20 Dec 2017

त्रैलोक्याचा राजा नरहरि तो माझा

आज पौष शुद्ध द्वितीया, कलियुगातील द्वितीय श्रीदत्तावतार, भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती !!
भगवान श्री श्रीपादश्रीवल्लभ स्वामी महाराजांनी, कुरवपूरच्या कृष्णानदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच पुढच्या जन्मी अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंनी श्री नरहरी रूपाने तिच्या पोटी, शके १३०० अर्थात् इ.स. १३७८ मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते एक वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते.  नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली व पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले. तेथून मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. तेथून कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले. तेथे एक चातुर्मास्य राहिले. तेथे त्यांच्या स्मरणार्थ पुढे 'विमल पादुका' स्थापन करण्यात आलेल्या आहेत. औदुंबरहून पुढे ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले. तेथे श्रींनी आपल्या 'मनोहर पादुका' व अन्नपूर्णामातेची स्थापन केली व मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर अंदाजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात  'निर्गुण पादुका' स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही. श्रींचा जो अपार्थिव, दिव्य-पावन श्रीविग्रह अशाप्रकारे स्थूलरूप धारण करून कार्यरत होता, तोच आजही गुप्तरूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहे व पुढेही करीत राहीलच.
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्याकाळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्माची पुनर्स्थापना केली. लोकांमध्ये भक्तिमार्गाचा प्रसार केला. ते स्वत: अत्यंत कडक आचरण करीत असले तरी, त्यांनी कृपा करण्यात भक्तांचा जात-धर्म कधीच पाहिला नाही. जसे चारही वेदांचे ज्ञानी ब्राह्मण, श्रेष्ठ संन्यासी त्यांचे शिष्य होते, तसेच भक्तराज तंतुक, पर्वतेश्वर शूद्र व बिदरचा मुसलमान बादशहा असे अन्य जाती-धर्मातील हजारो भक्तही त्यांच्या कृपेने धन्य झालेले होते. ते अकारणकृपाळू व परमदयाळूच आहेत. जगाच्या कल्याणासाठी आलेल्या अवतारांना, संतांना जात-धर्म यांच्या चौकटीत बसवणे हा वेडगळपणाच नव्हे काय?
भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तृगामी व स्मरणमात्रे संतुष्ट होणारे परमदयाळू व भक्तवत्सल आहेत. प्रेमभराने व निर्मळ अंत:करणाने त्यांना घातलेली साद त्यांच्यापर्यंत पोचतेच पोचते, असा लाखो भक्तांचा आजवरचा रोकडा अनुभव आहे. श्रीदत्तसंप्रदायातील थोर विभूतिमत्व  प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्याकडून ऐकलेले आहे की, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अत्यंत ऋजू अंत:करणाचे परमशांत असे अवतार आहेत. त्यांच्या दयाकृपेला ना अंत ना सीमा. त्यांच्या भक्तवात्सल्य ब्रीदाचे यथार्थ वर्णन करताना श्री गुरुभक्तही हेच म्हणतात,
अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।
संकटिं भक्ता रक्षी नानापरी ।
रुतूं देईना पायी कांटा रे ॥
शरणांगता जना पाठिसी घालुनी ।
कळिकाळासी मारी सोटा रे ॥
अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारु मोठा रे ।

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी ही श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची राजधानी आहे. तेथे ते निरंतर राहून भक्तकल्याण करीत असतात. त्यांचेच प्रत्यक्ष अधिष्ठान आमच्या श्रीक्षेत्र दत्तधाम येथेही आहे. " वाडी-गाणगापूर प्रमाणे आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू ", असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वत: प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांना दिला होता. त्यांच्या त्या अमृतशब्दांची आजही सतत प्रचिती येत असते.
प.प.श्री.नारायणस्वामी महाराजांचे शिष्योत्तम, वाडीतील ढोबळे पुजारी उपनावाचे व श्री गुरुभक्त ही नाममुद्रा धारण करणारे थोर भक्तवर, भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांविषयीचा आपला दृढ प्रेमभाव व्यक्त करताना म्हणतात,
त्रैलोक्याचा राजा ।
नरहरि तो माझा तो माझा ॥ध्रु॥
नांदे अमरापूर ग्रामीं ।
कृष्णातीरीं यतिवरस्वामी ॥१॥
नृसिंहसरस्वती करुणामूर्ति ।
त्रिभुवनिं गाती ज्याची कीर्ति ॥२॥
श्रीधरविभु निजकैवारी ।
भावें भजतां भवभय वारी ॥३॥

या अखिल ब्रह्मांडांचे नायक असणा-या, भक्तांचे भवभय वारण करणा-या, कृष्णातीरी नित्य नांदणा-या, त्रिभुवनात ज्यांच्या कीर्तीचा डंका सदैव वाजत असतो, त्या परमदयाळू परमकनवाळू महाराजाधिराज श्रीमत् नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं, आज जयंतीदिनी प्रेमभराने साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचेच परमपावन नाम घेत त्यांना कृपाप्रसादाची प्रार्थना करूया !!
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ।
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.


17 Dec 2017

15 Dec 2017

गुरुवरा ओवाळू आरती

आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे कनिष्ठ बंधू व शिष्योत्तम, साक्षात् ब्रह्मदेवांचे अवतार सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांची समाधी तिथी. श्रीसंत तुकोबारायांच्या चौदा टाळक-यांपैकी त्यांचे एक शिष्य श्री संताजी महाराज जगनाडे-तेली यांचीही आज पुण्यतिथी. श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्व महान शक्तिपाताचार्य योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांची आज जयंती. खरोखरीच, आजची तिथी मोठी पुण्यपावनच आहे !
सद्गुरु श्री सोपानदेव महाराज हे श्री माउलींचे धाकटे बंधू व शिष्य. त्यांचा जन्म इ.स.१२७७ मध्ये कार्तिक पौर्णिमेला आळंदीत झाला. त्यांनी देखील गीतेवर 'सोपानदेवी' या नावाची टीका रचलेली आहे. त्यांचे काही अभंगही उपलब्ध आहेत. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांचे स्वभाववैशिष्ट्य श्री नामदेवराय सांगतात, "न ये पां एकांत सोपानाचा ॥" सगळ्यांमध्ये राहूनही आंतरिक एकांत साधणे व त्या स्थितीत सदैव राहणे हे श्री सोपानदेवांचे वैशिष्ट्य होते. श्रीसंत विसोबा खेचरांवर श्री माउलींच्या आज्ञेने सद्गुरु श्री सोपानदेवांनीच अनुहग्रहकृपा केली होती.
आजच्याच तिथीला त्यांनी सासवड येथे क-हामाईच्या काठी सोमेश्वरांच्या मंदिरालगत समाधी घेतली. त्यांच्या समाधिवर्णनाच्या अभंगांमध्ये श्री नामदेवराय म्हणतात, " निशिदिनी कीर्तन केले द्वादशी । वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष ॥३॥ भोगावती केले अवघ्यांनी स्नान । चालिले सोपान समाधीसी ॥ना.गा.११३२.४॥" श्री सोपानदेवांच्या स्नानासाठी प्रत्यक्ष श्रीपांडुरंगांनी सर्व तीर्थांना आवाहन केले. त्यावेळी त्रैलोक्यातील यच्चयावत् सर्व तीर्थे क-हेच्या काठावरील एका कुंडात प्रकटली व त्या पावन जलाने सोपानदेवांना स्वत: भगवंतांनी स्नान घातले. ते कुंड आजही सासवड येथे मंदिरासमोरच पाहायला मिळते. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांच्या श्रीचरणीं साष्टांग दंडवत.
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या थोर शिष्यांपैकी एक, देहूनजीकच्या सुदुंब्रे येथील तेली समाजातील श्री संताजी महाराज जगनाडे यांचीही आज पुण्यतिथी असते. संताजी महाराजांनी स्वहस्ते लिहिलेला श्री तुकोबारायांचा गाथा आजही पाहायला मिळतो. श्री तुकाराम महाराजांच्या चौदा निष्ठावंत टाळकरी मंडळींमध्ये संताजी महाराजही होते. श्री संताजी महाराजांची पालखी श्री माउलींच्या पालखी मागोमागच आषाढी वारीसाठी पंढरीला जाते. त्यांच्याही श्रीचरणीं सादर दंडवत.
श्रीदत्त संप्रदायातील महान विभूतिमत्व, प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच अपरस्वरूप, योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांची आज १३१ वी जयंती. आजच्याच तिथीला, २३ डिसेंबर १८८६ रोजी, कोल्हापूर संस्थानातील राधानगरी तालुक्यातील कुडुत्री या छोट्याशा खेड्यात रात्री ८.१९ मिनिटांनी वे.शा.सं.दत्तंभट व सौ.उमाबाई या सात्त्विक दांपत्याच्या पोटी श्रीमहाराजांचा जन्म झाला. गुळवणी घराणे हे श्रीनृसिंहवाडीच्या प.प.श्री.नारायणस्वामींचे कृपांकित होते व त्यांच्याच कृपेने हा वंश चालला होता. शालेय शिक्षण कोल्हापूरला झाल्यानंतर श्रीमहाराजांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश घेऊन चित्रकलेत प्राविण्य मिळविले. आधी बार्शीला व त्यानंतर पुण्याच्या नू.म.वि. मध्ये त्यांनी चित्रकला शिक्षकाची नोकरी केली.
पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी, १९०९ साली पवनी मुक्कामी, अनंत चतुर्दशीच्या मंगल मुहूर्तावर श्रीगुळवणी महाराजांवर शक्तिपातपूर्वक मंत्रानुग्रह करून परंपरेचे उत्तराधिकारही प्रदान केले. श्रीमहाराजांनी आपले दैवी सद्गुण व विनम्र सेवा यांमुळे प.प.श्री.टेंब्येस्वामींची पूर्णकृपा संपादन केली. श्रीस्वामींनी त्यांना आपल्या स्वत:च्या हृदयात भगवान श्रीदत्तप्रभूंचे दर्शन करविले होते. श्रीमहाराज हे श्री. टेंब्येस्वामींचे पट्टशिष्यच होते. पुढे त्यांच्यावर बंगालमधील प.प.श्री. लोकनाथतीर्थ स्वामींचीही कृपा झाली.
श्रीमहाराज योगासनांमध्ये अत्यंत निष्णात होते. योगासनांचे व क्रेपची फुले बनविण्याचे ते वर्ग घेत असत. त्यांना क्रेप फुलांच्या स्पर्धा-प्रदर्शनांमध्ये भारतात व परदेशांतूनही अनेकवेळा प्रथम पुरस्कार, गोल्ड मेडल मिळालेले होते.
श्रीमहाराजांची राहणी अतिशय साधी होती. स्वच्छता, टापटीप व वक्तशीरपणा हे त्यांचे अंगभूत सद्गुण होते. त्यांनी आजन्म शास्त्र मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले. अपरंपार करुणा, ऋजुता, विनम्रता, प्रेमळपणा, प्रसिध्दिपराङ्मुखता, कमालीचे अमानित्व, शास्त्रपूत आचरण, कोणत्याही प्रसंगी न ढळणारी अद्भुत शांती, नैष्ठिक ब्रह्मचर्य, निस्पृहता, श्रीगुरुचरणी अात्यंतिक निष्ठा, विलक्षण योगसामर्थ्य, महायोग-शक्तिपात शास्त्रातील अलौकिक अधिकार इत्यादी शेकडो दैवी सद्गुणांचे ते साक्षात् भांडारच होते ! श्रीमहाराजांनी कधी प्रवचने केली नाहीत की पुस्तके लिहिली नाहीत. पण त्यांनी जगभरातील हजारो साधकांना आपल्या विलक्षण कृपेने परमार्थ मार्गावर अग्रेसर केले.
योगिराज श्री.गुळवणी महाराजांनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात अनेक अलौकिक कार्ये संपन्न केली. त्यांपैकी दोन फार महत्त्वपूर्ण कार्ये म्हणजे, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रींच्या मंदिरासभोवतालचा गोलाकार देखणा सभामंडप बांधण्याचे व प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे समग्र वाङ्मय मोठ्या कष्टाने जमवून अचूक व शुद्ध स्वरूपात प्रकाशित करण्याचे महान कार्य होय. त्यांनी त्याकाळात प्रचंड भ्रमंती करून, जिथे जिथे थोरल्या महाराजांचे वास्तव्य झाले होते, तिथे समक्ष जाऊन त्यांचे वाङ्मय मिळवले व ते बारा खंडांमधून श्री. टेंब्येस्वामींच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून १९५१ ते १९५४ सालांदरम्यान प्रकाशित केले. हे त्यांचे श्रीदत्त सांप्रदायिकांवरचे कधीही न फिटणारे ऋण आहे.
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांचे अपार स्नेहाचे अंतरंग संबंध होते. दोघेही एकमेकांचा अतीव प्रेमादर करीत असत. प.पू.काका श्रीमहाराजांना साक्षात् श्रीदत्तप्रभूच म्हणून वंदन करीत असत तर श्री.गुळवणी महाराज प.पू.काकांना ' एक थोर ब्रह्मनिष्ठ ' म्हणत असत. श्रीमहाराज फलटण येथे एकदा पू. काकांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी प.पू.काकांच्या घरासमोर, गळ्यात भरगच्च हार घातलेल्या व अत्यंत प्रसन्न भावमुद्रा असलेल्या या दोन संतश्रेष्ठांचा फोटो मुद्दाम काढण्यात आला होता. ९ जून १९७१ रोजी प.पू.काका पुण्यातील 'श्रीवासुदेव निवास ' या श्रीमहाराजांच्या आश्रमातही भेटीसाठी गेले होते. एरवी देखील भक्तगणांच्या मार्फत दोघांची नेहमीच निरोपा-निरोपी होत असे.
प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच असणा-या योगिराज सद्गुरु श्री गुळवणी महाराजांनी हजारो शिष्यांना शक्तिपात दीक्षा देऊन कृतार्थ केले. त्यांचे समग्र चरित्र अलौकिक गुरुभक्ती व शास्त्रनिष्ठेचा आदर्श असून परमार्थ साधकांसाठी निरंतर मार्गदर्शक आहे. सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांच्या चरित्रलीला वाचताना, त्यात जाणवणारे त्यांचे सर्वच दैवी सद्गुण आपल्याला आश्चर्यचकित करतात. पण त्यांची करुणा व ऋजुता हे विशेषत्वाने जाणवतात. श्री महाराज म्हणजे अमानित्वाचे व अदंभित्वाचे मूर्तिमंत स्वरूप होते. साक्षात् श्रीदत्तप्रभूच असूनही त्यांनी कधीही चुकूनसुद्धा कोणाला त्याची कल्पना येऊ दिली नाही. कायम आपले माहात्म्य झाकूनच ठेवले. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज त्यांना प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू म्हणूनच वंदन करीत असत.
श्री महाराज भक्तवत्सल होते. आपल्या भक्तांचा अपार कळवळा होता त्यांना. २६ डिसेंबर १९६९ ते २६ एप्रिल १९७० या चार महिन्यांच्या काळात त्यांनी एक पुरश्चरण केले होते. त्याकाळात ते कोणालाही भेटणार नाहीत, अशी सूचना लावलेली होती आश्रमात. त्यांच्या एका भक्ताने त्यांना प्रेमळपणे विनवले की, " या काळात तुम्हांला कोणीच भेटणार नाही का?" त्यावर महाराज म्हणाले, " दोन जण भेटतील, जेवणाचे ताट सरकवायला येतील तेव्हा." त्यावर ते भक्त म्हणाले, " मग आम्हीच काय पाप केले आहे? तुम्हांला बघायला काय हरकत आहे? तुम्ही ठरावीक वेळी तुमच्या सवडीने खाली येऊन देवघरात बसत जा. ग्रीलच्या बाहेरून आम्ही दर्शन घेऊन जात जाऊ." श्री महाराजांनी त्यांचे म्हणणे लगेच मान्य केले. त्याकाळात ते रोज सकाळी साडेनऊ ते दहा या वेळात खाली येऊन बसत व भक्त त्यांचे दर्शन घेऊन जात. " ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभावीण प्रीती ॥" हे श्री गुळवणी महाराजांचे यथार्थ स्वरूपवर्णनच आहे.
पू.श्री.महाराज म्हणजे करुणेची मूर्तीच होते. त्यांना कधीच कोणाहीबद्दल आपला-परका असा भेद जाणवला नाही, सर्वांवर त्यांचे समान प्रेम होते. महाराजांचे एक श्री.श्रीनिवास आचार्य नावाचे शिष्य होते. त्यांचे एक मित्र श्री.रायकर म्हणून होते. त्यांना एकदा सरकारी नोटीस आली, त्यात १ एप्रिल पूर्वी रु.७६८/- भरा असे म्हटले होते. त्यांच्यापाशी एवढी रक्कम नव्हती, शिवाय घरी पाच मुले, बायको, वृद्ध वडील. ते आचार्यांना म्हणाले की, " आता काय करणार? चल, तुमच्या महाराजांना विचारूया. तेच काहीतरी मार्ग सांगतील. " ते दोघे महाराजांकडे आले व सर्व हकीकत सांगितली. श्री महाराज म्हणाले, पैसे आहेत की नाहीत? रायकर म्हणाले, नाहीत. महाराजांनी लगेच श्री.नारायण भालेरावांना हाक मारली व कपाटातील टिनाच्या डब्यातील पैसे रायकरांना द्यायला सांगितले. गंमत म्हणजे त्या डब्यात नेमके ७६८ रुपयेच निघाले. महाराज रायकरांना म्हणाले, " बायको-पोरांना नीट सांभाळा, काळजी करू नका." यच्चयावत् सर्व जीवांविषयीचा असा आप-पररहित कळवळा, अशी निखळ आत्मीयता, प्रेमभावना श्रीमहाराजांच्या अंतरात ठासून भरलेली होती. म्हणूनच ओळखीच्याही नसलेल्या रायकरांना एवढी मोठी रक्कम द्यायला त्यांनी किंचितही वेळ घालवला नाही की विचार केला नाही. जणू ते त्यांचे आत्मीयच आहेत, या भावनेने त्यांनी तत्काळ त्यांचे हित केले. सद्गुरु श्री माउली म्हणतात, वाहणारे पाणी जसा वाटेत आलेला खड्डा भरून मगच पुढे जाते, तसे हरप्रयत्नाने समोरच्याचे दु:ख दूर करूनच महात्मे पुढे जातात. अशी अलौकिक करुणा श्री.गुळवणी महाराजांच्या ठायी विलसत होती. याच प्रकारचे शेकडो अद्भुत कथा-प्रसंग श्री महाराजांच्या चरित्रात पाहायला मिळतात.
आजच्या या पावन दिनी योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांच्या श्रीचरणी अनंतानंत दंडवत प्रणाम !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

12 Dec 2017

हाचि सुबोध गुरूंचा

आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी, साक्षात् श्रीमारुतीरायांचे अवतार, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची १०४ वी पुण्यतिथी  !!
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला ।
जयाने सदा वास नामात केला ।
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ।।
असे ज्यांचे सार्थ वर्णन केले जाते, त्या प्रत्यक्ष नामावतार सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अवघे चरित्र अलौकिक आणि बोधप्रद आहे.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपापरंपरेतील येहेळगांवच्या सद्गुरु श्री तुकामाई यांनी श्री गोंदवलेकर महाराजांना कृपानुग्रह करून सनाथ केले. श्रीमहाराजांच्या ठायी सद्गुुरु श्री माउलींचा नाथसंप्रदाय व सद्गुरु श्री समर्थांचा रामदासी संप्रदाय यांचा सुरेख समन्वय झालेला होता.
पूर्वी महाराजांनी बालवयातच गुरुशोधार्थ संपूर्ण भारत देश पालथा घातला होता. त्या भ्रमंतीमध्ये त्यांना राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे दर्शन व सान्निध्य लाभले. श्री स्वामींनी देखील या लहानग्या गणूला अतीव ममतेने स्वत:च्या मांडीवर बसवून त्याचे लाड केले. दोन दिवस स्वत:बरोबर ठेवून घेतले व नंतर आशीर्वाद देऊन रवानगी केली. त्यानंतर महाराजांना त्याकाळातील, श्री रामकृष्ण परमहंस, श्री त्रैलंगस्वामी, श्री माणिकप्रभू, श्री देव मामलेदार इत्यादी अनेक थोर संतांची दर्शने झाली. नंतर सद्गुरु श्री तुकामाईंची भेट होऊन, अत्यंत खडतर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पूर्णकृपा लाभली. लहानग्या गणुबुवांचे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज झाले.
महाराजांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथेच असे. पण रामनामाच्या प्रसारासाठी त्यांचा संचार सर्व भारतभर होई. त्यांनी आपल्या हयातीत हजारो लोकांना नाम देऊन सन्मार्गाला लावले. समाधी पश्चात् आजही त्यांच्या कृपेचे अनुभव अक्षरश: लाखो लोक घेत आहेत.
त्यांचे चरित्र परमार्थ साधकांसाठी विशेष बोधप्रद आहे. " भक्ताची श्रीरामरायाच्या चरणीं अनन्य निष्ठा कशी असायला हवी? " याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे श्री महाराज ! 'रामच कर्ता' या भावनेच्या बळावर अचाट कार्य करून दाखवण्यातली अलौकिक निस्पृहता म्हणजे श्री महाराज ! गुरुचरणीं अनन्य शरणागती म्हणजे श्री महाराज ! नि:शंक निर्भय निरहंकार आणि समर्थ साधुजीवन म्हणजे श्री महाराज ! जनांचा अपरंपार कळवळा म्हणजे श्री महाराज ! त्यांच्या दिव्य चरित्रलीला वाचताना, प्रेमाचे भरते येऊन कधी आपले नेत्र पाझरू लागतात हे आपल्याला समजत देखील नाही. खरोखरीच फार विलक्षण विभूतिमत्व होते ते  !!
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे परमगुरु, पलूसचे श्री धोंडीबुवा महाराज यांचा व श्री गोंदवलेकर महाराजांचा स्नेह होता. प.पू.काकांनाही श्री महाराजांविषयी अतीव प्रेमादर होता. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नसरापूरच्या घरी श्री महाराज येत असत. पू.मामांचे आई-वडील, पू.दत्तोपंत व पू.पार्वतीदेवी यांना श्री महाराजांबद्दल अतीव प्रेमादर होता. महाराजही त्यांना फार मानत असत. पू.दत्तोपंत व श्री महाराज समोर आल्यावर परस्परांना दंडवत घालून दृढ प्रेमालिंगन देत आणि मगच त्याची चर्चा सुरू होई. श्री महाराज एकदा त्यांना म्हणाले होते, " कृपायोगाचे साधनच सर्वश्रेष्ठ आहे. ज्यांना ते देणारे सामर्थ्यवान सद्गुरु लाभले ते धन्य होत. मलाही श्री तुकामाईंकडून हेच साधन मिळाले. पण हे सर्वांनाच देता येत नाही, म्हणून मी त्यांच्याच आदेशानुसार सर्वांना नाम घ्यायला सांगतो ! "
श्रीमहाराजांची प्रवचनेही अत्यंत सोपी व काळजाला हात घालणारी आहेत. रामनामाची व हरिभक्तीची महती त्यांनी फारच सोप्या आणि चटकन् हृदयाला भिडेल अशा समर्पक भाषेत, अधिकारवाणीने सांगितलेली आहे. त्या प्रवचनांचे दररोज नियमितपणे वाचन करून आपला परमार्थ सुकर करणारे लक्षावधी भक्त जगभर आहेत.
आज त्यांच्या १०४ व्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या चरणीं सादर वंदन करूया; व त्यांनी सर्वात शेवटी केलेला बोध, त्यांचा शेवटचा अभंग वाचून, त्यावर चिंतन-मनन करून, त्यांच्या कृपासावलीत आपणही आपला परमार्थमार्ग आनंदाने आक्रमूया !
भजनाचा शेवट आला ।
एक वेळ राम बोला ॥१॥ 
आज पुण्य पर्वकाळ ।
पुन्हा नाही ऐसी वेळ ॥२॥
राम नाम वाचे बोला ।
आत्मसुखा माजी डोला ॥३॥
दीन दास सांगे निका ।
रामनाम स्वामी शिक्का ॥४॥
" श्रीसद्गुरु मुखातून आलेले व परंपरेने लाभलेले 'दिव्यनाम' हेच जणू 'स्वामी शिक्का' आहे. हा शिक्का ज्याच्या चित्तावर श्रीगुरु उमटवतील, त्याचाच परमार्थात सहज प्रवेश होतो. ही नामरूपी निकी म्हणजेच श्रेष्ठ, शुद्ध कृपा-मोहोर लाभल्यावर मगच साधक ख-या अर्थाने पुनीत होतो. त्या कृपाप्रसादामुळे व आपल्या श्रीगुरूंचा 'दीनदास' बनून  झालेल्या त्या दास्ययुक्त साधनेने मग त्याला आत्मसुखात अखंड डोलण्याचे सौभाग्य लाभते ! त्याचे अवघे जीवनच मग एक अद्भुत पुण्य पर्वकाळ बनून जाते. त्याच्या पावन संगतीने मग जगाचाही उद्धार होतो. " श्री महाराजांच्या या अंतिम बोधामृतातून जणू त्यांचे आत्मचरित्रच थोडक्यात प्रकट झालेले आहे !
या लेखासोबत आज श्री महाराजांच्या प्रतिमेऐवजी त्यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश देत आहे. आपली साधना लवकर पूर्णत्वाला जावी, असे ज्याला मनापासून वाटते, त्या प्रत्येक साधकाने श्री महाराजांचा हा बोध मनाच्या गाभा-या सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा व वारंवार आठवावा इतका महत्त्वपूर्ण आहे. साधकाचे अवघे विश्वच अमृतमय करणारे हे बोधवचन, अनन्यगुरुभक्त असणा-या सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराजांचे हृद्गतच आहे जणू !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in)



3 Dec 2017

वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम्

भगवान श्रीदत्तप्रभू हे साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत. जगन्नियंत्या श्रीभगवंतांचे अभिन्न गुरुस्वरूप म्हणजे श्रीदत्तप्रभू. म्हणूनच त्यांना ' जगद्गुरु ' म्हणतात. आज मार्गशीर्ष पौर्णिमा हे भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीचे पावन पर्व आहे.
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अवताराचे रहस्य सांगताना प.पू.योगिराज सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीदत्तात्रेय अवतार ' हा चिरंजीव का आहे? तर, ' अज्ञान ' नावाचा राक्षस मारल्याशिवाय श्रीदत्तगुरूंना जाता येणार नाही; व अज्ञान हे अनंत काळापर्यंत राहणार. म्हणून हा अवतार चिरंजीव आहे. "
अज्ञान नष्ट करणे हेच श्रीगुरुतत्त्वाचे प्रधान कार्य आहे. या अज्ञानामुळेच जीव आपले मूळचे ब्रह्मस्वरूप विसरून मायेच्या कचाट्यात सापडून दु:ख भोगत असतो. दु:खी कष्टी जीवांचा कळवळा येऊन श्रीभगवंतच श्रीदत्तप्रभूंच्या रूपाने प्रकट होतात व योग्य वेळ आलेल्या जीवांवर कृपा करून त्याना आत्मबोध करतात. या कार्यासाठी श्रीदत्तप्रभूंचेच अंश विविध गुरुपरंपरांच्या माध्यमातून श्रीगुरु म्हणून पुन्हा पुन्हा अवतरित होतात. ही परंपरा आजही अक्षुण्ण चालूच आहे.
श्रीभगवंतांचे अवतार ज्या कार्यासाठी होतात, ते कार्य पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात विलीन होऊन जातात. पण श्रीदत्तप्रभूंच्या अवताराचे तसे नाही. जोवर माया आहे तोवर अज्ञान आहेच व तोपर्यंत श्रीदत्तप्रभूंचे कार्य पूर्ण झालेले नसल्याने ते कार्यरत राहणारच. म्हणूनच प.पू.श्री.मामा श्रीदत्तप्रभूंना ' चिरंजीव अवतार ' म्हणतात. आज याच चिरंजीव अवताराचा प्रकटदिन होय !
भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अलौकिक स्वरूपाची काही विलक्षण वैशिष्ट्ये आहेत. श्रीदत्तप्रभू हे भगवान ब्रह्मा, विष्णू व महेशांचे एकत्रित स्वरूप आहेत. त्यांच्या सहा हातांमध्ये तिघांची प्रत्येकी दोन आयुधे मिळून सहा आयुधे आहेत. त्यांच्या हातांचे व त्यातील शस्त्रांचे मार्मिक रहस्य सांगताना प.पू.श्री.मामा म्हणतात, " भगवान श्रीदत्तात्रेयांचे सहा हात हे सहा शास्त्रांचे निदर्शक आहेत. हातातील माळ - जपासाठी, डमरू - व्याकरण आदी शास्त्रे शिकवण्यासाठी, शंख - ज्ञान देण्यासाठी. "
श्रीदत्तप्रभूंचे तीन हात भक्तांसाठी आहेत तर तीन हात अभक्तांसाठी, शत्रूंसाठी आहेत. भक्तांसाठी असलेल्या उजवीकडील तीन हातांपैकी, सर्वात खालच्या हातात त्यांनी ब्रह्मदेवांचे आयुध असणारी जपाची 'माळ' धारण केलेली आहे. आपल्या भक्तांना सतत नामस्मरण करण्याचा त्याद्वारे श्रीदत्तप्रभू बोध करतात.
मधल्या हातात 'डमरू' हे शिवांचे आयुध आहे. त्याचा वापर व्याकरणादी शास्त्रे शिकवण्यासाठी होतो. व्याकरण शास्त्राची मूळ सूत्रे भगवान शिवांनी डमरूच्या नादातूनच निर्माण केलेली आहेत.
सर्वात वरच्या हातात भगवान विष्णूंचे 'शंख' हे आयुध आहे. या शंखाच्या स्पर्शाने भगवंत शिष्यांना ज्ञानदान करतात. ध्रुवबाळाच्या गालाला आपल्या हातातील शंखाचा स्पर्श करून श्रीभगवंतांनी ज्ञान दिल्याचा उल्लेख भागवतात व श्री ज्ञानेश्वरीत आहे.
या तिन्ही हातांचा व त्यातील आयुधांचा, जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभू आपल्या शरणागत शिष्यांवर कृपाप्रसाद करण्यासाठीच उपयोग करतात. 
जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभूंचे सहा हात हे सहा शास्त्रांचे, षड्दर्शनांचे प्रतीक आहेत. कपिलमुनींचे सांख्य, कणादांचे वैशेषिक, पतंजलींचे योग, न्याय, मीमांसा व वेदान्त ही सहा दर्शने अथवा शास्त्रे आहेत. साक्षात् परब्रह्म भगवान श्रीदत्तप्रभू हे जगद्गुरु असल्याने ही सर्व शास्त्रे जणू त्यांच्या पावन देहाचे अवयवच आहेत.
या सहा हातांपैकी, उजवीकडील तीन हात हे भक्तांसाठी अाहेत. उजवी बाजू आपल्याकडे पवित्र मानली जाते. तसे भक्तांना देवांकडे प्रथम मान आहे, म्हणून त्यांना उजवी बाजू दिलेली आहे. तर डावीकडील तीन हात हे अभक्तांसाठी, दुष्टांसााठी आहेत. या तिन्ही हातांतील शस्त्रे ही दुष्टांना शासन करण्यासाठी आहेत. यांचे रहस्य सांगताना प.पू.श्री.मामा म्हणतात, " भगवान श्रीदत्तात्रेयांचे डावीकडील तीन हात अभक्तांसाठी, दुष्टांसाठी आहेत. कमंडलू - पाणी मारून वैरी नाशासाठी, त्रिशूळ - दूर असलेल्‍या शत्रूला मारण्यासाठी, चक्र - फारच दूरच्या दुष्ट शक्तींना मारण्यासाठी."
श्रीदत्तप्रभूंनी डावीकडील सर्वात खालच्या हातात ब्रह्मदेवांचे 'कमंडलू' हे आयुध धारण केलेले आहे. यातील पाणी मारून ते धर्माचे व सज्जनांचे तसेच भक्तांचे  वैर करणारे, त्यांना अकारण त्रास देणारे शत्रू मारून टाकतात. मधल्या हातात त्यांनी भगवान शिवांचे 'त्रिशूल' हे आयुध धारण केलेले आहे. हे त्रिशूल फेकून दूरचे शत्रू ते नष्ट करतात. सर्वात वरच्या हातात त्यांनी भगवान श्रीविष्णूंचे 'चक्र' हे आयुध धारण केलेले आहे. फारच दूरच्या दुष्ट शक्तींचा नि:पात करण्यासाठी त्या चक्राचा ते उपयोग करतात.
भगवान श्रीदत्तप्रभू हे भक्तवत्सल भक्ताभिमानी व दुष्टनिर्दालन करणारे आहेत.
श्रीदत्तप्रभूंच्या ब्रीदांचे द्योतक असणा-या त्यांच्या या सहा हातांचा व त्यांतील आयुधांचा हा विलक्षण गूढार्थ, आजवर पहिल्यांदाच, प.पू.श्री.मामांनीच सर्वांना समजेल असा शब्दांमध्ये प्रकट केलेला आहे. हे त्यांचे आपल्यावरील फार मोठे ऋण आहे. या रहस्याचा अभ्यास करण्याने आपल्याला श्रीदत्तप्रभूंच्या अवतारामधील अज्ञात असणारा विलक्षण भाग नीट समजून येईल. आजच्या श्रीदत्तात्रेय जयंतीच्या पावन पर्वावर या प.पू.श्री.मामांच्या या मार्मिक बोधाचे चिंतन करून आपणही भगवान श्रीदत्तप्रभूंच्या श्रीचरणी ही स्मरणांजली सादर समर्पूया व धन्य होऊया !!
( छायाचित्र : योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांनी स्वत: रेखाटलेले भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंचे मनोहारी षड्भुज रूप ! )
( https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )


16 Nov 2017

बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित

आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी !!
जशी आम्हांला श्रावण कृष्ण अष्टमी सर्वात महत्त्वाची तिथी वाटते, तशीच कार्तिक कृष्ण त्रयोदशी देखील आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रावणात अष्टमीला पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंची, तसेच त्यांचे अभिन्न स्वरूप सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची जयंती असते. म्हणून तो आमच्यासाठी दसरा-दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे. तर इ.स.१२९६ मधील कार्तिक कृष्णपक्षात त्रयोदशीला श्री माउलींनी आळंदीतील आपल्या पुरातन स्थानीच पुन्हा संजीवन समाधी घेतली. म्हणून ही त्रयोदशी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे.
श्रीसंत गुलाबराव महाराज आळंदीला ' नित्यतीर्थ ' असे म्हणतात. कारण हेच माउलींचे समाधीचे युगानुयुगांचे जुनाट स्थान आहे. येथूनच ते पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येतात व अवतार समाप्तीनंतर पुन्हा तेथेच परत जातात. त्यामुळेच श्रीसंत नामदेवराय देखील समाधीच्या अभंगात म्हणतात, " अष्टोत्तरशे वेळा समाधि निश्चळ । "  आळंदीप्रमाणेच भगवान सद्गुरु श्री माउली देखील ' नित्यतीर्थ ' आहेत, तेच सगुण साकार झालेले साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत !
परमकरुणार्णव श्री माउलींच्या कृपासाम्राज्यात अनेक संतरत्ने निर्माण झालेली आहेत. त्यांतील स्वतेजाने तळपणा-या काही थोर विभूतिमत्वांमध्ये, फलटणचे महान संत प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व पुण्याचे योगिराज प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज; यांचे नाव अग्रक्रमावर आहे. या दोन्ही निस्सीम माउलीभक्तांचे चरित्र व कार्य श्री माउलींनाही समाधान देईल, इतके वैशिष्ट्यपूर्ण आहे. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे उत्तराधिकारी, प्राचार्य प.पू.श्री.शिरीषदादा कवडे हेही फार विलक्षण माउलीभक्त आहेत.
दरवेळी आपण ज्यांचा उत्सव असेल त्या सत्पुरुषांचे जीवन व कार्याचे सेवा म्हणून मनन करतो. पण यावेळी नेहमीच्या पद्धतीऐवजी आपण प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या माउलींवरील नितांतसुंदर अभंगांच्या आधारे, संजीवन समाधिदिनी श्रीमाउलीचरणीं दंडवतपूर्वक ही शब्द-पुष्पांजली समर्पूया !
आजवरचे सर्व संत श्री माउलींचे गुणगान गाण्यात, त्यांची सेवा-चाकरी करण्यात धन्यता मानत आलेले आहेत. तीच परंपरा पाळत प.पू.श्री.शिरीषदादा देखील भगवान माउलींच्या अलौकिक व अद्वितीय माहात्म्याचे सुरेख वर्णन करताना म्हणतात,
सागराची गाज शोभे तयापासी ।
थेंबुटे आवेशी कोण काजा ॥१॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हापुढे केवी ।
वाचाळी करावी लेकुराने ॥२॥
बोबड्या उत्तरी रिझें जरी तात ।
अज्ञानाची मात कवणासी ॥३॥
मी तो अज्ञ पोर अंध पंगु मुके ।
उच्छिष्ट भातुके द्यावे माते ॥४॥
अमृतेसी काही ठावे नाही आन ।
मर्यादेचे मौन भले मानी ॥५॥

महासागराच्या किना-यावर उभे राहिलो असता, त्याची जी रौद्र-मोहक व विलक्षण गाज जाणवते, तिचा मन भरून आस्वादच घ्यायचा असतो. बारक्याशा थेंबुट्याने कितीही आवेश आणला, तरी त्याला काही त्या गाजेचा आव आणता येणार नाही. अहो माउलीराया, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात, तुमच्यासमोर आम्ही सर्व त्या थेंबुट्यासारखेच आहोत. म्हणूनच, मायबापा ज्ञानेश्वरा ! तुमच्यापुढे आम्ही वाचाळी करावी तरी कोणत्या तोंडाने? आम्ही लेकुरवाचेने बोबडे बोलावे, हेच उत्तम. त्या बोबड्या बोलाने मायबाप रिझतात, कौतुकाने बाळाला कडेवर घेऊन लाड करतात; हे जरी खरे असले, तरी शेवटी त्या अज्ञानी लेकराची गती मती त्या मायबापांशिवाय आणखी ती काय असणार?
देवा, मी तर आपल्या घरचे अज्ञानी, अंध, पंगू व मुके पोर आहे. मला योग्य काय अयोग्य काय? याचे ज्ञान नाही; माझ्या चर्मनेत्रांना माझे हित कधी दिसतच नाही, म्हणून ते एका अर्थाने अंधच आहेत. मला माझ्या प्रारब्धानुसार कर्मांचीच गती आहे, म्हणून एकप्रकारे मी पाय असूनही पांगळाच आहे, मला स्वतंत्र चालताही येत नाही. जे बोलायला हवे ते, श्रीभगवंतांचे नाम, गुण, लीला मी कधीच बोलत नाही, पण बाकीचे सर्व निरर्थकच अकारण बडबडत बसतो, म्हणून मी खरेतर तोंड असूनही मुकाच आहे. पण अहो दयावंता, मी कसाही असलो तरी तुम्हांला माझी दया येऊ द्यावी. ती आली तर आपल्या कृपेच्या उच्छिष्ट प्रसादावर मी पोसला जाऊन, ख-या अर्थाने संपन्न होईन, धष्टपुष्ट होईन.
प्रेमसागरा माउली भगवंता, मला बाकी काहीही कळत नाही, पण मर्यादेचे मौन मात्र मी आपल्या कृपेने जाणतो व तेच सुयोग्य असे मौन धारण करून आता आपल्या समोर हात जोडून उभा आहे. आता जे काही माझे बरे-वाईट व्हायचे असेल ते तुमच्याच इच्छेने होऊदेत.
खरोखरीच भगवान श्री ज्ञानराज माउलींच्या समोर उभे राहताना, तुम्हां आम्हां साधकांची काय भावभूमिका असावी, याचे अप्रतिम वर्णन प.पू.श्री.दादांनी या अभंगात सुंदर रितीने केलेले आहे.  ही भावभूमिका आपण स्वत:मध्ये खोलवर रुजवली पाहिजे.
भगवान श्री माउलींची प्रार्थना करताना आणखी एका अभंगात प.पू.श्री.दादा म्हणतात,
आपुल्या दयेचा मज भरवसा ।
जीव जाला पिसा ज्ञानदेवा ॥१॥
अज्ञ मी म्हणोनी करावा अव्हेर ।
व्हावे ना कठोर ऐसे ताता ॥२॥
मूर्ख मतिमंद दोषांचे आगर ।
खुळे जरी पोर आपुले ना ॥३॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित ।
जाणता उचित लेकुराचे ॥४॥
रसरंगी मिठी घातलीसे पायी ।
दुजी आस नाही अमृतेसी ॥५॥

सद्गुरु श्री ज्ञानदेवा भगवंता, आपल्या निरंतर दयेचाच मला एकमात्र भरवसा आहे. आपल्यासाठी माझा जीव वेडापिसा झालेला आहे. अहो कृपावंता ताता, आपण कठोर होऊन अज्ञानी म्हणून माझा अव्हेर करू नका. मी जरी मूर्ख, मतिमंद, अनेक दोषांचे आगर असलो, वेडा खुळा असलो तरी आपलेच पोर आहे ना !
मायबापा ज्ञानेश्वरा, आपणच माझे खरे हित कशात आहे ते जाणता, तेव्हा माझ्यासाठी जे काही उचित असेल तेच आपण कृपावंत होऊन मला प्रदान करावे. आपल्या श्रीचरणीं मी मिठी घालून, काहीही न मागता, न बोलता निश्चल बसलेलो आहे, आता मला आपल्या स्मरणाशिवाय, आपल्या कृपेशिवाय दुसरी कसलीही आस उरलेली नाही. आपल्या या अजाण लेकरावर मायमाउली भगवंता, आपण कृपावर्षाव करणार ना ?
भगवान श्री माउली नुसते समाधिस्थ नाहीत, ते ' संजीवन समाधिस्थ ' आहेत. त्यामुळे ते कुठेही गेलेले नाहीत. ते आजही आळंदीत तर आहेतच, पण त्याचवेळी विश्वरूपही आहेत. त्यांच्या भक्तांच्या हृदयातील कोवळ्या प्रेमाचा सप्रेम आस्वाद घेत आहेत. ते त्यांच्या नामामध्ये आहेत, त्यांच्या चरित्रात आहेत. जो प्रेमादराने व कळवळून त्यांना हाक मारेल, त्याच्यासाठी ते सदैव त्या अनन्यभक्ताच्या समोरच आहेत ! फक्त तेवढा दृढ विश्वास मात्र त्या भक्तापाशी हवा. मग ते साक्षात् आहेतच समोर !!
आज भगवान सद्गुरु श्री ज्ञानराज माउली महाराजांच्या संजीवन समाधी दिनी, त्यांच्या सर्वार्थदायक श्रीचरणारविंदी वारंवार दंडवतपूर्वक नमन करून, जन्मजन्मांतरी आपले स्मरण व सेवा द्यावी अशी पुनश्च कृपायाचना करूया आणि ' महाराज ज्ञानेश्वर माउली ' या पुण्यपावन नामगजरात त्यांच्याच श्रीचरणी विसावूया !!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(http://rohanupalekar.blogspot.in )




29 Jun 2017

साठवणीतलीवारी_३

लागला टकळा पंढरीचा
वारी म्हणजे काय? परमाराध्य भगवान श्री माउलींच्या शब्दांत सांगायचे तर "सुखाची मांदुस" आहे वारी ! अपरंपार आनंदाचे हे गावच्या गाव मजल दरमजल करीत भूवैकुंठ पंढरीला निघालेेले आहे. त्या आनंदाच्या कल्लोळातला खरा ब्रह्मानंद आहेत साक्षात् भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज; पादुकारूपाने विसावलेला चैतन्याचा जिव्हाळा, कैवल्याचा पुतळा, कोवळिकेचा मळा, प्रेमाचा कळवळा ..... माझा ज्ञानोबा  !!!
जगात सर्वजण आनंदाकडे, आनंदासाठीच सतत धावत असतात. तो सापडतोच असे नाही. सापडला तर पूर्णपणे भोगताही येत नाही. कधी हातून निसटून जातो कळत देखील नाही. पण आमचा हा दैवी ब्रह्मानंद? अहो, हा स्वत:च सर्व सवंगड्यांना घेऊन आपल्या दारी येतो, आपल्या पाठी लागतो, मला पाहा, मला अनुभवा, माझा भोग घ्या, माझा आस्वाद घ्या असे म्हणत. हा माउलीरूप कैवल्यचंद्राचा अम्लान चांदणबहार पुरे म्हणायला उरत नाही आणि हवा म्हणून सरत नाही. याच वैकुंठीच्या अमृत-परगुण्याला आमच्या भगवान सद्गुरु श्री माउलींचा पालखी सोहळा म्हणतात. येथे येऊन जो प्रेमाने या महाप्रसादाच्या पानावर बसेल, तो देवदुर्लभ तृप्ती अनुभवूनच समाधानाच्या हाती आंचवतो. पण ही अनुभूती मात्र त्या सद्गुरु श्री माउलींच्याच कृपेने येते बरं का. ती कृपा झालेली नसेल तर मग वारीचा खरा आनंद काही जाणवतच नाही. वारी ही मग निव्वळ एक यात्राच होऊन बसते, तीही नाना कटकटींची. 
हे कैवल्याचे अलौकिक साम्राज्य जेव्हा आमच्या फलटणमधे विसावते ना, तेव्हाची स्थिती अवर्णनीयच असते. "ऐसा सुखसोहळा स्वर्गीं नाही" म्हणत आम्ही माउलींच्या स्वागतासाठी, खरेतर अपार विरहाने कातर होऊन माय-भेटीसाठी आसुसलेलो असतो. कधी एकदा ती त्रिभुवनपावन मायमाउली दृष्टीस पडते आणि सर्वस्वाचे बंधन तोडून, धावत जाऊन तिला मिठी मारून तिच्या मृदुमृदुल प्रेमअंकी बसतोय, अशीच मनाची कातर स्थिती होऊन जाते.
माझ्या लाडक्या माउलीलाही मला भेटण्याची अशीच उत्सुकता असेल का? हा प्रश्न अनाठायी असला, तरी क्षणभर येतोच हो मनात. ती नुसती लौकिक माय नाही, माउली पण आहे ना ! ती आपल्या कोणत्याही बाळाला कधीतरी विसरेल का? त्यात एखादे पोर अपंग असेल तर तिचा कळवळा अधिक पान्हावतो त्याच्यासाठी. शिवाय "तुका म्हणे जे येथे । तेथे तैसेचि असेल ॥" हा तर तिचा स्थायीभावच. हा विचार आला की मन शांत होते व पुन्हा तिच्या प्रेमात आणि त्या निरपेक्ष प्रेमाच्या मनावर गोंदलेल्या हळव्या आठवणीत मग्न होऊन जाते. या अशाश्वत जगातला हाच खरा शाश्वत सुखाचा विसावा; नाही का?
मी पहिल्यांदा वारीला गेलो १९९६ साली, दहावी झाल्यावर; तेही फलटणपासून पंढरपूरपर्यंत. पण त्याआधी माउलींचा फलटणचा मुक्काम एवढाच त्यांच्याशी, वारीशी माझा संपर्क होत असे. त्यामुळे माउली येणार म्हटले की तो दिवस शेकडो दिवाळी दस-यांसारखा वाटायचा. श्रीमंत बाळमहाराजांबरोबर दोनदा प्रस्थानाला तेवढा मी गेलो होतो. पण वारी सुरू झाल्यापासून दररोज न चुकता सकाळ मधील वारीची प्रत्येक बातमी मी अधाशासारखी वाचत असे. त्यावेळी आजच्या सारखा टीव्ही चॅनेल्सना वारीचा छंद लागलेला नव्हता, पण पेपरमध्ये मात्र माउली आणि तुकोबांच्या पालख्यांचे सविस्तर वृत्त येत असे. त्यावरच आम्ही तहान भागवायचो. सकाळी शिकवणीवरून आलो की, आधी पेपर ताब्यात घेऊन मी आमच्या स्वयंपाकघरातील ओट्यावर फतकल मारून बसायचो व नाष्टा करत करत बातम्या वाचून काढायचो. तेवढ्यानेही मी त्याच सोहळ्यात असल्याची अनुभूती मला येई.
भगवान श्री माउलींची पालखी आषाढ शुद्ध तृतीयेला फलटण मुक्कामी असते. काहीवेळा तिथीच्या वृद्धीमुळे दोन मुक्काम पडत असत. मग काय जास्तच मज्जा. तृतीयेला सकाळी केंदूरच्या श्रीसंत कान्हूराज पाठक महाराजांची पालखी आमच्या माउलींच्या मंदिरात येई. त्यांचे थोडावेळ भजन होई व मग ते पुढे निघून जात. त्यांचा सुंदर नक्षीकाम केलेला लाकडी रथ पहायला मला खूप आवडायचा. मी त्यांची दिंडी मंदिरात आली की धावत जाऊन दर्शन घेऊन यायचो. हे श्रीसंत कान्हूराज महाराज माउलींच्या काळातील, नागेश संप्रदायातील फार थोर विभूतिमत्व होते. माउली त्यांना प्रेमादराने 'काका' म्हणत असत म्हणजे पाहा. त्यांच्या हकिकती खूप जबरदस्त आहेत, पण त्यावर पुन्हा कधीतरी लिहीन. सद्गुरु माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात द्वादशीला सर्व संतमांदियाळी समोर त्यांची कीर्तनसेवा झाली होती, अशी नोंद सापडते. 
आपल्या मर्यादित मानवी, लौकिक प्रेमाला कधीच समजू शकणार नाही अशा; प्रेमाच्या अत्युच्च स्तरावरील या माउलीप्रेमाचा अगदी किंचित, कणभर स्पर्श सद्गुरुकृपेने लाभलाय. तेवढाच मला स्वर्गसुखाची अनुभूती सतत देतो आहे. माउलींनी आपल्या या प्रेमकृपेच्या मधाचे बोट लावून आजवर किती जीवांना वेडावून सोडलंय, कायमचे अंकित करून ठेवलंय, हे तेच एक जाणतात ! पण ही संख्या कोणत्याच गणिताच्या आवाक्यातली नाही, हे मात्र नक्की. आणि हेच वारीत समक्ष जाणवते. हे माउलींचे वेडेपण फार फार अद्भुत आणि हवेहवेसे वाटणारे आहे.
सद्गुरु श्री माउली दुपारी चार-साडेचारला वडजलचा विसावा घेऊन आमच्या तांबमाळावर येत. तत्पूर्वी मी तेथे जाऊन थांबत असे. रस्त्याच्या कडेला उभा राहून समोरून जाणारा वारक-यांचा मेळा पाहताना खूप आनंद होत असे. मी कधी असा वारीला जाईन? याचेच विचार मनात सतत तरळत असत. फार फार हेवा वाटायचा मला त्या पुण्यवान वारक-यांचा. अजूनही वाटतो !
सद्गुरु माउलींची पालखी आली की दर्शनासाठी गर्दी उसळायची. मी श्री.सुभाषराव शिंदे यांच्याबरोबर रथात चढून देवांना वंदन करायचो. पूजा झाल्यावर खाली उतरून मग मी पालखीबरोबर चालायला सुरुवात करी. तिथून फलटण चार-पाच किलोमीटर असल्याने साधारण दोन तासांत आम्ही पोहोचायचो. दोन तीन वर्षे असे नुसते चालल्यावर मी तळावर पालखीला खांदा द्यायलाही लागलो. पालखीला खांदा देणे हे माझ्यासाठी 'मर्मबंधातली ठेव'च आहे. या खांदा देण्यातले सुद्धा असंख्य अनुभव माझ्यापाशी आहेत. एक मोठा स्वतंत्र लेखच त्यावर होऊ शकेल.
पालखीला खांदा दिल्याची एक खूण उजव्या खांद्यावर उमटते. तशी छोटीशी खरचटलेली जखम माझ्याही खांद्याला व्हायची. ही हवीहवीशी वाटणारी हळवी खूण पुढे कित्येक दिवस श्री माउलींची तीव्र आठवण करून देत असे. खोटं सांगत नाही, त्या जखमेचा फार अभिमान वाटायचा मला आणि त्यामुळेच मी वारंवार त्या जखमेला गोंजारतही असे.
अहो, कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट या पालखीमध्ये प्रत्यक्ष बसलाय. राजा चाले तेथे वैभव सांगाते । असे म्हणतात. ते खरेही आहे. भगवान माउलींबरोबर त्यांचा सारा दृश्य-अदृश्य वैष्णवमेळाही आहेच. विठुरायाच्या प्रेमाने भारलेल्या, निरंतर आनंदाने बहरलेल्या माझ्या या सर्व हरिमय बांधवांना सादर वंदन. आणि तुम्हां-आम्हां सर्वांचेच परमाराध्य असणा-या महाभागवतोत्तम भगवान सद्गुरु श्री ज्ञानराज माउली महाराजांच्या नित्यश्रीर्नित्यमंगल श्रीचरणारविंदी अनंतानंतकोटी दंडवत प्रणाम  !!!!!
रोजच्या चालीने शिणवटा येतोच. त्यात असंख्य भक्तांची काळजी देखील वाहायची म्हणजे मग किती काम करावे लागत असेल? आमच्या या परमसुकोमल ज्ञानमाउलीला आमच्याचसाठी किती ते श्रम करावे लागतात नाही ! चला आपण सर्व मिळून आज मुक्कामी पोचल्यावर तिच्या श्रीचरणांना तेल लावून प्रेमाने मर्दन करू या आणि छान गरम पाण्याने शेकून तिचा सगळा शिणवटा दूर करू या. म्हणजे मग तिला शांत झोप लागून उद्याच्या प्रवासासाठी माउली ताजीतवानी होईल. आणि पुन्हा, "माझे जीवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥" म्हणत आपणही आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवत, तिच्यासोबत भूवैकुंठ पंढरीकडे मार्गक्रमण करू. 
माउलीराया, माझ्या तोडक्या मोडक्या, प्रेम-मायेची धड गादी उशीही नसणा-या आणि जर्जर झालेल्या हृदयमंचकावर शांत झोप येईल ना हो आपल्याला? आपल्याच कृपेने जशी जमेल तशी सेवा करतो आहे, गोड मानून घ्यावी, हीच लेकुरवाचेने कळकळीची प्रार्थना  !
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )

25 Jun 2017

श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

आज आषाढ शुद्ध द्वितीया, श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराजांची १०३ वी जयंती. यावर्षी पू.मामांची तिथी व तारीख दोन्ही एकच आलेले आहेत. आजच्याच तिथीला, आजच्याच तारखेला १९१४ साली त्यांचा जन्म झाला होता.
आजच्या दिनाचे औचित्य साधून, पू.मामांचे चरित्र व त्यांचे वारीविषयक चिंतन यावर आधारलेला एक लेख दै.ऐक्य मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. त्याची लिंक सोबत देत आहे. कृपया सर्वांनी हा लेख आवर्जून वाचावा व प.पू.मामांच्या श्रीचरणीं श्रद्धासुमनांजली समर्पित करावी ही विनंती.
लेखाची लिंक -
http://www.epapergallery.com/DainikAikya/25Jun2017/Normal/Zumbar/page4.htm

24 Jun 2017

भावार्थ करुणात्रिपदीचा

शांत हो श्रीगुरुदत्ता
आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, सद्गुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज तथा श्री थोरले महाराज यांची पुण्यतिथी. श्री थोरले महाराज हे प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच होते. त्यांचे चरित्र व कार्य अत्यंत अद्भुत आणि विस्मयकारक आहे. ( त्यांच्या चरित्राविषयी आज पुन्हा लिहीत नाही, माझ्याच एका लेखाची लिंक देत आहे, त्यावर थोडक्यात चरित्र वाचायला मिळेल.)


प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे वाङ्मय अतिशय अलौकिक आहे. त्यांची स्तोत्रे, त्यांचे ग्रंथ हे श्रीदत्तसंप्रदायाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. श्रीदत्त संप्रदायाचे समग्र तत्त्वज्ञान व उपासना पद्धती या मंत्ररूप ग्रंथांमधून स्वामीमहाराजांनी लीलया प्रकट केलेली आहे. आजवर लाखो भाविकांनी याच्या अनुसंधानाने भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंची परिपूर्ण कृपा प्राप्त करून घेतलेली आहे व पुढेही अनंतकाळपर्यंत प्राप्त करून घेतीलच.
परवाच डॉ.मलिक नावाच्या एका अमराठी भाविकाने संपर्क केला व विचारले की, "तुमचा ' करुणात्रिपदीची जन्मकथा ' हा लेख वाचला. ती कशी रचली गेली हे समजले, पण करुणात्रिपदी या सुंदर रचनेचा पूर्ण अर्थ मिळू शकेल का?" त्यांनी असे विचारल्यावर माझ्या मनात विचार आला. अरेच्चा, आजवर कुठे ह्या रचनेचा अर्थ वाचलाच नाही आपण. एकतर तुम्हां आम्हां मराठी लोकांना श्रीगुरुचरित्राचा परिचय असल्याने; व ही रचना मराठीतच असल्याने तिचा अर्थ उपलब्ध असावा असे कधी आपल्याला वाटलेच नसावे. पण अमराठी लोकांना ती नक्कीच अडचण वाटत असणार. तेव्हा या सज्जनांच्या रूपाने जणू श्री स्वामी महाराजांनीच ही सूचना केली आहे, असे मनापासून वाटले. म्हणून आजच्या श्री टेंब्येस्वामी महाराजांच्या १०३ व्या पुण्यतिथीला, करुणात्रिपदीचाच पूर्ण भावार्थ या लेखनसेवेद्वारे त्यांच्या श्रीचरणीं समर्पित करीत आहे.
( ' करुणात्रिपदीची जन्मकथा ' हा लेख या लिंकवर वाचता येईल. )


प.प.श्री.थोरले महाराज भगवान श्रीदत्तप्रभूंची विनवणी करताना पहिल्या पदात म्हणतात,
शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु.॥
तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता । तूं आप्तस्वजन भ्राता,
सर्वथा तूंचि त्राता । भयकर्ता तूं भयहर्ता, दंडधर्ता तूं परिपाता ।
तुजवांचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥१॥
अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था । तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा । तूं तथापि दंडिसि देवा,  कोणाचा मग करुं धावा । सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥२॥
तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि न च संतापी ।
गच्छतः स्खलनं क्वापि, असें मानुनी नच होऊ कोपी । निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ॥३॥
तव पदरीं असता ताता, आडमार्गीं पाउल पडतां । सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता । निज बिरुदा आणुनि चित्ता, तूं पतितपावन दत्ता । वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुनाथा ॥४॥
सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हें घरदार । तव पदी अर्पूं असार । संसाराहित हा भार । परिहरिसी करुणासिंधो, तूं दीनानाथ सुबंधो ।
आम्हां अघलेश न बाधो । वासुदेव प्रार्थित दत्ता ॥५॥
श्रीनृसिंहवाडीच्या पुजा-यांच्या मनमानी कारभारावर कोपाविष्ट झालेल्या श्रीदत्तप्रभूंची करुणा भाकताना स्वामी महाराज म्हणतात, "हे श्रीगुरु दत्तराया, आपण नेहमी शांतच असता. आपल्याला क्रोध येणे संभवतच नाही. पण भक्तांच्या हितासाठी आपण धारण या कृतक कोपाने माझ्या मनाला अस्वस्थता आलेली आहे, तेवढी घालवून आपण मला शांती प्रदान करावी ॥ध्रु.॥
( प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी एका प्रवचनात फार मार्मिक सांगितले होते की, करुणात्रिपदीमधील 'शांत हो श्रीगुरुदत्ता' मध्ये, 'अहो शांत श्रीगुरुदत्ता' असाच अधाहृत पाठ आहे. तेथे 'शांत' हे श्रीदत्तप्रभूंचे विशेषण आहे. स्वभावत:च जे नित्यशांत आहेत, त्यांना आणखी कशाला बरे स्वामी महाराज शांत व्हा म्हणतील? )
देवा, आपणच आमची माता आहात, आम्हांला जन्माला घालणारे जनितेही आपणच आहात. आपणच आमचे सर्व बाजूंनी हित करणारे आमचे आप्त, जवळचे नातेवाईक, सगेसोयरे, आमचे वाडवडील, बंधू
आणि आमचे रक्षणकर्ते आहात. प्रसंगी आम्ही नीट वागावे म्हणून भय दाखविणारे व ती सुयोग्य जाणीव झाल्यावर ते भय हरण करणारेही आपणच आहात. म्हणूनच तुम्ही दंड धारण केलेला आहे. शिवाय तो दंड आमच्या संकटांचा, शत्रूंचा नाश करण्याच्या आपल्या लीलेचा द्योतकही आहे. म्हणूनच श्रीदत्तराया, तुमच्याशिवाय आम्हांला अन्य कोणीही माहीतच नाही. देवा, आपणच आमच्यासारख्या आर्तांचे एकमात्र आश्रय आहात. ॥१॥
हे दयाळू भगवंता, आपण चुकलेल्यांना अपराधांची शिक्षा देण्यासाठीच हा दंड हाती धरलेला आहे. हे जरी यथार्थ असले तरी आम्ही अपराधी भक्त, आमच्या चुकांची कबूली देऊन, तुमची यशोगाथा गाऊन तुमच्या चरणीं मस्तक नमवून करुणा भाकत आहोत. तरीही आपण आम्हां अज्ञ लेकरांना दंड देणार असाल, तर मग आम्ही कोणाचा धावा करावा? तुमच्याशिवाय आम्हांला संकटांमधून सोडवणारे कोण आहे दुसरे? ( एरवी तुम्हीच आम्हांला सर्व संकटांमधून बाहेर काढता, आता जर तुम्हीच संकट रूपाने समोर उभे ठाकलात तर आम्ही बापुड्यांनी जायचे कुठे? ) ॥२॥
हे दत्तात्रेयप्रभो, आम्ही सुधारावे म्हणून आपण नटाप्रमाणे क्रोधाचा आवेश आणून आम्हां पापी जीवांना एकवेळ दंड द्याल. पण आम्ही अज्ञानी, संसारी जीव पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करणार. तेव्हा आपण आम्हांवर असे रागावू नका. पडून पडून आम्ही जाणार कुठे? तुमच्याच चरणांवर पडणार ना? तेव्हा आमच्यावर आता आपण निजकृपेचा वर्षाव करावा हीच आमची कळकळीची प्रार्थना आहे. ॥३॥
हे पतितपावना, आपल्या पदांचा एकदा का आश्रय घेतला, की समजा चुकून आडमार्गावर पाउल जरी पडले, तरीही आम्हांला त्या परिस्थितीतून सांभाळून सुखरूप पुन्हा आपणच योग्य मार्गावर आणता. हेच आपले भक्तवात्सल्याचे अलौकिक ब्रीद आहे. तेव्हा आता त्याच आपल्या ब्रीदाची आठवण काढून, हे करुणाघन गुरुनाथा, आपण आपला कोप सोडून पुन्हा आमच्यावर कृपावंत व्हावे. ॥४॥
सहकुटुंब, सहपरिवाराने, अवघ्या घरादाराने आम्ही आपलेच दास आहोत. आपल्याच श्रीचरणीं आम्ही आमचा हा असार संसारभार, आमची सर्व कर्मे अर्पण केलेली आहेत. त्या कर्मांच्या जडभाराचा परिहार करून, हे करुणेच्या सागरा, दीनानाथा, आमच्या उत्तम बांधवा, हे दत्तात्रेयप्रभो, आपण आमचे ते सर्व पाप हरण करावे. त्या पापांच्या लवलेशानेही आमच्या सेवेत इथून पुढे कसलीही बाधा आणू नये, हीच कृपा आम्हां दीनदासांवर आता आपण करावी, अशी मी 'वासुदेव' आपल्याला प्रार्थना करीत आहे. ॥५॥
श्रीदत्तात्रेयप्रभूंची अशी कळकळीने प्रार्थना करूनसुद्धा ते कृपावंत होतील की नाही, अशी शंका वाटल्याने, आता दुस-या पदात श्री स्वामी महाराज त्यांना त्यांच्याच श्री नृसिंह सरस्वती अवतारातील लीलांचा दाखला देऊन पुन्हा विनवणी करताना म्हणतात,
श्रीगुरुदत्ता जय भगवंता, तें मन निष्ठुर न करी आतां ॥ध्रु.॥
चोरें द्विजासी मारितां मन जें, कळवळलें तें कळवळो आतां ॥१॥
पोटशुळानें द्विज तडफडतां, कळवळले ते कळवळो आता ॥२॥
द्विजसुत मरतां वळलें तें मन, हो की उदासीन न वळे आतां ॥३॥
सतिपति मरता काकुळती येतां, वळले ते मन न वळे कीं आतां ॥४॥
श्रीगुरुदत्ता त्यजिं निष्ठुरता कोमल चित्ता, वळवी आता ॥५॥
हे भगवंता श्रीगुरु दत्तात्रेया, तुमचे मन असे निष्ठुर करू नका. ॥ध्रु.॥
पूर्वी तुमचा भक्त असणा-या वल्लभेश द्विजाला जेव्हा चोरांनी मारले, तेव्हा तुमचे जे मन कळवळले तेच आताही आमच्यासाठी कळवळो. ॥१॥
वासर क्षेत्री असह्य पोटदुखीने व्याकूळ झालेल्या, तडफडणा-या द्विजाला पाहून जे मन कळवळे तेच आताही कळवळो. ॥२॥
शिरोळ ग्रामीच्या गंगाधर द्विजाचा तुमच्याच कृपेने जन्मलेला लहान मुलगा धनुर्वाताने मेल्यावर जे कळवळले, तेच तुमचे मन आता का बरे आमच्याविषयी उदासीन होऊन कळवळा दाखवत नाहीये? ॥३॥
माहूरच्या गोपीनाथांच्या दत्त नामक पुत्राच्या पत्नीने, त्याच्या मृत्यूमुळे काकुळतीला येऊन प्रार्थना केल्यावर, जे मन करुणेने कळवळले, तेच आता का बरे आमच्यावर कृपा करीत नाहीये? ॥४॥
श्रीगुरु दत्तात्रेयप्रभो, आपण आम्हां दीनदासांविषयीची आपली ही निष्ठुरता त्यागावी व आपल्या कोमल चित्ताने आमच्यावर पुन्हा  करुणाकृपा वर्षवावी, हीच कळकळीची प्रार्थना. ॥५॥
या दोन पदांमधून करुणा भाकल्यावर आता श्री स्वामी महाराज तिस-या पदामध्ये, श्रीदत्तप्रभूंच्या करुणामय स्वरूपाला कळवळून साद घालून निर्वाणीची प्रार्थना करताना म्हणतात,
जय करुणाघन निजजनजीवन ।
अनसूयानंदन पाहि जनार्दन ॥ध्रु.॥
निजअपराधें उफराटी दृष्टी ।
होऊनि पोटीं भय धरू पावन ॥१॥
तूं करुणाकर कधी आम्हांवर ।
रुससी न किंकरवरद कृपाघन ॥२॥
वारी अपराध तूं मायबाप ।
तव मनी कोप लेश न वामन ॥३॥
बालकापराधा गणे जरि माता ।
तरी कोण त्राता देईल जीवन ॥४॥
प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव ।
पदी देवो ठाव देव अत्रिनंदन ॥५॥
माता अनसूयेचे सुपुत्र असणा-या, आपल्या निजभक्तांचे जीवन असणा-या करुणाघन श्रीदत्तप्रभूंचा जयजयकार असो. हे जनार्दना, आपणच आता आमचे रक्षण करावे. ॥ध्रु.॥
आमच्याच अपराधांमुळे आम्ही खजिल होऊन भयभीत झालेलो आहोत. आता दृष्टी वर करून आपल्याकडे पाहण्याची हिंमत देखील राहिलेली नाही आमची. ( त्यामुळे आम्ही मान खाली घालूनच उभे आहोत.) ॥१॥
हे दासांना वर देणा-या करुणाकर दत्तदेवा, कृपेचे मेघ असणारे आपण आमच्यावर कधीच रुसणे शक्य नाही. ( आपण आमच्यावर असे रुसू नये.) ॥२॥
हे मायबापा, आमच्याविषयीचा कोपलेश बाजूला सारून, आम्हांला आपले अपत्य मानून आमचे सर्व अपराध आता आपणच घालवा. हे दयामय वामना, मी आपल्या चरणी मनोभावे प्रार्थना करतोय. ॥३॥
अहो देवा, मातेनेच बालकाचे अपराध मानले, तर मग त्या अजाण बालकाला कोण जीवन देणार? त्याचे रक्षण कोण करणार? ॥४॥
हे देवा अत्रिनंदना, हा 'वासुदेव' आपल्या श्रीचरणीं प्रेमादराचा भाव विदित करून प्रार्थना करतो की, आपण सदैव आपल्या चरणींच मला ठाव द्यावा, मजवर कृपा करून मला कायमचे आपल्याच सेवेमध्ये रत ठेवावे. ॥५॥
सद्गुरु श्री थोरल्या महाराजांची करुणात्रिपदी हे अत्यंत प्रासादिक असे अजरामर प्रार्थनाकाव्य आहे. आजवर लाखो भक्तांनी या त्रिपदीच्या अनुसंधानाने भगवान श्रीदत्तप्रभूंच्या करुणाकृपेची अद्भुत प्रचिती घेतलेली आहे. श्री स्वामी महाराजांनी या तीन पदांमधून श्रीदत्तप्रभूंच्या करुणाप्राप्तीचा राजमार्गच तुम्हां आम्हां भाविकभक्तांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे यात शंका नाही. तेव्हा आजच्या पावन दिनी या अलौकिक करुणात्रिपदीचे अनुसंधान करून, श्री स्वामी महाराजांच्या शब्दात श्रीदत्तचरणीं कायमचा ठाव देण्याची श्रीगुरुचरणीं प्रेमप्रार्थना करू या !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.)


21 Jun 2017

साठवणीतलीवारी२

लागला टकळा पंढरीचा
वारीच्या वाटेवरील गावात माझे बालपण गेले, हा माझ्यावरचा भगवान श्री माउलींचा खूप मोठा उपकारच आहे. कारण त्यामुळेच नकळत माउली व त्यांची वारी जीवनात आले व पुढे कायमचेच अविभाज्य घटक होऊन राहिले ! फलटण गावाच्या मध्यवर्ती भागात लक्ष्मीनगर वसलेले आहे. त्यात श्रीसंत उपळेकर महाराज पथावर आमचे घर आहे. घरासमोरच भगवान श्री माउलींचे मंदिर आहे आणि त्याला लागूनच प.पू.डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे समाधिमंदिर आहे. माझे सगळे बालपण याच दोन्ही मंदिरात गेलेले आहे. इतके की मी सकाळी उठल्यावर माउलींच्याच मंदिरात माझा फुटबॉल घेऊन एकटाच खेळायला जात असे. दोन्हीकडून पळत पळत जाऊन आपणच बॉल मारायचा,असा माझा खेळ चाले. माझा दिवसातला जास्तीतजास्त वेळ या दोन्ही मंदिरांमध्येच जात असे.
हे माउलींचे मंदिर प्रशस्त असून त्यात माउलींची खूप सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. अशी मूर्ती इतरत्र कुठेही नाही. फलटणच्या राणीसाहेब कै.श्रीमंत लक्ष्मीदेवी मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी हे मंदिर बांधले. त्याची हकिकतही मोठी गोड आहे.
राणीसाहेबांच्या पर्यंत जवळपास सात पिढ्या निंबाळकर राजघराण्यात औरसपुत्र कधी जगलाच नाही. सात आठ पिढ्या दत्तकपुत्रच राजगादीवर बसे. पुढे प.पू.श्री.काकांच्या प्रेरणेने कै.लक्ष्मीदेवी राणीसरकारांनी भगवान श्री माउलींची मनोभावे प्रार्थना करून उपासना केली. माउलींच्या कृपेने त्यांची संतती जगली. पण असे म्हणतात की, पूर्वीच्या कोणा महात्म्याचा तसा शाप होता. त्यामुळे महात्म्याचाच शाप तो, खोटा कसा ठरणार ? राणीसाहेबांची संतती जगली पण राज्य गेले; म्हणजे औरस पुत्र राजा झालाच नाही शेवटपर्यंत ! 
पुढे एकदा राणीसाहेब परदेशात असताना विमान अपघातात मरता मरता आश्चर्यकारकरित्या बचावल्या, तेही प.पू.काकांनी प्रवासापूर्वीच दिलेल्या मोलाच्या सूचनेमुळे आणि भगवान श्री माउलींच्याच कृपेने. तेव्हापासून राणीसाहेबांनी मात्र मनापासून माउलींची सेवा आरंभिली. स्वहस्ते पूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली. आळंदी देवस्थानला त्या काळात लक्षावधी रुपयांची मदत केली. लक्ष्मीनगर भागात माउलींचे सुंदर मंदिर बांधले व त्या सर्व ऐषोआराम सोडून मंदिरातच अवघ्या एका खोलीत राहून सेवा करू लागल्या. त्यांनी सर्व राजवैभवाचा त्याग केला.
या मंदिरात भगवान श्री माउलींची लाईफ साईझची संगमरवरी मूर्ती आहे. माउलींचे हे ध्यान खूप वेगळे आहे. त्यांच्या डाव्या हातात ज्ञानेश्वरी असून ते ती सांगत आहेत. डोळे अगदी भावपूर्ण आहेत. मूर्तीसमोर माउलींच्या पादुका समाधीशिलेवर स्थापन केलेल्या आहेत.
या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज अचानक उठून तरातरा चालत पुणे रस्त्यावर पार गावाबाहेर पर्यंत गेले. तोंडाने 'गोळा आला गोळा आला' असे पुटपुटत होते. कोणाला काहीच कळेना. थोड्या वेळाने अंगावरच्या उपरण्यात काहीतरी झाकून धरल्यासारखे ते घेऊन आले व त्यांनी माउलींच्या नुकत्याच प्रतिष्ठापना झालेल्या पादुकांवर ते उपरणे रिकामे केले. या सर्व प्रकाराबद्दल त्यांना विचारल्यावर पू.श्री.काका उत्तरले, "तुम्ही माउलींचे आवाहन केलेत पण त्यांच्या स्वागतासाठी कोणी गेलाच नाहीत, म्हणून मग मी जाऊन त्यांचे स्वागत केले व त्यांचे तेज सन्मानाने घेऊन आलो." अशाप्रकारे फलटणच्या आमच्या श्री ज्ञानेश्वर मंदिरात भगवान माउलींची प्रतिष्ठापना प्रत्यक्ष प.पू.श्री.उपळेकर महाराजांनी केलेली आहे. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज दररोज या मंदिरात दर्शनाला येत व बराचवेळ श्री माउलींशी सुखसंवाद करीत असत. त्यांचा तो नित्याचा परिपाठच होता. 
लहानपणापासून याच माउलींच्या आणि प.पू.काकांच्या मंदिरात खेळताना माझ्या बालमनावर माउलींच्या प्रेमाचे जे संस्कार झाले ते माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत.
आमच्या माउलींच्या मंदिरात रोज आरतीनंतर पंचपदी होई व दर गुरुवारी आरतीपूर्वी पादुकांची प्रदक्षिणा होई. मी दररोजच्या संध्याकाळच्या आरतीला उपस्थित असायचोच. आरतीची घंटा वाजायला लागली की खेळ सोडून धावत जायचो आम्ही तिथे. आरतीच्या वेळी तास किंवा मोठा घोळ वाजवायचे अप्रूप वाटायचे आम्हांला. कधी कधी गुरुजी नसतील तर मलाच गुरुवारच्या प्रदक्षिणेच्या वेळी माउलींच्या पादुका धरण्याचे भाग्य लाभत असे. त्यावेळी माझा मित्र कै.प्रसाद नेर्लेकर माउलींची पूजा करायचा. तो आणि मी एकत्रच रुद्र, पुरुषसूक्त वगैरे शिकलो होतो.
या माउलींच्या मंदिरात कै.सौ.भगीरथीबाई उडपीकर नावाच्या फार गोड आजी सेवेला होत्या. त्या कानडी वैष्णव ब्राह्मण होत्या. श्री राघवेंद्रस्वामी, भगवान तिरुपती बालाजी हे त्यांचे आराध्य दैवत. उडपीहून पंढरपूरला वारीसाठी आलेल्या असताना त्यांची व त्यांच्या नवऱ्याची चुकामूक झाली. बरोबर त्यांची लहान मुलगी गीता देखील होती. त्यावेळी राणीसरकार पंढरपुरातच होत्या. त्यांनी असहाय्य भगीरथीबाईंना आपल्या सोबत फलटणला आणले व माउलींच्या मंदिरात सेवेला ठेवले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची सोयही करून दिली. कै.ती.भगीरथीबाईंसाठी माझ्या मनात अतीव प्रेमादराची भावना आहे. त्यांनीच अगदी सुरवातीला माउलींच्या प्रेमाचे संस्कार माझ्यावर केले.
ती.भागीरथीबाई फार देखणे हार करीत. त्यांचे पाहूनच मी देखील रंगीबेरंगी व नजाकतीचे हार करायला आवडीने शिकलो. त्या माझ्या घरातील देवमूर्तींसाठी देखील हार करून देत असत. त्यांचे कानडीमिश्रित मराठी ऐकायला गोड वाटे. त्या मला 'रोहनबाबा' म्हणत. मला चपला विसरायची तेव्हा खूप सवय होती. दर्शनाला जाताना मी चप्पल घालून जायचो; पण परत येताना साफ विसरून जायचो की मी चप्पल घालून गेलो होतो ते. त्यामुळे माझ्या चपला कायम हरवायच्या. पण ती.भागीरथीबाईंचे बरोबर लक्ष असायचे. त्या माझी राहिलेली चप्पल उचलून त्यांच्या खोलीच्या दाराआड ठेवत व मी शोधायला आलो की मला हाक मारून बोलावत व चप्पल देत असत. सोबत भाजलेले शेंगदाणे किंवा अांब्याची वडी वगैरे खाऊ देखील मिळायचा. दुहेरी लाभच तो ! भागीरथीबाईंनी माझ्या अशा पंधरा-वीस वेळा तरी नक्की चपला जपून ठेवलेल्या मला आठवतात.
भगवान माउलींच्या संगमरवरी मूर्तीला ठरावीक दिवसांनी त्या रिठ्याने व गरम पाण्याने स्नान घालीत; व लहान बाळाला अंघोळ झाल्यावर गच्च बांधून ठेवतात तसे डोक्यावरून अंगभर शाल घालून ठेवत. मी विचारल्यावर त्या म्हणाल्या, "बाबा, माउलींना स्नान घातले आत्ता, मग थंडी भरेल ना उघडे ठेवले तर. लहान बाळाप्रमाणे नाजूक आहेत ते !" माउलींची ही मूर्ती नसून सुकुमार कोमल असे माउलीच प्रत्यक्ष समोर आहेत, अशा थोर भक्तिभावनेने त्या सेवा करीत. त्यांच्या त्या प्रेमसेवेचा न पुसला जाणारा संस्कार माझ्या मनात खोलवर रुजलेला आहे.  भगवंतांची भक्ती कशी करावी, याचे प्रात्यक्षिक ज्ञान लाभले म्हणून मी भगीरथीबाईंचा आजही ऋणी आहे.
एक गंमत म्हणजे मला लहानपणी नेहमीच दृष्ट लागायची. त्या न सांगता माझी दृष्ट काढत असत, ती देखील माउलींच्या निर्माल्यानेच. काही कार्यक्रम वगैरे असला की आमच्या घरी येताना त्या निर्माल्य सोबत घेऊनच येत. अशाप्रकारे माउलीच माझे संरक्षक कवचही झालेले होते व आजही आहेत. भगीरथीबाई अतिशय उत्तम आणि रुचकर स्वयंपाक करीत. त्यांचे ते उंचपुरे, काठापदराचे नऊवारी लुगडे नेसलेले, तोंडात एकही दात नसलेले सात्त्विक सोज्ज्वळ रूप आजही माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात जसेच्या तसे जिवंत आहे. डोक्यावर पदर घ्यायची त्यांची विशिष्ट लकब होती. मानेला एक झटका देऊन त्या पदर सारखा करीत. ती त्यांची  सवय पाहणा-याच्या नजरेत येत असे.
ती.भागीरथीबाई गोष्टीवेल्हाळ होत्या. त्यांच्या भागातल्या कानडी हकिकती, पू.काकांच्या आठवणी, त्यांच्या गावाच्या दुर्गादेवीच्या गोष्टी व भूतकाळातील अनेक प्रसंग त्या रंगवून रंगवून सांगत असत. मूळची संपन्नता अनुभवलेली असूनही, त्यावेळच्या त्यांच्या परस्वाधीन व काही प्रमाणात गरीबीच्या परिस्थितीचे त्यांना दु:ख नक्कीच वाटत असे, पण त्यांच्या रोजच्या वागण्यात त्या दु:खाचा मागमूस नसे. त्या नेहमी अतीव आनंदातच राहात असत. ती.भागीरथीबाई वारीच्याही अनेक गोष्टी नेहमी सांगत असत. त्यामुळेच आपणही वारी करायलाच हवी, अशी तीव्र इच्छा तेव्हापासूनच माझ्या मनात तयार झालेली होती. माउलींच्या कृपेने १९९६ साली, दहावीच्या सुट्टीत ती इच्छा पहिल्यांदा पूर्ण झाली.
भागीरथीबाईंना माउलींच्याच मंदिरात राहिल्याने अनेक संतांची दर्शने झाली व सेवाही करायला मिळाली. पू.श्री.गोविंदकाका, पू.श्री.गुळवणी महाराज, पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज, पू.धुंडा महाराज देगलूरकर, पू.मामासाहेब दांडेकर इत्यादी अनेक संतांच्या दर्शनाच्या हकिकती त्या सांगत असत. त्यांना मरणही खूप चांगले आले. जन्मभर माउलींची सेवा केलेली ही भागीरथी नावाची भक्तिगंगा आषाढी एकादशीच्या सकाळी माउलींची पूजा झाल्यावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने माउलीचरणीं कायमची विसावली. केवढे मोठे भाग्य म्हणायचे हे ! त्या रोज प.पू.काकांच्या समाधीलाही एक हार देत असत. अजून मंदिरात नेऊन द्यायचा राहिल्याने त्यादिवशी तो हार त्यांच्या खोलीतच ठेवलेला होता टेबलावर. त्याच्या शेजारीच कसेतरी वाटायला लागले म्हणून त्या जरा लवंडल्या व तेथेच त्यांचे देहावसान झाले. आश्चर्य म्हणजे, पू.काकांच्या समाधीसाठी एकादशी म्हणून करून ठेवलेला भरगच्च तुळशीचा हार नेमका त्या टेबलावरून कसा काय माहीत नाही, पण त्यांच्या निष्प्राण देहावर पडला. जन्मभर त्यांनी देवांना मनोभावे दररोज हार करून वाहिला, शेवटी स्वत: प.पू.काकांनीच त्या सेवेचा त्यांना अशाप्रकारे प्रसाद दिला असे म्हणायला हरकत नाही. मी त्या वर्षी, १९९६ साली पहिल्यांदाच वारीला गेलो होतो, त्यामुळे मला त्यांचे अंत्यदर्शन होऊ शकले नाही.
माउलींनी ज्ञानेश्वरीत व समर्थांनी दासबोधात म्हटल्याप्रमाणे भागीरथीबाईंची सेवा होती. माउलींसाठी जे जे शक्य ते ते त्या अतीव प्रेमाने करत असत. त्यांना रोज भरपूर फुले लागत हार करायला. म्हणून त्यांनी स्वत: खपून छान बाग तयार केलेली होती मंदिराच्या आवारात. प्राजक्त, गुलाब, मोगरा, कुंद, शेवंती, गलांडा, झेंडू, बेल, तुळशी अशी अनेक फुलझाडे प्रेमाने वाढवलेली होती. त्यांचे नजाकतीने हार करणे चालायचे रोज रात्री. मी आईने जोरात हाक मारून बोलवेपर्यंत, शेजारतीनंतर त्यांच्या ओट्यावरच गप्पा मारत बसलेलो असायचो. आईची हाक ऐकली की त्या म्हणत, "रोहनबाबा, पळा लवकर, नाहीतर धम्मकलाडू मिळेल घरी गेल्यावर." मी लहान होतो तसेच वाटेत अंधार असायचा म्हणून मला त्या मंदिराच्या दारापर्यंत सोडायलाही येत. मी आमच्या घरात पोहोचेपर्यंत त्या दारातच थांबलेल्या असायच्या. माझ्यावर त्यांचे खूप प्रेम होते व त्यांना माझे कौतुकही होते.
ती.भागीरथीबाई गेल्यानंतर माउलींच्या मंदिरातले चैतन्यच उणावले यात शंका नाही. बहुदा त्यांच्या निर्मळ सेवेचा विरह माउलींनाही जाणवला असावा. त्यांच्यासारखे कोणीच प्रेमाने लक्ष न दिल्याने व दुर्दैवाने त्यांच्यासारख्या उत्कट प्रेमाची झाडांनाही सवय असल्यानेच बहुदा, त्या बागेतील झाडेही त्या गेल्यानंतर हळूहळू वाळून गेली. पण त्यांच्या बागेतली त्यांच्याच हाताने लावलेली मोग-याची काही झाडे मी मुद्दाम आणून माझ्या बागेत लावली होती. त्यांना जाऊन आता वीस वर्षे झाली, तरी ते मोगरे आजही भरपूर फुलत आहेत; आमच्या प्रेमळ भागीरथीबाईंची आठवण ताजी ठेवत आणि त्यांची सेवा आजही अविरत चालवत !
श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब स्वतः जातीने माउलींच्या पालखी प्रस्थानाला जात. आजही नाईक निंबाळकरांचा प्रतिनिधी उपस्थित असतोच. अंकलीचे शितोळे, ग्वाल्हेरचे शिंदे आणि फलटणचे निंबाळकर या तीन राजघराण्यांचे प्रतिनिधी प्रस्थानसमयी असतात. राणीसाहेब वारीलाही जात; पण गाडीने. चालत जाऊ शकत नव्हत्या त्या. ती.भागीरथीबाई त्यांच्याबरोबर जात असत. फलटणच्या मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी पहाटपूजेनंतर माउलींच्या पादुकांवर लक्ष तुलसीअर्चनाचा राणीसाहेबांचा नियम होता. तो आजही चालू आहे. वाखरी मुक्कामातही पहाटे निंबाळकरांना पूजेचा मान आहे. संपूर्ण सोहळ्यात फक्त एकाच ठिकाणी माउलींच्या पादुका पूजेसाठी मुक्कामाचा तळ सोडून बाहेर दिल्या जातात. माउलींची पालखी फलटणला मुक्कामाला असते त्या रात्री, पालखीसोबत दुसरा जो पूजेचा पादुकाजोड असतो तो आमच्या माउलींच्या मंदिरात आणून त्यांना पवमानाचा अभिषेक होत असतो. रात्रभर पादुका मंदिरातच असतात. या पूजेत मी लहानपणी प्रत्येकवर्षी सहभागी झालोय आणि स्वहस्ते माउलींची पूजा देखील केलेली आहे.
फलटणचा मुक्काम संपवून पंढरपूरला जाताना दुसऱ्या दिवशी माउलींची पालखी पू.काका व श्री माउलींच्या मंदिरासमोरूनच जाते. त्यावेळी  निंबाळकर संस्थानातर्फे माउलींची पूजा होते व प्रत्येक दिंडीला नारळ-साखर दिली जाते. तेव्हा होणारी पूजा रथात चढून मीच करीत असे. त्या गर्दीत झटकन रथात चढण्याचा माझा सराव चांगला असल्याने, कायम माउलींची ही सेवा मला मिळाली हे माझे परमभाग्य. पूजा झाल्यावर माउलींच्या पादुकांवर मनसोक्त डोके टेकवून नमस्कार करण्याचे सुख काही औरच असते !
या आमच्या मंदिरात परतीच्या वारीला (म्हणजे पंढरपूर ते आळंदी प्रवासात) भगवान श्री माउलींची पालखी यायची. आरती होऊन शिरावाटप व्हायचे व मग पालखी नामदेव विठ्ठल मंदिरात रात्रीच्या मुक्कामाला जाई. ही प्रथा पुढे बंद झाली. पण लहानपणी काही वर्षे त्या आरतीला उपस्थित राहिल्याचे मला व्यवस्थित स्मरते आहे. ज्यावर्षी माउलींची पालखी मंदिरात आली नाही, त्यावर्षी ती.भागीरथीबाईंचे ते अस्वस्थपण व त्यांनी केलेला त्रागा मला आजही डोळ्यांसमोर येतो. त्या खूपच उद्विग्न झालेल्या त्यावेळी.
श्रीमंत राणीसाहेबांचे सर्वात धाकटे चिरंजीव कै.श्रीमंत विक्रमसिंह तथा बाळमहाराज हे माळकरी होते. त्यांनीच राणीसाहेबांचा माउलीसेवेचा वारसा पुढे चालवला. त्यांचा माझ्यावर खूप जीव होता. मी सर्वात पहिल्यांदा त्यांच्याबरोबरच माउलींच्या प्रस्थानाला आळंदीला गेलो होतो. बहुदा १९९१-९२ साल असेल. त्याआधी माझ्या आजीच्या, कै.मालतीबाई उपळेकरांच्या कॅन्सर ट्रीटमेंटच्या वेळी १९८९ साली आयुष्यात पहिल्यांदा मी आळंदीला जाऊन माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले होते. कै.आजीबरोबर मी ज्ञानेश्वरी वाचायचाही त्यासुमारास एकदा प्रयत्न केला होता. पण फारतर पहिला अध्यायच वाचून झाला, मग 'ये अपने बस की बात नही ।' हे पटल्याने, पुढे बालसुलभ कंटाळ्यामुळे ते राहूनच गेले.
आमच्या घरात प.पू.श्री.काकांमुळे माउलींच्या हरिपाठाची उपासना आहे. त्यामुळे जवळपास दहाव्या-बाराव्या वर्षापासूनच माझी दररोज हरिपाठ म्हणायला सुरुवात झाली होती. बरेच दिवस मी संध्याकाळी स्नान करून बरोबर सात वाजता, पू.काकांच्या हरिपाठाच्या खोलीत बसून हरिपाठ म्हणत असे. नंतर पाठ झाल्यावर मात्र एका जागी बसून म्हणणे जवळपास बंद पडले. आता येताजाताच हरिपाठ म्हटला जातो.
अशाप्रकारे सद्गुरु श्री माउलींनी माझ्या जीवनात अगदी बालपणीच प्रवेश करून, पुढे कायमचा निवास केलेला आहे, ही त्यांचीच माझ्यावरची असीम दयाकृपा म्हणायला हवी. आज, "माउलींशिवाय आपल्याला दुसरे काही विश्वच असू नये", यावर सद्गुरुकृपेने माझे मत पक्के होऊ लागलेले आहे आणि हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे !!
( छायाचित्र संदर्भ  : डावीकडे, भगवान श्री माउलींची संगमरवरी श्रीमूर्ती व उजवीकडे वर कै.श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसरकार व खाली कै.ती.भागीरथीबाई उडपीकर. )
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )

17 Jun 2017

साठवणीतलीवारी१

लागला टकळा पंढरीचा
उन्हाळ्याची आग ओकणारी असह्य झळ निसर्गचक्रानुसार जसजशी कमी होऊ लागते, तसतसे ज्येष्ठ महिन्यात आकाशात एक दोन चुकार ढगही दिसू लागतात. अगदी त्याच सुमारास एक सतत हवीहवीशी वाटणारी भावपूर्ण आठवण मनात गर्दी करू लागते. होय, बरोबर ओळखलेत, आषाढी वारीचीच आठवण ती !
रिमझिमत्या पावसात माउलींसंगे होणारी पंढरीची वारी खरोखरीच अवर्णनीय आहे. शब्दांनी कधी तिचे वर्णनच होऊ शकत नाही. तो शांतपणे डोळे मिटून हृदयाच्या गाभ्याने अनुभवायचाच विषय आहे. म्हणून तर संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय म्हणतात, "पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ॥"
मोठ्या भाग्याने माझा जन्म भगवान श्री माउलींच्या वारीच्या वाटेवरील फलटण गावातील उपळेकरांच्या घरात झाला. थोर माउलीभक्त सत्पुरुष पूजनीय डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे कृपाशीर्वाद लाभून पावन झालेले हे घराणे, त्यात घरासमोरच श्री माउली आणि पू.काकांची मंदिरे; त्यामुळे सोन्याला सुगंधच म्हणायचा तो. वारीच्या वाटेवर गाव असल्याने नकळत वारीचा संस्कार मनात दृढावला, अगदी कळतंय तेव्हापासूनच ! मला आठवतंय, आमच्या फलटणच्या घडसोली मैदानावरच माउलींच्या पालखीचा मुक्काम असे. त्या मैदानावरच आमची शाळा पण होती. त्यामुळे पालखीच्या दिवशी व दुस-याही दिवशी शाळेला सुट्टी असायची. पालखीचे दोन मुक्काम असले तर एकूण तीन दिवस सुट्टी. मी आईबरोबर दर्शनाला जायचो. उंची कमी असल्याने पालखीपर्यंतही हात पोचत नसे. मग मला माउलींची पालखी ठेवलेल्या टेबलावर कोणीतरी उचलून ठेवी. मग मी बरोबर आणलेली घरच्या झाडांची तगरीची वगैरे फुले, बेल व तुळशी मनसोक्त माउलींच्या श्रीचरणपादुकांवर वाहत असे आणि त्या पादुकांवर डोके टेकवून नमस्कार करीत असे. आजही मला डोळ्यांसमोर ते दृश्य स्पष्ट दिसते आहे.
या पादुकांच्या रूपाने अत्यंत देखणा, मदनालाही लाज वाटेल असा तो दिव्य चैतन्याचा पुतळा, त्रैलोक्याचा जिव्हाळा, माझा ज्ञानोबाच त्या पालखीत आम्हां वेड्या भोळ्या-भाबड्या भक्तांची वाट पाहात, गोड हसत बसलाय, अशी माझ्या बालमनाची पक्की धारणाच आहे ! हे मनमोहक दृश्य माझ्या कल्पनेच्या कॅनव्हासवर आजही सजीव होऊन विलसते आहे !!
म्हणूनच सद्गुरु श्री माउलींच्या पादुकांवर कितीही वेळा डोके ठेवले, तरी माझे मन कधीच भरत नाही, कमीच वाटत राहते ते. जणू माउलींचा प्रेमळ हात आपल्या सर्वांगावरून मायेने फिरतोय, असेच त्यावेळी आतून सारखे जाणवत राहते. त्या लहान वयात, माउलींच्या फलटणमधील एक किंवा दोन दिवसांच्या मुक्कामात, मला किती वेळा त्यांचे असे डोके टेकवून दर्शन घ्यायला मिळाले, हे मी फार अभिमानाने सगळ्यांना सांगत असे. सहा-सात वेळा तरी नक्की दर्शन घेता येई मला.
गंमत म्हणजे पालखी येण्याच्या दोनतीन दिवस आधीपासून मी तगरीच्या झाडाजवळ अनेकवेळा जाऊन किती कळ्या आल्यात ते पाही. त्या झाडाला, तुला भरपूर फुले येऊ देत रे, म्हणून मी सांगत देखील असे. आज मागे वळून पाहताना जाणवतंय की, ते झाड तेव्हा नक्कीच माझ्या विनवणीला प्रतिसाद देऊन भरभरून फुलत असले पाहिजे. कारण मला चांगली पिशवीभर फुले सहज मिळायची पालखीच्या दिवशी.
वारीचे, दिंडीचे आणि भजनाचे एक आगळे प्रेम मला कायम वाटत आले आहे. वारीचे दिवस जवळ आले की बऱ्याचवेळा मला कुठूनतरी टाळमृदंगाचा आवाज ऐकू येतोय असा भास होई. असा आवाज आला की, मी हातातले सगळे सोडून त्या आवाजाच्या दिशेने धावत जात असे. आजही माझी ही आवड जशीच्या तशी टिकून आहे. दिंडीत रंगून भजन करणारे वारकरी पाहणे हा माझ्यासाठी फार मोठा स्वर्गीय आनंद असे. एकदा प्राथमिक शाळेतील दुसरीच्या वर्गात सर शिकवत असताना, असा आवाज आला म्हणून मी धावत वर्गाबाहेर आलो होतो दिंडी पाहायला, हे मला आजही लख्ख आठवते.
वारी हा माझ्या हृदयीचा चिरंतन आनंदठेवा आहे. वारीची नुसती आठवणही मला तत्काळ त्या वारीचा सुखद अनुभव देते, अगदी आजही; कुठेही असलो तरी. भगवान श्री माउलींच्या कृपेने सलग अकरा वर्षे वारीत मी अतिशय हृद्य आणि चिरस्मरणीय प्रसंग अनुभवलेले आहेत. हे एकेक प्रसंग आतून मखमली अस्तर असलेल्या देखण्या सुवर्ण पेटीत ठेवून, जन्म जन्म उराशी जपावेत इतके मधुर-मनोहर आहेत. या सर्व प्रसंगांवर लिहायचे ठरवले तर नक्कीच जाडजूड पुस्तक तयार होईल. तरीही या वर्षी त्यातील काही मोजक्याच पण भावपूर्ण स्मृतिचित्रांचे, या लेखमालेतून तुम्हां वारी-माउलीप्रेमी सुहृदांसाठी प्रदर्शन मांडण्याची व त्याद्वारे स्मृतिकुपीतले तेच आनंदप्रसंग पुन्हा पुन्हा भरभरून अनुभवण्याची मला मनापासून इच्छा होत आहे. ही माउलींचीच कृपा जणू ! माझ्या या कथनात वारंवार माझा 'मी' येईल, पण तो अहंकाराने नाही, केवळ सांगणा-याच्या भूमिकेतून येईल, हे कृपया ध्यानात असू द्यावे ही नम्र विनंती.
१९८९ साली, मी आठ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडलांनी पशुखाद्य बनविण्याचा कारखाना फलटण-पुणे रस्त्यावरील तांबमाळावर सुरू केला. त्याच्या शेजारीच फलटण दूधसंघ होता. त्याचे चेयरमन श्री.सुभाषराव शिंदे होते. सद्गुरु श्री माउलींचा दिव्य पालखी सोहळा याच रस्त्यावरून फलटणकडे जात असल्याने, दूधसंघाच्या वतीने वारक-यांना मोफत सुगंधी दूध वाटप, माउलींच्या पालखीवर पुष्पवृष्टी व श्रींची पूजा होत असे. बहुदा त्याच वर्षीपासून मी देखील दूधसंघाच्या पालखी स्वागताच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागलो. शिंदेसाहेबांबरोबर रथावर चढून पूजा देखील करीत असे मी त्यावेळी. मी वयाने बराच लहान असल्याने सर्वांना माझे तेव्हा खूप कौतुक वाटे व त्यामुळेच मलाही सगळीकडे फर्स्ट प्रेफरन्स मिळत असे, जो मला तर तेव्हा हवाच होता. अशाच एका वर्षी काढलेला फेटा बांधलेला माझा बालपणीचा एक फोटो अमित मुजुमदार व जाई हुबळीकर या माझ्या बालमित्रांनी आवर्जून मला गेल्या वर्षी पाठवला. तो फोटो पाहिल्याबरोबर माझे मन पुन्हा वारीच्या त्या समृद्ध स्मृतिकक्षात जाऊन ठाण मांडून बसले आणि वारीचे शेकडो प्रसंग चित्रपटासारखे डोळ्यांसमोरून झरझर जाऊ लागले. त्यातलेच काही प्रसंग "#साठवणीतलीवारी" या लेखमालेतून तुम्हां सर्वांसाठी आणि खरेतर स्वांत:सुखाय इथे मांडत आहे.
वारीची नुसती आठवण जरी झाली ना, तरी आपले मन, पावसाच्या आगमनाने हरखून गेलेला आणि भारदस्त पिसारा फुलवून मस्तीत नाचणारा मोरच होऊन जाते. ज्याने वारी केलेली आहे, त्यालाच मी जे म्हणतोय त्यातला खरा आनंद कळणार. माउलींच्या छत्रछायेत पंढरीची वाट चालणे, हा फार फार अद्भुत सोहळा असतो. हा ज्ञानियांचा अनभिषिक्त महाप्रभू, कैवल्यसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट 'माउली' होऊन वारीच्या वाटेवर तुम्हां आम्हां सर्वसामान्य वारक-यांसोबत चालतो, प्रत्यक्ष आपले बोट धरून आपल्याला चालवतो; आपले सुखदु:ख समजून घेऊन, मायेची फुंकर मारून आपल्याला गोंजारतो आणि भरभरून प्रेमकृपादान देऊन आपले अवघे जीवनच त्या अपूर्व प्रेमरंगाने भारून टाकतो. हा दैवी सुखानुभव कोणत्या शब्दांत सांगता येईल बरे? शब्दांच्या कुबड्या, हो कुबड्याच त्या, त्यांचा काहीही उपयोग होत नाही या वारीच्या वाटेवर. इथे फक्त नि:शब्द अनुभूतीच बोलते, ती देखील एका अगम्य वाणीत, जी फक्त माउलींवर आणि त्यांच्या वारीवर जीवापेक्षा जास्त प्रेम करणारा सच्चा वारकरीच समजून घेऊ शकतो !!
आज ज्येष्ठ कृष्ण अष्टमी, मायमाउली जगज्जीवन सद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या पालखीचे प्रस्थान; म्हणजे आषाढीवारीच्या अद्भुत, अलौकिक आणि अतुलनीय आनंदसोहळ्याची सुरुवात. चला तर, आपणही आता सद्गुरु श्री माउलींच्या स्मरणात, वारीच्या या प्रेमवर्षावात चिंब चिंब भिजून, "ज्ञानोबा-तुकाराम"च्या गगनभेदी गजरात, आनंदातिरेकाने थरथरणा-या, डोलणा-या कळसाच्या साक्षीने, आळंदीच्या देऊळवाड्यातून माउलींसंगे भगवान पंढरीनाथांच्या दर्शनासाठी, त्यांच्याचसारखे अखंड आनंदमय होण्यासाठी प्रस्थान ठेवू या !!
माझ्यासोबत या शब्द-वारीला तुम्ही सर्वांनी तर याच; पण तुमच्या सर्व सुहृदांनाही यात सहभागी करून घ्या, त्यांच्यापर्यंतही हे लेखन व्हॉटसप, फेसबुक सारख्या विविध माध्यमांतून पोहोचवून, त्यांनाही तो स्वर्गीय आनंद सप्रेम अनुभवण्यास मदत करा, ही आग्रहाची विनंती !
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )

करुणात्रिपदीची जन्मकथा

परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती ( टेंब्ये ) स्वामी महाराजांचे समग्र वाङमय हा अद्भुत चमत्कारच आहे. अत्यंत काटेकोर, व्याकरण-काव्य नियमांचा धागा न सोडता, प्रतिपादनाच्या विषयातच विविध मंत्रांची चपखल योजना करीत त्यांनी रचलेली असंख्य संस्कृत व मराठी स्तोत्रे हा भारतीय वाङ्मयातला अजरामर आणि अलौकिक असा विशेष विभाग आहे. त्यांनी रचलेल्या भगवान श्रीदत्तप्रभूंच्या अष्टोत्तरशतनाम स्तोत्रामध्ये असे १४ मंत्र खुबीने गुंफलेले आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक नवीन शब्दही निर्माण केलेले आहेत. अशाप्रकारच्या रचना करण्यासाठी विलक्षण प्रतिभा आणि भाषेवर अद्वितीय प्रभुत्व लागते आणि अशा लोकविलक्षण प्रतिभेचे प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराज अक्षरश: सम्राटच होते.
प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्धी पावलेली आहे. प्रत्येक दत्तभक्त दररोज ही रचना म्हणतोच म्हणतो. त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच ' करुणात्रिपदी ' होय ! भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सवाच्या निमित्ताने या अजरामर अशा करुणात्रिपदीची खरी जन्मकथा आपणां सर्वांसाठी सादर करीत आहोत !

गेले काही दिवस व्हॉट्सप व फेसबुकवर प. प. श्री. टेंब्येस्वामींची म्हणून एक खोटी कथा फारच फिरत होती. त्यातील सर्व संदर्भ खोडसाळपणेच तयार केलेले होते. एका मंदिराचा पुजारी देवाचा नैवेद्य खातो म्हणून स्वामी त्याला रागावतात व ते पाहून दत्तप्रभू चिडून स्वामींना ओरडतात की, आमचे पुजारी किंवा विश्वस्त काय करतात ते आम्हांला माहीत असते व त्यावर आमचे लक्ष असते, तेव्हा इतरांनी त्या फंदात पडू नये.....इत्यादी. मग स्वामी त्यांची क्षमा मागून ही करुणात्रिपदी रचून त्यांची करुणा भाकतात ; अशा स्वरूपाची ती पूर्णपणे खोटी गोष्ट सर्वत्र प्रसारीत होत होती. ही गोष्ट तर आपल्या चुकांवर रितसर पांघरूण घालण्यासाठीच कोणीतरी मुद्दाम रचलेली आहे, हे स्पष्ट दिसून येते. असा कोणताही प्रसंग प. प. टेंब्येस्वामींच्या चरित्रात कधीही घडलेला नाही. करुणात्रिपदीची रचना होण्यामागे यापेक्षा पूर्णपणे वेगळीच पण महत्त्वाची अशी एक गोष्ट घडलेली होती, तीच या लेखाद्वारे वाचकांपुढे ठेवत आहे.

श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे. त्यांच्या ' मनोहर पादुका ' कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे हे अतीव प्रेमादराचे स्थान आहे. या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता-नियमावली स्वत: प. प. श्री. टेंब्ये स्वामींनीच घालून दिलेली आहे. तेथील परिपाठानुसार चातुर्मास्यातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्यांचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी वाडीला श्रींची पालखी प्रदक्षिणा असते.
इ.स.१९०५ मध्ये एकेदिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना, पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा भलताच अपशकुन पाहून सगळे घाबरले. नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे, असे जाणून ते सगळे पुजारी हवालदिल झाले. त्यावेळी प. प. श्री. टेंब्ये स्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) येथे चातुर्मास्यानिमित्त वास्तव्याला होते. तेथे पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली.
पुजारी मंडळींच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामी ध्यानाला बसले.
ध्यानात त्यांनी श्रीदत्तप्रभूंना कारण विचारले, त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, " तू घालून दिलेल्या नियमांनुसार हे लोक वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हांलाच तेथे राहायचा कंटाळा आलाय. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी ! " ध्यानातून उठल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी पुजा-यांना रोषाने सांगितले की, " जर दुर्वर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर काय भयंकर परिणाम होतील ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाहीतर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे ! " पुजा-यांनी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागितल्यावर व नीट वागण्याची, जशी घालून दिली आहे त्याबरहुकूम सेवा करण्याची हमी दिल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी कळवळा येऊन भगवान श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली. त्याचवेळी त्यांनी ही तीन पदांची करुणात्रिपदी रचून ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली. आजही दररोज पालखीच्या तिस-या प्रदक्षिणेला तीन थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते.

' करुणात्रिपदी ' ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण, मंत्रमय व रसाळ रचना आहे. यातून श्रीस्वामी महाराज, भगवान श्रीदत्तप्रभूंना विनवणी करीत आहेत. देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर, शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावरही करा, आमच्याकडून सेवा निरंतर करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हां सर्वांवर करुणेचे कृपाछत्र घाला, अशी अत्यंत दयार्द्र होऊन भगवंतांची ते प्रार्थना करीत आहेत.

आजच्या घडीला श्रीदत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये, दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानांवर ही करुणात्रिपदी दररोज आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच पडलेली आहे. साक्षात् दत्तावतार प. प. श्री. टेंब्ये स्वामींचेच हे प्रासादिक, मंत्रमय शब्द असल्याने, आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की, करुणात्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्रीदत्तप्रभूंची कृपा नक्की होतेच. अपराधक्षमापनासाठीच्या उपलब्ध काव्यांमधील, एकमेवाद्वितीय, अद्भुत व अलौकिक काव्य म्हणून करुणात्रिपदीला सर्वदूर मान्यता आहे !
आजवर अनेकानेक सुप्रसिद्ध गायकांनी गायलेली ' शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता ' ही करुणात्रिपदी आकाशवाणी तसेच सीडी-कॅसेटच्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्धी पावलेली असून अजरामरही ठरलेली आहे.
प्रार्थनेचा आदर्श वस्तुपाठ असणा-या या करुणात्रिपदीची ही रंजक जन्मकथा देखील विशेषच म्हणायला हवी.
प. प. श्री. टेंब्येस्वामी त्रिपदीचा समारोप करताना श्रीदत्तमहाराजांकडे फार सुंदर मागणे मागतात,

प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव ।

पदीं देवो ठाव , देव अत्रिनंदन ॥


देवा सद्गुरुराया अत्रिनंदना, मी आपल्या श्रीचरणीं प्रेमभाव ठेवून प्रार्थना करतो की, आपण मला कायमच आपल्या पदी ठाव द्यावा, आपल्याच श्रीचरणीं निरंतर सेवारत ठेवावे. करुणात्रिपदीच्या सतत अनुसंधानाने, श्री. टेंब्येस्वामींच्या या मागणी प्रमाणे, करुणावरुणालय भगवान श्रीदत्तप्रभू तुम्हां-आम्हां सर्वांवर कृपावर्षाव करोत, हीच या परम पावन श्रीदत्तात्रेय जयंतीदिनी सादर प्रार्थना !!

लेखक - रोहन विजय उपळेकर.

भ्रमणभाष - 8888904481

16 Jun 2017

साठवणीतली वारी

राम राम मंडळी  !!
आजपासून आषाढी वारीच्या अलौकिक सोहळ्याला सुरुवात होत आहे. आज श्रीसंत तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान, उद्या सद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या पालखीचे प्रस्थान.
खरोखरीच अद्भुत आणि विलक्षण असतो हा वारीचा सोहळा. त्याची गोडी सप्रेम अनुभवलेल्या माणसालाच मी काय म्हणतोय ते कळेल, शब्दांत सांगताच येत नाही ते सुख !! 
गेल्यावर्षी मी त्या वारीच्या निमित्ताने, लागला टकळा पंढरीचा  याशीर्षकाने  साठवणीतलीवारी ही लेखमाला लिहायला घेतली खरी, पण फक्त तीनच लेख लिहून झाले. यावर्षी आधी तेच तीन लेख पुन्हा पोस्ट करून मग पुढील लेख जमतील तसे लिहायचा विचार आहे.
शेवटी या वारीबद्दल कितीही लिहिले तरी मन भरणारच नाही माझे, खरंच सांगतोय. आणि सद्गुरुकृपेने प्रचंड अनुभव आलेले आहेत आम्हां सर्वांना या आनंदसोहळ्यात. तेच तुम्हां सर्वांना सांगून, पुन्हा त्यांचा एकत्र आनंद घ्यावा असा विचार आहे. पाहू श्रीभगवंतांची कशी कृपा होते ते. इच्छा तर तीव्र आहेच.
सर्वांना पुनश्च या साठवणीतलीवारी साठी मन:पूर्वक हार्दिक आमंत्रण  !!
चला, येताय ना माझ्यासोबत वारीला??
- रोहन विजय उपळेकर

31 May 2017

आनंद म्हणे मज झाले समाधान, गेलो ओवाळून जीवेभावे

राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या प्रभावळीत फार फार मौल्यवान रत्ने, श्रीस्वामी कृपेनेच लाभलेल्या अपार तेजाने तळपताना दिसतात. या अनर्घ्य रत्नांपैकी, एक अलौकिक विभूतिमत्व म्हणजेच, सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज हे होत.
श्रीआनंदनाथ महाराज हे तळकोकणातील वालावल गांवचे, म्हणून त्यांचे आडनाव पडले वालावलकर. पुढे ते वेंगुर्ले कॅम्प परिसरात स्वामी महाराजांचे मंदिर बांधून राहू लागले. तिथेच त्यांनी १९०३ साली आजच्याच तिथीला, ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला जिवंत समाधी घेतली. त्यांची आज ११४ वी पुण्यतिथी आहे.
श्री स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून श्री आनंदनाथ महाराज अक्कलकोटी दर्शनासाठी निघाले. इकडे श्री स्वामीमाउलीलाही आपले लाडके लेकरू कधी एकदा भेटते असे झाले होते. म्हणून श्री स्वामीराज महाराज स्वत:च अक्कलकोटाबाहेर येऊन एका झाडावर वाट पाहात बसले होते. श्री आनंदनाथ महाराज नेमके तेथेच येऊन जरा विसावले. झाडावरून श्री स्वामीराजांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना खूण दाखवली. आपली साक्षात् परब्रह्ममाउली समोर उभी राहिलेली पाहून श्री आनंदनाथांनी गहिवरून त्यांचे श्रीचरण हृदयी कवटाळले. श्री स्वामीरायांनीही आपल्या या अनन्यदासाच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून पूर्ण कृपादान केले. तसेच तोंडातून कफाचा बेडका काढून ओंजळीत टाकला. त्या बेडक्यात इवल्याशा श्रीचरणपादुका स्पष्ट दिसत होत्या. हेच श्रीस्वामीमहाराजांनी श्री आनंदनाथांना प्रसाद म्हणून दिलेले 'आत्मलिंग' होय. आजही ते दिव्य आत्मलिंग वेंगुर्ले येथे पाहायला मिळते.
श्री आनंदनाथांनी जवळपास सहा वर्षे अक्कलकोटात श्रीस्वामीसेवेत व्यतीत केली व त्यानंतर स्वामीआज्ञेने ते प्रचारार्थ बाहेर पडले. येवल्याजवळ सावरगांव येथेही त्यांनी एक आश्रम स्थापन केला. पण त्यांचे वेंगुर्ले येथेच जास्त वास्तव्य होते.
श्री आनंदनाथ महाराज हे सिद्धहस्त लेखक व कवी होते. त्यांच्या श्रीस्वामी महाराजांवरील अप्रतिम रचना 'स्तवनगाथा' मधून प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे 'श्रीगुरुस्तवन स्तोत्र' तर असंख्य स्वामीभक्तांच्या नित्यपठणात आहे.
शिर्डीच्या श्री साईबाबांना जगासमोर आणण्याची श्री स्वामीरायांची आज्ञा श्री आनंदनाथांनीच पूर्ण केली. श्री साईबाबा हा साक्षात् हिरा आहे, हे त्यांनीच प्रथम लोकांना दाखवून दिले.
श्री आनंदनाथांचा स्तवनगाथा फार सुरेख, भावपूर्ण आणि स्वामीस्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारा आहे. आज त्यांच्या पावनदिनी त्यातील काही रचना आपण मुद्दाम अभ्यासूया. आपल्या एकूण २२८८ अभंगरचनांमधून त्यांनी स्वामीस्वरूप व स्वामीनामाचे अलौकिक माहात्म्य सुरेख आणि मार्मिक अशा शब्दांत स्पष्ट करून सांगितलेले आहे. त्यांच्या अपार प्रेमाने भारलेल्या या रचना वाचताना आपल्याही अंत:करणात स्वामीप्रेम दाटून येते व हेच त्यांना अपेक्षितही होते. "श्रीस्वामी पवाडा गाण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे", हे ते वारंवार सांगतात. त्यांच्याच रचना आज शतकापेक्षाही जास्त काळ झाला तरी स्वामीभक्तांच्या ओठी रंगलेल्या आहेत, हीच त्यांच्या अद्भुत स्वामीसेवेची पावती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
श्रीस्वामी महाराजांच्या विलक्षण अवताराचे माहात्म्य सांगताना ते म्हणतात,
अक्कलकोटीचा व्यवहारी ।
केली कलीवरी स्वारी ॥१॥
पायी खडाव गर्जती ।
भक्तवत्सल कृपामूर्ती ॥२॥
दंड कमंडलु करी ।
आला दासाचा कैवारी ॥३॥
कटी कौपीन मेखला ।
ज्याची अघटित हो लीला ॥४॥
करी दुरिताचा नाश ।
नामे तोडी माया पाश ॥५॥
आनंद म्हणे श्रीगुरुराणा ।
आला भक्ताच्या कारणा ॥११४.६॥

"अक्कलकोटातील लीलावतारी श्रीस्वामीब्रह्म हे कलियुगावर स्वारी करण्यासाठी आलेले आहेत. पायी खडावा, हाती दंड कमंडलू घेणारी ही भक्तवत्सल कृपामूर्ती दासांचा कैवार घेण्यासाठीच आलेली आहे. कटी कौपीन धारण करणारे हे साक्षात् दत्तदिगंबर अत्यंत अघटित लीला करीत भक्तांचा सांभाळ करतात, त्यांचे भक्तिप्रेम पुरेपूर आस्वादतात. या श्रीस्वामीनामाच्या निरंतर उच्चाराने सर्व पापे नष्ट होतात व भक्तांवर मायेचा प्रभावच उरत नाही. आनंदनाथ म्हणतात की, आमचा हा परब्रह्मस्वरूप श्रीगुरुराणा भक्तांसाठीच अवतरलेला आहे. म्हणून जो यांची भक्ती करील, नाम घेईल, तो या कळिकाळातही सुखरूपच राहील !"
राजाधिराज श्री स्वामीसमर्थ महाराजांच्या अलौकिक नामाचे अद्भुत माहात्म्य सांगताना श्री आनंदनाथ महाराज म्हणतात,
स्वामी नेमधर्म उपासना कर्म ।
नामाचें तें वर्म वेगळेंची ॥१॥
जीवेंभावें ज्यानें धरियेलें नाम ।
साधे सर्व कर्म तयालागी ॥२॥
अनंत जन्मींच्या पापांचा संहार ।
नामाचा उच्चार एक वेळ ॥३॥
सर्व ते मनोरथ पूर्ण हेचि होती ।
स्वामीनामीं प्रीती ठेविलिया ॥४॥
आनंद म्हणे ऐसे धरा हें बळकट ।
नको खटपट आणिक ती ॥५॥

"विविध उपासना, नित्यनेम व धार्मिक कर्मांपेक्षाही सद्गुरुमुखाने लाभलेल्या श्री स्वामी महाराजांच्या दिव्यनामाचे वर्म वेगळेच आहे. असे श्रीगुरूंनी दिलेले स्वामीनाम जो जीवेभावे धारण करतो, प्रेमाने घेतो, त्यालाच इतर सर्व कर्मांच्या परिपूर्णतेचे सौभाग्य लाभते.
सद्गुरु स्वामीराजांचे नाम एकवेळ जरी प्रेमाने घेतले, तरी अनंत जन्मांमधील असंख्य पापांचा तत्काळ संहार होतो. स्वामीनामावर परमप्रेम बसल्यावर त्या साधकाचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. नव्हे नव्हे, त्याचे मन मनोरथ करणेच विसरून जाते. ते मनच उन्मन होऊन जाते.
म्हणूनच स्वामीशिष्य श्री आनंदनाथ सांगतात की, इतर सर्व खटपटी सोडून तुम्ही सर्वांनी हे परमदिव्य स्वामीनाम बळकट धरा, सदैव त्या नामाचेच अनुसंधान करा, यातच खरे हित आहे !"
अशा सहजसुंदर आणि अपार प्रेमभावयुक्त रचना करून जगात स्वामीनामाचा, स्वामीकीर्तीचा डंका पिटून, अवघा स्वामीभक्तिरंग उधळणा-या, सद्गुरु स्वामीचरणीं स्वत:लाच सर्वभावे ओवाळून टाकल्याने पूर्ण समाधानी झालेल्या, या स्वनामधन्य श्रीस्वामीशिष्य श्री आनंदनाथ महाराजांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग प्रणिपात.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

24 May 2017

जीव ऋणवंत होई त्यांचा

आज वैशाख कृष्ण चतुर्दशी !
सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या शिष्यपरिवारासाठी ही अतीव महत्त्वपूर्ण तिथी आहे. या तिथीचे औचित्य म्हणजे, प.पू.श्री.मामांचे उत्तराधिकारी, प.पू.सौ.शकुंतलाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे या दोन्ही महात्म्यांची हीच जन्मतिथी आहे. एकाच परंपरेतील एकाच काळात कार्यरत असलेल्या दोन अधिकारी सद्गुरूंची जन्मतिथी एकच असणे हा किती विशेष योग आहे ! प.पू.सौ.शकाताईंचा जन्म २० मे १९४७ रोजी पुणे येथे झाला, तर प.पू.श्री.शिरीषदादांचा जन्म १३ मे १९६१ रोजी विदर्भात, बुलढाणा जिल्ह्यात जळगांव(जामोद) येथे झाला.
प.पू.सौ.शकाताईंनी स.प.महाविद्यालयातून रसायनशास्त्रात पदवी घेऊन पुढे पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ फर्ग्युसनमध्ये व बराच काळ स.प.महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्य केले. त्याहीनंतर त्या अभिनव अभियांत्रिकी व संगणक केंद्रात अध्यापन करीत होत्या. पुढे प.पू.श्री.मामांच्या परंपरेच्या कार्यानिमित्त त्यांचे अक्षरश: जगाच्या पाचही खंडांमध्ये प्रचंड भ्रमण झाले. त्यांनी आजवर जगभरातील चाळीस हजारांहून अधिक परदेशी नागरिकांना आपल्या विलक्षण अध्यात्मसाधनेची महती पटवून साधनारत केलेले आहे. आपल्या संतवाङ्मयाचा प्रचार-प्रसार करून प.पू.श्री.मामांच्या परंपरेनुसार साधना देऊन हजारो साधकांना परमार्थपथावर अग्रेसर केलेेले आहे. पूर्णपणे अनोळखी प्रांतात जाऊन, तिथे संतवाङ्मयावर प्रवचने करून त्या लोकांना परमार्थ करण्यास प्रवृत्त करणे, हे कार्य किती कठीण असेल, याची साधी कल्पनाही आपण करू शकत नाही. पण सद्गुरुकृपेने हे अवघड शिवधनुष्य पू.सौ.ताईंनी समर्थपणे पेललेले आहे.
पू.सौ.ताईंवर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा आहे. तसेच भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंचाही अपार प्रेमलोभ त्या निरंतर, क्षणोक्षणी अनुभवत असतात. त्यांचे अवघे भावविश्व श्रीसंत मीराबाईंच्या जातकुळीचे आहे, तितकेच वैभवसंपन्न आहे. विशेष म्हणजे त्यांची काव्य नाममुद्राही 'मीरा'च आहे. हा केवळ योगायोग नव्हे, हे तर भक्तिप्रांतातील एक अद्भुत वास्तवच !
प.पू.श्री.शिरीषदादांचे सुरुवातीचे शिक्षण यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे झाले. त्यांनी क-हाडच्या शासकीय इंजिनियरींग कॉलेज मधून बी.ई. केले. पुढे त्यांनी एम.ई. पदवी देखील मिळवली. त्याच काळात त्यांची व प.पू.श्री.मामांची भेट झाली व पौष कृष्ण षष्ठी, दि.२६ जानेवारी १९८१ रोजी श्रीनृसिंहवाडी मुक्कामी त्यांना पू.मामांकडून कृपानुग्रह व परंपरेचे उत्तराधिकारही प्राप्त झाले. पू.दादांना बालवयातच ज्योतिषादी विद्यांची सिद्धी होतीच, त्यात कालौघात असंख्य गूढविद्यांचीही भर पडली. परंतु पू.मामांच्या कृपेने त्यांचे विश्व पूर्णत:च बदलून गेले. सद्गुरुकृपेने त्या परमअद्भुत पराविद्येचेच आकलन झाल्यावर, या इतर अपरा-विद्यांची काय मिरास उरणार?
पू.मामांच्या आज्ञेने पू.दादांनी त्यावेळी नवीनच प्रकाशित होऊ घातलेल्या 'श्रीवामनराज' नावाच्या त्रैमासिकाचे संपादन करायला सुरुवात केली. तिथूनच त्यांच्या जगावेगळ्या संतवाङ्मयीन सेवाकार्यास सुरुवात झाली. आजमितीस पू.दादांच्या संपादित तसेच लिखित ग्रंथसंपदेने सव्वाशेचा आकडा पार केलेला असून, या ग्रंथांची एकत्रित पृष्ठसंख्या साधारणपणे वीस हजारांहूनही जास्तच आहे. मराठी संतसाहित्य विभागात पू.शिरीषदादा कवडे यांचे नाव त्यामुळेच सर्वाग्रणी आहे. त्यांच्या काव्याचे, अभंगांचेही संग्रह प्रकाशित झालेेले आहेत.
प.पू.श्री.शिरीषदादा आपल्या *'हंसा उडहूँ अगम को देस'* या पदसंग्रहातील एका अभंगात संतांचा महिमा सुरेख व नेमक्या शब्दांत व्यक्त करताना म्हणतात,
जाणोनी संतांचे उपकार अनंत ।
जीव ऋणवंत, होई त्यांचा ॥१॥
अनुभव चोख ठेवला बोलोनी ।
भाग्य कडसणी, साधकांसी ॥२॥
जनांचिये संगे चित्तासी अपाय ।
होती, तव पाय, तारक ते ॥३॥
धरोनिया हात, कृपे चालविती ।
अमृते प्रचिती, आली साच ॥४॥
संतांनी ग्रंथांच्या माध्यमातून आपला चोख स्वानुभवच स्पष्ट सांगून ठेवलेला आहे. हे त्यांचे अनंत उपकार पाहून आपला जीव जन्मजन्मांतरी त्यांचा ऋणवंत होतो. साधकांच्या कळवळ्याने त्यांनी किती सोपी पायवाट केलेली आहे ना ! एवढेच नाही तर, जनसंसर्गात असताना जेव्हा आपल्या चित्ताची परमार्थभूमिका गढूळ होऊ लागते, ते चित्त पुन्हा पुन्हा प्रपंचात गुंतू लागते तेव्हा हेच संतपाय आपल्यासाठी तारक ठरतात. त्यांच्या चरणीं शरण गेलेल्या जीवाला ते निगुतीने, अगदी प्रेमाने, त्याचा हात धरून आपल्या अमोघ कृपेने चालवीत जीवघेण्या प्रपंचाच्या पलीकडे सहजतेने नेतात. सद्गुरूंचे हे अद्भुत कृपापसाय सप्रेम अनुभवून 'अमृतमय' झालेली 'अमृता' (अर्थात् पू.श्री.शिरीषदादा) आपल्याला संतांचा हा विलक्षण महिमा कथन करीत आहे.
मी मुद्दाम हाच अभंग घेतला कारण, प.पू.सौ.शकाताई व प.पू.श्री.शिरीषदादा यांचेच जसेच्या तसे वर्णन यात आलेले आहे. आज बावीस वर्षे मी या दोन्ही विभूतींच्या जवळून संपर्कात आहे, त्यांची कृपा अनुभवतो आहे आणि त्यांच्या अपरंपार प्रेमवर्षावात अक्षरश: सुस्नान होत आहे. माझा हा अहंकार नव्हे, पण स्पष्ट सांगतो, या कृपाप्रेमामुळे मी खरोखरीच गर्भश्रीमंत झालेलो आहे; ही श्रीमंती कधीही कमी न होणारी आहे, कारण ती साक्षात् श्रीभगवंतांचीच शाश्वत कृपालक्ष्मी आहे !
पू.सौ.ताई व पू.श्री.दादांची समग्र ग्रंथसंपदा हे साधकांचे लळे पुरविणारे मधुर पाथेयच आहे. या पाथेयाच्या आस्वादनात साधनापथ सहजतेने आक्रमिला जातो, आजवर अनेकांचा हाच अनुभव आहे, उद्याही असणारच आहे. कारण या दोन्ही विभूतींनी आपला रोकडा स्वानुभवच मोठ्या  कळवळ्याने ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेला आहे. त्यामुळे त्यातून मिळणारी ऊर्जा ख-या साधकासाठी संजीवनीच ठरणार यात नवल नाही.
संतांचे वाङ्मय हे श्रीगुरुकृपेचे अलौकिक, अजर, अमर लेणे असते. त्यामुळे ते समजून घेण्यासाठी ती श्रीगुरुकृपा हेच अत्यंत आवश्यक साधनही असते. या दोन्ही विभूतींनी आपल्या प्रचंड  साहित्यातून तुम्हां-आम्हां भाविक अभ्यासकांना संतवाङ्मयाच्या आस्वादनाची ही आगळी वेगळी श्रीगुरुकृपादृष्टीच उलगडून दाखवलेली आहे. हे त्यांचे ऋण आपण कधीही फेडूच शकणार नाही, जन्मजन्मांतरी त्यांच्या त्या ऋणात राहण्यातच उलट आपले खरे हित आहे.
आज माझ्या या परमप्रेमळ सद्गुरुद्वयीचा पुण्यपावन जन्मदिन आहे. त्यांचे कृपाऋण हेच माझे अनर्घ्य वैभव आहे आणि तीच माझी मिराशी देखील ! देवा, आम्हां लेकरांवर असाच आपला कृपावर्षाव निरंतर होत राहो, हीच आपल्या महन्मंगल श्रीचरणीं सादर प्रार्थना !
जन्मदिवस जरी या महात्म्यांचा असला, तरी त्याचे बक्षीस तुम्हां-आम्हां लेकरांनाच मिळणार आहे. म्हणून सरतेशेवटी प.पू.श्री.दादांच्याच शब्दांत, श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणीं पसायदान मागतो.
खंड पडो नेदी चालविल्या नेमा ।
अगा मेघश्यामा, पांडुरंगा ॥१॥
संधिकालामाजी कृपेचे साधन ।
कीर्तन पूजन, निरंतरी ॥२॥
अतिथीसंतोष ब्राह्मणा आदर ।
सेवेसी तत्पर, संतांचिया ॥३॥
बांधव भगिनी, श्रीगुरु सेवका ।
वाढो एकमेका, प्रेमभाव ॥४॥
नामाचा विसर, नको क्षणभरी ।
अमृते पदरी, नित्यदान ॥५॥
खरेतर पू.सौ.ताई व पू.श्री.दादांना त्यांची स्तुती केलेली अजिबात आवडणार नाही, हे माहीत असूनही ही शब्द पुष्पांजली मी अर्पण करतोय. अहो, दोघांचेही एवढे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, पण एकातही त्यांची बोटभरसुद्धा वैयक्तिक माहिती नाही की फोटो नाहीत. त्यांनी जन्मभर आपल्या सद्गुरूंचाच उदोकार केलेला आहे आणि त्यातच त्यांना अपरंपार आनंद आहे. *"माझे असतेपण लोपो । नामरूप हारपो ।"* ही सद्गुरु श्री माउलींची श्रुती पू.सौ.ताई व पू.श्री.दादांचे ब्रीदवाक्यच आहे जणू. तरीही माझ्या मायबापांचे गुणगान करण्याचा माझा हक्क आहे आणि कर्तव्य देखील. शिवाय आजचा दिवसही मोठा भाग्याचा आहे. म्हणून मी धारिष्ट्य करून ही अनधिकार सेवा समर्पित करीत आहे. माउली म्हणतातच ना, बाळ बोबडे बोलले, वाकडे विचके चालले तरी त्याचा मायबापांना आनंदच होतो, त्याचे कौतुकच केले जाते. म्हणून त्याच आधारावर ही सेवा आपल्या श्रीचरणारविंदी विदित करतोय; देवा, गोड मानून घ्यावी व मज लेकराला, *"करीन तळहात साउली ।"* असाच वरप्रसाद द्यावा हीच आजच्या परमपावन पुण्यदिनी कळकळीची प्रार्थना !!
श्रीसद्गुरुनाथ महाराज की जय ।
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )