा शिवरात्रीच्या दिवशी पंपानगरीतील शिवमंदिरात उपाशी पोटी तीन प्रदक्षिणा घालतो, तेथे उजळलेली दीपमाळ पाहतो व शिवद्वारी प्राणत्यागही करतो. त्या पुण्याईने पुढच्या जन्मी तो कुत्रा शिवभक्त विमर्षण राजा होतो. म्हणजे दीपोत्सवाच्या दर्शनाचेही असे प्रचंड पुण्य प्राप्त होत असते.
आजच्याच तिथीला, भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू व शिष्य सद्गुरु श्री सोपानदेव महाराज, शिख संप्रदायाचे प्रणेते श्रीगुरु नानकदेव महाराज, निम्बार्कमताचे प्रणेते श्रीमत् न्निम्बार्क महामुनींद्र  आणि राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे प्रशिष्य व श्री बीडकर महाराजांचे थोर शिष्योत्तम, प.पू.श्री.रावसाहेब महाराज सहस्रबुद्धे या चार महात्म्यांची जयंती असते. आज श्रीगुरु नानकदेव महाराजांची ५५० वी जयंती आहे.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी या त्रिपुरी पौर्णिमेच्या संदर्भातले एक छान रूपक योजलेले आहे. श्री ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाच्या श्रीगुरुनमनात ते म्हणतात,
त्रिगुणत्रिपुरीं वेढिला ।
जीवत्वदुर्गीं आडिला ।
तो आत्मशंभूनें सोडविला ।
तुझिया स्मृती ॥ ज्ञाने.१७.०.२॥

"हे सद्गुरुभगवंता, आपले माहात्म्य काय वर्णन करावे ? सत्त्व, रज व तम या तीन गुणरूपी पुरांनी वेढल्यामुळे जीवत्वरूपी किल्ल्यात अडकलेल्या व त्या भ्रमामुळे स्वत:ला अपूर्ण मानणाऱ्या श्रीशिवांच्या अंशावर (जीवावर) तुम्ही श्रीसद्गुरुरूपाने जेव्हा कृपा करता, तेव्हाच तो जीव त्या त्रिगुणरूपी त्रिपुरासुराच्या वेढ्यातून मुक्त होऊन आपला मूळचा आत्मानंद पुन्हा उपभोगू लागतो !" अत्यंत दुर्लभ अशी श्रीसद्गुरुकृपा झाल्यानंतरच जीवाचे अज्ञानादी सर्व दोष जाऊन मूळचे शिवस्वरूप पुन्हा प्रकट होते, असे या त्रिपुरासुर कथेच्या रूपकातून श्री माउली स्पष्ट सांगत आहेत.
आजच्या या कथेच्या प्रसंगाचे हुबेहूब दर्शन खालील अप्रतिम शिल्पचित्रामधून होत आहे !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

8 Nov 2019

तुका म्हणे जन्मां आल्याचे सार्थक ।विठ्ठलचि एक देखिलिया ॥


आज देवप्रबोधिनी कार्तिकी एकादशी ! भगवान श्रीपंढरीनाथांची कार्तिकी वारी !!
भूवैकुंठ पंढरी, भगवान श्रीपांडुरंग आणि त्यांचे अलौकिक भक्त ; सारेच अत्यंत विलक्षण आहेत, इतर कशाशीच यांची तुलना होऊ शकत नाही. पंढरीत रंगणाऱ्या आषाढी व कार्तिकी या दोन एकादशांच्या अपूर्व सोहळ्याची देखील अन्य कशाशीच तुलना होऊ शकत नाही, तो प्रत्यक्ष अनुभवण्याचाच गूढरम्य विषय आहे !
भूवैकुंठ पंढरीचे माहात्म्य अतिशय समर्पक शब्दांत सांगताना भक्तश्रेष्ठ श्री तुकोबाराय म्हणतात,
अवघींच तीर्थें घडलीं एक वेळां ।
चंद्रभागा डोळां देखिलिया ॥१॥
अवघींच पापें गेलीं दिगंतरी ।
वैकुंठ पंढरी देखिलिया ॥२॥
अवघिया संता एक वेळां भेटी ।
पुंडलिक दृष्टि देखिलिया ॥३॥
तुका म्हणे जन्मां आल्याचे सार्थक ।
विठ्ठलचि एक देखिलिया ॥४॥

"जगातील यच्चयावत् सर्व तीर्थांच्या दर्शनाचे पुण्य भूवैकुंठ पंढरीतील परमपवित्र चंद्रभागा नदीच्या केवळ एका वेळच्या दर्शनानेच प्राप्त होते. भूवैकुंठ पंढरपुराचे मनोभावे दर्शन झाल्याबरोबर अवघी पापे दशदिशांना पळून जातात. भक्तश्रेष्ठ पुंडलिकांचे दर्शन हे सर्व संतांच्या दर्शनासारखेच आहे. श्रीतुकोबाराय म्हणतात, खरोखर सांगतो, जन्माला आल्याचे सार्थक हे एकमात्र भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीविठ्ठलांचे दर्शन झाल्यानेच केवळ होते !"
पंढरीच्या या सावळ्या सगुण परब्रह्माचे रूप इतके गोड आहे की बस ! अहो, साक्षात् भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य आणि भगवान श्री ज्ञानेश्वर माउली जेथे त्या अपूर्व-मनोहर रूपमाधुरीने वेडावले, तेथे आपला काय हो पाड ? युगानुयुगे हेच ते गोजिरे साजिरे गोवळे परब्रह्म नेणो कित्येकांना जन्माचा वेध लावून उभे आहे. या सुकुमार मदनाच्या पुतळ्याचे प्रेम आल्यागेल्याला असे झडपते की काय सांगायचे. पंढरीच्या या सावळ्याचे प्रेम जबरी भूतच आहे. या दिव्य प्रेमाने एकदा झपाटले की कोणताही उपाय करा, काही केल्या ते सोडतच नाही... !!
आणि ज्याला ते झपाटते त्याला तरी कुठे सुटायचे असते म्हणा त्यातून. त्या प्रेमात आपादमस्तक बुडून जाण्यात जी गोडी, जो आनंद आहे तो अन्य कश्शातच नाही. म्हणूनच तर श्री तुकोबा म्हणतात, पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरी सुकाळ ॥ पंढरीत नामाचा कल्लोळ आहे नि प्रेमाचा सुकाळ आहे. आणि त्याच दैवी प्रेमाचे साकार रूप विटेवरही उभे आहे, लुटाल तितके लुटा, कधीच काही कमी नाही होणार त्यात. तुम्हां आम्हां भोळ्या भाविकांसाठीच तर ही अखंडित सुखमिराशी आहे ना !
हे असे एकमात्र तीर्थ आहे जिथे कळसाच्या दर्शनानेही मोक्ष लाभतो. श्री तुकोबाराय गर्जून सांगतात, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ हा नाश अहंकाराचा ॥ एरवी शेवटच्या क्षणापर्यंत पाठ न सोडणारा आपला अहंकार, पंढरीत येऊन मंदिराच्या कळसाचे दुरून जरी दर्शन झाले तरी तत्काळ नष्ट होतो, त्याचे नावच राहात नाही. सर्वत्र एक विठ्ठलच दिसू लागल्यावर आपला अहंकार कुठे शिल्लक राहणार ?
पंढरीत नाम आहे, रूप आहे, भाव आहे आणि प्रेम आहे. या चतुर्विध संगमात भक्त एकदा का न्हाला की त्याचे काम फत्ते ! पंढरीचे सगळेच अलौकिक आहे, किती आणि काय बोलू त्याबद्दल ? शब्दांना तिथे काहीच किंमत नाही. अनुभवच घ्यावा लागतो त्यासाठी ज्याचा त्याने. पण त्यासाठी आधी पंढरीचे उघडे सगुणब्रह्मच पूर्णत्वाने वोळले पाहिजे. त्या प्रेममय सगुणमेघश्याम लावण्यसुंदराने आपल्या प्रेमपिशाचाची बाधा करवायला हवी आपल्याला. ते सर्वस्वी त्यांच्याच हातात आहे.
ह्या अपूर्व-मनोहर प्रेमबाधेची लागण व्हावी आणि ती आजन्म कायमचीच टिकून राहावी, यासाठीच आपण सर्वांनी त्या त्रिभुवनगुरु परमानंदकंद भगवान श्रीविठ्ठलांच्या अखंड नामगजरात आजची ही कार्तिकी हरिदिनी साजरी करू या आणि आनंदाचा धणीवरी उपभोग घेऊ या ! आजच्या प्रबोधिनीच्या पावन मुहूर्तावर आमच्याही चित्ताला तोच दिव्य प्रेमबोध होवो, हीच श्रीविठ्ठलस्वरूप श्रीगुरुचरणीं सादर प्रार्थना !
भगवान श्रीपंढरीरायांचे प्रेमभांडारी श्रीसंत नामदेवराय महाराजांच्या चरणीं जयंतीनिमित्त सादर दंडवत !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

श्रीपांडुरंगांच्या योगरूपाचे आणि 'प्रबोधिनी' शब्दाच्या विशेष अर्थाच्या विवेचनाचा समावेश असणारे कार्तिकी एकादशीचे पूर्वीचे चिंतन खालील लिंकवर आहे, तेही आवर्जून पाहावे.
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो
https://rohanupalekar.blogspot.com/2016/11/blog-post.html?m=1

25 Oct 2019

कलौ श्रीपादवल्लभ: ।

आज श्रीगुरुद्वादशी, कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा निजानंदगमन दिन !!
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे परिपूर्ण परब्रह्मस्वरूप, अतर्क्य लीलाविहारी, अपार करुणानिधान आणि विलक्षण असे नित्यअवतार आहेत. प.प.श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनी एका ठिकाणी त्यांना साक्षात् भगवान श्रीकृष्णांचेच अवतार देखील म्हटले आहे. त्यांच्या लीला वाचल्या की ते साक्षात् परब्रह्मच होते हे मनापासून पटते.
आंध्रप्रदेशातील पीठापूर या गांवी त्यांनी श्रीगणेशचतुर्थी दिनी सूर्योदयाला श्री.अपळराज व सौ.सुमतीमातेच्या पोटी जन्म घेतला आणि कृष्णा तीरावरील कुरवपूर या तीर्थक्षेत्री वास्तव्य करून अनेक लीला केल्या.
आश्विन कृष्ण द्वादशीला श्रीदत्तसंप्रदायात मोठ्या प्रेमादराने 'श्रीगुरुद्वादशी' म्हणतात. कारण ते याच तिथीला कृष्णा नदीमध्ये अदृश्य झाले. ते नित्य अवतार असल्याने त्यांनी आपला दिव्य देह कृष्णामाईत केवळ लौकिकदृष्ट्या अदृश्य केलेला आहे, त्यांनी देहत्याग केलेला नाही, हे आपण कायम लक्षात ठेवायला हवे. ते आजही त्याच पावन देहातून कार्य करीत आहेत व पुढेही करीत राहणार आहेत.
'श्रीगुरुद्वादशी' ही भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची निजानंदगमन तिथी, 'श्रीगुरुप्रतिपदा' ही भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांची निजानंदगमन तिथी व शनिवार हा भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मवार ; म्हणूनच श्रीदत्तसंप्रदायातील स्थानांवर श्रीगुरुद्वादशी, श्रीगुरुप्रतिपदा व शनिवारची वारी करण्याची पद्धत आहे.
भगवान श्री श्रीपादांचा देह अपार्थिव, दिव्य आहे. अशा देहाला कधीच जरा-व्याधी नसतात. त्यांचे स्वरूप सर्वकाळ सोळा वर्षांच्या कुमाराएवढेच होते. ते अत्यंत देखणे व सुकुमार होते. व्याघ्रांबर परिधान केलेली त्यांची दिव्य छबी पाहताच एका अनामिक वेधाने लोक त्यांच्याकडे खेचले जात असत. ते ब्रह्मचारी होते, त्यामुळे ते कधीच भगवी वस्त्रे घालत नसत. पण नंतरच्या चित्रकारांनी त्यांना भगव्या वस्त्रातच कायम दाखवलेले आहे. अनेक महात्म्यांना त्यांचे दर्शन एक मुख व षड्भुज अशा श्रीदत्तरूपात झालेले असल्याने त्यांचे तसेही फोटो प्रचलित आहेत. या पोस्ट सोबत दिलेला फोटो प.पू.सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांना प.प.सद्गुरु श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनी स्वत:च्या हृदयात करविलेल्या भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या दिव्य दर्शनानुसार काढलेला आहे.
पीठापूरहून निघून भगवान श्री श्रीपाद स्वामी महाराज बदरीनाथ आदि हिमालयातील तपस्थानांवर राहून मग पश्चिमसागराच्या तीरावरील गोकर्ण महाबळेश्वर येथे तीन वर्षे गुप्तपणे राहिले. त्यानंतर काही महिने तिरूपती बालाजी येथे राहून ते कुरवपूरला आले. त्यांचे काही काळासाठी महाराष्ट्रामध्येही वास्तव्य झालेले आहे. त्यांमध्ये विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव (जामोद) येथे ते राहिले होते. आज प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या 'श्रीपाद सेवा मंडळ' या संस्थेने तेथे सुंदर मंदिर बांधलेले असून भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची बालरूपातील अप्रतिम प्रासादिक मूर्ती स्थापन केलेली आहे. आजही अनेक भक्तांना तेथे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची प्रत्यक्ष अनुभूती वारंवार येत असते.
( http://rohanupalekar.blogspot.in )
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथेही वास्तव्य झाले होते. त्यांनी आपले शिष्य श्री रामचंद्र योगी यांना तेथेच तपश्चर्या करण्याची आज्ञा केली होती. आपल्या पुढील श्री नृसिंह सरस्वती अवतारामध्ये त्यांनी वाडीला येऊन श्री रामचंद्र योगींना दर्शन देऊन कृतकृत्य केले व स्वहस्ते त्यांना समाधी दिली. श्री रामचंद्र योगींची समाधी श्रीनृसिंहवाडीला घाट चढून आल्यावर पिंपळाखाली आजही पाहायला मिळते.
भगवान श्री श्रीपादांना, माठ/राजगिरा पालेभाजी, वांग्याची भाजी आणि साजुक तुपातला शिरा अत्यंत आवडत असे. याबद्दल एक गोड हकिकत त्यांच्या चरित्रात आलेली आहे. त्यांच्या मातु:श्री सुमतीमाता त्यांना भेटायला कुरवपूरला येत होत्या. त्यांनी मोठ्या प्रेमाने बनवून घेतलेला शिरा गार होऊ नये म्हणून, भगवान श्रीपादांनी पीठापूर ते कुरवपूर हा चार दिवसांचा त्यांचा प्रवास केवळ काही मिनिटातच घडवून त्यांना कुरवपूरला आणले व प्रेमभराने आपल्या मातु:श्रींनी केलेल्या त्या गरमागरम शिऱ्याचा आस्वाद घेतला.
अत्यंत करुणामय असे भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे स्वरूप आहे. त्यांचे जो प्रेमाने स्मरण करेल त्याच्यावर ते कृपा करतातच, असे अनेक महात्म्यांनी स्वानुभवपूर्वक सांगून करून ठेवलेले आहे. त्यांना कळवळून हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला ओ देऊन त्याचे अभीष्ट करणे, त्याच्यावर कृपा करणे, त्याचा प्रेमाने सांभाळ करणे हे भगवान श्री श्रीपादांचे आवडते कार्यच आहे. ते अत्यंत भक्तवत्सल आहेत, भक्ताभिमानी देखील आहेत !
"दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा" हा महामंत्र त्यांनीच प्रकट केलेला असून श्रीदत्तसंप्रदायामध्ये मोठ्या श्रद्धेने जपला जातो. हा महामंत्र नंतर प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी सर्वदूर प्रचलित केला. पण याचा प्रथम उपदेश भगवान श्री श्रीपादांनीच एकेदिवशी पंचदेव पहाडी परिसरातील आपल्या दरबारात कुरवपुरातील भक्तांना केला होता. म्हणून हा महामंत्र स्वत: भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनीच निर्माण केल्याचे मानले जाते.
द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आजच्याच तिथीला, भक्तांवर निरंतर कृपा करण्याच्या उद्देशाने, श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला आपल्या "मनोहर पादुका" स्थापन करून गाणगापुरी गमन केले होते. नृसिंहवाडीत औदुंबरातळी बारा वर्षे वास्तव्य करून भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी वाडीला आपल्या राजधानीचा दर्जा प्रदान केला. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज श्रीनृसिंहवाडीला श्रीदत्तप्रभूंचा "दिवाने खास" म्हणत असत. त्या राजधानीचे अधिष्ठान म्हणून भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजच श्रीमनोहर पादुकांच्या रूपाने आजही विराजमान आहेत ! म्हणून हा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर वाडीमध्येही साजरा होतो. सोबतच्या छायाचित्रामध्ये वाडीच्या मनोहर पादुकांच्या चंदनलेपनाचे सुंदर दर्शनही आहे.
स्मर्तृगामी भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं आजच्या श्रीगुरुद्वादशीच्या पावन पर्वावर सादर दंडवत घालून, त्यांची अलौकिक करुणाकृपा आपल्या सर्वांवर निरंतर राहावी यासाठी आपण कळकळीची प्रार्थना करू या. "आमच्या हृदयात निरंतर निवास करून तेथेही आपल्या पावन वास्तव्याने 'सुखाची राजधानी' निर्माण करावी आणि आपल्याच सादर स्मरणात आम्हांला सदैव रममाण करून ठेवावे", अशी प्रेमादरपूर्वक प्रार्थना त्यांच्या श्रीचरणीं करून, त्यांच्या स्मरणानंदात श्रीगुरुद्वादशी साजरी करू या  !!
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

21 Oct 2019

प.प.श्रीमत् नृसिंह सरस्वती (दीक्षित) स्वामी महाराज

ज्यांचे प्रेमाने नुसते नाव जरी घेतले तरी आपल्याही हृदयात श्रीगुरुभक्तीचा आविष्कार होतो आणि आपलेही नेत्र प्रेमादराने भरून येतात, त्या परमगुरुभक्त, साक्षात् गुरुभक्तीची प्रकट मूर्तीच असणाऱ्या परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् नृसिंह सरस्वती (दीक्षित) स्वामी महाराजांची आज पुण्यतिथी !
भारतातील अत्यंत थोर गुरुशिष्यांच्या श्रेयनामावलीमध्ये ज्यांच्या नावाचा समावेश मोठ्या आदराने केला जातो, त्या प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज व प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज या गुरुशिष्यांचे अलौकिक प्रेमनाते अत्यंत हृद्य व भावपूर्ण आहे. अतीव मनोरम असे यांचे प्रसंग वाचताना आपण खरोखरीच मोहरून जातो. शिष्य व्हावा ऐसा गुंडा । ज्याचा तिहीं लोकी झेंडा ॥ असे म्हणून श्री तुकोबाराय शिष्याचे यथार्थ माहात्म्यच प्रतिपादन करतात. प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज अगदी असेच स्वनामधन्य शिष्योत्तम होते ; ज्यांच्याबद्दल परमगुरु श्रीमत् टेंब्येस्वामी महाराजांनाही अत्यंत कौतुक होते. खरोखरीच, गुरूंनाही अभिमान वाटावा असे भाग्य फारच थोड्या शिष्यांच्या वाट्याला येत असते !
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज आचार्योपासनेच्या विवरणात म्हणतात की, "गुरुसंप्रदायधर्मच हाच ज्याचा श्वास असतो, गुरुसेवा हाच ज्याचा वर्णाश्रम व विहित कर्तव्य, नित्यकर्म असते, त्या गुरुभक्ताच्या घरी ज्ञानच मोठ्या आदराने पाईकी करीत असते. तो शिष्य गुरुभक्तीला गवसणी घालून राहिलेला असतो. त्याच्या रूपाने गुरुभक्तीच साकारलेली असते !" प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज अशा परमगुरुभक्तांचे शिरोमणीच होते.
कधीही पायात पादुका न वापरणाऱ्या प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी, आपल्या या शिष्योत्तमासाठीच एकवार केवळ पादुकांना एकदा स्पर्श करून त्यांना प्रसाद म्हणून त्या पादुका दिलेल्या होत्या. आजही त्या श्रीपादुका औरवाडच्या 'श्री वासुदेवानंद सरस्वती पीठा'त प्रेमादराने पूजिल्या जातात. आपल्या श्रीगुरुमहाराजांच्या शेवटच्या आजारपणात प.प.दीक्षित स्वामी महाराज या प्रसाद पादुकांवर विविध काढे व औषधी अर्पण करीत असत. शेवटी गरुडेश्वरहून श्रीगुरुमहाराजांनी निरोप पाठवून "आपली सेवा पोचली, अाता थांबवावी", असे सांगितले आणि नंतरच पूर्वनियोजितपणे त्यांनी देहत्याग केला. त्या पादुकांच्या रूपाने प्रत्यक्ष आपले श्रीगुरुदेवच आहेत, ही प.प.श्री दीक्षित स्वामींची धारणा किती यथार्थ होती पाहा !
श्रीगुरुनिष्ठेचा उत्तुंग आदर्श होते प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराज. त्यांच्या चरित्रातील काही अलौकिक व अद्भुत प्रसंगांची माहिती खालील लिंकवरील लेखात थोडक्यात दिलेली आहे. आजच्या पावन दिनी त्याद्वारे आपणही प.प.श्री.दीक्षित स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं मनोभावे दंडवत घालू या आणि भाग्याचेही भाग्य असणाऱ्या श्रीगुरुभक्तीच्या कृपालेश-प्राप्तीसाठी त्यांना कळकळीने विनवू या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
जाला गवसणी गुरुभक्तीसी

https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_22.html?m=1

8 Oct 2019

सद्गुरु श्रीसंत साईबाबा महाराज पुण्यतिथी

आज विजयादशमी,
सद्गुरु श्रीसंत साईबाबा महाराजांची आज १०१ वी पुण्यतिथी आहे. विजयादशमी, दि.१५ ऑक्टोबर १९१८ रोजी नेमक्या विजयमुहूर्तावर त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता.
राजाधिराज सद्गुरु श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील हे महान अवलिया विभूतिमत्व त्याकाळात व आजच्याही काळात लोकांच्या जाणिवेत मावलेले नाही, कधीच मावणारही नाही. त्यामुळेच त्यांच्याविषयी, त्यांच्या धर्माविषयी निरर्थक वाद घालण्यातच काहींना मोठा पुरुषार्थ केल्यासारखे वाटते. श्रीभगवंतांच्या मायेने पक्के भुलवलेले असले हे अज्ञानी जन त्यांच्या कुकर्मांच्या योगाने असे व्यर्थ बरळत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपण मात्र चुकूनही महात्म्यांच्या निंदेचे, अधिक्षेपाचे महापातक घेऊ नये. आपण प्रेमाने व मनापासून श्रीसंत साईबाबांच्या श्रीचरणीं अभिवादन करून धन्य होऊ या !
श्रीसंत साईबाबांच्या शताब्दी पुण्यतिथी दिनी लिहिलेला लेख खालील लिंकवर वाचता येईल.
श्रीसंत साईबाबा महाराज
https://rohanupalekar.blogspot.com/2018/10/blog-post_76.html?m=1

1 Oct 2019

'वेडी केरसुणी' तथा श्रीसंत गजानन महाराज गुप्ते, नाशिक


आज आश्विन शुद्ध तृतीया, नाथ संप्रदायातील एक महान विभूतिमत्व, श्रीसंत गजानन महाराज गुप्ते यांची आज पुण्यतिथी.
विदर्भातील यवतमाळ येथे श्रीगोकुळाष्टमी, दि.१५ ऑगस्ट १८९२ रोजी जन्माला आलेले श्री.गजानन मुरलीधर गुप्ते तथा सद्गुरु श्री.गजानन महाराज गुप्ते तथा श्री गुप्तनाथ हे खरोखर अत्यंत अद्भुत असे जन्मसिद्ध महापुरुष होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रचंड देवी आल्याचे निमित्त होऊन लहानगा गजानन पांगळा झाला. बालवयातच आई-वडिलांचा वियोग त्याला सहन करावा लागला. त्याच्या बालविधवा मावशीने त्याचा सांभाळ केला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील रानअंत्री या क्षेत्री राहणाऱ्या श्री नारायण सरस्वती महाराजांकडे हे गुप्ते कुटुंब एकदा दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी गजानन दहा-बारा वर्षांचा होता. त्याच्या मावशीने डोळ्यांत पाणी आणून श्री.नारायण महाराजांसमोर पांगळ्या गजाननाची व्यथा सांगून त्याच्यावर कृपा करावी म्हणून प्रार्थना केली. त्याला पाहताच श्री.नारायण महाराज म्हणाले, "हा पूर्वजन्मीचा नाथपंथी योगी आहे. हा काही वर्षांनी मोठा साधू म्हणून खूप प्रसिद्धी पावेल, अध्यात्ममार्गातील पुष्कळ साधकांना मार्गदर्शन करेल. याच्या डोळ्यांतील बाहुल्यांवरून मी सांगतो की हा पूर्वजन्मी नाथयोगी होता. तुम्ही याची मुळीच काळजी करू नका !" श्री.नारायण महाराजांचे हे शब्द पुढे खरोखर सत्यात उतरलेले पाहायला मिळतात.
त्याच रात्री गजाननासह सर्व कुटुंबीय महाराजांच्या आश्रमातच राहिले. गजाननाला झोप येत नव्हती, म्हणून पहाटेच्या सुमारास आपल्या अंथरूणावर अर्धवट झोपेत उठून बसलेल्या गजाननाला एक अद्भुत दृश्य दिसले. त्याला समोर दिसले की, एक समाधी आहे. ती दुभंगून त्यातून एक दिव्य नाथसिद्ध प्रकट झाले. त्याचवेळी 'आदेश ॐ हंस: सोऽहं ब्रह्म' असा प्रचंड ध्वनी ऐकू आला. त्या सिद्धांच्या मुखातून 'हंस: सोऽहं' असे शब्द सतत निघत होते. तेच शब्द आपणही उच्चारत आहोत, असे गजाननाला स्पष्ट जाणवले. समोरच्या नाथसिद्धांनी सौम्य रूप धारण करून 'मच्छिंद्र आदेश' अशी गर्जना केली व हे सर्व दृश्य एका क्षणात हरपले. भान हरपलेला गजानन जेव्हा जागृतीत आला तेव्हा नुकताच सूर्योदय झालेला होता. त्याचे सर्व अंग घामाने डबडबलेले होते, कपडे भिजून चिंब झालेले होते. त्याच्या अंगातून सुगंध येत होता.
बरोबरच्या मंडळींनी त्याला श्री.नारायण महाराजांकडे नेले. त्यासरशी महाराज म्हणाले, "एवढ्या लहान वयात तुला श्रीमत्स्येंद्रनाथांचे दर्शन लाभले आहे. तुला जो मंत्र मिळाला तो मला म्हणून दाखवतोस का ?" त्या पूर्ण मंत्रातील केवळ 'सोऽहं' एवढेच लक्षात राहिलेले शब्द गजाननाने म्हणून दाखवले. प्रसन्न झालेल्या सद्गुरु श्री.नारायण महाराजांनी प्रेमाने गजाननाला अाशीर्वाद दिला, "जगात तुझी कीर्ती वाढेल. तू सदैव आत्मानंदात निमग्न राहशील. तुझ्या श्वासात तुला निरंतर माझे दर्शन होईल !" आणि अंगभर कुरवाळून वात्सल्यप्रेमाने निरोप दिला.
पुढे श्री.गजानन महाराज आपल्या वडीलबंधूंबरोबर, श्री.नारायणराव तथा कवी बी यांच्याबरोबर राहिले. अकोल्यात त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले. त्यांनी नंतर शिक्षण सोडून दिले. अकोल्यातल्या पडक्या किल्ल्यात जाऊन ते ध्यानाभ्यास करीत. ते सदैव सोऽहं भावातच वावरत असत. पुढे तरुणपणी सद्गुरुकृपेने त्यांना साधनेची पूर्णता अनुभवाला आली. त्यानंतर ते सदैव त्या आत्मानुसंधानातच वावरत असत.
तत्कालीन अनेक थोर साधुसंतांशी त्यांचा संबंध आला. शेगावचे श्री गजानन महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज, कल्याणचे श्री राममारुती महाराज, वाशीम येथील श्री नंगे महाराज व श्री हरिरहरस्वामी, यवतमाळचे खटिया महाराज अशा अनेक विभूतींशी त्यांचे हृद्य संबंध होते. उत्तरायुष्यात ते या साधुसंतांच्या भेटींच्या कथा नेहमी सांगत असत.
आपल्या शिष्यांच्या घरी धुळे, मालेगांव, येवला, नाशिक, मुंबई इत्यादी ठिकाणी त्यांचे वास्तव्य होई. त्यांनी कधीच प्रवचन वगैरे केले नाही. साधकाचा भाव व पूर्वऋणानुबंध जाणून ते अनुग्रह देत असत. त्यांच्या कृपेचे अत्यंत अलौकिक अनुभव साधकांना येत असत. त्यांच्या ठायी नाथ संप्रदायाचे शांभव कृपावैभव पूर्ण बहरलेले होते. आयुष्याची शेवटची पंचवीस वर्षे त्यांचे वास्तव्य नाशिक येथेच होते. आजच्या तिथीला, वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी, दि.२८ सप्टेंबर १९४६ रोजी रात्री ११ वाजता त्यांनी नश्वर देहाचा त्याग केला. नाशिक येथे गोदावरीच्या काठावर त्यांचे समाधी मंदिर आहे. आज त्यांची ७३ वी पुण्यतिथी आहे.
श्री.गजानन महाराज नाशकात 'बायकांचा राम' म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवळाजवळच्या बैठ्या घरातील खोलीत राहात. ते दिवसातून दोनदा चहा घेत व दोन-तीन दिवसांतून एकदा जेवण करीत, तेही अर्धी पोळी व बिनाफोडणीची भाजी एवढेच. त्यांना स्वच्छ पोशाखाची व सुगंधी वस्तूंची आवड होती. त्यांची राहणी टापटिपीची व नेटकी होती. त्यांची शरीरयष्टी कृश, रंग गोरा, तरतरीत चेहरा, सरळ व धारदार नाक, पाणिदार डोळे आणि एकदम भेदक नजर होती. त्यांचा स्वभाव मिश्कील व विनोदी होता, स्वभाव अत्यंत सरळ व बालवत् होता. मनोवृत्ती अतिशय प्रसन्न व समोरच्याला सहज आपलेसे करणारी होती.
महाराज नेहमी सिगारेट ओढत व कधी कधी मद्यपानही करीत असत. ते पाहून बऱ्याच जणांना त्यांच्या साधुत्वाविषयी शंका येई. मुळात शंका यावी हाच तर त्यांचा त्यामागचा उद्देश होता. पण जे नि:शंक मनाने व श्रद्धेने त्यांना शरण गेले त्या भाग्यवान जीवांवर त्यांनी आपल्या अमोघ कृपेचा वर्षाव करून त्यांना धन्य केले.
सद्गुरु श्री.गजानन महाराजांचे "आत्मसाक्षात्कार मार्गप्रदीप" या नावाचे सुंदर चरित्र, श्रीसंत बीडकर महाराजांचे चरित्र लिहिणारे पुण्याचे कै.श्री.ल.ग.बापट यांनीच लिहिलेले आहे. त्यात शेवटी श्री.महाराजांच्या अनेक शिष्यांचे अद्भुत अनुभवही ग्रथित केलेले आहेत. ते वाचताना आपण अक्षरश: चकितच होऊन जातो.
श्री.गजानन महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा व आजच्याही काळात प्रत्येक परमार्थ साधकाने अावर्जून अभ्यासावा असा ग्रंथ म्हणजे "आत्मप्रभा" हा होय. प्रस्तुत ग्रंथ गुरुशिष्य संवादात्मक अाहे. त्यात महाराज स्वत:चा उल्लेख अत्यंत विनम्रतेने "वेडी केरसुणी" असा करतात. श्रीसद्गुरूंच्या घरची मी केरसुणी आहे, अशी त्यांची भावना होती. आत्मप्रभा ग्रंथ श्रीसंत स्वरूपानंद स्वामी महाराजांना अतिशय आवडत असे. ते त्यांच्या प्रत्येक शिष्याला तो वाचायलाच सांगत. सध्या या ग्रंथाची आवृत्ती पावसच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने प्रकाशित केलेली उपलब्ध आहे. प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे देखील नेहमी या ग्रंथाचा गौरवाने उल्लेख करतात. परमार्थ साधकांसाठी अत्यंत मोलाचे व मार्मिक असे उपदेशामृत या ग्रंथामधून श्री.गजानन महाराजांनी उपलब्ध करून दिलेले आहे. साधनेची पथ्ये, साधकाची कर्तव्ये, साधनेतील Do's and Don'ts, खरे व खोटे साधुत्व ओळखण्याचे मार्ग, अाध्यात्मिक प्रगतीची लक्षणे, शिष्यकर्तव्ये आणि गुरूंची कर्तव्ये, परमार्थासाठी आवश्यक असणारे सद्गुण यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा सुंदर ऊहापोह त्यात श्री.महाराजांनी केलेला आहे. पाऊणशे वर्षांपूर्वीच त्यांनी जे मांडले आहे, तेच आजही पूर्णसत्य आहे. परमार्थाच्या नावाने बाजार मांडलेल्या तथाकथित गुरूंचा त्यात त्यांनी सुयोग्य समाचार घेतलेला आहे. आजमितीस अशा भंपक व भोंदू गुरूंचाच सर्वत्र सुळसुळाट आहे. श्री.गजानन महाराजांचे त्याबद्दलचे परखड बोल म्हणूनच साधकांनी अभ्यासपूर्वक जाणून घेऊन आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. अतिशय साध्या-सोप्या, सहज समजेल अशा भाषेत व चपखल उदाहरणे देऊन श्री.गजानन महाराजांनी आत्मप्रभा ग्रंथात अध्यात्माचे विविधांगी विवेचन केलेले आहे. हा ग्रंथ प्रत्येकाने आवर्जून वाचावाच, अशी मी आजच्या पावन दिनी सर्वांना प्रार्थनापूर्वक विनंती करतो.
सद्गुरु श्री.गजानन महाराजांचे फार अधिकारी असे शिष्य होऊन गेले. पुण्याचे प.पू.श्री.दादा महाराज आंबेकर, सोलापूरचे प.पू.श्री.नाना पाठक आणि वेळापूरचे प.पू.श्री.भाईनाथ महाराज कारखानीस हे तिन्ही श्री.गजानन महाराजांचे अधिकारी शिष्योत्तम होते. यांतील प.पू.श्री.नाना पाठक व प.पू.श्री.भाईनाथ महाराजांचा प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांशी चांगला संबंध आलेला होता. हे दोन्ही महात्मे फलटणला पू.श्री.काकांच्या दर्शनाला नेहमी येत असत. दोघांच्याही चरित्रात अशा भेटींचे उल्लेख आहेत. प.पू.श्री.भाईनाथ महाराज व प.पू.श्री.दादा महाराज आंबेकर यांचा प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांशीही हृद्य स्नेह होता. पू.भाई महाराज तर पू.श्री.मामांच्या श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन संस्थेचे विश्वस्तही होते. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज लहानपणी आपल्या वडिलांबरोबर एकदा नाशिकला गेले असताना पू.श्री.गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. हे सर्व अतिशय रंगलेले महात्मे असल्याने सर्वांचा एकमेकांशी फारच गोड स्नेहबंध होता.
मी पहिल्यांदा जेव्हा श्रीसंत गजानन महाराजांचे चरित्र वाचले तेव्हा मी प्रचंड भारावूनच गेलो होतो. त्यात भरभरून नोंदवलेला, त्यांच्या शिष्यांना आलेल्या अत्यंत अलौकिक अनुभूतींचा खजिना फारच वेड लावणारा आहे. त्यानंतर एकदा नाशिकला गेलो असताना मी आवर्जून श्री.गजानन महाराजांच्या समाधिस्थानी जाऊन दर्शन घेऊन आलो होतो. सद्भाग्याने मला पू.श्री.गजानन महाराजांचे शिष्योत्तम प.पू.श्री.भाईनाथ महाराज कारखानीस यांचे दोन-तीनदा दर्शन लाभलेले आहे. पू.नाना पाठक यांचे 'सद्गुरुचरणाखाली' हे चरित्र व पू.दादा महाराज आंबेकर यांनी लिहिलेला ग्रंथ 'नाथपंथी ध्यानयोग' तसेच त्यांच्या चरित्रातील प्रसंग वाचतानाही फार आनंद लाभला होता, नेहमीच लाभतो. खरोखर ही सर्व फार फार महान विभूतिमत्वे होती.
आज प.पू.श्री.गजानन महाराजांच्या पुण्यतिथी दिनी, त्यांच्या आणि त्यांच्या अनन्य गुरुभक्त अशा सर्व शिष्यांच्या श्रीचरणीं सद्भावपूर्वक दंडवत घालतो व ही शब्दपूजा त्यांच्या श्रीचरणीं समर्पितो !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.com)



28 Sept 2019

सद्गुरु श्रीसंत ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर पुण्यतिथी

आज भाद्रपद अमावास्या, सर्वपित्री अमावास्या, सद्गुरु श्रीसंत ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे शिष्योत्तम आणि साक्षात् श्रीगुरुभक्तीचेच मूर्तिमान स्वरूप असणाऱ्या सद्गुरु श्रीसंत ब्रह्मानंद महाराज गाडगोळी, बेलधडीकर यांची आज १०१ वी पुण्यतिथी. सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
"श्रीगुरुसेवेचा परममंगल व अद्भुत आविष्कार म्हणजे श्री ब्रह्मानंद महाराज होत. श्रीगुरु गोंदवलेकर महाराज हेच आपले सर्वस्व, श्रीमहाराजांनी दिलेले कृपायुक्त नाम हेच एकमात्र साधन आणि श्रीमहाराजांची सादर परिचर्या-सेवा हेच एकमेव कर्तव्य ; असे मनापासून जाणून त्यानुसार वागणारे श्री ब्रह्मानंदबुवा म्हणजे साक्षात् मूर्तिमंत श्रीगुरुभक्तीच ! शुकासारिखे पूर्ण वैराग्य अंगी मिरवणारा हा महात्मा, आपल्या अपूर्व-मंगल निष्ठेने श्रीगुरु ब्रह्मचैतन्यांचेही चैतन्यच होऊन ठाकला होता, यात नवल ते काय?......"
पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे.
ब्रह्मानंद स्थिती काय वर्णू
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_1.html?m=1

27 Sept 2019

परमवैराग्यशिरोमणी सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज पुण्यतिथी

आज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील अलौकिक अवधूत विभूतिमत्व आणि सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे प्राणप्रिय सद्गुरु, प.पू.सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांची ९६ वी पुण्यतिथी !
अनिर्वचनीय अशा अवधूती स्थितीचे साक्षात् दर्शन म्हणजे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज. वैराग्याची परमसीमा, अद्वयानंदाची संपन्न अनुभूती आणि दैवी सद्गुणांची खाण म्हणजे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज ! अशा विभूतींचे दर्शन आणि त्यांना मनोभावे केलेले वंदनही जन्मजन्मांतरीच्या पुण्याचेच फळ म्हणायला हवे. एवढेच नाही तर, अशा महान संतांचे प्रेमाने केलेले स्मरणही इहपर साधनेची प्रगती साधणारे असते, त्या संतांचीच योग्यता प्रदान करणारे असते, असे भगवान सद्गुरु श्री माउलींनी सांगून ठेवलेले आहे.
हीच प्रेमजाणीव हृदयी जागती ठेवून, सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांच्या चरित्राचे चिंतन मांडणारा खालील लिंकवरील लेख आवर्जून वाचावा ही प्रार्थना !
तो देवांचाही देव जाणिजे
https://rohanupalekar.blogspot.com/2018/10/blog-post_7.html?m=1

22 Sept 2019

सद्गुरु श्री गोविंदकाका उपळेकर महाराज पुण्यतिथी

आज भाद्रपद कृष्ण अष्टमी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज यांची ४५ वी पुण्यतिथी !
राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील महान विभूतिमत्व आणि भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे पूर्णकृपांकित सत्पुरुष, सद्गुरु श्री.गोविंदकाका महाराज उपळेकर हे फार विलक्षण महात्मे होते. सदैव आपल्याच अवधूती अवस्थेत रममाण असणारे प.पू.श्री.काका श्री माउलींच्या श्री ज्ञानेश्वरीची ओवीन् ओवी अक्षरश: जगत होते.
गेल्या वर्षी आजच्याच तिथीला, प.पू.श्री.काकांच्या पावन स्मृतिकथा व चरित्रावर आधारित स्वानंदचक्रवर्ती हे सुंदर पुस्तक प्रकाशित झाले. त्याबरोबर तरुणांसाठी संतांनी केलेल्या मौलिक उपदेशांवर आधारित जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा हेही पुस्तक प.पू.काकांच्या समाधी समोर प्रकाशित झाले. वर्षभरात या दोन्ही ग्रंथांची आवृत्ती जवळपास संपत आलेली आहे. वाचकांनी या दोन्ही ग्रंथांचे मनापासून स्वागत व कौतुक केले, ही माझ्यावर बरसलेली श्रीसद्गुरुकृपाच आहे !
स्वानंदचक्रवर्ती ग्रंथाच्या प्रस्तावनेत प.पू.सद्गुरु श्री.काकांचे माहात्म्य यथार्थ शब्दांत सांगताना, श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू प.पू.श्री.शिरीषदादा कवडे लिहितात, "विसाव्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या अग्रगण्य भगवद् विभूतींमध्ये पू.उपळेकर काकांची गणना होते. पू.काका संतत्वाचा उत्तुंग आदर्श होते. लौकिकातल्या कुठल्याही प्रसंगांत त्यांच्या अंत:करणाची ब्रह्मबैसका सुटलेली दिसत नसे. ते स्वानंदसाम्राज्याचे चक्रवर्ती सम्राटच होते. प्राप्त पुरुषाची ती समग्र दैवी सुलक्षणे त्यांच्या ठायी सुखाने, आपलेपणाने तिन्ही त्रिकाळ नांदत होती. सहज, अखंड समाधीचे शांभवी वैभव त्यांच्या सर्व लीलाव्यवहारांमधून सदैव ओसंडत असे. हे पुस्तक चित्ताकर्षक झालेले असून वाचकाला भावविभोर व अंतर्मुख करणारे आहे. एकंदरीत स्वानंदचक्रवर्ती हे समग्र पुस्तकच अत्यंत वेल्हाळ, वाचनीय आणि मननीय झालेले आहे !"
[ प.पू.सद्गुरु श्री.काकांचे दिव्य चरित्र आणि कार्य यावरील लेख खालील लिंकवर जाऊन आपण वाचवा. त्याद्वारे आजच्या पावन तिथीला प.पू.काकांच्या चरणीं आपण सप्रेम आदरांजली वाहू या !
तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं चूडारत्न
https://rohanupalekar.blogspot.com/2016/04/blog-post.html ]
प.पू.श्री.काकांनी मंगळवार दि.८ ऑक्टोबर १९७४ रोजी आजच्याच तिथीला सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यापूर्वी साधारणपणे दीड-दोन महिने आधी फलटणला एक प्रसंग घडला. पू.काकांच्या दर्शनाला कै.श्री.ज्ञाननाथजी रानडे व काही मंडळी फलटणला आली होती. प.पू.काका आपल्याच अवस्थेत असले तरी फार सूचक वाक्ये बोलून जात. तसेच त्यावेळी क्रिकेट खेळाचा संदर्भ घेऊन प.पू.काका अचानक उद्गारले, "कशी झाली मॅच ? खेळाडू धावपट्टीवर येतो, खेळतो. जेवढा दम असेल तेवढी फटकेबाजी करून धावा काढतो. त्यातही प्रेक्षकांना आपली कलाकुसर दाखवतो. बॉल टाकल्यावर त्याचा झेल देऊन आऊट होणे चांगले. स्टंप मारून किंवा उडून आऊट (क्लीन बोल्ड) होण्यात काय मजा आहे ? हा चेंडू-फळीचा खेळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापासून तो श्रीकृष्णदेवांपर्यंत (प.पू.काकांचे सद्गुरु) आम्ही खेळत आलेलो आहोत. खेळ खेळ म्हणून खेळायचा, त्याला भ्यायचे नाही. हाच खेळ सर्व संत मंडळींसमवेत खेळत राहावयाचा आहे ! खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई हो ।"
वरकरणी अतिशय गूढ वाटणारे हे पू.श्री.काकांचे बोल अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. यातून त्यांनी आपल्या दैवी जन्मकर्माचे व अलौकिक देहत्यागाचे रहस्यच सांगून टाकलेले आहे. या संदर्भात मी प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्याशी बोललो होतो. त्यांनी प.पू.काकांच्या या वाक्यांचा अद्भुत अर्थ सांगितला होता. तो असा की, "प.पू.श्री.काका हे श्रीभगवंतांच्या आज्ञेने लोकांच्या उद्धारासाठीच जन्माला आलेले होते. "आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी ।" ह्या श्री तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे पू.काकाही पृथ्वीतलावर कार्यासाठीच आलेले होते. त्याअर्थाने ते भगवान श्रीकृष्णांचे खेळ-सवंगडीच होते. क्लीन बोल्ड होणे म्हणजे काळाने टाकलेल्या बॉलवर आऊट होणे, यमाच्या इच्छेने मृत्यू येणे. पण काळाच्या बॉलवर झेल (कॅच) देणे म्हणजे त्या काळाला फाट्यावर मारून स्वत:च्या इच्छेने देहत्याग करणे. ह्या प्रक्रियेत संत निष्णातच असतात. ते कधीच काळाच्या अधीन नसतात. एरवी दुर्लंघ्य असा काळ त्यांच्यासमोर मात्र कायमच हतबल असतो. आम्ही म्हणू तेव्हा आम्ही जाऊ, काळ आला म्हणून आम्ही आमची विकेट टाकणार नाही, असेच संत म्हणतात. ते यमाची बॉलिंग तर चोपूनच काढत असतात. त्यांची विकेट काढायची कोणाची ताकद आहे ?"
प.पू.श्री.काकांनी देखील असा आपल्या इच्छेने ठरवूनच देहत्याग केला होता. त्यामागचे कारणही खूप विशेष आहे. ८ ऑक्टोबर ही त्यांच्या सद्गुरूंची, प.पू.श्रीकृष्णदेव महाराजांची देहत्यागाची तारीख होती. ८ ऑक्टोबर १९२३ रोजी सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांनी देहत्याग केला होता. म्हणूनच परम गुरुभक्त असणाऱ्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी देखील आधी ठरवून ८ ऑक्टोबर याच तारखेला, आपल्याच इच्छेने नश्वर देहाची खोळ सांडली. आपल्या इच्छामरणाचाच सूचक संकेत प.पू.श्री.काकांनी क्रिकेटच्या संदर्भाने आलेल्या वरील वाक्यांत दिलेला नाही का ?
सद्गुरु श्री गोविंदकाका महाराज की जय !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( स्वानंदचक्रवर्ती व जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा या ग्रंथांसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा हा विनंती.)

20 Sept 2019

श्रीज्ञानेश्वरी जयंती

आज भाद्रपद कृष्ण षष्ठी, आजच्या तिथीला 'श्रीज्ञानेश्वरी जयंती' म्हणतात. अर्थात् ही श्रीज्ञानेश्वरीच्या निर्मितीची तिथी नाही, श्रीसंत एकनाथ महाराजांनी केलेल्या श्रीज्ञानेश्वरीच्या प्रतिशुद्धीची ही तिथी आहे. जवळपास तीनशे वर्षांमधील पाठांतरांमुळे मूळ श्रीज्ञानेश्वरीच्या पाठात ज्या अशुद्धी निर्माण झाल्या, चुकीचे पाठ रूढ होत गेले, ते श्रीसंत एकनाथ महाराजांनी काढून टाकून श्रीज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत पुन्हा तयार केली. ती त्यांची लेखनकामाठी आजच्या तिथीला पूर्ण झाली होती.
सद्गुरु श्री माउलींचेच स्वरूप असणाऱ्या श्रीज्ञानेश्वरीचे माहात्म्य सांगताना श्रीसंत जनाबाई म्हणतात,
वाचावी ज्ञानेश्वरी, डोळां पहावी पंढरी ॥१॥
ज्ञान होये अज्ञान्यांसी, ऐसा वर त्या टीकेसी ॥२॥
ज्ञान होये सकळा मूढां, अतिमूर्ख त्या दगडां ॥३॥
वाचेल जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी ॥४॥

श्रीसंत जनाबाई सांगतात, "श्रीमद् भगवद् गीतेची रहस्योद्घाटक  टीका असणारी श्रीज्ञानेश्वरी अावर्जून वाचावी अाणि पंढरीची वारी करावी, डोळ्यांनी पंढरीनगरी पाहावी. कारण या टीकेला एक विशेष आशीर्वाद आहे की, जे अज्ञानी आहेत त्यांना त्यामुळे ज्ञान होईल. अतिमूर्ख असणारा, दगड असणाराही कोणी जर ही मनापासून वाचेल, तरी त्यालाही ज्ञान होईल. अशा प्रेमाने व श्रद्धेने जो कोणी ही श्रीज्ञानेश्वरी वाचेल, तिला शरण जाईल, त्याला मीच लोटांगण घालते !"
श्रीसंत जनाबाईंचा हा अभंग वरवर अगदी सोपा वाटत असला, तरी त्याचा गूढार्थ अतिशय विलक्षण आहे. जिज्ञासूंनी त्यासाठी प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी या अभंगावर केलेली दोन प्रवचने मुद्दाम वाचावीत. "वाचावी ज्ञानेश्वरी" याच नावाने प्रस्तुत ग्रंथ श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे.
आजच्या पावन तिथीला सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचेच अपर स्वरूप असणाऱ्या माय माहेश्वरी श्री ज्ञानदेवीला आपण सर्वभावे शरण जाऊन दंडवत घालू या आणि आजन्म तिची सेवा करून या दुर्लभ अशा मानवी आयुष्यात धन्य धन्य होऊ या !
सद्गुरु श्री माउलींच्या 'भावार्थदीपिका' तथा 'श्रीज्ञानेश्वरी'चे संतांनी वर्णिलेले माहात्म्य सांगणारा, ती कधी निर्माण झाली, कशी निर्माण झाली ते सांगणारा आणि तिच्या सेवेचे व सेवनाचे सुफल कथन करीत श्रीज्ञानेश्वरीची शब्दपूजा मांडणारा लेख खालील लिंकवर जाऊन आजच्या पावन तिथीला आवर्जून वाचावा ही प्रेमळ प्रार्थना !
दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post_30.html

11 Sept 2019

श्रीसंत प.पू.ताई दामले

आज भाद्रपद शुद्ध त्रयोदशी, सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपांकित अशा अधिकारी सत्पुरुष प.पू.श्रीसंत पार्वती शंकर तथा प.पू.ताई दामले यांची पुण्यतिथी.  आज त्यांची ३६ वी पुण्यतिथी आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष येथे वसंत पंचमीदिनी, ५ फेब्रुवारी १८८९ रोजी पू.ताई दामले यांचा जन्म झाला. सौ.लक्ष्मी व श्री.नारायणराव पटवर्धन यांच्या पोटी त्या जन्मला. त्यांचे नाव द्वारका असे ठेवले गेले. १८९८ सालच्या प्लेगच्या साथीत त्यांचे जवळपास पूर्ण घरच मृत्युमुखी पडले. मातृछत्रही हरपले. त्यांच्या काकू पार्वतीबाई पटवर्धन यांनी त्यांना सांभाळले. या काकूंमुळेच पू.ताईंवर बालपणापासून परमार्थाचे संस्कार झाले. पार्वतीकाकूंचे पाठांतर दांडगे होते. उत्तमोत्तम श्लोक, स्तोत्रे, कवने, अभंगादी वाङ्मय या काकूंमुळेच पू.ताईंचेही पाठ झाले. ब्रह्मनाळ येथील एका स्वामींनी त्यांना बालपणीच नामस्मरण व मानसपूजा करण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार त्या भगवान श्रीदत्तप्रभूंची मानसपूजा व नामजप निष्ठेने करू लागल्या. त्या स्वामींनीच पुढे बारा वर्षांनी श्रीज्ञानेश्वरी वाचनाचीही त्यांना आज्ञा केली. तेव्हापासून श्रीज्ञानेश्वर माउली हे त्यांचे आराध्य दैवत बनले.
लहान वयात पू.ताई दामले यांच्या डोळ्यांना इजा होऊन ते लाल होत, दिसायला कमी आले. पुढे पुढे त्यांच्या डोळ्यांमध्ये केस उगवू लागले. त्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला सेवेसाठी राहिलेल्या असताना एकदा स्वप्नात "डोळ्यांत चरणतीर्थ घाल" अशी आज्ञा झाली. दुसऱ्याच दिवशी त्यांना पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे दर्शन लाभले. ते कृष्णामाईवरून स्नान करून येत होते. त्यांचे ओले चरणकमल घाटावर उमटत होते. पू.ताई त्यांच्या दर्शनासाठी गेल्या. त्यांना स्वप्नाची आठवण झाली व त्यासरशी जाणवले की श्रीदत्तप्रभूंनी हेच चरणतीर्थ घालायला सांगितले होते. प.प.श्री.टेंब्ये स्वामींच्या चरणांचे ओले ठसे त्यांनी पदराने टिपून घेतले व ते पाणी तांब्यात पिळून तीर्थ म्हणून वापरले. त्या तीर्थामुळेच पुढे कधी त्यांच्या डोळ्यांचा तो त्रास फारसा वाढला नाही.
पुढे १९०२-०३ मध्ये त्यांचा विवाह वाई येथील सुखवस्तू सावकार दामले यांच्या घराण्यातील श्री.शंकरराव यांच्याशी झाला. संसाराची सर्व कर्तव्ये पार पाडीत, हाताने काम व मुखाने नाम अशा प्रकारे त्यांची अध्यात्मसाधना गुप्तपणे चालूच होती. त्याचे फळ म्हणून त्यांना भगवान श्रीविष्णूंचे दर्शन लाभले. पुढे सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचेही दर्शन लाभले व त्यांच्या कृपाप्रसादाने प.पू.ताई धन्य धन्य झाल्या. सतत नामस्मरण व श्री ज्ञानेश्वरी वाचन हीच त्यांची साधना होती. त्याबरोबर विविध संतवाङ्मयाचेही वाचन-मनन त्या करीत. प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेचा, गोष्टीचा अध्यात्मपर अर्थ लावण्याची त्यांनी सवयच लावून घेतलेली होती. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातही त्यांचे अनुसंधान टिकत असे. कधी कधी नामाच्या अथवा अशा आत्मविचाराच्या अनुसंधानाच्या योगाने त्या जणू भावसमाधीतच जात. काम करता करताच भान हरपून त्या स्थिर होऊन जात असत. श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपेने आणि श्री ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने त्यांना असा अनुभव येत असे.
१९४५ साली श्री ज्ञानेश्वर माउलींनी त्यांच्या स्वप्नात येऊन इतरांना अनुग्रह देण्याची त्यांना आज्ञा केली. तेव्हापासून प.पू.ताई दामले अध्यात्मजिज्ञासूंना, विशेषत: गृहिणींना मार्गदर्शन करू लागल्या. त्या ज्ञानेश्वरीवर प्रवचनेही करीत असत. दररोजच्या व्यवहारातील उदाहरणे घेऊन त्याद्वारे त्या परमार्थ शिकवीत असत. म्हणूनच त्यांचे सांगणे पटकन् समजत व पटत देखील असे. "आदळआपट, भांडणतंटा, धुसफूस, एक राग दुसऱ्या गोष्टीवर काढणे, असमाधान, चिडचिड व माझे माझे अशी हाव टाळून जर आपण वाट्याला आलेली रोजची कामे उत्तमरित्या करीत राहिलो व त्याचवेळी नामाची सवय लावली आणि ईश्वरार्पण बुद्धीने संसार केला तर तेच देवाला आवडते", असे त्या आवर्जून सांगत. त्यांनी स्वत: सुद्धा हेच तत्त्व आयुष्यभर कसोशीने पाळले होते.
पू.ताई दामले यांचे जीवनचरित्र हे सांसारिक भक्तांसाठी आदर्शवत् आहे. संसारात राहून, सर्व कर्तव्ये अचूक पाळूनही उत्तम परमार्थ कसा साधता येतो, हे पाहायचे असेल तर पू.ताई दामले यांचे चरित्र अभ्यासावे. त्यांचे चरित्र किती महत्त्वपूर्ण आहे हे समजण्यासाठी एक उदाहरण सांगतो. सुरुवातीच्या काळात त्या अखंड नामस्मरणाचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करीत होत्या. त्यात स्वयंपाक करताना नाम घ्यायची सवय लागण्यासाठी, फळीवरचे भांडे काढताना नाम घ्यायचे विसरले तर त्या पुन्हा ते भांडे फळीवर ठेवत, आठवणीने नाम घेऊन मग ते परत काढून घेत व स्वयंपाक करीत. इतक्या निष्ठेने आपल्या मनाला, शरीराला परमार्थाची सवय लावावी लागते, तरच तो परमार्थ अंगी मुरतो आणि मग वेगळे कष्ट न करताही आपोआपच होऊ लागतो. पू.ताईंचे हे वागणे आपल्यासाठी किती मार्गदर्शक आहे पाहा. अशा असंख्य बोधप्रद घटना त्यांच्या चरित्रात वाचायला मिळतात.
प.पू.ताई दामले यांच्याबद्दल प.पू.सद्गुरु योगिराज श्री.गुळवणी महाराजांना खूप प्रेमादर होता. प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज तर त्यांना आपली बहीणच म्हणत असत. पू.ताई दामले यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात वाई येथे प.पू.श्री.मामा स्वत: हजर होते व त्यांचीच प्रवचनसेवाही झाली होती.
पू.ताई दामले यांना नीटनेटकेपणाची खूप सवय होती. त्या वाणसामान वगैरे बांधून आलेल्या कागदांच्या नीट घड्या करून ठेवीत, त्याचे दोरेही नीट गुंडाळून ठेवीत असत. एकदा अशाच कागदाची घडी करताना त्यांचे लक्ष गेले. त्यावर काहीतरी लिहिलेले होते. कुतूहलाने पाहू गेल्यावर लक्षात आले की ते श्री ज्ञानेश्वर माउलींचे अष्टक आहे. त्यांना तो श्री माउलींचाच कृपाप्रसाद वाटला. त्यांनी ते अष्टक पाठ केले व आपल्या परिवारातील सर्व भगिनांनाही शिकवले. ते अष्टक नियमाने म्हणायची पद्धत घालून दिली. गंमत म्हणजे ते 'श्रीज्ञानदेवाष्टक' हे आपल्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी रचलेले असून अतिशय सुंदर आहे. सद्गुरु श्री माउलींचे पूर्ण चरित्रच त्या अष्टकामधून मांडले गेले आहे.
वयाच्या ९४ व्या वर्षी, भाद्रपद शुद्ध त्रयोदशी, दि.२० सप्टेंबर १९८३ च्या पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांनी मुलुंड येथे प.पू.ताई दामले यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. त्यांच्या देहाला आळंदी येथे इंद्रायणी काठी अग्नी देण्यात आला. कृष्णेकाठी जन्मलेली ही सद्गुरु श्री माउलींची कृपांकित साध्वी इंद्रायणी काठी कायमची विसावली. त्यांची समाधी इंद्रायणी काठी बांधलेली आहे.
योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांच्या आज्ञेने प.पू.ताई दामले यांचे "कृष्णाकाठ ते इंद्रायणी घाट"नावाचे छोटेखानी चरित्र नीलाताई जोशी यांनी लिहिलेले आहे. त्या चरित्रातून अतिशय बोधप्रद मार्गदर्शन लाभते. म्हणून परमार्थ अभ्यासकांनी ते आवर्जून वाचावे. महाराष्ट्राच्या संपन्न संतपरंपरेतील एक अलौकिक स्त्रीसंत म्हणून पू.ताई दामले यांची गणना होते. त्या अतिशय प्रसिद्धिपराङ्मुख असल्याने त्यांचे नावही फारसे कोणाला माहीत नाही. सर्वसामान्य प्रापंचिक भक्तांसाठी त्यांचे जीवन खरोखर आदर्शच आहे.
प.पू.श्रीसंत ताई दामले यांच्या चरणीं पुण्यतिथी निमित्त सादर प्रणिपात !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481


10 Sept 2019

श्रीवामनद्वादशी

आज भाद्रपद शुद्ध द्वादशी, भगवान श्रीमहाविष्णूंच्या पाचव्या श्रीवामन अवताराची जयंती आणि श्रीज्ञानेश्वरकन्या प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज यांची पुण्यतिथी !
भगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत, त्यांचे आपल्या भक्तांवर स्वत:पेक्षाही जास्त प्रेम असते आणि विविध प्रसंगांनी ते प्रेम श्रीभगवंत व्यक्त करतातच. अशीच एक निरतिशय प्रेमाची सुखद लीला म्हणजेच श्रीभगवंतांचा श्रीवामन अवतार होय !
प्रात:स्मरणीय भक्तराज श्रीबलिराजा याच्या उद्धारासाठी आणि देवतांचे राज्य त्यांना पुन्हा प्रदान करण्यासाठी हा अवतार झाला. पण भक्तिशास्त्रात प्रकट झालेले भक्तांचे माहात्म्यच खरेतर या लीलेतून अधिक उजळून निघताना दिसते. भक्त कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही थराला जाऊन आपल्या लाडक्या श्रीभगवंतांना धरूनच ठेवतात, त्यांची प्राप्ती करूनच घेतात, हेच या सुमधुर लीलेतून दृग्गोचर होते.
श्रीभगवंतांच्या या प्रसन्न लीलेचा आस्वाद खालील लिंकवरील लेखातून आपण सविस्तर घ्यावा ही विनंती.
आज ज्यांची पुण्यतिथी आहे, ते सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे स्वनामधन्य शिष्योत्तम श्रीसंत गुलाबराव महाराज हेही तुम्हां आम्हां सगळ्यांसाठी प्रात:स्मरणीयच आहेत. त्यांच्या हृदयी वसत असलेल्या आपल्या श्रीज्ञानेश्वर माये विषयीच्या अपरंपार जिव्हाळ्याचे, आपल्या शाश्वत माहेराच्या भेटीच्या लालसेचे तलम भावचित्र त्यांच्या ऐक तू येवढे चंदनपाखरा या अप्रतिम अभंगातून व्यक्त झालेले आहे. श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या अभंगामधून मांडलेल्या या गर्भरेशमी भाव-पैठणीचे विवरण खालील लिंकवरील लेखात आपण पुरेपूर अास्वादावे ही प्रेमळ विनंती.
ऐक तू येवढे चंदनपाखरा
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post_21.html

8 Sept 2019

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची

( समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेल्या सुप्रसिद्ध श्रीगणेश आरतीचे विवेचन. )

रोहन विजय उपळेकर
8888904481

आरती म्हणजे भक्तहृदयाचा प्रसन्न आविष्कार. आपल्या आराध्याची अतीव प्रेमादराने गायलेली स्तुती म्हणजे आरती. 'रती' म्हणजे तीव्र अनुराग, प्रेम. म्हणून, अतीव प्रेमादराने केलेली क्रिया ही 'आरती' होय. भक्ताच्या हृदयातील सघन प्रेम ज्या प्रक्रियेने तो आपल्या आराध्यदेवतेला अर्पण करतो त्याला आरती म्हणतात ! आपल्याकडील भक्तिउपचारांमध्ये म्हणूनच आरतीला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे.
भगवान श्रीगणपती ही सर्वादिपूज्य देवता. त्यामुळे आरतीही त्यांचीच प्रथम म्हटली जाते. मराठी संतकवींपैकी समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्याच सर्वात जास्त प्रचलित आहेत. आपल्या अंगभूत रसाळता, अर्थघनता, मार्मिकता आणि गेयता आदी गुणांमुळेच श्री समर्थांच्या आरत्या सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी रचलेली सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । ही सर्वच मराठी जनांच्या नित्यपठणात असणारी गणपतीची आरती अतीव सुंदर आहे. आपण रोजच म्हणत असलेल्या आरतीचा अर्थ नीट समजला तर म्हणताना अधिक आनंद लाभतो; म्हणूनच हा लेखनप्रपंच.
बुद्धी व ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असणाऱ्या भगवान श्रीगणेशांच्या देखण्या स्वरूपाचे अत्यंत सुरेख वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात,
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची ।
नुरवी पुरवी प्रेमकृपा जयाची ।
सर्वांगीं सुंदर उटी शेंदूराची ।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मनःकामना पुरती ॥ध्रु.॥

भगवान श्रीगणेश सुखकर्ते आणि दुःखहर्ते आहेत. आपल्या भक्तांची सर्व प्रकारची दुःखे, ते केवळ आपल्या एका कृपाकटाक्षाने दूर करतात आणि शाश्वत सुख त्याच्या आयुष्यात निर्माण करतात. ज्यांची प्रेमकृपा दुःखांची वार्ताही नि:शेष नष्ट करते; त्या भगवान श्रीगणपतींनी सर्वांगी भक्तवात्सल्याच्या शेंदराची उटी चर्चिलेली असून, भक्तप्रेमरूपी मोत्यांची तेजस्वी माळ गळ्यात घातलेली आहे. अशा अखिल विश्वाचे मंगल करणाऱ्या मंगलमूर्ती देवाधिदेव विघ्नहर श्रीगणपतींचा जयजयकार असो ! त्यांच्या नुसत्या दर्शनानेही भक्तांच्या अखिल मनोकामना पूर्ण होतात.
श्री समर्थांनी इथे भगवान श्रीगणेशांचे 'मंगलमूर्ती' हे विशेष नाम वापरलेले आहे. त्याचा विचार करायला हवा. पूजनीय सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज आपल्या 'देवा तूंचि गणेश' या ग्रंथात म्हणतात, "वेदांतील प्रत्येक अक्षर म्हणजे श्रीभगवंतांची मूर्ती आहे. अक्षरेच मंगल करणारी आहेत म्हणून तीच मंगलमूर्ती आहे. भगवंतांचा जन्म होतो तो अक्षरातूनच होतो. भगवंतांचे मूळ स्वरूप हे शब्दब्रह्मानेच नटलेले आहे. म्हणून मंदिरातल्या मूर्तीपेक्षाही भगवंतांच्या या शब्दमूर्तीला, नामाने तयार होणा-या त्यांच्या 'अक्षरमूर्ती'लाच जास्त महत्त्व असते." या कारणानेच श्री माउलींनी देखील श्री ज्ञानेश्वरी ग्रंथारंभी भगवान श्रीकृष्णांच्या अक्षरमय ज्ञानरूप श्रीगणेशांना वंदन केले आहे.
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजही याच संदर्भाने मनाच्या श्लोकांच्या सुरुवातीला भगवान गणेशांचे वर्णन "मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।" असे करतात. निर्गुण निराकार परब्रह्म मूळ स्वरूपात प्रथमत: अक्षरांतूनच प्रकट होत असते. म्हणूनच समर्थ गणेशांना निर्गुणाचा मूळारंभ आरंभ म्हणतात. श्रीभगवंतांचे हे अक्षरमय सगुण रूप सर्वांसाठी मंगलकारक असल्याने त्यालाच 'मंगलमूर्ती' असे संबोधले जाते. श्री समर्थांनी या आरतीच्या ध्रुवपदात त्यामुळे मंगलमूर्ती हेच विशेषण वापरलेले दिसून येते. भगवान श्रीगणेश सर्वांचे मंगल करणारेच आहेत.
सर्व प्रकारची संकटे नष्ट झाल्याशिवाय खरे सुखही अनुभवाला येणार नाही. मुळात संकटांनी घेरलेल्या व्यक्तीला सुख उपभोगताच येत नाही. चित्ताला शांतपणा तर हवा ना ते सुख भोगायला ? म्हणूनच, भगवान श्रीगणेश आधी आपल्या भक्ताची संकटे नष्ट करतात. मगच त्याला सुख लाभते. यासाठीच श्री समर्थांनी श्रीगणेशांच्या सुखकर्ता व दु:खहर्ता ह्या दोन्ही विशेषणांचाही एकत्रित वापर या पहिल्या चरणात केलेला आहे.
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरें चरणीं घागरिया ॥२॥

अनर्घ्य रत्नांनी जडवलेले सुंदर पदक गौरीकुमरा आपल्याला शोभा देत आहे. तुम्ही सर्वांगी ल्यालेली केशरयुक्त लालसर सुगंधी चंदनउटी मोहक दिसत आहे. तुमच्या मस्तकावरचा हिरेजडित मुकुट तेजाने तळपत असून पायातील घागऱ्या, पैंजण मधुर ध्वनी करीत भक्तांच्या हृदयात आल्हाद निर्माण करीत आहेत. तुमचे हे मनोहर रूप तुमच्या भक्तांच्या चित्तवृत्तींना अंतर्बाह्य वेध लावून, भुंग्याप्रमाणे त्यांना तुमच्या चरणकमलीच खिळवून ठेवत आहे.
या चरणात भगवान श्रीगणेशांच्या सगुण रूपाचे फारच मनमोहक वर्णन केलेले आहे.
आपण ज्यांची आरती करीत आहोत ते श्रीगणराय दिसतात कसे ? त्यांची रूपमाधुरी आहे तरी कशी ? याचे बहारदार वर्णन करताना श्री समर्थ आरतीच्या शेवटच्या चरणात म्हणतात,
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकष्टीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना ॥३॥

हे पीतांबर नेसलेल्या लंबोदरा, कंबरेला नागाचे बंधन धारण करणाऱ्या, सरळ सोंडेच्या व वाकड्या मुखाच्या गणराया, तीन नेत्र असलेल्या श्रीगजानना, हा रामाचा दास तुमची आपल्या घरी आतुरतेने वाट पाहात आहे. तुम्ही माझ्या या प्रेमप्रार्थनेचा स्वीकार करून माझ्या अंत:करणरूपी घरी लवकर प्रकट व्हावे आणि माझे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करून माझा आणि माझ्या श्रीरामभक्तीचा शेवटपर्यंत सांभाळ करावा. श्रेष्ठ देव-देवताही ज्यांना वंदन करतात अशा श्रीगणेशा, या रामदासाची प्रेमार्ती स्वीकारून तुम्ही आता भरभरून कृपा करावी !
भगवान श्रीगणेशांचे 'वक्रतुंड' हे नाम श्री समर्थांनी या चरणात योजलेले आहे. ह्या नामाचा उत्तम विचार सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. श्री ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाच्या नमनात माउली एका सुंदर ओवीत भगवान श्रीगणेशांचे मार्मिक गुणवर्णन करताना म्हणतात,
जो तुजविखी मूढ । तयालागी तूं वक्रतुंड ।
ज्ञानियांसी तरी अखंड । उजूची आहासी ॥ ज्ञाने.१७.०.४॥

श्रीगणेशांची सोंड हे काही त्यांचे तोंड नाही, ते तर नाक आहे, पण सोंड हेच जणू त्याचे तोंड वाटते. म्हणून त्यांना 'वक्रतुंड' म्हणतात. माउली म्हणतात, हे सदगुरुरूप गणराया, जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत, त्यांना तू वक्रतुंड दिसतोस, म्हणजे तू त्यांना रागावलेला, तिरस्कार करणारा वाटतोस ; पण जे तुझ्याविषयी प्रेम बाळगून आहेत, तुझ्या स्वरूपाचे ज्ञान ज्यांना झालेले आहे, त्यांच्यासाठी तू उजू म्हणजे सरळ सोंडेचाच आहेस. त्यांना तू कायम कृपामय, करुणाकरच वाटतोस.
सद्गुरु श्री माउलींनी गणेशांची सरळ सोंड ही सुविमल विवेकाचे प्रतीक मानलेली आहे. विवेक म्हणजे सारासार जाणण्याची क्षमता. आपल्या परमार्थासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार म्हणजे 'विवेक'. ज्यांना श्रीगणेशांविषयी प्रेम आहे व ज्यांच्यावर गणेशांनी अनुग्रह केलेला आहे, त्यांना कायमच या सुविमल अर्थात् शुद्ध विवेकाची प्राप्ती होते. असा हा विवेक निःसंशय सदगुरुकृपेनेच लाभतो. खरेतर हा विवेकच गुरुकृपा लाभल्याचे प्रथम द्योतक मानतात. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या एका अभंगात म्हणूनच म्हणतात की, "विवेक तो मुख्य कृपेचे लक्षण । गर्भासी भूषण बुद्धीचिया ॥"
या विवेकाला इतके का बरे महत्त्व दिलेले आहे ? कारण; जेथे असा सुविमल विवेक असतो तिथेच साधनेने पुढे ज्ञान प्रकट होऊन परमानंदाची, महासुखाची प्राप्ती होत असते. श्रीगुरूंनी दाखवलेल्या मार्गानेच अत्यंत प्रेमाने व निष्ठेने साधना केल्यावर आपण विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन पोहोचतो. तिथे जन्मजन्मांतरी बुद्धीने साठवलेला कर्मांचा संस्काररूप मल स्वच्छ धुतला जाऊन बुद्धी शुद्ध होते. आणि त्यानंतरच खरेतर आपल्याला आत्मसुखाची प्राप्ती होते. म्हणून हा विवेक परमार्थात फार महत्त्वाचा मानला जातो.
सद्गुरु श्री समर्थांनी या आरतीच्या शेवटच्या चरणात योजलेल्या वक्रतुंड व सरळ सोंड ह्या दोन्ही शब्दांचा वरील श्री माउलींच्या विवेचनाच्या आधारे विचार केल्यावर आपल्याला आणखी सुंदर अर्थ लागतात. सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज अतिशय नेमकी शब्दयोजना करणारे तयारीचे कविश्रेष्ठ आणि विचक्षण शब्दप्रभू होते हे आपल्याला मनोमन पटते.
श्री समर्थ संप्रदायात यातील पहिले आणि तिसरे अशी दोनच कडवी म्हटली जातात. ‘रत्नखचित फरा..’ हे कडवे म्हणत नाहीत. ते प्रक्षिप्त मानले जाते. परंतु सर्वत्र ते प्रचलित असल्यामुळे मी या लेखात त्याचाही विचार केलेला आहे.
( http://rohanupalekar.blogspot.in )
गेली काही वर्षे गणेशोत्सव जवळ आला की, "समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेली गणपतीची मूळ सात चरणांची आरती" म्हणून एक आरती व्हॉटस्अॅप व फेसबुक सारख्या समाज माध्यमांमधून फिरू लागते. वस्तुत: अशी कोणतीही सात चरणांची आरती सद्गुरु श्री समर्थांनी रचलेली नाही. त्यांनी केवळ दोन चरणे व एक ध्रुवपदाची आरतीच रचलेली आहे. उर्वरित पाच चरणे नंतरच्या कोणा कवींनी रचलेली असावीत, पण ती नक्कीच समर्थांची रचना नाही. आजवर मिळालेल्या श्री समर्थांच्या कोणत्याही हस्तलिखितात ही पाच चरणे आलेली नाहीत. तेव्हा व्हॉटसअॅपवर फिरणाऱ्या या सात चरणांच्या मूळ आरतीकडे काणाडोळा करणेच उत्तम ठरेल.
काही अभ्यासकांचा, शेवटच्या चरणात ‘संकष्टी का संकटी’ यावर मतभेद आहे. या दोन्ही पाठभेदांचा अर्थ एकच होतो. संकष्टी पावावें म्हणजे संकटांमध्ये पावावे. संकष्टी चतुर्थीचा याच्याशी काहीही संबंध नाही. जुन्या काळातील मराठी भाषेत संकष्ट असाही शब्दप्रयोग होता ; त्यामुळे संकटी पावावे आणि संकष्टी पावावे हे दोन्ही पाठ अर्थदृष्ट्या बरोबरच आहेत. संकष्ट म्हणजे तीव्र कष्ट, मोठी दु:खे. आणि अशा संकटांच्या वेळी तर विघ्नहर्ताच स्वाभाविकपणे आठवणार ना !
काही ठिकाणी ‘दर्शनमात्रे मन स्मरणेमात्रे मन:कामना पुरती’ आणि ...जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती असे म्हणतात. ते मात्र पूर्ण चूक आहे. कोणाच्याही मूळ रचनेत आपले पदरचे शब्द घालणे, हे साधुसंतांनी चुकीचे वर्तन म्हणूनच सांगितलेले आहे. त्यामुळे मूळची आरती जशी आहे तशीच, शुद्ध शब्दोच्चार करीत म्हणायला हवी ; स्वतःचे कोणतेही शब्द त्यात न घालता. संतांच्या शब्दांना जसे अंगभूत सामर्थ्य असते तसे आपल्या शब्दांना नक्कीच नसते ; आणि म्हणूनच संतांच्या वाङ्मयात जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने होणारी ही पदरची भर आपण सर्वांनी कायमच टाळली पाहिजे. समर्थांनी तर अशा प्रकारे पदरचे शब्द घालणाऱ्याला मूर्खच म्हटलेले आहे.
मनोभावे आणि प्रेमाने केलेली आरती, स्तुतिप्रिय अशा श्रीभगवंतांच्या मनात आपल्याविषयी करुणा उत्पन्न होण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणूनच, कसलीही घाईगडबड न करता प्रेमाने आणि मनापासून, आरतीतील शब्दांचा सुयोग्य अर्थ जाणून, त्यातील भावना आपल्या अंतःकरणात रुजवून आरती म्हटली पाहिजे. जर आपण या श्रीगणेशोत्सवातच नाही तर रोजच्या पूजेतही अशाच प्रकारे समजून-उमजून आरती म्हटली, तर त्यातून अधिक आनंद तर लाभेलच ; शिवाय भक्तांवर निरतिशय प्रेम करणारे श्रीभगवंत देखील प्रसन्न होऊन आपल्या सर्व दुःखांचा समूळ नाश करून आपले आयुष्य सुखसमाधानाने भरून टाकतील यात तिळमात्रही शंका नाही !
मंगलमूर्ती मोरया ।
 रोहन विजय उपळेकर.




4 Sept 2019

श्रीबलराम जयंती

भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचे ज्येष्ठ बंधू, भगवान शेषांचे अवतार महाबलवान योद्धे भगवान श्रीबलराम यांची भाद्रपद शुद्ध षष्ठी ही जयंती. प्रत्यक्ष श्रीकृष्णस्वरूप आणि श्रीकृष्णलीलेतील प्रधान सहचर भगवान श्रीबलरामांच्या चरणीं सादर दंडवत !
भगवान श्रीबलरामांबद्दल श्रीमद् भागवतामध्ये तसेच आपल्या मराठी संतांनीही खूप चांगले सांगून ठेवलेले आहे. श्रीरामावतारात धाकटे बंधू लक्ष्मण झालेले भगवान शेष श्रीकृष्णावतारात ज्येष्ठ बंधू श्रीबलराम म्हणून जन्माला आले. मोठ्या मिश्कीलपणे या लीलेचे रहस्य सांगताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे श्रीनामदेवांचे अभंग उद्धृत करतात. देवदेवतांनी व असुरभाराने श्रमलेल्या पृथ्वीने विनवणी केल्यामुळे श्रीभगवंतांनी कृष्णावतार घेण्याचे ठरविले. आता अवतार घ्यायचा म्हणजे सगे-सोबती पण हवेतच ना ! म्हणून श्रीभगवंतांनी आपल्या सख्याला, भगवान शेषांना सांगितले की,
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आता ॥१॥
पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार । गाऱ्हाणे सुरवर सांगू आले ॥२॥
पूर्व अवतारातील वाईट अनुभव गाठीशी असल्याने शेषांनी तत्काळ नकार दिला व म्हणाले,
शेष म्हणे मज श्रम झाले फार । यालागी अवतार मी नघेचि ॥३॥
राम अवतारीं झालो मी अनुज । सेविलें अरण्य तुम्हांसवें ॥४॥
चौदा वर्षावरी केलें उपोषण । जाणतां आपण प्रत्यक्ष हें ॥ना.गा.२४.५॥

शेष म्हणतात, "देवा ! मी नाही बाबा येणार आता तुमच्याबरोबर. मागच्या वेळी तुमचा धाकटा भाऊ झालो नि काय काय सहन केले. तुमच्यासह अरण्यवास पत्करला, तिथे चौदा वर्षे उपास पण काढले. फार कष्ट झाले तेव्हा. तुम्ही हे सर्व जाणत असूनही अवतार घ्या म्हणताय ? आता मी चुकूनही नाही येणार !"
शेषांचेही बारसे जेवलेले हे श्रीभगवंत, ते काय बधणार आहेत थोडीच ? ते समजावणीच्या सुरात म्हणाले,
पूर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ । सोसियेले कष्ट मजसवें ॥१॥
आतां तूं वडील होईगा सर्वज्ञा । पाळीन मी आज्ञा तुझी बारे  ॥ना.गा.२५.२॥

देव म्हणाले, "अरे शेषा, तू गेल्यावेळी धाकटा झालास ना म्हणून तुला फार कष्ट झाले. आता यावेळी तू थोरला हो आणि मी धाकटा होऊन तुझ्या सर्व आज्ञा पाळीन, मग तर झाले ना ?"
नटनागर श्रीभगवंतांची गुगली बरोबर स्टंपवर लागून शेषांची विकेट पडली. ते लगेच तयार झाले अवतार घ्यायला आणि भगवान श्रीबलरामांच्या रूपाने प्रकटले !
भगवान श्रीकृष्णांचे मुख्य लीलासहचर भगवान श्रीसंकर्षणांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
श्रीबलरामांचा जन्म, त्यांची विविध नामे व त्यामागील गूढार्थ आणि श्रीबलरामांच्या काही चरित्रलीलांबद्दलची आणखी माहिती खालील लिंकवरील लेखात आपण वाचू शकता.
नमो अनन्ताय संकर्षणाय
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post_15.html?m=1

2 Sept 2019

भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती

भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्रीगणेश चतुर्थी ही कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जन्मतिथी आहे. आमच्याकडे सूर्यसिद्धांताचे पंचांग वापरले जाते. आजच्या सूर्योदयाला त्यात तृतीया असल्याने आमच्याकडे उद्याच्या सूर्योदयाला भगवान श्री श्रीपादप्रभूंचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. परंतु दृक् सिद्धांताचे पंचांग वापरणाऱ्यांकडे आजच्याच सूर्योदयाला श्रींचा जन्मोत्सव साजरा झाला. खरेतर जन्मोत्सवानिमित्त भगवान श्री श्रीपादप्रभूंचे प्रेमादरपूर्वक स्मरण होणे जास्त महत्त्वाचे आहे. आज का उद्या हा भाग गौण आहे. आपण दोन्ही दिवस श्रींचे स्मरण करू या.
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे सर्वदेवमय आहेत. तेच सृष्टी-स्थिती-लय करणारे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. तेच अज्ञान घालवून ज्ञान देणारे भगवान श्रीगणेश आहेत. तेच आपला मातृवत् सांभाळ करणारी आई जगदंबा आहेत ; आणि शरण आलेल्या जीवावर अनुग्रहकृपा करून त्याच्याकडून परमार्थ करवून घेणारे करुणासागर जगद्गुरूही आहेत ! अशा या अलौकिक व अद्वितीय भगवत्स्वरूपाच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या जयंती निमित्त पूर्वी लिहिले गेलेले अल्पसे चिंतन खालील लिंकवरील लेखात आपण वाचू शकता.
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post_13.html?m=1

27 Aug 2019

नमन संत त्रिमूर्तींना

नमस्कार !
आज श्रावण कृष्ण द्वादशी, श्रीसंत सेना न्हावी महाराज - पंढरपूर, श्रीसंत नारायण महाराज - बेटकेडगांव व स्वामी श्री स्वरूपानंद महाराज - पावस, अशा तिन्ही थोर सत्पुरुषांची पुण्यतिथी !
भगवान श्रीपंढरीनाथांचे अनन्य भक्त असलेल्या श्रीसंत सेना महाराजांच्या चरित्राबद्दल बरेच मतभेद आहेत. काहींच्या मते ते मूळचे महाराष्ट्रीय आहेत तर काहींच्या मते उत्तरभारतीय आहेत. चरित्रसंदर्भ काहीही असोत, पण ते भगवान श्री माउलींच्या काळातील थोर सत्पुरुष होते, श्री माउलींचे लीलासहचर होते यात मात्र काहीच शंका नाही. त्यांची अभंगरचना खूप छान आहे. "आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ॥"  हा त्यांचा रूपक-अभंग खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी सद्गुरु श्री माउलींवरही अप्रतिम अभंगरचना केलेल्या आहेत. ते त्यात श्री माउलींचा पूर्णब्रह्म म्हणूनच उल्लेख करतात. श्रीसंत सेना महाराजांच्या श्री माउलींवरील सर्व अभंगांच्या आधारे मी 'सेना म्हणे जगी पूर्णब्रह्म अवतरले' या शीर्षकाचा बापरखुमादेविवरु मासिकात एक लेखही पूर्वी लिहिलेला होता. त्यांचे अभंग पाहता हे स्पष्ट दिसून येते की, त्यांच्यावर प्रत्यक्ष श्री माउलींनीच अनुग्रहकृपा केलेली होती. त्यामुळे ते श्री माउलींचा 'आपले सद्गुरु' म्हणूनच सर्वत्र गौरव करताना दिसतात. उत्तरायुष्यात ते पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशात राहिले. त्या भागात आजही त्यांचा अनुयायी वर्ग आहे. त्यांची समाधी पंढरपुरात प्रदक्षिणा मार्गावर बेलीच्या महादेवासमोर आहे. संत सेना महाराजांच्या काही अभंगरचना शिखांच्या पवित्र श्रीगुरुग्रंथसाहिब मध्ये समाविष्ट आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरील चौफुल्या जवळील बेट केडगांव येथील थोर सत्पुरुष श्रीसंत नारायण महाराज हे महान राजयोगी होते. खूप राजेशाही थाटात ते राहात असत. सत्यनारायणाच्या पूजा करण्याची त्यांना आवड होती. ते एकाचवेळी एकशे आठ, एक हजार आठ अशा सामुदायिक सत्यनारायण पूजा करीत असत. बेटात यांनी बांधलेले श्रीदत्तमंदिर खूप छान असून तेथील श्रीदत्तमूर्ती ही शिवप्रधान आहे. म्हणजे या त्रिमूर्ती मध्ये मधले मुख हे श्रीविष्णूंच्या ऐवजी श्रीशिवांचे आहे. ( फोटो खाली दिलेला आहे. ) श्री नारायण महाराजांचे महानिर्वाण १९४५ साली बंगलोर येथे वयाच्या एकसष्टाव्या वर्षी झाले. त्यांचे समाधी मंदिर नंतर केडगांव येथे बांधण्यात आले. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या वडिलांकडे, प.पू.श्री.दत्तोपंत देशपांडे यांच्याकडे नसरापूरला पू.श्री.नारायण महाराज तरुण असल्यापासून येत असत. पू.मामाही बेटात त्यांच्याकडे बालपणापासून जात असत. प.पू.श्री.नारायण महाराजांच्या नित्यपूजेतील भगवान श्रीदत्तप्रभू आणि भगवान श्रीविष्णू यांच्या सोन्याच्या भरीव मूर्ती सध्या पुणे येथील महाराष्ट्र बँकेच्या विश्रामबाग वाड्यासमोरील शाखेच्या लॉकरमध्ये असतात. दरवर्षी श्रीदत्तजयंतीपूर्वी एक दिवस त्यांची पूजा होते व सर्वांना दर्शनही खुले असते. अतिशय सुबक व देखण्या आहेत या दोन्ही मूर्ती.
रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील आत्मरंगी रंगलेले थोर सत्पुरुष, स्वामी श्री स्वरूपानंद महाराज हे आमच्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे जवळचे स्नेही होते. स्वामी स्वरूपानंदांचे अभंग ज्ञानेश्वरी व इतर वाङ्मय खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या अभंगरचनाही अतिशय मार्मिक, अनुभूतिप्रचुर आणि रसाळ आहेत. प.पू.श्री.काकांनी आपल्या 'हरिपाठ सांगाती' ग्रंथामध्ये स्वामी स्वरूपानंदांच्या 'ज्ञानेश्वरी नित्यपाठा'च्या निवडक १०८ ओव्यांच्या लघुग्रंथाचा आवर्जून समावेश केलेला आहे.
आजच्या तिथीला, दि.१५ ऑगस्ट १९७४ रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास स्वामींनी पावस येथे देह ठेवला. नेमके त्याच दिवशी फलटण येथे कै.श्री.गोपाळराव फणसे व त्यांच्या पत्नी कै.सौ.अंबूताई प.पू.श्री.काकांच्या दर्शनाला गेले होते. त्यांनी प.पू.काकांना एक शाल अर्पण केली. त्यासरशी प.पू.काका उद्गारले, "आत्ताच तासाभरापूर्वी एका काळ्या माणसाने आम्हांला अशीच शाल घातली." कोणालाच त्यांच्या बोलण्याचा उलगडा झाला नाही. कारण असे कोणीच तत्पूर्वी तेथे आलेलेही नव्हते की कोणी शालही घातलेली नव्हती. सौ.अंबुताईंचे वडील स्वामी स्वरूपानंदांना मानणारे होते, त्याचा संदर्भ घेऊन, प.पू.काकांनी त्या वाक्यातून स्वामी स्वरूपानंदांच्या देहत्यागाचाच नेमका संकेत दिलेला होता. पण फणसेंना ही गोष्ट पुण्याला परत आल्यावर समजली.
यातून प.पू.काका व स्वामी स्वरूपानंद हे एकरूपच होते हे दिसून येते. श्री स्वामींच्या काही अनुगृहीतांनाही प.पू.काका व प.पू.स्वामींचे एकरूपत्व दृष्टांतांमधून अनुभवायला मिळाले होते. त्या अनोख्या लीला "सोनचाफ्याचा सुगंध" या पू.काकांच्या स्मृतिग्रंथाच्या भागांमध्ये छापलेल्या आहेत. पू.श्री.उपळेकर काका आपल्याच अवस्थेत असताना कधी कधी म्हणत की, "आम्ही इथूनच स्वरूपानंदांशी बोलतो !" स्वामी स्वरूपानंद आणि प.पू.योगिराज श्री.गुळवणी महाराज व त्यांचे शिष्योत्तम प.पू.योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचेही अतिशय हृद्य स्नेहसंबंध होते. साधू दिसती वेगळाले । परि ते स्वरूपी मिळाले । हेच खरे आहे अंतिमत: !
या तीनही थोर सत्पुरुषांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग दंडवत !!
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )


24 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - ७

आज श्रावण कृष्ण अष्टमी, श्रीजन्माष्टमी महोत्सव !!
आमचे परमाराध्य भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू आणि भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराजांची आज जयंती ! या दोन्ही अद्वितीय अवतारांच्या श्रीचरणारविंदी सादर साष्टांग दंडवत !!
गेले सात दिवस आपण सद्गुरु श्री माउलींच्या स्मरणाचा महोत्सव साजरा करीत आहोत. ही नि:संशय त्यांचीच परमकृपा म्हणायला हवी. कररण त्यांचे स्मरण होणे हे केवळ त्यांच्याच कृपाप्रसादाने शक्य आहे. तो आपल्या कर्तृत्वाचा भागच नाही.
सद्गुरु श्री माउलींच्या चरित्रावर आधारलेले एक सुंदर अष्टक प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी रचलेले आहे. नित्यपाठात ठेवावे असे हे अष्टक आजच्या या समारोपाच्या लेखात मुद्दामच देत आहे. श्री माउलांच्या समग्र चरित्राचे थोडक्यात स्मरण त्याद्वारे होईल.  छोटेसेच असल्याने लवकर पाठ देखील होऊ शकेल. हे अष्टक दररोजच्या श्री ज्ञानेश्वरी वाचनापूर्वी किंवा नंतर म्हणता येण्यासारखे आहे. त्यानिमित्ताने रोज श्री माउलींचे स्मरणही होईल आणि या अष्टकाला असणारा, 'भवसागरातील भयांपासून मुक्ती' हा आशीर्वादही आपल्याला लाभदायक ठरेल, यात शंकाच नाही.
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज विरचित, ॥ श्रीज्ञानदेवाष्टक ॥
महिंद्रायणीचे तटी जे आळंदी ।
दुजी पंढरीक्षेत्र लोकी प्रसिद्धी ।
असा घेतला तेथ जेणे विसावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥१॥
पिता विठ्ठल विख्यात रुक्माई माता ।
दयाशील दांपत्य नाही अहंता ।
तये पोटी न कां जन्म हा घ्यावा । नमस्कार..॥२॥
कलीमाजी तारावया भाविकांना ।
सुविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ केला ।

समाधान जो देई गीतार्थ जीवा । नमस्कार..॥३॥
चमत्कार नाना जगी दावियेले ।
पशूच्या मुखे वेदही बोलविले ।
असे थोर आश्चर्य वाटेचि जीवा । नमस्कार..॥४॥
द्विजाच्या घरी श्राद्धकाळी जिवंत ।
करी जेववी पूर्वजाते समस्त ।
मुखी घालती अंगुली लोक तेव्हा । नमस्कार..॥५॥
अगा व्याघ्रयाने वृथा खेळताहे ।
पहा भिंत निर्जीव ही चालताहे ।
असे दाखवी लाजवी चांगदेवा । नमस्कार..॥६॥
नसे द्वैतबुद्धी दया सर्वभूती ।
अशी देखिली ती संतमूर्ती ।
नसे साम्य लोकी जयाच्या प्रभावा । नमस्कार..॥७॥
महायोगी लोकी ऐसी प्रसिद्धी ।

आळंदीपुरी तोचि घेई समाधी ।
अशा ते न कां विश्वरूपी म्हणावा । नमस्कार..॥८॥
वदे भक्तीने नित्य या भाविकांसी ।
भवाब्धि भये बाधिती ना तयासी ।
म्हणे दास गोविंद विश्वास ठेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥९॥

सद्गुरु भगवान श्री माउलींच्या अवतरणामागची फारशी माहीत नसलेली एक अनोखी हकिकत प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगत असत. तीच हकिकत खालील लिंकवरील लेखात सविस्तर दिलेली आहे. ते छोटेसे जन्माख्यानच आहे म्हणा हवे तर. आजच्या परम पुण्यदिनी आपण सर्वांनी श्रीहरि भगवंत आणि श्री माउलींची जास्तीतजास्त स्मरण, पूजन, वंदनादी सेवा करून धन्य होऊ या !
गेले सात दिवस तुम्हां सर्व भाविक वाचकांच्या सहकार्याने संपन्न झालेली ही श्री माउली गुणानुवादन सेवा सर्वभावे श्री माउलींच्याच श्रीचरणीं सादर समर्पित करतो ; आणि आम्हां सर्वांकडून निरंतर सेवा, साधना व स्मरण घडो, अशी त्यांच्या चरणीं प्रार्थना करून तेथेच तुलसीदल रूपाने विसावतो !!
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - ७
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post_2.html?m=1

22 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - ६

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे सर्वकाही अद्वितीयच आहे ! कारण तेच एकमेवाद्वितीय असे विलक्षण अवतार आहेत. त्यांची संजीवन समाधी सुद्धा एकमेवाद्वितीयच आहे. त्या संजीवन समाधिस्थितीत राहून ते आजही सदैव कार्यरत आहेत. त्यांचे अधिष्ठान तेथे प्रकट आहे. आपल्या भक्तांवर कृपेची, मायेची पखरण करीत हे 'करुणाब्रह्म' आजही अखंड जागृत आहे.
सद्गुरु भगवान श्री माउलींच्या संजीवन समाधीचे माहात्म्य, प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथ आणि श्रीसंत नामदेवांच्या संवादाच्या माध्यमातून सांगताना सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात,
मोक्ष मुक्ति ऋद्धिसिद्धि ।
पाहतां समाधी ज्ञानदेवा ॥१॥
ऐसा लाभ सांगे देव ।
ऐके नामदेव आवडी ॥२॥
दरुशनें नासे व्याधी पीडा ।
ऐसा सवंगडा ज्ञानदेव ॥३॥
एका जनार्दनीं मापारी ।
नाचतसे अलंकापुरी ॥ए.गा.३५११.४॥

"श्रीसंत नामदेव महाराजांनी भगवान श्रीपंढरीनाथांनाच सद्गुरु श्री माउलींच्या समाधीचे माहात्म्य विचारले. त्यावर देव म्हणाले की, "अरे नामया, माझ्या अत्यंत लाडक्या ज्ञानदेवाच्या संजीवन समाधीचे प्रेमभावे दर्शन घेतल्यास चारी मुक्ती, मोक्ष, ऋद्धी-सिद्धी सर्वकाही प्राप्त होते. जे जे हवे ते मिळते. या समाधीच्या दर्शनाने सर्व प्रकारच्या व्याधी, पीडा नष्ट होतात, भवपीडाही कायमची जाते. कारण हा ज्ञानोबा माझा अतिशय जिवलग असा सवंगडीच आहे !" सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात की, "हे देवांच्याच मुखातून स्रवलेले माहात्म्य जाणून मी तर अलंकापुरातील या श्री माउलींच्या संजीवन समाधीसमोर त्यांचे नामस्मरण करीत अखंड नाचत आहे. त्यायोगे मोजताही येणार नाही एवढे शुद्ध पुण्य माझ्या पदरी जमा होत आहे. श्रीकृपेने माझे माप शिगोशीग भरलेले आहे."
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींची संजीवन समाधी ही अतिशय अद्भुत आणि अलौकिक आहे. ही एकमेवाद्वितीय अशीच आहे. कारण त्यांच्याशिवाय आजवर कोणीही अशा पद्धतीने संजीवन समाधी घेतलेली नाही आणि पुढेही कोणीही घेणार नाही. तो बहुमान केवळ श्री माउलींसाठीच इतर सर्व संतांनी एकमताने राखीव ठेवलेला आहे.
संजीवन समाधी म्हणजे जिवंत समाधी नव्हे. ही एक अत्यंत जटिल व अवघड प्रक्रिया आहे. खालील लिंकवरील सहाव्या लेखात संजीवन समाधीबद्दल पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्याकडून उपलब्ध झालेली अतिशय दुर्मिळ व महत्त्वाची माहिती एकत्र केलेली आहे. सद्गुरु श्री माउलींच्या संजीवन समाधीचे रहस्य कथन करणारा हा लेख आवर्जून वाचावा, त्या माहितीवर मनन करावे म्हणजे श्री माउलींचे लक्षणीय अद्वितीयत्व आणखी चांगल्याप्रकारे जाणवेल.
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ।
सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय ।
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - ६
https://rohanupalekar.blogspot.com/2018/09/blog-post.html?m=1

21 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - ५

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे यच्चयावत् सर्व मराठी संतांचे जीवीचे जिवलग आहेत, सोयरे-धायरे आहेत, सर्वस्वच आहेत. आपल्या संतांचे अवघे विश्वच सद्गुरु श्री माउलींभोवती फिरते. भगवान श्रीपंढरीरायांचे अनन्य भक्त असणारे श्रीसंत सेना न्हावी महाराज तर सद्गुरु श्री माउलींच्या गुणवर्णनात पुरेपूर रंगून जातात. श्री माउलींचे माहात्म्य सांगताना त्यांना सर्वस्वाचाच विसर पडतो, काय नि किती सांगू असे होऊन जाते. आता हाच अभंग पाहा त्यांचा, किती गोड बोलत आहेत ते यात.
ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं ।
उतरी पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥
ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ।
तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥
ज्ञानदेव माझे सोयरे धायरे ।
जिवलग निर्धारे ज्ञानदेव ॥३॥
सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान ।
दाविली निजखूण ज्ञानदेवे ॥स.सं.से.१२६.४॥

"सद्गुरु श्री ज्ञानदेव माउली हे माझे गुरु आहेत, तेच माझे भवसागरातून तरून जाण्याचे महान असे तारू, जहाज देखील आहेत. त्यांच्याच साहाय्याने मी हा दुस्तर भवसागर सहजतेने तरून जाणार आहे, गेलो आहे. (या जहाजाचा माझ्यासारखाच तुम्ही देखील आश्रय घ्यावा.)
सद्गुरु श्री ज्ञानदेव माउली हेच माझे खरे माता-पिता आहेत. कारण तेच आजवर सर्वार्थाने, सर्व बाजूंनी आणि सदैव माझा सांभाळ करीत आलेले आहेत. त्यांच्या कृपाप्रसादानेच ही दुर्धर भवव्यथा नष्ट होणार आहे, याची मला पूर्ण खात्री पटलेली आहे. माझे आप्त, माझे सोयरे-धायरे, माझे जिवलग सखे सर्वकाही हे सद्गुरु श्री माउली भगवानच आहेत. मला त्यांच्याशिवाय दुसरा कोणताच आधार नाही ; आणि आता ते असताना दुसऱ्या कोणत्याही आधाराची मला गरजही नाही.
सेना महाराज म्हणतात की, हे सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज माझे सर्वश्रेष्ठ असे निधान आहेत, माझे अपरिमित वैभव आहेत, माझा अनर्घ्य रत्नांचा खजिनाच आहे. कारण त्यांनीच मला कृपापूर्वक 'निजखूण' दाखवून ब्रह्मस्वरूप केलेले आहे. म्हणूनच मी त्यांना पूर्णपणे, अनन्यतेने शरण जाऊन, त्यांच्याच श्रीचरणीं कायमचा लीन होऊन राहिलेलो आहे !"
(सद्गुरु भगवान श्री माउलींच्या काळातील संतांच्या आणि त्यांच्या अलौकिक स्नेहसंबंधांवर प्रकाश टाकणारा तसेच प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी श्री माउलींवर लिहिलेल्या "चैतन्यचक्रवर्ती" या संगीत नाटकाचे रसग्रहण करणारा लेख खालील लिंकवर वाचता येईल.)
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - ५
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_23.html?m=1

20 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - ४

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे नाम हे श्रीभगवंतांच्या नामासारखेच पुण्यपावन आहे. 'ज्ञानदेव' या चतुराक्षरी नामाचा मनोभावे जप करणारा परमार्थाचा अधिकारी होतो असे अनेक संतांनी म्हणूनच सांगून ठेवलेले आहे. प्रज्ञाचक्षू ज्ञानेश्वरकन्या श्रीसंत गुलाबराव महाराजांच्या श्रीज्ञानेश्वर मधुराद्वैत संप्रदायात 'ज्ञानेश्वरमाउली' या सप्ताक्षरी नामाचा सदैव जप करतात. वारकरी संप्रदायातही 'महाराज ज्ञानेश्वर माउली' आणि 'ज्ञानोबा तुकाराम' ही नामे महामंत्र असल्यासारखेच मानतात. आजवर होऊन गेलेल्या असंख्य महात्म्यांनी या नामाच्या जपाने ब्रह्मस्थिती मिळवलेली आहे.
श्रीसंत एकनाथ महाराज, श्रीसंत हैबतराव बाबा आरफळकर व श्रीसंत गुलाबराव महाराज या तीन महात्म्यांना प्रत्यक्ष सद्गुरु भगवान श्री माउलींच्या मुखातून त्यांच्याच नामाचा उपदेश लाभलेला होता. श्रीसद्गुरूंकडून स्वनामाचा उपदेश होणे हाच मुळात अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो. या तिन्ही महापुरुषांना साक्षात् श्री माउलींकडून असा स्वनामाचा उपदेश झाला होता. याचा अर्थ त्यांच्यावर सद्गुरु श्री माउलींचे अात्यंतिक प्रेम होते. केवढे महान भाग्य आहे हे !!
सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पावन नामाचे आणि आळंदी क्षेत्राच्या दर्शनाचे माहात्म्य सांगताना सद्गुरु श्री एकनाथ महाराज म्हणतात,
ज्ञानदेव ज्ञानदेव वदतां वाचे ।
नाहीं कळिकाळाचे भेव जीवां ॥१॥
जातां अलंकापुर गांवीं ।
मोक्ष मुक्ति दावी वाट त्यासी॥२॥
ब्रह्मज्ञान जोडोनी हात ।
म्हणे मी तुमचा अंकित ॥३॥
वाचे वदतां इंद्रायणी ।
यम वंदितो चरणीं ॥४॥
एका जनार्दनीं भावें ।
ज्ञानदेवा आठवावें ॥ए.गा.३५०९.५॥

"ज्ञानदेव ज्ञानदेव असे सतत वाचेने वदणाऱ्या जीवाला कळिकाळाचे कसलेही भय राहात नाही. तो कधीच कोणत्याही भयाने पीडला जात नाही. मनोभावे अलंकापुर क्षेत्री श्री माउलींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाग्यवान जीवाला प्रत्यक्ष मोक्षच वाटाड्या म्हणून लाभतो. अर्थात् त्याचा मोक्षापर्यंतचा सगळा प्रवास सुखावह होतो. श्री माउलींच्या कृपेने ब्रह्मज्ञानच हात जोडून त्याच्या समोर उभे ठाकते. ज्ञान त्याचे कायमचे अंकित होऊन राहते. कृपासलिला इंद्रायणीचे नाम घेतल्याबरोबर महामृत्यू यमच त्याचे चरणी वंदन करतो.  सद्गुरु श्री माउलींच्या प्रकट अस्तित्वामुळे आळंदी देखील अशाप्रकारे मोक्षदायिनी ठरलेली आहे. म्हणूनच, श्रीसंत एकनाथ महाराज कळकळीने विनवतात की, तुम्ही-आम्ही सदैव प्रेमाने, आदराने, मनापासून सद्गुरु श्री ज्ञानदेवांना आठवावे, त्यांचे भजन-पूजन करावे, त्यांचे नामस्मरण करावे ; आणि धन्य होऊन जावे !"
(सद्गुरु भगवान श्री माउलींच्या चरित्रावर प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी रचलेल्या "श्रीज्ञानदेव विजय" या ओवीबद्ध ग्रंथाची माहिती व त्याआधारे श्री माउलींच्या नामाचे माहात्म्य कथन करणारा लेख खालील लिंकवर वाचता येईल.)
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - ४
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_30.html?m=1

प.प.श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज

आज श्रावण कृष्ण पंचमी, पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची १६५ वी जयंती.
सद्गगुरु श्री.टेंब्ये स्वामी महाराज म्हणजे परिपूर्ण श्रीदत्तप्रभूच. त्यांचे समग्र चरित्र अनन्यतेचा आणि शास्त्रोचित वर्तनाचा वस्तुपाठच आहे. भगवान श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेशिवाय ते कुठलीही छोटीशी देखील गोष्ट करीत नसत. आणि शास्त्राज्ञेसमोर कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. प्रत्यक्ष भगवान श्रीपंढरीनाथांनाही त्यांनी शास्त्राज्ञेचे कारण सांगून विनम्रपणे प्रसाद नाकारला होता. एवढी अढळ निष्ठा होती त्यांची भगवदाज्ञारूप शास्त्रावर !
एरवी अतीव कोमल आणि कनवाळू असे स्वामी महाराज प्रसंगी मोठा रागाचा आविर्भाव आणीत असत. अर्थात् तो समोरच्या व्यक्तीच्या हितासाठीच धारण केलेला असे. त्यांच्या विशुद्ध चित्तात रागद्वेषादी ऊर्मी कधीच नव्हत्या. ते तर लोण्याच्या गोळ्यासारखे मऊसूत होते. आदर्श भगवद्भक्त जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी प.प.श्री.टेंब्ये स्वामींचे चरित्र मनापासून अभ्यासायला हवे.
प.प.श्री.टेंब्येस्वामींची ग्रंथसंपदा हा तोंडात बोट घालावे असाच चमत्कार आहे. जन्म जन्म जातील त्या संपदेचा अभ्यास करायला. इंद्रधनुष्यातील सातही रंग अप्रतिमच असतात, त्यात उणा-अधिक कोणताच नसतो. तसेच प.प.श्री.टेंब्येस्वामींचे सर्व ग्रंथ विलक्षणच आहेत. त्यांचे कृपासामर्थ्य त्या सर्व ग्रंथांमध्ये, त्यांच्या रचनांमध्ये ओतप्रोत भरलेले आहे. म्हणूनच आपण सदैव त्यांचे वाचन-मनन करायला हवे. पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशनाने 'प.प.श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अक्षयवाङ्मयमाला' या प्रकल्पाद्वारे श्रीस्वामी महाराजांचे सर्व वाङ्मय देखण्या स्वरूपात पुन:प्रकाशित केले असून, भाविक-वाचकांना ते ३०% सवलतीत उपलब्ध आहे.
आज प.प.श्री.स्वामींच्या जयंती दिनी त्यांच्या श्रीचरणीं दंडवत घालून सर्वांच्या वतीने मनोभावे कृपायाचना करतो. प.प.श्री.स्वामी महाराजांच्या चरित्र व वाङ्मयावर आणि अलौकिक अशा करुणात्रिपदीवर पूर्वी लिहिलेले एकूण तीन लेख खालील लिंकवर वाचता येतील. आजच्या पावन दिनी तेही लेख आपण सर्वांनी आवर्जून वाचून श्रीचरणीं आपला प्रेमभाव विदित करावा ही सप्रेम प्रार्थना !!
अलौकिक वाङ्मयसम्राट प.प.श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_31.html?m=1

19 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - ३

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली हे साक्षात् भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंचे परिपूर्णतम अवतार आहेत. श्रीभगवंतांनी श्रीगीतेचा उपदेश केला, सद्गुरु श्री माउलींनी त्या गीतेचा श्रीभगवंतांना अभिप्रेत असणारा नेमका अर्थ सांगण्यासाठी श्री भावार्थदीपिका तथा श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केली. भगवद् गीता ही जशी श्रीभगवंतांची वाङ्मयी श्रीमूर्ती आहे, तशीच श्री ज्ञानेश्वरी ही सद्गुरु श्री माउलींची वाङ्मयी श्रीमूर्ती आहे. सद्गुरु श्री माउलींसारखीच त्यांची ही शब्दमूर्ती देखील अत्यंत कनवाळू, कृपाळू, प्रेमळ आणि सर्वसामर्थ्यसंपन्न आहे ! म्हणूनच जो या श्री ज्ञानेश्वरीला अनन्य शरण जाऊन राहतो त्याचे कोटकल्याणच होते, असा आजवरच्या असंख्य महात्म्यांचा स्वानुभव आहे.
सद्गुरु श्री माउलींच्या सारखीच कृपावंत असणारी ही श्री ज्ञानेश्वरी माउली देखील लीलया बद्धांचे साधक करते, साधकांचे सिद्ध करते, सिद्धांचे महासिद्ध करते आणि त्यांना अखंड भगवत्स्वरूप करून ठेवते. तिचे हे माहात्म्य जाणून सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराज म्हणतात,
भाव धरूनियां वाची ज्ञानेश्वरी ।
कृपा करी हरी तयावरी ॥१॥
स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु ।
श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेसी ॥२॥
तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे ।
भय कळिकाळाचें नाही तया ॥३॥
एका जनार्दनीं संशय सांडोनी ।
दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥ए.गा.३५३३.४॥
" 'सद्गुरु श्री माउली हे साक्षात् भगवंत आहेत आणि त्यांची ज्ञानेश्वरी ही माझ्या उद्धारासाठीच निर्माण झालेली त्यांची प्रत्यक्ष श्रीमूर्तीच आहे' ; असा भाव धरून जर एखाद्याने श्री ज्ञानेश्वरीला शरण जाऊन तिची सर्व प्रकारे सेवा करायला सुरुवात केली तर श्रीभगवंत त्या जीवावर कृपा करतातच !!
श्रीगीता हा प्रश्नोत्तररूप संवाद भगवंत आणि अर्जुनामध्ये झाला. तेच भगवंत पुन्हा माउलींच्या अवतारात ज्ञानेश्वरी वदले. म्हणूनच या पावन ग्रंथाचे नाम घेतल्याने, पूजन केल्याने,  वाचन-मनन-चिंतन-लेखन केल्याने व तिची जशी जमेल तशी सेवा केल्याने कळिकाळाचे भयच उरत नाही. यासाठीच सर्व प्रकारचे संशय सांडून, अत्यंत प्रेमादरपूर्वक आणि दृढ भक्तिभावाने सद्गुरु श्री माउलींच्या या वाङ्मयी श्रीमूर्तीला हृदयी दृढ धरावे. त्यातच आपले खरे हित आहे" ; असे सद्गुरु श्री एकनाथ महाराज येथे स्वानुभवपूर्वक कथन करीत आहेत.
(सद्गुरु श्री माउलींच्या करुणाकृपारूप अक्षरब्रह्माचे, श्री ज्ञानेश्वरीचे महत्त्व आणि माहात्म्य श्रीसंत जनाबाईंच्या अभंगाच्या आधारे खालील लिंकवरील लेखात मांडलेले आहे.
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - ३
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_29.html?m=1