24 Apr 2017

हम गया नही जिंदा है

आज चैत्र कृष्ण त्रयोदशी, राजाधिराज सद्गुरु समर्थ श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची १३९ वी पुण्यतिथी !
साक्षात् परब्रह्मच श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या रूपाने करुणावतार घेऊन तुम्हां-आम्हां जडजीवांचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले. चैत्र शुद्ध द्वितीयेला, शके १०७१, इ.स.११४९ मध्ये छेली खेड्यामध्ये प्रकटलेल्या या परब्रह्ममूर्तीने, अतर्क्य, अद्भुत आणि बोला-बुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून, शके १८०० च्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला, मंगळवारी दि. ३० एप्रिल १८७८ रोजी दुपारी ४-४.३० च्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली.
देहत्यागाची लीला म्हणण्याचे कारण म्हणजे, श्रीस्वामीगुरूंनी प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही. त्यांनी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की, ते ८०० वर्षे त्याच देहातून कार्य करीत असून, पुढची १००० वर्षे ते कार्य चालूच राहणार आहे ! शिवाय त्यांचे वचन आहेच, "हम गया नही जिंदा है ।" त्यामुळे श्री स्वामी महाराज कुठेही गेलेले नाहीतच.
वटवृक्षाखाली बसून "अनन्याश्चिन्तयन्तो मां..." हे गीतावचन पुन्हा पुन्हा उच्चारून, भक्तांना अभयदान देऊन श्री स्वामी निजानंदी निमग्न झाले. भक्तांनी गहिवरल्या अंत:करणाने, स्वत: श्री स्वामींनी पूर्वीच बांधवून घेतलेल्या बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुंफेमध्ये श्री स्वामींचा पावन देह ठेवून त्याचे द्वार बंद केले. तरीही दररोज श्री बाळप्पा महाराज श्रीगुरु स्वामींना अत्तर लावण्यासाठी त्या गुंफेत उतरत असत. तीन-चार दिवस झाल्यावर श्री स्वामींनी डोळे उघडून श्री बाळप्पांना बास म्हणून सांगितले. त्यानंतर मात्र पुन्हा त्या गुंफेत कोणीही उतरले नाही. तेव्हा श्री स्वामींनी आपला विशुद्ध देह तिथून अदृश्य केला व आजही त्याच अलौकिक देहाने ते कार्य करीत आहेतच !
देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील नीलेगांवच्या भाऊसाहेब जहागिरदारांना श्री स्वामींनी "शनिवारी घरी येऊ" असे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी व एक अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर पाच दिवसांनी श्री स्वामी महाराज नीलेगांवाच्या वेशीबाहेर प्रकटले. या लीलेचे वैशिष्ट्य म्हणजे, श्रीस्वामीगुरु एकटे नाही तर संपूर्ण लवाजमा, सेवेकरी यांच्यासह तेथे प्रकटले होते. गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर ते सगळ्यांसह अचानक कोठेतरी निघून गेले. लोकांनी खूप शोधले. शेवटी दुस-या दिवशी, रविवारी त्यांनी खुलाशासाठी अक्कलकोटात जासूद रवाना केला. तोवर दुपारी आणखी एक लीला घडली. श्री स्वामी जहागिरदारांच्या वाड्यात एकटेच प्रकटले, पूजा स्वीकारली पण मौनच बाळगून होते. भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात् परब्रह्म तेथेच अदृश्य झाले. इकडे तो जासूद अक्कलकोटाहून श्री स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊनच परतला. नीलेगांवच्या भक्तांना या अतर्क्य स्वामीलीलेचे आश्चर्य वाटून स्वामीप्रेमाने भरून आले. आजही श्री स्वामी महाराज त्याच पावन देहाने प्रत्यक्ष कार्यरत आहेत, भक्तांचा सर्वतोपरि सांभाळ प्रेमाने करीत आहेत व पुढेही करतीलच !
श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिकारी शिष्योत्तम श्री अानंदनाथ महाराज श्रीसद्गुरूंच्या या निजानंदगमन-लीलेचे रहस्य सांगताना म्हणतात,
स्वामी माझा पूर्णकाम l
तया कैचें निजधाम  ॥१॥
ठाव ठाया भरूनी गेला l
मूळ स्वरूपी राहिला ॥२॥
वटवृक्षातळी जाणा l
स्वामी बैसला कारणा ॥३॥
जड मूढ उद्धराया l
खरे दावियले पाया ॥४॥
शके अठराशे हे जाणा l
मास चैत्र हो पूर्णा ॥५॥
तिथी वद्य त्रयोदशी l
पडदा दिला जगासी ॥६॥
आनंद म्हणे पूर्ण धाम l
तया कैचे निजधाम ॥७॥

राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांनी देहत्यागाची लीला केली. श्री आनंदनाथ महाराज म्हणतात, "आमचे स्वामी महाराज पूर्णकाम आहेत. तेच सर्व विश्व व्यापून उरलेले आहेत. त्यामुळे त्यांना वेगळ्या निजधामाला पुन्हा  जाण्याची गरजच नाही. सर्व विश्व हेच त्यांचे निजधाम आहे. त्यामुळे त्यांनी लौकिकदृष्टीने धारण केलेला देह अदृश्य करून सर्वाठायी ते पुन्हा भरून राहिले.
हा चिन्मय देह देखील त्यांनी तुम्हां आम्हां भक्तांचा उद्धार करण्यासाठीच तर धारण केला होता. त्या देहाने ते अक्कलकोटी वटवृक्षाखाली राहून निरंतर लीला करीत होते. तो देह केवळ त्यांनी शके १८०० मधील चैत्र कृष्ण त्रयोदशीला गुप्त केला; मात्र त्यांचे कार्य अाजही चालूच आहे. त्यांनी जगासमोर प्रकट होऊन सुरू केलेले कार्य या दिवसापासून पडद्याआडून सुरू ठेवले इतकेच. आमचे श्रीगुरु स्वामी महाराज हेच पूर्णधाम आहेत, भक्तांचे निजविश्रांतीचे स्थान आहेत. त्यांचे परमपावन श्रीचरण हेच आम्हां भक्तांचे निजधाम आहे !"
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हेही श्री स्वामी महाराजांच्या परंपरेतील थोर सत्पुरुष. श्री स्वामींची अवधूती मस्ती अंगी पूर्ण पैसावलेला हा महात्माही स्वामीपरंपरेचे भूषण ठरला, यात नवल ते काय? पुण्याच्या एका भक्ताला प.पू.श्री.काकांनी स्वत:च्या ठिकाणी श्री स्वामींचे दर्शन करवून, मंडई जवळील स्वामीमठात नित्य दर्शनाला जाण्याची आज्ञा केली होती. आजही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्षरश: लाखो अनुभूती भक्तांना येत असतात. कारण श्री स्वामी महाराज हे या युगातील नित्यजागृत दैवत आहेत, तेच जगद्गुरु आहेत, साक्षात् परिपूर्णब्रह्म आहेत !
आज श्री स्वामी महाराजांच्या समाधीलीलेचे सप्रेम स्मरण करण्याचा पावन दिवस. श्री स्वामींचे चराचरातील चिरंतन अस्तित्व पुन्हा एकवार दृग्गोचर करणारा हा दिवस, तुम्हां-आम्हां सर्व भक्तांच्या अंत:करणात स्वामीकृपेचे व स्वामीप्रेमाचे, भक्तीचे लक्ष लक्ष दीप उजळो व त्या भक्तीने आपले सर्वांचे जीवन धन्य होवो, हीच श्रीस्वामीमाउलींच्या चरणीं याप्रसंगी वारंवार प्रार्थना ! "अशक्यही शक्य करतील स्वामी" ही सार्थ जाणीव, ही पक्की खात्री तर श्रीस्वामीकृपेने आपल्या अंत:करणात नित्य जागती आहेच !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी. 
http://rohanupalekar.blogspot.in )

20 comments:

  1. स्वामी समर्थ माऊली. रोहनजी अगदी सुंदर ओघवते लिहीता आपण

    ReplyDelete
  2. Excellent.. .wonderfully written.. . Shree Swami Samarth 🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. Shree swami samarth
    Rohan ji atishay sarth

    ReplyDelete
  4. फारच सुंदर श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  5. स्वामींना शतशः दंडवत

    ReplyDelete
  6. आपला लेख वाचून खूप आनंद झाला. जय श्री श्रीगुरुदेव, जय श्री श्रीस्वामी समर्थ !

    ReplyDelete
  7. Ashok Yashwant Mulay. Pune खूपच छान. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    ReplyDelete
  8. सुंदर पोस्ट. श्री स्वामीचरणी दंडवत 🌹🙏🌹

    ReplyDelete
  9. या अतर्क्य अगम्य चिडानंदस्वरूप विभूतीला सहस्रश: दंडवत💐

    ReplyDelete
  10. Shree Swami Samarth 🙏🙏

    ReplyDelete
  11. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

    ReplyDelete
  12. अनंतकोटी ब्रह्माण्डनायक राजाधिराज
    योगीराज श्रीस्वामी समर्थ महाराज की जय

    ReplyDelete
  13. माझे श्री स्वामी समर्थ महाराज,

    ReplyDelete
  14. श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete