28 Jun 2018

कहत कबीर सुनो भाई साधो

आज ज्येष्ठ पौर्णिमा !
आज थोर सत्पुरुष श्रीसंत कबीर महाराजांची जयंती व आळंदी येथील मागच्या पिढीतील अनन्य माउलीभक्त सत्पुरुष श्रीसंत मारुतीबुवा गुरव तसेच श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील थोर महासिद्ध श्रीसंत म्हादबा पाटील (धुळगांवकर) महाराज यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त या तिन्ही महात्म्यांच्या श्रीचरणीं दंडवत !
हिंदी संत जगतामध्ये श्रीसंत कबीर महाराजांचे नाव सर्वोपरि आहे. त्यांचे दोहे, साख्या, अभंग आजही अनेक भक्तांच्या नित्य पठणात आणि चिंतनात आहेत. त्यांचे वाङ्मय अतिशय सुंदर आणि खरोखरीच प्रचंड आहे. त्यांचे दोहे अत्यंत मार्मिक आणि मोजक्याच परंतु समर्पक शब्दांमध्ये अध्यात्माचे, परमार्थाचे स्वरूप सांगतात. श्रीसंत कबीर महाराजांची रसवंती अनेक विषयांमध्ये स्वच्छंद विहार करते आणि अनेक अर्थांच्या काव्य धुमाऱ्यांनी, कोंभांनी पैसावत साधक हृदयाचा ठाव घेते. त्यांची शब्दकळा काही न्यारीच आहे.
श्रीसंत तुकाराम महाराजांप्रमाणे श्री कबीर महाराज हेही परखड विचारांचे संत होते. परमार्थातील गैरसमजुती, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, भोंदूगिरी, फसवणूक या सर्वांचा त्यांनी त्यांच्या वाङ्मयातून खरपूस समाचार घेतलेला आहे.
तसेच श्रीसंत कबीर महाराजांचे सद्गुरु वर्णनपरह अनेक दोहे , साख्या आणि पदे उपलब्ध आहेत. अत्यंत भावभिजलेली अशी त्यांची मनोहर काव्यरचना आहे. सद्गुरूंसंबंधी बोलताना त्यांना राहवत नाही आणि ते फारच बहारीचे बोलून जातात. आपल्या एका सुप्रसिद्ध दोह्यात ते म्हणतात,
सब धरती कागज करू, लेखनी करू सब बनराय ।
सात समुंदकी मसी करू, गुरु गुन लिखा न जाय ।।
श्रीसंत कबीर महाराज म्हणतात की, साऱ्या पृथ्वीचा कागद केला, सर्व वृक्षांची लेखणी केली आणि सात समुद्रांची शाई केली तरी श्रीगुरूंचे गुण पूर्णपणे लिहिता येणार नाहीत.
श्री कबीर महाराज येथे अतिशयोक्ती करीत नाहीत, तर वस्तुस्थिती सांगतात. ' सद्गुरु ' हे असे अगाध तत्त्व आहे की ज्याचे समग्र आकलन होणे कधीही, कोणालाही शक्यच होणार नाही. सद्गुरूंचे गुण, माहात्म्य, अकारण दया, प्रेमळपणा, शिष्यवात्सल्य, अहैतुकी कृपा, थोरवी, श्रेष्ठपणा, ज्ञान, सर्वज्ञता या व अशा अनंत सद्गुणांची साधी यादी करणे देखील आपल्या आवाक्याबाहेरचे आहे, तर त्यांचे वर्णन कोठून करणार ? हेच श्री कबीर महाराज या दोह्यातून सांगतात.
सद्गुरु श्री माउलींनी देखील ज्ञानेश्वरीत वेळोवेळा म्हटले आहे की, श्रीगुरूंचे माहात्म्य वर्णन करणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. ज्याप्रमाणे कल्पतरूला फुलोरा आणणे, कापराला दुसऱ्याचा सुवास देणे, चंदनाला कशाचीही उटी देणे शक्य नाही; त्याचप्रमाणे,
तैसे श्रीगुरूचे महिमान ।
आकळिते के असे साधन ।
हे जाणोनिया नमन ।
निवांत केले ॥ ज्ञाने.१०.०.१३॥
श्रीगुरूंचे महिमान आकलन करून घेण्यासाठी साधनच अस्तित्वात नाही. म्हणून शांतपणे फक्त त्यांच्या श्रीचरणी मी नमन करतो. श्रीगुरूंचे गुण गाणे म्हणजे खऱ्या जातिवंत मोत्याला चमकण्यासाठी अभ्रकाचे पुट देणे किंवा शुद्ध सोन्याला चांदीचा मुलामा देण्याप्रमाणेच ठरेल. म्हणून या भानगडीत न पडता आपण आपले नमन करणेच श्रेयस्कर.
उगेयाचि माथा ठेविजे चरणी ।
हेचि भले ॥ ज्ञाने.१०.०.१५॥
अशाच आणखी एका सुंदर दोह्यात श्रीसंत कबीर महाराज शिष्य आणि गुरु यासंबंधी मत मांडतात. शिष्याने गुरूंना काय द्यायला हवे म्हणजे त्यांची कृपा होईल, हे श्रीमहाराज ह्या दोह्यातून फार सुंदर शब्दांत सांगतात.
पहिले दाता सिष भया, जिन तन मन अरपा सीस ।
पीछे दाता गुरु भये, जिन नाम दिया बकसीस ।।
श्रीमहाराज म्हणतात की; पहिल्यांदा शिष्य हा दाता असतो. तो सद्गुरूंना तन, मन आणि मस्तक अर्पण करतो. दुसऱ्यांदा सद्गुरु दाते असतात जे त्या शिष्याला 'नाम' बक्षीस देतात.
या दोह्यातून श्रीमहाराज शिष्याची लक्षणे सांगतात. भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींनी श्रीगीतेच्या ४ थ्या अध्यायातील ' तद्विद्धि प्रणिपातेन ' या श्लोकावरील टीकेत अगदी अशाच अर्थांच्या ओव्या घातलेल्या आहेत. ते म्हणतात ; सद्गुरु हे ज्ञानाचे आश्रयस्थान असतात. त्यांची सर्वस्वाने सेवा केली तरच ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल म्हणून;
तरी तनुमनजीवें ।
चरणांसी लागावें ।
आणि अगर्वता करावें ।
दास्य सकळ ॥ज्ञाने.४.३४.१६७॥
सर्वस्वाने, शरीर, मन आणि जीवाने, अहंकार समूळ टाकून देऊन या सद्गुरुरायांचे दास्य, सेवा करावी म्हणजे ते आपले सर्वस्व, आपला आत्मबोध आणि आनंद संपूर्णपणे आपल्याला देऊन टाकतात.
येथे श्रीसंत कबीर महाराज 'सीस' म्हणजे मस्तक असा उल्लेख करतात. त्याचा गर्भितार्थ 'अहंकार' असा आहे. तन, मन आणि अहंकार सर्वस्वाने त्यांच्या चरणी अर्पण केला की ते प्रसन्न होतात आणि परंपरेने आलेले पावन 'शक्तियुक्त नाम' बक्षीस म्हणून त्या जीवाला देतात. त्या परंपरेने आलेल्या सिद्ध नामाच्या अनुसंधानाने त्या शिष्याची अंतर्बाह्य शुद्धी होऊन, त्याच्या विशुद्ध झालेल्या चित्तात श्रीभगवंत पूर्णत्वाने प्रकट होतात व त्याचा परमार्थ सुफळ संपूर्ण होतो. ही नि:संशय श्रीगुरुकृपेचीच थोरवी आहे !
आजच्या पावन दिनी श्रीसंत कबीर महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !
थोर वारकरी संत वै.विष्णुबुवा जोग महाराजांचे शिष्योत्तम, श्रीसंत मारुतीबुवा गुरव हे मोठे अधिकारी महात्मे होते. माउलींच्या सेवेकरी गुरव घराण्यातच जन्म झालेला असल्याने, त्यांना जन्मापासूनच माउलींच्या सेवेचे, प्रेमाचे बाळकडू मिळाले. तो वसा त्यांनी निष्ठेने सांभाळला, वाढवला आणि आजन्म श्री माउलींची प्राणपणाने सेवा केली. वै.जोग महाराजांच्या आज्ञेने, त्यांनी ज्ञानेश्वरीची १०८ दिवसांत १०८ पारायणे केली होती. त्यातील १०० पारायणे केवळ एकदा दूध पिऊन आणि शेवटची ८ पारायणे अजानवृक्षाची पडलेली पाने प्रसाद म्हणून खाऊन ! एवढी उपासना झाल्यानंतरच वै.जोग महाराजांनी त्यांना कीर्तन-प्रवचने करण्याची अनुमती दिली. पूर्वीच्या काळातील वारकरी धुरीणांची ही पद्धतच होती. आजच्यासारखी दोन चार कीर्तने प्रवचने पाठ करून केली जाणारी पोपटपंची त्यांना कधीच मान्य नव्हती. त्यांच्यासाठी कीर्तन-प्रवचन हे श्रीभगवंतांच्या निखळ सेवेचे साधन होते. दुर्दैवाने आज तो लोकांचा पैसे व प्रसिद्धी कमवण्याचा धंदा होऊन बसलेला आहे, याचे मनस्वी वाईट वाटते.
वै.मारुतीबुवा हे परम निष्ठावान माउली भक्त आणि हाडाचे वारकरी होते. ते रात्री शेजारतीनंतर माउलींच्या समाधी मंदिरात वीणेचा पहारा करीत व पहाटे काकड्यापूर्वी स्नान आन्हिक करीत. मग देवदर्शन झाल्यावर, जेथे त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी राहात, त्या वास्तूच्या उंब-यावर डोके ठेवून नमस्कार करीत. एकदा एकाने त्यांना विचारले की, "महाराज, येथे तर तुमचेच शिष्य राहतात, तुम्ही का नमस्कार करता त्या वास्तूला?" त्यावर बुवा उत्तरले, "अरे पुढे जाऊन या विद्यार्थ्यांमधून एखादा महात्मा होईल आणि माझ्या ज्ञानोबारायांची पूर्णकृपा संपादन करेल, त्याला मी आत्तापासूनच वंदन करतो !" केवढी विलक्षण माउलीनिष्ठा !!
वै.मारुतीबुवांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना वारीला जाऊ न देण्याचा निर्णय त्यांच्या घरच्यांनी घेतला. त्यांना हे सांगितल्यावर ते म्हणाले, "जन्मल्यापासून माझी वारी कधीच चुकली नाही, मी आत्ताही चुकवणार नाही." त्यांच्या चिरंजीवांनी पुन्हा एकदा सांगितले की, वारीला तुम्हाला सोडणारच नाही. त्यावर ते म्हणाले, "तुम्ही मला जाऊ देणार नसाल तर मग मी हा देहच सोडून कायमचा माउलींच्या चरणी जाईन, पण वारी न करता राहणार नाही." त्यांनी आपला शब्द खरा केला, वारीच्या आठ दिवस आधीच माउलींच्या स्मरणात आळंदीला त्यांनी आजच्या तिथीला आपल्या देहाचा त्याग केला !! धन्य ते मारुतीबुवा आणि धन्य त्यांची अनन्य माउलीनिष्ठा !! अशी संतमंडळी आता पुन्हा होणे नाही. त्यांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त साष्टांग दंडवत !!
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ज्यांचे समाधिमंदिर आहे, ते थोर अवलिया सत्पुरुष श्रीसंत म्हादबा पाटील महाराजही विलक्षण अधिकाराचे महासिद्ध होते. वरकरणी रागीट वाटणारे, बालोन्मत्तवृत्तीने राहणारे पाटील महाराज आतून पूर्ण रंगलेले महात्मे होते. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा व त्यांचा विशेष प्रेमानुबंध होता. त्यांच्या लीलाही मनोहर आहेत. पू.मामांना ते साक्षात् श्रीदत्तप्रभूच मानून त्यांच्याशी फार प्रेमादराने वागत असत. पू.मामांचेही त्यांच्यावर निरतिशय प्रेम होते. प.पू.श्री.मामांच्या व त्यांच्या एकत्रित अशा अनेक लीला घडलेल्या आहेत. सांगलीला हरिपूर रोडवर  प.पू.श्री.मामांनी आपल्या सद्गुरूंच्या नावाने श्री गुळवणी महाराज प्रतिष्ठान स्थापन केलेले आहे. तेथे बांधकाम चालू असताना एकदा तेथील व्यवस्था पाहणा-या एका साधकांनी पू.मामांना पुण्यात फोन करून विचारले की, "मामा, आपल्याला प्रतिष्ठानच्या जागेत बोअर घ्यायचे आहे. कुठे घ्यावे म्हणजे भरपूर पाणी लागेल?" पू.मामा त्यावेळी पूजा करीत होते. त्यांनी निरोप दिला की, "कुठे बोअर घ्यावे हे पाटील महाराज सांगतील, त्याप्रमाणे करावे." हे साधक तेव्हा जयसिंगपूरला राहात असत. गंमत म्हणजे त्यांनी फोन ठेवून मागे वळून पाहतात तर, त्यांच्या घराच्या दारात पाटील महाराज येऊन दत्त म्हणून उभे राहिले होते. ते म्हणाले, "अरे, कशाला पू.मामांना त्रास देतोस, कुठेही घे बोअर, भरपूर पाणी लागेल, काळजी करू नकोस." पुढे खरोखरीच सोयीची जागा बघून तिथे बोअर घेतले गेले व त्याला प्रचंड पाणी लागले. पण दोन्ही महात्म्यांची ही लीला पाहा किती अद्भुत आहे. पू.मामा निरोप देतात काय, त्याक्षणी पाटील महाराज दारात येऊन काही न विचारताच प्रश्नाचे उत्तर देतात काय; सगळेच अतर्क्य आहे. पू.म्हादबा पाटील महाराजांच्या व पू.मामांच्या अशा असंख्य लीला आहेत.
पू.म्हादबा पाटील महाराजांनी देह ठेवला तेव्हा पू.मामांचे परगावी शिबीर चालू होते. तेथे त्यावेळी त्यांची प्रवचनसेवा चालू होती. मध्येच ते थोडे थांबले व त्यांनी समोरच्या श्रोत्यांना दु:खद बातमी सांगितली की, "आत्ताच आमच्या पू.म्हादबा पाटील महाराजांनी देहत्याग केला." हे सांगून झाल्यानंतर पू.मामांनी प्रवचनसेवा तेथेच पूर्ण केली. पू.मामांचा पू.पाटील महाराजांवर असा अतिशय प्रेमलोभ होता.
आज प.पू.श्री.म्हादबा पाटील (धुळगांवकर) महाराजांचे भव्य समाधिमंदिर श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याही श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत घालून स्मरणपूर्वक प्रार्थना करूया !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )



25 Jun 2018

अलौकिक गुरुप्रेम


( आज २५ जून तारखेने प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची जयंती. त्यानिमित्त त्यांचे हे पुण्यस्मरण ! )
प.पू.श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांचे शिष्योत्तम, प.पू.सद्गुरु श्री.श्रीपाद दत्तात्रेय उपाख्य मामासाहेब देशपांडे महाराज हे विसाव्या शतकातील विलक्षण अधिकारी महात्मे होते. पू.श्री.मामांच्या सर्वच चरित्रलीला तुम्हां आम्हां साधकांसाठी अतिशय बोधप्रद आणि निरंतर मार्गदर्शक आहेत.
प.पू.श्री.मामांच्याकडे त्यांचे एक परगावचे अनुगृहीत साधक दर्शनाला नेहमी येत असत. त्यांचे नाव 'वामन' होते आणि ते पेशाने शिक्षक होते. म्हणून प.पू.श्री.मामा त्यांना 'गुरुजी' असे संबोधत असत. ते एकदा प.पू.श्री.मामांना म्हणाले, "आपण मला 'वामन' अशी नावानेच मारीत जावे !" त्यावर प.पू.श्री.मामा त्यांना गंभीर होऊन म्हणाले, "असले काही तुम्ही मनात सुद्धा आणू नका. तुम्हांला जर नावाने व एकेरी संबोधले, तर माझ्या सद्गुरूंना नावाने व एकेरी संबोधल्याचे पातक माझ्या डोक्यावर बसेल !" असे म्हणत असताना देखील प.पू.श्री.मामांचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांचे ते विलक्षण सद्गुरुप्रेम पाहून त्या गुरुजींनाही गहिवरून आले.
प.पू.श्री.मामांच्या ठायी सद्गुरुप्रेम असे आत-बाहेर भरून राहिलेले होते. ते त्या नित्यनूतन गुरुप्रेमाचाच विविध प्रकारे सतत आस्वाद घेत असत.
( संदर्भग्रंथ : ब्रह्मानंद ओवरी, लेखक - नारायण पानसे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. )
अशाप्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर जावे.
http://rohanupalekar.blogspot.in )


21 Jun 2018

तेंचि सार जाण योगाचें


विमनस्क होऊन स्वकर्तव्य विसरलेल्या अर्जुनाला बोध करण्याच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या श्रीमद् भगवद् गीतेची भारतीय तत्त्वादर्शांचा प्रमाणग्रंथ म्हणून गणना होते. या ग्रंथात कर्म, ज्ञान, भक्ती, सद्गुण, दैवी-असुरी संपत्ती, आत्मस्वरूप झालेल्या महानुभवांची लक्षणे, योग अशा असंख्य बाबींचा सुरेख ऊहापोह केलेला दिसून येतो. यातील अठरा अध्यायांना 'योग' याच नावाने संबोधले जाते. श्रीगीतेचे माहात्म्यच असे आहे की, स्वजनांशीच लढावे लागणार म्हणून बळावलेला अर्जुनाचा विषाद देखील इथे 'योग' या संज्ञेला पात्र ठरलेला आहे. ही आमच्या भारतीय विचारदर्शनाची प्रगल्भता आहे !
मुळात 'योग' हा शब्दच सर्वसमावेशक आहे. औपनिषदिक तत्त्व-धारेतील सहा प्रमुख दर्शनांमध्ये भगवान पतंजलींच्या योगदर्शनास मोठी मान्यता लाभलेली आहे. योग हा शब्द युज् धातूपासून बनलेला आहे. योग म्हणजे जोडले जाणे ! दोन भिन्न गोष्टींना जोडून एकसंधता निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे योग. वस्तुतः अध्यात्मविद्येचा मुख्य भाग असणारा हा योग आमच्या प्रत्येक जीवन-घटकात सामावलेला आहे. त्यामुळे आमचे अवघे आयुष्य हाही एक 'जीवनयोग'च म्हणायला हवा.
योग हा अध्यात्माचा केंद्रबिंदू आहे स्वतःला अपूर्ण मानणारा जीव पूर्ण असणाऱ्या परमात्म्याशी ज्या प्रक्रियेने पुन्हा एकरूप होतो, तोच 'योग' होय. संतवाङ्मयाचे मर्मज्ञ जाणकार श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, *"जीवाला परमेश्वराशी जोडणे हा योग. कशाने जोडतात ? तर अग्नीने ! वैराग्यरूपी अग्नीने दोघांना जोडता येते."* योग शब्दामधून हाच योग भारतीय शास्त्रांना व संतांना अभिप्रेत आहे. पण लौकिक अर्थाने योग म्हणजे योगासने, प्राणायाम असाच घेतला जातो.
आपण रोजच्या जीवनात योग शब्द अनेक ठिकाणी वापरतो. जसे; भक्तियोग, ज्ञानयोग, ध्यानयोग. या सर्व योगांमध्ये त्या त्या साधनाने भगवंतांशी जोडले जाणेच अभिप्रेत आहे. म्हणजे जिथे जिथे काही जोडले जाण्याची प्रक्रिया घडते तिथे तिथे योग अनुस्यूत आहेच. याच अर्थाने वर उल्लेख केलेला अर्जुनाचा विषादही पाहता येईल. अर्जुनाला खूप दु:ख झाले म्हणूनच तर त्याचा तो विषाद नष्ट करण्यासाठी भगवंतांनी ज्ञान सांगितले. म्हणजे विषादामुळे ज्ञानाशी तो जोडला गेला, म्हणून तोच विषादयोग म्हटला जातो.
२१ जून हा *'जागतिक योग दिवस'* म्हणून साजरा केला जातो. यंदा त्याचे चौथे वर्ष आहे. जगातील एकूण १५९ देश हा योगदिन साजरा करतात. आजचाच दिवस *'जागतिक संगीत दिवस'* म्हणूनही साजरा होतो. जगभरातील १८ देश तो साजरा करतात. हे त्याचे बत्तीसावे वर्ष आहे. योगायोगानेच योगदिन व संगीतदिन एकाच दिवशी साजरे होत असले, तरी त्यांच्यात एक फार महत्त्वाचा समन्वय आहे. त्या सामायिक दुव्याचाच आपण थोडक्यात विचार करणार आहोत.
*'गीतं वाद्यं तथा नृत्तं त्रयं सङ्गीतमुच्यते।'* अशी भरतमुनींनी संगीताची व्याख्या आपल्या नाट्यशास्रात केलेली आहे. गायकाचे गायन, वादकाचे वादन आणि गातानाचे गायकाचे अल्प पण आवश्यक असे हावभाव, शरीराच्या हालचाली म्हणजेच काही प्रमाणातले नाट्य यांच्या संयोगातून 'संगीत' साकारते. म्हणजे संगीतातही जोडले जाण्याची प्रक्रिया आहेच, हे यातून आपल्या ध्यानात येईल.
संगीत आणि योग यांच्यात एक गोष्ट समान आहे; ती म्हणजे सम किंवा समत्व. संगीतात जितके महत्त्व समेला आहे तितकेच महत्त्व योगात समत्वाला आहे. किंबहुना ही समच संगीत व योगाचे खरे सौंदर्य आहे. सम चुकली तर गायक-वादकाने आपले ज्ञान कितीही कौशल्यपूर्ण दाखवलेले असले, तरी ते रसहीनच ठरते. तसे योगात ( हठयोगात ) शरीरातील अवयवांमधे समप्रमाण जर नसेल तर योगाची सिद्धी होत नाही. चित्ताला समत्व नाही आले तर जीव-ब्रह्माचे ऐक्यही प्रतिष्ठापित होत नाही. म्हणून दोन्हींमध्ये समेला फार महत्त्व आहे. यासाठीच श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
अर्जुना समत्व चित्ताचें ।
तेंचि सार जाण योगाचें ।
जेथ मन आणि बुद्धीचें ।
ऐक्य आथि ॥ज्ञाने.२.५०.२७३॥
मन आणि बुद्धीचे ऐक्य जेथे होते, तेच योगाचे खरे सार आहे. "समत्वं योग उच्यते । " असे गीतेत श्रीभगवंतही त्यामुळेच स्पष्ट करतात.
आपल्या प्रत्येक कर्मामध्ये प्रयत्नपूर्वक सुयोग्य कौशल्य बाणवणे हाही योगच होय. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण कर्मयोग सांगताना एक मार्मिक सिद्धांत सांगतात की, *"योग: कर्मसु कौशलम् ।(भ.गी.२.५०)"* कौशल्याने कर्म करणे हाही योगच आहे. कौशल्य म्हणजे व्यवस्थितपणाने, नेटकेपणाने आणि प्रामाणिकपणे आपल्या सर्व क्षमतांचा पूर्ण वापर करून केलेले कर्म होय. कौशल्य म्हणजे कर्मातला Excellence. हाच आजमितीस दुर्मिळ होत चाललेला आहे. असे कौशल्य अंगी बाणण्यासाठी मनाबरोबरच शरीरही सुदृढ असावे लागते. तन-मनाचे आरोग्य राहण्यासाठीच सूर्यनमस्कार व योगासनांना दैनंदिन जीवनात फार महत्त्व आहे. म्हणजे यातही लौकिक योग आलाच.
सुखी जीवनयोगातील कौशल्याचे नेमके दिग्दर्शन करताना पूजनीय मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, *"आयुष्यात रोगाला बरे करून, भोगाला स्वस्थ करून आणि योगाला अंगीकारून पुढे जायचे असते."* दुर्लक्षित रोग हा आगीसारखा असतो, कळेपर्यंत राखरांगोळी करून मोकळा होतो. म्हणून रोगाला वेळीच प्रयत्नपूर्वक बरे केले पाहिजे.
भोग हा कधीच संतुष्ट न होणारा असल्याने काहीतरी मर्यादा घालून त्याला स्वस्थच केले पाहिजे. हाव वेळीच आवरली तर खरे, नाहीतर ती प्राण घेण्यास कमी करत नाही. हे दोन्ही जमल्यावर योगाचा अंगीकार करून शांतचित्ताने समोर येईल ते आपले कर्तव्यकर्म प्रामाणिकपणे केले तरच जीवन समाधानी व सुखी होईल. शेवटी समाधानच आपले खरे प्राप्तव्य आहे. हे तीन भाग जर नीट कळले व त्यानुसार वागायला जमले, तर जीवनाचे सुरेख नादमय संगीत आतूनच अनुभवायला मिळून आपले आयुष्याचा एक "जीवनयोग" होतो.
जीवनाचा असा योग होण्यासाठी काही आवश्यक असणा-या मुद्द्यांचा विचार मांडताना प.पू.डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराज तीन स्तर सांगतात. त्यांचा नक्कीच सखोल विचार व्हायला हवा.
1. Always act in present.*
2. The service you are in, be taken up and made most and there lies the mandate.
3. Even one molecule in its perfection outweighs the world.
वर्तमानात जगणारा माणूसच यशाचे शिखर गाठू शकतो. यशस्वी होण्यासाठी जन्मजात क्षमताच फक्त लागते असे नाही. आपण जे काही कर्तव्य/कर्म करीत आहोत, त्यातील प्रामाणिकपणा, कष्ट घेण्याची आवड व कामावरील पक्की निष्ठा असेल तर यश हमखास मिळतेच. कौशल्याचा महत्त्वाचा भाग प. पू. उपळेकर महाराज शेवटच्या वाक्यात सांगतात की, योग्य वेळी नेमके व समरसून केलेले प्रयत्न थोडे जरी असले तरी ते फार मोठा प्रभाव दाखवतात, हे विसरता कामा नये. म्हणून आपण जे काही करत असतो त्यातले सर्वोच्च कौशल्य मिळवण्याचा सतत प्रयत्न करायला हवा. हाच प्रामाणिक प्रयत्न आनंददायकही ठरतो व अंतिमत: समाधानकारकही !
योग व संगीतातील हेच समत्व निष्ठेने अंगीकारल्यास ते आपल्या दैनंदिन जीवनात एक प्रकारची सुरेल तान निर्माण करते व ती तान जर आपल्या सुयोग्य प्रयत्नांनी टिकून राहिली, तर मग तेच योगाचे सार म्हणायला हवे. हेच तुम्हां आम्हां सर्वांसाठी सतत मिळवण्याजोगे महत्त्वाचे धनही आहे व तेच त्याचे साधनही आहे ! या तिन्ही स्तरांचा सर्वांगीण विचार करूनच पू.डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराज म्हणतात, "मनुष्यजन्म हा एक महायोग आहे !" श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज देखील 'विवेकचूडामणी'त, श्रीभगवंतांची प्राप्ती होण्यासाठी अत्यावश्यक असणा-या तीन अत्यंत दुर्लभ गोष्टींमध्ये पहिल्या क्रमांकावर मनुष्यजन्माचाच उल्लेख करतात. मनुष्यत्व, मग मुमुक्षुत्व व त्यानंतर महापुरुषसंश्रय अर्थात् सद्गुरुकृपा, याच त्या तीन अत्यंत दुर्लभ गोष्टी होत. जीवनात या तिन्हींचा संयोग झाला की मगच खरा महायोग साकारत असतो.
आपल्या दुर्मिळ अशा या मनुष्यजन्माचा असाच महायोग निरंतर साजरा करण्याचे सौभाग्य सर्वांना लाभो, हीच आजच्या या जागतिक योग व संगीत दिनानिमित्त श्रीचरणीं सादर प्रार्थना !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( पूर्वप्रसिद्धी : 'शब्दीप्ता' जून २०१६ http://rohanupalekar.blogspot.in )
[ छायाचित्र संदर्भ : योगशास्त्रातील समत्वाचे प्रतीक असणारे, महाप्राणरूप गरुड. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या नित्यपूजेतील प्राचीन गरुडमूर्ती. ]


