28 Apr 2017

नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम्

आज वैशाख शुद्ध तृतीया, भगवान महाविष्णूंचे सहावे अवतार महावीर चिरंजीव श्री परशुराम यांची जयंती. ऋषिवर्य जमदग्नी व भगवती श्रीरेणुकामातेचे हे चतुर्थ व सर्वात धाकटे सुपुत्र होत.
त्याकाळातील निर्दय व प्रजाहिताचा विचार न करणा-या, सत्तेमुळे माजलेल्या, अनाचारी अशा क्षत्रिय राजांच्या विनाशासाठी हा अवतार झाला होता. साक्षात् शिवावतार जमदग्नी ऋषी व जगदंबा रेणुकामातेच्या पोटी भगवंतांनी अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी, रोहिणी नक्षत्रावर अवतार धारण केला.
महासिद्ध आणि श्रेष्ठ राजा कार्तवीर्यार्जुन यांनी प्रारब्धवशात् जमदग्नींचा अपमान करून त्यांची कामधेनू त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बरोबर नेली. त्या अयोग्य गोष्टीचा बदला घ्यायचा म्हणून परशुरामांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांचे हजार हात कापून टाकले व शेवटी महापराक्रमी सहस्रार्जुन राजाचा वधही केला.
खरेतर, सहस्रार्जुन हे भगवान श्रीदत्तप्रभूंचे शिष्य होते व त्यांनीच श्रीदत्तप्रभूंना वर मागितला होता की, माझा मृत्यू तुमच्यासारख्याच कोणा महापुरुषाच्या हातून व्हावा. देवांच्याच प्रेरणेने परशुरामांनी त्यांचा वध केला. पण सहस्रार्जुनाच्या मुलांनी सूडाच्या भावनेने परशुरामांना मारण्यासाठी आश्रमावर हल्ला केला. परशुराम तेथे नव्हते म्हणून त्या आततायी राजपुत्रांनी जमदग्नींचाच वध केला. त्यांच्या त्या मूर्खपणावर संतापून, भ्रष्ट राज्यकर्त्यांचा पूर्णच नायनाट करण्याच्या आपल्या जन्मकार्याला पुढे ठेवून, परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वीवरील सर्व अनाचारी क्षत्रिय राजांचा संपूर्ण वंशच नष्ट केला. त्यांच्या रक्ताने भरलेल्या पाच तळ्यांच्या काठी पितृतर्पण करून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.
याठिकाणी लोक खूप मोठी गल्लत करतात. परशुरामांनी हे अयोग्य केले, संपूर्ण पृथ्वीवरचे क्षत्रिय मारले तर मग पुढे निर्माण कसे झाले, वगैरे अनभ्यस्त प्रश्न निर्माण करतात. एक लक्षात ठेवायला पाहिजे की, भगवान श्रीपरशुराम हे साक्षात् श्रीभगवंतांचे अवतार होते, ते कधीच चुकीचे वागणार नाहीत. त्यांनी केवळ जे अनाचारी व दुष्ट राजे होते, त्यांचाच वध केला. तोही सलग २१ वेळा. त्यांनी चांगल्या वागणा-या राजांना मारलेले नाही.
पुढे मारलेल्या राजांच्या रक्ताचे पाच डोह भरल्यावर, पूर्वी केलेल्या प्रतिज्ञेनुसार तेथे त्यांनी आपल्या वडलांचे क्रियाकर्म केले व त्या रक्ताने तर्पण केले. रेणुकामाता सती गेल्या. हा सगळा कथाभाग माहूर येथे घडला. तेथे प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंनीच त्या क्रियाकर्माचे पौरोहित्य केले होते. नंतर श्रीदत्तप्रभूंनी परशुरामांना रेणुकामातेचे दर्शन करविले व जमदग्नी-रेणुका हे साक्षात् शिव-पार्वती असल्याची जाणीव करवून दिली. त्यावेळी जमिनीतून श्रीरेणुकामातेचे मुख बाहेर आले, ज्याची आजही माहूर येथे पूजा केली जाते.
भगवान परशुरामांनी नंतर भगवान श्रीदत्तप्रभूंच्या पावन उपस्थितीत मोठा यज्ञ करून हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त घेतले व महर्षी कश्यपांना सर्व पृथ्वीचे दान दिले. दिलेल्या दानाचा आपण स्वत: पुन्हा उपभोग घ्यायचा नसतो. म्हणून आता राहायचे कोठे? या विचाराने त्यांनी पश्चिम सागराला काही जागा मागितली, तीच आजची कोकण भूमी होय. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा सर्व भाग भगवान परशुरामांनी वसवलेला असून त्यांनीच तेथील आदिवासी जनतेला शिक्षण दिले, ज्ञानी केले. परशुराम हे धनुर्विद्येचे महान आचार्य मानले जातात. त्यांनी पुढे भीष्माचार्य, कर्ण आदी महावीरांना धनुर्विद्या शिकवली. रामावतारात त्यांचे भगवान श्रीरामरायांशी युद्ध झाले व त्यांच्या ठिकाणचे क्षत्रिय तेज भगवान रामरायांमध्ये सामावले. त्यानंतर भगवान परशुराम ब्रह्मर्षी होऊन आजही कोकण प्रांतात वास्तव्य करून आहेत. चिपळूण जवळील परशुराम क्षेत्री त्यांचे मोठे स्थान आहे. ते चिरंजीव अवतार आहेत. भगवान परशुरामांना स्वत: भगवान श्रीशिवांनी धनुर्विद्या शिकवली होती. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी त्यांच्या "श्रीदत्तमाहात्म्य" या अद्भुत ग्रंथात अध्याय अठरा ते चोवीस या सात अध्यायांमधून भगवान परशुरामांचे सविस्तर चरित्र फार बहारीने वर्णिलेले आहे.
भगवान परशुराम हे साक्षात् भगवान श्रीदत्तप्रभूंचे शिष्य होते. त्यांना भगवान श्रीदत्तप्रभूंनी त्रिपुराविद्या अर्थात् श्रीविद्येचा अनुग्रह केलेला होता. त्या दोघांचा संवाद असलेला ' त्रिपुरा रहस्य ' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पुढे भगवान परशुरामांनी ही त्रिपुराविद्या कोयनानगर जवळील श्रीक्षेत्र दत्तधाम या पावन स्थानी, भगवान श्री गोरक्षनाथांना कृपापूर्वक प्रदान केली.
सप्त चिरंजीवांमधील थोर विष्णुअवतार व ब्राह्मणांचे तारणहार, श्रीदत्तशिष्य परशुरामांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीयेला, अक्षय्य तृतीयेला रात्रीच्या पहिल्या प्रहरात झाला. आज दुपारी वैशाख शुद्ध तृतीया लागलेली असल्याने, आजच श्री परशुराम जयंती साजरी केली जात आहे. मात्र सूर्यसिद्धांतानुसार अक्षय्यतृतीया उद्या साजरी होणार आहे.
भृगू ऋषींच्या कुळात जन्मले म्हणून "भार्गवराम", हातात परशु म्हणजे कु-हाड धारण करतात म्हणून "परशुराम",  रेणुकामातेचे पुत्र म्हणून "रेणुकानंदन" अशी त्यांची विविध नावे संतांनी गायलेली आहेत.
अधर्माचा संपूर्ण नि:पात करणा-या, वेदवेदांगे तसेच धनुर्विद्येचे महान आचार्य असणा-या, परमतेजस्वी भगवान श्री परशुरामांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत प्रणाम !!
(आम्ही सूर्यसिद्धांताचे पंचांग वापरीत असल्याने, आमच्याकडे अक्षय्यतृतीया उद्या साजरी होणार आहे. त्यामुळे अक्षय्यतृतीयेचे महत्त्व सांगणारा लेख उद्या पोस्ट केला जाईल.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

10 comments:

  1. सुन्दर माहिती ! धन्यवाद !

    ReplyDelete
  2. नमस्कार दादा. भगवान भार्गवरामांवरचा लेख वाचला. खूप छान व मुद्देसूत लिहीला आहे. आवडला. अभिनन्दन💐👌🏻🚩
    परंतु काही प्रश्न पडलेत.

    १. सामान्यत: भगवानांचे ४ भाऊ होते असेच सामान्यत: वाचण्यात आले आहे. तुम्ही ३ च भाऊ होते असे लिहीले आहे. याला संदर्भ काय आहे?
    २. भगवान दत्तात्रेय यांनी त्यांंना जी श्रीविद्या दिली, ती विद्या म्हणजे नेमकी कोणती? कारण भार्गवकवचम् मध्येही या विद्येचे उल्लेख आहेत.
    ३. पुराणांत भगवानांचे जे निवासस्थान आहे, ते म्हणजे महेन्द्रपर्वत, व हा महेन्द्र पर्वत तर ओरिसा राज्यांत आहे. तेव्हा भगवानांचे वास्तव्य कोंकणात आहे असे म्हणण्यामागचे रहस्य काय आहे?
    ४. भगवानांची उपासना कोणत्या मार्गाने करावी असे आदेश आहेत? म्हणजे उपासनापध्दति कोणती आहे?
    ५. भगवानांचा जो मंत्र आहे, तोच त्रयोदशाक्षरू मंत्र रामरायांचा आहे, याचे कारण काय आहे?
    ६. रामायण महाभारतासारखे भगवानांचे विस्तृत अधिकृत चरित्र उपलब्ध आहे का? व असेल तर ते कोठे वाचावयास उपलब्ध होईल?

    कृपया या शंकांचे समाधान करावे ही विनंती.

    ReplyDelete
  3. . भगवान दत्तात्रेय यांनी त्यांंना जी श्रीविद्या दिली, ती विद्या म्हणजे नेमकी कोणती? कारण भार्गवकवचम् मध्येही या विद्येचे उल्लेख आहेत.
    ३. पुराणांत भगवानांचे जे निवासस्थान आहे, ते म्हणजे महेन्द्रपर्वत, व हा महेन्द्र पर्वत तर ओरिसा राज्यांत आहे. तेव्हा भगवानांचे वास्तव्य कोंकणात आहे असे म्हणण्यामागचे रहस्य काय आहे?
    ४. भगवानांची उपासना कोणत्या मार्गाने करावी असे आदेश आहेत? म्हणजे उपासनापध्दति कोणती आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. Namaskar kokan bhumi tyani ek baan marun samudrala mage jayla sngitle...chiplun la mahendragiri parvat ahe...tynche sishya shree bramhendra swami yanni tya dongravarti mandir sthapan kele ahe ekda jaun avashya bhet dyavi

      Delete
  4. . भगवान दत्तात्रेय यांनी त्यांंना जी श्रीविद्या दिली, ती विद्या म्हणजे नेमकी कोणती? कारण भार्गवकवचम् मध्येही या विद्येचे उल्लेख आहेत.
    ३. पुराणांत भगवानांचे जे निवासस्थान आहे, ते म्हणजे महेन्द्रपर्वत, व हा महेन्द्र पर्वत तर ओरिसा राज्यांत आहे. तेव्हा भगवानांचे वास्तव्य कोंकणात आहे असे म्हणण्यामागचे रहस्य काय आहे?
    ४. भगवानांची उपासना कोणत्या मार्गाने करावी असे आदेश आहेत? म्हणजे उपासनापध्दति कोणती आहे?

    ReplyDelete
  5. भगवान परशुरामाना साष्टांग दंडवत

    ReplyDelete
  6. जय भगवान श्री परशुराम

    ReplyDelete
  7. जय श्री भगवान परशुराम महाराज की जय.

    ReplyDelete
  8. भगवान परशुरामाना साष्टांग दंडवत

    ReplyDelete