31 May 2016

*** सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ***



आज वैशाख कृष्ण दशमी, श्रीज्ञानेश्वरभगिनी  ब्रह्मचित्कला सद्गुरु श्रीसंत मुक्ताबाई महाराजांचा ब्रह्मलीन दिन !
श्रीमुक्ताबाई या फार थोर विभूतिमत्व होत्या. अश्विन शुद्ध प्रतिपदेला, घटस्थापनेला पृथ्वीतलावर आविर्भूत झालेली ही साक्षात् आदिशक्ती जगदंबाच होती. त्यांचे वर्णन करताना सर्वच संत गहिवरून जातात, ते उगीच नाही.
श्रीसंत मुक्ताईंच्या अलौकिक स्वरूपात; मातेचे वात्सल्य, कारुण्याचा परमोत्कर्ष, भगिनीचा अवखळपणा, श्रीगुरुकृपेचे शांभव समाधी-वैभव, अखंड स्वरूपस्थितीचा अपूर्व आविष्कार, स्वानुभूत ज्ञानाचा निरंतर वाहणारा झरा व त्यामुळे प्राप्त झालेला परमार्थप्रांतातला लोकविलक्षण अद्वितीय अधिकार, अखंड आत्मतदाकारतेमुळे आलेली जगाविषयीची एक मस्तवाल बेफिकिरी, अवधूती मस्ती यासारख्या अनेक गोष्टी एकाच वेळी प्रकटलेल्या पाहायला मिळतात. म्हणूनच सगळे संत त्यांना " आदिशक्ती मुक्ताबाई " असे अतीव गौरवाने म्हणतात.
भक्तश्रेष्ठ नामदेवांसारख्या महात्म्याला, भक्तीत न्यून ठरणारा अल्पसा अहंकारही स्पष्टपणे दाखवून देण्याची हिंमत बाळगणारी लहानगी मुक्ताई त्यांना " सणकांडी " भासली तर नवल नाही. सणकांडी म्हणजे तडतडणारी प्रकाशमय फुलबाजी. चौदाशेवर्षे योगसाधनेने जिवंत राहिलेल्या श्रीचांगदेवांना, सिद्धींच्या नादात आयुष्य व्यर्थ गेले असे ठणकावून सांगून श्रीगुरुकृपेचे खरे माहात्म्य पटवून देणारी आणि वर ती अद्वयानंद वैभव असणारी श्रीगुरुकृपा प्रदान करून परिपूर्ण करणारी ही ब्रह्मचित्कला खरोखरीच अवर्णनीय आहे. प्रत्यक्ष आपल्या सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउलींनाही, आपल्या जन्म-कर्माचे भान सुटू नये म्हणून विनम्रपणे ताटीचे अभंग रचून बोध करणा-या या श्रीमुक्ताईंचे अवघे विश्वच सामान्य बुद्धीला अनाकलनीय आहे, शब्दांच्या पलीकडचे, त्यांच्या कवेत न मावणारे आहे. त्या साक्षात् आदिशक्तीच आहेत, हेच त्यांच्याकडे पाहून वारंवार मनापासून पटते.
भगवान श्रीमाउलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर महिन्याभराने सासवडला श्रीसोपानदेवांनी समाधी घेतली. त्यानंतर पुणतांब्याला श्रीमुक्ताईंचे स्वनामधन्य शिष्य श्रीचांगदेवांनीही समाधी घेतली. त्यासुमारास श्रीमुक्ताईंना स्वरूपाची फार ओढ लागली असल्याचे सर्व संतांना जाणवू लागले. म्हणून श्रीनिवृत्तिनाथांनी मुक्ताईला, कोणत्या दिवशी तू गमन करणार ? असे विचारले. त्यावर मुक्ताईंनी दिलेले उत्तर त्यांचा पारमार्थिक अधिकार स्पष्टपणे सांगणारे आहे. त्या म्हणतात,
आमुच्या स्वस्थानीं नाहीं पा अंधार ।
अवघे चराचर प्रकाशत्वें ॥१॥
उदय आणि अस्तु नाही स्वरूपासी ।
ऐसे मुनिऋषी जाणताती ॥२॥
आम्ही कधीं आलो स्वरूप सोडोन ।
जावे पालटोन जेथील तेथे ॥३॥
अंतर बाहेर स्वामींचें स्वरूप ।
स्वयें नंदादीप उजळिला ॥४॥
" श्रीसद्गुरुराया, आमच्या नित्यवसतीच्या स्थानी कसलाच अंधार नाही, तेथील सगळे विश्वच प्रकाशरूप आहे. आमच्या निरंतर अनुभूतीला येणा-या आत्मसूर्याला उदय अस्त नाहीत, तो अखंड उदितच आहे. आम्ही कधी आमचे स्वरूप सोडून आलो म्हणून आम्हांला तेथे पुन्हा जायची गरज? आमच्या श्रीगुरुस्वामींचेच अपरंपार व आनंदमय स्वरूप, त्यांच्याच कृपेने प्रकटलेल्या शांत-स्निग्ध बोधदीपाच्या तेजात आमच्या नित्य अनुभूतीत प्रतीत होत असल्याने, सर्वत्र तोच ब्रह्मानंदोत्सवच आम्ही अविरत साजरा करीत आहोत. तेव्हा जाणेयेणे हा आमच्यासाठी केवळ एक भ्रमच आहे. " काय ही अनुभूतीची सखोलता !! श्रीगुरुकृपेने आकळलेला शांभव बोध सर्वांगी धारण करून त्या बोधाचा परिपाक असणारी ही निरालंब स्वानंदस्थितीच जणू श्रीमुक्ताई हे नामरूप धारण करून प्रकटलेली होती. खरोखरीच धन्य त्या श्रीमुक्ताई !!
श्रीसंत मुक्ताबाईंची अभंगसंपदा अल्प असली तरी त्यांच्याच स्वरूपासारखी अत्यंत गूढ-गहन आहे. सर्वसामान्यांच्या आकलनकक्षेच्या कैक योजने दूर असणारे हे शब्दधन केवळ श्रीगुरुकृपेच्याच बळावर आपल्या बुद्धीत प्रकाशते, म्हणून त्याचे मोल अनन्यसाधारण आहे. श्रीसंत मुक्ताबाईंच्या " मुंगी उडाली आकाशी । " या अत्यंत गहन अभंगावर श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराजांच्या अधिकारी शिष्या प. पू. सौ. शकुंतलाताई  आगटे यांनी फार सुरेख प्रवचनसेवा केलेली आहे. श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे लहानसेच पण विलक्षण पुस्तक, श्रीसंत मुक्ताबाईंचा सर्वार्थाने थोर अधिकार व त्यांच्या " सांगण्याची " खोली आपल्याला जाणवून देण्यात समर्थ आहे. हा अभंग वाचून एखाद्याला त्याचा सरळ अर्थही सांगणे शक्य नाही. पू. सौ. ताईंनी तर त्याचा अद्भुत योगार्थही अप्रतिमरित्या समजावून सांगितला आहे. भगवती कुंडलिनी शक्तीच्या कार्याचे मार्मिक वर्णन करणा-या श्रीमुक्ताबाईंच्या या कूट अभंगाचे हे विवरण नक्कीच वाचनीय, नित्य चिंतनीय आहे. ( मुंगी उडाली आकाशी : श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. सवलत मूल्य: ₹ २० /-)
तापी तीरावरील पुरातन तपोभूमी असलेल्या मेहूण गावी आजच्या तिथीला श्रीमुक्ताई ब्रह्मलीन झाल्या. ही आदिमाया जशी प्रकटली तशीच नकळत स्वरूपी मिसळली देखील ! मनोहर नभात अंकुरलेल्या विराटाच्या गाभ्यात वीज कडाडली, तशी ही भूलोकीची तेजस्वी ज्ञान-शलाका आपल्या मूळ स्वरूपात सर्वांच्या देखत पण कोणाच्याही नकळत विरून गेली. मागे उरले ते त्यांचे " मुक्ताबाई " हे पावन नाम, त्यांच्या परमपावन लीला-कथा. त्या पापहारक नाम, रूप व कथांच्या सप्रेम स्मरणाने आजच्या पुण्यदिनी आपणही पावन होऊया  !!
श्रीसंत एकनाथ महाराज श्रीमुक्ताबाईंचा यथोचित गौरव करताना अतीव प्रेमभराने म्हणतात,
मुक्तपणें मुक्त श्रेष्ठपणें श्रेष्ठ ।
सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती ॥
मुक्ताबाई चतुर्विधा ।
जो जप करील सदा ।
तो जाईल मोक्षपदा ।
सायुज्यसंपदा पावेल ॥
जय मुक्ताई माउली !!
( मुंगी उडाली आकाशी : श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 सवलत मूल्य: ₹ २० /-)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

26 May 2016

चोखा चोखट निर्मळ अंतर्बाह्य गंगाजळ



आज वैशाख कृष्ण पंचमी, भगवान सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउलींच्या शिष्य प्रभावळीतील, नावाप्रमाणेच विशुद्ध, चोख विभूतिमत्व असणा-या श्रीसंत चोखामेळा महाराजांची आज पुण्यतिथी आहे.
पंढरपुरातील थोर हरिभक्त संतांच्या यादीत श्रीसंत चोखामेळा महाराजांचे नाव अग्रणी आहे. ते श्रीसंत नामदेवरायांचे शिष्योत्तम होते. श्रीनामदेवांच्या कुटुंबाप्रमाणेच, श्रीचोखोबा, त्यांच्या पत्नी सोयराबाई, पुत्र कर्ममेळा, बहीण निर्मळा, मेव्हणा बंका असे सारे पूर्ण हरिरंगी रंगलेले भगवद् भक्तच होते. काय त्या अलौकिक काळाच्या भाग्याचे वर्णन करणार? अठरा पगड जातीतील सगळे संत त्या काळात माउलींच्या छत्रछायेत नवनवीन उत्साहाने भक्तीचा डांगोरा पिटत होते. मोठ्या आनंदाने हरिभक्तीत रममाण झालेले होते.  या सर्व संतांचा चोखोबांना भरपूर सहवास लाभला आणि त्यांनी या अक्षर सहवासाचे खरोखरीच सोने केले. त्याच्या बळावर अनंत असा परमात्मा हृदयी पूर्णपणे धारण केला.
संतांचा आणि त्यांच्या प्रेममत्त, भावपूर्ण वाङ्मयाचा अभ्यास हा लौकिक मोजपट्ट्यांनी आणि अननुभूत काल्पनिक निकषांच्या कमकुवत आधारावर कधीच करायचा नसतो. किंबहुना तसा जर अभ्यास केला तर तो अभ्यास न होता केविलवाणा कल्पनाविलासच अधिक ठरतो; आणि ती शब्दांची वायफळ कसरत ' बोलाचीच कढी बोलाचाच भात ' होऊन शेवटी ख-या आनंदाची भूक अतृप्तच राहाते.
श्रीसंत चोखोबारायांच्या बाबतीत अनेक अभ्यासकांची हीच गफलत झालेली दिसून येते. ते हिरीरीने तत्कालीन विषम जातिव्यवस्थेचा चोखोबांना व त्यांच्या कुटुंबाला कसा त्रास झाला, याची त्यांच्या तसे वर्णन असणा-या एखाददुस-या अभंगाचा आधार घेऊन निरर्थक मांडणी करीत बसतात. पण त्या भानगडीत चोखोबांच्या चोख सोन्यासारख्या खणखणीत आत्मानुभूतीचा आस्वाद घ्यायचे, त्यांच्या अद्भुत अंतरंग प्रचिती-प्राजक्ताचा संपन्न फुलोरा पाहायचे, त्याचा तो स्वर्गीय सुगंध आतबाहेर अनुभवायचे साफ विसरूनच जातात. चोखोबारायांची ही जगावेगळी, विलक्षण आत्मप्रचितीच जर पाहायची राहिली तर मग बघितले तरी काय? वेळ वायाच घालवला नाही का?पंचपक्वान्नांचे ताट समोर वाढलेले असताना केवळ ताक पिऊन उठल्यासारखेच आहे हे. पण भगवंतांच्याच प्रेरणेने काही महाभागांच्या नशीबी तेच लिहिलेले असते. आपण मात्र भरपेट जेवावे, हेच बरे. ज्या लौकिक गोष्टींची चोखोबांनी उभ्या आयुष्यात कधीही तमा बाळगली नाही, आपल्या स्वानंदामृताला  असल्या कोणत्याच मर्त्य गोष्टींचा विटाळ होऊ दिला नाही, त्याच फक्त जर आम्ही धरून बसलो व त्यावरच जर मांडणी करीत बसलो, तर तो चोखोबांचा व त्यांच्या वैभवसंपन्न शब्दब्रह्माचा, त्यांच्या रोकड्या आत्मप्रचितीचा घोर अपमानच ठरेल. म्हणून त्यांच्या या प्रारब्धजन्य भागाचा आपण विचार टाळून केवळ चोखोबांच्या नावाप्रमाणेच चोख विभूतिमत्त्वाचाच विचार करूया.
त्यांची अभंगरचना खूप सुंदर आणि निगूढ योगानुभूती सहजपणे सांगणारी आहे. त्यांच्या निर्मळ, प्रेमरंगी रंगलेल्या भाविक अंत:करणाचे आरस्पानी प्रतिबिंब त्यांच्या अभंगांमध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळते. त्या काळातील आश्चर्यच म्हणावे पण, अनंतभट नावाच्या पंढरीतीलच एका ब्राह्मण भक्ताने चोखोबांची सर्व अभंगरचना लिहून ठेवून आपल्यावर फार मोठे उपकारच केलेले आहेत.
श्रीचोखोबा सद्गुरुकृपेने आलेली मनोहर ज्ञानानुभूती सुरेख शब्दांत वर्णिताना म्हणतात,
देहीं देखिली पंढरी ।
आत्मा अविनाश विटेवरी ॥१॥
तो हा पांडुरंग जाणा ।
शांति रुक्मिणी निजांगना ॥२॥
आकारलें तितुके नासे ।
आत्मा अविनाश विठ्ठल दिसे ॥३॥
ऐसा विठ्ठल हृदयी ध्यायीं ।
चोखामेळा जडला पायी ॥७६.४॥
कोण म्हणेल की, असली भन्नाट योगानुभूती सांगणारा महात्मा लौकिक जगात निरक्षर होता? अहो, अक्षर परब्रह्माचा साक्षात्कार झालेलाच खरा " साक्षर " असतो. सगळ्या जगाचे ज्ञान आपल्यालाच आहे, या भ्रमात राहणारे बाकी आपल्यासारखेच सगळे खरेतर निरक्षर म्हणायला हवेत !!!
सोयराबाई, कर्ममेळा, निर्मळा, बंका या सगळ्यांचेच अभंग खूप सुंदर आणि अद्भुत योगानुभूती सांगणारे आहेत. हे सर्वजण श्रीचोखोबांचे अनुगृहीत होते. श्रीसोयराबाईंचा दैवी स्वानुभव मांडणारा एक अभंग तर सर्वांनाच माहीत आहे, तो म्हणजे, " अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥ "  या श्रीरंगी सप्रेम रंगलेल्या सोयराबाईंचे बाळंतपण स्वत: भगवान पंढरीनाथांनी व श्रीमुक्ताबाईंनी मिळून केले होते. केवढे अलौकिक भाग्य  !! त्या बाळंतपणात जन्मलेले कर्ममेळा हेही संतच झाले, यात नवल ते काय? म्हणूनच श्रीचोखोबा व त्यांच्या अवतारी परिवार सदस्यांचे अभंग-अमृत प्रत्येक भक्ताने आपल्या आयुष्यात एकदातरी प्रेमाने वाचून, जाणून घेऊन आकंठ प्राशन केलेच पाहिजे.
चोखोबा पंढरीत महारकी करत असत. त्यांच्या प्रेमाखातर, त्यांचा सहवास लाभावा म्हणून, प्रत्यक्ष पंढरीनाथ भगवान त्यांच्यासोबत गावात मेलेली गुरे ओढून नेऊन त्यांची विल्हेवाट लावत असत. अशी आख्यायिका संत आपल्या अभंगात सांगतात की, एकदा स्वर्गीचे अमृत विटले. ते पुन्हा कसे शुद्ध करायचे? असा गहन प्रश्न इंद्रादी देवतांसमोर पडला. त्यावर भगवंतांनी उपाय सांगितला की, " पंढरीत जाऊन आमच्या स्मरणात निरंतर निमग्न होऊन राहिलेल्या चोखोबांचा स्पर्श त्या अमृताला करवून आणा, ते तत्काळ शुद्ध होईल. " भगवंतांच्या आज्ञेने इंद्रदेवांनी पंढरीत येऊन चोखोबांची प्रार्थना करून अमृत पुन्हा शुद्ध करवून नेले. किती गंमत आहे पाहा, लौकिक जगात ज्यांना " अस्पृश्य " मानून मूर्ख समाज दूर ठेवत होता, ज्यांच्या अंगावरचा वारा लागला तरी विटाळ मानत होता, त्या चोखोबांच्या केवळ एका स्पर्शासाठी अलौकिक जगात अहमहमिका लागलेली होती  !! भगवद्भक्तांच्या निर्मल यशाचे, सर्वगुणसंपन्न महिम्याचे हे अद्भुत दर्शन स्तिमित करणारेच आहे.
एकदा पंढरपूर जवळच्या मंगळवेढा गावांत गांवकुसाची भिंत बांधण्यासाठी पंढरीतले सगळे महार मजूर नेण्यात आले होते. ती अर्धवट बांधलेली भिंत अचानक पडल्याने त्याखाली चिरडले जाऊन श्रीचोखोबांचा आजच्या तिथीला लौकिक अर्थाने मृत्यू होऊन ते भगवंतांशी पूर्ण एकरूप झाले.
पण भगवान पंढरीनाथांना आपल्या या लाडक्या भक्ताचा विरह काही सहन होईना, म्हणून त्यांनी श्रीनामदेवांना पाठवून चोखोबांच्या अस्थी आणायला सांगितल्या. त्या कशा ओळखणार? असे नामदेवांनी विचारल्यावर देव म्हणाले की, " ज्या अस्थींमधून विठ्ठलनाम ऐकू येईल, त्या अस्थी नि:संशय माझ्या चोख्याच्याच समज. " आपल्या अनन्य भक्ताची केवढी खात्री आहे पाहा देवांना. मेला तरी त्याची निर्जीव हाडे सुद्धा निरंतर नामच घेत असतील, असे ते भगवंत आवर्जून सांगत आहेत. नामदेवरायांनी त्यानुसार त्या अस्थी बरोबर शोधून आणल्या. भगवान पंढरीनाथांना चोखोबांचे इतके प्रेम होते की, लहान बाळाला कुशीत घ्यावे त्याप्रमाणे देवांनी अतीव प्रेमभराने त्या अस्थी आपल्या उपरण्यात घेतल्या व स्वहस्ते त्यांना मंदिराच्या महाद्वारासमोरच समाधी दिली, लाडका भक्त सतत डोळ्यांसमोर राहावा म्हणून ! त्यावर स्थापन झालेल्या समाधिशिलेचीच आजही पूजा होत असते. ही घटना वैशाख वद्य त्रयोदशीला संपन्न झाली. आजही पंढरी भूवैकुंठातील भगवान पंढरीनाथांच्या दरबारात आणि आपल्या सद्गुरूंच्या, श्रीनामदेवरायांच्या पायरीच्या समोरच श्रीचोखोबा अढळपदी विराजमान होऊन निरंतर विठ्ठलनाम घेताना दिसतात. त्यांच्या अपूर्व गुरुभक्तीचा याहून मोठा सन्मान काय असेल बरे?
अंतर्बाह्य चोख, सोन्यासारखा शुद्ध, लखलखीत आणि श्रीभगवंतांशी अखंड एकरूप होऊन राहिलेला म्हणजेच " चोखा-मेळा " ! अशा या थोर भगवद् भक्ताच्या पावन पुण्यदिनी त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत  !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://rohanupalekar.blogspot.com/

23 May 2016

*** भक्तश्रेष्ठ नारदा वंदन मनोभावे ***



ज्यांचा तिन्ही लोकांमध्ये अप्रतिहत संचार असतो व जे भक्तश्रेष्ठ मानले जातात त्या देवर्षी श्रीनारदांची कथा मोठी रोचक आहे. हे श्रीनारद पूर्वजन्मी एका दासीचे पुत्र होते. त्यांच्या गावातील धर्मशाळेत काही साधू चातुर्मास्यासाठी राहिले होते. त्यांच्या आई त्या साधूंची सेवा करीत असत. त्यामुळे या बालकालाही संतांची सेवा करायला मिळाली. त्यांच्या कृपेने बालकाच्या हृदयात भगवंतांच्या भक्तीचे बीज रुजले. पुढे ते साधू तीर्थयात्रेला निघून गेले. इकडे त्यांची आई देखील मरण पावली. मग त्यांनी उर्वरित आयुष्य भगवंतांच्या अखंड नामस्मरणात भ्रमण करीत घालवले. पुढील कल्पात ते साक्षात् भगवान ब्रह्मदेवांचे मानसपुत्र म्हणून श्रीनारदांच्या रूपाने जन्माला आले. थोर भगवद् भक्त श्रीसनत्कुमारांचा त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. गळ्यात ब्रह्मवीणा धारण करून अखंड भगवन्नामस्मरण केल्यामुळे देवर्षी नारदजी हरिरूप होऊन गेले.
त्यांनी पुढे भक्तिसूत्रांची रचना केली. श्रीनारदांच्या नावाचे एक पुराणही उपलब्ध आहे. त्यांनी वैष्णव तंत्राची निर्मिती केली. त्याला नारद पांचरात्र म्हणतात. देवर्षी श्रीनारदांना  महाभारतात परमज्ञानी, पूर्व कल्पांचे ज्ञाते म्हटलेले आहे. ते अत्यंत अद्भुत भावपूर्ण अंत:करणाचे महान भगवद्भक्त आहेत. देवर्षी नारदांना कीर्तनभक्तीचे आचार्य म्हटले जाते. म्हणून आजही कीर्तनकार ज्या गादीवर/गालिच्यावर उभे राहून कीर्तन करतात त्याला " नारदांची गादी " म्हणतात. तसेच कीर्तनकाराला, वीणा घेऊन नामसंकीर्तन करणा-याला नारदस्वरूप मानून वंदन करण्याचा प्रगात आहे. देवर्षी नारदांनी महर्षी व्यास, प्रल्हाद, ध्रुव आदी थोर भक्तांना अनुग्रह करून भगवद्भक्ती प्रदान केली. आजही देवर्षी नारद भक्तांवर कृपा करीत निरंतर भगवंतांचे नाम घेत तिन्ही लोकांमध्ये संचार करीत असतात. हे सर्व त्यांना पूर्वजन्मी केलेल्या संतांच्या सेवेचे मिळालेले फळ आहे.
श्रीमद् भागवत माहात्म्या मध्ये श्रीनारदांचा व भक्तीमातेचा संवाद आहे. त्यात ते प्रतिज्ञा करतात की, " मी भक्तीची घराघरात स्थापना करीन. " आपल्या प्रतिज्ञेच्या पूर्तीसाठी देवर्षी आजही कार्य करीत आहेत. त्यांच्या कृपेने सनाथ झालेले अगणित संत हरिभक्तीचा डंका वाजवीत आजही लोकांचा उद्धार करीत आहेत.
भक्तश्रेष्ठ श्रीनारदांना " देवर्षी " म्हणतात. त्याचे विशेष कारण संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी दिलेले आहे. ज्या महात्म्यांना " गर्भ दीक्षा " देता येते, त्यांनाच शास्त्रांमध्ये देवर्षी म्हटले जाते. गर्भातील जीवाला शक्तिपात दीक्षा देणे हे अत्यंत जोखमीचे व अवघड कार्य आहे. फार मोठा अधिकार असल्याशिवाय हे जमत नाही. देवर्षी नारदांनी भक्तश्रेष्ठ प्रल्हादांना अशी गर्भदीक्षा प्रदान केली होती. श्रीनारदांशिवाय आणखीही महात्म्यांनी अशा दीक्षा दिलेल्या आहेत, पण देवर्षी म्हणून श्रीनारदजीच सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत.
इतक्या महान विभूतिमत्वाला " कळीचा नारद " म्हणून जेव्हा लोक हिणवतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. पुराणात नारदांनी जिथे जिथे काही कळ लावलेली आहे, तिथे तिथे प्रत्येकाचे भलेच झालेले आहे. संतांना कोणाचेही अहित करणे माहीतच नसते. ज्यांना सर्व प्राचीन विद्वान महाज्ञानी म्हणतात, जे अनेक महान भक्तांचे सद्गुरु आहेत त्या श्रीनारदजींची पायधुळी मस्तकावर धारण करण्याचेही भाग्य थोर थोर महापुरुषांना अत्यंत कष्टाने प्राप्त होते, हे आपण विसरता कामा नये. भगवान श्रीकृष्ण ज्यांचे सप्रेम स्मरण करतात, ते नारदजी तुम्हां आम्हां सर्वांसाठी परम वंदनीय, पूजनीयच आहेत.
एकदा देवर्षी नारदांनी भगवान श्रीविष्णूंना सत्संगतीचे महत्त्व काय? असे विचारले. त्यावर देव म्हणाले, " अरे, त्या समोरच्या झाडाखाली एक किडा आहे, त्याला विचार, तो तुला सांगेल. " देवर्षी त्या किड्यापाशी गेले व त्यांनी त्याला प्रश्न विचारला. त्याबरोबर तो किडा टपकन् मरून पडला. देवर्षी खट्टू होऊन भगवंतांकडे परत आले. देव म्हणाले, " अरे, तो किडा तर मेला. तू असे कर, त्या समोरच्या झाडावरील घरट्यात आत्ताच अंड्यातून एक पक्षाचे पिल्लू जन्माला आले आहे. त्याला विचार. " देवांची आज्ञा मानून नारद त्या घरट्यापाशी गेले व त्यांनी त्या नवजात पिलाला सत्संगतीचे महत्त्व विचारले. त्या पिलाने नारदांकडे पाहिले आणि तेही तत्काळ गतप्राण झाले. नारदांना कळेच ना काय होते आहे ते. ते तसेच भगवंतांकडे परत आले.
आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नसल्याने नारद हिरमुसले होते. मग त्यांनी देवांना पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यावर भगवंत मिश्किल हसत म्हणाले, " अरे नारदा, अमक्या देशाचा राजाला नुकताच एक राजपुत्र झालेला आहे. त्याला जाऊन विचार, तो नक्की सांगेल. " नारदजी जरा घाबरलेच. ते म्हणाले, " देवा, किडा व पक्षी मेला तर मला काही फारसे वाटले नाही. पण आता जर तो राजपुत्र मेला तर माझी काही धडगत नाही. नको रे बाबा, मी नाही जाणार विचारायला. " त्यावर देव हसून उत्तरले, " अरे, जा. काही विपरीत घडणार नाही. आमच्यावर विश्वास ठेव. यावेळी तुला नक्की उत्तर मिळेल. " आज्ञेनुसार नारदजी त्या राजाच्या राजवाड्यात नारायण नारायण करीत प्रकट झाले. राजाने आदराने त्यांची पूजा केली व आपल्या नवजात राजपुत्राला त्यांच्या पायावर घातले. त्याला पाहून नारदांनी त्याला, ' सत्संगतीचे महत्व काय? ' असे विचारले. त्याबरोबर तो राजपुत्र उठला व नारदांना साष्टांग दंडवत घालून म्हणाला, " अहो देवा, मीच त्याचे साक्षात् फळ आहे. मी किड्याच्या जन्मात असतांना तुमच्या केवळ दर्शनाने माझा त्या मूढ योनीतून उध्दार झाला. मी पक्षी म्हणून जन्माला आलो. त्याही जन्मात तुमचे दर्शन झाले व लगेच गती लाभून आता राजपुत्र म्हणून जन्माला आलोय. तुम्ही आता माझ्यावर कृपा करून मला अनुग्रह द्या. "
देवर्षी नारदांना अशाप्रकारे सत्संगतीचे महत्व भगवंतांनी दाखवून दिले. संतांची संगती, त्यांचे दर्शन, त्यांची कृपा ही अत्यंत अद्भुतच असते. पुराणांनी संतांच्या संगतीचे अनेक अलौकिक प्रसंग वर्णन करून ठेवलेले आहेत. त्यांचा साकल्याने विचार केल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते की, सत्संगतीला परमार्थामध्ये अनन्यसाधारण महत्व असते, म्हणूनच साधकाने संतांची संगतीत, त्यांच्या  विचारांच्या व त्यांच्या पावन स्थानाच्या संगतीत राहावे, म्हणजे आपला परमार्थ सुफळ संपूर्ण होतो.
आज वैशाख कृष्ण द्वितीया, देवर्षी भगवान श्रीनारदांच्या जयंती निमित्त त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत. काही ठिकणी वैशाख कृष्ण प्रतिपदेला जयंती मानतात. संतांच्या स्मरणासाठी मुहूर्त पाहायची गरज काय? तसे जर पाहिले तर रोजच त्यांची जयंती असते. भगवंतांना अत्यंत आवडणारे संतस्मरण करणे हे आपले साधक म्हणून कर्तव्यच आहे. म्हणून आजच्या जयंतीदिनी आपण प्रेमभराने भगवान श्रीनारदांचे स्मरण करून त्यांना प्रेमभक्तीचे दान मागूया.

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

20 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ९ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ९ वे *


आज वैशाख शुद्ध चतुर्दशी, भक्तवत्सल भक्ताभिमानी प्रल्हादवरद भगवान श्रीनृसिंहराजांची जयंती  !! तुम्हां आम्हां श्रीनृसिंहपदसेवकांसाठी परम आनंदाचा दिन.
" न मे भक्त: प्रणश्यति ।" ही  साक्षात् भगवंतांची प्रतिज्ञा आहे. माझे भक्त कधीच नाश पावत नाहीत ! असे स्वत: भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभू गीतेत उच्चरवाने सांगतात. त्यांच्या त्या सत्यप्रतिज्ञेचेच साकार रूप म्हणजे हा परमकरुणामय श्रीनरहरी अवतार होय  !!
श्रीभगवंतांचे अत्यंत लाडके जर कोणी असतील तर ते केवळ त्यांचे अनन्य भक्तच असतात, हे त्रिवार सत्य आहे. त्यांचे जेवढे प्रेम आपल्या भक्तांवर असते, तेवढे स्वत:वरही नसते. जीवप्राणाने अनुसरणारे भक्त साक्षात् भगवंतांचे हृदय अधिष्ठाते असतात. एका क्षणासाठीही भगवंतांना त्यांचा विरह सहन होत नाही. भक्तांसाठी ते कोणत्याही थराला जाऊन कार्य करू शकतात. श्रीनृसिंह अवतार हे त्याचे समर्पक उदाहरण आहे. प्रल्हादजींसाठी भगवंतांनी नर व सिंहाचा एकत्रित अवतार धारण केला. ऐसा पूर्वी न ऐकिला न देखिला । हेच भगवंतांच्या परमप्रेमाचे द्योतक नव्हे काय?
भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे एक वैशिष्ट्य असते. श्रीरामावतारात मर्यादा तर श्रीकृष्णावतारात प्रेम हेच मुख्यप्राण आहेत. तसे या अभिनव नृसिंह अवतारात भक्तकरुणा किंवा भक्तवात्सल्य हेच प्रधान वैशिष्ट्य आहे. भक्तांचे सर्व बाजूंनी संरक्षण करणे, हेच त्यांचे मुख्यब्रीद आहे. म्हणूनच खरेतर अत्यंत उग्र, भीषण, भयानक असला तरी हाच देवबाप्पा आम्हांला खूप जवळचा, हवाहवासा वाटतो.
भगवान श्रीकृष्ण व ऋषींच्या संवादातील एक श्रीनृसिंहस्तवराज स्तोत्र आहे. त्यात शेवटी प्रसन्न झालेले भगवान श्रीनृसिंह प्रकट होऊन एक विशेष वर देताना म्हणतात,
भो भो भक्तवरा: सर्वे श्रृणुध्वं वरमुत्तमम् ।
अहं भक्तपराधीनो अन्येषामतिदुर्लभ: ॥
" माझ्या सर्व श्रेष्ठ भक्तांनो, माझा उत्तम वरप्रसाद ऐका, मी माझ्या भक्तांच्या आधीन आहे, प्राप्त करून घ्यायला इतरांसाठी मात्र मी अत्यंत अवघड आहे  ! " येथे प्रत्यक्ष भगवान श्रीनृसिंहच आपल्या अवताराचे मार्मिक रहस्य स्वमुखाने सांगत आहेत.
भगवान श्रीज्ञानेश्वर माउली या विलक्षण अवताराचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
ऐसा अवतार नरहरी स्तंभामाझारी ।
भक्तां परोपरी धरी रूपें ॥१॥
धरूनिया महीत्व जाला नृसिंहरूप ।
वेदशास्त्रांसी अमूर्त मूर्तीस आला ॥२॥
बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु ।
वर्ण सारङ्गधरू निजरूप ॥३॥
" भक्तांच्या भल्यासाठीच हा नरहरी अवतार स्तंभामधून प्रकट झाला. अत्यंत भव्य-दिव्य अशा नृसिंह रूपात प्रकटलेले हे हरितत्त्व दुसरे तिसरे काही नसून वेदांनाही ज्याचा थांग कधी लागला नाही तेच साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच आहे. सकलकलानिधी भगवान श्रीकृष्ण हेच निजरूपातूनच पुन्हा श्रीनृसिंह झालेले आहेत. तेच माझे मायबाप, माझे परमहितैषी श्रीसद्गुरु देखील आहेत ! "
आपण गेले नऊ दिवस ज्या श्रीनृसिंह भगवंतांची ही शब्दपूजा बांधत आहोत, ते अहेतुकदयानिधी, भक्तहृत्कमलविहारी श्रीनृसिंहप्रभू या लेकुरवाचेने अर्पिलेल्या भातुकलीच्या नैवेद्याने संतुष्ट होऊन आपल्यावर कृपाप्रसाद करोत, हीच प्रेमभावना या शेवटच्या सांगतेच्या लेखात त्यांच्या अम्लान श्रीचरणीं सर्वांच्या वतीने निवेदितो. गेले नऊ दिवस या निमित्ताने आपण कळत नकळत पण सतत भगवान श्रीनृसिंहदेवांच्या नित्य अनुसंधानातच आहोत, हे भाग्य काय थोडे आहे?
भगवान श्रीनृसिंहराज प्रभू हे किती दयाळू आहेत? याचे आजवर सर्वश्रेष्ठ अशा वेदांनाही वर्णन करणे शक्य झालेले नाही. श्रीनृसिंह पुराणात एक गमतीशीर कथा येते. एक आचारभ्रष्ट झालेला ब्राह्मण एकदा तीव्र कामवासनेने एका स्त्रीला घेऊन जंगलात जातो. तेथे कामक्रीडेसाठी त्याला एक पडकी जागा सापडते. तो ती स्वच्छ करतो व आपला कार्यभाग साधतो. त्याच्या लक्षातही येत नाही की ती पडकी जागा हे प्राचीन नृसिंह मंदिर असते. तेवढ्यातच त्याला मृत्यू येतो. पण अशा पापी जीवाला न्यायला जेव्हा यमदूत येतात तेव्हा त्यांना तेथेच पुण्य पावन विष्णुदूतही आलेले दिसतात. त्या दोघां दूतांमध्ये संवाद होतो व ते विष्णुदूत सांगतात की, या पापी भक्ताचे सर्व पाप केवळ एकदा नृसिंह मंदिराची स्वच्छता केल्याने भगवंतांनी नष्ट केलेले अाहे. तसेच त्याला विष्णुलोकाला आणण्याची भगवंतांची आज्ञाही आहे. तेव्हापासूनच नृसिंह उपासनेत मंदिराची स्वच्छता हा एक प्रभावी सेवा प्रकार रूढ झालेला आहे. आवळा घेऊन कोहळा देण्याचाच हा प्रकार नाही का? अल्पशा स्वार्थप्रेरित सेवेनेही भगवान श्रीनृसिंह संतुष्ट होऊन किती भरभरून फळ देतात पाहा. म्हणूनच त्यांच्याठायी विलसणा-या याच अद्वितीय करुणारसपूर्ण स्वभावाचे सर्व संत वारंवार वर्णन करतात.
आज त्या परमकारुणिक श्रीनरहरी अवताराची जयंती आहे. आजच्या सूर्यास्ताला हे करुणाब्रह्म पुन्हा अवतरणार आहे, आपल्यावर अपरंपार कृपावर्षाव करण्यासाठी ! म्हणून त्यांना अतिप्रिय असणा-या त्यांच्या सप्रेम स्मरणात आपण रममाण होऊया व श्रीनृसिंहजन्माचा आनंदोत्सव साजरा करूया.
आपल्या या लेखमालेचे शीर्षक ही भगवान श्रीमाउलींची एक ओवी आहे. त्यात ते भक्तवर प्रल्हादांची भगवंतांच्या तोंडून महती गातात की, त्या माझ्या लाडक्या भक्तासाठीच केवळ मी हे रूप धारण केलेले आहे. माझे हे नृसिंहरूप ' लेणे ' म्हणजेच अलंकार आहे. तोही मी माझ्या भक्ताचे माहात्म्य वाढविण्यासाठीच घातलाय. सुंदर दागिन्यांनी जशी मूळच्या सौंदर्यात आणखी वाढ होते, तसे या नृसिंहरूपामुळे षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीभगवंतांच्या गुणगणांमध्ये भक्तवात्सल्य या थोर गुणाचा प्रकर्षाने समावेश होऊन देवांचे गुणसौंदर्य आणखी वाढलेले आहे.
आईच्या प्रेमावर खरा हक्क तिच्या अबोध बाळाचाच असतो. तसे या भगवंतांच्या प्रेमावर तुम्हां आम्हां भक्तांचाच खरा हक्क आहे, फक्त आपण सर्वार्थाने आईला शरण जाऊन, ती ठेवेल तसे राहणारे, केवळ तिचीच आस असणारे बालक व्हायला हवे. हेच बालकत्व भक्तश्रेष्ठ प्रल्हादांनी निरंतर जपले म्हणून अनावर, अपार असे उग्रभीषण नृसिंह भगवंत कायमचे त्यांचेच होऊन राहिले. ' प्रल्हादवरद ' असे नाव ते भगवंत आजही अभिमानाने मिरवीत आहेत. भक्तीचे अलौकिक श्रेष्ठत्व यापरते काय आणिक सांगणार?
आजच्या या पावन पर्वावर भक्ताग्रणी श्रीप्रल्हादजींच्या श्रीचरणीं आपण सर्वजण एकच मागणे मागूया की, " देव आपलासा कसा करावा? याचे यथार्थ ज्ञान आपण  कृपापूर्वक आमच्या हृदयात प्रतिष्ठापित करावे व भक्तकरुणाकर श्रीनृसिंह भगवंतांचा खरा आविर्भाव आमच्या हृदयकोशात करवून त्यांना कायमचे तेथेच स्थिर करावे. आपण त्यांच्यासाठी आहात व ते आपल्यासाठीच आहेत, म्हणून ते आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. तेव्हा आमची दया येऊ द्यावी व आम्हांलाही तुमच्यासारखी " नृसिंहजयंती " लवकरात लवकर साजरी करण्याची सुवर्णसंधी प्रदान करावी  !"
नृसिंहकवचात भगवान श्रीशंकर म्हणतात,
कुतो भीति: कुतो मृत्यु: कुतस्तस्य दरिद्रता ।
मृत्योर्मृत्यु: रमानाथो यस्य नाथो नृकेसरी ॥
भगवान श्रीनृसिंहांच्या भक्तांना ना मृत्यूची भीती ना दारिद्र्याची. मृत्यूचाही मृत्यू असणारे भगवान श्रीनृसिंह ज्यांचे स्वामी आहेत, त्यांच्या भाग्याची तुलना कशाशी करणार?
म्हणूनच आजच्या या नृसिंहजयंती पर्वावर श्रीसद्गुरुकृपेने गेले नऊ दिवस निर्माण झालेली ही नवविधा भक्तीरूपी सुगंधी श्वेत पुष्पे परमप्रेमादरे भगवान श्रीनृसिंहप्रभूंच्या श्रीचरणीं त्यांच्याच पावन नामाच्या गजरात समर्पूया व आत्मनिवेदन साधून धन्य होऊया  आणि ज्ञानी ऋषींनी स्तवराजात मागितलेलाच वरप्रसाद मागून भगवान श्रीनरहरीरायांच्या परममंगलमय श्रीचरणीं तुलसीदल रूपाने कायमचे विसावूया !!
यदि नोऽसि प्रसन्नस्त्वं देवदेव कृपानिधे ।
त्वमेव नितरां देहि त्वयि भक्तिं दृढां प्रभो ॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

19 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ८ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ८ वे *

** श्रीदत्तसंप्रदाय व भगवान श्रीनृसिंह : ऋणानुबंध **

भगवान श्रीनृसिंह ही देवता पुराण कालापासूनच खूप प्रसिद्ध आहे. श्रीनृसिंहांची अनेक स्थानेही जुन्या काळापासून भरभराटीला आलेली आहेत. नृसिंह उपासना देखील समाजाच्या सर्व थरांमध्ये पोचलेली पाहायला मिळते.
भगवान श्रीनृसिंह हा अवतार श्रीदत्तसंप्रदायामध्येही खूप मानला व उपासला गेलेला दिसून येतो. श्रीदत्त संप्रदाय व श्रीनृसिंह भगवंतांचा अन्योन्य-संबंध असून तो फारसा आजवर लोकांसमोर आलेला नाही. म्हणून तो महत्त्वाचा विविधांगी संबंध आजच्या आपल्या लेखामधून आपण त्यांच्याच कृपेने अभ्यासणार आहोत.
श्रीनृसिंह अवतार शनिवारी झाला म्हणून श्रीनृसिंह उपासनेत शनिवार हा मुख्य वार मानतात. कलियुगातील प्रथम दत्तावतार भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज व द्वितीय दत्तावतार भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्मवार शनिवारच आहे. त्यामुळेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडीची वारी ही शनिवारचीच मानतात. तसा उल्लेख श्रीगुरुभक्त यांनी " सावळा सद्गुरु तारू मोठा रे..। " या वाडी नित्यक्रमाच्या पदात केलेला आहे की, " द्वादशी शनिवार करिता वारी पाडवा । " पूर्वी दत्त संप्रदायातही गुरुवारपेक्षा शनिवारलाच अधिक महत्त्व होते, हे यावरून कळते. नंतरच्या काळात ते महत्त्व गुरुवारला प्राप्त झाले असावे.
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंची व भगवान श्रीनृसिंहांची जन्मवेळ ही देखील एकच, सूर्यास्ताचीच आहे. तसेच दोघांचाही जन्म शुक्लपक्षातील चतुर्दशीलाच झालेला आहे.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादजींना भगवान श्रीदत्तप्रभूंनी अवधूतवेषात आत्मस्वरूपाचा उपदेश केल्याचा उल्लेख श्रीमद् भागवत महापुराणाच्या सातव्या स्कंधात येतो.
श्रीपादश्रीवल्लभ चरितामृत या ग्रंथातही अनेकवेळा भगवान श्रीनृसिंहांचा तसेच औदुंबर वृक्षाचा उल्लेख येतो. त्यात एकेठिकाणी आजवर इतरत्र कोठेच न आलेला एक वेगळाच संदर्भ सांगितलेला आहे. श्रीनृसिंह भगवंत औदुंबराच्याच लाकडापासून बनवलेल्या खांबातून प्रकटले व त्यानंतर त्या खांबाला पालवी फुटली. तोच औदुंबर वृक्ष होय. त्याची प्रल्हादजी नियमाने पूजा करीत असत. पुढे त्यांना औदुंबरवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या श्रीदत्तप्रभूंनी आत्मबोध केला होता. त्याच वेळी त्या औदुंबरवृक्षाने मनुष्यरूपाने प्रकट होऊन भगवान श्रीदत्तप्रभूंना आशीर्वाद मागितल्यावर त्यांनी, तुझ्याठायी मी सूक्ष्मरूपाने अखंड वास करीन व कलियुगातील अवतारात तुझ्यातून प्रकटलेल्या भगवान नृसिंहांचेच नाव मी धारण करीन, असा आशीर्वाद दिला. श्रीनृसिंह दैवताचे प्रेम म्हणूनच कलियुगातील या द्वितीय अवतारामध्ये भगवान श्रीदत्तप्रभूंनी स्वत:ला " नरहरि " किंवा " नृसिंह सरस्वती " असेच नाम धारण केलेले दिसून येते.
श्रीनृसिंह अवतार धारण करून भगवंतांनी, " देव आहे व तो सर्वत्र व्यापून राहिलेला आहे !" हेच दाखवून दिलेले आहे. शिवाय देवत्वाचा विरोध करणा-याचा समूळ नायनाट केलेला आहे. हेच कार्य श्रीदत्तप्रभू व त्यांच्या सर्व अवतारांनी केलेले आहे. त्यांनी अप्रकट असलेले देवत्वच लोकांना दाखवून दिले. शिवाय नास्तिकांची ती नास्तिकबुद्धी आपल्या कृपेने नष्ट करून लोकांची धार्मिक श्रद्धा बळकट केलेली आहे. एकप्रकारेे नृसिंहरूपाच्याच कार्याचा हा पुढील भाग म्हणता येईल. भगवान नृसिंहांनी दुष्टांचाच नाश केला तर भगवान माउली म्हणतात तसा, या अवतारांनी केवळ दुष्टबुद्धीचा नाश करून समाजात अास्तिकता वाढविली.
श्रीदत्त संप्रदायातील वेदतुल्य मानलेल्या श्रीगुरुचरित्रातील तीन हकिकतींमध्ये श्रीनृसिंहांचा उल्लेख येतो. श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी तटाकयात्रा करीत असताना, मंजरिका क्षेत्री राहणा-या श्रीमाधवारण्य नामक संन्यासी भक्तावर कृपा केल्याचा उल्लेख तेराव्या अध्यायात येतो. हे माधवारण्य श्रीनृसिंहभक्त होते व त्यांना स्वामींनी नृसिंहरूपातच दर्शन दिले होते. तसेच मानसपूजेतील नृसिंहमूर्ती प्रत्यक्ष होईल, असा आशीर्वादही दिला होता.
पंधराव्या अध्यायात भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या शिष्यांना पवित्र तीर्थक्षेत्रांची माहिती सांगितलेली आहे. त्यात गाणगापूरच्या भीमा-अमरजा संगमावरील कल्पवृक्ष अश्वत्थासमोर " नृसिंहतीर्थ " असल्याचा उल्लेख आलाय. त्यानंतर कृष्णाकाठावरील कोळे नृसिंहपूरच्या श्रीनृसिंह भगवंतांचाही श्रीस्वामी महाराज आवर्जून उल्लेख करतात.
एकोणिसाव्या अध्यायात औदुंबर वृक्षाचे माहात्म्य व श्रीदत्तप्रभूंचे त्यावरील विशेष प्रेम कथन करताना पुन्हा भगवान श्रीनृसिंहांचा उल्लेख येतो. हिरण्यकश्यपूच्या विषयुक्त रक्तामुळे नखांचा होणारा दाह,  भगवती लक्ष्मीमातेने आणलेल्या औदुंबराच्या फळांमध्ये नखे रोवल्याने शांत झाला. म्हणून औदुंबर वृक्षाला भगवान श्रीनृसिंहांनी भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत. औदुंबराला भगवान श्रीनृसिंहांनीच " सदा फळित तू होसी । " असा कल्पवृक्ष होण्याचा आशीर्वादही दिलेला आहे. तसेच, " आम्ही लक्ष्मीसह निरंतर तुझ्याखाली वास करू ", असाही वर दिलेला आहे. तोच वर त्यांनी श्रीनृसिंह सरस्वती स्वामींच्या रूपाने पूर्ण केलेला दिसून येतो. तेथे एका ओवीत श्रीगुरुचरित्रकार म्हणतात,
अवतार आपण तयाचे ।
स्थान आपुलें असे साचें ।
शांतवन करावया उग्रत्वाचें ।
म्हणोनि वास औदुंबरीं॥१९.२८॥
येथे श्रीगुरुचरित्रकार सरस्वती गंगाधर, भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामींना स्पष्टपणे नृसिंह-अवतार म्हणतात. या आधीच्या ओवीत गुरुचरित्रकार फार महत्त्वाचा संदर्भ सांगतात की,
याकारणें श्रीगुरुमूर्ती ।
नृसिंहमंत्र उपासना करिती ।
उग्रत्वाची करावया शांति ।
औदुंबरी वास असे ॥१९.२७॥
सरस्वती गंगाधर या ओवीत स्पष्ट सांगतात की, भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज " नृसिंह मंत्र उपासना " करत होते. तसेच नृसिंह अवताराप्रमाणेच उग्रत्वाची शांती करण्यासाठी ते नित्य औदुंबरवृक्षाखाली वास करीत असत.
चोविसाव्या अध्यायात श्रीत्रिविक्रम भारतींचा प्रसंग आहे. हे थोर संन्यासी देखील श्रीनृसिंह भक्तच होते. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी कुमसी गावी गेले होते. त्यावेळी त्यांनी श्रीत्रिविक्रम भारतींना मानसपूजेत नृसिंहरूपातच दर्शन दिल्याचा उल्लेख येतो.
तृतीय श्रीदत्तावतार, राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामींचेही जन्मनाम " नृसिंहभान " असेच होते. प्रसंगी तेही नृसिंहरूपासारखेच अत्यंत उग्र रूप धारण करीत असत. त्यावेळी त्यांच्यासमोर जाण्याची कोणाचीही छाती होत नसे. त्याचबरोबर त्यांचे अलौकिक भक्तवात्सल्यही त्यांच्या सर्व गोष्टींमधून स्पष्ट जाणवते. त्यांच्या अशा अपरंपार भक्तप्रेमाचे वर्णन करणा-या अनेक कथा त्यांच्या बखरीत सापडतात. अत्यंत असह्य उग्रत्व व त्याचवेळी अपरंपार करुणा या नृसिंहरूपाचेच वैशिष्ट्य असणा-या दोन्ही गोष्टी श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या ठायी विलसणा-या श्रीनृसिंहतत्त्वाचेच प्रत्यंतर देत आहेत.
भगवान श्रीनृसिंहांची उपासना करून त्यांची पूर्णकृपा प्राप्त झालेले परम भाग्यवान जीव देहपातानंतर भगवान श्रीदत्तात्रेयांच्या स्वरूपाशी एकरूप होतात, असा स्वानुभव काही नृसिंहभक्त महात्म्यांनी नोंदवून ठेवलेला आहे. हा आजवर फारसा ज्ञात नसलेला विलक्षण संदर्भ तर श्रीनृसिंह भगवंत व श्रीदत्त भगवंतांचे एकरूपत्वच सांगत नाही का?
श्रीदत्तसंप्रदायामध्ये अशाप्रकारे श्रीनृसिंह भगवंतांचीही उपासना केली जाते. याही संप्रदायात श्रीनृसिंह हे भक्तवत्सल व भक्त-रक्षणकर्ते म्हणूनच पूजिले जातात. श्रीदत्त संप्रदायातील आजवरच्या अनेक थोर सत्पुरुषांचे इष्टदेव भगवान श्रीनृसिंहच असल्याचे त्यांच्या चरित्रांमधून पाहायला मिळते. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील थोर विभूतिमत्व, प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांचेही भगवान श्रीलक्ष्मीनृसिंह हेच इष्टदेव होते.
श्रीदत्तसंप्रदायातील अधिकारी विभूती व श्रीनृसिंह भगवंतांचे परमभक्त तसेच श्रीनृसिंह कोशाचे संपादन-प्रमुख, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे श्रीनृसिंह भगवंतांच्या अवीट गोडीच्या लीलेचे मोठ्या मार्मिक व गूढार्थपूर्ण शब्दांमध्ये वर्णन करताना म्हणतात,
विदारूनी महास्तंभ ।
देव प्रकट स्वयंभ ॥१॥
राखावया भक्तजन ।
स्वये येती नारायण ॥२॥
ऐसा प्रल्हाद बळिया ।
केले देवासी खेळिया ॥३॥
देव अंकित भावाचा ।
लोट नयनी कृपेचा ॥४॥
भक्त घेई अंकावरी ।
प्रेमे चाटितो श्रीहरी ॥५॥
बहू नवलाव जाला ।
दैत्य तोही उद्धरिला ॥६॥
म्हणे अमृता माधवा ।
फेडी स्तंभाते आघवा ॥७॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

18 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ७ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ७ वे *

भक्तश्रेष्ठ प्रल्हादांसाठी प्रकटलेला हा " आवेश " अवतार मोठा विलक्षणच आहे. श्रीनृसिंह पुराणामध्ये भक्त प्रल्हाद व भगवंतांचा फार सुंदर आणि भावपूर्ण असा संवाद त्रेचाळिसाव्या अध्यायात आलेला आहे. भगवद् भक्तांचे अंत:करण किती वैशिष्ट्यपूर्ण असते, याचा सुखद प्रत्यय या कथेतून आपल्याला वाचायला मिळतो.
हिरण्यकश्यपूने आपल्या दूतांना प्रल्हादाला नागबंधनात जखडून समुद्रात नेऊन टाकण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या राक्षसांनी प्रल्हादाला रात्रीच्या वेळी गाढ समाधी अवस्थेत असतानाच बांधून नेऊन समुद्रात टाकले. प्रल्हाद समाधीच्या आनंदसागरात रममाण असल्यामुळे त्यांना समजलेच नाही की आपण खा-या पाण्याच्या समुद्राच्या तळाशी पोचलेलो आहोत. समुद्रदेवानेच स्वत: प्रल्हादांना किना-यावर आणले. तोवर ते समाधीतून जागे झाले व त्यांचा समुद्रदेवाशी संवाद झाला. भगवंतांच्या साक्षात् दर्शनाची प्रल्हादांची तीव्र तळमळ जाणून समुद्राने त्यांना भगवंतांचे स्तुती-गान करण्याचा सल्ला दिला. प्रल्हाद तेथेच रात्रभर व्याकूळ अंत:करणाने भगवंतांना आळवत बसले.
शेवटी भगवान नारायणांनी त्यांना पहाटे प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यावेळी देवांनी अत्यंत प्रेमभराने प्रल्हादांना वर माग म्हटले. प्रल्हाद म्हणाले की, " देवा, मला तुमचे दर्शनच सतत हवे असते. ते मिळाल्यावर, त्यापेक्षा काय मोठे असे आणखी मागू? " देव म्हणाले की, तरीही काहीतरी मागच. त्यावर प्रल्हाद म्हणाले, " मला जन्मजन्मांतरी गरुडाप्रमाणे आपला दास करून ठेवा. " त्यावर देव म्हणाले, " काय कठीण समस्या ठेवलीस समोर? मीच मला तुला देऊन टाकायची, तुझ्याच स्वाधीन होण्याची इच्छा बाळगतोय आणि तुला माझे दास व्हायचे आहे. आणखी दुसरे काहीतरी माग. "
त्यावर भक्तश्रेष्ठ प्रल्हाद फार सुंदर म्हणतात, " देवा, वर द्यायचाच असेल तर, माझी आपल्या ठिकाणी सात्त्विक भक्ती सदैव स्थिर राहील, त्या भक्तीमुळे मी सतत तुमचे नाम-गुण-कीर्तीच गात राहीन, असाच वर द्या !" भगवंत आपल्या या श्रेष्ठ भक्तावर अतीव प्रसन्न झाले व त्यांनी तसाच वर त्याला दिला.
भक्तांचे अंत:करण कसे सर्वांगांनी भक्तिमय झालेले असते पाहा. त्यांना भक्तीशिवाय दुसरे काहीही सुचतच नाही. सर्वत्र त्यांना हरिरूपच दिसत असते व तेच सतत हवेहवेसेही वाटत असते. त्यासाठीच तर त्यांचा जन्म झालेला असतो. भगवान श्रीमाउली भक्तांच्या या अनन्य प्रीतीला गंगामैयाची उपमा देतात. ती गंगा समुद्राला काल मिळाली, आज मिळाली, नव्हे आत्ताही मिळतच आहे. तरीही नित्यनवीन प्रेमाने, उत्साहाने ती सतत समुद्राशी एकरूप होत असते. त्याचा तिला ना कंटाळा ना आळस. तसेच हे भक्तही भगवंतांशी एकरूप होऊनही पुन्हा पुन्हा तीच इच्छा करीत असतात. त्यांच्यासाठी तो अनुभव प्रत्येक क्षणी नवीनच असतो. हीच परम अद्भुत अशी अद्वैतीभक्ती होय.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादच या भक्तिसुखासाठी, रामावतारात अंगद, कृष्णावतारात उद्धव, माउलींच्या काळात भक्त श्रीनामदेव, नंतर श्रीतुकाराम महाराज, त्यानंतर श्रीतुकाविप्र महाराज व त्याहीनंतर चिदंबर महास्वामींचे शिष्य श्रीराजाराम महाराज म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घेते झाले. शिवाय दक्षिणेत श्रीमत् राघवेंद्रस्वामी रूपानेही भक्तश्रेष्ठ प्रल्हादजीच अवतरले होते. भक्तश्रेष्ठ प्रल्हाद व भगवान नरहरी ही पूर्ण एकरूप अशी थोर जोडगोळीच आहेत. भक्तिसुखासाठी प्रल्हादजी सतत पृथ्वीतलावर विविध रूपांनी अवतरित होऊन भक्तीचा आनंद लुटतात व लोकांनाही भरभरून देत असतात. या एकरस जोडगोळीच्या अम्लान चरणीं सर्वांच्या वतीने सादर साष्टांग दंडवत करतो.
भगवान श्रीनृसिंहांविषयी अक्षरश: प्रचंड वाङ्मय पूर्वीच्या ऋषीमुनींनी व साधुसंतांनी रचून ठेवलेले आहे. यामध्ये नृसिंह अवताराच्या लीला, प्रल्हादादी नृसिंहभक्तांच्या कथा, नृसिंहविषयक स्तोत्रे, मंत्र, सहस्रनामे, मालामंत्र, पूजापद्धती, प्रार्थना स्तोत्रे अशाप्रकारचे विविध भाषांमधील विपुल प्रासादिक वाङ्मय पाहायला मिळते. हे सर्व एकत्रित स्वरूपात प्रथमच एकूण साडेसोळाशे पानांच्या तीन खंडात्मक " श्रीनृसिंह कोश " मधून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्वात आनंददायक गोष्ट अशी की, हे ₹ ५७५ /- मूल्याचे तीन खंड सवलतीत केवळ ₹ ३०० /- मध्ये श्रीवामनराज प्रकाशन नृसिंहभक्तांना देत आहेत.
थोर नृसिंहभक्त प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली अनेक मान्यवर अभ्यासकांनी या कोशात मोलाचे योगदान दिलेले आहे. हे तीनही खंड प्रत्येक नृसिंहभक्ताच्या संग्रही असायलाच हवेत, इतके महत्त्वपूर्ण व विलक्षण आहेत.
प्रथम 'संहिता'खंडात वेद, उपनिषदे, स्मृती व पुराणांमधील नृसिंहविषयक संदर्भांची संहिता अाहे. ऋग्वेदातील ' द्वे विरूपे ' सूक्त, त्यावरील संस्कृत टीका व मराठी भाषांतर आहे. या सूक्ताचा नीरानृसिंहपूर स्थानाच्या दृष्टीने अर्थ केलेला आहे. श्रीनृसिंहपुराणाची देखील पूर्ण संहिता आहे.
द्वितीय 'उपासना'खंडात, वर ज्यातील सुंदर कथा सांगितली आहे त्या नृसिंहपुराणाचा मराठी अर्थ दिलेला अाहे. त्यानंतर शरभोपनिषद व लिंगपुराणातील नृसिंहदमन हा विलक्षण भाग सविस्तर चर्चिलेला आहे. प्रत्यक्ष उपासना खंडात नृसिंहविषयक ७५ संस्कृत व ४७ मराठी रचनांचा समावेश केलेला आहे. शिवाय प्रदीर्घ अशी नृसिंहार्चनपद्धती देखील दिलेली आहे.
तिस-या 'माहात्म्य'खंडात उपासनाखंडातील उर्वरित स्तोत्रे व नीरानृसिंहपूर क्षेत्राचे संस्कृत माहात्म्य व त्याचा मराठी अर्थ दिलेला आहे. परिशिष्टातील दहा अभ्यासपूर्ण प्रदीर्घ लेख हे तर या खंडाचे वैभवच म्हणायला हवे. या लेखांमधून नृसिंह उपासनेची परंपरा, मूर्तीशास्त्र, भारतातील नृसिंह क्षेत्रे यांवर उत्तम प्रकाश टाकलेला आहे. हे सर्व लेख नुसते माहितीपूर्णच नाहीत तर रंजकही झालेले आहेत. श्रीनृसिंह दैवताची सर्वांगीण ओळख करून देणारा हा कोश वाचकांबरोबरच अभ्यासकांसाठी व नृसिंह उपासकांसाठीही अतिशय महत्त्वाचा ठरतो. हे अपूर्व शब्दब्रह्म कृपया जरूर संग्रही ठेवा व अभ्यासा,  ही माझी कळकळीची प्रार्थना आहे. हा कोश १९९६ सालीच प्रकाशित झालेला असल्याने आता फार थोड्याच प्रती शिल्लक आहेत. असे प्रचंड महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा पुन्हा होत नसतात, तेव्हा त्वरा करून हे अल्पमूल्यात उपलब्ध झालेले अद्भुत धन प्राप्त करून घ्यावे, ही विनंती. कोश हवा असल्यास श्रीवामनराज प्रकाशन, पुणे यांना 02024356919 क्रमांकावर किंवा माझ्या खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क करावा, ही विनंती.
आजच्या वैशाख शुद्ध द्वादशी तिथीचे आणखी एक महान वैशिष्ट्य म्हणजे, आजच भक्तश्रेष्ठ अंबरीष राजासाठी, भगवान महाविष्णूंनी दुर्वास ऋषींचा दहा वेळा गर्भवासाला जाण्याचा शाप आपल्यावर घेऊन आपले भक्तवात्सल्य व भक्ताभिमान पुन्हा एकदा दाखवून दिला होता. हेच भगवान विष्णूंचे दशावतार होत. हा प्रसंग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी घडला. त्यामुळे आज श्रीभगवंतांचीही जयंती साजरी केली जाते.
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
( छायाचित्र  : श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील श्रीअतिबळेश्वर मंदिराच्या बाहेरील प्राचीन श्रीलक्ष्मीनृसिंह शिल्प )

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

17 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ६ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ६ वे *

भगवान श्रीनृसिंहांचा अवतार हा केवळ भक्त रक्षणासाठीच झालेला असल्याने भक्ताभिमान व भक्तवात्सल्य हे या अवताराचे मूळ वैशिष्ट्य आहे. भगवान श्रीराम व श्रीकृष्ण हे दोन प्रमुख पूर्णावतार सोडता इतर विष्णू अवतारांमध्ये आवेश अवतार असूनही श्रीनृसिंह अवतारच जनमानसात जास्त प्रसिद्धी पावलेला दिसतो. इतर देवतांच्या मानाने नृसिंह हे कुलदैवत असणा-या घराण्यांचीही संख्या खूप मोठी आहे. सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त करणारा असल्यानेच बहुदा श्रीनृसिंह अवताराची आज हजारो वर्षे उपासना होत राहिलेली आहे. संत व पंत कवींनी नृसिंह विषयक प्रचंड वाङ्मय रचलेले आहे. भारतभरात नृसिंह मंदिरांची संख्या देखील भरपूर आहे. तसेच विपुल प्रमाणात स्तोत्रमंत्रादी श्रीनृसिंह उपासना वाङ्मय सुद्धा उपलब्ध आहे. ( अशा सर्व वाङ्मयाचा व इतर प्रचंड माहितीचा एकूण साडेसोळाशे पृष्ठांचा तीन खंडात्मक " श्रीनृसिंह कोश " प्रकाशित झालेला आहे. हे अमूल्य शब्दधन सवलतीत केवळ तीनशे रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याविषयी सविस्तर माहिती उद्याच्या लेखात पाहू. )
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांची कथा तर सर्वश्रुत आहेच, पण अगदी तशीच कथा भगवान आद्य श्रीशंकराचार्यांच्या चरित्रात देखील घडलेली आहे. भगवान श्रीनृसिंहांनी पुन्हा एकदा आपले भक्तरक्षणाचे ब्रीद त्यांच्या बाबतीतही सार्थ ठरविलेले आहे. ही कथा विलक्षण असून आपलाही भक्तिभाव वाढवणारी आहे.
एकदा आद्य शंकराचार्यांचा श्रीशैल्याला मुक्काम असताना, अनेक वाईट धंदे जेथे चालत असत अशा त्या कर्दळीवनातील एक वामाचारी कापालिक तेथे आला. त्याने आचार्यांना पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की, हे सर्व उत्तम लक्षणांनी युक्त आहेत. अशा बत्तीस लक्षणी पुरुषाचा जर आपण आपल्या देवीला बळी दिला तर ती प्रसन्न होऊन इच्छित वर तत्काल देईल. म्हणून तो आचार्यांकडे आला व त्यांना सरळ म्हणाला की, " मला आपला बळी देण्याची इच्छा आहे. तुमचा बळी दिला की माझी इष्टदेवता प्रसन्न होऊन मला सिद्धी प्रदान करेल." त्याच्या इच्छेवर आचार्यांनी शांतपणे होकार दिला व परोपकारार्थ आयुष्य व्यतीत करणारे भगवान श्रीशंकराचार्य, त्याने सांगितलेल्या रात्री बळी जाण्यासाठी तयार राहिले.
आचार्यांनी ही गोष्ट आपल्या कोणाही शिष्यांना कळू दिलेली नव्हती. कापालिकाबरोबर ते जायला निघाले. इकडे आचार्यांचे प्रमुख शिष्य श्रीपद्मपादाचार्य यांना ध्यानात त्यांच्या इष्टदेवतेने अर्थात् भगवान श्रीनृसिंहांनी सांगितले की, " तुझ्या गुरूंवर मोठे संकट येऊ पाहते आहे. तू केवळ त्यांच्या मागे मागे जा, पुढचे आम्ही पाहून घेतो. देवांच्या आज्ञेनुसार श्रीपद्मपादाचार्य तडक निघाले. लपून छपून ते कापालिकाच्या मागोमाग त्याच्या कर्दळीवनातील अड्ड्यावर गेले. तेथे गेल्यावर त्या कापालिकाने आचार्यांची पूजा करून त्यांना बळी देण्यासाठी देवीसमोर ओणवे बसवले. एवढ्यात अचानकच पद्मपादाचार्यांच्या देहात भगवान नृसिंह प्रवेशले व त्यांनी भयंकर गर्जना करून त्या दुष्ट कापालिकाच्या हातातली तलवार घेऊन त्याचाच वध केला. कापालिक मेला तरी त्या उग्र रूपाच्या भयंकर गर्जना चालूच होत्या.
ते क्रोधाविष्ट पण भक्तवत्सल ' आवेशरूप ' पाहून श्रीशंकराचार्यांचे अष्टसात्त्विक भाव जागे झाले व त्यांनी नृसिंहरूपाचा तो अनावर क्रोध आवरावा म्हणून एक सुंदर स्तवन रचले. त्या भावभिजल्या स्तुतीने प्रसन्न होऊन श्रीपद्मपादाचार्यांच्या देहात प्रकटलेले नृसिंह भगवान आचार्यांना आशीर्वाद देऊन गुप्त झाले.
याशिवाय भगवान शंकराचार्यांनी रचलेली, " नृसिंह पंचरत्नम् " व " लक्ष्मीनृसिंह करावलम्बन स्तोत्र " ही दोन्हीही फार सुंदर स्तोत्रे आहेत. नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्रीआचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन, या वैराण मरुभूमीसारख्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी भगवान लक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद ख-या आनंदासाठी तू सतत सेवन करावास, असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे, सहज पाठ होऊन सारखे गुणगुणावेसे वाटते.
श्रीनृसिंह भगवंतांनी अशा प्रकारे पुन्हा एकदा आपले भक्तवात्सल्य दाखवीत भक्तरक्षणाचे ब्रीद पूर्ण केलेले आहे. भगवान श्रीनृसिंह ही वरकरणी जरी अत्यंत उग्र देवता असली तरी ती आपल्या भक्तांचा मातेप्रमाणे प्रेमानेच सांभाळ करीत असते. समर्थ श्रीरामदासस्वामी आपल्या अभंगात भगवंतांच्या याच दोन्ही वैशिष्ट्यांचा एकत्रित उल्लेख करून सांगतात की, " उग्र बहु नृसिंहोपासना । लोभे सांभाळी देव भक्तजना ॥ " सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त करणारे, भक्ताभिमानी भक्तवत्सल भगवान श्रीनृसिंह हे निजभक्तांचे लाडके दैवत न झाले तरच नवल !!
श्रीशंकराचार्य आपल्या करावलम्बन स्तोत्रात भक्तकरुणाकर श्रीनृसिंहरूपाचे सुंदर व अगदी चित्रदर्शी वर्णन करताना म्हणतात,
एकेन चक्रमपरेण करेण शङ्ख-
मन्येन सिन्धुतनयामवलम्ब्य तिष्ठन् ।
वामेतरेण वरदाभय-पद्मचिन्हं
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१४॥
आचार्य म्हणतात, " डावीकडील वरच्या एका हातात चक्र व दुस-या हातात शंख धरणा-या तर तिस-या हाताने सिन्धुतनया भगवती लक्ष्मीला आलिंगन दिलेल्या आणि उजवीकडील एका हाताने वर देणा-या, दुस-या हाताने अभयदान देणा-या व तिस-या हातात कमल धारण करणा-या हे नृसिंहप्रभो, आपण मला आपल्या हाताचा आधार द्या, माझा सर्वतोपरि सांभाळ करा ! "
मोजके आणि मार्मिक अनुप्रास साधून रचलेले हे संपूर्ण करावलंबन स्तोत्र फार मनोहर आहे. त्यातून भगवान आद्य शंकराचार्यांनी श्रीनृसिंहांची नेमक्या व भावपूर्ण शब्दांमध्ये महती गाऊन करुणा भाकलेली आहे. अनेक नृसिंहभक्तांच्या नित्यपाठात विसावलेली भगवान आद्य श्रीशंकराचार्यांची ही दोन्ही स्तोत्रे अप्रतिमच आहेत.
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

16 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ५ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ५ वे *

भगवान श्रीनृसिंह हे अत्यंत उग्र व भयंकर रूप मानले जाते. आपल्या लाडक्या भक्तावर अनन्वित अत्याचार करणा-या हिरण्यकश्यपूच्या वधासाठीच हा परम विलक्षण " आवेश " अवतार झालेला असल्यामुळे, साहजिकच त्यांच्या रूपात, लीलेत क्रोधाचे प्राबल्य होते. पण हा अवतार अतिशय उग्र असला तरी, निर्माण झाला मात्र भक्तप्रेमातूनच ना ! त्यामुळेच भगवान श्रीनरहरीरायांच्या अपरंपार भक्तवात्सल्याचेच सर्व संतांनी व भक्तांनी वर्णन केलेले आढळून येते.
श्रीमद् भागवत महापुराणात एक कथाभाग येतो. त्यानुसार हिरण्यकश्यपू व त्याचा भाऊ हिरण्याक्ष हे दोघेही मूळचे भगवान श्रीविष्णूंचे द्वारपाल जय-विजय. एके दिवशी भगवंतांच्या दर्शनाला आलेल्या सनत्कुमारादी चार भावंडांचा त्यांनी वैकुंठाच्या द्वारातच अपमान केला. त्यावर चिडून त्यांनी जयविजयाला , " पृथ्वीवर तीन जन्म राक्षस होऊन जन्माला जा " असा शाप दिला. त्यामुळे तेच पहिल्या जन्मात हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू झाले. हिरण्याक्षाला वराह भगवंतांनी मारले तर हिरण्यकश्यपूूला नृसिंहांनी. दुस-या जन्मात तेच रावण व कुंभकर्ण झाले व श्रीरामांच्या हातून मृत्यू आला. तर तिस-या जन्मात शिशुपाल व दंतवक्त्र झाले व त्यांना भगवान श्रीकृष्णांनी मारले. तिन्ही जन्मांत या दोघांना साक्षात् भगवंतांनीच स्वहस्ते मारून मुक्ती दिली. हे दोघेही भगवंतांशी सरूपता मुक्ती लाभलेले त्यांचे नित्यपार्षद होते. त्यांना शापामुळे जन्म मिळाले तरी त्यांची भक्ती काही थांबली नाही. त्यांनी तसाच वर भगवंतांना मागितलेला होता. म्हणूनच त्यांनी या तिन्ही राक्षस जन्मात " विरोधी भक्ती " करून भगवंतांचे अनुसंधन अबाधितच राखलेले होते. ही लीला जरा वेगळ्या दृष्टीने पाहिली तर, श्रीभगवंतांनी आपल्या पार्षदांना शापातून मुक्त होऊन पुन्हा मूळ स्थितीला लवकर जाण्यासाठी कृपापूर्वक मदतच केलेली आहे, असे स्पष्ट दिसून येते. हेही त्यांचे अपार भक्तवात्सल्यच नाही का?
भगवान श्रीनरहरीरायांच्या या प्रेमकृपेचाच अनुभव आजही त्यांना शरण जाऊन कळवळून प्रेमाने साद घालणा-यांना नेहमीच येत असतो. भगवान श्रीनृसिंह हे भक्तांचे कोणत्याही संकटातून हमखास रक्षण करणारे दैवत आहेत.
अशा या परम विलक्षण श्रीनृसिंह रूपाचा योगार्थही फार सुंदर आहे. श्रीनृसिंह कोशाच्या प्रथम खंडाच्या " देवा तूं अक्षर " या आपल्या प्रस्तावनेत, कोशाचे संपादन-प्रमुख व श्रीनृसिंहकृपांकित थोर सत्पुरुष प. पू. श्री. शिरीषदादा कवडे नृसिंहरूपाचा योगार्थ बहारीने स्पष्ट करताना म्हणतात, " श्रीनृसिंहावतार हे योगाच्या परिभाषेतील एक गूढ रूपक आहे. हिरण्यकश्यपूरूपी दुर्वासनांचे, कुवृत्तींचे निर्दालन करून प्रल्हादरूपी भक्त जीवाला याच शरीरात भगवत्स्वरूप होता येते, हे या अवतारकथेचे मर्म आहे.
सुषुम्ना नाडीरूपी स्तंभातून नृसिंहरूपात भगवत् शक्तीचे प्राकट्य आहे. ही शक्ती अर्धनर व अर्धमृगेंद्र रूपात आहे, म्हणजे सात्त्विकभावाने उत्पन्न झालेला वासनाविरोधी क्रोधच वासना निर्दालनास मदत करीत आहे, मृगेंद्र(सिंह) रूप झाला आहे. या वासनांचे निर्दालनही संधीकालात म्हणजे सुषुम्नेतच झाले आहे व त्या हिरण्यकश्यपू निर्दालनानंतरच भगवान शांत झालेले आहेत. त्यांची अनुग्रहशक्ती आपले ईप्सित कार्य साधून मूळ निरामय स्वरूपाला आलेली आहे.
त्या भगवत् कृपाशक्तीच्या विलक्षण, अद्भुत अशा आविर्भावाचे वर्णन करताना, तिच्या अंकावर जीवस्वरूपात स्थिर झालेले भक्तराज प्रल्हाद म्हणतात, " माझे मन आपल्या अमृतस्वरूप दर्शनाच्या आस्वादनाने तृप्त होत नाही. हे प्रभो, ब्रह्मादी देवतांनाही जे दर्शन अतीव दुर्लभ आहे, असे आपले पावन दर्शन दहा लाख वर्षे मिळाले तरीही माझे मन तृप्त होणार नाही. अशा दर्शनानंतरही दर्शनासाठीच अतृप्त, आसुसलेल्या मज दासाचे चित्त आपल्याच दर्शनाशिवाय आणखी कशाची इच्छा करू शकते ? " ( श्रीनृसिंहपुराण ४३.७४-७५ )
या श्लोकात वेदव्यासांनी साधकाच्या परम अवस्थेचे मर्मच जणू उलगडून दाखवलेले आहे ! "
प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांचे हे नृसिंहरूपाचे सुरेख योगार्थ-विवरण सर्वच भक्तांनी नित्य चिंतन करावे, असे महत्त्वपूर्ण आहे.
श्रीभगवंतांचा कोणताही अवतार हा अत्यंत विचारपूर्वक झालेला असतो, त्यातून अनेक मार्मिक संदर्भ प्रकट होत असतात. आपापल्या अधिकारानुसार व भगवंतांच्या कृपेनुसार ते यथायोग्य प्रकारे व योग्यवेळी आपोआप समजून येतातच, हेच त्यातील खरे इंगित आहे.
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
( छायाचित्र  : श्रीक्षेत्र कोळे नृसिंहपूर येथील श्रीज्वालानृसिंह )

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

15 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ४ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ४ थे *

भक्त - भगवंत हे प्रेमनाते बोला-बुद्धीच्या पलीकडचे, अत्यंत विलक्षण असे असते. सर्वच नात्यांमध्ये प्रेम अनुस्यूत असतेच, पण या सगळ्या नात्यांमध्ये भक्त-भगवंत आणि गुरु-शिष्य ही दोन नाती फार वेगळेपण मिरवणारी व अपूर्व प्रेम व्यक्त करणारी अशी असतात. श्रीज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात भगवान श्रीमाउलींनी भगवंतांच्याच मुखाने हा समग्र भक्तियोग अप्रतिम शब्दांत वर्णन करून सांगितलेला आहे. त्यात एकेठिकाणी ते म्हणतात,
ऐसे अनन्ययोगें ।
विकले जिवें मनें आंगें ।
तयांचें कायि एक सांगें ।
जें मी न करीं ॥ज्ञाने.१२.६.८२॥
अरे अर्जुना, कायिक, वाचिक व मानसिक भावांनी अखंड माझे (भगवंतांचे) अनुसंधान करणा-या, मलाच जीव, मन, शरीर व प्राणांनी पूर्ण विकल्या गेलेल्या माझ्या अनन्य भक्तांची अशी कोणती गोष्ट आहे की जी मी कधी करत नाही?
भगवंतच भक्तांच्या सर्व गोष्टी न सांगता सांभाळत असतात, त्यांची पडेल ती सेवा ते अत्यंत आनंदाने करीत असतात. म्हणून तेच खरे ' भक्तश्रेष्ठ ' म्हटले जातात. आजवरच्या असंख्य संतांच्या चरित्रातले अनंत प्रसंग याला साक्ष आहेत. याविषयी साक्षात् श्रीभगवंतांचेच हृदगत सांगताना श्रीमाउली म्हणतात,
तैसे ते माझे ।
कलत्र हें जाणिजे ।
कायिसेनिही न लाजें ।
तयांचेनि मी ॥ज्ञाने.९.७.८६॥
भगवंत आपल्या भक्तांना लाडक्या पत्नीप्रमाणे जपत असतात, भक्तांच्या, भक्तांसाठी कोणत्याही गोष्टी करताना त्यांना अजिबात लाज वाटत नाही. आपल्या अनन्य भक्तांसाठी अगदी हीन गोष्टी देखील देव प्रेमानेच करतात.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांसाठी झालेला अगदीच आगळा-वेगळा, अभूतपूर्व श्रीनृसिंहावतार हा श्रीभगवंतांच्या याच भक्तवात्सल्य-ब्रीदाचा मनोहर आविष्कार नव्हे काय? दैत्यराज हिरण्यकश्यपूचा तो कसला विचित्र वर, त्यावर पूर्ण विचारांती झालेला, अर्धा मानव व अर्धा सिंहरूप अवतार, खांबामधून प्रकटणे, नखांचे अभिनव अस्त्र, तिन्हीसांजेची वेळ, उंब-यासारखे मजेशीर ठिकाण ; काय एकेक विलक्षण गोष्टी सांभाळून व दैत्याच्या वरामध्ये काहीही न्यून न येऊ देता केलेली अवतार लीला, सारेच न्यारे, अद्भुत आहे. पण भक्त प्रल्हादांसाठी असल्या विचित्र रूपाने प्रकट होऊन देवांनी आपले ब्रीद राखलेच शेवटी. माउलींची वरील ओवी जणू भगवंतांनी नृसिंह रूप घेऊन खरी करून दाखवलेली आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.
भगवान श्रीमाउलींनी श्रीज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाच्या शेवटी एका ओवीत, अर्जुनावरील कृष्णकृपेचे महत्त्व सांगताना भगवान श्रीनृसिंहांचा मार्मिक उल्लेख केलाय. ते म्हणतात,
जो प्रल्हादाचिया बोला ।
विषाही सकट आपणचि जाहाला ।
तो सद्गुरु असे जोडला ।
किरीटीसी ॥ज्ञाने.१०.४२.३३४॥
अर्जुनाच्या सर्व इच्छा तत्काळ पूर्ण होत आहेत कारण त्याला भगवान श्रीकृष्णांसारखे सद्गुरु लाभलेले आहेत. हे भगवंत प्रल्हादाच्या सतत चालणा-या सप्रेम नामस्मरणासाठी स्वत:च विषरूपही झाले तसेच त्याला त्यांनी सर्व संकटांमधून सुखरूप बाहेर काढले. इथे उपमेच्या माध्यमातून श्रीमाउली भगवंतांचे भक्तांवरील परमप्रेमच सांगत आहेत. बाल प्रल्हादावर हिरण्यकश्यपूने अनंत अत्याचार केले; पण प्रत्येकवेळी तो वाचला. कारण हे भगवंतच त्या त्या भयानक रूपात स्वत:च जाऊन प्रल्हादाचे रक्षण करीत होते. हिरण्यकश्यपूने विष पाजले तर ते विषच भगवंत बनून राहिले. त्यामुळे ते प्यायल्याने मरायच्या ऐवजी प्रल्हादजी अजरामर झाले; इतके की आज अनेक युगे लोटली तरी प्रल्हाद-श्रीनृसिंहांच्या भक्तिकथा आम्हांला हव्याहव्याशा वाटतात. त्या ऐकल्याने आमचे भक्त-हृदय आजही भगवंतांवरच्या प्रेमाने उचंबळून येते. आमचे बालमन व बालपण आजी-आजोबांच्या तोंडून रसभरित प्रल्हादचरित्र ऐकून आजही निश्चिंततेचा अनुकार देते. भक्तवर प्रल्हादांचे हे सर्वजनप्रियत्व हेच त्यांच्या अनन्य हरि-निष्ठेचे व एकूणच भगवद् भक्तीचे अलौकिकत्व भरभरून सांगत नाही का?
भगवंतांच्या या भक्तवात्सल्याचे नेमके वर्णन करताना श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात,
प्रल्हादाकारणे नरसिंह झालासी ।
त्याचिया बोलासी सत्य केले ॥१॥
राम कृष्ण गोविंद नारायण हरी ।
गर्जे राजद्वारी भक्तराज ॥२॥
विठ्ठल माधव मुकुंद केशव ।
तेणे दैत्यराव दचकला ॥३॥
तुका म्हणे त्याकारणे सगुण ।
भक्ताचे वचन सत्य केले ॥४॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

14 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ३ ***


* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ३ रे *

श्रीभगवंतांना सर्वात जास्त आपले भक्तच आवडतात. त्यांचे आपल्या भक्तांवर, अभिन्न व परमप्रिय अशा लक्ष्मीमातेपेक्षाही जास्त प्रेम असते आणि प्रसंगी ते विलक्षण प्रेम भगवंत मुद्दाम दाखवूनही देतात.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांसाठी झालेला हा अद्भुत श्रीनृसिंहावतार हे याच विलक्षण भक्त-प्रेमाचे विशेष उदाहरण म्हणायला हवे.
श्रीमद् भागवत महापुराणाच्या सप्तम स्कंधातील अध्याय क्रमांक १ ते १० मध्ये ही संपूर्ण नृसिंहावतार कथा भगवान श्रीवेदव्यासांनी फार सुंदर शब्दांमध्ये वर्णिलेली आहे. त्यात भक्तिशास्त्रातले अनेक सिद्धांत त्यांनी स्पष्ट करून सांगितलेले आहेत.
श्रीनृसिंह हे भगवंतांचे अत्यंत उग्र रूप होते, इतके की त्यांच्या आविर्भावामुळे संपूर्ण ब्रह्मांडच जळू लागले. भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींनी, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दाखवलेल्या विश्वरूपाचे वर्णन करताना जे म्हटले आहे, ते या उग्र नृसिंहरूपालाही चपखल साजणारेच आहे. माउली म्हणतात,
एथ अग्नीचीही दिठी करपत ।
सूर्य खद्योत तैसा हारपत ।
ऐसें तीव्रपण अद्भुत ।
तेजाचे यया ॥ ज्ञाने.११.३०० ॥
हे नरसिंहरूप इतके भयंकर होते की त्याच्या तेजाने प्रत्यक्ष अग्नीचीही दृष्टी करपली, महाप्रतापी सूर्य काजव्यासारखा भासू लागला. असे ते तीव्र नृसिंहतेज अवघ्या ब्रह्मांडासाठी असह्य होते.
पण त्यांचे हिरण्यकश्यपूला मारण्याचे कार्य झाल्यावरही त्यांचा क्रोध काही शांत होईना. हे पाहून सर्व देव-देवता अस्वस्थ झाले. श्रीनृसिंह भगवंतांसमोर जाण्याची कोणाचीच छाती होईना. ते वारंवार डरकाळ्या फोडून ब्रह्मांड दणाणून सोडत होते. देवांना शांत तर करायलाच हवे, नाहीतर त्यांच्या क्रोधाग्नीत सगळे त्रिभुवन जळून खाक व्हायचे. देवतांना काहीच सुचेना काय करावे ते. मग त्यांनी भगवती लक्ष्मीला प्रार्थना केली नृसिंहांना शांत करण्याची. त्या देवांसमोर आल्या ख-या, पण ते उग्र रूप पाहून घाबरल्या व त्याच पावली परत फिरल्या.
शेवटी ब्रह्मदेव लहानग्या प्रल्हादाला म्हणाले, " अरे बाळा, हे उग्ररूप तुझ्यासाठी निर्माण झालेले आहे, आता तूच त्यांना शांत कर. आमची काही हिंमत नाही त्यांच्या समोर जायची ! " प्रल्हादाने शांतपणे ब्रह्मदेवांचे बोलणे ऐकले व तो त्या उग्ररूपाला अजिबात न भिता समोर गेला. त्याने अतीव प्रेमाने व आदराने भगवंतांना साष्टांग दंडवत घातला.
देवांच्या ज्या क्रोधापुढे त्रैलोक्याची होळी होत होती, तो क्रोध बाळ प्रल्हादाला पाहताच एका क्षणात शांत झाला. ज्या रक्त ओकणा-या भयानक नेत्रांमधून काही क्षणांपूर्वी जणू क्रोध-अंगार बरसत होते, तेच नेत्र बाल प्रल्हादाला समोर पाहून अचानक मायेने भरून आले. भगवंतांच्या हृदयात मातृवात्सल्याचा पूर आला आणि त्याच स्नेहाने त्यांनी प्रल्हादाच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. प्रेमावेगाने प्रल्हादाला जवळ घेऊन आपल्या मांडीवर बसवले आणि चाटायला सुरुवात केली. ते सिंहरूपात प्रकटलेले असल्यामुळे चाटणे हेच त्यांचे प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम होते.
इतर देव-देवता तर सोडा, पण लक्ष्मीमाता सुद्धा जेथे जाऊ शकत नव्हती, तेथे भक्तश्रेष्ठ प्रल्हाद नि:संकोचपणे गेले, हेच भक्तीचे श्रेष्ठत्व आहे. भगवान वेदव्यासांनी या गोष्टीतून दोन सिद्धांत स्पष्ट केले आहेत की, भक्त व भगवंतांचे प्रेमनाते सगळ्यात वेगळे व अलौकिक असते आणि जे देव-देवतांनाही कधीच प्राप्त होत नाही, ते भगवंतांचे समग्र प्रेम आपल्या अनन्य भक्तीमुळे केवळ भक्तालाच मिळत असते. म्हणून प्रेमभक्ती ही खरोखरीच बोला-बुद्धीच्या पलीकडची, अपूर्व-मनोहर गोष्ट आहे !!
भगवंतांच्या या अद्भुत भक्तप्रेमाचे चपखल वर्णन करताना सद्गुरु श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात,
जय जय नरसिंहा ।
अकळ न कळे तुझा पार ॥ध्रु.॥
भक्तभूषण दीनवत्सल हरी ।
प्रल्हादासी रक्षिलें नानापरी ॥१॥
भावार्थ प्रल्हादभक्तें दाखविला ।
त्याच्या भावार्थे स्तंभी प्रगट झाला ॥२॥
हरिजनाचा द्वेषी सारियेला ।
दास प्रल्हाद देवें रक्षियेला ॥
॥स.गा.११४९.३॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

13 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - २ ***

⁠⁠⁠

* श्रीनृसिंह जयंती नवरात्र  पुष्प २ रे *

भक्ती ही जात, धर्म, कर्म, वंश इत्यादी सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ आहे. श्रीभगवंतांच्या परिपूर्ण प्राप्ती साठी अनन्य-भक्ती हा एकच मार्ग आहे ; असे भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे प्रतिपादन आहे.
अनन्य भक्तीमुळे भगवंतांशी जी पूर्ण एकरूपता होते, ती ज्ञान, योग, याग, धर्माचरण अशा इतर कोणत्याही मार्गांनी होत नाही, हे सांगताना माउली भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचे उदाहरण देतात.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की,
तो प्रल्हाद गा मजसाठीं ।
घेतां बहुतें सदा किरीटी ।
कां जें मियां द्यावें ते गोष्टी ।
तयाचिया जोडे ॥
॥  ज्ञाने. ९.३२.४५१॥
अरे अर्जुना, माझ्या प्रेमळ भक्त प्रल्हादासाठी मला नृसिंहरूप धारण करावे लागले. तो खरेतर पापयोनी अशा दैत्यकुळात जन्माला आलेला असूनही प्रत्यक्ष माझ्याशी तुलना केली तर, तोच माझ्यापेक्षा कांकणभर सरस ठरेल. कारण ज्या मोक्षासारख्या दुर्मिळ गोष्टी मी खूप परीक्षा पाहून, क्वचित एखाद्याला प्रदान करतो, त्या त्याच्या केवळ कथा जरी प्रेमाने श्रवण केल्या तरी कोणालाही सहज प्राप्त होतात. म्हणूनच भक्तवर प्रल्हादजी आपल्या भक्तीच्या बळावर भगवंतांहूनही श्रेष्ठ ठरतात.
भगवान श्रीमाउली भक्तीला गंगेची उपमा देतात. एकदा गंगेला मिळाले की स्वतंत्र अस्तित्व संपते. मग पूर्वी तो ओढा असो नाहीतर छोटी नदी असो किंवा गावाचे घाण गटार असो, गंगेला मिळाले की ते गंगारूपच होऊन ठाकते. तसे एकदा या भगवंतांच्या भक्तिचिद्गंगेला मिळाले की तो भगवंतांचेच रूप होऊन उरतो. गंगेला जसा समुद्र हाच अंतिम पाडाव असतो, तसे भक्तीला भगवंत हेच हक्काचे अंतिम गंतव्य स्थान आहेत. हेच भक्तीचे सर्वश्रेष्ठत्व आहे. असे अन्य कोणत्याही मार्गात घडत नाही. फक्त हे ' गंगेला मिळणे ' आपल्या हाती नाही, ते श्रीसद्गुरूंनीच कृपापूर्वक घडवावे लागते. ते होईपर्यंत आपण जसे जमेल तसे मनापासून भगवंतांना आळवीत राहायचे असते, वेळ आली की ते बरोबर गुरुरूपाने कृपा करतातच. ही निश्चिंतता देखील केवळ भक्तीतच लाभते. ( आज गंगासप्तमी, अर्थात् गंगेची उत्पत्ती तिथी आहे, म्हणून मुद्दाम श्रीमाउलींचे भक्तिचिद्गंगा विवेचन मांडले. )
म्हणून अर्जुना, अनन्य-भक्ती समोर जात, वंश इत्यादी सर्व गोष्टी गौणच आहेत. भक्ती हीच धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चारी पुरुषार्थांची माता आहे !
देवांच्या अवतारलीला आणि अवतारी भक्तांच्या, संतांच्या लीला यांच्यामध्ये फलत: भेद नसतो. या कोणत्याही लीलांचे प्रेमाने केलेले वाचन पुण्यप्रद असतेच पण त्यांचे चिंतन-मनन हे त्याहूनही फायदेशीर असते. कारण संत दिसायला तरी आपल्या सारखेच मनुष्यरूप असतात, त्यांनाही आपल्यासारखेच सुख-दु:खादी भोग असतात. म्हणून त्यांच्याविषयी एक वेगळी आपुलकी आपोआपच आपल्या मनात निर्माण होते. या आपुलकीमुळेच, कठीण परिस्थितीत ते कसे वागले? त्यांनी कोणते निर्णय घेऊन आपली भक्ती प्रपंचाच्या रामरगाड्यात देखील अबाधित राखली? याबद्दलचे त्यांचे प्रसंग वाचून आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते, साधनेचा आपला हुरूप वाढतो. शिवाय माउली सांगतात की, भगवंतांना त्यांच्या भक्तांची स्तुती केली की विशेष आनंद होतो व ते त्या स्तुती करणा-यावर प्रसन्न होऊन कृपा करतात. हा दुहेरी फायदा असतो संत चरित्रांचा. म्हणून नेहमी संतांची चरित्रे वाचावीत, त्यावर चिंतन करावे. याही दृष्टीने भक्तश्रेष्ठ प्रल्हादांचे चरित्र फार मोठा आदर्श आहे. सभोवती अत्यंत विरोधी वातावरण असूनही त्यांनी निष्ठेने इतकी भक्ती केली की, साक्षात् भगवंतांना त्यांच्यासाठी अवतार धारण करावा लागला. धन्य ते भक्तवर प्रल्हादजी !!
अशा परमवंदनीय प्रल्हादबाळासाठी भगवान श्रीनरहरीराय धावत आले व त्यांनी त्याचे संरक्षण केले. या लीलेचे फार मोहक वर्णन करताना भक्तवर श्रीनामदेवराय म्हणतात,
काय रे गडगडित दुमदुमित ।
ब्रह्मकटाह उलथूं पहात ॥१॥
तो देव आला रे नरहरी ।
आतां कवण सांवरी ॥२॥
प्रल्हादासी दिधले जैत्य ।
हर्षे नामा गुढी उभारीत ॥ ना.गा.५१०.३॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
( छायाचित्र:  प्रल्हादस्थापित श्रीनृसिंहराज, श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

12 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - १ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प १ ले *

आज वैशाख शुद्ध षष्ठी, परमाराध्य श्रीनृसिंह भगवंतांच्या जयंती-नवरात्राचा प्रथम दिवस. प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांचे कुलदैवत नीरा-नृसिंहपूर येथील भगवान श्रीनृसिंहराज हे होत. प. पू. काका हे जयंती नवरात्र मोठ्या आवडीने व उत्साहात साजरे करीत असत. श्रीनृसिंह जयंतीचा उत्सव होईपर्यंत ते कैरी किंवा आंबा अजिबात खात नसत. जन्मकालानंतर श्रीनरहरीरायाला कैरीच्या पन्ह्याचा नैवेद्य दाखवून उपस्थित ब्राह्मणांची स्वहस्ते पाद्यपूजा करून त्यांना ते पन्हे प्यायला देत व मगच प. पू. काका कैरी, आंबा खात असत.
प. पू. काकांच्या घराण्यात श्रीनृसिंहांचा चांदीचा फार सुंदर आणि प्राचीन टाक नित्यपूजेत आहे. या देखण्या टाकामध्ये खांबातून प्रकट झालेले उग्र नृसिंह भगवान हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेऊन त्याचे पोट नखांनी फाडताना स्पष्ट दिसतात. आपल्या उजवीकडे कयाधू व डावीकडे लहानगे प्रल्हादजी हात जोडून उभे राहिलेले दिसतात. या छोट्याशा टाकातही देवांच्या चेह-यावरील उग्र भाव लपत नाहीत. आज जयंती नवरात्राच्या प्रथमदिनी, गुरुपुष्यामृत योगावर प. पू. काकांच्या नित्यपूजेतील त्याच परमपावन श्रीविग्रहाचे आपण दर्शन घेऊन श्रीनरहरीनामाचा जयजयकार करूया !!
भगवान नृसिंहांची अवतार लीला व भक्तश्रेष्ठ प्रल्हादांची गोष्ट आपण अगदी लहानपणापासूनच ऐकत-वाचत मोठे झालेलो आहोत. श्रीभगवंतांच्या " भक्तवात्सल्य " ब्रीदाचे अलौकिक उदाहरण म्हणून ही गोष्ट प्रसिद्धच आहे. या कथेतून भक्तिशास्त्रातील अनेक सिद्धांत स्पष्ट होतात. पण तेवढा काही विचार आपण कधी केलेलाच नाही या गोष्टीचा. म्हणूनच साधूसंतांच्या वाङ्मयामधून उलगडणारा श्रीनृसिंहकथेतील मार्मिक भक्तिविचार आता पुढील नऊ दिवस आपण त्यांच्याच कृपेने आस्वादणार आहोत. हीच आपली श्रीनृसिंह जयंती नवरात्र गुणगान-सेवा !
भगवान श्रीमाउलींनी ज्ञानेश्वरीत काही महत्त्वपूर्ण ओव्यांमधून नृसिंह लीलेचा उल्लेख केलेला आहे. एका ठिकाणी भक्तीचे श्रेष्ठत्व व सर्वसमावेशकत्व सांगताना माउली म्हणतात,
ते पापयोनीही होतु कां ।
ते श्रुताधीतही न होतु कां ।
परी मजसी तुकितां तुका ।
तुटी नाही ॥ ज्ञाने.९.३२.४९९॥
ज्या भक्तांनी आपले सर्व भाव केवळ मज एका भगवंतालाच समर्पित करून माझ्याच साठी जे जीवन जगत असतात, ते शरणागत भक्त राक्षसादी पाप योनीत जन्मलेले असले, त्यांनी वेदांचे अध्ययनही केलेले नसले, तरी माझ्याशी म्हणजे साक्षात् भगवंतांशी तुलना केली तर ते तसूभरही कमी ठरणार नाहीत. आधी कसेही असले तरी ते त्या परमभक्तीमुळे पूर्ण भगवत्स्वरूपच झालेले असतात. यासाठी एक चपखल उदाहरण देताना भगवंत अर्जुनाला सांगतात,
पाहें पां भक्तिचेनि आथिलेपणें ।
दैत्यीं देवां आणिलें उणें ।
माझें नृसिंहत्व लेणें ।
जयाचिये महिमे ॥ ज्ञाने.९.३३.४५० ॥
या थोर भक्तीच्या वैभवामुळे पूर्ण तमोगुणी अशा दैत्यांनी देखील सत्त्वगुणी अशा देवतांना उणेपण आणलेले आहे. एवढेच नाही तर, माझा नृसिंहावतार देखील या दैत्यराज प्रल्हादासाठीच तर झाला.
श्रीमाउलींचे येथे स्पष्ट सांगणे आहे की, भगवंतांची पूर्ण प्राप्ती करून घेण्याचा भक्ती हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. भक्ती ही अशी अलौकिक गोष्ट आहे की, तिची भुरळ प्रत्यक्ष परमात्म्यालाही पडते. एरवी निरिच्छ, निस्पृह, निराकार, निर्विकार असा असणारा परमात्मा, या भक्तिसुखासाठी सगुण-साकार होतो, अवतार धारण करतो, अनेक अद्भुत लीला करतो व भक्तांसह त्या परमभक्तीचा आस्वाद पुरेपूर लुटतो.
योगयागादी साधनांच्या कष्टप्रद मार्गापेक्षा सहज सोपा व सर्वांना करता येईल असा एकमेव भक्तिमार्गच आहे व तो सर्वश्रेष्ठही आहे. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत भगवंतांची भक्ती सोडता कामा नये !
भगवान श्रीनृसिंह हे भगवान श्रीमहाविष्णूंचे " आवेश अवतार " आहेत. ते केवळ हिरण्यकश्यपूला मारण्यासाठीच अवतरले होते, असे मानले जाते. पण खरेतर याही अवतारात अनेक भक्तिसिद्धांत अनुस्यूत आहेतच. आज हजारो वर्षे भक्तप्रतिपालक श्रीनरहरी अवताराची उपासना चढत्या वाढत्या प्रमाणात होत आहे, हेच त्यांच्या लोकप्रियतेचे व भक्तवात्सल्याचे निदर्शक नाही का?
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

11 May 2016

*** भाष्यकाराते वाट पुसतू ***



आज वैशाख शुद्ध पंचमी, अद्वैतज्ञानभास्कर भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांची जयंती !
"भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य" असे नुसते नाव जरी उच्चारले तरी आम्हां भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येतो आणि दोन्ही हात जोडले जाऊन केव्हा मस्तक नमवले जाते, ते कळत देखील नाही. इतका या श्रेष्ठ, प्रत्यक्ष शिवावतारी व अलौकिक, अद्भुत विभूतिमत्वाचा आम्हां भारतीयांच्यावर प्रेमळ पगडा आहे. त्यांचीच प्रात:स्मरण स्तोत्रे म्हणत-ऐकत आमचा दिवस उजाडतो तर त्यांची अपराधक्षमापन स्तोत्रे म्हणत आम्ही भारतीय झोपी जातो. आमच्या दैनंदिन जीवनात श्रीमद् शंकराचार्यांचा असा ' अक्षर सहवास ' आम्हांला सतत लाभतो व त्यातील अद्भुत माधुर्य, गेयता, रसिकतेमुळे तो हवाहवासाही वाटतो.
भारतीय तत्त्वपरंपरेत सर्वात श्रेष्ठ व मानाचे स्थान भूषविणा-या अद्वैत-वेदान्त दर्शनाचे प्रणेते भगवान भाष्यकार श्रीमद् शंकराचार्य हे आमचे परमपूजनीय, प्रात:स्मरणीय मार्गदर्शक आहेत. श्रीआचार्यांच्या भव्य जीवन-कार्याचे एका श्लोकात वर्णन करायचे तर असे म्हणता येईल,
अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रवित् ।
षोडशे कृतवान्भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात ॥
केरळ प्रांतातील कालडी गावी शिवगुरु-आर्यांबा या सात्त्विक दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या या परिपूर्ण शिवावताराने वयाच्या आठव्या वर्षी चारही वेदांचा संपूर्ण  व सांगोपांग अभ्यास केलेला होता. त्यांना बाराव्या वर्षी यच्चयावत् सर्व शास्त्रे मुखोद्गत झालेली होती. नर्मदा किनारी सद्गुरु श्रीगोविंदयतींच्या कृपाप्रसाद प्राप्तीनंतर, प्रमुख दश उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, विष्णुसहस्रनाम आदी ग्रंथांवरील सर्व भाष्ये त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी लिहून पूर्ण केली. पुढील सोळा वर्षे संपूर्ण भारतखंडामध्ये अद्वैत वेदान्ताचा प्रचार प्रसार करून हा दिग्विजयी अवतारी महात्मा केवळ बत्तिसाव्या वर्षी मर्त्य जगाचा निरोप घेऊन निजधामी परतला. अर्थात् त्यांचे लौकिक रूप अदृश्य झाले असले तरी, आपल्या ग्रंथांच्या दिव्यरूपाने ते सदैव सर्वांच्या पाठीशी आहेतच.
श्रीआचार्यांचे हे जीवनकार्य नुसते वाचतानाही आपल्या मनात धडकी भरते. त्यांचे एकेक ग्रंथ सुद्धा एका मानवी आयुष्यात पूर्ण समजून घेता येणार नाहीत इतके अद्भुत आहेत.
श्रीशंकराचार्य व श्रीज्ञानेश्वर माउली यांच्या जीवन व कार्यात खूप साम्य आहे व हे दोघेही आपल्याकडचे अद्वितीय चमत्कारच आहेत !
श्रीमद् आचार्यांच्या भाष्यांपेक्षाही त्यांचे खरे स्वरूप त्यांच्या, " प्रबोधसुधाकर, शतश्लोकी, अपरोक्षानुभूती, ब्रह्मज्ञानावलीमाला " इत्यादी प्रकरणग्रंथ तसेच त्यांच्या रसाळ, मोहक स्तोत्रांच्या अभ्यासानेच कळते. श्रीआचार्य हे फार रस-भावपूर्ण अंत:करणाचे भक्तश्रेष्ठ होते. त्यांच्या स्तोत्रांमधील मनोज्ञ भाव-विश्वाचे प्रेमदर्शन आपल्याला अंतर्बाह्य स्तिमित करणारे, खळाळत्या असीम भक्तिसागरात अंतर्बाह्य ओलेचिंब भिजवणारे आहे. " मूकास्वादनवत् ।" अशी सर्वांग-तृप्ती प्रदान करणारे आहे !!
सनातन वैदिक धर्माचे त्यांनी केलेले संरक्षण व पुनरुज्जीवन कार्य हे वादातीत अलौकिक आहे. आचार्य नसते तर संपूर्ण भारतीय उपखंड हा वेदविरोधी व अपूर्ण अशा नास्तिक संप्रदायांनी गिळंकृत केला असता. आचार्यांच्या थोर कार्यामुळेच आपण अजरामर व सर्वश्रेष्ठ अशी आपली वैदिक संस्कृती आजही अभिमानाने जोपासू शकलेलो आहोत. हे त्यांचे आपल्यावरचे कृपाऋण विसरून चालणार नाही.
श्रीमद् आचार्यांचा आणखी एक खूप मोठा उपकार म्हणजे, त्यांनी त्या काळात प्रामुख्याने प्रचलित असलेल्या , गणपती, शंकर, विष्णू, देवी व सूर्य या पाच ब्रह्मस्वरूप देवतांच्या सर्व उपासना संप्रदायांचा " पंचायतन पूजा " या एकाच प्रकारात केलेला विलक्षण समन्वय, हा होय. त्यामुळे विविध संप्रदाय आपापले हेवे-दावे सोडून एकत्र आले व भारतीय संस्कृती तुकडे होण्यापासून वाचली.
सनातन वैदिक हिंदू धर्माच्या रक्षण व संवर्धनासाठी त्यांनी भारताच्या चार दिशांना जगन्नाथपुरी, शृंगेरी, द्वारका व बद्रिनाथ अशी चार व कांचीला पाचवे पीठ स्थापन केले. आपल्या प्रमुख शिष्यांची त्यावर स्थापना करून त्यांना कार्य-नियमावली व उपासना घालून दिली. सनातन धर्माच्या संधारणेसाठी प्रचंड ग्रंथरचना करून भक्कम तात्त्विक आधार निर्माण करून ठेवला. विविध स्थानांवर देवतांची प्रतिष्ठापना करून लोकांना उपासना करण्यासाठी प्रोत्साहित केले. कन्याकुमारीपासून ते पार अफगाणिस्तानापर्यंत आणि पश्चिम सागरापासून ते पूर्वेच्या कामाख्येपर्यंत अखंड भ्रमण करून त्यांनी धर्मस्थापना केली. त्याच काळात त्यांनी आपल्या भूवैकुंठ पंढरीत येऊन भगवान श्रीपांडुरंगांचे दर्शन घेतले. ते सावळे सुकुमार राजस रूप पाहून त्यांनाही उत्स्फूर्त अष्टक रचून स्तुती करायचा मोह आवरला नाही. अवघ्या बत्तीस वर्षात एवढे प्रचंड व अमानवी कार्य केवळ श्रीभगवंतच करू शकतात, यात किंचितही शंका नाही. म्हणूनच आमचे सर्व मायबाप संत श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांना अपरशिवच मानतात.
भगवान श्रीआचार्यांचे किती व कसे गुणगान करावे? आपली लेखणी-वाणी फार फार तोकडी आहे त्यासाठी. साक्षात् ज्ञानावतार भगवान श्रीज्ञानेश्वर माउली देखील, " भाष्यकाराते वाट पुसतू ।" असे म्हणून त्यांचे तत्त्वज्ञान विषयातील सार्वभौमत्व मान्य करतात आणि त्यांच्याच अद्वैतसिद्धांताचे स्वानुभूत प्रतिपादन आपल्या वाङ्मयातून करतात. म्हणून आपण केवळ सद्गुरुकृपेनेच लाभलेल्या, आचार्यांच्या चरणींचे बहुमोल रज:कण मस्तकी धारण करण्याच्या आपल्या महद्भाग्याचा वारंवार हेवा करावा, यात नवल ते काय? हे अपूर्व सुखभाग्य तरी काय थोडे म्हणता येईल का?
भगवान श्रीमद् शंकराचार्य स्वामी महाराजांचा अद्वैत सिद्धांत केवळ एका वाक्यात " ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर: । " असा सांगता येत असला, तरी त्याच्या सविस्तर आकलनासाठी आजवर ग्रंथच्या ग्रंथ लिहिलेले आहेत महात्म्यांनी. पण त्या सर्वंकष सिद्धांताची व्याप्ती एखाद्याच्या पूर्ण कवेत आलेली आहे, हे म्हणणे धारिष्ट्याचेच ठरावे. तरीही माझ्या वाचनात आलेल्या एका विलक्षण ग्रंथाचा मुद्दाम उल्लेख करतो. संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक पूजनीय श्री. शिरीषदादा कवडे यांनी बेळगाव येथील श्रीशंकर जयंती महोत्सवात केलेली " शिवानंदलहरी " या स्तोत्रातील अडतिसाव्या श्लोकावरील चार प्रवचने " चित्तडोहावरील आनंदलहरी " या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झालेली आहेत. या ग्रंथात पू. दादांनी सर्वसामान्यांनाही सहज समजेल अशा सोप्या भाषेत श्रीआचार्यांचे समग्र तत्त्वज्ञान नेमकेपणे विवरिले आहे. माझी सर्वांना प्रेमळ विनंती आहे, हा जबरदस्त ग्रंथ जरूर पाहा, अभ्यासा. त्यातून समोर उभे ठाकणारे श्रीमत्शंकर भगवत्पादाचार्यांचे भव्य-दिव्य स्वरूप आपल्याला कायमच तत्त्व-ऊर्जा देणारे, आपले लळे पाळीत आपल्याला ब्रह्मबोधाचे खाजे भरवणारे व निरंतर आनंदमय करणारेच आहे. आचार्य तत्त्वज्ञानावरचा दुसरा इतका सोपा व सुंदर ग्रंथ आजवर मी तरी पाहिलेला नाही !
भारतभूमीचे चिरंतन आणि अमूल्य वैभव असणा-या भगवान श्रीमद् आद्य श्रीशंकराचार्य स्वामी महाराजांच्या पावन, सर्वतीर्थास्पद श्रीचरणीं, आजच्या श्रीशंकरजयंतीच्या पर्वावर आपण सर्वांनी मिळून प्रेमदानाची कृपायाचना करीत वारंवार नतमस्तक होऊया आणि भगवान श्रीमाउली म्हणतात त्याप्रमाणे श्रीमद् आचार्यांनी दाखवलेल्या उपासनावाटेवरून मार्गक्रमण करीत ब्रह्मबोधाच्या महानगरीत सुखरूप पोहोचूया !
श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयम् ।
नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

9 May 2016

अक्षयतृतीयेचा अमृतयोग


नमस्कार सुहृदहो,
आज वैशाख शुद्ध तृतीया, अक्षयतृतीया !!
आपली वैदिक संस्कृती ही फार प्रगल्भ विचारांतून निर्माण झालेली आहे. या संस्कृतीचा मूळ पायाच विवेक-विचार हा असल्याने यात काहीही अनाठायी किंवा वावगे नाही. आपण नीट विचार न करता उगीचच भुई धोपटत बसतो. म्हणूनच आपले प्राचीन वैभव आपल्याला कवडीमोलाचे वाटते, हे मोठे दुर्दैव आहे. आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत व्यास वाल्मीकादी थोर थोर ऋषी. त्यांच्या अलौकिक ऋतंभरा प्रज्ञेतून साकार झालेल्या सर्व गोष्टी देखील अलौकिकच असणार यात शंका ती काय?
उदाहरणार्थ साधी सणांची संकल्पनाच घ्या. आपल्या संस्कृतीचे सण हे निसर्गचक्र, ऋतुमान, शारीरिक व मानसिक आरोग्य यांचा सुयोग्य विचार करून  समाजहित-देशहित तसेच अंतिमत: मानवजातीचे शाश्वत हित डोळ्यांसमोर ठेवूनच तयार केलेले आहेत. या सणांमधून कायम सर्वांचे कल्याणच पाहिलेले दिसून येते. ऋषीमुनींच्या प्रातिभ व सात्त्विक बुद्धीचे पडलेले निखळ प्रतिबिंब या सणांमधून साकारलेले आपल्याला दिसते. म्हणूनच भारतीय सणांची संकल्पना हा एक नाही तर अनेक पीएचड्यांचा विषय आहे.
भारतीय सणांमध्ये साडेतीन शुभमुहूर्त महत्त्वाचे मानले जातात. त्यातील आज अक्षयतृतीया हा साडेतीनावा, म्हणजेच अर्धा शुभमुहूर्त आहे. ही तिथी त्रेतायुगाची सुरुवात मानली जाते म्हणून तिला ' युगादी ' असेही म्हणतात. पुराणांत या शुभ मुहूर्तावर अनेक उत्तम प्रसंग घडल्याची नोंद सापडते.
आपला प्रत्येक सण हा काही विशेष गोष्टीशी निगडित असतो. पाडव्याला गुढीचे तर दिवाळीत दिव्यांचे महत्त्व ; दस-याला सोने लुटायचे असते. आजच्या तृतीयेला " दान " महत्त्वाचे मानले जाते. ही पितृतिथी आहे. या दिवशी आपल्या कुळातील दिवंगत पितरांसाठी आवर्जून दानधर्म केला जातो.
" दान " हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. पण त्याचे खरे मर्म मात्र कोणीच समजून घेतलेले नसते. त्यासाठीच आजच्या मुहूर्तावर आपण भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींनी मांडलेली दानाची संकल्पना थोडक्यात समजून घेऊया.
भगवान श्रीमाउली दानाचेही तीन प्रकार मानतात, सात्त्विक, राजस व तामस. यातले सात्त्विक दानच संतांनी श्रेष्ठ मानलेले असून आजच्या तिथीला त्याचेच विशेष महत्त्व असते. सात्त्विक दानाचे मर्म सांगताना, श्रीज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायातील विसाव्या श्लोकाच्या विवरणात श्रीमाउली म्हणतात, " जे दान प्रामाणिकपणे व स्वधर्मानुसार मिळालेल्या आपल्या स्वकष्टार्जित संपत्तीतून निरपेक्षपणे केले जाते तेच दान सात्त्विक होय. उत्तम क्षेत्रस्थानी, सुयोग्य व गरजू व्यक्तीला मनात कसलाही अहंकार न ठेवता आणि आढ्यतेची, मी दान दिले आहे अशी किंचितही भावना न ठेवता तसेच परतफेडीची किंवा मोबदल्याची कसलीही अपेक्षा न ठेवता जे दिले जाते, तेच सात्त्विक दान होय. दुधाच्या अपेक्षेने गायीचा प्रयत्नपूर्वक सांभाळ करणे, याप्रकापचे दान राजस दान होय. तर वाईट काळात, वाईट गोष्टींवर म्हणजे नाचगाणे, तमाशा सारख्यावर खर्च करणे हे तामस दान होय. "
आजच्या तिथीला जो प्रेमादरपूर्वक सात्त्विक दान करतो, त्याला त्या दानाचे अक्षय म्हणजे कधीही कमी न होणारे पुण्य मिळते, असे आपले संत म्हणतात. यावर्षी अक्षयतृतीया सोमवारी आलेली आहे. त्यात दिवसभर मृग नक्षत्र असल्याने अमृतसिद्धी योगही घडलेला आहे. या परमपुण्यदायक योगावर जो तीर्थस्नान, दान व साधना-नामस्मरण करेल, त्याला त्याचे अनंतपट व अक्षय फल प्राप्त होईल. थोडक्या कष्टात मोठा लाभ मिळवून देणारे आपले सण किती प्रगल्भ विचारांतून निर्माण झालेले आहेत पाहा.
अक्षयतृतीया उन्हाळ्याच्या दिवसात येत असल्याने, पाण्याचा माठ, छत्री, वस्त्र, पंखा, पन्हे अशा उष्णताशामक गोष्टींचे आवर्जून दान करायला शास्त्राने सांगितलेले आहे. यातही किती विचार केलाय बघा ऋषीमुनींनी. त्यांची एकही गोष्ट निरर्थक नाही, हे पाहून आपला ऊर अभिमानाने भरून यायला हवा  !
आजच्या या पावन पर्वावर, तुम्हां आम्हां सर्वांना आपल्या प्रगल्भ प्राचीन वारशाचे महत्त्व उमजो आणि सात्त्विक पारमार्थिक कर्मांमध्ये सर्वांची रुची वाढो, भगवंतांचे अक्षय नाम घेण्याची सद्बुद्धी लाभो, हीच जगन्नियंत्या भगवान श्रीपांडुरंग परमात्म्याच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक प्रार्थना करून पुनश्च सर्वांना अक्षयतृतीयेच्या शुभेच्छा देतो !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

8 May 2016

*** नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम् ***



आज वैशाख शुद्ध तृतीया, भगवान महाविष्णूंचे सहावे अवतार महावीर चिरंजीव श्रीपरशुराम यांची जयंती. हे ऋषिवर्य जमदग्नी व भगवती श्रीरेणुकामातेचे चतुर्थ व सर्वात धाकटे सुपुत्र होत.
त्याकाळातील निर्दय व प्रजाहिताचा विचार न करणा-या, सत्तेमुळे माजलेल्या, अनाचारी अशा क्षत्रिय राजांच्या विनाशासाठी हा अवतार झाला होता. साक्षात् शिवावतार जमदग्नी ऋषी व जगदंबा रेणुकामातेच्या पोटी भगवंतांनी अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी अवतार धारण केला.
महासिद्ध आणि श्रेष्ठ राजा कार्तवीर्यार्जुन यांनी प्रारब्धवशात् जमदग्नींचा अपमान करून त्यांची कामधेनू त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बरोबर नेली. त्या अयोग्य गोष्टीचा बदला घ्यायचा म्हणून परशुरामांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांचे हजार हात कापून टाकले व शेवटी महापराक्रमी सहस्रार्जुन राजाचा वधही केला.
खरेतर, सहस्रार्जुन हे भगवान श्रीदत्तप्रभूंचे शिष्य होते व त्यांनीच दत्तप्रभूंना वर मागितला होता की, माझा मृत्यू तुमच्यासारख्याच कोणा महापुरुषाच्या हातून व्हावा. देवांच्याच प्रेरणेने परशुरामांनी त्यांचा वध केला. पण सहस्रार्जुनाच्या मुलांनी सूडाच्या भावनेने परशुरामांना मारण्यासाठी आश्रमावर हल्ला केला. परशुराम तेथे नव्हते म्हणून त्या आततायी राजपुत्रांनी जमदग्नींचाच वध केला. त्यांच्या त्या मूर्खपणावर संतापून, भ्रष्ट राज्यकर्त्यांचा पूर्णच नायनाट करण्याच्या आपल्या जन्मकार्याला पुढे ठेवून, परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वीवरील सर्व अनाचारी क्षत्रिय राजांचा संपूर्ण वंशच नष्ट केला. त्यांच्या रक्ताने भरलेल्या पाच तळ्यांच्या काठी पितृतर्पण करून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.
याठिकाणी लोक खूप मोठी गल्लत करतात. परशुरामांनी हे अयोग्य केले, संपूर्ण पृथ्वीवरचे क्षत्रिय मारले तर मग पुढे निर्माण कसे झाले, वगैरे अनभ्यस्त प्रश्न निर्माण करतात. एक लक्षात ठेवायला पाहिजे की, भगवान श्रीपरशुराम हे साक्षात् भगवंतांचे अवतार होते, ते कधीच चुकीचे वागणार नाहीत. त्यांनी केवळ जे अनाचारी व दुष्ट राजे होते, त्यांचाच वध केला. तोही सलग २१ वेळा. त्यांनी चांगल्या वागणा-या राजांना मारलेले नाही.
पुढे मारलेल्या राजांच्या रक्ताचे पाच डोह भरल्यावर तेथे त्यांनी आपल्या वडलांचे क्रियाकर्म केले व त्या रक्ताने तर्पण केले. रेणुकामाता सती गेल्या. हा सगळा भाग माहूर येथे घडला. तेथे प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंनीच त्या क्रियाकर्माचे पौरोहित्य केले होते. नंतर श्रीदत्तप्रभूंनी परशुरामांना रेणुकामातेचे दर्शन करविले व जमदग्नी-रेणुका हे साक्षात् शिव-पार्वती असल्याची जाणीव करवून दिली. त्यावेळी जमिनीतून श्रीरेणुकामातेचे मुख बाहेर आले, ज्याची आजही माहूर येथे पूजा केली जाते.
भगवान परशुरामांनी नंतर भगवान श्रीदत्तप्रभूंच्या पावन उपस्थितीत मोठा यज्ञ करून हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त घेतले व महर्षी कश्यपांना सर्व पृथ्वीचे दान दिले. दिलेल्या दानाचा आपण उपभोग घ्यायचा नसतो. म्हणून आता राहायचे कोठे? या विचाराने त्यांनी पश्चिम सागराला काही जागा मागितली, तीच आजची कोकण भूमी होय. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा सर्व भाग भगवान परशुरामांनी वसवलेला असून त्यांनीच तेथील जनतेला शिक्षण दिले, ज्ञानी केले. परशुराम हे धनुर्विद्येचे महान आचार्य मानले जातात. त्यांनी पुढे भीष्माचार्य, कर्ण आदी महावीरांना धनुर्विद्या शिकवली. रामावतारात त्यांचे भगवान श्रीरामरायांशी युद्ध झाले व त्यांच्या ठिकाणचे क्षत्रिय तेज भगवान रामरायांमध्ये सामावले. आता भगवान परशुराम ब्रह्मर्षी होऊन आजही कोकण प्रांतात वास्तव्य करून आहेत. चिपळूण जवळील परशुराम क्षेत्री त्यांचे मोठे स्थान आहे. ते चिरंजीव अवतार आहेत. भगवान परशुरामांना स्वत: भगवान श्रीशिवांनी धनुर्विद्या शिकवली होती. प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांनी त्यांच्या " श्रीदत्तमाहात्म्य " या अद्भुत ग्रंथात अध्याय अठरा ते चोवीस या सात अध्यायांमधून भगवान परशुरामांचे सविस्तर चरित्र फार बहारीने वर्णिलेले आहे.
भगवान परशुराम हे साक्षात् भगवान श्रीदत्तप्रभूंचे शिष्य होते. त्यांना भगवान श्रीदत्तप्रभूंनी त्रिपुराविद्या अर्थात् श्रीविद्येचा अनुग्रह केलेला होता. त्या दोघांचा संवाद असलेला ' त्रिपुरा रहस्य ' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पुढे भगवान परशुरामांनी ही त्रिपुराविद्या कोयनानगर जवळील श्रीक्षेत्र दत्तधाम या ठिकाणी भगवान श्रीगोरक्षनाथांना कृपापूर्वक प्रदान केली.
सप्त चिरंजीवांमधील थोर विष्णुअवतार व ब्राह्मणांचे तारणहार, श्रीदत्तशिष्य परशुरामांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीयेला, अक्षय्य तृतीयेला रात्रीच्या पहिल्या प्रहरात झाला. आज संध्याकाळी तृतीया लागलेली असल्याने आजच परशुराम जयंती साजरी केली जात आहे.
भृगू ऋषींच्या कुळात जन्मले म्हणून " भार्गवराम ", हातात परशु म्हणजे कु-हाड धारण करतात म्हणून " परशुराम ",  रेणुकामातेचे पुत्र म्हणून " रेणुकातनय " अशी त्यांची विविध नावे संतांनी गायलेली आहेत.
अधर्माचा संपूर्ण नि:पात करणा-या, परम तेजस्वी व वेदवेदांगे तसेच धनुर्विद्येचे महान आचार्य असणा-या भगवान श्रीपरशुरामांच्या श्रीचरणीं, सादर साष्टांग दंडवत प्रणाम !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

6 May 2016

नृसिंह सरस्वती अतिप्रिय धन्य नारायण यतिराय



आज चैत्र अमावास्या, श्रीदत्तप्रभूंची राजधानी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील अग्रपूजेचा मान असलेल्या प. प. श्री. नारायणस्वामी महाराजांचा वैकुंठगमन दिन.
जगद्गुरु श्रीतुकाराम महाराजांप्रमाणेच, साक्षात् वैकुंठाला गेलेले हे दुसरे विभूतिमत्व होय. ही घटना फार जुनी नाही, इ.स. १८०५ मध्ये घडलेली आहे. या प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे शिष्य श्री. गोपाळस्वामी यांनी त्याचे वर्णन करणारे पद रचलेले आहे. ते " सांगावे, कवणा ठाया जावे । " हे पद श्रीदत्त संप्रदायात विनवणीचे पद म्हणून दररोज आवर्जून म्हटले जाते. तसेच वाडीलाही पालखीसेवेच्या समाप्तीला म्हटले जाते.
प. प. श्री. नारायणस्वामींवर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे अपार प्रेम होते. पूर्वाश्रमी असताना श्री. नारायणशास्त्रींची पत्नी निवर्तली होती, त्यांना दोन लहान मुली होत्या. एकदा त्यांनी रात्री मुलींना जेऊ घालून झोपवले व स्वत: समाधी लावून बसले. नेमके त्या मुलींना संडास लागल्याने जाग आली. त्यांनी बाबांना हाक मारली, पण ते तर समाधीत होते. त्यांना ऐकू जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज चटकन श्री. नारायणशास्त्रींचे रूप घेऊन आले व त्या दोघींना परसाकडेला घेऊन गेले. त्यांची स्वहस्ते शुद्धी केली व पुन्हा आणून झोपवले. सकाळी हा प्रसंग श्री. नारायणशास्त्रींना कळला. प्रत्यक्ष देवांना आपल्यासाठी असे हीन कृत्य करावे लागले, याचे त्यांना अतीव वाईट वाटले. त्यांनी लवकरच आपल्या मुलींना योग्य वर शोधून त्यांची लग्ने लावून दिली व सद्गुरुसेवेसाठी मोकळे झाले. त्यांचे कोल्हापूर परिसरात भरपूर वास्तव्य व लीला झालेल्या आहेत.
वाडीला एके दिवशी ते कृष्णेत स्नानाला गेलेले असताना अद्भुत घटना घडली. प्रत्यक्ष भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा नदीच्या पात्रातच त्यांना संन्यास दीक्षा दिली. ते नदीत स्नानाला उतरले नारायणशास्त्री म्हणून, पण डोहातून बाहेर आले ते भगवी छाटी घालून व हाती दंड कमंडलू घेऊनच. त्यांनी दुर्गमानगडावर वाघाच्या पायातील काटा काढून त्याला दु:खमुक्त केले होते. त्या भयानक जनावराने गायीसारखे प्रेमळ होऊन त्यांच्याकडून सेवा करून घेतली. दक्षिणेतील साक्षात् शिवावतार श्री. चिदंबर महास्वामींचाही प. प. श्री. नारायणस्वामींवर लोभ होता. तीन महिने त्यांनी स्वामींना आपल्यापाशी ठेवून घेतले होते. त्यांच्या चरित्रातील असे सगळेच प्रसंग अत्यंत भावपूर्ण आणि हृद्य आहेत. योगिराज सद्गुरु श्री. वामनरावजी गुळवणी महाराजांच्या घराण्यावर या प. प. श्री. नारायणस्वामींचीच परमकृपा होती. त्यांच्या कृपेनेच गुळवणी वंश चालला व त्यात पुढे श्रीमहाराजांचा जन्म झाला. प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी बारा संस्कृत श्लोकांमधून प. प. श्री. नारायणस्वामींचे चरित्र गायलेले आहे.
प. प. श्री. नारायणस्वामींचे चरित्र अलौकिक असून प्रासादिकही आहे. सदर ग्रंथ श्री. गुळवणी महाराजांचे शिष्य वै. रामकवींनी रचलेला असून तो पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेला आहे. या पंधरा अध्यायी छोटेखानी पोथीमध्ये महाराजांच्या सर्व लीलांचे वर्णन आलेले आहे. योगिराज श्री. गुळवणी महाराजांचे आशीर्वाद लाभलेली ही पोथी प. पू. श्री मामासाहेब देशपांडे महाराज अनेक भक्तांना अडीअडचणींमध्ये आवर्जून वाचायला सांगत असत व त्याचे अद्भुत अनुभवही लोकांना येत असत.
त्यांची आराधना म्हणून आज श्रीनृसिंहवाडी येथे मोठा उत्सव संपन्न होत असतो. भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे त्यांच्यावर इतके प्रेम होते की, आजही प. प. श्री. नारायणस्वामींची मनोहर पादुकांच्या आधी पूजा होते. तसेच देवांची स्वारी ( उत्सवमूर्ती ) देखील एरवी प. प. श्री. नारायणस्वामींच्याच ओवरीत विराजमान असते. देवांनाही आपल्या या अनन्य भक्ताचा विरह क्षणभर देखील सहन होत नसावा.
प. प. श्रीनारायण स्वामी महाराजांचे अनेक शिष्य विख्यात झाले. त्यात श्री. गोपाळस्वामी, श्री. अच्युतस्वामी व श्रीकृष्णानंद स्वामी (काशीकर स्वामी)  हे तीन संन्यासी शिष्य व ' गुरुभक्त ' नावाने रचना करणारे श्री. ढोबळे पुजारी हे गृहस्थाश्रमी शिष्य मोठे अधिकारी होते. श्री. गुरुभक्तांच्याच अनेक रचना वाडीला काकड्यापासून शेजारतीपर्यंत म्हटल्या जातात. " धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची । " व " सावळा सद्गुरु तारू मोठा रे । " या श्री. गुरुभक्तांच्या काही सुप्रसिद्ध रचना  अनेकांच्या नित्यपठणात आहेत.
आजच्या पावन आराधना दिनी, भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे लाडके शिष्योत्तम प. प. श्री. नारायणस्वामी महाराजांच्या श्रीचरणीं सादर दंडवत प्रणाम  !!

( " श्रीनारायणस्वामी चरित्ररत्नाकर " हा ग्रंथ हवा असल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा. श्रीवामनराज प्रकाशन, पुणे -५१ , © : 020-24356919 )
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।
लेखक - रोहन विजय उपळेकर

4 May 2016

नाम गावे नाम ध्यावे, स्वामीब्रह्मी लीन व्हावे



राजाधिराज भगवान सद्गुरु श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणजे परब्रह्माचे अलौकिक सगुण-साकार रूप, बोला बुद्धीच्या पलीकडचे, विलक्षण अवतारी विभूतिमत्व होय ! आज चैत्र कृष्ण त्रयोदशी, श्रीस्वामी समर्थ महाराजांची १३८ वी पुण्यतिथी. ( सूर्यसिद्धांतानुसारी पंचांगाप्रमाणे आजच दि. ४ मे रोजी पुण्यतिथी आहे, इतर पंचांगांमध्ये उद्या दि. ५ मे रोजी आहे.)
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज हे नित्य अवतार आहेत. त्यांना ना जन्म ना मृत्यू. त्यांचा प्रकटदिन काय आणि पुण्यतिथी काय, सगळी त्यांचीच लीला आहे. त्यांच्या सप्रेम स्मरणासाठी त्यांनी तुम्हां आम्हां भक्तांना अजून एक विशेष दिवस दिलेला आहे, इतकाच याचा अर्थ आहे. तसे पाहिले तर, ज्या दिवशी, ज्या क्षणी सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला अंत:करणापासून प्रेमपडिभराने स्मरण होईल, तो दिवस, तो क्षण हाच पुण्यपावन नव्हे काय? त्या आनंदक्षणाला अन्य कशाची उपमा देता येईल?
सद्गुरु भगवान श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या त्रिभुवन-मनोहर दिव्य रूपाचे फार भावपूर्ण व स्वानुभूत वर्णन करताना, त्यांचे पूर्णकृपांकित भक्तश्रेष्ठ पूजनीय श्री. शिरीषदादा कवडे, श्रीस्वामी महाराजांचे आशीर्वाद लाभलेल्या आपल्या प्रासादिक ' श्रीस्वामी समर्थ नामपाठ ' या रचनेतील दहाव्या अभंगात म्हणतात,
सुवर्ण झळाळ, दिव्य परिमळ ।
पद्मसुकोमळ, स्वामीकांती ॥१॥
साजे कटीकर, टिळा माळा भार ।
ना भी ऐसा वर, नेत्र देती ॥२॥
मृदु कर्णपातीं, सुहास्ये डुल्लती ।
उदरी आवृत्ती, स्वानंदाची ॥३॥
ब्रह्मांडे अनंत, लीले खेळवत ।
गोटी नाचवीत, स्वामीराज ॥४॥
अमृते हृदयी, मोडी मांडी काही ।
ऐशाकृपे पाही, देवा आता ॥१०.५॥
राजाधिराज श्रीस्वामींची अंगकांती अस्सल सोन्यासारखी झळाळणारी असून त्यांच्या अंगातून सतत केशरकस्तुरीचा दिव्य सुगंध सर्वत्र दरवळत असतो. त्यांचे सारे शरीर कमळाच्या नाजूक पाकळ्यांसारखे कोमल आहे. त्यांचा डावा हात कंबरेवर शोभतो. भव्य कपाळावर केशर-चंदनाचा सुरेख टिळा आणि गळ्यात रुद्राक्षांच्या व तुळशीच्या माळा अतीव शोभून दिसतात. त्यांचे पाणीदार व प्रेमपूर्ण नेत्र " भिऊ नकोस " असे भक्तांना जणू आश्वासनच निरंतर देत असतात. ते जेव्हा प्रसन्न होऊन हसू लागतात, तेव्हा त्यांच्या कानांच्या मृदू पाळ्या छान डुलतात, तर त्यांच्या विशाल उदरात जणू स्वानंदाच्या लाटाच उचंबळून येत अाहेत, असे पाहणा-याला वाटते. अनंतकोटी ब्रह्मांडांच्या सर्व घडामोडी श्रीस्वामी महाराज बसल्या जागीच आपल्या लीलेने करीत असतात. त्या लीलेचे प्रतीक म्हणून ते आपल्या बोटांमध्ये गोटी नाचवतात.
अमृता श्रीस्वामीचरणीं प्रार्थना करते की, " देवा, माझ्या हृदयातही मोडण्याजोगे (अज्ञान) ते मोडा व मांडण्याजोगे (ज्ञान) ते मांडा. माझ्या परमार्थाला विरोधी असणारे सर्व प्रापंचिक भाव मोडा व परमार्थपूरक असे श्रद्धा-भक्तीचे भाव प्रकट करून पूर्णपणे स्थिर करा. माझ्या बाबतीत आपल्याला जे पाहिजे व जसे पाहिजे तसे करा, पण अशीच कृपादृष्टी मात्र माझ्यावर कायम ठेवा. "
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज हे खरोखरीच " अनंतकोटी ब्रह्मांडनायक " आहेत. म्हणून ब्रह्मांडगोटी ते हातात बाळगत असत. ते लहान मुलांशी गोट्या देखील खेळत असत. छेली खेड्यात रामसिंग (पूर्वजन्मीचे श्रीस्वामीसुत महाराज) नावाचा बाल भक्त राहात होता. त्याच्यावर गोट्या खेळताना आलेल्या डावामुळे तो रडू लागला व त्याच्यासाठीच अष्टवर्षीय बटूच्या रूपात शके १०७१ म्हणजे इ. स. ११४९ साली प्रथम श्रीस्वामी महाराज धरणी दुभंगून प्रकट झाले होते. अशाप्रकारे या गोटीचा त्यांच्या जन्मापासूनच संबंध आहे.
काही लोक हातात गोटी धारण केलेल्या श्रीस्वामींच्या प्रतिमेच्या विरोधात मत मांडतात. ते फोटो पूजेत ठेवू नयेत, असा प्रचारही करतात. ते पूर्णपणे चूक आहे. श्रीस्वामी महाराज खरोखरीच हातात गोटी घेऊन कधी कधी बसत असत, मुलांशी प्रसन्नतेने गोट्याही खेळत असत. म्हणून तो फोटो काही काल्पनिक किंवा चुकीचा नाही. त्यामुळे अशा बिनबुडाच्या मतांना श्रीस्वामीभक्तांनी अजिबात किंमत देऊ नये.
या गोटीच्या संदर्भात एकेदिवशी थोर विभूतिमत्व प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी साक्षात् श्रीस्वामी महाराजांनाच प्रश्न विचारला होता. त्यावर प्रसन्न हास्य करून श्रीस्वामी महाराज म्हणाले, " सख्या, तुला पाहायचंय का ही गोटी म्हणजे काय ते? " आणि त्यांनी हातातील ती गोटी फेकली. त्यासरशी प्रचंड जाळ होऊन स्फोटासारखा मोठा आवाजही झाला. पू. मामांनी त्यांना आश्चर्याने हे काय झाले, असे विचारले. त्यावर श्रीस्वामी महाराज म्हणाले, " अरे, आम्ही एक ब्रह्मांड नष्ट केले. " लगेच त्यांनी आपला हात पुढे केला तर त्यावर तीच गोटी पुन्हा साकार झाली. त्यावर ते म्हणाले, " हे पाहा, एक ब्रह्मांड नवीन तयार झाले !" आपल्या अवघ्या एका ब्रह्मांडाचा थांगपत्ता जिथे आजच्या आधुनिक विज्ञानालाही पूर्ण लागलेला नाही, तिथे अशी अनंतकोटी ब्रह्मांडे केवळ संकल्पाने नवीन घडवण्याचे व नको झाले म्हणून क्षणात नष्ट करण्याचे अलौकिक सामर्थ्य श्रीस्वामी महाराज लीलया बाळगून आहेत. गोट्या खेळाव्यात तशी ब्रह्मांडांची जोड-तोड करणे हे श्रीस्वामी महाराजांसाठी डाव्या हाताचा मळ आहे. म्हणूनच ते खरोखरीचे ब्रह्मांडनायक शोभतात. त्यांच्या या देवदुर्लभ सामर्थ्याचे प्रतीक असणारी त्यांच्या उजव्या हातातली ही गोटी म्हणूनच फार महत्त्वाची व वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रीस्वामी समर्थ महाराजांचा आधार असेल तरच ब्रह्मांडांचा व्यवहार सुरळीत चालतो, नाहीतर नाही;  हेच या लीलेचे खरे रहस्य आहे.
अशा या परमकरुणामूर्ती श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या अलौकिक कृपेची प्राप्ती आपल्याला कशी होईल बरे? याचे सहज सोपे उत्तर महात्म्यांनी देऊन ठेवलेले आहे. ते म्हणजे, अनन्य शरणागत होऊन श्रीस्वामी नामाचा जो प्रेमभराने व नियमाने जप करेल, त्यांच्याच दिव्यमनोहर रूपाचे सतत स्मरण करेल, त्याच्यावर श्रीस्वामीकृपामेघ उदंड बरसेल, त्याला अंतर्बाह्य चिंब चिंब भिजवून अखंड सुखरूप करेल, यात तीळमात्र शंका नाही  !!
श्रीस्वामीसुत महाराज आपल्या श्रीस्वामीपाठात छातीवर हात ठेवून शपथपूर्वक सांगतात,
घेऊनीया जिम्मा उतरितों विमा ।
तारक हें तुम्हां स्वामीनाम ॥३१.१॥
स्वामीनाम हेच सर्व साधनांचे सार असून, तेच अकल्पनाख्य कल्पतरूही आहे. आपल्या भक्तांचे लळे पुुरवून, त्यांच्या सर्व सुख-दु:खात आतून बाहेरून सांभाळून, भक्तांना हळूहळू स्वामीरूपच करणारे हे श्रीस्वामीनाम म्हणजे त्रिभुवनगामिनी गंगाच आहे. या गंगौघात जो प्रेमाने न्हायला, तो जन्ममरणाच्या फे-यातून मुक्त होऊन अखंड आनंदमय होऊन राहिलाच म्हणून समजा !
आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. हे श्रीस्वामीनाम कोणते? ज्याचा भक्तांनी जप करायचा आहे. कारण आज अनेक प्रकारची स्वामीनामे प्रचलित होताना दिसत आहेत. भक्तांचा त्यामुळे उगीचच गोंधळ उडतो आहे. यावरही श्रीस्वामींच्या सर्व अंतरंग भक्तश्रेष्ठांनी सविस्तर लिहून ठेवलेले आहे. श्रीस्वामीसुत महाराज आपल्या स्वामीपाठात म्हणतात,
स्वामीनाम मोठें अन्य सर्व खोटें ।
स्मरलीया कोठें भय नाही ॥१॥
पंचदशाक्षरी जपीं भाववरी ।
चित्त स्वामीवरी ठेवूनीया ॥५.३॥
श्रीस्वामीसुत महाराज आपल्या ' भूपाळी'तही म्हणतात,
जपा नाम निर्धारीं ।
पावन ते पंचदशाक्षरी।
तेणें चुकूनि तुमची फेरी ।
मोक्षपद मिळेल की ॥५॥
श्रीस्वामी समर्थ महाराजांचे " श्रीस्वामीसमर्थ जयजय स्वामीसमर्थ " हे पंचदशाक्षरी नामच संप्रदायात मान्य आहे. याच नामाचा प्रेमभावाने केलेला जप श्रीस्वामीकृपेचे अपूर्व दान आपल्या पदरात भरभरून घालतो. श्रीस्वामी महाराजांच्या लौकिक लीला काळातही, श्रीस्वामीसुत महाराज, श्रीबाळप्पा महाराज, श्रीआनंदनाथ महाराज तसेच पू. मामासाहेब देशपांडे महाराजांचे आजोबा पू. नारायणभट सोनटक्के इत्यादी असंख्य श्रीस्वामीभक्तांना श्रीस्वामीकृपेने हेच पंधरा अक्षरी नाम मिळालेले होते व त्याच्याच जपाने हे सर्व महात्मे सिद्ध झालेले होते. आजही श्रीस्वामी महाराजांच्या मूळच्या अक्षुण्ण परंपरांमध्ये याच नामाचा अनुग्रह केला जातो.
दुर्दैवाने आजमितीस हे मुख्य सिद्धनाम सोडून श्रीस्वामी महाराजांच्या इतरच नामांची मन:कल्पित संस्करणे रूढ होताना दिसत आहेत. रोज कोणीतरी उठतो आणि नवीनच प्रकारचे स्वामीनाम तयार करून लोकांना त्याचा उपदेश करत सुटतो. कोणी स्वामीनामाला आधी ॐ लावतो तर कोणी शेवटी नम: वगैरे लावतो. या गोष्टींची आवश्यकताच नाही. हे खरेतर श्रीस्वामी संप्रदायाला धरून नाही, त्यामुळे त्याचा भक्तांनी अजिबात अवलंब करता कामा नये.
या संप्रदायात " श्रीस्वामी समर्थ " हे सहा अक्षरी नामही पूर्वीपासून प्रचलित आहे, पण तो नाममंत्र नाही, ते " संबोधन " आहे. प्रेमाने ती श्रीस्वामींना मारलेली हाक आहे. जसे श्रीदत्त संप्रदायात " श्रीगुरुदेव दत्त " म्हणतात तसे श्रीस्वामी परंपरेत " श्रीस्वामी समर्थ " म्हणतात. पण हा नाममंत्र नाही, हे ध्यानात घ्यावे. आजवर अनंत भक्तांनी जपलेला सिद्ध नाममंत्र हा पंधरा अक्षरीच आहे. महान स्वामीभक्तांनी याच नाममंत्रावर प्रचंड तपश्चर्या केलेली असल्याने, तोच मंत्र आपणही जपणे श्रेयस्कर आहे. त्यामुळे त्या सर्व महात्म्यांनी त्यावर केलेली तपश्चर्या आपल्याही उपयोगी पडून, आपल्याला स्वामीनामाच्या अनुभूती लवकर येतात.
पूजनीय श्री. शिरीषदादा कवडे यांनी श्रीस्वामी महाराजांच्या प्रेरणेने व परमकृपेने रचलेला " श्रीस्वामीसमर्थ नामपाठ " हा श्रीस्वामी महाराजांच्या या पावन नामाचे सर्वांगीण महत्त्व व माहात्म्य विशद करून सांगणारा सत्तावीस अभंगांचा लघुग्रंथ आहे. भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींच्या हरिपाठाप्रमाणे, या ग्रंथातही श्रीस्वामीसंप्रदायाचे अनेक सिद्धांत, श्रीस्वामी स्वरूपाचे तात्त्विक विवेचन, स्वामीसंप्रदायाचे अंतरंग व बहिरंग साधना-रहस्य असे महत्त्वाचे विषय फार सुरेख रितीने प्रकट झालेले आहेत. या अभंगांना श्रीस्वामींचाच आशीर्वाद असल्याने यांच्या नित्यपठणाने, पारायणाने आणि चिंतनाने  आजही हजारो भक्तांना श्रीस्वामीकृपेचे अद्भुत अनुभव येत आहेत. स्वामीभक्तांनी या नामपाठरूपी कल्पतरूचा नित्यपठणात मुद्दाम अंतर्भाव करावा, ही विनंती. (श्रीस्वामीनामपाठ मिळवण्यासाठी 02024356919 यावर किंवा खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. ग्रंथमूल्य रु. १५/- फक्त)
श्रीस्वामी महाराजांनी देहत्याग केलेलाच नाही, त्यांनी फक्त ती लौकिक लीला केली. ते त्याच पावन देहातून अजूनही कार्यरत आहेत व पुढेही राहणारच आहेत. तरीही उपासनेच्या आनंदासाठी त्यांचे सप्रेम पुण्यस्मरण आज पुण्यतिथी म्हणून आपण करूया. आजच्या या परमपावन दिनी, अकारणकृपाळू परमानंदमूर्ती राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कुसुमकोमल श्रीचरणीं अनन्यभावे दंडवत घालून आपण पू. शिरीषदादांच्याच भावघन शब्दांत प्रार्थना करून, त्याच निजानंदमय श्रीचरणकमलीं स्वामीनामगजरात निरंतर विसावूया. श्रीसद्गुरुकृपेने आपल्याला असा पुण्यस्मरण-सोहळा साधणे, हीच खरी पुण्यतिथी साजरी करणे होय !!
पूर्णब्रह्म स्वामीराया, वटमूला अप्रमेया ।
प्रवर्तिले संप्रदाया, लीलावेगी ॥
काय वानूं शब्दातीत, वारंवार दंडवत ।
राखावे जी सेवारत, जन्मोजन्मी ॥
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु समर्थ श्रीअक्कलकोट स्वामी महाराज की जय ।

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481