17 Jun 2018

निर्मळ आठवणींचा गहिरा डोह !!!



प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या पावन सान्निध्यातील अलौकिक, अद्भुत आणि निरंतर मार्गदर्शक अशा स्मृतिकथांचे आदरणीय श्री.नारायणराव पानसे यांच्या लेखणीतून साकारलेली ही दोन कैवल्यलेणी - #ब्रह्मानंदओवरी व #चिदानंदविलास. त्यावरील आज प्रकाशित झालेले दै.तरुणभारत मधील परीक्षण. निखळ आनंद व सद्भाव प्रदान करणारे हे दोन्ही भावमधुर ग्रंथ अवश्य संग्रही ठेवावेत असेच आहेत !!!

पुस्तकांसाठी संपर्क : श्रीवामनराज प्रकाशन © 02024356919 / 8888904481



13 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २९


श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

१७. अज्ञानाने अथवा नकळत झालेल्या पापांच्या नाशाकरिता मंत्र

आत्मयोनिः स्वयंजातो वैखानः सामगायनः ।

देवकीनन्दन: स्रष्टा क्षितीशः पापनाशनः ॥११९॥

आत्मयोनिः - स्वतःच स्वतःचे उपादान-कारण असणारा.

स्वयंजातः - स्वतःच स्वतःचे निमित्त-कारण असणारा.

वैखानः - भूमीला विशेषरूपाने खोदून काढणारा

सामगायनः - सामगान करणारा.

देवकीनंदन: - देवकीचा पुत्र.

स्रष्टा - सर्व लोक रचणारा.

क्षितीशः - पृथ्वीपती.

पापनाशनः - पापांचा नाश करणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

पुराणपुरुष श्रीपुरुषोत्तम भगवंतांच्या असीम दयाकृपेने गेले महिनाभर संपन्न झालेली ही सर्व सेवा त्यांच्याच श्रीचरणीं सादर समर्पित असो !

या महिन्याभरात अनेक सद्भक्तांनी आवर्जून आपला प्रतिसाद कळवला, आनंद व्यक्त केला, पोस्ट शेयर करून असंख्य लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्या सर्व सद्भक्तांनाही सादर अभिवादन. सर्वांच्या वतीने ही सेवा श्रीचरणी प्रेमभावे समर्पित असो !

- रोहन विजय उपळेकर.









12 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २८



श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

१६. पोटाचे विकार दूर होण्याकरिता मंत्र

भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः।
अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसु: ॥२९॥

भ्राजिष्णुः - प्रकाशरूप.
भोजनम् - मायारूपाने आस्वाद घेण्यास योग्य.
भोक्ता - पुरुषरूपाने भोगणारा.
सहिष्णुः - दैत्यांचे बळ सहन करणारा (त्यांचा पराभव करणारा.)
जगदादिजः - जगाच्या आधी हिरण्यगर्भरूपाने स्वतः उत्पन्न होणारा.
अनघः - निष्पाप.
विजयः - ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य इत्यादी गुणांनी विश्वाला जिंकणारा.
जेता - स्वभावतः भूतमात्रांहून वरचढ.
विश्वयोनिः विश्व व त्याचे कारण.
पुनर्वसु: - पुन्हा पुन्हा शरीरात आत्मरूपाने राहणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


11 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २७

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

१५.  साधनेतील विघ्नांचा नाश होण्याकरिता मंत्र

वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणव: पृथुः ।
हिरण्यगर्भ: शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ॥ ५७॥


वैकुण्ठः - पंचभूतांच्या परस्परविरोधी गती अडवून त्यांना एकमेकांशी जोडणारा.
पुरुषः - शरीरात राहणारा.
प्राणः - प्राणवायुस्वरूप.
प्राणदः - प्राण्यांचे प्राण खंडित करणारा.
प्रणवः  - ज्याला वेदही प्रणाम करतात असा, ॐकाररूपी.
पृथुः - प्रपंचरूपाने विस्तार पावणारा.
हिरण्यगर्भः - ज्याच्यापासून हिरण्यमय अण्डे उत्पन्न झाले, तो.
शत्रुघ्नः - शत्रूंना मारणारा.
व्याप्त: - कारणरूपाने सर्व कार्यांत व्याप्त असणारा.
वायुः  - वायुरूप.
अधोक्षजः  - आपल्या स्वरूपापासून क्षीण न होणारा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919)


10 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २६

विष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग


१४. भगवत्कृपा होण्याकरिता मंत्र

श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावन: ।
श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमाँल्लोकत्रयाश्रयः ॥७८॥

श्रीदः - भक्तांना ऐश्वर्य देणारा.
श्रीश: - लक्ष्मीपती.
श्रीनिवासः - श्रीमंतांमध्ये नित्य वास करणारा.
श्रीनिधिः - सर्व ऐश्वर्याचा आधार.
श्रीविभावनः - मनुष्यांना कर्मानुसार ऐश्वर्य देणारा.
श्रीधरः - मायेला धारण करणारा.
श्रीकरः - स्मरण, स्तवन आणि पूजन करणाऱ्यांना ऐश्वर्य देणारा.
श्रेयः - परमकल्याणरूपी.
श्रीमान् - सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त.
लोकत्रयाश्रयः - तीनही लोकांचे आश्रयस्थान.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


9 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २५


अधिकस्य अधिकं फलम् - २५

_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_

१३. शांत निद्रा आणि दुःस्वप्ननाश याकरिता मंत्र

उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दु:स्वप्ननाशनः।
वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः ॥११२॥

उत्तारण: - संसार-सागराच्या पार नेणारा.
दुष्कृतिहा - पापांचा नाश करणारा.
पुण्यः - पुण्य प्रदान करणारा 
दुःस्वप्ननाशन: - वाईट स्वप्नांचा नाश करणारा.
वीरहा - सांसारिकांच्या विविध गतींचा नाश करून त्यांना मुक्ती देणारा.
रक्षणः - संरक्षण करणारा. 
सन्तः - सन्तरूप.
जीवनः - सर्व प्राण्यांना प्राणरूपाने जिवंत ठेवणारा.
पर्यवस्थितः - विश्वाला व्यापून राहणारा. 

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.

( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

8 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २४

_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_
१२. भय, चिंता दूर होण्याकरिता मंत्र
सहस्रार्चिः सप्तजिह्व: सप्तैधाः सप्तवाहनः ।
अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृद्भयनाशनः ॥१०२॥
सहस्रार्चिः - हजारो किरण असलेला.
सप्तजिह्व: - काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, धूम्रवर्णा, स्फुलिंगिनी व विश्वरुची अशा सात जिह्वा असलेला, अग्निरूप.
सप्तैधाः - सात ज्वाला असलेला, अग्निरूप.
सप्तवाहनः - सात घोड्यांचे वाहन असलेला, सूर्यरूप.
अमूर्तिः - निराकार.
अनघः - निष्पाप.
अचिन्त्य: - चिंतनाने आकलन न होणारा.
भयकृत् - दुष्टांना भयभीत करणारा.
भयनाशनः - वर्णाश्रम पाळणाऱ्यांचे भय नाहीसे करणारा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


7 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २३


_श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग_

११. वैषयिक-वासनानाशाकरिता मंत्र


भूतावासो वासुदेवः सर्वासुनिलयोऽनलः ।

दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथापराजितः ॥८९॥

भूतावासः - भूतमात्रांचे मुख्य निवास-स्थान.
वासुदेवः - आपल्या मायेने जगाला आच्छादणारा देव.
सर्वासुनिलय: - सर्व प्राणांचा जीवरूप आधार 
अनलः - अपार शक्ती आणि संपत्तीने युक्त.
दर्पहा - अधर्मी लोकांचा अहंकार नष्ट करणारा. 
दर्पदः - धार्मिकांना गौरव देणारा.
दृप्तः - नित्य आनंदात मग्न असलेला.
दुर्धरः - हृदयामध्ये धारण करण्यास कठीण.
अपराजितः - अंतर्बाह्य-शत्रूंकडून पराजित होत नाही, असा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919)

6 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २२

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

१०. सर्वप्रकारचे कल्याण होण्याकरिता मंत्र

अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः ।
श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतांवरः ॥७७॥

अनिवर्ती - रणभूमीतून मागे न हटणारा.
निवृत्तात्मा - विषयांपासून स्वभावतः दूर राहणारा.
संक्षेप्ता - प्रलयकाळी सृष्टीला सूक्ष्म करणारा.
क्षेमकृत् - प्राप्त पदार्थाचे रक्षण करणारा.
शिवः - नामस्मरणानेही पवित्र करणारा.
श्रीवत्सवक्षाः - वक्षावरती श्रीवत्स चिन्ह धारण करणारा.
श्रीवासः - ज्याच्या हृदयात लक्ष्मीचे निवासस्थान आहे, असा.
श्रीपतिः - लक्ष्मीचा पती.
श्रीमतांवरः - वेदरूप ऐश्वर्याने युक्त अशा ब्रह्मादी देवांच्यापेक्षा श्रेष्ठ.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


5 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २१

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

९. प्रतिकूल काळात रक्षण होण्याकरिता मंत्र
ऋतुः सुदर्शन: कालः परमेष्ठी परिग्रहः ।
उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः॥५८॥

ऋतुः - काळरूप.
सुदर्शन: - ज्याचे दर्शन मोक्ष देणारे आहे, असा.
कालः - सर्वांची गणना करणारा.
परमेष्ठी - आपल्या सर्वोत्तम महिम्यात राहणारा.
परिग्रहः - शरणार्थी ज्याला सर्वत्र पाहतात, असा.
उग्रः - सूर्य आदी ज्याचे भय बाळगतात, असा.
संवत्सरः - सर्व भूतमात्रांचे निवासस्थान.
दक्ष: - सर्व कार्ये तत्परतेने करणारा.
विश्राम: - मुमुक्षूंना विश्रांती देणारा.
विश्वदक्षिणः - सर्वांत दक्ष.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


4 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २०

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

८. विवाहयोग जुळून येण्याकरिता मंत्र

कामदेवः कामपालः कामी कान्त: कृतागमः ।
अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनंजयः ॥८३॥

कामदेवः - चार पुरुषार्थांची इच्छा करणाऱ्या मनुष्यांनी इच्छिलेला देव.
कामपाल: - सकाम भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा.
कामी - पूर्णकाम.
कान्तः सुंदर शरीर धारण केलेला.
कृतागमः - सर्व वेदशास्त्रांची रचना करणारा
अनिर्देश्यवपुः - ज्याच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करता येत नाही, असा.
विष्णु: - ज्याची कांती पृथ्वी आणि आकाश यांना व्यापून आहे, असा.
वीरः - गतिमान.
अनन्तः - ज्याला अन्त नाही, असा.
धनंजयः - अर्जुनरूप. 

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919)

3 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १९

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
७. स्मरणशक्ती वाढण्याकरिता मंत्र
महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः ।
अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ॥३२॥
महाबुद्धि: - महान बुद्धिमान
महावीर्यः - माया हे ज्याचे महान वीर्य आहे, असा
महाशक्ति: - महान सामर्थ्यवान
महाद्युतिः - अंतर्बाह्य अत्यंत कान्तिमान
अनिर्देश्यवपुः - ज्याच्या शरीराविषयी सांगणे शक्य नाही, असा
श्रीमान् - समग्र ऐश्वर्यशाली
अमेयात्मा - ज्याच्या बुद्धीचे मोजमाप केले जात नाही, असा
महाद्रिधृक् - मंदर आणि गोवर्धन या महान पर्वतांना धारण करणारा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919)

2 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १८

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
२. मानसिक विकार दूर होण्याकरिता मंत्र
वेद्यो वैद्य: सदायोगी वीरहा माधवो मधु: ।
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल: ॥३१॥
वेद्य: - कल्याणाची इच्छा असणा-यांकडून जाणण्यास योग्य.
वैद्य: - सर्व विद्या जाणणारा.
सदायोगी - नेहमी प्रत्यक्ष असणारा.
वीरहा - राक्षसांना मारणारा.
माधव: - विद्यापती.
मधु: - मधाप्रमाणे प्रसन्नता उत्पन्न करणारा.
अतीन्द्रिय:- इंद्रियातीत.
महामाय: - मायावींच्या वर आपल्या मायेचे वर्चस्व ठेवणारा.
महोत्साह: - परम उत्साही.
महाबल: - अत्यंत बलशाली.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

1 Jun 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १७

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

५. व्यवसायवृद्धी व नोकरीत बढती होण्याकरिता मंत्र

व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः ।
परर्द्धि: परमस्पष्टस्तुष्ट: पुष्टः शुभेक्षणः ॥

व्यवसाय: - ज्ञानमात्रस्वरूप
व्यवस्थानः - सर्व विश्वाची व्यवस्था करणारा
संस्थानः - प्रलयकाळी प्राणिमात्रांचे स्थान असलेला
स्थानदः - प्रत्येकाला कर्माप्रमाणे स्थान देणारा
ध्रुवः - अविनाशी
परर्द्धि - श्रेष्ठ विभूतिस्वरूपी
परमस्पष्टः - श्रेष्ठ वैभव व ज्ञान असलेला
तुष्टः - एकमात्र परमानन्दस्वरूप
पुष्ट: - सर्वत्र परिपूर्ण
शुभेक्षणः - दर्शनाने कल्याण करणारा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )