22 Nov 2020

मैं कैलास का रहनेवाला हूं


आज कार्तिक शुद्ध अष्टमी, गोपाष्टमी. आजच्याच तिथीला पावन करीत इ.स.१७८५ साली नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर या ग्रामी, पहाटेच्या वेळेस एक दिव्य बालक प्रकट झाले. शिवभक्त श्री.नारायणराव अंतापूरकर व त्यांच्या पत्नीला या दैवी बालकाच्या रूपाने पुत्र लाभला आणि त्याच 'शंकर' नावाच्या बालकाने पुढे जाऊन अनंत जीवांचा उद्धार केला व आजही करीत आहेत.
"मैं कैलास का रहनेवाला हूं ।" असे स्पष्ट सांगणारे, प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. साक्षात् राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज देखील त्यांच्यासारखेच अखंड अवधूती मौजेमध्ये राहात असत. त्यांच्या लोकविलक्षण लीला वाचताना आश्चर्यालाही चमत्कार वाटावा, अशी आपली परिस्थिती होऊन जाते. 
सद्गुरु श्री शंकर महाराज अष्टावक्र होते, त्यांचा डावा पाय मोठा तर उजवा पाय लहान होता. ते म्हणत की, डावा पाय स्वामींचा व उजवा पाय माझा आहे. ते सद्गुरु श्रीस्वामींना 'आई' म्हणत असत व सांगत, " खरोखरीच स्वामीआईने मला मांडीवर घेऊन आपले दूध पाजलेले आहे !" राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे हे परमप्रिय शिष्योत्तम खरोखरीच श्रीस्वामी समर्थ महाराजांसारखेच अद्भुत आणि अतर्क्य लीलाविहारी होते. 
आमच्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा व सद्गुरु श्री शंकर महाराजांचा खूप दृढ स्नेह होता. या दोघांही महात्म्यांचा जिव्हाळ्याचा समान विषय श्री ज्ञानेश्वरी हाच होता.
सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या असंख्य लीला प्रचलित आहेत, पण त्यांचे श्री ज्ञानेश्वरीप्रेम त्यामानाने जास्त प्रचलित नाही. 
नगर ला सरदार मिरीकरांकडे एकदा चालू प्रवचनात स्वत: श्री शंकर महाराजांनी श्री माउलींच्या एकाच ओवीचे पन्नास वेगवेगळे अर्थ सांगून लोकांना आश्चर्यचकित केले होते. पुण्याला रावसाहेब मेहेंदळे यांच्या वाड्यात नेहमी चालणाऱ्या ज्ञानेश्वरी चिंतनास श्री शंकर महाराज उपस्थित असत. त्यावेळीच काही प्रसंगी तेथे प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजही उपस्थित होते. रावसाहेब मेहेंदळे हे प.पू.श्री.काकांचे नू.म.वि.शाळेतील मित्र होते. बहुदा १९४४ साली श्री शंकर महाराज फलटणला येऊन गेले होते. पण त्यावेळी प.पू.श्री.काकांची व त्यांची भेट झाली होती का ? हे आजतरी कोणाला माहीत नाही. प.पू.श्री.शंकर महाराज व प.पू.श्री.उपळेकर काकांच्या भेटीचा मेहेंदळे वाड्यात घडलेला एक प्रसंग मी स्वत: श्री.ज्ञाननाथजी रानडे यांच्या तोंडून ऐकलेला आहे.
श्री शंकर महाराजांनी आपले शिष्य डॉ.धनेश्वर यांच्याकडून श्री ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास करवून घेतला होता. वरकरणी महाराजांचे वागणे-बोलणे वाटत विचित्र असले, तरी तो केवळ दिखावा होता लोकांना टाळण्यासाठी. त्यांचे मद्यपान, धूम्रपान सर्वकाही केवळ नाटक होते. आतून ते सदैव पूर्ण आत्मरंगी रंगलेले व परमज्ञानी असे विलक्षण भक्तश्रेष्ठ होते.
प.पू.श्री.काकांचे उत्तराधिकारी प.पू.श्री.बागोबा महाराज कुकडे हे श्री शंकर महाराजांचेही लाडके होते व त्यांच्या नवरत्न दरबारापैकी एक रत्न होते. श्री शंकर महाराजांचा नवरत्न दरबाराचा फोटो उपलब्ध आहे, त्यात पू.श्री.बागोबा बसलेले पाहायला मिळतात. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी, "श्री शंकर महाराज व आम्ही एकच आहोत", अशी विशेष अनुभूती एका भक्ताला काही वर्षांपूर्वी दृष्टांताने दिली होती. खरोखर हे दोन्ही महात्मे अतिशय विलक्षण असे अवधूतच होते.
प.पू.योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचेही सद्गुरु श्री शंकर महाराजांशी हृद्य नाते होते. प.पू.श्री.मामांच्या मातु:श्री व राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पूर्णकृपांकित कन्या प.पू.पार्वतीदेवी देशपांडे यांच्याकडे श्री शंकर महाराज आवर्जून येत असत. ते मोठ्या प्रेमाने पू.मातु:श्रींच्या हातचे सुग्रास अन्न ग्रहण करीत. नंतर त्यावेळी तरुण असलेल्या पू.श्री.मामांच्या सायकलवर बसून त्यांना हवे तिथे नेऊन सोडायला सांगत असत. प.पू.श्री.मामांना श्रीस्वामी समर्थ महाराज 'सख्या' म्हणत असत. त्यामुळेच पू.मातु:श्री व श्री शंकर महाराजही पू.मामांना 'सख्या' याच नावाने संबोधत असत. 
सद्गुरु श्री शंकर महाराज अक्षरश: काहीही लीला करू शकत असत. त्यांचे अचाट सामर्थ्य पाहून आपण स्तिमितच होऊन जातो. पण दुर्दैवाने म्हणा किंवा कलियुगाच्याच प्रभावाने म्हणा, आजच्या घडीला अनेक भोंदू महाराज, 'आमच्यामध्ये श्री शंकर महाराजांचा संचार होतो किंवा त्यांचे आदेश होतात' असे सांगून लोकांची फसवणूक करताना दिसत आहेत. "संतांचे कधीही संचार होत नसतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहे." भूतपिशाचे किंवा देवतांच्या गणांचे संचार होत असतात, देवांचे किंवा संतांचे कधीही संचार होत नसतात. ते पूर्णत: शास्त्रविरुद्ध आहे. त्यामुळे श्रीस्वामी समर्थ महाराज, श्री गोरक्षनाथ महाराज, श्री शंकर महाराज, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज इत्यादी महान संतांचे नाव घेऊन जर कोणी संचार झाल्याचे सांगत असेल, तर ते धादांत खोटे आहे हे स्पष्ट समजावे. तिथे दुसरेच एखादे पिशाच त्या नावाने संचार करीत असते किंवा ती व्यक्ती लोकांना लुबाडण्यासाठी संचाराचा खोटाच बनाव रचत असते, हे स्पष्ट समजून जावे. एखादा पुरुष गर्भार राहणे जितके अशक्य आहे, तितकाच संतांचा संचार होणे अशक्य आहे. गेल्या शतकातील थोर नाथयोगी संत श्री.गजानन महाराज गुप्ते यांनी आपल्या 'आत्मप्रभा' नावाच्या ग्रंथात असल्या भोंदूगिरीवर प्रचंड ताशेरे ओढलेले आहेत. तेही स्पष्ट सांगतात की, "संतांना कोणाच्याही शरीरामध्ये संचार करण्याची काहीही आवश्यकता नाही."
