21 Sept 2016

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण *** *** षष्ठम अध्याय ***

(प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथीच्या सप्ताहास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा आस्वाद घेत आहोत. लेखासोबत दररोज पू. काकांची एक विशेष आठवणही देत आहोत. सर्वांना या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )

भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे दिव्य सारस्वत हे साक्षात् त्यांचे स्वरूपच आहे; आणि हीच प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांची पक्की धारणा होती. स्वत: श्रीमाउली भगवद्गीतेविषयी म्हणतात की,
म्हणौनि मनें कायें वाचा ।
जो सेवकु होईल इयेचा ।
तो स्वानंदसाम्राज्याचा ।
चक्रवर्ती करी ॥
ज्ञाने.१८.७८.१६६८॥
जो भगवद् गीतेचा मन, शरीर व वाचेने अनन्य दास होतो, सेवक होतो, त्याला ती स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट करून ठेवते. माउलींची ही प्रतिज्ञा त्यांच्या श्रीज्ञानेश्वरीलाही पूर्णपणे लागू आहे आणि प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज हे त्याचे जागते उदाहरण आहेत. भगवान श्रीमाउलींच्या कृपेने, त्या दैवी वाङ्मयाच्या नित्य अनुसंधानाने प. पू. श्री. काका स्वानंदसाम्राज्याचे चक्रवर्ती झालेले होते. श्रीमाउलींच्या मुखकमलातून निर्माण झालेल्या अमृतरसाचे ते निरंतर पान करीत होते आणि माउलींच्याच प्रेरणेने कृपावंत होऊन त्यांनी तो अमृतरस तुम्हां-आम्हां भक्तांसाठी ग्रंथरूपाने उपलब्ध करून दिला. ही त्यांची आपल्यावरील फार मोठी करुणाकृपाच म्हणायला हवी.
प. पू. श्री. काकांच्या वाङ्मयाची ओळख करून देण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. पू. काकांचे लेखन पूर्णपणे आपल्या अवधूती मस्तीत झालेले असल्याने, ज्याला त्या स्थितीचा अनुभव आहे, त्याच्या साठीच केवळ ते सुबोध असते. इतरांना तो अनुभव नसल्याने ते वाङ्मय तसे अत्यंत क्लिष्टच वाटते. त्यांची लेखनाची शैली खूप चांगली असली तरीही ती एकप्रकारे स्वतंत्रच आहे. त्यामुळे त्यांच्या शैलीची व्यवस्थित ओळख होईपर्यंत, त्यांची वाक्ये देखील आपल्याला सलग वाचता येत नाहीत. म्हणूनच पू. काकांचे वाङ्मय म्हणावे त्याप्रमाणात लोकांच्या नित्यवाचनात राहू शकले नाही. अर्थात् त्यांचे ज्योतिज्योति, आमोद, प्रास्ताविक व श्रीकृष्णदेव हे चिंतनपर चार ग्रंथच असे कठीण आहेत. बाकी श्रीसिद्धांत ज्ञानेश्वरी, विभूती, हरिपाठ सांगाती हे ग्रंथ त्यामानाने सोपे आहेत.
पू. काकांना एकदा एका भक्ताने सांगितले, " काका, आम्हांला तुमचे लेखन कळत नाही. " त्यावर काका पटकन् उत्तरले, " अरे, पण तुम्हांला कळावे म्हणून मी लिहिलेच नाही ! " खरोखरीच, पू. काकांनी स्वांत:सुखाय वाङ्मयनिर्मिती केलेली आहे. त्यांच्या निर्मळ आत्मप्रचितीची जी अंत:प्रेरणा होती, ती त्यांनी फक्त शब्दबद्ध केलेली आहे. तो आतून स्वयंभ प्रकटलेला त्यांचा स्वानुभव-अनुकारच आहे. त्यामुळे सर्वसामान्यपणे त्यांचे सारस्वत सहज कळणारे नाही. पण त्यांची जर कृपा झालेली असेल एखाद्यावर, तर मात्र त्यांचे वाङ्मय अगदी सोपे होऊन जाते, हेही तितकेच खरे आहे.
पू. काका सलग दहा दहा तास लेखन करीत असत. त्यांचे एक जुने भक्त कै. हिरालालजी काबरा यांनी मला स्वत:ला एकदा सांगितलेला एक विलक्षण प्रसंग सांगतो. हाच पू. काकांच्या आठवणींच्या संग्रहामध्येही छापून आलेला आहे. एकदा हिरालालजी पू. काकांच्या दर्शनाला फलटणला आले होते. त्यावेळी पू. काका श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनीचे लेखन करीत बसलेले होते. लहानगा शशिकांत ( पू. काकांचे सर्वात धाकटे चिरंजीव ) त्यांच्या मांडीवर होता. ते भराभरा पानेच्या पाने लिहीत होते. गंमत म्हणजे त्यांच्या दौतीतील शाई कधीच संपलेली होती व त्यांनी ती दौत उपडी ठेवलेली होती. तरी ते तसेच त्या दौतीत टाक बुडवून झरझर लेखन करीत होते. जवळपास दोन तासांनी त्यांनी थोडी उसंत घेतली व चाहूल लागली म्हणून मागे पाहिले तेव्हा त्यांना हिरालालजी आलेले समजले. किती एकाग्रता असेल पाहा त्यावेळी पू. काकांची ! जसे त्या कृपाशक्तीच्या माध्यमातून सुचेल तसेच ते लेखन करीत असत. म्हणूनच त्यांचे ते अवधूती मस्तीतले लिखाण सर्व सामान्यांना दुर्बोधच आहे. पण तेच महात्म्यांना अगदी साजूक वाटते. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी एकदा पू. काकांचे " श्रीकृष्णदेव " हे पुस्तक पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या हाती दिले व म्हणाले, " बघ रे, आपल्या माहेरचे वाङ्मय आहे. वाच, खूप आवडेल तुला !" जे वाङ्मय आपल्याला किंचितही कळत नाही, तेच महात्म्यांना मात्र अमृतमय वाटते.
पू. काकांना पुस्तक छापताना शब्दांत किंचितही बदल केलेला खपत नसे. ते खूप काळजीपूर्वक शुद्धलेखन तपासत असत. प. पू.  काकांची वाक्यरचना तशी पल्लेदार, मोठी आणि अनेक उपवाक्यांचा समूह वाटावी अशीच आहे. भराभर सुचणारे शब्द सलग वाक्यांमध्ये तातडीने गुंफल्यामुळे बहुदा अशी शब्दरचना होत असावी. आपल्याला ती वाक्ये दोन तीनदा वाचल्याशिवाय त्यातला आशय लक्षात येतच नाही.
पू. काकांच्या वाङ्मयापैकी, " विभूती " हा तुलनेने बाकीच्यांपेक्षा सोपा ग्रंथ म्हणायला हवा. ( प्रस्तुत लेखाच्या शेवटी या पुस्तकाची लिंक दिलेली आहे, जिज्ञासूंनी तो ग्रंथ डाऊनलोड करून जरूर वाचावा.) फलटण येथील थोर सत्पुरुष श्रीसंत हरिबाबा महाराज व त्यांच्या शिष्योत्तम लाटे गावच्या पू. आईसाहेब महाराज यांचे सुंदर चरित्र पू. काकांनी विभूती मधून उलगडलेले आहे. त्यातही स्फुटलेखन भाग थोडा क्लिष्ट असला तरी चरित्रपर भाग सोपा आहे.
भगवान श्रीमाउलींच्या परमपावन हरिपाठावर प. पू. श्री. काकांचे विलक्षण प्रेम होते. पू. काकांनी कधीच कोणाला अनुग्रह दिला नाही. पण ते श्रीहरिपाठाची उपासना मात्र अनेकांना सांगत असत. सुरुवातीला जयजयकार, मग श्रीज्ञानेश्वरीतील निवडक मंत्ररूप ओव्या, त्यानंतर हरिपाठाचे अठ्ठावीस अभंग, मग श्रीशंकराचार्यांचे पांडुरंगाष्टक, त्यानंतर आरती व उर्वरित काही प्रार्थनेचे, उपसंहाराचे अभंग, कैवल्याचा पुतळा व श्रीतुकारामांचे बारा अभंग; अशा क्रमाने पू. काकांचा नित्याच्या हरिपाठाचा होत असे. या हरिपाठासोबत परमार्थात लाभ व्हावा म्हणून त्यांनी " श्रीहरिपाठ सांगाती " हे पुस्तक प्रकाशित केले. या ग्रंथात पू. काकांनी नामसाधनेवर भर देऊन, भगवान माउलींच्या हरिपाठाबरोबरच, सर्वांगीण परमार्थासाठी आवश्यक असणा-या विविध संतांच्या ओव्या व निवडक अभंगांचे, तसेच श्लोकांचे संकलन केलेले आहे. हे संकलन अगदी नेमके, काळजीपूर्वक व नीट विचार करूनच केल्याचे वाचताना स्पष्ट जाणवते. म्हणूनच त्याचे " सांगाती " हे नाव यथार्थ आहे. हा ग्रंथ म्हणजे परमार्थ मार्गातील साधकांचा सज्जन सांगाती, काळजी वाहणारा, सांभाळणारा जोडीदारच आहे, यात शंका नाही.
हरिपाठ सांगाती चे अजून एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात पू. काकांनी श्रीज्ञानेश्वरीच्या ओव्या कोणकोणत्या रागात गायच्या त्याची नोंद केलेली आहे. ज्ञानेश्वरीच्या इतिहासात, ओव्या गाण्यासाठी रागांचा असा उपयोग सर्वात प्रथम पू. काकांनीच नोंदवलेला आहे. वेगवेगळ्या रागांचा त्यांना जो संदर्भ लागला, ती नि:संशय श्रीमाउलींचीच कृपा म्हणायला हवी. त्यातून पू. काकांचेही ज्ञानेश्वरीचे सर्वांगीण चिंतन कळून येते. त्यांनी माउलीकृपेने ध्यानावस्थेत त्या ओव्यांचा तसा सांगीतिक अनुभवच घेतला असावा, असे मला मनापासून वाटते. त्यांचे स्वत:चे रागदारीचे ज्ञानही परिपूर्ण असल्याने, त्यांनी ह्या नोंदी फार काळजीपूर्वक व स्वानुभवाने केलेल्या दिसून येतात.
" सिद्धांत ज्ञानेश्वरी " चे चार खंड म्हणजे श्रीज्ञानेश्वरीतील ओव्यांचे त्यातील सिद्धांतांनुसार केलेले संकलन असून, त्यांचा अर्थही सोबत दिलेला आहे. हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाचाच आहे. आजही दररोज रात्रीच्या हरिपाठानंतर यातील दोन पाने वाचली जातात. तशी पू. काकांच्या वेळेपासूनच चालत आलेली पद्धत आहे.
पू. काकांच्या वाङ्मय प्रसारासाठी " डॉ.गोविंद महाराज उपळेकप साहित्य संस्था " स्थापन करण्यात आलेली होती. या संस्थेमार्फतच आजवर पू. काकांच्या ग्रंथांच्या अनेक आवृत्या काढल्या गेल्या. पण आजमितीस त्यातले फारसे ग्रंथ उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्हीच ते सर्व ग्रंथ हळूहळू स्कॅन करून आपल्या कम्युनिटीवर पोस्ट करणार आहोत.
पू. काका हे भगवान श्रीमाउलींचे नुसतेे निस्सीम भक्तच नव्हे तर त्यांच्या वाङ्मयाचे सखोल ज्ञानी देखील होते. श्रीमाउलीकृपेने स्वानंदसाम्राज्याच्या सम्राट पदावर बसलेला हा कोमल अंत:करणाचा महात्मा, श्रीज्ञानेश्वरी क्षणोक्षणी जगत होता. त्यांच्या चरित्रातील प्रसंग पाहिले की माउलींचे शब्द त्यांच्या मनीमानसी, सर्वांगी मुरलेले होते, हे स्पष्ट दिसते.
प. पू. श्री. काका भगवान श्रीमाउलींविषयी किती हळवे होते? याचा एक हृद्य प्रसंग सांगतो. हा प्रसंग १९७१ सालचा आहे. एकदा पहिल्यांदाच भेटायला आलेल्या एका तरुण मुलाला त्यांनी विचारले, तुमचे गोत्र काय? शाखा कोणती? त्याने आम्ही यजुर्वेदी आहोत, असे नुसते सांगितल्याबरोबर पू. काकांनी त्याला तेथेच साष्टांग नमस्कार घातला. कारण, श्रीमाउली देखील यजुर्वेदी होते म्हणून ! पाहा, केवढी निष्ठा होती त्यांची. आणि अशी अपार निष्ठा, असे अनन्य प्रेम असेल तर ती कनवाळू, दयाळू ज्ञानमाउली आपला दिव्य-अलौकिक कृपा-प्रेमपान्हा त्या भक्ताला का बरे पाजणार नाही? भगवान श्रीमाउलींचे ते सतरावियेचे स्तन्य पिऊन आत्मतृप्त झालेले आणि त्या अनुहताचा दिव्य हल्लरु ऐकण्यात निमग्न होऊन राहिलेले प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज हे म्हणूनच फार फार विलक्षण, नित्य वंदनीय आणि लोकोत्तर विभूतिमत्व होते, यात अजिबात शंका नाही  !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( विभूती ग्रंथाची लिंक -
https://www.dropbox.com/s/v6nohpo2lbrt92m/Vibhuti-Full.pdf?dl=0 )

*** गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद ***

संतांना कोणाही बद्दल आपला-परका अशीच भावनाच नसते. सगळ्या जीवांविषयी समान प्रेम व तीव्र दयेची भावना त्यांच्या हृदयात भरलेली असते. प. पू. काकांच्याही ठायी हाच प्रेमभाव पुरेपूर होता. या संदर्भात श्री.भास्कर महादेव वेलणकर यांनी त्यांचे मित्र श्री. पत्की यांची एक विलक्षण हकीकत  सांगीतली होती. ती उद्बोधक कथा तुम्हां सर्वांनाही नक्कीच भावेल.
चोहो बाजूनी ढासळत अालेल्या, जुन्या वडिलोपार्जित पडक्या घरात श्री. पत्की राहात असत. अत्यंत सरळ मनाचा पण दारिद्र्याने गांजलेला, कसाबसा बायकापोरांचा निर्वाह करणारा हा गृहस्थ बिचारा परिस्थितीने पिचून गेला होता. अंगावर कपडा नीट नाही, घरात खायला अन्न नाही, पण योग्य मार्गदर्शनही नसल्यामुळे पिडलेला असा दिवस कंठीत होता. त्यांचेच घरी माडीवर प. पू. काका काही दिवस आपला नित्याचा हरिपाठही करीत असत; पण पत्की यांचे पूर्वकर्मच आड येत असल्याने, ते कधीही त्या हरिपाठाला हजर राहिले नाहीत. सबब त्यांना प. पू. काकांचा सत्संग सहज शक्य असूनही कधीच लाभला नाही. त्यांचा भोगच संपलेला नव्हता ना!
एके दिवशी परिस्थितीने फारच गांजल्यामुळे ते मनाने आत्यंतिक उदास होऊन, जीव देण्याच्या हेतूने अपरात्री कुरणातल्या विठोबाच्या वाटेने निघाले. किर्रर्र झाडी, काटेकुटे, उजेडाचा मागमूस नाही, विजन रस्ता, अंधारी रात्र, अशा वेळी पत्की जीव देण्यास योग्य जागा शोधत असताना, त्यांचा शर्ट काटेरी कुंपणात अडकल्याचा त्यांना भास झाला. तरीही पत्की पुढे चालू लागताच त्यांच्या लक्षात आले की, आपला शर्ट कोणीतरी मागे ओढत आहे. घाबरून मागे वळून डोळे विस्फारून पाहतात तर प. पू. श्री. गोविंदकाका त्याही अंधारात त्यांना स्पष्ट दिसले. प. पू. काकांना पाहताच ते हादरले. आत्ता या वेळी प. पू. काका इथे  कसे? या विचाराने ते गोंधळले. प. पू. श्री. काकांनी त्यांची दारुण स्थिती व मनाचा दुबळेपणा आपल्या सामर्थ्याने जाणला होता. त्यांना आत्महत्येपासून वाचवण्यासाठी, त्या भयाण अपरात्री त्यांच्यावरील अकारण-करुणेने ते स्वत:हूनच तेथे प्रकट झाले होते. वस्तुत: ते प. पू. काकांचे भक्तही नव्हते की त्यांनी त्यांची प्रार्थनाही केलेली नव्हती.  पू. काकांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला व अतीव प्रेमळ शब्दांत त्यांना म्हणाले, " अरे वेड्या, हे काय ? असा अपरात्री कोठे निघालास? काहीतरी भलताच विचार मनात दिसतोय तुझ्या! "
पू. काकांच्या त्या आश्वासक शब्दांनी धीर आलेल्या श्री. पत्कींनी आपली भयंकर कर्मकथा अश्रूपूर्ण नयनांनी पू. काकांना निवेदन केली. ती ऐकून पू. काका एवढेच म्हणाले, " आत्महत्या महापातक आहे हे लक्षात ठेव. " आणि दक्षिणेकडे हात करून म्हणाले, " त्या दिशेला जा, तुझे कल्याण होईल !"
पुढे पू. काकांची आज्ञा शिरोधार्य मानून श्री. पत्की त्या दक्षिण दिशेकडील गावास गेले. तेथे त्यांना चांगली नोकरी लागली. नोकरी शेवटपर्यंत निभली. पेन्शन घेऊन आज ते आपल्या मुलाबाळांसह समाधानी जीवन जगत आहेत. भक्तीने समाधी मंदिरातील उत्सवास प्रसादास येतात.
परिस्थितीने गांजलेल्या, रडकुंडीला आलेल्या जिवांचे दैव जाणून, त्यांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचा शाश्वत लाभ करून देण्याची निर्मळ कणव एकमेव साधुसंतानाच असते ! त्यांचा त्यासंदर्भातला संकेत वरवर साधा जरी वाटला, तरी त्यात अफाट दैवी सामर्थ्य असते. पण संतांचा असा कृपाप्रसाद दैवयोगाने प्राप्त होणे व त्यानुसार आपले वर्तन होणे, हे  एकाद्याच पुण्यवंताच्या वाट्याला येते आणि तेही श्रीभगवंतांची कृपा झाली तरच !
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
https://www.facebook.com/pages/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar/139539956212450 )

20 Sept 2016

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण *** *** पंचम अध्याय ***

(प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२ व्या पुण्यतिथीच्या सप्ताहास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा आस्वाद घेत आहोत. लेखासोबत दररोज पू. काकांची एक विशेष आठवणही देत आहोत. सर्वांना या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )

भगवान श्रीज्ञानेश्वर माउली संतांचे सद्गुण सांगताना म्हणतात,
वाचस्पतीचेनि पाडें ।
सर्वज्ञता तरी जोडे ।
परि वेडिवेमाजि दडे ।
महिमे भेणें ॥
ज्ञाने.१३.७.१९१॥
या आत्मस्वरूप झालेल्या महात्म्यांच्या ठायी प्रत्यक्ष ब्रह्मदेवांप्रमाणे ज्ञान विलसत असते, पण ते मात्र जगात मुद्दामच वेड पांघरून राहात असतात; नसत्या उपाध्या पाठीमागे लागू नयेत म्हणून ! प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजही असेच परमज्ञानी होते, तरी आपले माहात्म्य वाढू नये म्हणून लोकांमध्ये मात्र ते वेडाचे सोंग घेऊन वावरत असत. पू. काकांनी कधीही लोकांसमोर आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन केले नाही. त्यांनी कधीच प्रवचने-कीर्तने केली नाहीत. त्यांना महाराज म्हटलेलेही आवडत नसे. कधी कधी दर्शनाला आलेल्या नवीन माणसांनी, उपळेकर महाराज कुठे भेटतील? असे चुकून काकांनाच विचारल्यावर, समोर राहणा-या श्री. मनोहरपंत उपळेकर या आपल्या थोरल्या बंधूंकडे ते त्या लोकांना पाठवून देत असत.
पू. काकांच्या ठायी अमानित्व आणि अदंभित्व सखोल मुरलेले होते. एक प्रसंग सांगतो म्हणजे कळेल की, पू. काका कसे माउलींना अभिप्रेत असणारे खरे सत्पुरुष होते ते. पू. काकांचे एक भक्त श्री. भवानीशंकर मंजेश्वर हे त्याकाळात डिस्ट्रिक्ट जज्ज होते. त्यांनी पू. काकांचे The Maharshi of Phaltan या नावाचे एक सुंदर इंग्रजी चरित्र लिहिलेले आहे. त्याच्या काही प्रती त्यांनी पू. काकांना पाठवल्या होत्या. पण पू. काकांचे अमानित्व इतके प्रखर होते की, दुस-या दिवशी त्या सर्व प्रती पू. काकांनी स्वत: बसून पाणी तापवायच्या बंबात घालून जाळून टाकल्या. माउली म्हणतात तसे, " पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ति कानीं नायकावी । " हेच पू. काकांच्या आयुष्याचे ब्रीदवाक्य होते जणू  !
प. पू. काका नेहमीच आपल्या स्थितीत राहात असत. पण म्हणून आल्या-गेल्याचे त्यांना काहीच पडलेले नसे, असेही नाही. समोर आलेल्या प्रत्येकाचे सुख-दु:ख ते आपलेपणाने स्वीकारत असत. जमेल तेवढे दूर करीत असत. प्रेमळपणा व सर्वांविषयी आपुलकी हा संतांचा मूळ स्वभावच असतो. या संदर्भात वर उल्लेख केलेल्या मंजेश्वरांचाच एक अनोखा प्रसंग आहे. ते पहिल्यांदा जेव्हा पू. काकांकडे आले तेव्हा त्यांना रक्ती मूळव्याधीचा प्रचंड त्रास होत होता. त्याविषयी पू. काकांशी काहीतरी बोलावे, त्यांना उपाय विचारावा असे ठरवूनच ते फलटणला गेले होते. तिथे गेल्यावर पू. काकांशी त्याबद्दल काही बोलण्यापूर्वीच, त्यांना मध्यान्हीच्या रणरणत्या उन्हात पू. काका स्वत:सोबत अनवाणी फिरायला घेऊन गेले आणि म्हणाले, " अशा ऊन्हात अनवाणी चालणे फार चांगले असते बरे का मूळव्याधीसाठी. " हा जगावेगळाच, खरेतर उफराटा उपाय होता, पण मंजेश्वरांची मूळव्याध त्याने अवघ्या चार दिवसांत कोणतेही दुसरे औषध न घेता समूळ बरी झाली. पण शेवटी ते कर्मच ना, कोणाला तरी भोगावेच लागणार. त्यामुळे त्या दिवसापासून पू. काकांनी ती मूळव्याध स्वत:वर घेतली, पण मंजेश्वरांना मात्र पूर्ण रोगमुक्त केले. समोरच्याच्या दु:खाने स्वत: दु:खी होऊन ते दु:ख हरप्रकारे कमी करणे, हा संतांचा स्वाभाविक गुणच असतो. मूळव्याध, हार्निया, पीनस अशाप्रकारचे अनेकांचे रोग पू. काकांनी स्वत:वर घेऊन भोगून संपवलेले होते. पण त्याबद्दल एक शब्दही संपूर्ण आयुष्यात ते कधीच कोणापाशी बोलले नाहीत. त्या हार्नियासाठी ते धोतरावर पट्टा घालत असत. त्यांच्या काही जुन्या फोटोंमधे तो पट्टा स्पष्ट दिसतो.
फलटणच्या कै. श्रीमंत लक्ष्मीदेवी नाईक निंबाळकर राणीसाहेब पू. काकांच्या निस्सीम भक्त होत्या. त्या पू. काकांच्या कृपेनेच फार भयानक विमान अपघातातून सही सलामत वाचल्या होत्या. पू. काकांच्या प्रेरणेने त्यांनी लक्ष्मीनगर मध्ये श्रीज्ञानेश्वर मंदिर बांधले. त्याची जागाही पू. काकांनीच सांगितली होती. या मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना पण पू. काकांच्या सान्निध्यात झालेली आहे. पुढे काही भक्तांनी मिळून पू. काकांना १९५४ साली बांधून दिलेल्या " श्रीगुरुकृपा " वास्तूला लागूनच हे मंदिर बांधले गेले.
भगवान श्रीमाउली हे प. पू. काकांचे जीव की प्राण होते.  दररोज पूजा झाल्यावर ते शेजारील मंदिरात श्रीमाउलींच्या दर्शनाला जात व तेथे हातवारे करून भगवान श्रीमाउलींशी जीवाभावाचा सुखसंवाद करीत असत. पू. काका भगवान श्रीमाउलींसमोर कायम लोटांगण घालूनच दर्शन घेत असत. गळ्यातली तुळशीमाळ एका हाताने सावरीत ते गडाबडा लोटांगणे घालून वंदन करीत. अशीच लोटांगणे ते श्री हरिबुवा महाराजांच्या समाधी समोरही घालत असत. ब-याचवेळा पू. काका तसेच सोवळ्यात, उघड्या अंगानेच माउलींच्या मंदिरात दर्शनाला जात. पू. काका दर्शनाला येऊन गेल्यानंतरच माउलींचे मंदिर दुपारी बंद केले जाई.
पू. काका कधी कधी सातारा रस्त्यावरील हरिनारायण टेकडीवरही फिरायला जात असत. त्या टेकडीवर आता नुसतेच मंदिर आहे, त्यातली श्रीहरिनारायणस्वामींची मूर्ती भैरोबा गल्लीतील रानड्यांच्या वाड्यात आहे. तिथेही पू. काका नेहमी जात असत. कधी कधी पू. काका रविवार पेठेतील उघड्या मारुतीच्या किंवा शेरीतल्या खडकहिरा गणपतीच्या दर्शनालाही जात. महानुभाव पंथाच्या श्रीकृष्णनाथ व श्रीआबासाहेब मंदिरांमधेही ते नेहमी दर्शनाला जात असत.  एकादशीला विमानतळाशेजारील बिरोबाच्या माळावरील विठ्ठलमंदिरात दर्शनाला जात. या सर्व वेळेला नेहमीची काही मंडळी पू. काकांच्या बरोबर असायची. ते एकटे फारसे जात नसत, कोणी ना कोणी बरोबर असायचेच. असेच एका एकादशीला विठ्ठल मंदिरात गेलेले असताना, मंदिराच्या थोडे अलीकडे येऊन, प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथांनीच एका खेडुताच्या रूपात समक्ष येऊन पू. काकांना दर्शन दिले होते. या अलौकिक भेटीचे साक्षीदार आजही हयात आहेत. त्याच पावन स्थानावर त्या प्रसंगाचा स्मृतिस्तंभ उभारलेला असून, आता त्या स्थानाचाही विकास करण्यात येत आहे. कधी कधी पू. काका फलटण जवळील गिरवी येथील देशपांडे यांच्या श्रीगोपालकृष्ण मंदिरातही दर्शनाला जात असत. हे फार उत्तम असे जागृत स्थान असून येथे फार देखणी गोपालकृष्णांची मूर्ती आहे. परगांवाहून पू. काकांच्या दर्शनाला आलेल्या प्रत्येकाला ते श्रीराम, हरिबुवा, कृष्णनाथ इत्यादी मंदिरांमधे जाऊन आवर्जून दर्शन घेऊन यायलाच लावत असत.
भगवान श्रीनृसिंह हे पू. काकांचे कुलदैवत. त्यामुळे श्रीनृसिंह जयंती त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर साजरी होत असे. स्वत: पू. काका नृसिंहजन्म झाला की, उपस्थित ब्रह्मवृंदाची स्वहस्ते पाद्यपूजा करून त्यांना दक्षिणा देऊन त्यांना कैरीचे पन्हे देत व त्यानंतरच स्वत: प्राशन करीत असत. श्रीनृसिंह जयंती होईपर्यंत पू. काका कैरी, आंबा यातले काहीही खात नसत.
साबुदाण्याची खिचडी, बेसनाचा लाडू, हापूस आंबा, आंब्याची बर्फी हे त्यांचे काही आवडते पदार्थ होते. चॉकलेटी रंग आवडायचा. उन्हाळ्याच्या दिवसात रोज दुपारी पू. काकांचे एक भक्त श्री. गुणानी हे थंडगार दूध कोल्ड्रिंक आणत असत. जवळपासची सर्व चिल्ली-पिल्ली खास ते दूध कोल्ड्रिंक पिण्यासाठी पू. काकांकडे मुद्दाम येत असत. पू. काका देखील सर्वांसोबत दूध कोल्ड्रिंकचा प्रेमाने आस्वाद घेत. हापूस आंबा हा फळांचा राजा आहे, त्याला सुरी लावायची नाही, असे पू. काका म्हणत. ते आंबा माचवून चोखून आवडीने खात. त्याकाळी पू. काकांचे मेव्हणे श्री. ताथवडकर यांच्या बागेतील लंगडा बनारस आंब्यांची एक स्वतंत्र आढी पू. काकांच्या घरीच लावली जायची.
" अलौकिका नोहावे लोकांप्रति ।" ही माउलींची आज्ञा पू. काकांनी आजन्म तंतोतंत पाळली. वस्तुत: ते साक्षात् परब्रह्मच झालेले होते. असे असूनही लोकांमध्ये वावरताना आपले सामर्थ्य, आपले दिव्यत्व त्यांनी कधीच कोणाला कळू दिले नाही. तरीही श्रीभगवंतांच्याच अमोघ संकल्पाने अनेक आश्चर्यकारक चमत्कार पू. काकांच्या ठायी घडत असत, आजही वारंवार घडत आहेत. संत स्वत:हून कधीच चमत्कार करीत नसतात, संतांना त्या चमत्कारांचे काहीएक घेणे-देणे नसते. ते चमत्कार तर आपोआपच घडत असतात. असे अनाकलनीय चमत्कार श्रीभगवंतच संतांच्या जीवनात मुद्दाम घडवून आणतात. कारण त्यामुळेच लोक अशा संतांकडे आकर्षिले जातात व हळूहळू भक्तिमार्गाला लागतात.
प. पू. काकांच्या घरी तर सर्व सिद्धी पाणी भरत होत्या, पण त्यांना त्यांचे कधीच काही सोयर सुतक देखील नव्हते. त्यांनी आपला ब्रह्मानंद असल्या सिद्धींपायी कधीच गढूळ होऊ दिला नाही. संतांच्या घरचा खरा चमत्कार हा तुम्हां आम्हां मठ्ठ लोकांच्या दगडांसारख्या टणक अंत:करणात भगवद्भक्तीचा कोमल अंकुर रुजविणे हाच असतो. आणि आपल्या अलौकिक सामर्थ्याने असे चमत्कार करण्याच्या विद्येत हे सर्व संत पक्के तयार असतातच  !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

*** गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद ***

एकदा पू. काका घराशेजारील श्रीमाउलींच्या मंदिरात दर्शनाला गेलेले असतानाचा एक हृद्य प्रसंग सांगण्याचा मोह आवरत नाहीये. पू. काकांचे निस्सीम भक्त श्री. बेंदुरकर पुण्याहून त्यावेळी त्यांच्या  दर्शनाला आलेले होते. ते घरून ठरवूनच आलेले की, यावेळी पू. काकांच्या श्रीचरणांखालील माती प्रसाद म्हणून सोबत घेऊन जायचीच. पण तसे ते कोणापाशीही बोलले काहीच नव्हते. श्रीमाउलींचे दर्शन घेऊन घरी परत जात असताना वाटेत खूप चिखल होता, त्यात पू. काकांचा पाय भरला. बहुदा त्यांनी मुद्दामच आपला पाय भरवला असावा. पायाला चिखल लागला म्हणून पू. काका थांबले व स्वत: हाताने त्यांनी पायाचा तो ओला चिखल काढला व झटकन् मागे वळून बेंदुरकरांच्या हाती देऊन म्हणाले, " तुला हवी होती ना माती? घे मग ! " आपल्या मनातली गोष्ट न सांगताच जाणून त्यानुसार पू. काकांनी स्वहस्ते असा देवदुर्लभ प्रसाद प्रेमभराने दिलेला पाहून, श्री. बेंदुरकरांना तेथेच रडू कोसळले. त्या रस्त्यावरील चिखलाच्या गोळ्याला पू. काकांच्या श्रीचरणांचा स्पर्श झाला काय आणि त्यातून अचानक दिव्य सुगंधच स्रवू लागला. श्रीसंत तुकाराम महाराज श्रीभगवंतांच्या व संतांच्याठायी शोभणा-या परचित्त जाणून तसेच वागण्याच्या या अलौकिक सामर्थ्याचा भावपूर्ण उल्लेख करताना म्हणतात, " अंतरीचा भाव जाणोनियां गूज । तैसे केले काज पांडुरंगा ॥" श्री. बेंदुरकरांची निष्ठा जाणून प. पू. श्री. काकांनी स्वत:च त्यांना असा अद्भुत प्रसाद दिलेला होता.
पुढे श्री. बेंदुरकरांनी तो अलौकिक सुगंध येणारा श्रीप्रसाद पुण्याच्या श्रीमती मंगलाताई जोग यांना दिला. त्यांनी आपल्या नित्यपूजेत ती पावन श्रीचरणधुली ठेवलेली असून, आजही तिला तोच दिव्य सुगंध येतो, असे त्या प्रेमाने सांगतात. प. पू. श्री. काकांच्याच असीम दयाकृपेने अत्यंत दुर्लभ अशा त्या परमपावन श्रीचरणधुलीतील छोटा भाग, दोन वर्षांपूर्वी मलाही प्रसाद म्हणून मिळाला, हे मी माझे फार मोठे सद्भाग्यच मानतो. पू. काकांचा हा माझ्यावर झालेला विलक्षण कृपाप्रसादच आहे !
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
https://www.facebook.com/pages/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar/139539956212450 )