31 Jan 2017

तया नमो श्रीगणेंद्रा श्रीगुरुराया

भगवान श्रीगणेश हे आपल्या सगळ्यांचे लाडके दैवत आहे. अग्रपूजेचा मान असणारा हा बाप्पा सर्वांना अगदी जवळचा वाटतो. लहान मुलांना देखील पहिल्यांदा देवाची अोळख या बाप्पा पासूनच होते. आपण जसे या गणपतीबाप्पाचे नेहमी स्मरण करतो, त्याप्रमाणे ज्ञानी ऋषीमुनी आणि साधूसंतही करतात. पण त्यांना अभिप्रेत असणारा गणपती बाप्पा हा, आपल्याला माहीत  असणारा मोठ्या पोटाचा, मोदक आवडीने खाणारा, लांब सोंड असणारा नाही. त्यांचा बाप्पा खूप वेगळा आहे. तो आधी समजून घेतला पाहिजे, तरच मग आपल्याला खरा गणपती बाप्पा समजला असे म्हणता येईल.
भारतीय संस्कृतीमध्ये वेदकाळापासून पाच प्रमुख देवतांची उपासना चालत आलेली आहे. हे पाचही देव परब्रह्मस्वरूप आहेत, एकाच तत्त्वापासून प्रकटलेले आहेत. बाकीच्या सर्व देवता ह्या अंशरूपाने निर्माण झालेल्या आहेत. भगवान महाविष्णू, भगवान शिवशंकर, भगवान गणेश, भगवान सूर्यनारायण आणि भगवती जगदंबा हीच ती पाच प्रमुख परब्रह्मस्वरूप दैवते आहेत. पूर्वी यांच्या अनुयायांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हेवेदावे निर्माण झाले, म्हणून भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी ' पंचायतन पूजा ' सुरू करून दिली. या पाचही दैवतांची प्रत्येकाने पूजा करायची, फक्त आपले आराध्य जे असेल त्याला पाचांमध्ये प्रधान मानून उपासना करायची. अशा प्रकारे तोडगा काढून श्रीशंकराचार्यांनी सामाजिक एकोपा साधला.
भगवान श्रीगणेश हे मूळ परब्रह्माचेच साकार रूप आहे. त्यांचे तत्त्वरूप वेगळे आणि आपल्या डोळ्यांना दिसणारे भावरूप वेगळे. तत्त्वतः ते साक्षात् परब्रह्मच आहेत.
भगवान श्रीज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमधून भगवान श्रीगणेशांच्या या तत्त्वरूपाचा मनोज्ञ परामर्ष घेतलेला आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने आपण श्रीमाउलींच्या परमकृपेने त्यांचे हे सांगणे सप्रेम आस्वादूया.
भगवान श्रीमाउली हे खरोखरीच ' ज्ञानेश्वर ' आहेत. त्यांचे शब्द अलौकिकच असतात. वरवर पाहता त्यांचा दिसणारा अर्थ आणि माउलींना अभिप्रेत असणारा अर्थ नेहमी एकच असेल असे नाही. माउलींनी केलेले श्रीगणेश वर्णनही असे बहुपेडी आहे. त्यातील काही भाग आपण पाहूया.
या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या आोवीत माउली आत्मरूपाला वंदन करतात. वास्तविक सगळीकडे प्रथम भगवान श्रीगणेशांना वंदन करण्याची पध्दत आहे. पण माउली दुस-या आेवीत गणेशांना वंदन करतात. त्याचा गर्भितार्थ फार सुंदर आहे.
माउली म्हणतात.
ॐ नमोजी आद्या ।
वेदप्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या ।
आत्मरूप ॥ज्ञाने.१.०.१॥
देवा तूंचि गणेश ।
सकलार्थमतिप्रकाश ।
म्हणे निवृत्तिदास ।
अवधारिजो जी ॥ज्ञाने.१.०.२॥

वेदांनी ज्याचे प्रतिपादन केलेले आहे अशा सर्वात आधीपासून प्रकट असणा-या आणि ज्याला कोणी घडविलेले नाही अशा स्वसंवेद्य असणा-या आत्मरूपाला माझे वंदन असो.
तेच आत्मरूप तत्त्व ' गणेश ' देखील असून सकल मतीचे प्रकाशकही आहे. त्याच तत्त्वाला मी निवृत्तिनाथांचा दास सादर वंदन करून प्रार्थना करीत आहे.
भगवान श्रीमाउलींच्या शब्दांचे अर्थ त्यांच्याच वाङ्ममयातून शोधायचे असतात. इथे त्या आत्मरूप तत्त्वाला म्हणजे कोणाला ते वंदन करीत आहेत? हे जर समजून घ्यायचे असेल तर त्याला लावलेल्या विशेषणांचा अाधी अभ्यास करायला हवा. श्रीमाउली त्या तत्त्वाला  ' वेदप्रतिपाद्य ' म्हणतात. हाच शब्द ते ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायातही वापरतात. वेदांनी ज्याचे प्रतिपादन केलेले आहे तो एकमात्र भगवान श्रीकृष्ण परमात्माच आहे.
बाप बाप ग्रंथ गीता ।
जो वेदी प्रतिपाद्य देवता ।
तो श्रीकृष्ण वक्ता ।
जिये ग्रंथी ॥ज्ञाने.११.०.२६॥

वेद ज्याचे प्रतिपादन करतात तो मूळ परब्रह्मस्वरूप परमात्मा म्हणजेच भगवान श्रीकृष्ण होत. तोच स्वसंवेद्य असून आत्मरूपही आहे आणि तोच येथे ' गणेश ' रूपाने प्रकटलेला आहे. त्यालाच उद्देशून माउली ' देवा तूंचि गणेश ' असे म्हणत आहेत.
माउलींच्या वाङ्मयाचे साक्षेपी अभ्यासक योगिराज श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज आपल्या " देवा तूंचि गणेश " या ग्रंथात हे स्पष्ट करून सांगतात की, " असे हे गणेश कोण आहेत? माउली म्हणतात, ते गणेश दुसरे कोणीही नाहीत, तर प्रत्यक्ष परब्रह्म किंवा भगवान श्रीकृष्ण गणेश आहेत ! " भगवान श्रीकृष्णांचे एक विशिष्ट कार्यरूप म्हणजे बुद्धीचे दैवत असणारे भगवान गणेश आहेत. गण म्हणजे इंद्रिये. आपल्या इंद्रियांद्वारे कार्य करते ती आपली बुद्धी, म्हणून बुद्धीचे दैवत असणा-या, पर्यायाने शरीरातील सर्व इंद्रियगणांचे ईश्वर असणा-या गणेशांना माउली ग्रंथारंभी वंदन करून उत्तम मतिप्रकाश करण्याची विनंती करीत आहेत.
श्रीज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीच्या एकोणीस आेव्यांमधून माउलींनी गणेश रूपाचे अतिशय सुंदर वर्णन केलेले अाहे. या मंत्ररूप आेव्यांमधून ते गणेशांच्या अलौकिक रूपाचा मार्मिक आकृतिबंधच आपल्यासमोर मांडतात. या सर्व गणेशवर्णनाचे सार सांगताना ते म्हणतात ,
अकार चरणयुगुल ।
उकार उदर विशाल ।
मकार महामंडल ।
मस्तकाकारे ॥ ज्ञाने.१.०.१९॥

गणेश म्हणजे ज्ञान, ज्ञानाचे प्रकटीकरण होते शब्दांच्या माध्यमातून. यच्चयावत् सर्व शब्दसृष्टी निर्माण झालेली आहे. प्रणवातून अर्थात ॐकाराच्या अ उ म या तीन मात्रांमधून. म्हणून ॐकार  हेच श्रीभगवंताचे ज्ञानमय गणेशरूप आहे. अकार हा शरीराचा चरणभाग, उकार हे मधले उदर आणि मकार हे मस्तक ; असे हे ॐकारमय श्रीगणेश आहेत. श्रीसंत तुकाराम महाराज देखील " ॐकार प्रधान रूप गणेशाचे । " असेच म्हणतात.
पूजनीय मामासाहेब आपल्या ग्रंथात म्हणतात, " वेदांतील प्रत्येक अक्षर म्हणजे श्रीभगवंतांची मूर्ती आहे. अक्षरेच मंगल करणारी आहेत म्हणून तीच मंगलमूर्ती आहे. भगवंतांचा जन्म होतो तो अक्षरातूनच होतो. भगवंतांचे मूळ स्वरूप हे शब्दब्रह्मानेच नटलेले आहे. म्हणून मंदिरातल्या मूर्तीपेक्षाही भगवंतांच्या या शब्दमूर्तीला, नामाने तयार होणा-या त्यांच्या 'अक्षरमूर्ती'लाच जास्त महत्त्व असते. " या कारणानेच श्रीमाउली ग्रंथारंभी भगवान श्रीकृष्णांच्या अक्षरमय ज्ञानरूप गणेशांना वंदन करीत आहेत.
भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींनी पहिल्या अध्यायाप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाच्या सुरुवातीलाही वीस आेव्यांमधून भगवान श्रीगणेशांचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. पहिल्या अध्यायात श्रीकृष्णांचे व गणेशांचे एकरूपत्व सांगितले,  तसे या सतराव्या अध्यायात ते भगवान गणेश आणि सद्गुरु यांचे एकत्व प्रतिपादन करतात.
वर सांगितलेल्या पंचायतनाची श्रीसद्गुरुतत्त्वामध्येच एकवाक्यता झालेली पाहायला मिळते. श्रीसद्गुरु हे पंचायतनरूप असतात. शिष्यांचे अज्ञान नष्ट करून त्याला ज्ञान देतात, म्हणून ते ज्ञानदायक गणेश असतात. त्याचे मातृवत् पोषण करतात, म्हणून तेच भगवती जगदंबाही होतात. त्याच्या दोषांचा, जीवभावाचा नाश करतात, म्हणून सद्गुरूच संहारक शिवरूपही असतात. त्याच्या परमार्थाचा आणि त्याचाही सर्वबाजूंनी योगक्षेम चालवतात, त्याचा सांभाळ करतात, म्हणून तेच प्रतिपालक विष्णुरूप असतात. त्याच्या हृदयात आत्मज्ञानाचा, स्वरूपबोधाचा प्रकाश करतात, म्हणून तेच ज्ञानतेजोमय सूर्यरूपही असतात.
यातील ज्ञानदायक गणेशरूपाचे सतराव्या अध्यायाच्या नमनात श्रीमाउलींनी फार बहारीचे वर्णन केले आहे. ते म्हणतात
विश्वविकासित मुद्रा  ।
जया सोडवी तुझी योगनिद्रा  ।
तया नमो श्री गणेंद्रा  ।
श्रीगुरुराया ॥ ज्ञाने. १७.०.१॥

श्री गणेश हे सर्व गणांचे अधिपती आहेत. ते जेव्हा योगनिद्रेत मग्न होतात, तेव्हा माया कार्यरत होऊन विश्वाचा आभास होऊ लागतो, पण जेव्हा ते योगनिद्रेतून जागे होतात तेव्हा संपूर्ण विश्वाचा आभास मावळून त्या जागी आत्मज्ञानाचाच प्रकाश शिष्याला जाणवू लागतो. याचा गर्भितार्थ असा की, जेव्हा शिष्यांवर सदगुरूंची अनुग्रहकृपा होते, तेव्हाच त्याला, तोवर सत्य वाटत असलेला प्रपंच खोटा असल्याचे आपोआप जाणवू लागते; आणि त्याचे लोपलेले मूळचे आत्मज्ञान पुन्हा प्रकट होऊ लागते.
ही प्रकिया सदगुरूंच्या अनुग्रहाने संपन्न होते. म्हणूनच श्रीमाउली ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायात श्रीसद्गुरूंच्या अनुग्रह गणेशांचा उल्लेख करतात.
तुमचा अनुग्रह गणेश ।
जैं आपला दे सौरस ।
तैं सारस्वती प्रवेश ।
बाळकाही अाथि ॥ज्ञाने.१०.०.६॥

अहो सदगुरुराया, तुमचा अनुग्रहरूपी गणेश ज्याला आपला प्रसाद देईल, ज्याच्यावर त्याचा प्रसन्न कृपाअनुग्रह होईल, त्या बालकालाही सारस्वतामध्ये, ज्ञानसागरामध्ये सहज प्रवेश मिळेल. इथे श्रीगुरूंच्या गणेशरूपाचा माउली मुद्दामच उल्लेख करीत आहेत. कारण मुळात प्रत्येक जीव हा परब्रह्माचाच अंश आहे. सूर्याचा किरण जसा सूर्यासारखा तेजस्वीच असतो, तसा
प्रत्येक जीव हा श्रीभगवंतांसारखा अानंदमयच आहे, पण मग आम्हाला तो आनंद का जाणवत नाही? याचे कारण आहे माया ! भगवंतांच्या मायाशक्तीमुळे जीव स्वतःला वेगळा मानू
लागतो आणि त्याचक्षणी त्याला सुख-दुःखादी गोष्टींची अनुभूती येऊ लागते. आता भगवंतांच्याच संकल्पाने कार्य करणारी ही माया कोण दूर करणार? त्यासाठी मायिक गोष्टींचा उपयोग नाही. म्हणून भगवंतच ' श्रीसदगुरु ' हे परम करुणामय रूप धारण करून जीवांवरील मायेचे आवरण नष्ट करून त्याचे मूळचे आनंदस्वरूप त्याला पुन्हा प्रदान करतात.
श्रीभगवंत, त्यांची
शक्ती आणि सदगुरु, हे तिन्ही एकरूपच आहेत. त्यासाठी सतराव्या अध्यायातील दुस-या ओवीत माउली म्हणतात,
त्रिगुण त्रिपुरी वेढिला ।
जीवत्वदुर्गीं आडिला ।
तो आत्मशंभूने सोडविला ।
तुझिया स्मृती || ज्ञाने.१७.०.२॥

त्रिपुरासुराची कथा माउली येथे रूपक म्हणून वापरत आहेत, त्रिपुरासुराला ब्रह्मदेवांनी सोने, चांदी व तांब्याची तीन नगरे दिली होती. या मायावी नगरांच्या बळावर तो खूप मातला होता. देवांच्या विनंती वरून मग भगवान श्रीशिवशंकरांनी त्या तीन मायावी नगरांचा नाश करून
त्रिपुरासुराचाही वध केला. त्यासाठी त्यांनी भगवान गणेशांची प्रार्थना केली होती. तोच संदर्भ येथे चपखलपणे वापरून माउली म्हणतात, "हे गणेशरूप सदगुरुराया, सत्त्व, रज आणि तम तीन नगरे असून त्यांच्या जीवरूप किल्ल्यामध्ये अडकून पडलेल्या आत्मरूप शिवशंभूने तुमच्याच स्मरणाची तपश्चर्या करून स्वत:ची त्या संकटातून सुटका करून घेतली." मायेमुळे उत्पन्न झालेल्या जीवत्वाचा अडसर केवळ श्रीसदगुरूंच्याच कृपेने दूर होतो, अन्य कोणत्याही मार्गाने नाही; हेच माउली येथे स्पष्ट करीत
आहेत .
सतराव्या अध्यायाच्या नमनात माउली एका सुंदर ओवीत भगवान श्रीगणेशांचे मार्मिक गुणवर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
जो तुजविखी मूढ ।
तयालागी तूं वक्रतुंड ।
ज्ञानियांसी तरी अखंड ।
उजूची आहासी ॥ज्ञाने.१७.०.४॥

गणेशाची सोंड हे काही त्यांचे तोंड नाही, ते तर नाक आहे, पण सोंड हेच जणू त्याचे तोंड वाटते. म्हणून त्यांना ' वक्रतुंड ' म्हणतात. माउली म्हणतात, हे सदगुरुरूप गणराया, जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत, त्यांना तू वक्रतुंड दिसतोस, म्हणजे तू त्यांना रागावलेला, तिरस्कार करणारा वाटतोस; पण जे तुझ्याविषयी प्रेम बाळगून आहेत, तुझ्या स्वरूपाचे ज्ञान ज्यांना झालेले आहे, त्यांच्यासाठी तू उजू म्हणजे सरळ सोंडेचाच आहेस . त्यांना तू कायम कृपामय, करुणाकरच वाटतोस. माउलींनी गणेशाची सरळ सोंड ही सुविमल विवेकाचे प्रतीक मानलेली आहे. विवेक म्हणजे सारासार जाणण्याची क्षमता. आपल्या परमार्थासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार म्हणजे ' विवेक '. ज्यांना श्रीगणेशांविषयी प्रेम आहे व ज्यांच्यावर गणेशांनी अनुग्रह केलेला आहे, त्यांना कायमच या सुविमल अर्थात् शुद्ध विवेकाची प्राप्ती होते. असा हा विवेक निःसंशय सदगुरुकृपेनेच लाभतो. खरेतर हा विवेकच गुरुकृपा लाभल्याचे प्रथम द्योतक मानतात. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या एका अभंगात म्हणूनच म्हणतात की, "विवेक तो मुख्य कृपेचे लक्षण ।"
या विवेकाला इतके का बरे महत्त्व दिलेले आहे? कारण; जेथे विवेक असतो तिथेच साधनेने पुढे ज्ञान प्रकट होऊन परमानंदाची, महासुखाची प्राप्ती होत असते. श्रीगुरूंनी दाखवलेल्या मार्गानेच
अत्यंत प्रेमाने व निष्ठेने साधना केल्यावर आपण विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन पोहोचतो. तिथे जन्मजन्मांतरी बुद्धीने साठवलेले कर्मांचे संस्कार स्वच्छ धुतले जाऊन बुद्धी शुद्ध
होते. आणि त्यानंतरच खरेतर आपल्याला आत्मसुखाची प्राप्ती होते.
भगवान श्रीमाउलींनी ज्ञानमय परब्रह्मस्वरूप श्रीगणेशांचे असे विविधांगी वर्णन करून ठेवलेले आहे. त्या अमृतसागरातील ही लहानशी आेंजळ त्यांच्याच कृपेने आपण प्राशन करीत आहोत. हे भाग्य काय लहान थोडीच आहे? हा ही आपल्यावरचा श्रीमाउलींचा गणेशकृपा-सौरसच जणू !
भगवान श्रीमाउलींच्या परमकृपेने, माघी श्रीगणेश जयंतीच्या निमित्ताने संपन्न झालेली ही श्रीगणेश गुणवर्णन सेवा, श्रीगणेशरूप श्रीसद्गुरूंच्याच श्रीचरणीं सादर समर्पित असो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती.
अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

29 Jan 2017

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण *** *** अष्टम अध्याय ***

(प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या सप्ताहास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा दररोज आस्वाद घेत आहोत. सर्वांना या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण ***

*** अष्टम अध्याय ***

भगवान श्रीकृष्णांचे हृद्गत सांगताना सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माउली म्हणतात,
तेही प्राणापरौते ।
आवडती हें निरुतें ।
जे भक्तचरित्रातें ।
प्रशंसिती ॥
ज्ञाने.१२.१९.२२७॥
अर्जुना, जे माझ्या भक्तांचे चरित्र गातात, वाचतात व त्या चरित्राचे परिशीलन करून इतरांनाही सांगतात, ते मला माझ्या प्राणांपेक्षाही जास्त आवडतात. एखाद्या पोराचे कौतुक केले की जशी त्याची आईच खूश होऊन हवे ते देते, तसेच हे भगवंतही भक्तांची चरित्रे गाणा-यांवर कृपा करतात.
म्हणूनच गेले आठ दिवस आपण भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे पूर्णकृपांकित व राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेतील थोर विभूतिमत्व सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या दिव्य-पावन चरित्रसागरातील काही अंश पाहात आहोत. खरोखरीच महात्म्यांचे चरित्र हा अगाध महासागरच असतो. हिमालयातील पुष्पघाटी मध्ये गेल्यावर जसे आपण भांबावून जातो की, कोणती फुले पाहायची? कोणाचे कौतुक करायचे?  बघावे तिकडे निसर्गाचा अनोखा रंगसाज सजलेला दिसतो. अगदी तशीच आपली स्थिती प. पू. काकांचे चरित्र पाहताना होऊन जाते. त्यांच्या चरित्रसागरातील कोणकोणते मोती, कोणकोणती रत्ने आपण पाहणार? अवघे आयुष्य अपुरे पडून जाईल. माउली म्हणतात की, गंगेचे घोटभर पाणी जरी प्यायले तरी ते पूर्ण गंगेचे पान केल्याची तृप्ती देते, तसे पू. काकांच्या चरित्रातील हे काही अंशही आपल्याला सर्वांगतृप्ती देण्यास सक्षम आहेत.
संतांचे चरित्र हे बहुआयामी असते. ते जसे आपल्यासाठी आदर्शांचा खजिना असते तसेच तनमनाचे पोषकही असते. आपली साधनेची, परमार्थाची मरगळ नष्ट करून आपल्याला साधनमार्गावर अग्रेसर करण्याचे फार मोलाचे काम संतचरित्रे करतात. संतचरित्रांचे चिंतन, अनुशीलन व अनुगमन ही एक प्रकारे संतसंगतीच आहे, जी सहज सोपी व सहजसाध्यही आहे.
प. पू. काकांचे चरित्र आपल्याला कोणता संदेश देते? असे जर विचारले, तर आपण सांगू शकतो की ते चरित्र अनन्यभक्तीचा संदेश देते. सर्वकाही आपल्या श्रीसद्गुरूंवर सोपवून शांतपणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन करावे, त्यातच आपले सर्वार्थाने हित असते. पू. काका म्हणत, " तुम्ही मनुष्य आहात एवढेच तुम्हांला तुमच्या स्वरूपाच्या दर्शनाचा अधिकारी करण्यास बस आहे ! " म्हणजे आम्हांला आधी " मनुष्य " बनायला हवे. आमच्यातील पशुत्व पूर्णपणे जायला हवे. पुढे पू. काका म्हणतात, " सर्व आकर्षकतेचे रहस्य वैराग्य हेच आहे ! " म्हणून नुसते मनुष्य होऊन चालणार नाही तर त्यामध्ये वैराग्यही बाणायला हवे. असे वैराग्य चित्तात प्रकट झाल्यावर मगच खरे साधन हातून घडते. त्यासाठी प. पू. काका याठिकाणी महत्त्वाचा उपदेश करतात की, " सर्व साधनांचा राजा म्हणजे सद्गुरूपासना ! " जेव्हा सद्गुरूंची अशी अनन्यभक्ती साधते तेव्हाच खरे मनुष्यजन्माचे सार्थक होते ! पू. काकांच्या पावन चरित्राचा हाच मुख्य उपदेश आहे.
प. पू. काकांचा उपदेश अगदी सोपा होता. कोणत्याही लौकिक अवडंबराच्या भानगडीत न पडता, आपली दररोजची कर्तव्ये प्रेमाने व निष्ठेने, भगवंतांची पूजाच आहे या बुद्धीने अलिप्तपणे करावीत व निरंतर त्या परमात्म्याचे स्मरण करीत राहावे, असे ते सांगत. माउलींचा परमदिव्य हरिपाठ दररोज वाचणे, जवळ बाळगणे व श्रीज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा इत्यादी सद्ग्रंथांचे जमेल तसे प्रेमाने वाचन-चिंतन करणे, असे त्यांच्या उपासनेचे सुटसुटीत रूप होते. त्यांनी कधीच कोणाला अनुग्रह दिला नाही की कोणाचे गुरुपदही भूषवले नाही. पण माउलींच्या हरिपाठाचा मात्र प्रचंड प्रचार प्रसार केला. ते यच्चयावत् सर्व अडचणींवर माउलींचा हरिपाठ वाचण्याचा सल्ला देत असत. अक्षरश: लाखो लोकांनी त्यांच्या सांगण्यावरून हरिपाठाचे नित्य वाचन करून मनातील इच्छा पूर्ण करून घेतल्या. हा अनुभव आजही असंख्य भक्त दररोज घेत आहेत. याच्याही पुढे जाऊन पू. काका तर म्हणत असत की, " माउलींचा हरिपाठ श्रद्धेने नुसता जवळ बाळगला तरीही त्याच्यावर माउली कृपा करतात, इतके ते प्रेमळ आहेत व हरिपाठही तितकाच श्रेष्ठ आहे. "
प. पू. काका हे अंतर्बाह्य माउलीमय झालेले होते. त्यांना माउलींच्या शिवाय करमतच नसे. त्यांनी कधी लौकिक चमत्कार स्वत:हून केले नाहीत, पण भगवदीच्छेने आपोआपच चमत्कार घडत असत. पू. काकांचा सर्वात मोठा चमत्कार हा त्यांनी लाखो लोकांच्या चित्तात जागवलेला हरिपाठप्रेमाचा आविष्कार हाच होय !  आणि या कामी ते पूर्ण तयार विभूतिमत्व होते.
पू. काकांना दीर्घ आयुष्य लाभले. इ.स. १८८८ मध्ये माघ शुद्ध द्वितीयेला पृथ्वीतलावर अवतरलेले पू.  काका, ८७ वर्षांचे कृतार्थ आयुष्य क्रमून इ.स. १९७४ साली भाद्रपद कृष्ण अष्टमी, दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी समाधिस्थ झाले. पू. काका किती थोर गुरुभक्त होते पाहा. त्यांच्या सद्गुरूंनी, पू. श्रीकृष्णदेव महाराजांनीही १९२३ साली ८ ऑक्टोबरलाच महासमाधी घेतली होती. पू. काकांनी त्याच तारखेला समाधी घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत आपली गुरुनिष्ठा अबाधित राखली होती.
पू. काकांच्या चरित्रसागरात आपण गेले आठ दिवस यथामती, यथाशक्ती अवगाहन करीत आहोत. हे चिंतन सर्वांनाच आनंददायी ठरले, यात शंका नाही. प. पू. काकांचे माउलींच्या हरिपाठावर नितांत प्रेम होते, म्हणून त्या हरिपाठाचे श्रद्धा व प्रेमादरपूर्वक नित्य पठण करण्याची प्रतिज्ञा करून, आज त्यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊया आणि आत्तापर्यंत वाचलेल्या चरित्र प्रसंगांचे चिंतन करून आपापल्या साधनेत मग्न होऊन पू. काकांचा कृपाप्रसाद पुरेपूर अनुभवूया  !!
आठव्यात ' आठवा ' आठवा ।
हृदयी निरंतर साठवा ॥
दिवसाच्या आठव्या प्रहरी, ब्राह्ममुहूर्तावर देवकीचा आठवा पुत्र भगवान श्रीकृष्ण, गोविंद, केशव वेळोवेळा आठवा. प. पू. काकांचेही नाव ' गोविंद ' व आठ ही प. पू. काकांची आवडती संख्या होती. म्हणून प्रेमादराचा सुगंध असलेल्या सुमधुर आठवणींच्या आठ भावपुष्पांची ही लेखमाला प. पू. काकांच्या जयंतीदिनी त्यांच्या श्रीचरणीं सर्वांच्या वतीने मी समर्पित करतो.
गेले आठ दिवस या लेखमालेला वाचकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. पू. काकांच्या चरित्राची गोडीच इतकी विलक्षण आहे की तिने वाचकांना वेध लावला नाही तरच नवल ! याचा सुखद प्रत्यय मी गेले आठ दिवस अनुभवतोय. लेखाची दररोज वाचक आतुरतेने वाट पाहात होते, हे लेखक म्हणून माझ्यासाठी खूपच समाधानकारक होते. माझी मनोमन धारणा आहे की, हे लेखन वाचकांनी इतक्या प्रेमाने, आवडीने वाचले, म्हणजेच ही सेवा श्रीसद्गुरूंनी रुजू करून घेतली ! असाच तुम्हां सद्गुरुस्वरूप वाचकांचा प्रेमाशीर्वाद आम्हां सर्वांना निरंतर लाभो, हीच श्रीचरणीं कळकळीची प्रार्थना !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण *** *** सप्तम अध्याय ***

(प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या ४२व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या सप्ताहास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त आपण प. पू. श्री. काकांच्या अलौकिक चरित्र आणि कार्यावर आधारलेल्या लेखमालेचा दररोज आस्वाद घेत आहोत. सर्वांना या ब्रह्मरसाच्या मेजवानीचे हार्दिक आमंत्रण !! )

*** हे दिव्य लीला आख्यान, रम्य सद्गुरुपुराण ***

*** सप्तम अध्याय ***

भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचे दिव्य सारस्वत हे साक्षात् त्यांचे स्वरूपच आहे आणि हीच प. पू. सद्गुरु श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांची पक्की धारणा होती. स्वत: श्रीमाउली भगवद्गीतेविषयी म्हणतात की,
म्हणौनि मनें कायें वाचा ।
जो सेवकु होईल इयेचा ।
तो स्वानंदसाम्राज्याचा ।
चक्रवर्ती करी ॥
ज्ञाने.१८.७८.१६६८॥
जो भगवद् गीतेचा मन, शरीर व वाचेने अनन्य दास होईल, सेवक होईल, त्याला ती स्वानंदसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट करून ठेवते. माउलींची ही प्रतिज्ञा त्यांच्या श्रीज्ञानेश्वरीलाही पूर्णपणे लागू आहे आणि प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज हे त्याचे जागते उदाहरण आहेत. माउलींच्या कृपेने पू. काका स्वानंदसाम्राज्याचे चक्रवर्ती झालेले होते. माउलींच्या अमृतरसाचे ते निरंतर पान करीत होते आणि माउलींच्याच प्रेरणेने कृपावंत होऊन त्यांनी तो अमृतरस तुम्हां-आम्हां भक्तांसाठी ग्रंथरूपाने उपलब्ध करून दिला. ही त्यांची आपल्यावरील फार मोठी करुणाकृपाच म्हणायला हवी.
प. पू. काकांच्या वाङ्मयाची ओळख करून देण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. पू. काकांचे लेखन पूर्णपणे आपल्या अवधूती मस्तीत झालेले असल्याने ज्याला त्या स्थितीचा अनुभव आहे, त्याच्या साठीच केवळ ते सुबोध असते. इतरांना तो अनुभव नसल्याने ते वाङ्मय तसे अत्यंत क्लिष्टच वाटते. त्यांची लेखनाची शैली खूप चांगली असली तरीही ती एकप्रकारे स्वतंत्रच आहे. त्यामुळे त्यांच्या शैलीची व्यवस्थित ओळख होईपर्यंत त्यांची वाक्ये देखील सलग वाचता येत नाहीत आपल्याला. म्हणूनच पू. काकांचे वाङ्मय त्यामानाने लोकांच्या नित्यवाचनात राहू शकले नाही. अर्थात् त्यांचे ज्योतिज्योति, आमोद, प्रास्ताविक, श्रीकृष्णदेव हे चिंतनपर ग्रंथच असे कठीण आहेत. बाकी श्रीसिद्धांत ज्ञानेश्वरी, विभूती, हरिपाठ सांगाती हे ग्रंथ त्यामानाने सोपे आहेत.
पू. काकांना एका भक्ताने सांगितले, " काका, आम्हांला तुमचे लेखन कळत नाही. " त्यावर काका पटकन् उत्तरले, " अरे, तुम्हांला कळावे म्हणून मी लिहिलेच नाही! " खरोखरीच, पू. काकांनी स्वांत:सुखाय वाङ्मयनिर्मिती केलेली आहे. त्यांची ती आत्मप्रचितीची अंत:प्रेरणा होती, जी त्यांनी फक्त शब्दबद्ध केलेली आहे. तो आतून स्वयंभ प्रकटलेला त्यांचा स्वानुभव-अनुकारच आहे. पण त्यांची जर कृपा झालेली असेल एखाद्यावर तर मात्र त्यांचे वाङ्मय अगदी सोपे होऊन जाते, हेही तितकेच खरे आहे.
पू. काका सलग दहा दहा तास लेखन करीत असत. त्यांचे एक जुने भक्त कै. हिरालालजी काबरा यांनी मला स्वत:ला एकदा सांगितलेला एक विलक्षण प्रसंग सांगतो. हाच काकांच्या आठवणींमध्येही छापून आलेला आहे पूर्वी. एकदा हिरालालजी पू. काकांच्या दर्शनाला फलटणला आले होते. त्यावेळी पू. काका श्रीज्ञानेश्वरी सुबोधिनीचे लेखन करीत बसलेले होते. लहानगा शशिकांत ( पू. काकांचे सर्वात लहान चिरंजीव ) त्यांच्या मांडीवर होता. ते भराभरा पानेच्या पाने लिहीत होते. गंमत म्हणजे त्यांच्या दौतीतील शाई कधीच संपलेली होती, तरी ते तसेच त्या दौतीत टाक बुडवून झरझर लेखन करीत होते. जवळपास दोन तासांनी त्यांनी थोडी उसंत घेतली व चाहूल लागली म्हणून मागे पाहिले तेव्हा त्यांना हिरालालजी आलेले समजले. किती एकाग्रता असेल पाहा त्यावेळी पू. काकांची !
पू. काकांना पुस्तक छापताना शब्दांत किंचितही बदल केलेला खपत नसे. ते खूप काळजीपूर्वक शुद्धलेखन तपासत असत. काकांची वाक्यरचना तशी पल्लेदार, मोठी आणि अनेक उपवाक्यांचा समूह वाटावी अशीच आहे. आपल्याला दोन तीनदा वाचल्याशिवाय आशय लक्षात येतच नाही. पू. काकांच्या वाङ्मयापैकी, " विभूती " हा तुलनेने बाकीच्यांपेक्षा सर्वात सोपा ग्रंथ म्हणायला हवा. ( प्रस्तुत लेखाच्या शेवटी या पुस्तकाची लिंक दिलेली आहे, जिज्ञासूंनी तो ग्रंथ डाऊनलोड करून जरूर वाचावा. ) फलटण येथील थोर सत्पुरुष श्रीसंत हरिबाबा महाराज व त्यांच्या शिष्योत्तम लाटे गावच्या पू. आईसाहेब महाराज यांचे सुंदर चरित्र पू. काकांनी विभूती मधून उलगडलेले आहे. त्यातही स्फुटलेखन भाग थोडा क्लिष्ट असला तरी चरित्रपर भाग सोपा आहे.
" हरिपाठ सांगाती " या ग्रंथात पू. काकांनी नामसाधनेवर भर देऊन, भगवान माउलींच्या हरिपाठाबरोबरच, सर्वांगीण परमार्थासाठी आवश्यक असणा-या विविध संतांच्या ओव्या व निवडक अभंगांचे संकलन केलेले आहे. हे अभंग व ओव्यांचे संकलन अगदी नेमके, काळजीपूर्वक व नीट विचार करूनच केल्याचे वाचताना स्पष्ट जाणवते. म्हणूनच त्याचे " सांगाती " हे नाव यथार्थ आहे. हा ग्रंथ म्हणजे परमार्थ मार्गातील साधकांचा सज्जन सांगाती, काळजी वाहणारा, सांभाळणारा जोडीदारच आहे, यात शंका नाही.
हरिपाठ सांगाती चे अजून एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यात पू. काकांनी श्रीज्ञानेश्वरीच्या ओव्या कोणकोणत्या रागात गायच्या त्याची नोंद केलेली आहे. ज्ञानेश्वरीच्या इतिहासात रागांचा असा उपयोग सर्वात प्रथम पू. काकांनीच नोंदवलेला आहे. वेगवेगळ्या रागांचा त्यांना जो संदर्भ लागला ती नि:संशय माउलींचीच कृपा म्हणायला हवी. त्यातून पू. काकांचेही ज्ञानेश्वरीचे सर्वांगीण चिंतन दिसून येते. त्यांनी माउलीकृपेने ध्यानावस्थेत त्या ओव्यांचा तसा सांगीतिक अनुभवच घेतला असावा, असे मला वाटते.
" सिद्धांत ज्ञानेश्वरी " चे चार खंड म्हणजे श्रीज्ञानेश्वरीतील ओव्यांचे त्यातील सिद्धांतांनुसार केलेले संकलन असून  त्यांचा अर्थही सोबत दिलेला आहे. हा ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाचाच आहे. आजही दररोज रात्रीच्या हरिपाठानंतर यातील दोन पाने वाचली जातात. तशी पू. काकांच्यापासूनच चालत आलेली पद्धत आहे.
पू. काकांच्या वाङ्मय प्रसारासाठी " साहित्य संस्था " स्थापन करण्यात आलेली होती. संस्थेमार्फतच आजवर पू. काकांच्या ग्रंथांच्या अनेक आवृत्या काढल्या गेल्या. पण आजमितीस त्यातले फारसे ग्रंथ उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्हीच ते सर्व ग्रंथ हळूहळू स्कॅन करून आपल्या कम्युनिटीवर पोस्ट करणार आहोत.
पू. काका हे माउलींचे नुसतेे निस्मीम भक्त नव्हे तर त्यांच्या वाङ्मयाचे सखोल ज्ञानी देखील होते. माउलीकृपेने स्वानंदसाम्राज्याच्या सम्राट पदावर बसलेला हा कोमल अंत:करणाचा महात्मा ज्ञानेश्वरी क्षणोक्षणी जगत होता. ते माउलींविषयी किती हळवे होते? याचा एक हृद्य प्रसंग सांगतो. हा प्रसंग १९७१ सालचा आहे. एकदा एका तरुण मुलाला त्यांनी विचारले, तुमचे गोत्र काय? शाखा कोणती? त्याने यजुर्वेदी वाजसनीय शाखेचे आहोत, असे नुसते सांगितल्याबरोबर पू. काकांनी त्याला तेथेच साष्टांग नमस्कार घातला. कारण, माउली यजुर्वेदी वाजसनीय शाखीय होते म्हणून  ! पाहा, केवढी निष्ठा होती त्यांची. आणि अशी निष्ठा, असे अनन्य प्रेम असेल तर ती कनवाळू, दयाळू माउली आपला दिव्य-अलौकिक कृपा-प्रेमपान्हा त्या भक्ताला का बरे पाजणार नाही? माउलींचे ते सतरावियेचे स्तन्य पिऊन आत्मतृप्त झालेले पू. काका हे म्हणूनच फार फार विलक्षण आणि नित्य वंदनीय विभूतिमत्व होते, यात शंका नाही  !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

28 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - ७

नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय ७ -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_22.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seWl1eGJwOEs3Ylk/view?usp=drivesdk )
           ***********
७ : तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ
साधुसंत म्हटले की आपल्या मन:चक्षूंसमोर उगीचच भगवे कपडे, गळ्यात भारंभार माळा, कपाळावर मोठे गंध, भोवती शिष्यमेळा वगैरे कल्पनाचित्र उभे राहते. पण प्रत्यक्षात साधूंची अशी कोणतीच बाह्य लक्षणे सांगता येत नाहीत. किंबहुना, बाह्यात्कारी मिरवणारे खरे साधूच नव्हेत, असे सर्व संत एकमुखाने सांगतात. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींनी दोन अफलातून ओव्यांमधून संतत्वाची लक्षणे सुंदर सांगितलेली आहेत. ते म्हणतात,
जो अंतरीं दृढ ।
परमात्मरूपीं गूढ ।
बाह्य तरी रूढ ।
लौकिक जैसा ॥ज्ञाने.३.७.६८॥

नैष्कर्म्यसिद्धी झालेला महात्मा आपल्या भूमिकेवर अातून पक्का दृढ असतो, आपला अनुभव तो कायम गुप्तच राखतो व बाहेर रूढार्थाने सर्वसामान्यांसारखेच लौकिक आचरण करून दाखवत असतो. तो कसल्याही प्रकारचे आपले वेगळेपण चुकूनही भासवत नाही.
माउली अशा महिमावान संताचे नेमके लक्षण सांगतात की,
तें चालतें ज्ञानाचें बिंब ।
तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ ।
येर माणुसपण तें भांब ।
लौकिक भाग ॥ज्ञाने.१०.३.७७॥

श्रीभगवंतांचे समग्र स्वरूप जाणून त्याच्याशीच एकरूप होऊन ठाकलेले महात्मे म्हणजे चालते-बोलते ज्ञानसूर्यच. त्यांचे शरीर, त्यांचे सर्व अवयव हे अलौकिक आत्मसुखाला फुटलेले कोंभच होत. बाहेरून दिसणारे त्यांचे माणूसपण किंवा मनुष्यरूप हे निव्वळ लौकिक असून ते मूळचे खरे नव्हे. पण तरीही ते लौकिक रूपही त्या अलौकिकाच्या छायेतच असल्याने, आपल्याला अपार सुखदायकच ठरत असते.
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हे असेच प्रसन्न विभूतिमत्व होत. त्यांचे वागणे, बोलणे, हसणे, पाहणे; सारे काही निखळ व मधुरच होय. आजही त्यांच्या फोटोंमधून त्यांचे ते निरागस हास्य व त्यामागची निर्मळ प्रेमभावना स्पष्ट जाणवते व आपले ऊर त्याच प्रेमावेगाने भरून येते.
साधू संत म्हटले की ते कायम गंभीरच असतात असे अजिबात नाही. उलट त्यांनाच खरा विनोद आकलन झालेला असतो. श्रीभगवंतांनी आपल्याला एकट्याला करमत नाही म्हणून तर हा मायाविस्तार केलेला आहे. म्हणजे आनंद घेण्यासाठीच ते विश्वरूप झालेले आहेत. त्यांची ही सुखमय विश्व-नाटक विनोदलीला या संतांनाच केवळ खरी समजलेली असल्याने, तेच तिचा यथार्थ आस्वाद घेत असतात. बाकी सर्वसामान्य लोकांच्या म्हणजे आपल्या आयुष्याचाच एक प्रकारे आपल्या कर्मांनी विनोद मांडलेला असल्याने, आपण विनोदी नव्हे तर विदूषकच झालेलो आहोत. पण संत मात्र खरा श्रीभगवंतांचा विनोद पुरेपूर आस्वादत असतात.
मिश्कीलपणा हा संतांचा जात्याच सद्गुण असतो. ते लीलानाटकी भगवंतांचेच अंश असल्याने त्यांना विविध नाटके एकाचवेळी उत्तमरित्या वठवता येतात. पू.काका देखील याला अपवाद नव्हते.
सर्व काही करून नामानिराळे राहणे, हा तर पू.काकांचा सवयीचा हातखंडा प्रयोग होता. उदाहरण म्हणून श्रीमती कुसुमावती हिरकण्णवर आजींचा हा किस्सा पाहा.
हिरकण्णवर कुटुंबाने निवृत्तीनंतर बारामतीला स्थायिक व्हायचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे व्यवस्थाही केलेली होती. सहज बोलता बोलता पू.काकांसमोर हा विषय निघाला. ते पटकन् म्हणाले, "तुम्ही बारामतीकर नव्हे, फलटणकरच आहात!" बारामतीस जाण्याची त्यांची सर्व तयारी तोवर खरेतर पूर्ण झालेली होती, भाड्याचे घरही घेतलेले होते. पण पू.काकांचे शब्द ते, कोण टाळू शकणार? पुढे नकळत अनेक घडामोडी घडल्या व त्यांचे बारामतीकर होण्याचे रहितच झाले.
पू.काकांच्याच आशीर्वादाने म्हणा, पण फलटणातच उत्तम जागा मिळून त्यांची स्वत:ची वास्तू उभी राहिली. काही काळानंतर हिरकण्णवरांच्या मुलाला टायफॉईड झाला व मुलीला घशाखाली गाठी झाल्या. दोघांवरही भरपूर औषधोपचार झाले, पण काहीच गुण आला नाही.
एके दिवशी अचानकच पू.काका त्यांच्या घरी गेले. पत्ता वगैरे काही माहीत नसतानाही एकटेच गेले. त्यांनी आनंदाने पू.काकांच्या चरणीं मस्तक ठेवले. दोन कॉटवर पडलेली मुले पाहून पू.काकांनी विचारले, "काय झाले? कशाला काळजी करता? मुलाला टायफॉईड झाल्याला चौदा दिवस झाले ना? आता काळजीचे कारण नाही." असे बोलून त्यांनी मुलीच्या गाठींवरून हळुवार हात फिरवला व "चुन्याने गाठींवरून रोज चोळत जा", असे सांगून ते निघून गेले.
आश्चर्य म्हणजे, तीन-चार दिवसांतच मुलाचा ताप पूर्ण बरा झाला व मुलीच्या गाठीही शमल्या. पू.काकांना जाऊन हे सांगितल्यावर ते आश्चर्य दाखवीत गमतीने म्हणाले, "ऑ ! इतक्या लवकर कसे काय झाले? कोणत्या डॉक्टरचे औषध लागू पडले?" आता यावर ते तरी काय उत्तर देणार? त्यांनी फक्त कृतज्ञतेने पू.काकांना मनोभावे वंदन केले. 'मी त्या गावचाच नाही', याचे हुबेहूब नाटक संतांशिवाय कोणाला बरे जमणार?
सामान्यांप्रमाणे लौकिक व्यवहारातही संत आनंद घेतच असतात. श्री तुकाराम महाराज म्हणतात, "विषय तो त्यांचा झाला नारायण ।" अशी त्यांना सर्वत्र हरिप्रचितीच येत असल्याने, त्याही गोष्टींत ते तेवढाच आनंद घेतात.
१९६९-७० सालची गुरुपौर्णिमा. त्यादिवशी भक्तांची वर्दळ चालू होती. पू.काका खोलीत बसलेले होते. श्रीमती फणसे आजी दर्शनाला आल्या होत्या. त्यांना पू.काका म्हणाले, "काय काय आणले आहेस? काढ काढ". आणि ते सामान काढेपर्यंत स्वत:च गुणगुणायला लागले, "हिरवा शालु नवा ल्याली, वेणीमध्ये मरवा ।" चेह-यावर गोड हास्य होते. फणसे आजींनी खरोखरीच बागेतला मरवा नेला होता, ते आधीच त्यांनी असे गाणे गाऊन सुचवले.
तेवढ्यात पू.सौ.मामी खोलीत डोकावून गेल्या. पू.काका तक्क्याला टेकून अर्धवट बसलेले होते. त्यांनी चटकन् अंबूताईंना हाक मारली व अभिनय करीत बोलू लागले, "हे (डोकावून गेलेले) कोण आहे? मी गोविंद आहे, पण हे कोण डोकावून गेले?" हाताचा पंजा गालावर ठेवून अगदी गोड हसत हसत, हे कोण आहे? असे सारखे म्हणू लागले. त्यानंतर आपणच वर्णन करायला सुरुवात केली, "पाठीवर सुवर्ण गोंड्याच्या फुलाची लांबसडक नागिणीसारखी वेणी, बिंदीबिजवरा, सफरचंदासारखे लालबुंद गोबरे गाल, कमरेला शालु शेला गुंडाळलेला, वेणीत गुंफलेला हिरवागार मरवा, कोण आहे हे कोण आहे?" मग अंबूताईंचा हात हातात घेत अतिशय गोड हसत म्हणाले, "ही तर मामी, ही तर मामी !"
त्यांचे ते लाघवी मनोहर रूप पाहून उपस्थितांनाही आनंदाचे भरते आले. गोविंद-रुक्मिणीचा हा जोडा खरोखरीच श्रीकृष्ण-रुक्मिणीचाच तर जोडा होता !
ती.सौ.रुक्मिणीदेवी तथा मामी याही मोठ्या तयारीच्या होत्या. पू.काकांची पत्नी होणे तसे सोपे नव्हते. फार फार अवघड काम ते. पण आपल्या पतीशी असलेल्या जन्मजन्मांतरीच्या ऋणानुबंधामुळे पू.सौ.मामींनी ही जबाबदारी लीलया पेलली. पू.काकांचा विश्वप्रपंच त्यांनीही समर्थपणे साजिरा-गोजिरा केला. माहेरची गडगंज संपत्ती सोडून ही लंकेची पार्वती झाल्यावरही अजिबात डगमगली नाही. जे आहे त्यातच त्यांनी सगळे सुखाने सांभाळले. पू.काकांचे कधीच घरात लक्ष नसायचे. पण पू.मामींनी न कुरकुरता बिनबोभाट पू.काकांचा संसार आनंदाने केला.
पू.सौ.मामींचे पू.काकांवर निरतिशय प्रेम होते. पू.काकाही फार मायेने त्यांच्याशी बोलत. त्या आजारी असताना त्यांना पुण्याला उपचारासाठी ठेवले होते. पू.काका त्यांना भेटायला आले व त्यांचा हात हातात घेऊन फार ममतेने त्यांनी ती.मामींची विचारपूस केली होती. पू.काकांनी देह ठेवल्यानंतर पू.मामी देखील खूप अस्वस्थ झाल्या व बरोबर शंभराव्या दिवशी, १९ जानेवारी १९७५ रोजी त्यांनीही देहत्याग केला. पू.काका गेलेले नाहीत, ते सतत बरोबर आहेतच; या भावनेने पू.मामींनी सौभाग्यालंकार काढलेले नव्हते. हीच भावना देवांनाही सत्य ठरवायची इच्छा झाली असावी बहुदा; कारण पू.मामींच्या अंत्यक्रियेनंतर रक्षा संकलन करताना, त्यांचा हिरवा चुडा व गळ्यातले मंगळसूत्र जसेच्या तसे सापडले. पू.सौ.मामी पू.काकांशी अशा एकरूपच झालेल्या होत्या !
लौकिकात राहूनही आपले अलौकिकत्व अंतरी जपणा-या, अखंड अवधूती मस्तीमध्ये निमग्न असणा-या, सद्गुरु श्री माउलींच्या या अनन्यदासाची, सद्गुरु श्री.गोविंदकाकांची जीवनगाथा खरोखरीच विलक्षण व मनोहर आहे. जितके जितके त्यात आपण अवगाहन करू, तितके अधिकाधिक आनंदाचे धनी होऊ, यात शंका नाही. गेले सात दिवस हीच तर अपूर्व सुखानुभूती आपण सर्वजण घेतो आहोत, बरोबर ना?
( छायाचित्र संदर्भ : पू.श्री.काका व पू.सौ.मामींची फलटणला 'श्रीगुरुकृपा' वास्तूच्या प्रवेशद्वारातील पाय-यांवर टिपलेली प्रसन्न भावमुद्रा.
हेच ते अनादि दांपत्य !!!!
"तिये वंदिली मियां मूळिके । देवो देवी ॥" )
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

27 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे* लेखांक - ६

नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय -६ -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_21.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -

           ***********
६ : तो समुद्रापैलीकडील देखे
श्रीगुरुकृपेने ज्यांची श्रीभगवंतांच्या स्वरूपातच स्थिती होते, त्या थोर महात्म्यांच्याठायी प्रकटणा-या सहज सिद्धींविषयी सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात,
मग समुद्रापैलीकडील देखे ।
स्वर्गींचा आलोच आइके ।
मनोगत ओळखे ।
मुंगियेचें ॥ज्ञाने.६.१४.२६९॥
तो महात्मा बसल्याजागी जगातले काहीही पाहू शकतो. स्वर्गातील बोलणेही त्याला ऐकता येते व लहानग्या मुंगीचे मनोगतही समजते. विश्वाकार झालेल्या महात्म्यांची ही सहज स्थितीच असल्याने, त्यांच्या जीवनात दिसणारे असंख्य चमत्कार हे सिद्धींचे नव्हेत, तर भगवत्कृपेचेच अलौकिक आविष्कार असतात.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजही आपल्याच स्वानंदमग्न स्थितीमध्ये केव्हा केव्हा असे विलक्षण संदर्भ सहज बोलून जात. काहीवेळा ते भूतकाळातील प्रसंग सांगत तर काहीवेळा भविष्यात घडावयाच्या गोष्टीच ते पटकन् बोलून जात.
यासंदर्भात माझ्याच आईचा एक आश्चर्यचकित करणारा अनुभव सांगतो.
माझी आई कु.चारुलता श्रीराम नवरे हिचे श्री.विजय श्रीपाद उपळेकर यांच्याशी १९७४ साली जून महिन्यात लग्न झाले व ती उपळेकरांच्या घरात सून म्हणून आली. घरातील थोर संत व आजेसासरे म्हणून, पू.काकांच्या श्रीचरणांवर डोके ठेवण्याचे सौभाग्य तिला चार पाच वेळा लाभले. तिचे लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनीच पू.काकांनी देह ठेवला.
भेटीच्या प्रत्येकवेळी पू.काका तिचा हात हातात घेऊन आपला हात त्यावर ठेवत व "तू चारुगात्री आहेस" असे तिला सांगत असत. तसेच दरवेळी पू.काका तिला एक प्रश्न विचारत की, "सोलापूरच्या नव-यांपैकी इंग्लिश बायको कोणी केलेली आहे?" माझी सौ.आई दरवेळी सांगे की, "काका, आमच्यापैकी कोणीच नाही लग्न केलेले इंग्लिश बाईशी". तरीही नेहमी पू.काका तोच प्रश्न विचारीत असत.
माझ्या सौ.आईचे एक काका काही काळ सोलापूर जिल्ह्यात करमाळ्याला शेती करायला जाऊन राहिलेले होते. पण पुढे आपल्या बंधूंना मदत करण्यासाठी ते तेथील सर्व विकून मुंबईत परत आले. नवरे मंडळींपैकी बाकी कोणीही सोलापूर भागात गेलेले नव्हते आणि कोणीच परदेशी बाईशी लग्नही केलेले नव्हते. त्यामुळे पू.काकांच्या या वाक्याचा कोणाला कधीच संदर्भ लागला नाही.
पण पू.काका नक्कीच काहीतरी पाहून तसे म्हणत असावेत. सर्वात आश्चर्य तर पुढेच आहे. गेल्यावर्षी त्याच सोलापूरला जाऊन राहिलेल्या काकांच्या नातवाचे अमेरिकन मुलीशी लग्न झाले. ते लग्न ठरल्यावर माझ्या आईला अचानक पू.काकांचे तेव्हाचे शब्द आठवले आणि अक्षरश: तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने ताबडतोब मला फोन करून हे सर्व विस्मृतीत गेलेले प्रसंग सांगितले. मलाही पू.काकांच्या त्या विलक्षण भविष्यवेधाचे महदाश्चर्य वाटले. पू.काकांचे ते शब्द थोडे थोडके नाही, तर बेचाळीस वर्षांनी खरे ठरलेले होते ! म्हणजे त्यांनी त्याचवेळी हे भविष्य पाहून अचूक सांगितलेले होते. अनंत काळाच्या गर्भात काय काय दडलंय, हे या सूक्ष्मदृष्टीच्या क्रांतदर्शी महात्म्यांशिवाय इतर कोण पाहू शकणार बरे?
खरोखरीच 'समुद्रापैलीकडील देखे' या श्री माउलींच्या वचनाची मूर्तिमंत अनुभूतीच त्यानिमित्ताने आम्हां सर्वांना आली. अर्थात् प.पू.श्री.काकांच्या चरित्राचा धांडोळा घेतला तर अशा प्रकारचे अगणित प्रसंग पाहायला मिळतात. 
प.पू.श्री.काका आपल्याच स्वानंदस्थितीमध्ये काय काय बरळत असत. तेच ते शब्द पुन्हा पुन्हा बोलत. एखादा माणूस समोर आल्यावर त्याच्यासंबंधाने जे काही दिसेल, ते पू.काका बोलून टाकत असावेत. एरवी कोणाला त्यांचा संदर्भच लागत नसे. पण गंमत म्हणजे, समोर उपस्थितांपैकी कोणा ना कोणाच्या मनात चालू असलेल्या गोष्टींची, विचारावयाच्या प्रश्नांची त्यात नेमकी उत्तरे असत. त्यांचे बोलणे असे सामान्यत: गूढ वाटत असले, तरी ज्याचे त्याला बरोबर उमजत असे व तो ते ऐकून समाधानाने वंदन करून जात असे. वरकरणी वेड्यासारख्याच भासणा-या पण आतून ज्ञानपूर्ण असणा-या अवधूत स्थितीचे हे वैशिष्ट्यच आहे. कोणाची उगीच उपाधी नको म्हणून हे वेडेपण त्यांनी मुद्दामच पांघरलेले असते, असे श्री माउली स्पष्टच सांगतात.
संतांचे शब्द हे ब्रह्मवाक्यच असते.  काळ्या दगडावरची पांढरी रेघच ती ! त्यांच्या शब्दांत कालत्रयी बदल होत नसतात. ते जे बोलतात तेच पूर्णसत्य असते; आणि त्यांच्या हृदयी आपल्या कल्याणाशिवाय अन्य विषयच नसतो. त्यामुळे त्यांनी केलेली आज्ञा ही आपल्यासाठी अनुष्ठेय आवश्यकच ठरते. कारण सर्वभावे संतांचे दास होऊन, त्यांच्या शब्दांबरहुकूम श्रद्धाभक्तिपूर्वक वागण्यातच आपले खरे व शाश्वत हित असते !!
( छायाचित्र संदर्भ : पू.काकांच्या या चित्रात, अनंताचा वेध घेणारी, 'पल्याड'चे पाहणारी त्यांची विलक्षण ब्रह्मदृष्टी स्पष्ट दिसते. हे छायाचित्र पाहताना, जणू ते आपल्या आरपार पाहात आहेत, आपले पूर्वीचे व नंतरचेही शेकडो जन्म पाहात आहेत, असेच वाटत राहते.)
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

26 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - ५


नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय ५ -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_20.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seWl1eGJwOEs3Ylk/view?usp=drivesdk )
           ***********
५ : नेणती चंद्रकिरणें जिव्हाळा तो
भगवान श्री ज्ञानेश्वर माउली संतांचे सद्गुणैश्वर्य फार सुंदर शब्दांमध्ये सांगतात. अद्भुत उपमा द्याव्यात त्या माउलींनीच ! आपल्याकडे 'उपमा कालिदासस्य' असे म्हणतात. ते खरेही आहे; पण त्या कविकुलगुरु  कालिदासालाही शरणागती पत्करून दास्यत्व करावेसे वाटेल, इतक्या अलौकिक उपमा सद्गुरु भगवान श्री माउली देतात. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण व त्या संदर्भांचा नेमक्या जागी चपखल वापर करण्याची हातोटी वादातीत विलक्षण आहे. आता हेच पाहा; साधुत्वातील दयेची परिसीमा सांगताना ते म्हणतात,
निम्न भरलिया उणें ।
पाणी ढळोंनि नेणे ।
तेंवि श्रांता तोषौनि जाणें ।
सामोरें पां ॥ज्ञाने.१६.२.१५८॥

पाणी वाहते आहे, त्याच्या वाटेत एक खड्डा आला, तर ते पाणी तो खड्डा भरूनच पुढे जाते. तसे समोरच्याच्या ठिकाणी जे काही न्यून असेल ते पूर्ण करून, त्याचे ते शल्य, त्याचे ते दु:ख नष्ट करूनच हे संत स्वस्थ बसतात. हा त्या संतांचा सहजस्वभावच आहे. सद्गुरु श्री माउलींनी किती गोड उपमा योजलेली आहे पाहा !
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हे तर पेशाने डॉक्टरच होते. रोग्याचे दु:ख हरण करून त्याला सुख देणे, हे त्यांनी जाणतेपणी स्वीकारलेले जीवनव्रतच ! त्यातही ते संत, मग तर बोलायलाच नको. इवल्याशा परदु:खानेही तळमळणा-या त्यांच्यासारख्या महात्म्याने, सत्याऐंशी वर्षांच्या आपल्या जीवनकालात किती जीवांचे दु:ख, शोक, उद्वेग, भयादी हरण करून त्यांना शाश्वत समाधान दिले असेल, याची गणतीच होऊ शकत नाही.
प.पू.श्री.काकांचे असे काही हृद्य प्रसंग भक्तांनी प्रेमादरपूर्वक नोंदवून ठेवलेले आहेत, म्हणूनच आपण त्यांचा प्रेमास्वाद आजही तेवढ्याच उत्कटतेने घेऊ शकतो आहोत; हे आपले भाग्यच!
प.पू.श्री.काकांच्या निस्सीम भक्त, ती.अंबूताई फणसे यांची एक भावपूर्ण हकीकत त्यांच्याच शब्दांत.
"इ.स. १९४४ साली माझे वडील ती.माधवराव उपाख्य नाना वेलणकर श्रीदत्तचरणीं विलीन झाले. आता माझे माहेरच संपले, ही तीव्र भावना निर्माण होऊन कुठेतरी खोलवर मनात रुतून बसलेली होती. त्यावेळी आम्ही अंबाल्यास होतो. तब्बल सहा वर्षांनी आम्ही सिकंदराबादला बदलीवर आलो. इ.स.१९५० साली मी एकटीच सिकंदराबादहून फलटणला आले.
दुसरे दिवशी प.पू.काकांचे दर्शनास गेले. आता घरी आईवडील कोणीच नसल्यामुळे, शिवाय वडिलांच्या दुःखद निधनाने व्याकुळ मनाला सांत्वनाचे दोन शब्द सांगून दिलासा देणारे, पाठीवरून मायेचा हात फिरवून धीर देणारे प.पू . काकांशिवाय कोण होते मला?याच विचारातच मी पू.काकांच्याकडे गेले व एकदम त्यांच्या कमरेला मिठी मारून हमसाहमशी रडले. माझा रडण्याचा आवाज ऐकून ती.सौ.मामी बाहेर आल्या. पू. काका आपल्याच तंद्रीत, सद्गुरूंच्या अनुसंधानात निमग्न होते. त्यांनी सौ.मामींना विचारले, "कोण आहे ? का रडते आहे ?"
ती.सौ.मामी पू.काकांना म्हणाल्या, "अहो, असे काय करता? माधवरावांची अंबू नव्हे का? नाना वारले म्हणून तिला फार वाईट वाटते आहे." ती.सौ.मामींनी असे सांगताच पू.काका देहभानावर आले व माझ्या पाठीवरून हळुवार मायेने हात फिरवून, "उगी उगी बाळ, ऊठ ऊठ", असे म्हणाले व प्रेमभराने त्यांनी आपल्या धोतरच्या सोग्याने माझे अश्रू देखील पुसले. आई-वडीलसुद्धा अतीव दु:खाच्या प्रसंगी अशी निरपेक्ष, निखळ माया व्यक्त करू शकतील की नाही सांगता येत नाही. पण पू.काकांनी आपल्या निर्व्याज प्रेमाने माझे सांत्वन केले. मला पोटाशी घेऊन, चार शब्द सांगून शेजारी बसवून घेतले. त्याक्षणापासून माझी पोरकेपणाची ती भावना कायमची नष्टच झाली. कशी नाही जाणार हो ती भावना? पू.काकांसारखे अलौकिक माहेर जे मला लाभलेले होते!"
संतांच्या ठायी भगवत्कृपेने प्रकटलेल्या अद्भुत अहिंसेचे सुरेख वर्णन श्री माउलींनी तेराव्या अध्यायात केलेले आहे. त्यातील हातांच्या माध्यमातून प्रकटणा-या अहिंसेचे वर्णन करताना ते म्हणतात की, "या अहिंसा-सिद्ध संतांच्या हातांना कसलाही व्यापार शिल्लकच नसतो. त्यांना जरी कर्तव्यच काही उरलेले नसले, तरी ते हात सदैव नमस्कारासाठी तत्पर असतात. त्या हातांना केवळ आशीर्वाद देणे माहीत असते किंवा पडलेल्याला हात देऊन उठवणे माहीत असते अथवा आपल्या मृदुमुलायम स्पर्शाने आर्ताचे दु:खहरण करणेच फक्त माहीत असते." माउली म्हणतात, *"नेणती चंद्रकिरणें । जिव्हाळा तो ॥ज्ञाने.१३.७.२८९॥"* अहो, या संतांच्या हातांमधून (सर्वांगातून, शब्दांमधून) जे अद्भुत प्रेम, जो अलौकिक जिव्हाळा प्रकट होतो; जगातील सर्वात मुलायम व शीतल मानले गेलेले चंद्रकिरणही तो कधीच समजू शकणार नाहीत. पू.काकांच्या प्रत्येक व्यवहारातून, क्रियेतून हाच अपरंपार प्रेमभाव स्वाभाविकपणे प्रकट होत असे.
पू.काकांची नात श्रीमती पद्मा मिराशी आपल्या लहानपणीचा एक प्रसंग सांगतात. तो वाचून सद्गुरु माउलींचे वरील म्हणणे नक्की पटेल.
"प.पू.गोविंद महाराज माझे आजोबा. मी पाचवीमध्ये असताना मला टायफॉईड झाला होता. त्यावेळी आजोबा माझ्याजवळ बसून चमच्याने तोंडात पाणी घालत होते. कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवत होते. तरीही ताप वाढतच होता. रात्री ताप १०५° पर्यंत गेला. माझी आई घाबरून आजोबांना सारखे विचारत होती, "पद्माचा ताप केव्हा उतरणार?" आजोबा व आई रात्रभर माझ्याजवळ बसूनच होते. शेवटी पहाटे ५ वाजता ताप उतरला. त्यावेळी मिश्कीलपणे आजोबा माझ्या आईला म्हणाले, "पद्माला न्यायला यम आला होता. मी त्याला दूध, कोल्ड्रिंक देऊन परत पाठवले." त्यानंतर ताप उतरतच गेला. पुन्हा काही ताप आला नाही.
अशी दैवी शक्ती माझ्या पाठीशी आजोबांच्या रूपाने असल्यामुळेच मी त्या भयंकर दुखण्यातून सहीसलामत बाहेर आले. मृत्यूवरही नियंत्रण राखण्याचे सामर्थ्य बाळगून होते माझे आजोबा !
मी त्यांची नात म्हणून ते माझ्यावरील प्रेमाने बसून राहिले, असे अजिबात नाही. त्यांना असा कळवळा सर्वांविषयीच होता. म्हणून तेच आजही तुम्हां-आम्हां भक्तांच्या पाठीशी सतत उभे आहेत. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आपले सगळे बिनबोभाट होत आहे. तेच कसल्याही संकटांतून आपल्याला  तारतात व त्यांचे स्मरणही करवून देतात, ही केवढी मोठी कृपा आहे त्यांची !!"
जणू अमृताच्या अवखळ गंगेने स्वत:च येऊन एखाद्यावर अविरत प्रेमवर्षाव करावा, तसे हे संत सर्वांचे अखंड कल्याणच करीत असतात. त्यांच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊन, त्या श्रीचरणांद्वारे प्रकट होणा-या भगवत्कृपा-गंगेत सुस्नात होण्याच्या या महद्भाग्याचा हेवा करावा तेवढा थोडाच ! जन्मोत्सवानिमित्त सध्या चालू असलेल्या या 'गोविंदगुण-गायन सेवे'चे हेच तर एकमात्र उद्दिष्ट आहे !!!
( छायाचित्र संदर्भ : सद्गुरु श्री माउली सांगतात की, "जे सदांचि ते मोकळे । जैशीं चंदनांगें शीतळें ।(ज्ञाने.१३.७.२९१) चंदन जसा सर्वांगानेच शीतळ आहे, न फळताच तो सर्वांना सर्वांगाने फलप्रद ठरतो, तसे हे संतांचे हात सदैव आशीर्वादच देतात, कसलाही भेदभाव न बाळगता! श्री माउलींच्या या मधुर श्रुतीचा प्रकट दिव्य अनुभव म्हणजेच पू.काकांचे हे छायाचित्र !!)
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

25 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - ४


नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय ४ -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_19.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -

           ***********
४ : विचरे विश्व होउनि विश्वामाजी
थोर ज्ञानेश्वर्युपासक प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज आपल्या 'अमृतबोध' ग्रंथात म्हणतात, "देव सांगतात 'सगळी कर्मे संपवून या, तरच जवळ करतो!' तर संत सांगतात की, 'सगळ्या कर्मांसह या'. त्यांच्या संगतीत कर्मेच मोक्ष देणारी होतात." खरोखरीच, किती मार्मिक आणि जबरदस्त आहे हे वाक्य !! संत आणि भगवंतांमधला  अचूक फरक पू.मामा येथे सांगत आहेत. एकाच श्रीभगवंतांची दोन रूपे आहेत, पण भेद पाहा; श्रीभगवंत पित्याच्या भूमिकेत असतात, तर संत हे कायमच हजारो लाखो मातांची माया ल्येऊन साकार झालेले असतात. श्रीभगवंतांचे अपरंपार प्रेमच घनीभूत होऊन संत हे रुपडे धारण करीत असते. श्रीभगवंत स्वत:च निर्माण केलेले शास्त्र जसेच्या तसे पालन करतात; पण त्यांनी आपल्या संत रूपाला त्यात सवलत ठेवलेली आहे. संतांनी जीवांच्या कळवळ्यापोटी असंख्य वेळा शास्त्र मोडून उपकार केलेले दिसून येतात. आजही संतांच्या या अकारण-करुणेचे अक्षरश: हजारो अनुभव भक्तांना येत असतात; व पृथ्वीच्या अंतापर्यंत येत राहतीलच.
संतांना ना आपला-परका हा भेद असतो, ना लाडका-दोडका ही भावना असते. सगळे चराचर जग त्यांना स्वत:चे स्वरूपच असल्याचे सतत जाणवत असते. आपण आपल्या स्वत:शी कधीतरी वाईट वागू शकतो का? तसेच तेही कधीच कोणाशी वाईट वागू शकत नाहीत, कारण त्यांना सर्वत्र आत्मप्रचितीच असते. *पू.शिरीषदादा कवडे म्हणतात की, "सद्गुरूंच्या शब्दकोशात 'अकल्याण' हा शब्दच अस्तित्वात नाही. त्यामुळे, 'कल्याण व्हावे' असा वेगळा आशीर्वाद द्यायची त्यांना गरजच नसते. त्यांच्या हृदयात यच्चयावत् सर्वांच्या अखंड कल्याणाचीच एकमात्र भावना सदैव असते."* भगवान श्री माउलींनी देखील यावर फार सुंदर ओव्या रचलेल्या आहेत. बाराव्या अध्यायात भक्तांची लक्षणे सांगताना ते म्हणतात, श्रीमंत-गरीब हा भेद न पाहता प्राण सर्वांचे पोषण करतो, वाघ आहे का गाय आहे, हे न पाहता पाणी सर्वांची तहान भागवते, तसेच हे संतही सर्वांवर समान प्रेम करतात. समोरचा कितीही कृतघ्नपणे वागला, तरी मनात किंचितही किंतू न आणता त्याचेच हित हे क्षमाशील संत साधतात. प्राणांवर बेतले तरीही ते समोरच्याचा फायदाच करवून देतात. हा त्यांचा सहज स्वभावच असतो.
तैसी आघवियांची भूतमात्रीं ।
एकपणें जया मैत्री ।
कृपेसि धात्री।
आपण जो॥ज्ञाने.१२.१३.१४८॥

करुणाकृपेचे साक्षात् आगर असणारे हे संत, अवघ्या भूतमात्रांशी समान मैत्री ठेवून असतात. त्यांच्या अंत:करणात कधीही कोणाविषयीही परकेपणाची भावनाच नसते.
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हेही असे विलक्षण करुणामूर्तीच होते. ते जरी अखंड आपल्याच अवधूती आनंदात रममाण होऊन राहात असले, तरीही संतांचा स्थायीभाव असणारा, आपल्याकडे आलेल्या संसारश्रांत, क्लांत जीवांचा स्वाभाविक कळवळा त्यांच्या ठायी पूर्ण प्रभावाने विलसत होताच.
या संबंधी पू.काकांचे एक भक्त श्री.गुरुनाथ वेलणकर यांनी सांगितलेली हकीकत मोठी बोलकी आहे. पू.काकांच्या अलौकिक करुणेचे ते प्रसन्न व भव्य दर्शनच होय !
श्री. वेलणकर म्हणतात, "डॉ. उपळेकर काकांसारख्या महान संतांच्या सान्निध्यात यायला मिळाले, आजही मिळते, हे मी माझे भाग्य समजतो. मी नोकरीला मिलिटरीमध्ये असल्यामुळे, देव-धर्म-बुवाबाजी वगैरे गोष्टींकडे बघण्याचा माझा दृष्टिकोण वेगळाच होता, परंतु पू.काकांच्या अल्पशा सहवासात आलेले अनुभव सांगितल्याशिवाय मन स्वस्थ बसू देत नाही.
असाच एकदा दोन महिन्यांच्या सुट्टीवर फलटणला आलो असताना, प.पू.काकांचे दर्शनास गेलो. त्यांच्या बंगल्याबाहेरच्या ओट्यावर बसून बूट काढीत असताना, माझे विचारचक्र जोरात चालू झाले. "आपण सर्वजण पू.गोविंद काकांसारख्या थोर पुरुषाच्या दर्शनाला जाऊन, 'काका, माझे हे केव्हा होणार? काका, माझे ते केव्हा होणार? हा आजाराने त्रासला आहे, त्यावर काय करायचे? याला नोकरी केव्हा मिळणार? तिचे लग्न कधी होणार? आम्हांला मूल कधी होणार?' इत्यादी अनेक प्रापंचिक प्रश्नच वारंवार विचारतो. त्यावर ही महान विभूती, आपल्या सामर्थ्याने, आपले कठोर तपश्चर्येचे बळ व सद्गुरुकृपा खर्ची घालून उपाय सुचवणार. म्हणजे एका दृष्टीने आपण सर्व लोक त्यांच्या पुण्याईतला काही भाग, कारण नसताना आपल्यासाठी खर्च करावा अशीच गळ त्यांना घालत नाही का? आपला असे म्हणण्याचा अधिकार काय? आपण असे काय करतो म्हणून त्यांनी आपल्यावर फुकटच कृपा करावी? त्याची परतफेड आपण कधीतरी करतो का? त्यांचे सांगणे किंचित तरी ऐकतो का?" अशा तऱ्हेचे असंख्य विचार माझ्या मनात येत होते. म्हणून मी तत्काळ ठरविले की, आपण दर्शन घेतल्यावर पू.काकांकडे काहीही मागायचे नाही की काही बोलायचेही नाही. फक्त दर्शन घेऊन परत जायचे. असा सुविचार करूनच हरिपाठाच्या खोलीत शिरलो.
नेहमीप्रमाणे तिथल्या गादीला नमस्कार करून पू.काकांचे चरणांवर डोके ठेवून एका बाजूला बसलो. पू.काका आपल्याच आनंदाच्या अवस्थेत गोड हसत बसलेले होते. योग असा की, तेव्हा खोलीत कोणीही नव्हते. मी शांत बसलेला बघून आणि माझ्या मनातली ती विचारांची खळबळ अचूक जोखून पू.काका स्वत:हूनच मला म्हणाले, "अरे वेड्या, कोणी कोणाचे काही घेत नाही, कोणी कोणाचे काही ओरबाडत नाही. कोणी कोणासाठी काही खर्चही करत नाही. तुझ्यात आणि माझ्यात फरकच जर नाही, तर मी तुझ्यासाठी काही केले आणि तू मजकडे काही मागितलेस, असे वावगे विचार तरी तुझ्या मनात आलेच कसे?"
त्यांची ती अपरंपार करुणा आणि माउली म्हणतात तशी, *"विचरे विश्व होऊनि । विश्वामाजी ॥"* अशी उत्तुंग योगावस्था पाहून माझ्या डोळ्यांत खळकन् पाणीच आले. कसाबसा सावरून मी पू.काकांना म्हणालो, "अहो, मी एक सर्वसामान्य माणूस आहे. मी एवढ्या उच्च विचारांचा अजून झालेलो नाही की चराचर सृष्टीमध्ये स्वत:ला पाहीन. आपली स्थिती भिन्न आहे. जे आपल्याला सहज शक्य आहे, ते सर्वसाधारण बुद्धी असणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला कसे जमणार? आपली कृपा होईल, तरच या सद्विचाराचे मर्म-वर्म समजेल व तदनुरूप कर्म होईल, खरे ना?"
यावर पू.काका दिलखुलास हसले. त्यांचे ते निर्व्याज प्रेम व तुम्हां आम्हां बुडत्या जनांबद्दलचा अपार कळवळा पाहून मी एका भारावलेल्या अवस्थेतच पुन्हा त्यांच्या पायी मस्तक ठेवले व त्यांची अनुज्ञा, आशीर्वाद घेऊन बाहेर पडलो."
श्रीभगवंतांचेच अपर-स्वरूपच असणा-या संतांच्या या जगावेगळ्या दया-कृपेचे वर्णन करणे सरस्वतीमातेलाही जिथे शक्य होत नाही, तिथे मी बोबड्याने किती वाचाळी करावी? म्हणून सद्गुरु श्री माउली स्वत: करतात तेच कर्तव्य; मी, माझ्या व तुम्हां सर्वांच्याही वतीने प्रेमादरपूर्वक करतो,
तैसें श्रीगुरूंचें महिमान।
आकळितें कें असे साधन ।
हें जाणोनियां नमन ।
निवांत केलें ॥ज्ञाने.१०.०.१३॥

करुणामूर्ती दयाघन सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या श्रीचरणीं सादर दंडवत !!!
( छायाचित्र संदर्भ : प.पू.श्री. काका अनेकवेळा, काहीतरी दूरचे नीट ऐकू यावे म्हणून जसा आपण हात लावतो, तसे उजवा हात कानाशी घेऊन आपल्याच तंद्रीमध्ये आनंदाने स्मितहास्य करीत बसलेले असत. याही छायाचित्रात त्यांचे ते अज्ञात विश्वातील अगम्य शब्द म्हणा किंवा श्रीभगवंतांची वाणी म्हणा,  कान देऊन ऐकणे चालू आहे आणि त्यामुळेच एक अलौकिक, मधुर व त्रिभुवनमोहक हास्य त्यांच्या मुखावर उमटलेले स्पष्ट दिसत आहे. दृष्टी अगोचरी लागलेली आहे.)
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

24 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - ३

नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र थोडक्यात पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय-३ -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_23.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seWl1eGJwOEs3Ylk/view?usp=drivesdk )
           ***********
३ : अपार महिमा नारायण
परमपावन श्रीगुरुचरित्राच्या शेहेचाळिसाव्या अध्यायात भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची एक अलौकिक लीला विशद करून सांगितलेली आहे. दिवाळीसाठी घरी बोलविणा-या सातही शिष्यांना श्री स्वामी महाराज येऊ म्हणून सांगतात. गावातील लोक दिवाळीला येथेच राहावे म्हणून विनवितात. सर्वच भक्तांचे अंत:करण राखण्यासाठी, श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आठ रूपे धारण करून आठही ठिकाणी दिवाळी साजरी करतात.
श्रीगुरुचरित्रकार म्हणतात,
आठरूप झाले आपण ।
अपार महिमा नारायण ।
सात ठायीही गेले आपण ।
गाणगापुरीं होतेचि ॥४६.२६॥

अशाच प्रकारच्या अद्भुत लीला, भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंचेच अंश असणा-या, पू.गोविंदकाका उपळेकर महाराजांसारख्या थोर संतांच्या चरित्रातही घडलेल्या पाहायला मिळतात. त्यांचे हे अतर्क्य सामर्थ्य म्हणजे केवळ सिद्धी नव्हेत. हा तर त्यांच्या महात्मेपणाचा, भगवत्स्वरूप असण्याचा दृश्य पुरावाच आहे !
प.पू.श्री.काकांच्या बाबतीतले असे दोन प्रसंग आज आपण पाहणार आहोत. पहिला अनुभव खुद्द पू.काकांचे चिरंजीव कै.ती.प्रभाकरपंत उपळेकरांचा  आहे. तर दुसरा त्यावेळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनेच स्वत: मला सांगितलेला आहे.
कै.प्रभाकरपंत सांगतात, "माझी बदली इ.स. १९६१ साली फलटणला झाली होती. मी बहुतेक वेळ प.पू. काकांच्या सहवासात घालविण्याचा प्रयत्न करीत असे. साधारणतः १९६१ सालचे मे महिन्याचे ते दिवस असावेत. मी प.पू.काकांच्या खोलीतच रात्री झोपत असे. त्या दिवशी रात्री हरिपाठ झाल्यानंतर, प.पू.काकांनी नेहमीप्रमाणे लांब बाह्यांचा स्वेटर घातला. डोक्याला उपरणे गुंडाळले. डोक्याखाली काही पुस्तकांची उशी केली आणि रात्री साधारणतः बारा वाजता ते झोपले असावेत.
पहाटे चारच्या सुमारास मला जाग आली. त्यावेळी मी प.पू काकांना गादीवर शांतपणे झोपलेले पाहिले. मी तेथून उठून लघुशंकेसाठी घराबाहेर जाऊन डावीकडे वळलो, तर प.पू.काका मला समोरून येताना दिसले. हातात काठी, डोक्याला करड्या रंगाची टोपी, अंगात कोट, पायात सॉक्स व कॅनव्हासचे बूट होते. प.पू.काका त्यांच्या या बाहेर जाण्याच्या पोशाखात शेजारच्या कट्टयावर 'अगं आई' असे त्यांच्या नेहमीच्या सवयीने म्हणत बसले.
त्यावेळी त्यांचेकडे नुसते पाहिले आणि मी लघुशंकेसाठी निघून गेलो. काहीतरी वेगळे घडते आहे हे दोन क्षण माझ्या अजिबात लक्षात आले नाही. अवघ्या काही सेकंदांपूर्वी तर मी त्यांना गादीवर झोपलेले पाहिलेे होते. शिवाय रात्रभर मी त्यांच्या शेजारीच झोपलेलो होतो. ते बाहेर कुठे गेल्याचे मला कळलेही नव्हते. पण त्यावेळी माझ्या डोक्यात हा काहीच प्रकाश पडला नाही. मी लघुशंका करून परत आलो, तर प.पू.काका त्या कट्ट्यावर दिसले नाहीत. दारातून आत येऊन खोलीत बघतो, तर तेथे गादीवर प.पू.काका पहिल्याच पद्धतीने झोपलेले दिसले.
प.पू.काका बाहेर कुठे व कधी गेले? असे ते रात्री कोणत्या कार्यासाठी गेले असावेत? परत केव्हा आले? कपडे कधी बदलले? एकाच वेळी ते खोलीतही झोपलेले आणि बाहेरही कुठेतरी गेलेले; हे कसे काय घडले? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मला आजवर उमगलेली नाहीत. पण राहून राहून या विलक्षण अनुभवाचे आश्चर्य मात्र वाटते. ही आठवण अद्यापही मी विसरलेलो नाही, अजूनही जशीच्या तशी माझ्या स्मरणात आहे. खरोखरीच, आमचे पितृचरण अलौकिक अधिकाराचे थोर महायोगी होते, यात तीळमात्र शंका नाही !"
पू.काकांचे एक निस्सीम भक्त कै.श्री.हिरामण तेली वकील यांनी स्वत: अनुभवलेला एक प्रसंग मला लहानपणी सांगितला होता. ते एकदा पू.काकांबरोबर सकाळी फलटणातील शुक्रवार पेठेतील एकांच्या घरी गेले होते. तेथे त्यांनी चहा घेतला व बोलणे वगैरे झाल्यावर तेथून परत घरी आले. संध्याकाळी ते पू.काकांकडे गेले होते, तेव्हा दुसरे एक गृहस्थ त्यांना म्हणाले की, "आज सकाळी ९ वाजता पू.काका आमच्या घरी येऊन गेले." तेली वकील चक्रावलेच. ते म्हणाले, "अहो, असे काय करताय? सकाळी ९ वाजता तर मी स्वत: पू.काकांच्या बरोबर अमक्यांच्या घरी शुक्रवार पेठेत होतो. त्याचवेळी ते तुमच्या इथेही कसे काय आलेले होते?" पू.काकांची ही अतर्क्य लीला पाहून तेली वकील नतमस्तकच झाले.
श्रीगुरुचरित्रकार म्हणतात ते खरेच अाहे; *'अपार महिमा नारायण ।'* हेच याचे उत्तर आहे. चराचरावर सत्ता असणे व हवे तेव्हा हवे तसे वागणे; हे केवळ श्रीभगवंतांना व त्यांचेच अंश असणा-या व त्यांच्याशी सदैव एकरूप होऊनच वावरणा-या प.पू.काकांसारख्या संतांनाच शक्य आहे ! आपली मती व गती त्यांच्या महन्मंगल श्रीचरणांपर्यंतच सीमित आहे. देवदेवताही जिच्या प्राप्तीसाठी आसुसलेले असतात, ती परमभाग्याने मिळणारी यांची दिव्य श्रीचरणधुली प्रेमादराने मस्तकी धारण करण्यात जो अपूर्व-मनोहर आनंद आहे, त्याची तुलना आणखी कशाशी बरे करता येईल?
( छायाचित्र संदर्भ : प.पू.श्री. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या दोन आत्ममग्न भावमुद्रा )
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

23 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - २

लेखांक - २

नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय दुसरा -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_17.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seWl1eGJwOEs3Ylk/view?usp=drivesdk )
           ***********
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज हे ब्रह्मानंदाच्या अगम्य अवस्थेतच अखंड राहात असत. यालाच उपनिषदांत 'तुरीयातीतावधूत अवस्था' असे म्हटले जाते. राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेचे व्यवच्छेदक लक्षण असणा-या या अलौकिक व अद्भुत स्थितीत सदैव राहणा-या, पू.काकांसारख्या महात्म्यांचे वागणे-बोलणे तुम्हां-आम्हां सर्वसामान्यांना पटकन् कळत नाही, उमजत नाही. श्रीसंत तुकाराम महाराज यांचे वर्णन करताना म्हणतात, "जगात पिशाच्च अंतरी शहाणा । सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो ॥" आतून पूर्ण ज्ञानी असणारा हा महात्मा बाहेर मात्र वेड्यासारखाच वागताना दिसतो. वस्तुत: त्यांचा तो वरकरणी भासणारा वेडाचारही शास्त्रकसोटीवर घासून पाहिला तर चोखच ठरतो. खरेतर आपली तोकडी मनुष्यबुद्धी या ब्रह्मस्वरूप लीलावतारांचे जगावेगळे वर्तन कधीही जाणूच शकत नाही. म्हणूनच सद्गुरु श्री माउली म्हणतात,
वाचस्पतीचेनि पाडें ।
सर्वज्ञता तरी जोडे ।
परि वेडिवेमाजीं दडे ।
महिमेभेणे ॥ज्ञाने.१३.७.१९१॥
हे महात्मे ज्ञानाच्या बाबतीत साक्षात् ब्रह्मदेवांशी तुलना करण्याच्या योग्यतेचे असतात, पण आपले माहात्म्य वाढून त्याचा उपसर्ग होऊ नये म्हणून वेड्याचे सोंग घेऊन वावरतात.
प.पू.काका याच अवस्थेत सतत राहात असल्याने त्यांचे बोलणे अतिशय गूढ असे. त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे कालांतरानेच समजून येत असे.
पू.काकांच्या नात, कै.सौ.विनताताई गुळाणीकर यांनी पू.काकांच्या काही विलक्षण हकीकती सांगितलेल्या आहेत. त्यातून पू.काकांच्या त्या लोकविलक्षण अवस्थेचे नितांतसुंदर व लोभस दर्शन आपल्याला होते.
कै.विनताताई सांगतात," माझी आई कै.गोदुताई ही पू. गोविंदकाकांची पुतणी. ती आम्हांस पू.काकांच्या खूप आठवणी सांगायची. माझे वडील श्री.अण्णासाहेब खासनीस हे पू. गोविंदकाकांचे परमभक्त. आमचा वाडा पुण्याला आंबेकरांच्या बोळात होता. तेथे पू.काका पुष्कळ वेळा यायचे. बरोबर ती.सौ.काकी, दोन तीन लहान मुले असायची. त्यांच्यासोबत बॅरिस्टर रावसाहेब मेहेंदळे, पू.बागोबा कुकडे, दामुअण्णा देशपांडे असे बरेच भक्त असायचे. कितीही लोक असले तरी माझी आई सगळ्यांचे करायची व पू.काकांच्या कृपेने स्वयंपाक कधीही कमी पडायचा नाही.
माझी आई सांगायची की, घरांत जे काही भविष्यात होणार असेल ते पू.काका अगोदरच सांगायचे. माझी आजी, श्री.मनोहरपंत उपळेकरांची पत्नी ही निवर्तण्याच्या आधीच पू काकांनी 'ही जाणार आहे' म्हणून सांगितले होते.
माझी बहीण कै.सौ.मालती धोकटे फलटणला येणार होती. तिने येण्यापूर्वी पत्र किंवा निरोप काहीच पाठविला नव्हता. त्या दिवशी सकाळपासूनच पू. काका घरातल्या माणसांना सांगत होते, आज सौ.माली येणार. आणि खरोखर ती सायंकाळी आलेली पाहून आम्हां सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.
साधारणतः १९५१-५२ सालातली गोष्ट आहे. पू.काका आमच्याकडे आले होते. ती.सौ.काकू त्यावेळी आमच्याकडेच होती. माझ्या चुलतबहिणीची तब्येत खूप चांगली होती. पण लग्नानंतर पाच वर्षे झाली तरी मूल झाले नव्हते. आमच्या आईने पू.काकांना विचारले, "काका, सौ.लीलीला मूल कधी होईल ?" पू.काका उन्मनी अवस्थेत होते. वर पाहात म्हणाले, "बुंदीचे झारे करावयास टाकलेत. लग्न झालं की मूल होईल. अजून लग्न व्हायचेय !" आई परत म्हणाली, "काका, अहो सौ.लीलीचे लग्न झाले आहे. तिला मूल कधी होईल ?" त्यावर ते काहीच बोलले नाहीत. जरा वेळाने पू.काका नेहमीच्या अवस्थेत आल्यावर म्हणाले, "भंग्या मारुतीला नैवेद्य दाखव." या वाक्याचा संदर्भ आम्हां कोणालाही त्यावेळी लागला नाही.
पू. काकांच्या पहिल्या वाक्याचा अर्थही त्यावेळेस कोणालाच कळला नाही. परंतु चार पाच महिन्यातच एकाएकी माझी बहीण वारली व तिच्या नवऱ्याचे दुसरे लग्न होऊन मग पुढे त्याला मुले झाली.म्हणजे, 'बुंदीचे झारे करायला टाकले आहेत, लग्न झाले की मूल होईल', या वाक्याचा हा अर्थ होता."
प.पू.श्री.काका नेहमीच असे गूढ बोलत असत. त्यांची ती विशिष्ट शैली नवीन माणसांना खूपच वेगळी वाटे, पण त्याचे पू.काकांना काहीच सोयर-सुतक नसे. सर्वकाळी, सर्व अवस्थांमध्ये ते आपल्याच आनंदात रममाण झालेले असत. श्री माउली म्हणतात, "भोगितां उन्मनी । आरायेना ॥" तसे पू.काका आपल्या अवधूती आनंदातून कोणत्याही कारणासाठी बाहेर येत नसत. त्यांची ती दिव्य सहज-समाधी सद्गुरुकृपेने शेवटपर्यंत अविच्छिन्नच होती ! अशा परिपूर्ण परब्रह्माचे दर्शन होणे हेही जन्मजन्मांतरीच्या महद्भाग्याचे फलितच नव्हे काय ?
( छायाचित्र संदर्भ: आपल्या नातवंडांच्या मुंजीच्या प्रसंगी, श्री ज्ञानेश्वर मंदिराच्या समोर बाकड्यावर बसून काढलेले ती.सौ.रुक्मिणीदेवी व पू.काकांचे दुर्मिळ छायाचित्र. यात पू.काकांच्या प्रसन्न चेह-यावर प्रकटलेले अवधूती मस्तीचे ब्रह्मानंद-हास्य स्पष्ट दिसून येते.)
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

22 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे - लेखांक - १


नमस्कार मंडळी,
आजपासून प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेऊया. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या चरित्रातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
गोविंद-चरित्र : अध्याय पहिला -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_92.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B-4fTpvl_d6seWl1eGJwOEs3Ylk/view?usp=drivesdk
)
           ***********
१ : अलौकिक त्रिकालदर्शी विभूतिमत्व
कै.गोपाळराव फणसे व श्रीमती अंबूताई हे पू.काकांचे निस्सीम भक्तदांपत्य. यांनी पू.काकांची मोलाची वाङ्मय-सेवा केलेली आहे. आजही ९४ वर्षांच्या अंबूताई निष्ठेने पू.काकांच्या स्मरणात व सेवेत मग्न असतात. त्यांचीच एक हृद्य हकीकत येथे देत आहे.
कै.फणसे म्हैसूरला नोकरीला असताना पू.काकांनी त्यांना स्वत:च्या स्वाक्षरीचे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, "दोन खोल्या बांधा अन् राहायला लागा. म्हणजे आम्हांला काही करता येईल !" पू.काका सहसा असे कोणाला कधी लिहीत नसत. पण आश्चर्य म्हणजे त्यांच्याच कृपेने, सर्वसामान्य नोकरदार असणा-या कै.फणसे यांची वास्तू पुण्यात टि.म.वि कॉलनीत उभी राहिली. ते १९६६ साली त्या वास्तूत राहायलाही आले.
त्यांनी पू.काकांना विनंती केली  की, "आपल्या अमोघ शब्दांचे फळ म्हणून वास्तू उभी राहिलेली आहे, तर आपण एकदा येऊन पायधूळ झाडून ती पावन करावी." पू.काकाही प्रसन्नतेने, "बरं बरं, अवश्य येऊ", असे म्हणाले.
पुढे १९७० साली आपली तब्येत दाखविण्याच्या निमित्ताने, पू.काका, पू.सौ.मामी व त्यांचे चिरंजीव कै.वसंतराव पुण्यात आले होते. त्याचवेळी पू.काकांनी फणश्यांच्या 'संगम' या बंगल्यास भेट दिली. सर्व घर हिंडून, "शॉर्ट बट स्वीट" असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. फणसे दांपत्यास भरून पावल्यासारखे वाटले.
घराच्या मागील बाजूस उभे असताना कै.फणसे पू.काकांना म्हणाले, "काका, ५० फूट पुढपर्यंत आपलीच जागा आहे, तेथपर्यंत चला ना." पण पू.काका म्हणाले, "माझे पाय दुखतात."
तेवढ्यात त्यांना दूरवर एक विहीर दिसली. तिकडे पाहात त्यांनी विचारले, "तिथे कोणी जीव दिलाय का?" फणसे आश्चर्याने म्हणाले, "हो, मी ऐकलंय की एक-दोघांनी त्या विहिरीत जीव दिलाय."
पुन्हा एकदा फणसे म्हणाले, "काका, चला की प्लॉटच्या टोकापर्यंत जाऊन येऊ." पुन्हा पू.काकांनी तेच उत्तर दिले, "नको, पाय दुखतात रे माझे !" ते काही तेथवर गेलेच नाहीत.
पू.काकांच्या या मोजक्याच पण अर्थपूर्ण शब्दांचा उलगडा पुढे बारा वर्षांनी झाला. घरामागची ती ५० फूट जागा फणसे यांनी बिल्डरला ओनरशिप फ्लॅट्स बांधायला दिली. म्हणजे पू.काका उभे होते, तीच फणश्यांच्या घराची सीमा ठरली. पाय दुखतात याचा स्पष्ट अर्थ ती जागा तुझी नाही, हे तेव्हा बारा वर्षे आधी कोणाच्या लक्षात येणार? पण पू.काका तर त्रिकालदर्शी विभूतिमत्व होते ना, त्यांच्यापासून थोडीच काही लपणार होते?
पू.काकांच्या दृष्टीला भूत-भविष्य-वर्तमान सर्व काही एकाच वेळी स्पष्ट दिसत असे. त्यामुळेच भूतकाळात घडून गेलेले त्या विहिरीत कोणी जीव दिल्याचे प्रसंग असोत किंवा भविष्यातील घटना असोत, ते सर्व त्यांना समोर पाहिल्यासारखेच दिसत असे. त्यांच्यापासून काहीच लपून राहात नसे, हेच खरे!
पू.काकांच्या पत्रातील वाक्याचाही खरा खुलासा नंतर झाला. १९८० साली याच वास्तूत प्रसिद्ध चित्रकार व पू.काकांचे भक्त श्री. डी.डी.रेगे यांनी काढलेल्या पू.काकांच्या भव्य तैलचित्राची स्थापना झाली व पुण्यनगरीत पू.काकांच्या भक्तांसाठी त्यांचे एक श्रद्धास्थान निर्माण झाले. या वास्तूत पुढे अनेक संत सत्पुरुषांनी आवर्जून येऊन पू.काकांचे दर्शन घेऊन सेवा केलेली आहे. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची प्रवचनसेवाही या तैलचित्रासमोर झालेली आहे. त्यांनीही समाधान व्यक्त केले होते हे स्थान पाहून.  "दोन खोल्या बांधा, म्हणजे आम्हांला काही करता येईल", या वाक्याचा हाच गूढार्थ होता; जो पुढे जवळपास पंचवीस वर्षांनी सत्य ठरला. संतांचे संकल्पही असे अमोघच असतात !
भगवान सद्गुरु श्री माउली प्रत्यक्ष श्रीभगवंतांच्याच मुखाने अर्जुनाला संतांची महती सांगताना म्हणतात,
मी जैसा अनंतानंद ।
जैसाचि सत्यसंध ।
तैसेचि ते भेद ।
उरेचि ना ॥ज्ञाने.१४.२.५४॥
"अर्जुना, मी जसा अनंत व आनंदस्वरूप आहे, जसा सत्य संकल्प आहे; तसेच माझ्याशी एकरूप झालेले संतही असतात. त्यांच्यात आणि माझ्यात कसलाही भेद उरलेला नसतो !"
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजही, श्रीभगवंतांच्या याच उक्तीनुसार देहीच हरिरूप होऊन ठाकलेले होते. आपले परमभाग्य की आपल्याला त्यांचे स्मरण करण्याचे, त्यांच्या लीला आस्वादण्याचे सौभाग्य लाभते आहे! धन्य धन्य  !!
( छायाचित्र : 'संगम' वास्तूसमोर उभ्या असलेल्या ती.अंबूताई व वास्तूतील पू.श्री.काकांचे तैलचित्र)
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )