31 Dec 2016

त्रैलोक्याचा राजा नरहरि तो माझा

आज पौष शुद्ध द्वितीया, कलियुगातील द्वितीय श्रीदत्तावतार, भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती !!
भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराजांनी, कुरवपूरच्या कृष्णानदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच पुढच्या जन्मी अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंनी श्री नरहरी रूपाने तिच्या पोटी, शके १३०० अर्थात् इ.स. १३७८ मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते.  नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले. तेथून मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. तेथून कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले. तेथे एक चातुर्मास्य राहिले. तेथे त्यांच्या स्मरणार्थ पुढे 'विमल पादुका' स्थापन करण्यात आलेल्या आहेत. औदुंबरहून पुढे ते नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले. तेथे श्रींनी आपल्या 'मनोहर पादुका' व अन्नपूर्णामातेची स्थापन केली व मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात  'निर्गुण पादुका' स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. श्रींचा जो अपार्थिव, दिव्य-पावन श्रीविग्रह अशाप्रकारे स्थूलरूप धारण करून कार्यरत होता, तोच आजही गुप्तरूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहे व पुढेही करीत राहीलच.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्याकाळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली. लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला. ते स्वत: अत्यंत कडक आचरण करीत असले तरी, त्यांनी कृपा करण्यात भक्तांचा जात-धर्म कधीच पाहिला नाही. जसे चारही वेदांचे ज्ञानी ब्राह्मण, श्रेष्ठ संन्यासी त्यांचे शिष्य होते, तसेच भक्तराज तंतुक, पर्वतेश्वर शूद्र व बिदरचा मुसलमान बादशहा असे अन्य जाती-धर्मातील हजारो भक्तही त्यांच्या कृपेने धन्य झालेले होते. ते अकारणकृपाळू व परमदयाळूच आहेत. जगाच्या कल्याणासाठी आलेल्या अवतारांना, संतांना जात-धर्म यांच्या चौकटीत बसवणे हा वेडगळपणाच नव्हे काय?
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तृगामी व स्मरणमात्रे संतुष्ट होणारे परमदयाळू व भक्तवत्सल आहेत. प्रेमभराने व निर्मळ अंत:करणाने त्यांना घातलेली साद त्यांच्यापर्यंत पोचतेच पोचते, असा लाखो भक्तांचा आजवरचा रोकडा अनुभव आहे. श्रीदत्तसंप्रदायातील थोर विभूतिमत्व  प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्याकडून ऐकलेले आहे की, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अत्यंत ऋजू अंत:करणाचे परमशांत असे अवतार आहेत. त्यांच्या दयाकृपेला ना अंत ना सीमा. त्यांच्या भक्तवात्सल्य ब्रीदाचे यथार्थ वर्णन करताना श्री गुरुभक्तही हेच म्हणतात,
अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।
संकटिं भक्ता रक्षी नानापरी ।
रुतूं देईना पायी कांटा रे ॥
शरणांगता जना पाठिसी घालुनी ।
कळिकाळासी मारी सोटा रे ॥
अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे. तेथे ते निरंतर राहून भक्तकल्याण करीत असतात. त्यांचेच प्रत्यक्ष अधिष्ठान आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही आहे. " वाडी-गाणगापूर प्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू ", असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वत: प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना दिला होता. त्यांच्या त्या अमृतशब्दांची आजही सतत प्रचिती येत असते.
प.प.श्री.नारायणस्वामी महाराजांचे शिष्योत्तम, वाडीतील ढोबळे पुजारी उपनावाचे व श्री गुरुभक्त ही नाममुद्रा धारण करणारे थोर भक्तवर, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांविषयीचा अापला दृढ प्रेमभाव व्यक्त करताना म्हणतात,
त्रैलोक्याचा राजा ।
नरहरि तो माझा तो माझा ॥ध्रु.॥
नांदे अमरापूर ग्रामीं ।
कृष्णातीरीं यतिवरस्वामी ॥१॥
नृसिंहसरस्वती करुणामूर्ति ।
त्रिभुवनिं गाती ज्याची कीर्ति ॥२॥
श्रीधरविभु निजकैवारी ।
भावें भजतां भवभय वारी ॥३॥

या अखिल ब्रह्मांडांचे नायक असणा-या, भक्तांचे भवभय वारण करणा-या, कृष्णातीरी नित्य नांदणा-या, त्रिभुवनात ज्यांच्या कीर्तीचा डंका सदैव वाजत असतो, त्या परमदयाळू परमकनवाळू महाराजाधिराज श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं, आज जयंतीदिनी प्रेमभराने साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचेच परमपावन नाम घेत त्यांना कृपाप्रसादाची प्रार्थना करूया !!
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

26 Dec 2016

गुरुवरा ओवाळू आरती

आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे कनिष्ठ बंधू व शिष्योत्तम, साक्षात् ब्रह्मदेवांचे अवतार सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांची समाधी तिथी. श्रीसंत तुकोबारायांच्या चौदा टाळक-यांपैकी त्यांचे एक शिष्य श्री संताजी महाराज जगनाडे-तेली यांचीही आज पुण्यतिथी. श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्व महान शक्तिपाताचार्य योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांची आज जयंती. आजची तिथी मोठी पुण्यपावनच आहे !
सद्गुरु श्री सोपानदेव महाराज हे श्री माउलींचे धाकटे बंधू व शिष्य. त्यांचा जन्म इ.स. १२७७ मध्ये कार्तिक पौर्णिमेला आळंदीत झाला. त्यांनी देखील गीतेवर 'सोपानदेवी' या नावाची टीका रचलेली आहे. त्यांचे काही अभंगही उपलब्ध आहेत. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांचे स्वभाववैशिष्ट्य श्री नामदेवराय सांगतात, "न ये पां एकांत सोपानाचा ॥" सगळ्यांमध्ये राहूनही आंतरिक एकांत साधणे व त्या स्थितीत सदैव राहणे हे श्री सोपानदेवांचे वैशिष्ट्य होते.
आजच्याच तिथीला त्यांनी सासवड येथे क-हामाईच्या काठी सोमेश्वरांच्या मंदिरालगत समाधी घेतली. त्यांच्या समाधिवर्णनाच्या अभंगांमध्ये श्री नामदेवराय म्हणतात, " निशिदिनी कीर्तन केले द्वादशी । वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष ॥३॥ भोगावती केले अवघ्यांनी स्नान । चालिले सोपान समाधीसी ॥ना.गा.११३२.४॥" श्री सोपानदेवांच्या स्नानासाठी प्रत्यक्ष श्रीपांडुरंगांनी सर्व तीर्थांना आवाहन केले. त्यावेळी त्रैलोक्यातील यच्चयावत् सर्व तीर्थे क-हेच्या काठावरील एका कुंडात प्रकटली व त्या पावन जलाने सोपानदेवांना स्वत: भगवंतांनी स्नान घातले. ते कुंड आजही सासवड येथे मंदिरासमोरच पाहायला मिळते. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांच्या चरणीं साष्टांग दंडवत.
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या थोर शिष्यांपैकी एक, देहूनजीकच्या सुदुंब्रे येथील तेली समाजातील श्री संताजी महाराज जगनाडे यांचीही आज पुण्यतिथी असते. संताजी महाराजांनी स्वहस्ते लिहिलेला श्री तुकोबारायांचा गाथा आजही पाहायला मिळतो. श्री तुकाराम महाराजांच्या चौदा निष्ठावंत टाळकरी मंडळींमध्ये संताजी महाराजही होते. त्यांच्याही श्रीचरणीं सादर दंडवत.
श्रीदत्त संप्रदायातील महान विभूतिमत्व, प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच अपरस्वरूप योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांची आज १३० वी जयंती. आजच्याच तिथीला, २३ डिसेंबर १८८६ रोजी, कोल्हापूर संस्थानातील राधानगरी तालुक्यातील कुडुत्री या छोट्याशा खेड्यात रात्री ८.१९ मिनिटांनी वे. शा. सं. दत्तंभट व सौ. उमाबाई या सात्त्विक दांपत्याच्या पोटी श्रीमहाराजांचा जन्म झाला. गुळवणी घराणे हे श्रीनृसिंहवाडीच्या प.प.श्री.नारायणस्वामींचे कृपांकित होते व त्यांच्याच कृपेने हा वंश चालला होता.
श्रीमहाराजांची राहणी अतिशय साधी होती. स्वच्छता, टापटीप व वक्तशीरपणा हे त्यांचे अंगभूत सद्गुण होते. त्यांनी आजन्म शास्त्र मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले. अपरंपार करुणा, ऋजुता, विनम्रता, प्रेमळपणा, प्रसिध्दिपराङ्मुखता, कमालीचे अमानित्व, कोणत्याही प्रसंगी न ढळणारी अद्भुत शांती, नैष्ठिक ब्रह्मचर्य, निस्पृहता, श्रीगुरुचरणीं अात्यंतिक निष्ठा, विलक्षण योगसामर्थ्य, महायोग-शक्तिपात शास्त्रातील अलौकिक अधिकार इत्यादी शेकडो दैवी सद्गुणांचे ते साक्षात् भांडारच होते ! श्रीमहाराजांनी कधी प्रवचने केली नाहीत की पुस्तके लिहिली नाहीत. पण त्यांनी जगभरातील हजारो साधकांना आपल्या विलक्षण कृपेने परमार्थ मार्गावर अग्रेसर केले.
श्री गुळवणी महाराजांच्या चरित्रलीला वाचताना, त्यात जाणवणारे त्यांचे सर्वच दैवी सद्गुण आपल्याला आश्चर्यचकित करतात. पण त्यांची करुणा व ऋजुता हे विशेषत्वाने जाणवतात. श्री महाराज म्हणजे अमानित्वाचे व अदंभित्वाचे मूर्तिमंत स्वरूप होते. साक्षात् श्रीदत्तप्रभूच असूनही त्यांनी कधीही चुकूनसुद्धा कोणाला त्याची कल्पना येऊ दिली नाही. कायम आपले माहात्म्य झाकूनच ठेवले. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज त्यांना प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू म्हणूनच वंदन करीत असत.
श्री महाराज भक्तवत्सल होते. आपल्या भक्तांचा अपार कळवळा होता त्यांना. २६ डिसेंबर १९६९ ते २६ एप्रिल १९७० या चार महिन्यांच्या काळात त्यांनी एक पुरश्चरण केले होते. त्याकाळात ते कोणालाही भेटणार नाहीत, अशी सूचना लावलेली होती आश्रमात. त्यांच्या एका भक्तांनी त्यांना प्रेमळपणे विनवले की, " या काळात तुम्हांला कोणीच भेटणार नाही का?" त्यावर महाराज म्हणाले, " दोन जण भेटतील, जेवणाचे ताट सरकवायला येतील तेव्हा." त्यावर ते भक्त म्हणाले, " मग आम्हीच काय पाप केले आहे? तुम्हांला बघायला काय हरकत आहे? तुम्ही ठरावीक वेळी तुमच्या सवडीने खाली येऊन देवघरात बसत जा. ग्रीलच्या बाहेरून आम्ही दर्शन घेऊन जात जाऊ." श्री महाराजांनी त्यांचे म्हणणे लगेच मान्य केले. त्याकाळात ते रोज सकाळी साडेनऊ ते दहा या वेळात खाली येऊन बसत व भक्त त्यांचे दर्शन घेऊन जात. " ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभावीण प्रीती ॥" हे श्री गुळवणी महाराजांचे यथार्थ स्वरूपवर्णनच आहे.
आजच्या या पावन दिनी योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत प्रणाम !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481*
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन

आज मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, पावसच्या स्वामी स्वरूपानंद महाराजांची जयंती !!
श्री.रामचंद्र विष्णू गोडबोले तथा स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी, दि. १५ डिसेंबर १९०३ रोजी पावस येथे झाला. स्वामी स्वरूपानंद हे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील सत्पुरुष, पुणे येथील श्री गणेशनाथ तथा बाबामहाराज वैद्य यांचे अनुगृहीत होते. त्यांच्यावर राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचीही कृपा होती. त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी या भगवान श्रीमाउलींच्या ग्रंथांचा सुलभ अभंगानुवाद केलेला असून, त्यांचे ते सर्व ग्रंथ खूप लोकप्रिय देखील आहेत. त्यांच्या अत्यंत मार्मिक व सुरेख अशा अभंगरचना 'संजीवनी गाथा' नावाने प्रसिद्ध झालेल्या आहेत. तरुणपणी पुण्यात विद्याभ्यास करीत असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हिरीरीने भाग घेतलेला होता. परंतु भगवंतांच्याच प्रेरणेने पुढे ते सर्व सोडून रत्नागिरी जवळ पावस येथे येऊन राहिले. येथेच त्यांचे सलग चाळीस वर्षे वास्तव्य होते. पावस सोडून ते कधीच बाहेर गेले नाहीत. आता तेथेच त्यांचे भव्य समाधी मंदिर बांधलेले आहे.
प. पू. गोविंदकाका उपळेकर महाराजांचा त्यांच्याशी अपार स्नेह होता. प. पू. गोविंदकाकांनी त्यांच्या 'हरिपाठ सांगाती' ग्रंथात स्वामींनी संकलित केलेल्या 'ज्ञानेश्वरी नित्यपाठ' या रचनेचा अंतर्भाव केलेला आहे. स्वामींच्या "उदारा जगदाधारा ... " या वरप्रार्थनेला स्वत: प.पू.काकांनी फार सुंदर चाल लावून काही भक्तांना शिकवली होती. पावसला म्हणतात त्यापेक्षा ही चाल वेगळी व अधिक भावपूर्ण आहे. स्वामी स्वरूपानंदांचे शिष्योत्तम स्वामी सत्यदेवानंद सरस्वती व स्वामी अमलानंद नेहमी फलटणला प. पू. श्री.काकांच्या दर्शनाला येत असत. प. पू. काका व स्वामी स्वरूपानंद हे दोघेही एकरूपच आहेत, असा दृष्टांत स्वामींच्या एका दिवेकर नावाच्या शिष्यांना झाला होता. ते दिवेकर पतीपत्नी फलटणलाही नेहमी दर्शनाला येत असत. प. पू. काका व स्वामी स्वरूपानंद आपल्या भक्तांना परस्परांच्या दर्शनाला मुद्दाम पाठवत असत. अशा अनेक भक्तांच्या विलक्षण हकिकती पू.काकांच्या आठवणींच्या संग्रहामध्ये नोंदवलेल्या आहेत. या दोघांचेही आराध्य एकच, भगवान श्री ज्ञानेश्वर माउली;  त्यामुळेही परस्परांची मैत्री अगदी दाट होती.
स्वामी स्वरूपानंदांच्या रचना खूप सुंदर आहेत. त्यांच्या सर्व अभंगांमधून त्यांचे उत्कट सद्गुरुप्रेम प्रकर्षाने जाणवते. " स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन ।सद्गुरुचरण उपासितां ॥" असा आपला रोकडा स्वानुभव ते मांडतात. आपल्या नाथ सांप्रदायिक साधनेचे माहात्म्य सांगताना ते म्हणतात, "स्वामी म्हणे माझा नाथसंप्रदाय । अवघे हरिमय योगबळे ॥" त्यांची 'संजीवनी गाथा' साधकांसाठी खरेखरी 'संजीवनी'च आहे !
श्रीस्वामींनी श्रावण कृष्ण द्वादशीला, दिनांक १५ ऑगस्ट १९७४ रोजी पावस येथे देह ठेवला. त्या घटनेची माहिती प. पू. काकांनी फलटणला बसून सांगितली होती. दर्शनाला आलेल्या ती.अंबुताई फणसे यांनी पू.काकांना एक शाल घातली. त्याबरोबर पू.काका उद्गारले, " अगं, आत्ताच एका काळ्या पुरुषाने आम्हांला अशीच शाल पांघरली. " पू.काकांच्या गूढ बोलण्यातले संदर्भ कधीच पटकन् कळत नसत. ती.अंबुताईंना संध्याकाळी पुण्याला परत आल्यावर कळले की, जेव्हा हा प्रसंग फलटणला घडला, त्याच्या थोडा वेळ आधीच पावसला स्वामींनी देह ठेवला होता. पू.काका व स्वामी स्वरूपानंद या दोन्ही संतांची अंतरंगातील एकरूपताच या प्रसंगाने दृग्गोचर होते.
स्वामी स्वरूपानंदांचे व योगिराज सद्गुरु श्री गुळवणी महाराज व प.पू.मामासाहेब देशपांडे महाराजांचेही स्नेहबंध होते. पू.मामांची व त्यांची नेहमी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर चर्चा चालत असे. कारण दोघेही रंगलेले ज्ञानेश्वरीप्रेमी व उत्तम सखोल अभ्यासकही होतेच. त्यांच्या ओव्यांवरील परस्पर चर्चा किती विलक्षण होत असतील, याची कल्पना करता येत नाही.
आज स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या ११३ व्या जयंतीदिनी, त्यांच्या अम्लान श्रीचरणीं सादर दंडवत  !!
( फोटो  :  स्वामी स्वरूपानंद समाधी, पावस)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

23 Dec 2016

हाचि सुबोध गुरूंचा

आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी, साक्षात् श्रीमारुतीरायांचे अवतार, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची१०३ वी पुण्यतिथी  !!
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला ।
जयाने सदा वास नामात केला ।
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ।।
असे ज्यांचे सार्थ वर्णन केले जाते, त्या प्रत्यक्ष नामावतार श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अवघे चरित्र अलौकिक आणि बोधप्रद आहे.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपापरंपरेतील येहेळगांवच्या सद्गुरु श्री तुकामाई यांनी श्री गोंदवलेकर महाराजांना कृपानुग्रह करून सनाथ केले. श्रीमहाराजांच्या ठायी श्री माउलींचा नाथसंप्रदाय व श्री समर्थांचा रामदासी संप्रदाय यांचा सुरेख समन्वय झालेला होता.
पूर्वी महाराजांनी बालवयातच गुरुशोधार्थ संपूर्ण भारत देश पालथा घातला होता. त्या भ्रमंतीमध्ये त्यांना राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे दर्शन व सान्निध्य लाभले. श्री स्वामींनी देखील या लहानग्या गणूला अतीव ममतेने स्वत:च्या मांडीवर बसवून त्याचे लाड केले. दोन दिवस स्वत:बरोबर ठेवून घेतले व नंतर आशीर्वाद देऊन रवानगी केली. त्यानंतर महाराजांना त्याकाळातील, श्री रामकृष्ण परमहंस, श्री त्रैलंगस्वामी, श्री माणिकप्रभू, श्री देव मामलेदार इत्यादी अनेक थोर संतांची दर्शने झाली. नंतर श्रीतुकामाईंची भेट होऊन, अत्यंत खडतर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पूर्णकृपा लाभली. लहानग्या गणुबुवांचे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज झाले.
महाराजांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथेच असे. पण रामनामाच्या प्रसारासाठी त्यांचा संचार सर्व भारतभर होई. त्यांनी आपल्या हयातीत हजारो लोकांना नाम देऊन सन्मार्गाला लावले. समाधी पश्चात् आजही त्यांच्या कृपेचे अनुभव अक्षरश: लाखो लोक घेत आहेत.
त्यांचे चरित्र परमार्थ साधकांसाठी विशेष बोधप्रद आहे. " भक्ताची रामरायाच्या चरणीं अनन्य निष्ठा कशी असायला हवी?" त्याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे श्री महाराज. 'रामच कर्ता' या भावनेच्या बळावर अचाट कार्य करून दाखवण्यातली अलौकिक निस्पृहता म्हणजे श्री महाराज. गुरुचरणीं अनन्य शरणागती म्हणजे श्री महाराज. नि:शंक निर्भय निरहंकार साधुजीवन म्हणजे श्री महाराज. त्यांच्या दिव्य चरित्रलीला वाचताना, प्रेमाचे भरते येऊन कधी नेत्र पाझरू लागतात हे आपल्याला समजतच नाही. खरोखरीच फार विलक्षण विभूतिमत्व होते ते  !!
प.पू.श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांचे परमगुरु, पलूसचे श्री धोंडीबुवा महाराज यांचा व श्री गोंदवलेकर महाराजांचा स्नेह होता. प.पू.काकांनाही श्री महाराजांविषयी अतीव प्रेमादर होता. प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या घरी श्री महाराज येत असत. पू.मामांचे आई-वडील, पू.दत्तोपंत व पू.पार्वतीदेवी यांना श्री महाराजांबद्दल अतीव प्रेमादर होता. महाराजही त्यांना फार मानत असत. पू.दत्तोपंत व श्री महाराज समोर आल्यावर परस्परांना दंडवत घालून दृढ प्रेमालिंगन देत आणि मगच त्याची चर्चा सुरू होई. श्री महाराज एकदा त्यांना म्हणाले होते, " कृपायोगाचे साधनच सर्वश्रेष्ठ आहे. ज्यांना ते देणारे सामर्थ्यवान सद्गुरु लाभले ते धन्य होत. मलाही श्री तुकामाईंकडून हेच साधन मिळाले. पण हे सर्वांनाच देता येत नाही, म्हणून मी त्यांच्याच आदेशानुसार सर्वांना नाम घ्यायला सांगतो ! "
श्रीमहाराजांची प्रवचनेही अत्यंत सोपी व काळजाला हात घालणारी आहेत. रामनामाची व हरिभक्तीची महती त्यांनी फारच सोप्या आणि चटकन् हृदयाला भिडेल अशा समर्पक भाषेत, अधिकारवाणीने सांगितलेली आहे. त्या प्रवचनांचे दररोज नियमितपणे वाचन करून आपला परमार्थ सुकर करणारे लक्षावधी भक्त जगभर आहेत.
आज त्यांच्या १०३ व्या पुण्यदिनी त्यांच्या चरणीं सादर वंदन करूया; व त्यांनी सर्वात शेवटी केलेला बोध, त्यांचा शेवटचा अभंग वाचून, त्यावर चिंतन-मनन करून, त्यांच्या कृपासावलीत आपणही आपला परमार्थमार्ग आनंदाने आक्रमूया !
भजनाचा शेवट आला ।
एक वेळ राम बोला ॥१॥
आज पुण्य पर्वकाळ ।
पुन्हा नाही ऐसी वेळ ॥२॥
राम नाम वाचे बोला ।
आत्मसुखा माजी डोला ॥३॥
दीन दास सांगे निका ।
रामनाम स्वामी शिक्का ॥४॥
" श्रीसद्गुरु मुखातून आलेले व परंपरेने लाभलेले 'दिव्यनाम' हेच जणू 'स्वामी शिक्का' आहे. हा शिक्का ज्याच्या चित्तावर श्रीगुरु उमटवतील, त्याचाच परमार्थात सहज प्रवेश होतो. ही नामरूपी निकी म्हणजेच श्रेष्ठ, शुद्ध कृपा-मोहोर लाभल्यावर मगच साधक ख-या अर्थाने पुनीत होतो. त्या कृपाप्रसादामुळे व आपल्या श्रीगुरूंचा 'दीनदास' बनून  झालेल्या त्या दास्ययुक्त साधनेने मग त्याला आत्मसुखात अखंड डोलण्याचे सौभाग्य लाभते ! त्याचे अवघे जीवनच एक अद्भुत पुण्य पर्वकाळ बनून जाते. त्याच्या पावन संगतीने मग जगाचाही उद्धार होतो. " श्री महाराजांच्या या अंतिम बोधामृतातून जणू त्यांचे आत्मचरित्रच प्रकट झालेले आहे !
या लेखासोबत आज श्री महाराजांच्या प्रतिमेऐवजी त्यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश देत आहे. आपली साधना लवकर पूर्णत्वाला जावी, असे ज्याला मनापासून वाटते, त्या प्रत्येक साधकाने श्री महाराजांचा हा बोध मनाच्या गाभा-या सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा व वारंवार आठवावा इतका महत्त्वपूर्ण आहे. साधकाचे अवघे विश्वच अमृतमय करणारे हे बोधवचन, श्री महाराजांचे हृद्गतच आहे जणू !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

10 Dec 2016

गीता जाणा वाङ्मयी श्रीमूर्ति प्रभूची

मोक्षदा एकादशी !!
आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, आजच्याच पावन तिथीला भगवान श्रीकृष्णांनी भक्तराज अर्जुनाच्या मनात आपणच निर्माण केलेला मोह नष्ट करण्यासाठी श्रीगीतेचा थोडक्यात उपदेश केला. तोच उपदेश पुढे श्री व्यास महर्षींनी महाभारतात सातशे श्लोकांमध्ये ग्रथित करून आपल्याला उपलब्ध करून दिला. पुढे जेव्हा तोही लोकांना समजेनासा झाला, तेव्हा मग भगवान श्रीकृष्णप्रभूंनीच सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या रूपाने अवतरून श्रीगीतेवर ज्ञानेश्वरी हे अद्भुत भाष्य रचले.
श्रीगीता हे साक्षात् भगवान श्रीहरींच्याच मुखातून निर्माण झालेले अजरामर अमृत आहे. वेदही श्रीभगवंतांचीच वाणी आहे, पण ती योगनिद्रेतली वाणी आहे. म्हणूनच वेदांना निश्वसित म्हणतात. ते श्रीभगवंतांचे घोरणे आहे. पण श्रीगीता तशी नाही. शिष्याच्या अपार कळवळ्याने श्रीभगवंतांनी उदार होऊन स्वमुखाने जागेपणी केलेला हा श्रेष्ठ उपदेश आहे ! म्हणूनच श्री माउली गीतेला वेदांहूनही श्रेष्ठ म्हणतात.
श्रीगीतेचे दुसरे प्रधान वैशिष्ट्य म्हणजे, वेदांप्रमाणे ही अनाकलनीय नाही. वेद समजणे महाअवघड. शिवाय त्याचा सर्वांना अधिकारही नाही. पण श्रीगीतेला तसे काहीच नियम नाहीत. येथे यच्चयावत् सर्वांना समान अधिकार आहे.
श्री माउली एका अप्रतिम ओवीत, श्रीमद् भगवद् गीतेचे हे श्रेष्ठत्व सांगताना म्हणतात,
गीता माउलिये कीं नसे ।
जाणें तान्हें ॥ ज्ञाने.१८.७०.१५२८॥

श्रीभगवंतांच्या वाङ्मयी श्रीमूर्तीला, भगवद् गीतेला श्री ज्ञानेश्वर महाराज 'माउली' म्हणतात आणि तिचे वैशिष्ट्य सांगतात की, तिला कसलाही आपपरभाव नाही. जाणते लेकरू व नेणते लेकरू असा भेद न करता ती सर्वांवरच समान कृपा करते. म्हणून वेदांचेही बीज असणा-या, मोहरूपी महिषाला मारणा-या, सातशे श्लोकांद्वारे प्रकटलेल्या, मंत्रप्रतिपाद्य भगवती श्रीगीतेचीच मनाने, शरीराने व वाणीने निरंतर सेवा व सेवन करून स्वानंदसाम्राज्याचे धनी व्हावे, असा श्री माउली आपल्या सर्वांना प्रेमाचा उपदेश करीत आहेत. श्रीसद्गुरुकृपेने या श्रीगीतामाउलीचे प्रेम आपल्या हृदयात निर्माण होणे, हीच आपल्यासाठी खरी 'गीताजयंती' आहे; आणि ती लवकरात लवकर साजरी व्हावी म्हणून आपण श्रीचरणीं कळवळून प्रार्थना करूया !
आज श्रीगीता जयंतीच्या पावन पर्वावर, जशी जमेल तशी व जेवढी जमेल तेवढी गीतासेवा नियमाने करण्याचा संकल्प करून, श्रीभगवंतांच्या या गीतारूप शब्दब्रह्मास सादर साष्टांग दंडवत घालून कृपायाचना करूया व त्याच गीताश्लोकांच्या गजरात श्रीचरणीं ही शब्दसुमनांजली समर्पूया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

7 Dec 2016

प्रसन्न कृपाछाया,'श्रीस्वामीतनया'

श्रीसद्गुरु परंपरा ही साक्षात् शक्तिरूपच असते. श्रीभगवंतांची आदिशक्ती भगवती देवात्मशक्तीच परंपरेच्या माध्यमातून श्रीगुरूंचा सगुण आविर्भाव धारण करून प्रकट होत असते व योग्य वेळ आलेल्या जीवांवर कृपा करून त्यांना साधनेत अग्रेसर करीत असते. म्हणूनच श्रीभगवंतांपासून सुरू झालेल्या श्रीगुरुपरंपरेतील सर्व महात्मे हे सच्चिदानंद स्वरूपच असतात. भगवान श्री माउली अशा महात्म्यांविषयी सांगतात,
तयाचे बिसाट शब्द ।
सुखें म्हणो येती वेद ।
सदेह सच्चिदानंद ।
कां नोहावे ते ॥
ज्ञाने.१८.७८.१६४६॥
अशा भगवत्स्वरूप झालेल्या महात्म्यांच्या मुखातून आलेले सहज शब्दही वेदतुल्य असतात. त्यांचा देह आपल्याला पांचभौतिक दिसत असला तरी, प्रत्यक्षात ते त्या देहानेही सच्चिदानंद स्वरूपच झालेले असतात. म्हणूनच या महात्म्यांनी केलेली ग्रंथरचना किंवा उपदेशिलेला बोध आणि त्यांचे अद्भुत चरित्रग्रंथ देखील त्यांच्याच प्रमाणे दिव्य असतात व ते श्रद्धावंत अभ्यासकाला व उपासकाला परब्रह्मस्वरूप करणारेही असतात !
आता या प्रस्तावनेचे कारण सांगतो. नाथ-दत्त-भागवत संप्रदायांचे अध्वर्यू, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातुःश्री व सद्गुरु,  स्वनामधन्य प.पू.पार्वतीदेवी देशपांडे या साक्षात् श्रीस्वामीतनयाच होत्या. आज त्यांचा अमृतमहोत्सवी पुण्यतिथी उत्सव आहे. राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या कृपा परंपरेतील अलौकिक अधिकारसंपन्न विभूतिमत्व म्हणजे पूजनीय पार्वतीदेवी ! त्यांचे चरित्र हा साधक सद्भक्तांना निरंतर मार्गदर्शन करणारा अजरामर, रत्नखचित बोध-ठेवाच आहे. श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या या लाडक्या तनयेचे दिव्यपावन चरित्र, प.पू.श्री.मामासाहेबांच्या तितक्याच अधिकारसंपन्न कन्येने; प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे यांनी लिहिलेले असावे, हा निव्वळ योगायोग मुळीच नाही ! श्रीवामनराज प्रकाशनाचे बावीसावे ग्रंथपुष्प असणाऱ्या *'श्रीस्वामीतनया'* या रसाळ चरित्राची आज सहावी आवृत्ती संपत आलेली आहे; यातच त्याच्या उपयोगितेचे व अपूर्वतेचे मर्म स्पष्ट होते.
या चरित्राच्या ठिकाणी त्रिवेणीसंगम झालेला आहे. श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या मांडीवर खेळलेल्या, त्यांचे अलौकिक कृपाछत्र लाभलेल्या श्रीस्वामीतनया पू.पार्वतीदेवींचे चरित्र, त्याच परंपरेतल्या, श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्याच परमकृपांकित पू.सौ.शकाताईंनी लिहावे आणि त्यातून पुन्हा श्रीस्वामीकृपेचीच त्रिभुवनपावनी गंगा खळाळून वाहावी; हा किती मनोहर योग आहे ना ! या दिव्य ग्रंथाच्या 'सच्चिदानंदमयते'चे अजून काय प्रमाण द्यावे?
या पुण्यप्रद चरित्रग्रंथाची माझी एक विशेष अनुभूती मुद्दामच येथे देत आहे. आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला, दिनांक ७ डिसेंबर रोजी, प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवींची पंच्चाहत्तरावी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या या चरित्रगायनाने मी श्रीस्वामीतनयेच्या श्रीचरणीं मनोभावे भावपुष्पांजली अर्पितो.
२००९ साली भाद्रपद महिन्यात श्रीक्षेत्र दत्तधामहून मी फलटणला चाललेलो होतो. बसच्या प्रवासात माझी एका कुलकर्णी नावाच्या सरकारी अधिकारी गृहस्थांशी ओळख झाली. ते कोयनानगरला काही कामानिमित्त आले होते. बोलता बोलता मी त्यांना श्रीक्षेत्र दत्तधाम ची माहिती सांगितली. ते स्वतः कोणा सत्पुरुषांचे अनुगृहीत असून साधना करणारे होते. म्हणून त्यांना आमच्या  स्थानाविषयी आपुलकी वाटली व त्यांनी दर्शनाला येण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे ते पुढच्याच आठवड्यात दर्शनाला आले देखील. त्यावेळी मी त्यांना 'श्रीस्वामीतनया' या ग्रंथाची एक प्रत भेट म्हणून दिली.
सुमारे महिन्याभरानंतर ते पुन्हा दर्शनाला आले. मी त्यावेळी सहजच 'श्रीस्वामीतनया' वाचलेत का ? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून मला खूप आश्चर्य आणि समाधानही वाटले. ते म्हणाले, "अहो काय सुंदर पुस्तक आहे ! ते वाचल्यापासून माझी, ' साधनेला वेळ मिळत नाही ' ही अडचणच पार गेली. आता माझी साधना नियमाने होते व त्यातून खूप आनंदही मिळतो !" संतांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये त्यांची कृपाशक्ती ओतप्रोत भरून राहिलेली असते; याचे सुरेख प्रत्यंतर वरील उत्तरातून जाणवते.
प.पू.मातु:श्री पार्वतीदेवींचे अवघे चरित्र हा स्वतंत्र स्वामी-लीलाविलासच आहे. त्यातून साधक म्हणून आपल्याला मिळणारी विशेष ऊर्जा कल्पनातीत आहे. संतांचे वर्तन हे आपल्याला असंख्य बाबींमध्ये अचूक मार्गदर्शन करणारे असते. म्हणूनच आपण नेहमी संतांची चरित्रे डोळसपणे अभ्यासली पाहिजेत. आणि या दृष्टीने, पू. पार्वतीदेवींचे चरित्र तर, कोणत्याही परिस्थितीतला भक्कम आधार म्हणून आयुष्यभर अगदी जवळ बाळगावे, इतके जबरदस्त आहे.
पू.पार्वतीदेवींचा जन्म अक्कलकोटातलाच, १८७५ सालचा. त्यावेळी साक्षात् परब्रह्मच राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने तेथे अलौकिक लीला करीत होते. पू. पार्वतीदेवींचे पिताश्री, पू. नारायणभट्ट सोनटक्के हे अक्कलकोट संस्थानात वाकनिस होते. ते श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त व पूर्ण कृपांकित महात्मेच होते. त्यांच्या पोटी पू. बाई तथा पू.पार्वतीदेवींचा जन्म झाला व त्यांना परमभाग्याने लीलावतार श्री स्वामी महाराजांच्या मांडीवर खेळण्याचे सौभाग्य लाभले. श्री स्वामी महाराजांनीच लहानग्या बाईला मांडीवर घेऊन, तिच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवून, स्वमुखाने सांगितले होते, " ही आमची पोर आहे ! " श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या या शब्दाची जिवंत प्रचिती 'श्रीस्वामीतनया' वाचताना आपल्याला वारंवार येते. खरोखरीच, पू.पार्वतीदेवी या परिपूर्ण श्रीस्वामीतनयाच होत्या !
श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेने अवघ्या सातव्या वर्षी पू.बाईंवर पू. नारायणभट्टांनी परंपरेच्या बीजमंत्रासहित शक्तिपातपूर्वक कृपानुग्रह केला. दीक्षा झाल्याक्षणीच पू.बाई प्रगाढ समाधीत गेल्या. त्यांचा जन्मजात अधिकारच तेवढा अद्भुत होता.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह नसरापुरच्या देशपांडे घराण्यातील पू.दत्तोपंतांशी झाला. पू.दत्तोपंत प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांचे पूर्णकृपांकित शिष्य होते. हा लक्ष्मी-नारायणाचा जोडा परमार्थाच्या दृष्टीनेही संपन्न होता. त्यांच्यासारखा अलौकिक संसार क्वचितच पाहायला मिळेल. त्याही दृष्टीने हे चरित्र अभ्यास करण्याजोगे आहे. पतीनिधनानंतर आलेल्या प्रारब्धाच्या गंभीर परीक्षेतही त्या पुरेपूर उतरल्या. एके दिवशी श्री स्वामी महाराज त्यांच्यासमोर प्रकटले व म्हणाले, " बये, तुला दुर्दैवाचे दशावतार माहीत आहेत का?" त्यावर त्या स्मितहास्य करून म्हणाल्या, " महाराज, आपले छत्र असताना दुर्दैव कसे बरे पाहायला मिळेल?" त्यावर पुन्हा श्री स्वामी महाराज म्हणाले, " तुला आता दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागणार आहेत, तयारीत राहा. " त्यावर आदराने त्यांनी विचारले, " त्या काळात आपण आणि माझे भगवंत माझ्यासोबत असणार ना?" श्री स्वामी महाराज प्रसन्नपणे उत्तरले, " बये, बाप कधी लेकीला सोडून जातो का? आम्ही कायमच तुझ्यासोबत आहोत, काळजी करू नकोस! " त्याक्षणी मोठ्या खंबीरपणे पू.पार्वतीदेवी उत्तरल्या, " महाराज, मग मी दुर्दैवाचे दशावतारच काय, शतावतारही आनंदाने सहन करीन! " आपल्या लेकीचा हा दृढविश्वास पाहून श्री स्वामी महाराजांना काय आनंद झाला असेल, याची कल्पनाही करवत नाही.
प.पू.मामांचे पिताश्री प.पू.श्री.दत्तोपंत देशपांडे १९२८ साली ६ मे रोजी श्रीदत्तचरणीं लीन झाले. त्यावेळेपासूनच दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. १८०० एकर जमिनीची मालकी असणा-या पू.दत्तोपंतांची इस्टेट त्यांच्या दत्तक गेलेल्या सख्या भावाने हडपली व पू.पार्वतीदेवींना नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर काढले. एरवी पायलीने मोती व दाग-दागिने मोजणा-या पू.पार्वतीबाई जेवढ्या निस्पृहपणे संपन्नता उपभोगत होत्या, तेवढ्याच शांतपणे त्यांनी दारिद्र्यही उपभोगले. चित्ताची केवढी समता हवी हे सहन करायला! श्रीस्वामीतनयेचे जीवन असे बावनकशी लखलखीत सोनेच आहे. पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्ये स्वामीमहाराजांनी पुन्हा अवतार धारण करण्यासाठी म्हणून पू.पार्वतीदेवींचीच पावन कूस निवडली, यात नवल ते काय?
पू.दत्तोपंतांच्या देहत्यागापासूनच प.पू.मातुःश्री पार्वतीदेवींनी झोपेचा पूर्ण त्याग केला होता. आयुष्यातली शेवटची बारा वर्षे त्या चुकूनही जमिनीला पाठ लावून झोपल्या नाहीत. रात्रभर त्या साधनेत असत किंवा दोन साधनांमधील वेळात फेऱ्या मारत माळ घेऊन जप करीत. पण त्यांनी जमिनीला पाठ म्हणून टेकवली नाही. त्यांचा परमार्थ केव्हाच पूर्णत्वाला गेलेला होता, तरीही त्यांनी आपली साधना कधीच सोडली नाही. साधना हेच त्यांचे कर्तव्य होते आणि तेच त्यांचे औषधही !
त्यांच्या चरित्रातील याच गुणवैशिष्ट्याचा उल्लेख करून त्या कुलकर्णींनी मला वरील उत्तर दिले होते. ते म्हणाले की, मातु:श्रींना इतक्या भयानक परिस्थितीतही एवढा वेळ साधनेला देता येत होता, मग मी कोणत्या तोंडाने म्हणू की मला साधनेला वेळच मिळत नाही? माझी तर परिस्थिती देवदयेने किती चांगली आहे. हे पुस्तक वाचल्यापासून माझी मलाच इतकी लाज वाटायला लागली की बस. आणि आपोआपच माझ्याकडून साधना न चुकवण्याचा निर्धार झाला व सद्गुरुकृपेने साधना निर्विघ्नपणे दररोज घडूही लागली. शिवाय साधनेचे प्रेमही एवढे वाढले की, आता ती साधनाच हळूहळू माझी प्राथमिकता होत आहे ! सतत श्रीगुरूंनी दिलेल्या साधनेत रममाण असणाऱ्या, साधनाच ज्यांचा ध्यास आहे, सर्वस्व आहे अशा पू.मातुःश्री पार्वतीदेवींच्या पावन चरित्राने कुलकर्णींवर केलेली ही अमोघ कृपाच नाही का? ब्रह्मस्वरूप झालेल्या संतांची चरित्रे देखील 'अक्षरब्रह्म' बनून साधकांना साधनेतही अग्रेसर करतात; त्या महात्म्यांप्रमाणेच 'आपणासारिखे करिती तात्काळ ।' असे दैवी सामर्थ्य बाळगून असतात, हेच त्रिवार सत्य आहे !
पू.पार्वतीदेवी या निष्णात ज्योतिषी व वैद्यही होत्या. त्यांनी आपल्या या दोन्ही दैवी विद्यांचा लोकांच्या भल्यासाठी भरपूर वापर केला. ज्योतिषाचा किंवा औषधांचा त्यांनी कधीच कसल्याही प्रकारचे मोबदला घेतला नाही. त्यांनी आपल्या परंपरेने आलेल्या दोन्ही विद्या देऊन पू.मामांनाही त्या शास्त्रांमध्ये निष्णात केले होते.
पू.पार्वतीदेवींच्या काळातील थोर थोर सत्पुरुष त्यांचा अधिकार जाणून त्यांच्याशी अतीव प्रेमादराने वागत असत. प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज, श्रीसंत गोंदवलेकर महाराज, श्रीसंत नारायण महाराज केडगांवकर, श्री शंकर महाराज यांसारख्या अनेक विभूतींचा व पू.पार्वतीदेवींचा दृढ स्नेहबंध होता. श्री शंकर महाराज तर आवर्जून पू.पार्वतीदेवींकडे येत, त्यांच्या हातचे अन्न खात व मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांच्याशी वागत.
प.पू.सौ.शकाताईंनी अतीव रसाळ भाषेत वर्णिलेली पू. मातुःश्री पार्वतीदेवींची ही चरित्रागाथा मनोहर आहे. त्या चरित्राला इतका सुंदर ओघ आहे की हातात घेतल्यावर पूर्ण वाचून झाल्याशिवाय कोणी खाली ठेवणारच नाही ! त्यातील शब्द न् शब्द आपल्या काळजाला हात घालतात. मातुःश्रींची उत्कट गुरुभक्ती, जगावेगळे गुरुप्रेम, कष्टी जनांविषयीचा अपरंपार कळवळा, साधनेची प्रगाढ निष्ठा, त्यांच्यातील कणखर आणि खंबीर पारमार्थिक महात्मा व तळमळीचा शिक्षक, त्यांचे स्वयंसिद्ध गुरुत्व आणि सर्वात महत्त्वाची अशी त्यांची परमशांती; असे त्यांचे असंख्य सद्गुण आपल्याला वेडावून टाकतात. भारावून जाणे म्हणजे काय? हे ज्याला सप्रेम अनुभवायचे असेल, त्याने हे चरित्र एकदातरी आवर्जून वाचावेच !
प.पू.मातुःश्री पार्वतीदेवी व प.पू.श्री.मामा या मायलेकांचे गूळपीठ तर अद्भुत आहे. त्यांच्यातला तो प्रेमबंध वाचताना, वाचत वाचत अनुभवताना, आपलेही हृदय प्रेमपडिभराने सुस्नात होते. काय सुरेख पद्धतीने त्यांनी प.पू.श्री. मामांना घडवलेले आहे; लाजवाब ! बालसंगोपनाच्या, शिष्यघडणीच्या विद्यापीठाचे अनभिषिक्त कुलगुरुपद भूषवावे ते मातुःश्री पार्वतीदेवींनीच ! पालकांना, शिक्षकांना चिरंतन मार्गदर्शन करण्याचे विलक्षण सामर्थ्य या ग्रंथात लीलया सामावलेले आहे !
मातुःश्री पार्वतीदेवींच्या चरित्राचे आणखी एक अद्वितीय वैशिष्ट्य सांगतो. मातुःश्री पार्वतीदेवी या प.पू.मामांच्या नुसत्या जन्मदात्रीच नव्हत्या, तर त्या त्यांच्या मोक्षगुरूही होत्या. आई ही पहिली गुरु असतेच. पण येथे ही पहिली गुरूच मोक्षगुरूही आहे. शिवाय त्यांनी अगदी शेवटपर्यंत आपले गुरुत्व सांभाळलेले आहे. श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या आज्ञेने त्यांनी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला, २६ नोव्हेंबर १९४१ रोजी पहाटे, पू.श्री.मामांवर शक्तिपातपूर्वक कृपानुग्रह केला. त्याच दिवशी; मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी (तारखेने २७ नोव्हेंबर) त्यांनी आपले शिष्य पू. मामांना समोर बसवून, 'भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेले महात्म्यांचे प्रयाण कसे असते ते पाहा', असे सांगून शांतपणे देहत्याग केला. किती अद्भुत महाप्रयाण आहे हे ! असा प्रसंग जगाच्या आजवरच्या इतिहासात एकमेवाद्वितीयच आहे ! शेवटच्या श्वासापर्यंत शिष्याला सप्रमाण, सोदाहरण बोध देण्याची ही घटना आजवर दुसरी न ऐकली न पाहिली व पुढेही कधी घडेल असे वाटत नाही.
आपल्या आचरणाने व अपूर्व आत्मप्रचितीने साक्षात् परिपूर्णब्रह्म राजाधिराज श्रीस्वामीसमर्थ महाराजांची कूस धन्य ठरविणाऱ्या, महासिध्दांनाही मार्गदर्शक ठरलेल्या सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी देशपांडे तथा श्रीस्वामीतनया यांच्या श्रीचरणीं अमृत महोत्सवी पुण्यतिथी निमित्त सादर वंदन. हे आई, आम्हांलाही आमची साधना 'सर्वस्व' वाटावी; अशी करुणाकृपा कराल ना आमच्यावर?
प.पू.मातु:श्री पार्वतीदेवी देशपांडे यांचे समग्र जीवनचरित्र व कार्य, पू. सौ. शकाताईंनी रचलेल्या त्यांच्या आरतीत फार सुंदर शब्दांत आलेले आहे. आज त्यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यतिथी दिनी, ती आरती गाऊन आपण राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या लाडक्या कन्येच्या, श्रीस्वामीतनया पू.पार्वतीदेवींच्या श्रीचरणीं सादर दंडवत करून धन्य होऊया  !!
आरती स्वामीतनयेची ।
सद्गुरु माय पार्वतीची ॥ध्रु.॥
स्वामी अंकी बैसविती।
'अमुची पोर' असे वदती ।
त्या तुज अन्य काय उपमा ।
आम्हां न कळे तव महिमा ॥१॥
धन्य तव आत्मतेज धीर ।
धन्य तप शांती ज्ञान थोर ।
घेई नवनीत करकमळी ।
प्रेमे अंकित वनमाळी ॥२॥
प्रकटले दत्तकृपाबीज ।
वोळले श्रीपादा सहज ।
ऐसे दिधले गुरुचरण ।
अंतरी शकुंतला लीन ॥३॥
(  'श्रीस्वामीतनया' ग्रंथ मूल्य ₹ ४०/-, सवलतीत मिळण्यासाठी  02024356919 या क्रमांकावर संपर्क करावा.)
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

27 Nov 2016

बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित

कार्तिक कृष्ण त्रयोदशी !!
जशी आम्हांला श्रावण कृष्ण अष्टमी सर्वात महत्त्वाची तिथी वाटते, तशीच कार्तिक कृष्ण त्रयोदशी देखील आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रावणात अष्टमीला पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंची, तसेच त्यांचे अभिन्न स्वरूप सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची जयंती असते. म्हणून तो आमच्यासाठी सर्वात मोठा सण आहे. कार्तिक कृष्णपक्षात श्रीमाउलींनी आळंदीतील आपल्या पुरातन स्थानीच पुन्हा संजीवन समाधी घेतली. म्हणूनच श्रीसंत गुलाबराव महाराज आळंदीला ' नित्यतीर्थ ' असे म्हणतात. हेच त्यांचे समाधीचे युगानुयुगांचे जुनाट स्थान आहे. येथूनच ते पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येतात व अवतार समाप्तीनंतर पुन्हा तेथेच परत जातात. आळंदी प्रमाणेच ' माउली ' हे पण ' नित्यतीर्थ ' आहेत, तेच सगुण साकार झालेले साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत !
परमकरुणार्णव श्री माउलींच्या कृपासाम्राज्यात अनेक संतरत्ने निर्माण झालेली आहेत. त्यांतील स्वतेजाने तळपणा-या काही थोर विभूतिमत्वांमध्ये, फलटणचे महान संत प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज व पुण्याचे योगिराज प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज; यांचे नाव अग्रक्रमावर आहे. या दोन्ही निस्सीम माउलीभक्तांचे चरित्र व कार्य श्री माउलींनाही समाधान देईल, इतके वैशिष्ट्यपूर्ण आहे. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे उत्तराधिकारी, प्राचार्य प. पू. श्री. शिरीषदादा कवडे हेही फार विलक्षण माउलीभक्त आहेत.
दरवेळी आपण ज्यांचा उत्सव असेल त्या सत्पुरुषांचे जीवन व कार्याचे थोडक्यात सेवा म्हणून मनन करतो. पण यावेळी नेहमीच्या पद्धतीऐवजी आपण प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या माउलींवरील नितांतसुंदर अभंगांच्या आधारे, संजीवन समाधिदिनी श्रीमाउलीचरणीं दंडवतपूर्वक पुष्पांजली समर्पूया !
आजवरचे सर्व संत श्रीमाउलींचे गुणगान गाण्यात, त्यांची सेवा-चाकरी करण्यात धन्यता मानत आलेले आहेत. तीच परंपरा पाळत प. पू. श्री. शिरीषदादा देखील भगवान माउलींच्या अलौकिक व अद्वितीय माहात्म्याचे सुरेख वर्णन करताना म्हणतात,
सागराची गाज शोभे तयापाशी ।
थेंबुटे आवेशी कोण काजा ॥१॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हांपुढे केवी ।
वाचाळी करावी लेकुराने ॥२॥
बोबड्या उत्तरे रिझे जरी तात ।
अज्ञानाची मात कवणासी ॥३॥
मी तो अज्ञ पोर, अंध पंगु मुके ।
उच्छिष्ट भातुके द्यावे माते ॥४॥
अमृतेसी काही ठावे नाही आन ।
मर्यादेचे मौन भले मानी ॥५॥
महासागराच्या किना-यावर उभे राहिलो असता, त्याची जी रौद्र-मोहक व विलक्षण गाज जाणवते, तिचा मन भरून आस्वादच घ्यायचा असतो. बारक्याशा थेंबुटाने कितीही आवेश आणला, तरी त्याला काही त्या गाजेचा आव आणता येणार नाही. अहो माउलीराया, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात, तुमच्यासमोर आम्ही सर्व त्या थेंबुटासारखेच आहोत. म्हणूनच, मायबापा ज्ञानेश्वरा ! तुमच्यापुढे आम्ही वाचाळी करावी तरी कोणत्या तोंडाने? आम्ही लेकुरवाचेने बोबडे बोलावे, हेच उत्तम. त्या बोबड्या बोलाने मायबाप रिझतात, कौतुकाने बाळाला कडेवर घेऊन लाड करतात; हे जरी खरे असले, तरी शेवटी अज्ञानाची गती आणखी ती काय असणार?
देवा, मी तर आपल्या घरचे अज्ञानी, अंध, पंगू व मुके पोर आहे. मला योग्य काय अयोग्य काय? याचे ज्ञान नाही; माझ्या चर्मनेत्रांना माझे हित कधी दिसतच नाही, म्हणून ते एका अर्थाने अंधच आहेत. मला माझ्या प्रारब्धानुसार, कर्मांचीच गती आहे, म्हणून मी पांगळाच आहे, मला स्वतंत्र चालताही येत नाही. जे बोलायला हवे ते, श्रीभगवंतांचे नाम, गुण, लीला मी कधीच बोलत नाही, पण बाकीचे सर्व अकारण बोलत बसतो, म्हणून मी खरेतर मुकाच आहे. पण अहो दयावंता, तुम्हांला माझी दया येऊ द्यावी. ती आली तर आपल्या कृपेच्या उच्छिष्ट प्रसादावर मी पोसला जाऊन, ख-या अर्थाने संपन्न होईन, धष्टपुष्ट होईन.
प्रेमसागरा माउली भगवंता, मला बाकी काहीही कळत नाही, पण मर्यादेचे मौन मात्र मी आपल्या कृपेने जाणतो व तेच सुयोग्य असे मौन धारण करून आता आपल्या समोर हात जोडून उभा आहे !
खरोखरीच भगवान श्री ज्ञानराज माउलींच्या समोर उभे राहताना साधकाची काय भावभूमिका असावी, याचे अप्रतिम वर्णन प. पू. श्री. दादांनी या अभंगात केलेले आहे.
भगवान श्री माउलींची प्रार्थना करताना प. पू. श्री. दादा म्हणतात,
आपुल्या दयेचा मज भरवंसा ।
जीव जाला पिसा ज्ञानदेवा ॥१॥
अज्ञ मी म्हणोनि करावा अव्हेर ।
व्हावे ना कठोर ऐसे ताता ॥२॥
मूर्ख मतिमंद दोषांचे आगर ।
खुळे जरी पोर आपुले ना ॥३॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित ।
जाणता उचित लेकुराचे ॥४॥
रसरंगी मिठी घातलीसे पायी ।
दुजी आस नाही अमृतेसी ॥५॥
सद्गुरु श्री ज्ञानदेवा भगवंता, आपल्या निरंतर दयेचा मला भरवसा आहे. आपल्यासाठी माझा जीव वेडापिसा झालेला आहे. अहो कृपावंता ताता, आपण कठोर होऊन अज्ञानी म्हणून माझा अव्हेर करू नका. मी जरी मूर्ख, मतिमंद, अनेक दोषांचे आगर असलो, वेडा खुळा असलो तरी आपलेच पोर आहे ना !
मायबापा ज्ञानेश्वरा, आपणच माझे खरे हित कशात आहे ते जाणता, तेव्हा माझ्यासाठी जे काही उचित असेल तेच आपण कृपावंत होऊन मला प्रदान करावे. आपल्या श्रीचरणीं मी मिठी घालून निश्चल बसलेलो आहे, आता मला आपल्या स्मरणाशिवाय, आपल्या कृपेशिवाय दुसरी कसलीही आस उरलेली नाही. आपल्या या अजाण लेकरावर माय माउली भगवंता, आपण कृपावर्षाव करणार ना !
भगवान श्री माउली नुसते समाधिस्थ नाहीत, ते ' संजीवन समाधिस्थ ' आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत. ते आजही आळंदीत आहेत, त्यांच्या भक्तांच्या हृदयात प्रेमाचा आस्वाद घेत आहेत, त्यांच्या नामामध्ये आहेत, त्यांच्या चरित्रात आहेत. जो प्रेमादराने व कळवळून त्यांना हाक मारेल, त्याच्यासाठी ते सदैव त्या अनन्यभक्ताच्या समोरच आहेत !
आज भगवान सद्गुरु श्री ज्ञानराज माउली महाराजांच्या संजीवन समाधी दिनी, त्यांच्या सर्वार्थदायक श्रीचरणारविंदी वारंवार दंडवतपूर्वक नमन करून, प. पू. श्री. दादांच्याच शब्दांद्वारे कृपायाचना करूया आणि ' श्रीज्ञानदेव माउली ' या पुण्यपावन नामगजरात त्याच श्रीचरणीं विसावूया !!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

25 Nov 2016

नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा

आज कार्तिक कृष्ण एकादशी, उत्पत्ती एकादशी, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिसोहळ्याची कार्तिकी आळंदी वारी  !!
अलं ददाति इति आलंदि । अशी आळंदी शब्दाची फोड आहे. जी पुरे म्हणेपर्यंत देते ती आळंदी  ! अहो, भगवान श्री ज्ञानराय तर आहेतच, पण त्यांची पावन
आळंदी नगरी देखील " जो जे वांच्छिल तो ते लाहो । " हा श्री माउलींचाच अमृत-शब्द गेली साडेसातशे वर्षे पूर्ण करीत आलेली आहे. साक्षात् श्रीभगवंतांचेच अभिन्न स्वरूप असणा-या श्री माउलींसारखेच अगाध व अचाट सामर्थ्य, त्यांचे चिरंतन अस्तित्व लाभल्याने ही लौकिक नगरी देखील सर्वार्थाने अंगोअंगी मिरवत आहे. प्रत्यक्ष श्री माउलींच्या संजीवन समाधीचे अधिष्ठान-माहेर लाभल्यास काय होणार नाही? ज्यांच्या दारातला पिंपळही प्रत्यक्ष सुवर्णाचा आहे, त्या कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री माउलींच्या साम्राज्यात उणेपणाच कायमचा उणावलेला आहे  !!
आज कार्तिकी वारी. पहाटे पवमानपंचसूक्ताच्या अभिषेकाने उत्सवास सुरुवात होते. दुपारी श्री माउलींची पालखी नगर परिक्रमेस बाहेर पडते व हजेरी मारुती मंदिरात सर्व दिंड्यांच्या हजे-या होऊन पालखी सोहळा पुन्हा मंदिरात परत येतो. उद्या द्वादशीला श्री माउलींची रथातून मिरवणूक निघते व गोपाळपु-यातून फिरून परत येते. परवा त्रयोदशीला श्री माउलींचा समाधिउत्सव साजरा होतो. वारकरी संप्रदायात या उत्सवाला अतिशय महत्त्व आहे! 
आळंदीचा व तिचे अक्षय अधिष्ठान असलेल्या श्री माउलींचा महिमा गाताना सर्व संत वेडावून जातात. श्रीसंत तुकोबाराय तर श्री माउलींविषयीच्या अत्यंत जिव्हाळ्याने शपथपूर्वक म्हणतात,
चला आळंदीला जाऊ।
ज्ञानेश्वर डोळा पाहू ॥
होतील संतांचिया भेटी।
सांगू सुखाचीया गोष्टी ॥
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।
मुखी म्हणता चुकती फेर ॥
जन्म नाही रे आणिक।
तुका म्हणे माझी भाक ॥
अशा या आळंदी क्षेत्राचे आजचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण साक्षात् श्रीपांडुरंगांनीच स्वमुखे नामदेवरायांना सांगितले आहे की, " कार्तिक शुद्ध एकादशी माझी तर कृष्ण एकादशी ज्ञानोबांची. आम्ही कार्तिकात या एकादशीला कायम आमच्या लाडक्या ज्ञानोबांच्या सोबतच असू ! " श्रीभगवंतांचे हे अलौकिक माउली-प्रेम पाहून श्री नामदेवराय हर्षोत्फुल्ल होऊन धन्योद्गार काढतात,
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार ।
धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ॥१॥
धन्य भागीरथी मनकर्णिका वोघा ।
आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२॥
धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग ।
मिळालें तें सांग अलंकापुरी ॥३॥
नामा म्हणे धन्य भाग्याचे हें संत ।
झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४॥
" कार्तिक कृष्ण अष्टमीपासून ते त्रयोदशीपर्यंत जो कोणी माझ्या परमप्रिय श्रीज्ञानराज माउलींचे स्मरण, वंदन, पूजन, भजन, नमन, चरित्रगायन व नामस्मरण करेल, त्याच्यावर मी प्रसन्न होईन ! " असा प्रत्यक्ष आनंदकंद भगवान श्रीपंढरीनाथांचाच आशीर्वाद आहे. म्हणूनच आजपासून त्रयोदशीपर्यंत सद्गुरु भगवान श्री माउलींच्या संजीवन समाधीस वारंवार साष्टांग दंडवत घालून, श्री माउलींचे प्रिय भक्त प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज विरचित श्रीज्ञानदेवाष्टकाचे प्रेमादरपूर्वक वाचन, चिंतन करून आपणही श्रीपंढरीश परमात्म्याचे शुभाशीर्वाद प्राप्त करून घेऊया व धन्य होऊया  !!
॥ श्रीज्ञानदेवाष्टकम् ॥
महिंद्रायणीचे तटी जे आळंदी ।
दुजी पंढरीक्षेत्र लोकी प्रसिद्धी ।
असा घेतला तेथ जेणे विसावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥१॥
पिता विठ्ठल विख्यात रुक्माई माता ।
दयाशील दाम्पत्य नाही अहंता ।
तये पोटी न कां जन्म हा घ्यावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥२॥
कलीमाजी तारावया भाविकांना ।
सुविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ केला ।
समाधान जो देई गीतार्थ जीवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥३॥
चमत्कार नाना जगी दावियेले ।
पशूच्या मुखे वेदही बोलविले ।
असे थोर आश्चर्य वाटेचि जीवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥४॥
द्विजाच्या घरी श्राद्धकाळी जिवंत ।
करी जेववी पूर्वजाते समस्त ।
मुखी घालती अंगुली लोक तेव्हा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥५॥
अगा व्याघ्रयाने वृथा खेळताहे ।
पहा भिंत निर्जीव ही चालताहे ।
असे दाखवी लाजवी चांगदेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥६॥
नसे द्वैतबुद्धी दया सर्वभूती ।
अशी देखिली ती संतमूर्ती ।
नसे साम्य लोकी जयाच्या प्रभावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥७॥
महायोगी लोकी ऐसी प्रसिद्धी ।
आळंदीपुरी तोचि घेई समाधी ।
अशा ते न कां विश्वरूपी म्हणावा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥८॥
वदे भक्तीने नित्य या भाविकांसी ।
भवाब्धि भये बाधिती ना तयासी ।
म्हणे दास गोविंद विश्वास ठेवा ।
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानदेवा ॥९॥
इति सद्गुरु श्रीगोविंदकाका उपळेकर महाराज विरचितम् श्रीज्ञानदेवाष्टकम् संपूर्णम् ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

11 Nov 2016

आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो


नमस्कार सुहृदहो,
आज प्रबोधिनी कार्तिकी एकादशी, पंढरपूर यात्रा !!
चातुर्मास्याची सुरुवात आषाढी एकादशीला होते व चार महिन्यांनंतर कार्तिकी एकादशीला समाप्ती होते. भगवान श्रीविष्णूंचा हा चार महिन्यांचा शयनकाल मानला जातो. त्यामुळेच आषाढीला " देवशयनी एकादशी " म्हणतात व कार्तिकीला " प्रबोधिनी एकादशी " म्हणतात.
भूवैकुंठ पंढरपूर क्षेत्री प्रत्येक महिन्यातल्या शुद्ध पक्षातील एकादशीचे महत्त्व आहेच. पण त्यातही आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार एकादशींना महत्त्व जास्त असते. " आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो ।" असे श्री एकनाथ महाराज आपल्या, कर कटेवर ठेवून उभ्या राहिलेल्या कृष्णाबाईच्या गोंधळात म्हणतात.
भगवान श्रीपंढरीनाथ हे योगमूर्ती आहेत. त्यांनी आपले दोन्ही चरण जोडलेले असून नेत्र मिटलेले आहेत. समचरण असणे हे योगशास्त्रातील फार दुर्मिळ आणि दिव्य लक्षण आहे. भगवान पंढरीनाथ हे आपल्या परमप्रिय भक्तांचे निरंतर ध्यान करीत असतात, म्हणून त्यांनी आपले नेत्र मिटलेले आहेत. आपल्या लाडक्या भक्तांची ते कंबरेवर हात ठेवून अखंड वाट पाहात असतात. त्यांना भक्तांशिवाय करमतच नाही. भक्तांचीही स्थिती याहून काही भिन्न नसते.
संपदा सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ॥
जावे पंढरीसी आवडे मनासी ।
कधी एकादशी आषाढी हे ॥
तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी ।
त्याची चक्रपाणि वाट पाहे ॥
अशी प्रत्येक हरिभक्ताची हृदयभावना असते व अशाच अनन्य भक्तांसाठीच गेली अठ्ठावीस युगे श्रीभगवंत पंढरीत उभे आहेत. कारण; " प्रेमळांचे सांकड आमुचिया गावी ।" ही त्यांची खरी खंत आहे. अहो, शुद्ध व निरपेक्ष प्रेम करणा-या भक्तांची त्यांच्याकडे फार मोठी वानवा आहे. आणि ज्या गोष्टीची आपल्याकडे कमतरता असते, तिचे महत्त्व वेगळे का पटवून द्यावे लागते कोणाला? म्हणूनच श्रीभगवंतांचेही आपल्या या अनन्यदासांवर निरपेक्ष प्रेम असते.
" वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळू तातडी उतावीळ ॥ " असे उतावीळ होऊन प्रेमवर्षाव करणारे हे भगवंत किती प्रेमळ म्हणावेत? तुलनाच नाही त्यांच्या प्रेमाला ! म्हणूनच भूवैकुंठ श्रीपंढरीचे वैभव त्रिखंडात इतरत्र कोठेही पाहायला, अनुभवायला मिळणार नाही. पंढरी ती पंढरीच, एकमेवाद्वितीय, अलौकिक, अद्भुत आणि अवर्णनीय देखील !! तेथील सुख साक्षात् श्रीपंढरीश परमात्म्याच्या सगुण रूपाने विटेवर प्रकटलेले असून तेच सर्व वारक-यांच्या रूपाने आपल्याच प्रेमसुखाची अखंड अनुभूती घेत असते. आषाढी कार्तिकीला त्यांच्या या प्रेमसागराला उधाण येत असते. त्या आनंद-उधाणात अवघे चराचरच प्रेममय, आनंदमय होऊन ठाकले, तर त्यात नवल ते काय?
हे सगळे आपल्या अनुभूती-कक्षेच्या पूर्णपणे बाहेरचेे, बोला-बुद्धीच्या पलीकडचे आहे. शब्दांच्या असल्या कुबड्यांना तेथे काय हो मातब्बरी? प्रेम कोणाला कधी शब्दांनी सांगता येते काय? तो तर डोळे झाकून हृदयाच्या गाभेवनात अनुभवायचा भाग आहे ! म्हणून आनंदकंद भदवान श्रीपंढरीनाथांच्या त्या अपरंपार आणि अलौकिक प्रेमाचा अनुभव ज्याचा त्यानेच आपापला घेऊन सुखमय होऊन जायचे असते.
आजच भगवान पंढरीनाथांचे अत्यंत लाडके भक्त, त्यांचे प्रेमभांडारी सद्गुरु श्री नामदेव महाराजांची ७४६ वी जयंती. इ.स. १२७० मध्ये कार्तिकी एकादशीला त्यांचा जन्म झाला. श्रीनामदेवांच्या उत्कट प्रेमभक्तीचे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे महत्त्व आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीपांडुरंगांना त्यांच्याशिवाय क्षणभरही करमत नसे, यातच त्यांचे महत्त्व समजून येते. त्यांच्या श्रीचरणीं सादर दंडवत!
कार्तिकी एकादशी ही प्रबोधिनी आहे. या दिवशी श्रीभगवंत चातुर्मास्य निद्रेतून जागे होतात, असे म्हणतात. देव कधी तरी झोपतात का हो? झोपतो आपण. नुसते झोपतो नाही, तर त्या झोपेत नाही नाही ती स्वप्नेही पाहतो. स्वप्नातले जगच खरे मानून त्यात इतके रमतो की खरे जग पार विसरूनच जातो. आपली ही झोप संतांना काही पाहावत नाही, म्हणून ते वारंवार आपल्याला जागे करीत असतात. त्यासाठी श्रीभगवंतांची प्रेमभक्ती ते आपल्याला प्रदान करतात. त्या विशुद्ध भगवत्प्रेमाची यथार्थ जाणीव होऊन तोच निजध्यास होणे, हीच आपल्यासाठी साधक म्हणून खरी ' प्रबोधिनी एकादशी ' आहे. मात्र ही भान-जागृती श्रीगुरुकृपेशिवाय कदापि येऊ शकत नाही. म्हणून श्रीगुरुकृपेने श्रीभगवंत त्यांच्या अलौकिक प्रेम-रूपाने आपल्या हृदयात जागे होणे, हेच आपल्यासाठी एकादशीचे खरे जागरण आहे व याचीच सतत वाट पाहत राहिले पाहिजे. हे वाट पाहणेही किती समाधानकारक आहे ना !
आज या परमपावन कार्तिकी एकादशीच्या पुण्यपर्वावर, नंद-सुनंद, जय-विजय, गरुड-हनुमंत इत्यादी सर्व पार्षदांसह भगवान श्रीरुक्मिणी-पांडुरंग आणि त्यांचेच अभिन्न प्रेमस्वरूप असणा-या माउली श्री ज्ञानदेव, श्री नामदेव, श्री एकनाथ, श्री तुकोबादी सर्व संतश्रेष्ठ-भक्तश्रेष्ठांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत करूया आणि  त्यांंच्या प्रेमभक्तीच्या प्राप्तीसाठी त्यांनाच कळकळीने प्रार्थूया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

28 Oct 2016

ज्ञानाची दिवाळी



नमस्कार मित्रहो,
आज धनत्रयोदशी, भारतीय संस्कृतीतील प्रमुख महोत्सव, दीपावलीचा दुसरा दिवस. आजच्याच तिथीला देव-दानवांनी समुद्राचे मंथन केल्यामुळे, त्या रत्नाकरातून चौदा रत्ने लोककल्याणासाठी निर्माण झाली होती. म्हणून त्या चौदा रत्नांपैकी भगवान विष्णूंची पत्नी भगवती लक्ष्मी व भगवान विष्णूंचे अवतार भगवान धन्वंतरी यांची जयंती आज साजरी होत असते. उत्तर भारतात ही धनतेरस खूप मोठ्या प्रमाणावर साजरी होते.
आज भगवती लक्ष्मीमाता व धनाधिपती कुबेरांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. तसेच सप्त धान्यांचीही पूजा करतात, नवीन वस्त्र, धातू, दागिने, सोने अशा वैभवसूचक  गोष्टींची देखील खरेदी करतात. सायंकाळी प्रदोष समयी श्रीलक्ष्मी-कुबेर पूजन करून साळीच्या लाह्या व बत्तासे आणि धने-गुळाचा नैवेद्य अर्पण करून, धन-धान्य समृद्धी व्हावी म्हणून कृतज्ञतापूर्वक श्रीभगवंतांची प्रार्थना करायची असते.
आजच्या तिथीलाच सायंकाळी धर्मदेवता यमराजाच्या नावाने दक्षिणेकडे तोंड करून एक दीप अर्पण करायचा असतो. एरवी आपण वर्षभर कधीही दक्षिणेकडे वात करून दिवा लावत नाही. या दीपदानाने अकालमृत्यू पासून सुटका होते असे म्हणतात.
भगवान विष्णूंच्या श्रीमद् भागवतातील चोवीस अवतारांमध्ये भगवान धन्वंतरींची गणना होते. हे देवांचे वैद्य मानले जातात. दीर्घकाल आयुष्य व उत्तम आरोग्य टिकून राहावे म्हणून आज त्यांची देखील पूजा केली जाते.
आरोग्य हीच खरी संपत्ती असून तेच सुखी व आनंदी जीवनाचे द्योतक आहे; व तेच सर्वथा साध्य देखील ! म्हणूनच की काय, भगवती लक्ष्मी व श्रीधन्वंतरींचा जन्म एकाच वेळेला झाल्याची गोष्ट शास्त्रांमध्ये आलेली आहे. पण दुर्दैवाने लक्ष्मीच्या पाठीमागे लागून लोक पहिल्यांदा आपल्या शरीराचे व आरोग्याचेच वाटोळे करून घेतात. पैसे मिळवण्यात इतके गढून जातात की अत्यंत दुर्मिळ असणारा मनुष्यजन्म, हेलपाट्याच्या गाढवासारखा झापडे लावून तेच ते करण्यात वाया घालवतात. एवढे मर मर मरून कमावलेली संपत्ती देखील मग त्यांना सुखाने उपभोगताही येत नाही. मिळालेला पैसा औषधांवरच खर्च होऊन जातो. ना समाधान ना आरोग्य, ना सुख ना आनंद, फक्त कष्ट; अशा विवंचनेतच सर्व आयुष्य नष्ट होऊन जाते. मानवजातीचे हेच भविष्य बहुदा पूर्वीच्या द्रष्ट्या ऋषींनी आधीच ओळखून लक्ष्मी व धन्वंतरींची सांगड घातलेली असावी.
प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज एक मार्मिक गोष्ट सांगत असत. भगवती लक्ष्मीचे वाहन आहे घुबड. त्याला संस्कृतमध्ये उलूक म्हणतात. हिंदीत उल्लू म्हणतात. उल्लू म्हणजे बावळट देखील. जेव्हा ही लक्ष्मी एकटीच येते तेव्हा ती घुबडावर बसून येते व ज्याच्याकडे येते त्याला ' उल्लू ' बनवून लगेच निघूनही जाते. पण ती जेव्हा भगवान विष्णूंसोबत येते तेव्हा ती गरुडावरून येते व त्यावेळी ती स्थिर देखील राहाते. भगवान श्रीज्ञानेश्वर माउली मुद्दाम म्हणतात की, " मुकुंदीं स्थिरावली लक्ष्मी जैसी ।" एरवी अत्यंत चंचल असणारी भगवती लक्ष्मी श्रीभगवंतांबरोबर आली की एकदम स्थिर राहाते. म्हणून जो फक्त लक्ष्मीच्या मागे लागतो तो 'उल्लू'च बनतो. त्याला मग धन्वंतरींचाच आधार घ्यावा लागतो.
भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे दैवत मानले जातात. त्यांच्या एका हातात अमृतकुंभ असतो. हा सर्व औषधांचे प्रतीक आहे. औषध हे भगवान विष्णूंचे एक नाम आहे. त्यांची " अमृत, भेषज, भिषक्, वैद्य " इत्यादी अनेक नामे विष्णुसहस्रनामामध्ये आलेली आहेत. या नामांमधून श्रीभगवंतांचेच करुणामय धन्वंतरीस्वरूप आणखी स्पष्ट होते. म्हणून भगवान धन्वंतरींचा हात न सोडता अर्थात् आरोग्य न बिघडवता, गरुडावरून श्रीभगवंतांबरोबर येणारी लक्ष्मी प्राप्त करण्यासाठीच आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. अशी लक्ष्मी प्राप्त झाली तरच आयुष्य अमृतमय होते. अमृतासाठी पूर्वी जे समुद्रमंथन झाले, त्या गूढ प्रक्रियेचे हे विचारमंथनच आजच्या धनत्रयोदशीचे खरे रहस्य आहे ! हे जाणून जर धनत्रयोदशी साजरी झाली, तरच मग दीपावलीचा शाश्वत आनंद लाभेल !
दीपावलीची सुरुवात वसुबारसेला गोपूजनाने होते. गायीच्या सर्वांगात, शेणात, मूत्रातही पावित्र्याचा, मांगल्याचा, आरोग्याचा, लक्ष्मीचा वास असतो. म्हणून तिचे महत्त्व आधी जाणून तिची सेवा करायची, मग धनत्रयोदशीला आरोग्यासह लक्ष्मी प्राप्त होते. त्यानंतरच नरकासुराचा वध श्रीभगवंत करतात. तीच नरकचतुर्दशी ! मग आपल्या आयुष्यातील पापरूपी नरकाची अर्थात् आपले दुर्गुण, व्यसने व वाईट सवयी यांची व आपली संगत सुटते. तेव्हाच मिळालेली स्वर्गीय संपत्ती संपूर्ण कुटुंबासह आपल्याला सुखाने व योग्य पद्धतीने उपभोगता येते. तेच लक्ष्मीपूजन होय ! यातून आपल्या आयुष्यात एक नवे प्रकाश-पर्व सुरू होते, तोच दीपावली पाडवा होय. असा जेव्हा बोध-दीपोत्सव संपन्न होतो, तेव्हाच सर्वत्र, सर्व समाजात असूया व द्वेषरहित बंधुभाव, स्नेहभाव उत्पन्न होत असतो, म्हणून दीपावलीची सांगता ही भाऊबीजेने होते. हीच संतांना अभिप्रेत असणारी खरी बोध-दीपावली होय !
आपल्या प्रचंड बुद्धिमान व ज्ञानी ऋषीमुनींनी या सर्व भूमिकांचा सांगोपांग विचार करूनच हा तेजाचा, प्रकाशाचा महोत्सव, दीपावली महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. आपण त्यांचे मर्मच जाणून घेत नाही, हे आपलेच दुर्दैव नाही का?
आजच्या या पर्वावर आपण सर्वांनी असा निर्धार करूया की, आम्ही आमच्या प्रगल्भ संस्कृतीचा यथायोग्य मान ठेवू, ती जाणून घेऊन आपले आयुष्य खरे सुखी करू व अभिमानाने भारतीय वैदिक संस्कृतीचे पाईक म्हणून जगात मिरवू ! अशी अलौकिक बोध-जाणीव निर्माण होऊन कायमची स्थिर होणे, हीच खरी दीपावली आहे व अशाच बोध-दीपावलीच्या तुम्हां सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा !!
( आजच्या दिवशी कोल्हापूरच्या भगवती महालक्ष्मीचा धन्वंतरी रूपातलाच फोटो या लेखासोबत मुद्दाम शेयर करीत आहे. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.com )

22 Oct 2016

जाला गवसणी गुरुभक्तीसी


आज आश्विन कृष्ण सप्तमी, परम आदर्श श्रीगुरुभक्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् नृसिंह सरस्वती ( दीक्षित) स्वामी महाराजांची पुण्यतिथी !!
प. प. श्री. दीक्षित स्वामी हे पंचम श्रीदत्तावतार प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांचे स्वनामधन्य शिष्योत्तम होत. प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी संपूर्ण हयातीत केवळ श्री. दीक्षित स्वामींनाच संन्यासदंडदीक्षा दिलेली होती; तेही त्यांची तीव्र परीक्षा पाहून. श्री. दीक्षितस्वामींनी प. प. श्री. थोरल्या महाराजांना रात्री निजताना आपल्याला दंड देण्याची प्रार्थना केली. पण श्री. स्वामी महाराज म्हणाले, आम्हांला आज्ञा नाही, इतर कोणाकडून दंड घ्यावा. असे म्हणून श्री. थोरले महाराज छाटी पांघरून झोपून गेले. त्यांच्या पायाशी उभे राहिलेले श्री. दीक्षितस्वामी डोळ्यांतून अश्रू गाळत तसेच उभे होते. पहाटे श्रीगुरुमहाराजांना जाग आली तर, रात्री जसे श्री. दीक्षितस्वामी उभे होते, तसेच उभे होते, खाली मान घालून, अविचल व अडीग. आपल्या शिष्याची दृढ निष्ठा पाहून श्रीगुरु महाराजांनी सुहास्य वदनाने विचारले, " स्वामी, तुम्ही अजून तसेच उभे आहात? जा, तयारी करा दंडदानाची ! " श्री. दीक्षित स्वामींनी प्रेमभराने गुरुचरणांवर दंडवत घालून अश्रूंचा अभिषेक केला. पुढे वाडीतच दंडदान झाले व नारायण दीक्षितांचे श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज झाले. त्यांना वाडीत राहूनच उपासना चालविण्याची गुरुआज्ञा झाली, जी त्यांनी मनापासून पाळली.
प. प. श्री. दीक्षितस्वामी हे श्रीनृसिंहवाडीचे राहणारे व त्याकाळात बी. ए पर्यंत शिक्षण घेतलेले होते. त्यांचा परमार्थ अधिकार फार मोठा होता. ते प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांचे लीलासहचरच होते व कार्यासाठीच त्यांच्यासोबत अवतरलेले होते.
श्रीगुरुभक्तीचा परम आदर्श म्हणजे श्री. दीक्षित स्वामी !! प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराज कायम त्यांच्या विलक्षण गुरुसेवेचे कौतुक करीत व त्यांना खूप मानही देत असत. शेवटच्या गरुडेश्वर वास्तव्यात श्री. ब्रह्मानंद तीर्थ स्वामींना श्री. थोरल्या महाराजांनी जीवन्मुक्तीची लक्षणे शिकवून त्यांचा अभ्यासही करवून घेतला होता. त्यावेळीच त्यांनी सांगितले, " स्वामी, आपण कधी श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला गेला आहात काय? नसाल तर एकदा जरूर जा. तेथे आपणांस शिकविलेल्या जीवन्मुक्त लक्षणांची साक्षात् मूर्तीच आम्ही स्थापन करून ठेवलेली आहे. ते  तेथीलच आहेत, पण त्यांना कोणी ओळखत नाही. आमच्यापेक्षाही ते काकणभर अधिक आहेत !" आपल्या शिष्याविषयी एवढे गौरवोद्गार, तेही प्रत्यक्ष श्रीमत् टेंब्येस्वामींसारख्या श्रीदत्तस्वरूपाने काढणे, हे सोपे नाही. यातच श्री. दीक्षितस्वामींचा अद्भुत अधिकार दिसून येतो. त्यांचे चरित्रही अगदी श्री. टेंब्येस्वामींसारखेच विलक्षण आणि सुंदर आहे.
एकदा प्रत्यक्ष सूर्यचंद्रादी नवग्रह मनुष्यरूप घेऊन त्यांच्या दर्शनाला आले व त्यांनी प्रार्थना केली की, " उद्या पासून तुम्हाला शनीची साडेसाती सुरू होणार आहे. तरी आपली त्यासाठी परवानगी असावी. " त्यावर ते शांतपणे म्हणाले, " आपण आपले कार्य करावे. आमची काही हरकत नाही. " दुस-याच दिवशी त्यांच्यावर वाडीच्या पुजा-यांनी चोरीचा आळ घेतला आणि वाडी सोडून जाण्यास फर्मावले. ज्या वाडीत त्यांना प्रत्यक्ष देवांइतका मान होता, तिथेच त्यांच्यावर खोटा आळ लावला गेला. त्यांच्या चित्तात प्रारब्धवशात् आलेल्या या बालंटाने कसलेही तरंग उठले नाहीत, ते पूर्ण स्थितप्रज्ञच होते. हीच देवांची इच्छा समजून ते वाडीतून कृष्णेच्या समोरील तीरावरील औरवाड येथे जाऊन राहिले. तेथे त्यांनी श्रीदत्तामरेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला व तेथे प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या प्रसाद पादुका स्थापून " श्रीवासुदेवानंद सरस्वती पीठ " निर्माण केले.
प. प. श्री. टेंब्येस्वामी आपल्या प्रत्येक नवीन ग्रंथाची हस्तलिखित प्रत प. प. श्री. दीक्षितस्वामींनाच पाठवत असत, एवढे त्यांचे आपल्या या पट्टशिष्यावर प्रेम होते. त्यांचा व दीक्षित स्वामींचा झालेला पत्रव्यवहारही फार सुंदर असून पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. श्री. दीक्षित स्वामींनी लिहिलेला ' गुरुशिष्य संवाद ' हा आवर्जून वाचावा असा प्रश्नोत्तररूप अप्रतिम लघुग्रंथही त्यांनीच प्रकाशित केलेला आहे.
श्री. दीक्षितस्वामींनी प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या आज्ञेनुसार भरपूर भ्रमंती करून वैदिक धर्माचा विकास केला. हजारो लोकांना श्रीदत्तभक्तीला लावले. अनेकांना अडचणींतून सहज सोडविले. तेही अत्यंत प्रेमळ, उदार व कोमल अंत:करणाचे होते. त्यांच्या रचनाही मनोहर आहेत. प. प. श्री. टेंब्येस्वामींची त्यांनी रचलेली " जय जय श्रीमत् गुरुवर स्वामिन् परमात्मन हंसा । " ही संस्कृत आरती तर अतीव प्रासादिक आहे.
अखंड गुरुभजनात, गुरुसेवेत रममाण झालेल्या या थोर अवतारी सत्पुरुषाने शरयू नदीच्या तीरावरील अयोध्या नगरीत नश्वर देहाचा त्याग केला. " आम्ही संपूर्ण जग फिरलो पण श्रीनृसिंह सरस्वतींसारखा ज्ञानाला सुपात्र व परम गुरुभक्त शिष्य दुसरा पाहिला नाही ! " असे प्रशंसोद्गार ज्यांच्याबद्दल साक्षात् भगवान श्री. टेंब्येस्वामींनी काढले, त्या थोर सत्पुरुष प. प. श्री. नृसिंह सरस्वती ( दीक्षित)  स्वामी महाराजांचा कीर्तिसुगंध व पावन नाम पृथ्वीच्या अंतापर्यंत श्रीदत्त संप्रदायामध्ये अजरामर राहणार आहे; अगदी ' या सम हा ' असे !
आज त्यांच्या पुण्यतिथीच्या पुण्यपर्वावर, प. प. श्रीमत् नृसिंह सरस्वती ( दीक्षित ) स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत घालून, सर्वांसाठी श्रीगुरुभक्तीचाच आशीर्वाद त्यांना मागूया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

11 Oct 2016

*** आदिशक्तिचें कवतुक मोठें   *** ** एकादशोल्लास **

सर्व भगवत्प्रेमी सुहृदांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज दसरा, नवरात्रीच्या सांगतेचा दिवस ! आजच्या तिथीलाच विजयादशमी देखील म्हणतात. भगवती श्रीजगदंबेने महिषासुराचा व भगवान श्रीरामांनी रावणाचा वध आजच्याच तिथीला केला होता. त्यांच्या त्या विजयाचे द्योतक, धर्माच्या अधर्मावरील विजयाचे प्रतीक म्हणून प्राचीन काळापासून या तिथीला उत्सव साजरा करून सीमोल्लंघन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. सगळीकडे झेंडूच्या फुलांची आरास करून, देवांना झेंडूची फुले वाहून, शमी व आपट्याच्या फांदीची पूजा करायची. देवांना व श्रीसद्गुरूंना विशिष्ट पद्धतीने आपट्याची व शमीची पाने आणि झेंडूचे फूल अर्पण करायचे. देवी सरस्वतीची व तिचे प्रतीक असणा-या ग्रंथांची पूजा करायची. नंतर एकमेकांना आपट्याचे सोने द्यायचे आणि सर्वांचे अभीष्ट चिंतून आनंद व्यक्त करायचा; आपल्या गुरुजनांची आवर्जून भेट घेऊन त्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे, अशी या दिवशीची प्रथा आहे. या सगळ्यांचा खूप मोठा अर्थ आपल्या ऋषी-मुनींनी सांगून ठेवलेला आहे. आपण आपल्या जगावेगळ्या संस्कृतीचा खोलात जाऊन विचारच करत नाही, हे आपलेच दुर्दैव आहे. आता फक्त दिवसभर व्हॉटसपवर पडीक राहून, स्वत: न वाचताच भरमसाठ मेसेज नुसते फारवर्ड करायचे, दुपारी भरपेट गोडधोड हाणून ताणून द्यायची आणि सणाचे, सुट्टीचे सार्थक करायचे; हीच सध्या आपल्याकडील उत्सवांची पद्धत रूढ होत चाललेली आहे. दुर्दैवाने बळावलेला हा मूर्खपणा खरंच कुठेतरी थांबायला हवा.
संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक पूजनीय सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज या विजयादशमीच्या प्रतीकांचा गूढ अर्थ फार सुंदर रितीने स्पष्ट करून सांगत असत. त्यांचे उत्तराधिकारी पूजनीय श्री. शिरीषदादा कवडे यांनी आपल्या ' महेशें शिवेसी निजखूण दाविली ' या ग्रंथातील ' विजयादशमी रहस्य ' या प्रवचनात हे सर्व मर्म उलगडून सांगितलेले आहे. आपण त्याचा येथे थोडक्यात आस्वाद घेऊया.
कालच्या लेखामध्ये आपण वैष्णवी माया म्हणून भगवती जे कार्य करते ते पाहिले. तीच मायारूपिणी अंबा सद्गुरुरूपाने जीवावर अनुग्रहकृपा करून त्याचा देहभाव आटवते व त्याला जीवदशेतून पुन्हा मूळच्या शिवस्वरूपात एकरूप करते. याच प्रक्रियेला खरे ' सीमोल्लंघन ' म्हणतात आणि त्याच्या विधीलाच ' नवरात्र ' म्हणतात. जीवाचा जीवभाव नष्ट होण्याची प्रक्रिया म्हणजेच साधना व ही साधना नऊ प्रकारांनी संपूर्ण होते. यांनाच नवविधा भक्ती म्हणतात. श्रीसद्गुरूंची कृपाशक्ती साधकाला क्रमाने, टप्प्यात टप्प्याने या नऊ पाय-यांवरून आत्मस्वरूपाच्या महालात नेऊन ठेवते.
श्रवण, कीर्तन, नामस्मरण,  पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य व  सख्य या आठ भक्तीपाय-या ओलांडून तो जीव आत्मनिवेदन या नवव्या पायरीवर येतो. तेथे तो श्रीकृपेने भगवंतांशी पुन्हा एकरूप होऊन जातो. त्यालाच विजयादशमी म्हणतात. जीवत्वातून शिवत्वात पुन्हा झालेले हेच खरे सीमोल्लंघन होय. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आधी श्रीगुरुचरणीं शरण जाऊन त्यांची कृपा संपादन करावी लागते. त्यांच्या कडून ते कृपाबीज हृदयात प्रतिष्ठापित होणे हीच घटस्थापना होय. मग त्यांनी कृपावंत होऊन दिलेले साधन प्राणपणाने जपून वाढवावे लागते. हेच आपल्यासाठी नवरात्र अनुष्ठान असते आणि याची परिपूर्ती म्हणजेच विजयादशमी होय !
प्रत्यक्ष भगवंतच विजयस्वरूप आहेत, तर अर्जुनाचे एक नाव विजय देखील आहे. अर्जुन म्हणजेच हा जीव व तो विजया नावाच्या शक्तीच्या कृपेने भगवंतांशी एकरूप होऊन पुन्हा विजयस्वरूप होऊन जातो. जीव विजयस्वरूप होण्याची ही सर्व प्रक्रिया म्हणजेच नवरात्र होय !
विजयादशमीला देवांना आणि श्रीसद्गुरूंना आपटा व शमीची पाने आणि झेंडूचे फूल वाहतात. याचे शास्त्रीय कारणही खूप सुंदर आहे.
आपट्याला दोन दले असतात. आपट्याला संस्कृतात कांचन म्हणतात. कांचन म्हणजेच मोह, म्हणून तो आपल्या मोहाचे प्रतीक आहे. ' मी ' व ' माझे ' या दोन रूपांनी आपला मोह कार्य करीत असतो. म्हणून ही दोन दले मिटून श्रीसद्गुरुचरणीं वाहतात. " माझे द्वैत मिटले जावो आणि मोह तुमच्या चरणी अर्पण असो," अशी त्यामागची भावना असते.
शमीची पाने ही चिंचेच्या पानांसारखी असतात. तो आपल्या मनाचे प्रतीक आहे. आपल्या मनाला असे अनेक फाटे फुटलेले असतात. ही सगळी पाने हिरवी म्हणजे टवटवीत देखील असतात. आपल्या मनाच्या वृत्ती ह्या अशाच असतात. म्हणून त्या श्रीगुरुचरणीं अर्पण करून आपण मनाला आवर घालायचा असतो. म्हणून शमीचे पान पालथे अर्पण करतात. " माझ्या मनाच्या वृत्ती प्रपंचातून निघून तुमच्या चरणी आश्रयाला येवोत, 'पालटोत' ," हे त्यातून आपण श्रीगुरूंना विनवायचे असते.
याबरोबर झेंडूचे फूलही वाहतात. झेंडूला तसा सुगंध नाही, पण एक विशिष्ट तीव्र गंध असतो. शिवाय हे एक स्वतंत्र फूल नाही, तो अनेक फुलांचा गुच्छ आहे. तसे आमच्या मनाचा भाव जरी वरून एकविध दिसत असला तरी तो बहुविधच असतो. अनेक वासनांचा मिळून बनलेला असतो. त्याला आपापल्या वासनांचा तीव्र गंधही असतो. तो वासनांचा रंग या झेंडू सारखा भगवा होवो, वैराग्याचा होवो म्हणून झेंडू वाहायचा; तोही देठ देवांकडे करून. तो वासनामूळांनी बनलेला देठ श्रीसद्गुरूंनी हातात घेतला तरच आपण त्या वासनांच्या कचाट्यातून सुटणार ना !
असा या प्रतीकांचा सुरेख गूढ अर्थ आहे. हे सगळे रहस्य समजावे, त्यामागचे विचार कळून आपले उत्सव अधिक जाणीवपूर्वक, वाढत्या उत्साहाने व प्रेमाने साजरे व्हावेत यासाठीच आपल्या ऋषीमुनींनी व संतांनी मांडलेले चिंतन आपण वारंवार वाचले, अभ्यासले पाहिजे.
गेले दहा दिवस आपण भगवती श्रीजगदंबा मातेची यथामती शब्दपूजा करीत आहोत. भगवती जगदंबिकेच्या विविध अवतारांच्या लीलांचे आपल्याकडून या नवरात्रात सप्रेम स्मरण घडले. आज या सुमुहूर्तावर, दस-याच्या पावन दिवशी तिच्याच करुणाकृपेने माझ्याकडून लेखन व तुम्हां सर्वांकडून वाचन, मनन रूपाने संपन्न झालेली ही सर्व वाङ्मयसेवा श्रीशारदा भगवतीच्या परमपावन श्रीचरणीं अर्पूया आणि सद्गुरुस्वरूपिणी भगवती जगज्जननी श्रीअंबामातेकडे, ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिन्ही प्रकारचे वैभव आम्हांला भरभरून द्यावे, असा कृपाप्रसाद मागूया. ही कोमलहृदयाची परमप्रेमळ माता आपली लेकुरवाचेने केलेली प्रार्थना नक्कीच पूर्ण करेल.
सद्गुरु श्रीसंत एकनाथ महाराजांनी आपल्या सुप्रसिद्ध जोगव्यातून श्रीआदिशक्तीचे स्वरूप व कार्य यांचे सर्वांगीण दर्शन घडवलेले आहे. आपण गेले दहा दिवस जे चिंतन करतोय, ते सर्व नाथमहाराजांनी या एकाच अभंगात साररूपाने व्यक्त केले आहे. म्हणून त्याच पावन शब्दांद्वारे आपण कृपापसाय मागून, विजयादशमीचा असा ज्ञानपूर्ण उत्सव साजरा करूया आणि सरतेशेवटी विश्वजननी श्रीभगवतीमातेच्या प्रेमार्द्र मायकुशीत निरंतर विसावूया !
अनादि निर्गुण प्रकटली भवानी ।
मोहमहिषासुर मर्दनालागुनी ।
त्रिविध तापांची करावया झाडणी ।
भक्तांलागोनी पावसी निर्वाणीं ॥१॥
ऐसा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारूनी माळ मी घालीन ।
हातीं बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा ।
करुनी पोटी मागेन ज्ञानपुत्रा ।
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा ।
दंभ संसार सांडीन कुपात्रा ॥३॥
पूर्णबोधाची भरीन परडी ।
आशा-तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी ।
अद्भुतरसाची भरीन दुरडी ॥४॥
आतां साजणी मी झालिये नि:संग ।
विकल्प नव-याचा सोडियेला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग ।
केला मोकळा मारग सुरंग ॥५॥
ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।
जाऊनी महाद्वारीं नवस फेडिला ।
एकपणें जनार्दन देखिला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

10 Oct 2016

* आदिशक्तिचें कवतुक मोठें * * दशमोल्लास *

आज नवरात्राची दहावी माळ, यंदा तिथीच्या वृद्धीमुळे नवरात्र दहा दिवसांचे झाले. आज आश्विन शुद्ध नवमी, नवरात्रोत्थापन !
गेले नऊ दिवस आपण आदिशक्ती जगत्रयजननी भगवती श्रीजगदंबेच्या अद्भुत स्वरूपाचे, विविध अवतारांचे तसेच अलौकिक कार्याचे यथामती गुणवर्णन आईसाहेबांच्याच कृपेने करीत आहोत. पराम्बिका आदिशक्ती हीच सर्व विश्वाची जननी असल्याने तिच्या रूपांना, अवतारांना मितीच नाही. तिच्या अक्षरश: हजारो अवतारांचे आणि अपूर्व-मनोहर लीलांचे वर्णन पुराणांनी केलेले आहे.
भगवती जगदंबा माता ही जशी वैष्णवी माया बनून जगाची निर्मिती करते आणि विनोदाने खेळ खेळावा तसे परमआनंदमय अशा शिवांचा जीव करून त्याला नाना कर्मांच्या कचाट्यात गोवते; तशीच ती श्रीभगवंतांची अनुग्रहशक्ती होऊन, आपणच निर्माण केलेल्या त्या जाळ्यातून भाग्यवान जीवांना अलगद बाहेर देखील काढते ! हीच भगवती मग सरस्वती रूप धारण करून त्याच्या हृदयातील अज्ञान नष्ट करून तेथे आत्मज्ञानाचा अलौकिक प्रकाश करते.
' माया ' या शब्दातच त्याचा अर्थ आणि कार्य दोन्ही लपलेले आहे. " या मा सा माया " अशी मायेची व्याख्या करतात. जी अस्तित्वातच नाही ती माया ! रस्त्यात पडलेल्या दोराला अंधारात आपण साप समजून घाबरतो आणि प्रसंगी संकटातही पडतो. पण दिवा लावून पाहिले की आपला भ्रम नाहीसा होतो. साप मुळात तेथे कधी नव्हताच, होता तो सापाचा भास, तोही अंधारामुळे झालेला ! तसे मायेने निर्माण केलेल्या या जगात आपण ' मी आणि माझे ' या, आपणच निर्माण करून सतत पोसलेल्या प्रचंड मोठ्या भ्रमामुळे कायम सुख-दु:खांची अनुभूती घेत असतो. या मोहापायी निव्वळ कल्पनाच असणा-या सुख-दु:खांमध्ये आपण किती गुरफटलेलो आहोत, बापरे! बरं, हे सुख-दु:खांचे गणितही किती अवघड? यात एकाचे सुख हे नेहमीच दुस-याचे दु:ख ठरत असते. कसा निवाडा करणार आपण योग्य अयोग्याचा? या सुख-दु:खांना खरेतर आपलीच पूर्वकर्मे कारणीभूत होतात, हेच आपण विसरतो आणि आपल्या भोगांच्या कर्तृत्वाचा उगीचच दुस-या कोणावर तरी आरोप करीत बसतो. आजच्या आपल्या सुख-दु:खांना सर्वस्वी आपणच जबाबदार असतो, हे पक्के लक्षात ठेवायला हवे.
जेव्हा त्या श्रीजगदंबेची आपल्यावर कृपा होते, तेव्हा आपण वरीलप्रमाणे खोलात जाऊन विचार करायला लागतो आणि मग या सुख-दु:खांच्या चक्रातून कायमचे सुटण्यासाठी धडपड करू लागतो. याच स्थितीला शास्त्रांमध्ये ' मुमुक्षुता ' म्हणतात. मोक्षाची इच्छा म्हणजे मुमुक्षा!
अशी मुमुक्षुता आपल्यामध्ये निर्माण झाली की, आपोआपच आपण परमार्थाकडे वळतो, भजन- कीर्तन- प्रवचनाची व श्रीदासबोध, श्रीज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथांची आपल्याला आवड निर्माण होते. पुढे भगवत्कृपेने योग्य सद्गुरूंची गाठ पडून त्यांची कृपा होऊन आपण साधना करू लागतो.
साधनेने मग आपले मूळचे आनंदमय स्वरूप आपल्याला अनुभवाला येते. हे सर्व ती भगवती जगदंबाच घडवून आणत असते. म्हणून तिच्या या परमकरुणामय मातृवात्सल्याचे सा-याच संतांनी भरभरून कौतुक केलेले पाहायला मिळते.
हीच जगन्माता आदिमाया जगदंबा भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या माध्यमातून जगदोद्धारासाठी 'श्रीज्ञानेश्वरी'च्या रूपाने अवतरली ! आज गेली साडेसातशे वर्षे या भगवती ज्ञानेश्वरीने अक्षरश: लाखो लोकांना सन्मार्गाला लावून, विशुद्ध परमार्थ देऊन अखंड सुखी केलेले आहे व पुढेही जगाच्या अंतापर्यंत हे कार्य अव्याहत चालूच राहील.  भगवान श्री माउलींची ज्ञानेश्वरी हा भगवती श्रीशारदेचा अतिशय विलक्षण व करुणामय अवतारच आहे !!
प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांनी आजन्म श्री माउलींची आणि ज्ञानेश्वरीची सेवा केली व अनेकांना या सेवेची गोडी लावली. ते म्हणत असत की, " जो कोणी माउलींना शरण जाऊन प्रेमाने आणि नेमाने ज्ञानेश्वरी व हरिपाठ दररोज वाचेल, किंवा नुसते यांचे स्मरण जरी करेल तरी त्याची सर्व काळजी माउली वाहतील, त्याला सुखरूप करून टाकतील ! " प. पू. काकांच्या या अमोघ शब्दांचा अनुभव हजारो लोकांनी आजवर घेतलेला आहे.
संतश्रेष्ठ जनाबाईंनी माउलींच्या या श्रीज्ञानेश्वरीची जगदंबेच्याच रूपात फार सुंदर स्तुती केलेली आहे. त्या म्हणतात,
भाव अक्षराची गाठी ।
ब्रह्मज्ञानाने गोमटी ॥१॥
ते हे माय ज्ञानेश्वरी ।
संतजनां माहेश्वरी ॥२॥
ज्ञानेश्वर मंगलमुनी ।
सेवा करी दासी जनी ॥३॥
ब्रह्मज्ञानरूप गोमटी अक्षरे प्रेमभावाचे सुरेख कोंदण ल्येऊन श्रीज्ञानेश्वरीच्या रूपाने अवतरलेली आहेत. तीच ही ज्ञानेश्वरी संतजनांसाठी भगवती माहेश्वरी आहे, भगवान महेश्वरांपासून चालत आलेली अक्षुण्ण श्रीगुरुपरंपराच आहे. जनांचे परम मंगल करणारे श्रीज्ञानेश्वर माउली हेच या परंपरेचे मुकुटमणी आहेत, म्हणून मी जनाबाई त्यांची व त्यांचेच स्वरूप असणा-या श्रीज्ञानेश्वरीची दासी बनून त्यांच्याच अविरत सेवेत मग्न  आहे.
नवरात्र हा वर्षातून एकदाच साजरा करण्याचा सोहळा नाही. नऊ दिवस पाट्या टाकल्याप्रमाणे उपासना केली व उरलेले वर्ष श्रीजगदंबेचे तोंडही नाही पाहिले; तर ती पुढच्या वर्षीच्या नवरात्रात आपल्याला ओळख तरी देईल काय? म्हणून नव-रात्र हे फक्त नऊ दिवसांचे न राहता पूर्ण जन्मभराचाच सोहळा व्हायला हवे. घट जरी आज उठले तरी त्या श्रीजगन्मातेबद्दल हृदयात निर्माण झालेली प्रेमाची वीण मात्र तशीच घट्ट राहायला हवी. घटाबरोबर ती उठता कामा नये. आणि मग त्याच प्रेमापोटी रोज नव-नवीन उत्साहाने हे नवरात्र साजरे झाले, तर आदिमाया श्रीभगवतीच्या अद्भुत कृपा विलासाची नवनवोन्मेषशालिनी अनुभूती आपल्याला निरंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही ! असे साजरे करायला जमले तर तेच खरे नवरात्र होय ! पण हेही तिच्या कृपेशिवाय शक्य नाही.
ही प्रेमानुभूती सतत यावी असे वाटत असेल तर, भगवती श्रीज्ञानेश्वरी माउलीची, जशी जमेल तशी व जेवढी जमेल तेवढी, पण प्रेमादरपूर्वक सेवा दररोज व्हायलाच हवी. हा निर्धार करून प्रार्थना केली तर ती आई आपल्या लेकराची तहान-भूक भागवणार नाही का? माझ्या म्हणण्याचा विश्वास वाटत नसेल तर एकदा प्रार्थना करून प्रयत्न करून पाहा की. मला नक्की खात्री आहे श्री माउलींच्या जगावेगळ्या मातृवात्सल्याची, पुरेपूर आणि पक्की!
श्री माउलींच्या या मंत्रप्रतिपाद्य भगवती श्रीज्ञानदेवीवर सर्वांचा अढळ विश्वास व प्रेमादरपूर्वक श्रद्धा बसून तिची निरपेक्ष आणि निरंतर सेवा व सेवन करण्याची सद्-बुद्धी सर्वांना लाभो हीच यानिमित्ताने श्रीगुरुचरणीं कळकळीची प्रार्थना !

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

http://rohanupalekar.blogspot.in )⁠⁠⁠⁠


9 Oct 2016

*** आदिशक्तिचें कवतुक मोठें *** ** नवमोल्लास **

' दुर्गा ' म्हणजे जाणून घेण्यास, ओळखण्यास जी अत्यंत कठीण आहे अशी. दुर्ग नावाच्या दैत्याचा वध केला म्हणूनही श्रीजगदंबेला दुर्गा म्हटले जाते. भगवती श्रीदुर्गेच्या नऊ रूपांचे वर्णन पुराणांनी केलेले आहे. यांनाच नवदुर्गा म्हणतात. नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये त्यांची रोज एक याप्रमाणे उपासना केली जाते. आपण दररोज यांची थोडी माहिती घेतली. आज नवव्या माळेला नवदुर्गांची पुन्हा एकत्रित माहिती घेऊया.
१. *भगवती शैलपुत्री*
दक्षकन्या सतीने योगमार्गाने देहत्याग केल्यानंतर ती नगाधिराज हिमालय व मेनका या दांपत्याच्या पोटी ' पार्वती ' नावाने जन्माला आली. हिमालयाची कन्या म्हणून तिला ' शैलपुत्री ' म्हणतात.
२. *भगवती ब्रह्मचारिणी*
हिमालयसुता पार्वतीने भगवान शिवशंकरच पती म्हणून प्राप्त व्हावेत, यासाठी घोर तपश्चर्या केली होती. त्यामुळे तिला ' ब्रह्मचारिणी ' नावाने ओळखले जाते.
३. *भगवती चंद्रघंटा*
चंद्रघंटा म्हणजे चंद्राप्रमाणे शीतलता देणारी, आल्हाद देणारी. शरण आलेल्या भक्तांना सर्व प्रकारचे सुख प्रदान करणारी.
४. *भगवती कूष्माण्डा*
कूष्मांड म्हणजे कोहळा. या कोहळ्याचाच बळी देतात देवीच्या यज्ञांमध्ये. हा कोहळा जिला आवडतो ती कूष्माण्डा. दुसरा तात्त्विक अर्थ असा की, कूष्मांड हे एक प्रकारचे पिशाच असते व ते आभासी असते. यालाच Thought form असेही म्हणतात. माया ही अशीच भ्रामक व आभासी असते व ही श्रीजगदंबाच श्रीभगवंतांची मायाशक्ती असल्याने तिला ' कूष्माण्डा ' म्हणतात.
५. *भगवती स्कंदमाता*
स्कंद म्हणजे कार्तिकेय किंवा सनत्कुमार. त्यांची आई ती स्कंदमाता. ही पूर्ण प्रेमळ देवता आहे. शास्त्रामध्ये वर्णिलेले तिचे रूपही छान आहे. तिच्या हातात दोन कमळे व एक हात वरमुद्रेत असतो. एका हाताने तिने कार्तिकेयांना धरलेले असते. जगदंबेचे हे परम प्रेमळ मातृस्वरूप असल्याने तिच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. कार्तिकेयांना सहा मुखे असतात, तसेच आपण सर्व जीव; काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या सहा विकारांद्वारे व्यक्त होत असतो. अशा आपल्यासारख्या पापी, विकारी जीवांचाही सर्व बाजूंनी सांभाळ करणारी म्हणूनच ती जगदंबा स्कंदमाता म्हटली जाते.
६. *भगवती कात्यायनी*
कत नावाच्या ऋषींचे पुत्र कात्य, त्यांच्याच वंशात पुढे थोर ज्ञानी असे कात्यायन ऋषी झाले. त्यांची कात्यायन संहिता प्रसिद्ध आहे.  या ऋषींनी जगदंबेची कठोर तपश्चर्या करून तिला आपली मुलगी हो, म्हणून वर मागितला. तीच ही कात्यायनी. अनुत्तरभट्टारिका श्रीराधाजी व सर्व गोपींनी मिळून भगवान श्रीकृष्ण हे पतीरूपात लाभावेत यासाठी व्रजवनातील अधिष्ठात्री देवता भगवती कात्यायनीचे व्रत केले होते. प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज हे महिनाभर चालणारे व्रत मोठ्या प्रेमाने करीत असत.
७. *भगवती कालरात्री*
भगवान श्रीशिवांचे एक रूप काल म्हणजे मृत्यू, त्याची स्वामिनी ती कालरात्री. ही भगवान शिवशंकरांची संहारक शक्ती आहे. ही भक्तांचे सर्व प्रकारच्या भयांपासून संरक्षण करते.
८. *भगवती महागौरी*
अत्यंत गौरवर्णाची ती महागौरी. हीच भगवती पार्वती होय. गौर वर्ण हा शुद्धतेचे, पावित्र्याचे द्योतक आहे. नित्यपवित्र अशा विशुद्ध सत्त्वगुणाचे मूर्तिमंत रूप म्हणजे महागौरी होय.
९. *भगवती सिद्धिदात्री*
सिद्धी प्रदान करणारी किंवा भक्तांना उपासनेचे योग्य फळ देणारी ती सिद्धिदात्री होय.
या नऊ दुर्गांचे जो रोज स्मरण करतो, तो सर्व संकटांपासून सहज मुक्त होतो, असे मार्कंडेय पुराणात म्हटलेले आहे.
या नवदुर्गांशिवाय तंत्रशास्त्रांमध्ये श्रीजगदंबेच्या आणखी दहा रूपांची उपासना केली जाते. यांना ' दश महाविद्या ' असे म्हणतात. काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी, भुवनेश्वरी, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या दहा रूपांनी श्रीजगदंबा महाविद्या रूपाने जनांच्या कल्याणासाठी प्रकटलेली आहे. या महाविद्या अत्यंत प्रभावी असून भोग-मोक्षदायक आहेत. पण यांची उपासना अतिशय कठीण व कष्टदायक आहे. या सर्व महाविद्यांची पूर्वीच्या काळात आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर उपासना प्रचलित होती. यांची अनेक स्थाने देखील वैभवसंपन्न होती. या महाविद्यांची उपासना अत्यंत गुप्त राखलेली आहे. आज क्वचितच यांची शास्त्रशुद्ध उपासना अगदीच मोजक्या स्थानी होताना दिसते.
देवी भागवतामध्ये माता श्रीअंबेच्या अंश, अंशांश, कला आणि कलांश अशा अनेक रूपांचेही वर्णन केलेले पाहायला मिळते. त्यांमध्ये यच्चयावत सर्व स्त्रिया या श्रीआदिशक्तीच्या कलांशच असल्याने त्यांचा नेहमीच आदर करावा, सन्मानाने वागवावे, अन्यथा जगदंबेच्या रोषाला कारणीभूत व्हावे लागेल असे स्पष्ट म्हटलेले आहे !
भगवती श्रीजगज्जननीच सर्व चराचर सृष्टीच्या रूपाने नटलेली आहे. त्यामुळे आपल्याला दिसणारे, भासणारे, जाणवणारे व प्रत्ययाला येणारे यच्चयावत् सर्व विश्व हे तिचेच रूप आहे, त्यामुळे तिच्या अवतारांची संख्या करणे केवळ अशक्यच आहे !
परमकरुणामूर्ती भगवती श्रीजगदंबेची श्रीवैकुंठनिवासिनीच्या रूपामध्ये महापूजा बांधून भक्तांनी तिच्यासमोर मांडलेला वैष्णव गोंधळ, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज फार बहारीच्या शब्दांमध्ये सांगत आहेत. आज नवरात्रीच्या अष्टमी दिनी, नवव्या माळेला आपण त्याच गोंधळाद्वारे आदिमाया भगवती श्रीनारायणी मातेच्या श्रीचरणीं सादर वंदन करून तिच्याकडे ज्ञान, भक्ती व प्रेमाचा जोगवा मागूया आणि भगवती अंबामातेच्या उदोकारात दंग होऊया !!
सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो ।
पंच प्राण दिवटे दोनी नेत्रांचे हिल्लाळ वो ॥१॥
पंढरपुरनिवासे तुझे रंगीं नाचत असे वो ।
नवस पुरवी माझा मनींची जाणोनिया इच्छा वो ॥२॥
मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारीं वो ।
चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥३॥
बैसली देवता पुढे वैष्णवाचे गाणे वो ।
उद्गारे गर्जती कंठीं तुळसीची भूषणे वो ॥४॥
स्वानंदाचे ताटी धूप दीप पंचारती वो ।
ओवाळिली माता विठाबाई पंचभूती वो ॥५॥
तुझे तुज पावले माझा नवस पुरवी आतां वो ।
तुका म्हणे राखे आपुलिया शरणागता वो ॥६॥

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in  )