22 Jan 2024

राजाधिराज भगवान श्रीरामचंद्र महाराज की जय !!

जय श्रीराम !!!!!!

पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली. सूर्यवंशभूषण राजाधिराज महाराज श्रीरामचंद्र भगवान आपल्या राजप्रासादात आज विराजमान झाले आहेत !! 
हा अत्यंत सद्भाग्याचा क्षण आपण याचि देही अनुभवतो आहोत, लौकिकार्थाने यापेक्षा मोठे भाग्य ते काय ? जन्मभर ही स्मृती जपून ठेवावी, मरेपर्यंत पुन:पुन्हा कौतुकाने कथन करावी असाच हा भाग्ययोग आहे. भगवान श्रीरामरायांच्या जयजयकारात आम्ही हा क्षण पाहून धन्य ठरलो !
'ठकाराचे ठाण' अर्थात् दैवी सौंदर्याची खाण असणाऱ्या भगवान श्रीरामरायांची आज प्रतिष्ठापित झालेली अतिशय रेखीव, देखणी, विलोभनीय श्रीमूर्ती व तिचे सुहास्य वदन पाहून ऊर भरून आला. सुरेख सजविलेले भव्य-दिव्य श्रीराम मंदिर डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या ना त्या प्रकारे ज्या ज्या सर्वांचे हात या कार्यात लागले त्या त्या सर्वांची कृतज्ञतेने स्मरणवंदना करतो !
स्वकर्तृत्वाने भाग्यवान ठरलेल्या ज्या लक्षावधी भक्तांनी आजवर ही भूमी परत मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्वांना ते जिथे कुठे असतील तिथे आज केवढा आनंद होत असेल याचा आपण विचारही करू शकत नाही; केवळ त्यांच्या पायी दोन अश्रू ढाळून कृतज्ञता मात्र व्यक्त करू शकतो. ही कृतज्ञत व्यक्त करणे हे तमाम भारतीयांचे कर्तव्यच आहे. 
पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही कृतज्ञतापूर्वक अभिनंदन. कोणी काहीही बरळो, मोदीजींच्या टीमनेच हे अशक्य वाटणारे कृत्य सत्यात उतरवलेले आहे, यात शंका नाही. 
आजचा दिवस अवघ्या भारताने अत्यंत आनंदात, मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे. अयोध्येतील लाईव्ह प्रक्षेपण एकेका लिंकवर दोन-दोन लाख लोक एकावेळी पाहात होते. आपला अवघा देश श्रीराममय होऊन गेला आहे. आज संध्याकाळी देशभर खरोखर दुसरी दिवाळीच साजरी होणार आहे. जनसामान्यांचा हा उत्साह, हा आनंदच आमची एकात्मता, आमची अस्मिता आणि आमचे आदर्श जगासमोर उच्चरवाने उद्घोषित करतो आहे. हे पुढेही असेच टिकू दे आणि सनातन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन होऊ दे रे रामराजा !!
यतो धर्मस्ततो जय: । हे शाश्वत सत्यच आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दृग्गोचर झाले आहे. भगवान श्रीराम हे धर्माची साक्षात् श्रीमूर्ती आहेत; आणि कितीही अडचणी आल्या तरी, जसे खोल पाण्यातूनही कमलपुष्प वर येऊनच उमलते, तसे आज कमलपुष्पावर उभे असलेले मनमोहक भगवान श्रीराम प्रतिष्ठापित झाले आहेत. एक ना एक दिवस अधर्माचा समूळ विनाश होऊन धर्माचाच विजय होत असतो !
जिथे भगवान श्रीरामराय आणि त्यांचे दासोत्तम वीरवर श्रीहनुमान प्रकटतात, तिथली भूतप्रेतपिशाचे पाय लावून पळून जातात, ही वस्तुस्थिती आहे. 'पळे भूतबाधा भेणे तेथे ।' असे श्रीमाउलींनी म्हटलेले आहेच. त्यामुळे ज्यांना आजच्या या अद्वितीय सोहळ्यामुळे पोटशूळ उठला, ज्यांची झोप उडाली, मती भ्रष्ट होऊन जे निरर्थक बडबडू लागले, त्या समस्त राजकीय, अराजकीय पुरोगामट्या-भामट्या भूतप्रेतपिशाचांच्या विचकट नाचाकडे आपण दुर्लक्ष करून आपला आनंद दणक्यात साजरा करू या. आपल्या गगनभेदी "जय श्रीराम" घोषणांनी त्यांचा जीव असाही जाणारच आहे यात शंका नाही.
आजच्या तारखेचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांची आज तारखेने पुण्यतिथी आहे. त्यांनी माघ कृष्ण नवमी, दि.२२ जानेवारी १६८२ रोजी सज्जनगडी देहत्याग केला होता. श्री समर्थांच्या देहत्याग तारखेलाच, त्यानंतर ३४२ वर्षांनी आज श्रीरामराय आपल्या स्वत:च्या प्रासादात पुनर्स्थापित होत आहेत. 
पुन्हा एकदा "जय श्रीराम - सियावर रामचंद्र की जय !" अशी ललकारी देऊ आणि आनंदात निमग्न होऊ या !!
- रोहन विजय उपळेकर.