18 Oct 2018

श्रीसंत साईबाबा महाराज



आज दसरा, सद्गुरु श्री साईबाबा महाराजांची शंभरावी पुण्यतिथी. विजयादशमी, मंगळवार दि.१५ ऑक्टोबर १९१८ रोजी दुपारी विजयमुहूर्तावर त्यांनी शिर्डी येथे आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली होती. आज त्यांच्या देहत्यागाला शंभर वर्षे पूर्ण झाली.
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींनी श्रीमद् भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातील बत्तीसाव्या श्लोकाच्या विवरणात फारच बहारीची रचना केलेली आहे. त्यातील एका ओवीत एक विशेष सिद्धांत साक्षात् श्रीभगवंतांच्याच मुखाने सांगताना श्री माउली म्हणतात,
म्हणोनि कुळ जाति वर्ण ।
हें आघवेंचि गा अकारण । 
एथ अर्जुना माझेपण ।
सार्थक एक ॥ज्ञाने.९.३२.४५६॥
श्रीभगवंत सांगतात, "अर्जुना, एखादा छोटासा ओहोळ किंवा नाला जेव्हा गंगेला मिळतो तेव्हा तो आपले मूळचे अस्तित्व टाकून गंगारूपच होऊन ठाकतो. अग्नीत टाकलेली खैरचंदनादी वेगवेगळी लाकडे एकदा अग्निरूप झाली की त्यांचे स्वरूप हे केवळ अग्नी हेच आहे, भिन्नत्व संपले त्यांचे. त्याप्रमाणे एखादा भक्त; कोणत्याही का जातीचा, धर्माचा, वंशाचा, कुळाचा असेना, तो माझ्याशी एकरूप झाला की त्याचे ते मागील सर्व हारपून जाते व तो केवळ माझेच स्वरूप होऊन ठाकतो. त्याला माझ्याहून भिन्न अस्तित्वच नसते !"
भक्तिशास्त्राचा, प्रत्यक्ष श्रीभगवंतांच्या श्रीमुखातून आलेला हा महन्मंगल सिद्धांत जर आपल्याला नक्की पटत असेल तर श्री साईबाबा मुसलमान होते, हे चुकूनही आपल्या मनात यायला नको. आणि जर तसे ते येत असेल तर आपल्याला भक्तीची बाराखडी देखील अजून कळलेली नाही हाच त्याचा स्पष्ट अर्थ आहे. लय टाईम आहे अजून आपल्याला या प्रांतात शिरकाव व्हायला, हेच सत्य !
आजवरच्या इतिहासात पाहिले तर, प्रत्येक महात्म्याला जनांच्या, समाजाच्या विनाकारण त्रासाला सामोरे जावेच लागलेले आहे. किंबहुना ती कसोटीच आहे महात्मेपणाची, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण काही महात्म्यांना देहत्यागानंतरही त्याच दिव्यातून हकनाक जावे लागते ; श्रीसंत साईबाबा, श्री रामदास स्वामी महाराज, श्री शिवछत्रपती ही काही त्याची उदाहरणे. अर्थात् देहात असतानाही असल्या भंपकपणाचे त्यांना काहीच देणे-घेणे नसते, तर देह ठेवून विश्वाकार झाल्यावर त्यांना काय घंटा फरक पडणार त्याचा ? रस्त्याने कुत्री भुंकली म्हणून हत्ती काय चाल बदलतो की त्यांना घाबरून रस्ताच सोडतो ? अरे हट् ! जे देहीच विदेहत्वाला आले, अंतर्बाह्य हरिरूप झाले, त्यांना देहाचाच विचार करणा-या असल्या तद्दन मूर्खांचा कसलाही त्रास कधीच होत नसतो. कर्म परीक्षा मांडते ते या मूर्खांचीच. त्यांच्या आयुष्याचे पार भंगार करूनच सोडते त्यांचे हे भयानक संतनिंदेचे कर्म. असो. माझी वाचा मी विटाळून घेत नाही आजच्या चांगल्या मुहूर्तावर.
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील एक अत्यंत अलौकिक व महान अवतारी विभूतिमत्त्व म्हणजे श्री साईबाबा होत. स्वत: श्रीस्वामी महाराजांनीच श्री आनंदनाथ महाराजांकरवी त्यांना प्रसिद्धीला आणले व अनेकांना त्यांच्या दर्शनाला जाण्यास प्रेरित केले होते. यातच त्यांचे अलौकिकत्व सिद्ध होते. ते श्रीदत्तपरंपेरतील एक विलक्षण अधिकारी असे अवतारच होते. आमच्या श्रीगुरुपरंपरेतील सर्व महात्म्यांनाही श्री साईबाबांचा नितांत प्रेमादर आहे. पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज त्यांना बंधुतुल्य मानत. श्रीसंत उपळेकर महाराजांनाही त्यांच्याबद्दल प्रेम होते. श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज नेहमी श्री बाबांचा उल्लेख करीत. त्यांच्या ठायी श्री साईबाबांचे दर्शनही काही भाग्यवान साधकांना झालेले आहे. पू.मामांच्या शेवटच्या काळात कल्याण रेल्वे स्टेशनवर श्री साईबाबा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा पू.मामांना निरोप द्यायला म्हणून प्रत्यक्ष प्रकटले होते. पू.शिरीषदादा व काही साधक त्या प्रसंगाचे साक्षीदार आहेत. अशा थोर महात्म्याविषयी काही लोक जेव्हा अनुदार उद्गार काढतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. स्वत:चे 'स्वरूप'ही न जाणणा-या, आत्मज्ञानाच्या नावाने 'आनंद'च असणा-या एखाद्याने, साक्षात् श्रीहरींचेच स्वरूप असणा-या श्री साईबाबांच्या विषयी आक्षेप घ्यावेत, याला त्या माणसाची दुस्तर कर्मगतीच म्हणतात दुसरे काही नाही. मोठ्या पदावर बसलेले हे लांडगेच जणू, लोकांची दिशाभूल करणारे. असो, त्यांना या पापाचे योग्य ते प्रायश्चित्त भोगावेच लागेल, कोणी सुटत नसते संतनिंदेच्या महापातकातून. श्रीभगवंत आपल्या भक्तांचे अभिमानी असतात, ते कधीच अशांना क्षमा करीत नाहीत. न मे भक्त: प्रणश्यति । हे काय गंमत म्हणून म्हटलेले नाही त्यांनी.
श्री साईबाबांनी लौकिक अर्थाने आज देह ठेवलेला असला तरी त्यांचे अस्तित्व आजही जाणवते. असंख्य भाविकांना त्यांच्या कृपेचे शेकडो अनुभव आजही येत असतात ; व त्यांच्या अनाठायी निंदेचे पातक मस्तकी घेणा-या या लोकांच्या नाकावर टिच्चून पुढेही येतच राहणार आहेत, यात मला अजिबात शंका नाही. लोकांना अनुभव येतात म्हणूनच तर गर्दी वाढते आहे ना शिर्डीची ? की वेळ जात नाही म्हणून लोक येतात ? एवढा साधा विचारही करत नाहीत हे लोक.
"शिरडीस ज्याचे लागतील पाय टळतील अपाय सर्व त्याचे", असे आपले भक्तवात्सल्य ब्रीद प्रेमाने जपणा-या, भगवान श्रीरामरायांचे निस्सीम भक्त असणा-या, राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील श्रीसंत साईबाबा या महान विभूतिमत्त्वाला शताब्दी पुण्यतिथी दिनी, मी श्रद्धाभक्तिपूर्वक मनोभावे दंडवत घालतो आणि त्यांच्या श्रीचरणीच तुलसीदल रूपाने विसावतो !!
( लेखासोबत श्रीसंत साईबाबांचे अस्सल छायाचित्र. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

17 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार -अष्टमोल्लास



आज नवरात्रीची आठवी माळ, आज भगवती श्रीमहागौरीची उपासना केली जाते. भगवती महागौरी म्हणजेच भगवान श्रीगणेश व श्रीकार्तिकेयांची माता, जगदंबा पार्वती होय.
नवरात्रीतील अष्टमी व नवमीला विशेष महत्त्व असते. म्हणूनच तिला महाष्टमी म्हणतात. अष्टमीच्या रात्री कोकणस्थांकडे महालक्ष्मी स्थापून रात्री जागर केला जातो.
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज या अष्टमीच्या दिनी भगवती श्रीजगदंबेची स्तुती करताना म्हणतात,
अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायणी ।
श्रीरामवरदायनी सह्याद्री पर्वतीं हो ।
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ।
स्तनपान घेउनि सुखें निवालों अंत:करणीं हो ॥८॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"अष्टमीला भगवान श्रीनारायणांची शक्ती आदिमाया भगवती अष्टभुजा नारायणीची मी उपासना करतो. तीच पार्वती रूपाने सीतेच्या शोधात फिरणा-या भगवान श्रीरामरायांना वर देण्यासाठी सह्याद्री पर्वतावर प्रकटली व श्रीरामवरदायिनी म्हणून प्रसिद्धी पावली. महाबळेश्वरजवळ पार नावाच्या गावात श्रीरामवरदायिनीचे स्थान आहे. तसेच तुळजापूरच्या श्रीभवानीमातेलाही रामवरदायिनीच म्हणतात.
आदिजगदंबा महागौरी श्रीनारायणी ही प्रेमळ माता आहे व मी तिचे लेकरु आहे. तिच्या करुणेने अभिभूत होऊन, तिच्या मातृस्वरूपाने मोहून जाऊन मी तिच्या चरणी शरण गेलो व तिच्या प्रसादरूप कृपास्तन्याचे मनसोक्त पान करून मी आता अंत:करणापासून सुखाने निवालो आहे, समाधान पावलो आहे" ; असा आपला स्वानुभव त्या जगदंबाआईचेच नाम मोठ्या आदराने गर्जत सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज येथे सांगत आहेत.
भगवती श्रीजगदंबेचा उपनिषदात वर्णिलेला अवतार म्हणजे भगवती उमा हैमवती होय. या भगवती उमेची व त्यानंतर झालेल्या योगमाया आदी अवतारांची कथा तसेच या सर्व अवतारांचे मूळ असणा-या भगवान श्रीराधा-दामोदरांच्या आपल्या संतांनी केलेल्या मनोहर वर्णनाचा आस्वाद खालील लिंकवरील लेखातून आवर्जून घ्यावा ही विनंती.
[ आदिशक्ती भगवती श्रीजगदंबा मातु:श्रींच्या असीम दयाकृपेने कालच्या अष्टमीच्या रात्री माझ्या ब्लॉगने एक लाख व्ह्यूजचा टप्पा ओलांडला. आपणां सर्व वाचकांचे मी त्यासाठी मनापासून आभार मानतो. आजच्या काळात एखाद्या शुद्ध आध्यात्मिक ब्लॉगस्पॉटला असा भरभरून प्रतिसाद मिळणे ही नि:संशय श्रीसद्गुरूंचीच करुणाकृपा आहे ! यापुढेही आपला असाच पाठिंबा मला सदैव मिळत राहो हीच प्रार्थना. ]
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
अष्टमोल्लास

https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_8.html

आदिशक्तीचा उदोकार - नवमोल्लास



( उद्या महानवमी व विजयादशमी एकाच दिवशी आल्याने नवमीचा लेख आजच पोस्ट करीत आहे. )

आज नवरात्रीची नववी माळ, भगवती सिद्धिदात्रीची आज उपासना केली जाते. घटोत्थापन करून नवरात्रीची सांगता महानवमीला करतात.
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजही आपल्या नवरात्रीच्या पदात सांगतेचा उल्लेख करताना म्हणतात,
नवमीचे दिवशीं नवा दिवसांचें पारणें हो ।
सप्तशतीचा जप होम हवनादी करुनी हो ।
पक्वान्नें नैवेद्यें केलें कुमारीपूजन हो ।
आचार्य ब्राह्मण तृप्त केले जगदंबेनें हो ॥९॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"नवमीच्या दिवशी नऊ दिवसांच्या नवरात्रीच्या उपवासाचे पारणे केले जाते. सप्तशतीचे होमहवन, जपजाप्य करून ही सांगता केली जाते. जगदंबेच्या नैवेद्याला विविध पक्वान्ने करून, जगदंबास्वरूप कुमारिकापूजन व ब्राह्मणसवाष्ण भोजन वगैरे आपापल्या कुळाचारानुसार करून आईची सेवा संपन्न केली जाते. अशा प्रकारे नऊ दिवसांचे हे नवरात्र मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरे केले जाते."
आपण गेले नऊ दिवस श्रीसद्गुरूंच्या कृपेने भगवती श्रीजगदंबामातु:श्रींचा हा उदोकार करीत आहोत. त्याचीही उद्या सानंद सांगता होणार आहे. खालील लिंकवरील लेखात नवरात्रीच्या अधिष्ठात्री असणा-या नवदुर्गांची सविस्तर माहिती दिलेली असून दशमहाविद्यांचीही तोंडओळख करून दिलेली आहे. लेखा सोबतच्या फोटोमध्ये नवदुर्गांच्या सुरेख प्रतिमाही आपल्याला पाहायला मिळतील. आज महानवमीच्या पावन पर्वावर आपण जगत्रयजननी आदिशक्ती भगवती श्रीजगदंबामातु:श्रींचा जयजयकार करून तिच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष - 8888904481

आदिशक्तीचे कवतुक मोठेंनवमोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_9.html?m=1

16 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार - सप्तमोल्लास



आज नवरात्रीची सातवी माळ, भगवती कालरात्रीची आज आराधना केली जाते. सर्वसंहारक भगवान श्रीमहाकालांची शक्ती तीच भगवती कालरात्री होय. महामृत्यूची अधिष्ठात्री देवताही भगवती कालरात्रीच आहे.
सातव्या माळेला समर्थ श्री रामदास स्वामी महाराज सप्तशृंगनिवासिनी भगवती श्रीजगदंबिकेच्या दर्शनाला जातात व तिचे गुणवर्णन करताना म्हणतात,
सप्तमीचें दिवशीं सप्तशृंग गडावरी हो ।
तेथें तूं राहासी भोंवतीं पुष्पें नानापरी हो ।
जाई जुई शेवंती पूजा देखिली बरवी हो  ।
पडणी पडतां झेलुनी घेसी वरिचेवरी हो ॥७॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"आई जगदंबे, नवरात्रीच्या सातव्या दिवशी तुझ्या लाडक्या सप्तशृंग गडावर मी दर्शनाला आलो आहे. काय मनोहर आहे तुझे हे स्थान आणि तुझे भव्य रूप देखील ! जाई, जुई, शेवंती यांसारख्या सुगंधी पुष्पांनी तुझी अप्रतिम पूजा बांधलेली आहे. माझे डोळे सुखावले ही पूजा पाहून.
आई, तुझे महिमानच असे अलौकिक आहे की, समजा एखादा आपल्याच पूर्वकर्मांच्या कचाट्यात सापडून, आहे त्या स्थानावरून खाली पडू लागला, त्याचे पतन होऊ लागले आणि त्याने जर तुला कळवळून हाक मारली, तर तू धावत जाऊन त्याला वरच्यावर झेलतेस आणि पुन्हा सुखरूप करतेस, स्वस्थ करतेस. तुझ्या करुणेला ना अंत ना पार ! तुझा हा खरोखरीच अद्भुत महिमा जाणून मीही तुझेच नाम गात आता नाचतो आहे. आई, माझ्याकडे लक्ष देशील ना गं ?"
भगवती अंबामातेचेच एक रूप म्हणजे भगवान शिवांची प्रथम पत्नी भगवती सती होय. दक्ष प्रजापतींची ही कन्या. दक्षाच्या यज्ञात तिचा अपमान झाला व ते सहन न होऊन तिने त्या यज्ञातच देहत्याग केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवगणांनी दक्षयज्ञाचा विध्वंस केला. श्रीशिवांनी सतीचा देह खांद्यावर घेऊन उन्मत्तपणे भ्रमण करायला सुरुवात केली. त्यावेळी श्रीविष्णूंनी तिच्या देहाचे तुकडे केले व ते तुकडे जेथे जेथे पडले तेथे तेथे एकेक शक्तिपीठ निर्माण झाले. सोबतच्या लेखात भगवती सतीची ही रोचक कथा व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांची थोडक्यात माहिती दिलेली आहे. तसेच भगवती सरस्वतीच्या पूजनाचेही माहात्म्य कथन केले आहे. आजच्या सप्तमी-महाष्टमीच्या पर्वावर भगवती श्रीजगदंबा मातु:श्रींच्या श्रीचरणीं आपण मनोभावे दंडवत घालून तिच्याच नामगजरात मग्न होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
सप्तमोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_7.html?m=1

15 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार - षष्ठोल्लास



आज नवरात्रीची सहावी माळ, भगवती कात्यायनीमातेची आज उपासना केली जाते.
समर्थ श्री रामदास स्वामी महाराज आपल्या नवरात्रीच्या पदातील सहाव्या चरणात म्हणतात,
षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ।
करीं घेउनी दिवट्या हर्षें गोंधळ घातला हो ।
कवडीया दर्शनें हार मिरवे मुक्ताफळा हो ।
जोगवा मागतां प्रसन्न जाली निजभक्तां हो ॥६॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"नवरात्रीच्या सहाव्या दिवशी गळ्यात कवड्यांची माळ घालून हाती दिवटी, पोत व परडी घेऊन आईचा गोंधळ घालून जोगवा मागण्यात तिचे भक्त मोठ्या आनंदाने रममाण झालेले आहेत. आई जगदंबेच्या नावाचा गजर करीत, उदोकार करीत नाचत आहेत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झालेली आदिमाया जगदंबा त्यांना इच्छित वरप्रसाद देऊन संतुष्ट करीत आहे !"
जोगवा मागणे हा देवीच्या उपासनेतला फार विशेष असा उपचार आहे. या जोगव्याचे तात्त्विक तसेच आध्यात्मिक महत्त्व प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी आपल्या "अनादि निर्गुण प्रकटली भवानी" व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या "आदिशक्तिचे कवतुक मोठें" या दोन अप्रतिम ग्रंथांमधून सविस्तर वर्णिलेले आहे. देवीच्या उपासक व अभ्यासकांनी ही दोन्ही पुस्तके आवर्जून वाचावीत. पू.शिरीषदादांनी तर जोगव्यामध्ये असलेल्या प्रत्येक लहानसहान मुद्द्यावर अतिशय सविस्तर विवरण केलेले आहे. खरोखरीच त्यात वर्णन केलेला जोगव्याचा भावार्थ व आध्यात्मिक अर्थ जाणून आपण हरखूनच जातो, इतके निगूढ अभिप्राय या दोन्ही ग्रंथांमध्ये आलेले आहेत.
भगवती जगदंबामातु:श्रींचा विशेष अवतार म्हणजे भगवती श्रीरेणुकामाता. खालील लिंकवरील लेखात आई रेणुकेच्या संपूर्ण चरित्राचा आढावा घेतलेला आहे. आजच्या पावन दिनी प्रेमभराने "आई" अशी तिला हाक मारून आपणही तिचे चरित्र-यशोगान करून धन्य होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
षष्ठोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_6.html?m=1

14 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार - पंचमोल्लास



आज नवरात्रीची पाचवी माळ. भगवती श्रीस्कंदमातेची आज आराधना केली जाते. भगवती स्कंदमाता म्हणजे देवसेनापती कार्तिकेय यांची माता, भगवती पार्वती ! नवदुर्गांपैकी ही एकमात्र भगवती आहे जिच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. अहो, ती साक्षात् परमप्रेममयी माता आहे, तिला कशाला शस्त्र हवे? ती आपल्या प्रेमानेच जग जिंकते, शस्त्राची कधीही तिला गरजच नाही पडत. अशा या मातहृदयी प्रेममय भगवती स्कंदमातेच्या चरणीं आपण मनोभावे दंडवत घालू या !
काल चौथी माळ असूनही, ललितापंचमी म्हणून आपण नवरात्रीच्या पदाच्या पाचव्या चरणाचा विचार केला. आज त्यामुळे राहिलेले चौथे चरण पाहू. सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज आपल्या पदाच्या चौथ्या चरणात म्हणतात,
चतुर्थीचे दिवशीं विश्वव्यापक भवानी हो ।
नवरात्र करिती निराहार निर्वाणीं हो ।
त्यांसी तूं प्रसन्न जगन्माता मनमोहिनी हो ।
भक्तांची तूं माउली सुरवर येती लोटांगणीं हो ॥४॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"संपूर्ण विश्व व्यापून राहिलेल्या जगन्माते भवानी, तुझे भक्त नवरात्रात निराहार उपवास करून तुझी आराधना करतात. तू देखील त्यांच्या त्या अनन्यभक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपाप्रसाद करतेस. श्रेष्ठ सुरवर देखील तुझ्या चरणी लोटांगण घालतात, मीही त्यामुळे आनंदाने तुझे नाम गात तुला सर्वभावे दंडवत घालतो !"
भगवती श्रीजगदंबेच्या लीलांचे रसपूर्ण वर्णन करणा-या, भगवान मार्कंडेयमुनींच्या पुराणातील सातशे श्लोकांच्या श्रीदुर्गासप्तशतीला देवीउपासकांमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. या सप्तशतीत वर्णिलेल्या महाकाली, महासरस्वती व महालक्ष्मी या तिन्ही देवी रूपांची थोडक्यात माहिती खालील लिंकवरील लेखात आहे.
आपल्या मराठी संतांनी भगवान श्रीपांडुरंगांच्या रूपातच भगवती श्रीजगदंबामातु:श्रींची कल्पना करून त्यांची उपासना केलेली आहे. पंढरीची सावळी विठाईच माउली बनून या भक्तांचे लळे पुरवीत आहे. म्हणूनच तिच्या प्रेमवात्सल्याचे भरभरून वर्णन संतांनी केलेले आहे. त्या सुमधुर अमृतरसाचा आस्वादही खालील लिंकवरील चतुर्थोल्लासातून घ्यावा ही सादर विनंती !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
चतुर्थोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_5.html?m=1

13 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार -चतुर्थोल्लास



आज नवरात्रीची चौथी माळ, परंतु पंचमी तिथी लागलेली असल्याने पंचांगानुसर आजच ललितापंचमी व्रत आहे. त्यामुळे आपणही आज भगवती श्रीललिता महात्रिपुरसुंदरीच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊ या. चौथ्या माळेला भगवती श्रीकूष्मांडादेवीची पूजा करायची पद्धत आहे.
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज आपल्या पदात म्हणतात,
पंचमीचे दिवशीं व्रत उपांगललिता हो ।
भक्त संतोषती आईचें पूजन करितां हो ।
रात्रीचे समयीं कीर्तन जागरण हरिकथा हो ।
आनंदें नाचती प्रेम आलेंसें निजभक्तां हो ॥५॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
(आज चौथी माळ असूनही ललितापंचमी व्रतामुळे आपण समर्थांच्या पदाचे पाचवे चरण विचारात घेत आहोत.) समर्थ म्हणतात, "नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीचे भक्त मोठ्या उत्साहाने उपांगललितेचे व्रत करतात. अतीव आनंदाने भगवती श्रीललितेचे स्वरूप मानले गेलेल्या कुंकवाच्या करंड्याच्या झाकणाची यथासांग पूजा करतात. अठ्ठेचाळीस दूर्वांची एक जुडी याप्रमाणे अठ्ठेचाळीस जुड्या अर्पण करतात. या व्रतात रात्रीचे जागरण मुख्य मानलेले असल्याने भक्त आज रात्री आनंदाने हरिजागर, कीर्तन, भजन-गायन वगैरे करून श्रीललिताजगदंबेची आराधना करतात. आजच्या दिवशी या भक्तांच्या अनन्यप्रेमाला सीमाच राहात नाही !"
भगवती महात्रिपुरसुंदरी श्रीललिताजगदंबा ही श्रीविद्येची अधिष्ठात्री देवता आहे. ललितापंचमी हा तिच्या आराधनेचा मुख्य दिवस. श्रीविद्या ही सर्व मंत्रांची जननीच मानली जाते व अत्यंत गुह्य अशी ही महाविद्या केवळ श्रीसद्गुरुकृपेनेच प्राप्त होत असते. श्रीविद्येचे प्रकट रूप म्हणजे श्रीयंत्र होय. या श्रीयंत्रामध्ये भगवती श्रीअंबिकेचा प्रत्यक्ष वास असतो. सोबतच्या लिंकवरील पूर्वीच्या पंचमोल्लास लेखात भगवती श्रीकूष्मांडा, परमगुह्य अशी श्रीविद्या परंपरा व श्रीयंत्राची अगदी थोडक्यात माहिती दिलेली आहे. तसेच त्या सोबतच्या फोटोमधून श्रीयंत्राचे दर्शनही होईल. आजच्या श्रीललितापंचमीच्या पावन पुण्यपर्वावर श्रीचक्रस्थित भगवती श्रीमहात्रिपुरसुंदरी जगदंबेच्या श्रीचरणीं मनोभावे दंडवत घालून आपणही तिच्या नामस्मरणात मग्न होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें

https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_4.html?m=1

12 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार - तृतीयोल्लास



आज नवरात्रीची तिसरी माळ, भगवती चंद्रघंटा मातेची उपासना आज केली जाते. चंद्रघंटा या नावाचा अर्थ व माहात्म्य खालील लिंकवरील लेखात सविस्तर मांडलेले आहेच.
समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज आपल्या नवरात्रपर पदाच्या तिस-या चरणात म्हणतात,
तृतीयेचे दिवशीं बाईनें शृंगार मांडिला हो ।
सेलीव पातळ चोळी वरती हार मुक्ताफळा हो ।
कंठींचे पदक कांसे पितांबर पिंवळा हो ।
अष्टभुजा मिरवती आईची सुंदर दिसती कळा हो ॥३॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
नवरात्राच्या तिस-या माळेला समर्थ भगवती श्रीजगदंबेच्या सुरेख व देखण्या रूपाचे वर्णन करतात की, "आठ भुजांमध्ये तळपती हत्यारे धारण केलेल्या अंबामातेचे श्रृंगारलेले रूप अतीव मनोहर दिसत आहे. अतिशय तलम आणि राजेशाही असे रेशमी पातळ व पितांबर तिने धारण केलेले असून, गळ्यातले मोत्यांचे हार व त्यातील रत्नजडित पदक तिच्या रूपाची शोभा अाणखीनच वाढवीत आहे. तिची ही दैवी सौंदर्यकळा भक्तांच्या हृदयात भक्तिप्रेमाचा महापूरच निर्माण करीत आहे ! अशा या आदिशक्ती अंबाबाई माउलीचा उदोकार असो, जयजयकार असो !"
भगवती श्रीजगदंबाच श्रीभगवंतांची मायाशक्ती आहे. या मायाशक्तीच्या माध्यामातूनच श्रीभगवंत कार्य करीत असतात. म्हणून तिचा श्रृंगार म्हणजेच हे दृश्य-अदृश्य असे चराचर विश्व होय. समर्थ याही अर्थाने वरील चरणात तिच्या सौंदर्यपूर्ण रूपाचे, श्रृंगारलेल्या स्वरूपाचे वर्णन करीत आहेत.
श्रीभगवंतांचे कार्य तीन प्रकारचे असते. म्हणूनच या मायेला त्रिगुणात्मिका म्हणतात. आणि ते भगवंतच तीन रूपांनी हे कार्य संपन्न करीत असतात. म्हणून तेच त्रैमूर्ती म्हटले जातात. भगवान श्रीदत्तप्रभू हे देखील त्रैमूर्तीरूपच आहेत. श्रीभगवंतांच्या त्या तीन रूपांचे अलौकिक आणि अद्भुत कार्य खालील लिंकवरील लेखामध्ये सविस्तर वर्णिलेले आहे, त्याचेही सप्रेम वाचन करावे ही विनंती.
आजच्या तिस-या माळेला, या त्रिगुणात्मक त्रैमूर्ती स्वरूपातील जगद्गुरु भगवती श्रीजगदंबामातेचे हे गुणानुवाद-कीर्तन आपणही मनापासून करून, 'आम्हांला त्रिगुणांच्या पल्याड असणा-या निर्गुण निराकार आणि विश्वव्यापक परमात्म्याचा साक्षात्कार करवावा', अशीच तिच्या श्रीचरणीं प्रेमभावे प्रार्थना करू या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
तृतीयोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_3.html?m=1

11 Oct 2018

आदिशक्तीचा उदोकार - द्वितीयोल्लास



आज नवरात्रीची दुसरी माळ. नवदुर्गांपैकी भगवती श्रीब्रह्मचारिणी मातेची आज उपासना केली जाते.
समर्थ श्री रामदास स्वामी महाराज आपल्या नवरात्रीच्या पदामधील दुस-या कडव्यात म्हणतात,
द्वितीयेचे दिवशीं मिळती चौसष्ट योगिनी हो ।
सकळांमाजीं श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।
कस्तुरीमळवट भांगीं शेंदुर भरुनि हो ।
उदोकार गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो ॥२॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
श्रीजगदंबेच्याच अंशरूप अशा चौसष्ट योगिनींचे श्री समर्थ येथे स्मरण करीत आहेत. तसेच या दुस-या चरणात भगवती श्रीअंबिकेच्या माता रेणुका या अत्यंत प्रेमळ अवताराचेही आवर्जून स्मरण करतात. भगवान श्रीविष्णूंच्या श्रीपरशुराम या सहाव्या अवताराची जननी, रेणुराजाची कन्या व जमदग्नी ऋषींची भार्या असणारी भगवती रेणुका ही मातृत्त्वाचा परमादर्शच आहे. आपल्या श्रीदत्तमाहात्म्य ग्रंथात प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी यावर फार सुंदर ओव्या रचलेल्या आहेत. रेणुकामातेची संपूर्ण कथा आपण पुढील एका लेखात पाहणारच आहोत.
अशा या रेणुकामातेने कपाळी कस्तुरीचा सुगंधी मळवट भरलेला असून भांगात सौभाग्यसूचक असा शेंदूर ल्यालेला आहे. तिच्या भोवती तिचा उदोकार करीत असंख्य चामुंडा आनंदाने नाचत आहेत. देवीच्या सेविकागणांना चामुंडा म्हणतात. अशा या त्रिभुवनमातेला, जगदंबा श्रीरेणुकेला समर्थ श्री रामदास स्वामी महाराज नवरात्रीच्या दुस-या दिवशी प्रेमभावे वंदन करीत आहेत. आपणही मनोभावे तिच्या चरणीं दंडवत घालू या !
श्रीरेणुकाआई ही मातृत्त्वाची साकार मूर्तीच आहे. श्रीजगदंबा ही देखील आपल्या सर्वांची प्रेमळ माताच आहे. तिच्या या जगावेगळ्या मातृत्त्वाचा व अलौकिक कार्याचाच ऊहापोह खालील लिंकवरील लेखात केलेला आहे. तसेच तिच्या नामाचे माहात्म्यही कथन केले आहे. आजच्या दुस-या माळेला आपण सर्वांनी या लेखाचे वाचन करून भगवती श्रीजगदंबिकामातेच्या चरणी ही गुणवर्णनरूप सेवा समर्पूया आणि तिचा 'भवानी भवानी भवानी' असा त्रिवार नामजप करून धन्य होऊ या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
द्वितीयोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post_2.html?m=1

आदिशक्तीचा उदोकार - प्रथमोल्लास



आज घटस्थापना, शारदीय नवरात्रीचा प्रथम दिन. भगवती श्रीजगदंबामातु:श्रींच्या पुण्यपावन नवरात्र महात्सवास आज सानंद सुरुवात होत आहे.
आपण सर्व त्या भगवती आदिमायेचेच अपत्य आहोत आणि आपल्या बाळाचे निरतिशय प्रेम प्रत्येक आईला असतेच. त्यामुळे आपणही या नऊ दिवसांच्या महोत्सवात आपल्या परमप्रिय मातेच्या गुणानुवादाची, स्तुतीची आणि तिचे भरभरून कौतुक करण्याची ही पुण्यदायक संधी पुरेपूर साधू या !
समर्थ श्री रामदास स्वामी महाराज आपल्या एका सुमधुर पदात नवरात्रीचे माहात्म्य सांगून जगन्मातेचा उदोकार करताना म्हणतात,
आश्विन शुद्ध पक्षीं अंबा बैसली सिंहासनीं हो ।
प्रतिपदेपासुनी घटस्थापना करुनी हो ।
मूळ मंत्रें करुनि दैत्य मारिले निर्वाणीं हो ।
ब्रह्माविष्णुमहेश आईचे लागले पूजनीं हो ॥१॥
उदो म्हणा उदो अंबाबाई माउलिचा हो ।
आनंदें नाचती काय वर्णूं महिमा तिचा हो ॥ध्रु.॥
"आश्विन मासाच्या शुद्ध प्रतिपदेला भगवती अंबाबाई (भक्ताच्या हृदय-) सिंहासनावर विराजमान झालेली आहे. तिचे प्रतीक असणारा घट स्थापन केला आहे. तिच्या मूळ महामंत्राच्या जपसाधनेने शेवटी अनेक दैत्यांचे ( चित्तातील व बाहेरील ) निर्दालन झाल्याने साधक सुखी झालेला आहे आणि म्हणूनच तो मनोभावे हा नवरात्रीचा महोत्सव साजरा करीत आहे. ह्या भगवती जगदंबेच्या पूजनात प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेशही सहभागी झालेले आहेत ; म्हणूनच आपणही सर्वांनी अत्यंत प्रेमभावे नऊ दिवसांचा हा आदिशक्तीचा जागर तिच्या नामाच्या घनगर्जित उदोकारात उत्साहाने साजरा करू या ! सर्वांना हार्दिक आमंत्रण !!"
आजच्या पावन तिथीला श्री ज्ञानेश्वरभगिनी श्रीसंत मुक्ताबाईंची जयंती व श्री तुकारामशिष्या श्रीसंत बहेणाबाई शिऊरकरांची पुण्यतिथी असते. या दोन्ही महान विभूतींच्या श्रीचरणीं सादर दंडवत प्रणाम !
नवरात्र महात्सवाचे शास्त्रशुद्ध माहात्म्य आणि त्यासंबंधीच्या पुराणांनी व संतांनी सांगितलेल्या अनेकविध मनोहर कथा व संतांचे देवीमाहात्म्य कथन करणारे अलौकिक अभंग यांचा आस्वाद पूर्वी एका लेखमालेतून घेतला होता. ते सर्व लेख आजपासून क्रमाने आपण खालील लिंकवर वाचावेत. श्रीसंत मुक्ताबाई व श्रीसंत बहेणाबाई यांच्याविषयीही खालील लिंकवरील माहिती वाचून त्यांच्याचरणी आदरांजली समर्पावी.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
आदिशक्तीचे कवतुक मोठें
प्रथमोल्लास
https://rohanupalekar.blogspot.com/2016/10/blog-post.html?m=1

7 Oct 2018

हा देवांचाही देव जाणिजे

साक्षात् परब्रह्म राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या शिष्य-परंपरांमध्ये फार तयारीचे महात्मे होऊन गेलेले आहेत. आपल्या अवधूती आनंदामध्ये स्वच्छंद विहार करणारे हे सर्व स्वामीशिष्य अलौकिक अधिकाराचे धनी होते. या श्रेयनामावलीमध्ये पूर्णत: अप्रसिद्ध असे एक थोर विभूतिमत्त्व म्हणजे, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावचे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज हे होत. हेच प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे सद्गुरु ! आज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, ७ ऑक्टोबर रोजी त्यांची ९५ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या अद्भुत चरित्राचे हे सादर स्मरण !  
शके १७७९ म्हणजे इ.स.१८५७ साली पुसेसावळी येथील राक्षे आडनावाच्या परीट घराण्यात पूजनीय श्रीकृष्णदेवांचा जन्म झाला. वयाच्या ८-१० व्या वर्षी गावातील एक भीषण प्रसंग पाहून त्यांची वृत्ती एकदम पालटली व ते घरदार सोडून, दिगंबर अवस्थेत जंगलात राहू लागले. त्यांच्या वृत्ती अंतर्मुख झाल्या. त्याच सुमारास पलूस येथील सद्गुरु श्री.धोंडीबुवांनी स्वत: येऊन एके दिवशी श्रीकृष्णदेवांना अनुग्रह केला. त्यानंतरच ते पूर्णपणे नि:संग होऊन खडतर तपश्चर्येत निमग्न झाले. बालोन्मत्त वृत्तीने राहू लागले. एका पायावर तासन् तास उभे राहणे, तीन तीन तास पाण्याखाली बसून राहणे, दिवस दिवस तापलेल्या वाळूत पडून राहणे अशा कठीण साधनांचा अवलंब करून त्यांनी आपल्या देहाचे ममत्व संपूर्णपणे टाकून दिले. या खडतर साधनेने अंतरात प्रकटलेल्या वैराग्यअग्नीने त्यांचे अंत:करण सोन्यासारखे शुद्ध झाले. सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेने लाभलेल्या कृपाशक्तीच्या अनुसंधानामुळे त्यांचे साधन पूर्णत्वाला जाऊन ते सदैव आत्मस्वरूपी निमग्न राहू लागले. सद्गुरु श्री.धोंडीबुवांनी आपल्या भक्तांना सांगून ठेवले होते की, "आमच्या पश्चात् पुसेसावळीच्या कृष्णाला आमच्या गादीवर बसवा व आमचेच स्वरूप मानून त्याची सेवा करा !" त्याप्रमाणे श्री धोंडीबुवांनी देह ठेवल्यावर १९०८ साली त्यांच्या भक्तांनी सद्गुरु श्रीकृष्णदेवांना समारंभपूर्वक पलूसच्या गादीवर बसवले. पण अवघ्या दोनच दिवसात सद्गुरु श्रीकृष्णदेव ते वैभव सोडून रात्रीच पुन्हा पुसेसावळीला निघूून आले. ते परत कधी त्या गादीकडे गेलेच नाहीत. त्यांच्या परम वैराग्य-स्थितीला तो संपन्न सरंजाम थोडीच मानवणार होता ?
श्रीकृष्णदेव महाराज अत्यंत मृदू बोलत. ते खूप कमी बोलत, पण बोललेच तर ऐकणा-याला कानांवर अमृत पडते आहे असेच वाटे. रोज सकाळी ओढ्यावर स्नान झाल्यावर ते चराचराला सद्गुरुरूप मानून वंदन करीत. स्नानही दोन दोन तास चाले. त्याआधी मातीचे ढेकूळ घेऊन ते दात घासायला बसत. पूर्ण ढेकूळ संपेपर्यंत दात घासणे चालूच राही. लौकिक क्रियांमधूनही त्यांचे आतून श्रीभगवंतांशी अनुसंधान लागलेले असे. त्यामुळे बाह्यत: ते वेडगळपणा करीत आहेत असे वाटले, तरी तेही त्यांचे एक प्रकारचे साधनच होते. कोणी काही दिले तर मुकाट्याने खात, पण स्वत:हून कोणाकडे मागत नसत. आयाचित, सुडके इत्यादी भक्तांच्या घराच्या पडवीत रात्रीचा मुक्काम करीत. बाकी दिवसभर आपल्याच तंद्रीत फिरत असत. कुळथाचे माडगे त्यांना विशेष आवडत असे.
ब-याचवेळा गावातील मारुतीच्या मंदिरात बसून ते हनुमंतरायांशी प्रेमसंवाद करीत असत. वेळ असला तर मंगळवारी औंधच्या श्रीयमाईच्या दर्शनालाही जात. त्यांचा उपलब्ध एकमेव फोटो हा औंध संस्थानच्या घोड्याच्या पागेत एका झाडाखाली बसून काढलेला आहे. श्रीकृष्णदेव महाराज चांगले उंचपुरे, राकट व श्यामवर्णाचे होते. चेह-यावर बालसुलभ प्रेमळ भाव असत. त्यांच्या सा-या हालचाली अवधूती मस्तीत, आपल्याच आनंदात घडत असत.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज १९२० साली प्रथम त्यांच्या सेवेत रुजू झाले तेव्हा देवांना भगेंद्र झाले होते. त्या जखमेत किडे झालेले, पण देवांना त्यांचे काहीच सोयरसुतक नव्हते. देहाचेच जिथे भान नाही, तिथे व्यथा वेदना कळणार तरी कशा ? पू.काका तर निष्णात डॉक्टर, त्यांना ते बघवत नसे. ते देवांना पाठुंगळीवर घेऊन सरकारी दवाखान्यात नेत व ड्रेसिंग करीत. देव प्रचंड विरोध करीत, प्रसंगी पू.काकांना चोपही देत. म्हणत, "त्यांनी माझे अंग खाल्ले तर तुझे काय जाते ? खाऊ देत त्यांना, नाहीतरी कधीतरी जाणारच आहे हे !" पण पू.काकांनी निष्ठेने सेवा करून त्या दुखण्यातून देवांना बाहेर काढले. हीच त-हा पायाला झालेल्या नारूची पण होती. देहबुद्धीचा पूर्ण निरास झाल्याने, सदैव परमहंस स्थितीत विचरण करणारे श्रीकृष्णदेव महाराज हे खरोखरीच मोठे विलक्षण विभूतिमत्त्व होते.
पूजनीय गोविंदकाका उपळेकर महाराजांनी आपल्या या अद्भुत सद्गुरूंचे, 'श्रीकृष्णदेव' या नावाचे फार सुंदर चरित्र लिहिलेले आहे. त्यातील सर्व हकिकती वाचताना आपल्याला आतूनच भरून येते. 
श्रीकृष्णदेव महाराजांच्या दिव्य अधिकाराची एक गोष्ट पू.काका सांगतात. एकेदिवशी परळीचे बापू महाराज आपला सर्व लवाजमा घेऊन पुसेसावळीला आले होते. त्यांनी श्रीकृष्णदेवांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. खूप शोधूनही श्रीकृष्णदेव काही सापडलेच नाहीत. पण नंतर कुठूनतरी अचानक देव त्यांच्यासमोर आले व मांडी घालून खाली मान घालून स्वस्थ बसून राहिले. बापू महाराजांनी दोन तीनदा विचारले, "देवा, कुठे पाहता?" पण श्रीकृष्णदेवांनी काहीच उत्तर दिले नाही. पुन्हा तेच विचारल्यावर एकदम जोरात म्हणाले, "कुणीकडे बघतोय ? पड्याल बघतोय पड्याल !" हे उत्तर ऐकल्यावर बापू महाराजांनी श्रीकृष्णदेवांना दंडवत घातला व लोकांना त्यांच्या वाक्याचा अर्थ सांगितला की, "पड्याल म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या चार वाणींच्या पलीकडे असणा-या, अनिर्वचनीय परब्रह्मतत्त्वाचे दर्शन-चिंतन करतोय ! " केवढा मोठा अधिकार होता पहा श्रीकृष्णदेव महाराजांचा !!
आपल्याच ब्रह्मानंदात अखंड निमग्न असणारे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराज, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील तेजस्वी रत्न होते. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांवर कृपा करण्याचे आपले कार्य पूर्ण झाल्यावर त्यांनी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी, भाद्रपद कृष्ण त्रयोदशी दि.८ ऑक्टोबर १९२३ रोजी गावाजवळच्या ओढ्यात मध्यान्ही जलसमाधी घेतली. आदल्या दिवशीच त्यांनी, "उद्या आमचा महाळ करा" , असे निकटच्या लोकांना सांगून ठेवले होतेच. त्यांच्या पावन देहाला ओढ्याच्या काठाजवळच समाधी देण्यात आली. आज त्यावर सुरेख मंदिर बांधलेले असून ते भक्तांवर मायेची कृपासावली घालीत आहे. याच वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून, आता मंदिराला फार देखणे रूप आलेले आहे.
एक अत्यंत आश्चर्याची गोष्ट म्हणजे प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांनी देखील त्यानंतर बरोबर ५१ वर्षांनी, ८ ऑक्टोबर १९७४ रोजीच आपला देह त्यागला. पू. काकांनी आधी ठरवून आपल्या श्रीसद्गुरूंच्याच तारखेला देहत्याग करून आपली अद्भुत गुरुभक्तीच जणू श्रीगुरुचरणीं समर्पित केलेली दिसून येते. हे दोघेही गुरु-शिष्य फारच विलक्षण होते.
आज सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांच्या ९५ व्या समाधिदिनी, ही चरित्रस्मरणरूपी सेवा आपण त्यांच्या श्रीचरणीं समर्पून धन्य होऊ या.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


2 Oct 2018

सद्गुरु श्री गोविंदकाका उपळेकर महाराज

आज भाद्रपद कृष्ण अष्टमी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज यांची ४४ वी पुण्यतिथी !
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील महान विभूतिमत्त्व आणि भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे पूर्णकृपांकित सत्पुरुष सद्गुरु श्री.गोविंदकाका महाराज उपळेकर हे फार विलक्षण महात्मे होते.
आज त्यांच्या पावन स्मृतिकथा व चरित्रावर आधारित स्वानंदचक्रवर्ती हे सुंदर पुस्तक प्रकाशित झाले. त्याबरोबर रोहन उपळेकर यांनी लिहिलेले जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा हेही पुस्तक पू.काकांच्या समाधी समोर प्रकाशित झाले.
स्वानंदचक्रवर्ती च्या प्रस्तावनेत प.पू.श्री.शिरीषदादा कवडे लिहितात, "विसाव्या शतकात महाराष्ट्रात झालेल्या अग्रगण्य भगवद् विभूतींमध्ये पू.उपळेकर काकांची गणना होते. पू.काका संतत्वाचा उत्तुंग आदर्श होते. लौकिकातल्या कुठल्याही प्रसंगांत त्यांच्या अंत:करणाची ब्रह्मबैसका सुटलेली दिसत नसे. ते स्वानंदसाम्राज्याचे चक्रवर्ती सम्राटच होते. प्राप्त पुरुषाची ती समग्र दैवी सुलक्षणे त्यांच्या ठायी सुखाने, आपलेपणाने तिन्ही त्रिकाळ नांदत होती. सहज, अखंड समाधीचे शांभवी वैभव त्यांच्या सर्व लीलाव्यवहारांमधून सदैव ओसंडत असे. हे पुस्तक चित्ताकर्षक झालेले असून वाचकाला भावविभोर व अंतर्मुख करणारे आहे. एकंदरीत स्वानंदचक्रवर्ती हे समग्र पुस्तकच अत्यंत वेल्हाळ, वाचनीय आणि मननीय झालेले आहे !"
सद्गुरु श्री.काकांच्या दिव्य चरित्र आणि कार्यावरील चिंतन खालील लिंकवरील लेखात आपण वाचू शकता. त्याद्वारे पू.काकांच्या चरणी आपण सप्रेम आदरांजली वाहू या !
आजच्या श्रींच्या दिव्य दर्शनाचे छायाचित्र लेखासोबत देत आहे. तेही दर्शन आपला श्रद्धाभाव वाढविणारे ठरेल असे मनापासून वाटते.
सद्गुरु गोविंदकाका महाराज की जय !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चूडारत्न
https://rohanupalekar.blogspot.com/2016/04/blog-post.html?m=1