लोकांच्या असहाय्यतेचा, प्रापंचिक संकटांनी पिडलेल्या जनतेचा ही भोंदू मंडळी पुरेपूर गैरफायदा घेऊन आपला  धंदा वाढवीत असतात. आपल्या कष्टदायक परिस्थितीत काहीतरी आशेचा किरण मिळेल या भाबड्या विचाराने लोकही मग त्यांच्या नादी लागतात व आगीतून अजून फुपाट्यात पडतात. तेव्हा चुकूनही असल्या संचारवाल्या बाया-बाबांच्या भानगडीत कधीही पडू नये, ही नम्र विनंती.
शास्त्रानुसार संतांचे शक्त्यावेश होत असतात, संचार नाही. शक्त्यावेश म्हणजे संतांच्या शक्तीचा काही काळासाठी झालेला दिव्य आवेश. असा शक्त्यावेश होण्यासाठी तो देहही तेवढ्याच तयारीचा लागतो. सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या अवतारकालात, त्यांच्या समक्षही असे शक्त्यावेश झालेले पाहायला मिळतात, पण ते काही क्षणांसाठीच होते. तसेच त्यांच्या अवतारकालानंतर नाशिकच्या श्री.कुलकर्णी मास्तरांमध्ये असलेला त्यांचा शक्त्यावेश अनेक भक्तांनी समक्ष पाहिलेला, अनुभवलेला आहे. तो मात्र खरा शक्त्यावेश होता व आजीवन राहिलेला होता. म्हणूनच तर त्या रूपातील श्री शंकर महाराजांना, विडणीला समाधिस्थ झालेले श्री शंकर महाराजांचे शिष्योत्तम श्री.शिवाजी महाराजही आपली आई म्हणूनच संबोधत असत. परंतु दुर्दैवाने आजमितीस मात्र श्री शंकर महाराजांचा संचार झाल्याचे दाखवून किंवा त्यांनी आदेश दिल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणारेच फार झालेले आहेत. शेवटी 'कालाय तस्मै नम: ।' हेच खरे.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे स्नेही व परमश्रेष्ठ योगिराज सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या महन्मंगल श्रीचरणीं प्रकट दिनानिमित्त सादर साष्टांग दंडवत !!
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

3 Nov 2020

अभ्यासदर्शन ग्रंथसंच ( प्रत्येक महायोग साधकासाठी अत्यंत महत्त्वाचे व आवर्जून अभ्यासलेच पाहिजे असे वाङ्मयसंचित )



भगवती श्री ज्ञानेश्वरीच्या उपासक-अभ्यासकांसाठी अत्यंत मोलाचे व महत्त्वपूर्ण कार्य श्रीवामनराज प्रकाशन करीत आलेले आहे. विशेषत: श्री ज्ञानेश्वरीचे हृदय समजला जाणारा आणि निगूढ साधनारहस्यांमुळे अद्भुत ठरलेला सहावा अध्याय अर्थात् अभ्यासयोग, महायोग यासंदर्भात जेवढे मौलिक आणि विशुद्ध साहित्य श्रीवामनराज प्रकाशनाने प्रकाशित केले आहे, तेवढे आजवर इतर कोणीही प्रकाशित केलेले नाही. म्हणूनच महायोग साधनेच्या बाबतीत 'श्रीवामनराज'चे ग्रंथ हाच अंतिम शब्द मानला जातो व ते यथार्थच आहे ! यासाठी नि:संशय प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची दूरदृष्टी व सुनियोजन आणि प.पू.सौ.शकाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांचे अपार कष्ट कारणीभूत ठरलेले आहेत. 
'योग' व 'बोध' हे जीवरूपी पक्ष्याचे दोन पंख आहेत. या दोन्हींच्या साहाय्यानेच तो आत्मज्ञानाच्या आकाशात स्वच्छंद विहार करू शकतो. यासाठीच प.पू.सद्गुरु श्री.मामा म्हणतात ; " 'योग' आणि 'बोध' यांची सांगड पडल्याशिवाय ज्ञानाला परिपूर्णता येत नाही !" श्रीसद्गुरुकृपा झाल्यावर साधकाचा 'योग' सुरू होतो ; आणि मग श्रीसद्गुरुपरंपरेच्या वाङ्मयाच्या अभ्यासाने त्याला 'बोध' होत असतो. बोधप्राप्तीसाठी साधकाला मनापासून व जाणीवपूर्वक प्रयत्न करावेच लागतात. 
श्रीसद्गुरूंच्या असीम दयाकृपेचे साक्षात् स्वरूप असणाऱ्या श्रीवामनराज प्रकाशनाचे हेच प्रधान उद्दिष्ट आहे. साधक बोधाच्याही अंगाने 'तयार' व्हावा म्हणूनच गेली अडतीस वर्षे श्रीवामनराज प्रकाशन मोठ्या कष्टाने अखंड कार्यरत आहे. आजमितीस अतिशय मोलाची अशी जवळपास अडीचशे प्रकाशने करून या संस्थेने साधक-वाचकांना बोधामृताचे, ब्रह्मरसाचे आकंठ परगुणेच घातलेले आहे ! 
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली अभ्यासयोगाचे विवरण 'आसनालागोनि स्पष्ट' केल्याचा उल्लेख करतात. कारण, साधनेसाठी आवश्यक असे सुयोग्य स्थान, साधनेसाठीचे योग्य आसन, साधनेची प्रत्यक्ष प्रक्रिया आणि साधनेतील अनुभूती ; या चार विभागांचा साधकाला मुळातून अभ्यास करावा लागतो. याला उद्देशूनच याला 'अभ्यासयोग' अशी संज्ञा आहे. याच अतिशय दुर्लभ मानलेल्या पण अत्यंत प्रभावी अशा 'अभ्यासयोगा'च्या अभ्यासाचे एक पुढचे पाऊल म्हणून, श्रीवामनराज प्रकाशन अत्यंत महत्त्वाचा व मौलिक असा *"अभ्यासदर्शन ग्रंथसंच"* घेऊन आपल्या भेटीसाठी येत आहे.
प्रस्तुत 'अभ्यासदर्शन ग्रंथसंचा'मध्ये वर उल्लेखिलेल्या साधनाभ्यासाच्या चार विभागांचे अतिशय मूलगामी व मार्मिक विवरण करणारे पाच ग्रंथ समाविष्ट आहेत. या पाच ग्रंथांची मिळून पृष्ठसंख्या ८१२ आहे. याशिवाय स्वतंत्र अभ्यासदर्शन सूची १५२ पृष्ठांची आहे. त्यामुळे संचाची एकूण पृष्ठसंख्या ९६४ एवढी झालेली आहे. अतिशय मोठा व महत्त्वपूर्ण असा हा संच, सप्तरंगी आकर्षक बॉक्स व चार देखण्या बुकमार्क्ससह केवळ ₹ ५०० /- या अल्प सवलतमूल्यात साधकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
श्री ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील श्लोक क्रमांक अकरा ते चौदा आणि वीस-एकवीस अशा सहा श्लोकांच्या विवरणात आलेल्या महत्त्वाच्या ओव्यांवरील प.पू.श्री.शिरीषदादांची एकूण सव्वीस प्रवचने ह्या अभ्यासदर्शन ग्रंथसंचात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. एखाद्या विषयाचा सांगोपांग अभ्यास करणारा परिपूर्ण शोधप्रबंध असावा ; तसे प.पू.सद्गुरु श्री.दादांचे हे पाचही ग्रंथ, साधकांसाठी आवश्यक असणारा अभ्यासयोगाचा समग्र चिंतनविषय, अगदी मुळातून, त्यातील सर्व खाचाखोचांचा विचार करीत समजावून सांगतात. 
श्री ज्ञानेश्वरीच्या आजवरच्या साडेसातशे वर्षांच्या इतिहासात, अभ्यासयोगाचे विविधांगी विवेचन करणारा अशा प्रकारचा अत्यंत समृद्ध, देखणा व नि:संशय उपयोगी ग्रंथसंच प्रथमच निर्माण झालेला आहे. या ग्रंथसंचात योगविभवभांडार मानल्या गेलेल्या अभ्यासयोगाचे, महायोगाचे अत्यंत स्वानुभूत आणि साधार असे विलक्षण विवेचन मांडलेले आहे. साधनेचे स्थान, आसन, साधनेची प्रक्रिया आणि साधनेतला अनुभूतिक्रम या सर्वांच्या विषयीच्या इतक्या बारकाव्यांची प.पू.सद्गुरु श्री.दादांनी यात विस्ताराने चर्चा केली आहे, की ते वाचून आपण अक्षरश: स्तिमितच होऊन जातो. विवेचनाच्या ओघात, प.पू.श्री.दादा असंख्य शास्त्रसिद्धांत, साधनेशी संबंधित इतर महत्त्वपूर्ण बाबी आणि प्रक्रिया यांचा अप्रतिम ऊहापोह करतात. एवढे विषय समजून घेण्यासाठी एरवी आपल्याला शेकडो शास्त्रग्रंथांचा सखोल अभ्यास करावा लागेल, जे आपल्यासारखा कोणालाही केवळ अशक्यच आहे. हेच या संचाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल की ; एखाद्या साधकाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी जेवढे म्हणून ज्ञान आवश्यक आहे, तेवढे सोदाहरण, सविवरण या एकाच संचात आपल्याला एकत्र अभ्यासायला मिळत आहे. म्हणूनच हा अभ्यासदर्शन संच महायोगाच्या, कृपायोगाच्या प्रत्येक साधकाने तसेच योगशास्त्राच्या अभ्यासकाने मनापासून व निगुतीने अभ्यासायलाच हवा इतका महत्त्वाचा झालेला आहे.
आपण जी महायोगाची साधना करतो, तिचे श्रेष्ठत्व आणि महत्त्व, त्या साधनेची सुयोग्य प्रक्रिया, त्यांतील Do's आणि Don'ts, साधनेला पूरक ठरणाऱ्या व आवश्यक अशा इतर बाबी, साधकाचा आहार-विहार, साधनेची पथ्ये-कुपथ्ये, साधकांकडून नकळत सर्रास होणाऱ्या चुका व त्यांचे दुष्परिणाम, त्या चुका टाळण्याच्या नेमक्या युक्त्या आणि साधनेचा आनंद वाढविणाऱ्या इतर अनेक गोष्टींचा, या संचात करण्यात आलेला सविस्तर विचार नि:संशय अद्भुतच उतरलेला आहे. महायोग साधनेचे विश्व किती अलौकिक आणि दैवी असते, त्याची यथार्थ जाणीव या संचाच्या सप्रेम अभ्यासाने कोणाही साधकाला नक्कीच येईल. हीच जाणीव जितकी आपल्या मनात अधिकाधिक रुजेल, वाढेल ; तितकीच आपली साधनाही सौख्यदायक होऊन आपल्या आत मुरत जाईल. मग आपला रोजचा, करून करून सवयीचा झालेला निरस प्रपंचही निरतिशय आनंदाची खाणच होऊन जाईल. हा या संचाचा फार मोठा लाभ आहे.
भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींचा शब्द हा अभ्यासयोगात 'परम' मानलेला आहे. त्यांच्या इतके परिपूर्ण आणि विलक्षण आजवर कोणीही बोललेले नाही आणि पुढेही कोणी बोलू शकणार नाही. श्री माउलींच्या एकेका शब्दात अर्थाचे आभाळ सामावलेले असते. ते जाणून घेणे श्री माउलींच्या परमकृपेशिवाय केवळ अशक्यच आहे. अभ्यासयोगाच्या बाबतीतले हे गुरुगम्य रहस्य प्रस्तुत अभ्याससंचाच्या रूपाने, प.पू.सद्गुरु श्री.दादांच्या माध्यमातून, सद्गुरु श्री माउलींच्या अहैतुकीकृपेने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे.
आपण जी दिव्य साधना करतो आहोत तिच्या श्रेष्ठत्वाची, अलौकिकत्वाची जाणीवच जर आपल्या आत नसेल, तर आपल्याकडून त्या दुर्लभ साधनेची हेळसांड होईल आणि वर्षानुवर्षे कष्ट करूनही आपल्या पदरात काहीच अनुभव पडणार नाहीत. हे टाळण्यासाठी आणि साधना निर्विघ्नपणे पूर्णत्वास जाण्यासाठी, प्रत्येक साधकाने साधनेचे अंतरंग रहस्य समजून-उमजून घेणे अगत्याचेच असते. त्यासाठी प्रस्तुत सहा पुस्तकांचा अभ्यासदर्शन ग्रंथसंच फार मोलाची भूमिका बजावेल यात अजिबात शंका नाही. 
शाळेचा अभ्यास जसा आपण मन लावून, महत्त्वाच्या भागावर खुणा करून, आवश्यक तेथे त्याच्या नोटस् काढून आणि पुन्हा पुन्हा वाचन करून करायचो, तसाच प्रस्तुत ग्रंथसंचातील पाच ग्रंथांचा क्रमाने आणि निष्ठेने अभ्यास केला ; तर महायोगाच्या मूलभूत सर्व अंगांचा उत्तम परिचय होईल. या पाच ग्रंथांपेक्षा वेगळे असे काही समजून घेण्याची मग आवश्यकताच उरणार नाही. साधकांसाठी आवश्यक व मुद्दाम अभ्यासावेत असे सर्व मुद्दे या पाच ग्रंथांमधून सुस्पष्टपणे व पूर्णत्वाने प्रकट झालेले आहेत. 
आता आपण या ग्रंथसंचातील सहा ग्रंथांची थोडक्यात माहिती करून घेऊ या.
१. जो संती वसविला ठावो 
सहाव्या अध्यायातील अकराव्या श्लोकाच्या विवरणातील ओवी क्र.१६४ ते १८० या ओव्यांवरील मार्मिक अशी बारा प्रवचने या ग्रंथात संकलित केलेली आहेत. साधनेच्या स्थानाचा इतका विविधांगी व नेमका परामर्श इतरत्र कुठेही वाचायला मिळणार नाही. या तीनशे छत्तीस पानांच्या ग्रंथात, पू.श्री.दादांनी साधकांसाठी आवश्यक असलेल्या आहार-विहारावरही अतिशय मार्मिक प्रकाश टाकलेला आहे. आपल्या दैनंदिन साधनेत या माहितीचा फार लाभ होईल.
२. होआवें आसन ऐसे
सहाव्या अध्यायातील अकराव्या श्लोकाच्या विवरणातील ओवी क्र.१८१ ते १८५ या पाच ओव्यांवरील गूढार्थ स्पष्ट करणाऱ्या तीन प्रवचनांचे संकलन. आसन संकल्पनेचा सर्वांगीण विचार, आसनांचे प्रकार, आसनक्रमाचे विवरण अशा अनेक विलक्षण गोष्टींचा ऊहापोह या ग्रंथामधून प.पू.श्री.दादांनी फारच बहारीने केलेला आहे.
३. विषयांचा विसर पडे
यथोचित आसनावर बसून केलेल्या साधनेच्या प्रत्यक्ष प्रक्रियेचा भाग सांगणारी बोधप्रद चार प्रवचने. महायोग साधनेत पडणारा विषयांचा विसर आणि घडणारी मनाची घडी यावर विस्तृत आणि विविध शास्त्रीय संज्ञांचे सुरेख विवरण करणारे मर्मग्राही विवेचन. साधना करताना सर्वसामान्यपणे येणाऱ्या अनेक शंकांची सुस्पष्ट उत्तरे यात आलेली आहेत.
४. अभ्यासाची पाखर पडे
साधनाकालात भगवती शक्तीच्या विविध क्रिया घडल्याने शरीर व मनाच्या पातळीवर जी लक्षणे दिसतात, त्यासाठी श्री माउलींनी 'पाखर' असा शब्दप्रयोग केला आहे. साधनेतील या विविध अद्भुत अनुभूतींचा विशेष लेखाजेखा पू.श्री.दादा या ग्रंथातील चार प्रवचनांमधून मांडतात. आपले साधन अधिक डोळसपणे, अधिक जाणीवपूर्वक होण्यासाठी ही 'अभ्यासाची पाखर' शांतपणे समजून घेणे अगत्याचेच आहे.
५. म्हणोनि आसनाचिया गाढिका
हा ग्रंथ म्हणजे साधनेच्या आसनाचे आणखी महत्त्वाचे आणि आजवर कधीच कुठेही प्रकट न झालेले अपूर्व संदर्भ स्पष्ट करणाऱ्या तीन प्रवचनांचे फारच विशेष संकलन आहे. यात आलेले आसनाचे तीन प्रकार, एरवी कुठेही वाचायला न मिळणारी शक्तिपात दीक्षेची प्रत्यक्ष प्रक्रिया, साधनेत अनुभवाला येणारा चक्रशुद्धीचा, मातृकासिद्धीचा क्रम इत्यादी गूढ विषयांचे अद्भुत आणि अलौकिक संदर्भ वाचून आपण अक्षरश: चकितच होऊन जातो. हे पूर्ण गुरुगम्य मानलेले रहस्य आजवर पहिल्यांदाच प्रकाशित होत आहे. त्यामुळे साधनाभ्यासाच्या दृष्टीने हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. सध्याच्या काळात इंटरनेट व सोशलमिडियावर महायोग विषयावर सर्रास फिरणाऱ्या बिनबुडाच्या व अशास्त्रीय माहितीच्या पार्श्वभूमीवर तर विशुद्ध ज्ञान देणाऱ्या या संचाचे महत्त्व मला पुन:पुन्हा अधोरेखित करावेसे वाटते.
६. अभ्यासदर्शन सूची
वरील पाच ग्रंथांमध्ये आलेल्या विविध विषयांच्या एकूण सात प्रकारच्या सूची यात समाविष्ट आहेत. त्यामुळे एखादा विषय कुठल्या ग्रंथात कुठे आलेला आहे, हे चटकन् शोधण्यासाठी ही सूची खूपच उपयुक्त आहे. यातील 'पारिभाषिक शब्द, व्याख्या सूची' व 'विशेष विवरण सूची' या दोन्ही सूचींचा सखोल अभ्यासात महत्त्वाचा हातभार लागेल.
या सहा ग्रंथांसाठी सप्तरंगी आकर्षक असा कार्डबोर्ड बॉक्स व चार सुरेख बुकमार्क्सही देण्यात आलेले आहेत. या ९६४ पानांच्या बृहद् संचाचे मूळ मूल्य ₹ ७२०/- असून, तो सवलतीत केवळ ₹५००/- एवढ्या अल्पमूल्यात साधकांसाठी उपलब्ध आहे.
महायोगाचा, अभ्यासयोगाचा समग्र अभ्यास करण्यासाठी तसेच या निगूढानुभूतींनी भरलेल्या साधनेच्या अथांग आनंदसागरात विहार करण्यासाठी, आधी या अभ्यासदर्शन ग्रंथसंचाचाच नीट अभ्यास करणे आवश्यक आहे. महायोगाचा एक साधक म्हणून हे आपले कर्तव्यच नाही का ? तेव्हा त्वरा करावी आणि या दीपावलीच्या पावन पर्वकाली, आपले अंत:करण अद्वितीय बोधप्रकाशाने संपन्न होण्यासाठी प्रस्तुत अभ्यासदर्शन ग्रंथसंच खालील क्रमांकावर संपर्क करून तातडीने मागवून घ्यावा, ही प्रेमळ प्रार्थना !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
( _ग्रंथसंचासाठी संपर्क- श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919_ )