27 Jan 2017

दिनरजनी हाचि धंदा गोविंदाचे पवाडे* लेखांक - ६

नमस्कार मंडळी,
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या १२९ व्या जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. त्यानिमित्त प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक लीलांचा आपण सप्रेम आस्वाद घेत आहोत. गेल्या वर्षी पुण्यतिथी महोत्सवात आपण रोज एक अध्याय याप्रमाणे प.पू.काकांचे संपूर्ण चरित्र पाहिलेले आहे. त्यामुळे त्यावर पुन्हा न लिहिता, त्यांच्या जीवनातील काही अद्भुत अनुभवच या सप्ताहात आपण दररोज पाहणार आहोत. सर्वांचे या 'गोविंदगुण-गायन' सेवेसाठी सहर्ष स्वागत.
( अधिक माहितीसाठी : दररोज क्रमाने गेल्या वर्षीच्या एका लेखाची लिंक येथे दिली जाईल, त्यावर जाऊन चरित्राचेही वाचन आपण सहज करू शकता. ज्यांना गेल्यावर्षी पोस्ट केलेले ते संक्षिप्त चरित्र डाऊनलोड करून संग्रही ठेवायचे आहे, त्यांनी कृपया लिंकवरून पीडीएफ डाऊनलोड करावी, ही विनंती.
सद्गुरुपुराण : अध्याय -६ -
http://rohanupalekar.blogspot.in/2016/09/blog-post_21.html
संपूर्ण चरित्र पीडीएफ -

           ***********
६ : तो समुद्रापैलीकडील देखे
श्रीगुरुकृपेने ज्यांची श्रीभगवंतांच्या स्वरूपातच स्थिती होते, त्या थोर महात्म्यांच्याठायी प्रकटणा-या सहज सिद्धींविषयी सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात,
मग समुद्रापैलीकडील देखे ।
स्वर्गींचा आलोच आइके ।
मनोगत ओळखे ।
मुंगियेचें ॥ज्ञाने.६.१४.२६९॥
तो महात्मा बसल्याजागी जगातले काहीही पाहू शकतो. स्वर्गातील बोलणेही त्याला ऐकता येते व लहानग्या मुंगीचे मनोगतही समजते. विश्वाकार झालेल्या महात्म्यांची ही सहज स्थितीच असल्याने, त्यांच्या जीवनात दिसणारे असंख्य चमत्कार हे सिद्धींचे नव्हेत, तर भगवत्कृपेचेच अलौकिक आविष्कार असतात.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजही आपल्याच स्वानंदमग्न स्थितीमध्ये केव्हा केव्हा असे विलक्षण संदर्भ सहज बोलून जात. काहीवेळा ते भूतकाळातील प्रसंग सांगत तर काहीवेळा भविष्यात घडावयाच्या गोष्टीच ते पटकन् बोलून जात.
यासंदर्भात माझ्याच आईचा एक आश्चर्यचकित करणारा अनुभव सांगतो.
माझी आई कु.चारुलता श्रीराम नवरे हिचे श्री.विजय श्रीपाद उपळेकर यांच्याशी १९७४ साली जून महिन्यात लग्न झाले व ती उपळेकरांच्या घरात सून म्हणून आली. घरातील थोर संत व आजेसासरे म्हणून, पू.काकांच्या श्रीचरणांवर डोके ठेवण्याचे सौभाग्य तिला चार पाच वेळा लाभले. तिचे लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनीच पू.काकांनी देह ठेवला.
भेटीच्या प्रत्येकवेळी पू.काका तिचा हात हातात घेऊन आपला हात त्यावर ठेवत व "तू चारुगात्री आहेस" असे तिला सांगत असत. तसेच दरवेळी पू.काका तिला एक प्रश्न विचारत की, "सोलापूरच्या नव-यांपैकी इंग्लिश बायको कोणी केलेली आहे?" माझी सौ.आई दरवेळी सांगे की, "काका, आमच्यापैकी कोणीच नाही लग्न केलेले इंग्लिश बाईशी". तरीही नेहमी पू.काका तोच प्रश्न विचारीत असत.
माझ्या सौ.आईचे एक काका काही काळ सोलापूर जिल्ह्यात करमाळ्याला शेती करायला जाऊन राहिलेले होते. पण पुढे आपल्या बंधूंना मदत करण्यासाठी ते तेथील सर्व विकून मुंबईत परत आले. नवरे मंडळींपैकी बाकी कोणीही सोलापूर भागात गेलेले नव्हते आणि कोणीच परदेशी बाईशी लग्नही केलेले नव्हते. त्यामुळे पू.काकांच्या या वाक्याचा कोणाला कधीच संदर्भ लागला नाही.
पण पू.काका नक्कीच काहीतरी पाहून तसे म्हणत असावेत. सर्वात आश्चर्य तर पुढेच आहे. गेल्यावर्षी त्याच सोलापूरला जाऊन राहिलेल्या काकांच्या नातवाचे अमेरिकन मुलीशी लग्न झाले. ते लग्न ठरल्यावर माझ्या आईला अचानक पू.काकांचे तेव्हाचे शब्द आठवले आणि अक्षरश: तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने ताबडतोब मला फोन करून हे सर्व विस्मृतीत गेलेले प्रसंग सांगितले. मलाही पू.काकांच्या त्या विलक्षण भविष्यवेधाचे महदाश्चर्य वाटले. पू.काकांचे ते शब्द थोडे थोडके नाही, तर बेचाळीस वर्षांनी खरे ठरलेले होते ! म्हणजे त्यांनी त्याचवेळी हे भविष्य पाहून अचूक सांगितलेले होते. अनंत काळाच्या गर्भात काय काय दडलंय, हे या सूक्ष्मदृष्टीच्या क्रांतदर्शी महात्म्यांशिवाय इतर कोण पाहू शकणार बरे?
खरोखरीच 'समुद्रापैलीकडील देखे' या श्री माउलींच्या वचनाची मूर्तिमंत अनुभूतीच त्यानिमित्ताने आम्हां सर्वांना आली. अर्थात् प.पू.श्री.काकांच्या चरित्राचा धांडोळा घेतला तर अशा प्रकारचे अगणित प्रसंग पाहायला मिळतात. 
प.पू.श्री.काका आपल्याच स्वानंदस्थितीमध्ये काय काय बरळत असत. तेच ते शब्द पुन्हा पुन्हा बोलत. एखादा माणूस समोर आल्यावर त्याच्यासंबंधाने जे काही दिसेल, ते पू.काका बोलून टाकत असावेत. एरवी कोणाला त्यांचा संदर्भच लागत नसे. पण गंमत म्हणजे, समोर उपस्थितांपैकी कोणा ना कोणाच्या मनात चालू असलेल्या गोष्टींची, विचारावयाच्या प्रश्नांची त्यात नेमकी उत्तरे असत. त्यांचे बोलणे असे सामान्यत: गूढ वाटत असले, तरी ज्याचे त्याला बरोबर उमजत असे व तो ते ऐकून समाधानाने वंदन करून जात असे. वरकरणी वेड्यासारख्याच भासणा-या पण आतून ज्ञानपूर्ण असणा-या अवधूत स्थितीचे हे वैशिष्ट्यच आहे. कोणाची उगीच उपाधी नको म्हणून हे वेडेपण त्यांनी मुद्दामच पांघरलेले असते, असे श्री माउली स्पष्टच सांगतात.
संतांचे शब्द हे ब्रह्मवाक्यच असते.  काळ्या दगडावरची पांढरी रेघच ती ! त्यांच्या शब्दांत कालत्रयी बदल होत नसतात. ते जे बोलतात तेच पूर्णसत्य असते; आणि त्यांच्या हृदयी आपल्या कल्याणाशिवाय अन्य विषयच नसतो. त्यामुळे त्यांनी केलेली आज्ञा ही आपल्यासाठी अनुष्ठेय आवश्यकच ठरते. कारण सर्वभावे संतांचे दास होऊन, त्यांच्या शब्दांबरहुकूम श्रद्धाभक्तिपूर्वक वागण्यातच आपले खरे व शाश्वत हित असते !!
( छायाचित्र संदर्भ : पू.काकांच्या या चित्रात, अनंताचा वेध घेणारी, 'पल्याड'चे पाहणारी त्यांची विलक्षण ब्रह्मदृष्टी स्पष्ट दिसते. हे छायाचित्र पाहताना, जणू ते आपल्या आरपार पाहात आहेत, आपले पूर्वीचे व नंतरचेही शेकडो जन्म पाहात आहेत, असेच वाटत राहते.)
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

0 comments:

Post a Comment