15 Dec 2017

गुरुवरा ओवाळू आरती

आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे कनिष्ठ बंधू व शिष्योत्तम, साक्षात् ब्रह्मदेवांचे अवतार सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांची समाधी तिथी. श्रीसंत तुकोबारायांच्या चौदा टाळक-यांपैकी त्यांचे एक शिष्य श्री संताजी महाराज जगनाडे-तेली यांचीही आज पुण्यतिथी. श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्व महान शक्तिपाताचार्य योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांची आज जयंती. खरोखरीच, आजची तिथी मोठी पुण्यपावनच आहे !
सद्गुरु श्री सोपानदेव महाराज हे श्री माउलींचे धाकटे बंधू व शिष्य. त्यांचा जन्म इ.स.१२७७ मध्ये कार्तिक पौर्णिमेला आळंदीत झाला. त्यांनी देखील गीतेवर 'सोपानदेवी' या नावाची टीका रचलेली आहे. त्यांचे काही अभंगही उपलब्ध आहेत. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांचे स्वभाववैशिष्ट्य श्री नामदेवराय सांगतात, "न ये पां एकांत सोपानाचा ॥" सगळ्यांमध्ये राहूनही आंतरिक एकांत साधणे व त्या स्थितीत सदैव राहणे हे श्री सोपानदेवांचे वैशिष्ट्य होते. श्रीसंत विसोबा खेचरांवर श्री माउलींच्या आज्ञेने सद्गुरु श्री सोपानदेवांनीच अनुहग्रहकृपा केली होती.
आजच्याच तिथीला त्यांनी सासवड येथे क-हामाईच्या काठी सोमेश्वरांच्या मंदिरालगत समाधी घेतली. त्यांच्या समाधिवर्णनाच्या अभंगांमध्ये श्री नामदेवराय म्हणतात, " निशिदिनी कीर्तन केले द्वादशी । वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष ॥३॥ भोगावती केले अवघ्यांनी स्नान । चालिले सोपान समाधीसी ॥ना.गा.११३२.४॥" श्री सोपानदेवांच्या स्नानासाठी प्रत्यक्ष श्रीपांडुरंगांनी सर्व तीर्थांना आवाहन केले. त्यावेळी त्रैलोक्यातील यच्चयावत् सर्व तीर्थे क-हेच्या काठावरील एका कुंडात प्रकटली व त्या पावन जलाने सोपानदेवांना स्वत: भगवंतांनी स्नान घातले. ते कुंड आजही सासवड येथे मंदिरासमोरच पाहायला मिळते. सद्गुरु श्री सोपानदेव महाराजांच्या श्रीचरणीं साष्टांग दंडवत.
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या थोर शिष्यांपैकी एक, देहूनजीकच्या सुदुंब्रे येथील तेली समाजातील श्री संताजी महाराज जगनाडे यांचीही आज पुण्यतिथी असते. संताजी महाराजांनी स्वहस्ते लिहिलेला श्री तुकोबारायांचा गाथा आजही पाहायला मिळतो. श्री तुकाराम महाराजांच्या चौदा निष्ठावंत टाळकरी मंडळींमध्ये संताजी महाराजही होते. श्री संताजी महाराजांची पालखी श्री माउलींच्या पालखी मागोमागच आषाढी वारीसाठी पंढरीला जाते. त्यांच्याही श्रीचरणीं सादर दंडवत.
श्रीदत्त संप्रदायातील महान विभूतिमत्व, प्रत्यक्ष भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच अपरस्वरूप, योगिराज सद्गुरु श्री.वामनरावजी गुळवणी महाराजांची आज १३१ वी जयंती. आजच्याच तिथीला, २३ डिसेंबर १८८६ रोजी, कोल्हापूर संस्थानातील राधानगरी तालुक्यातील कुडुत्री या छोट्याशा खेड्यात रात्री ८.१९ मिनिटांनी वे.शा.सं.दत्तंभट व सौ.उमाबाई या सात्त्विक दांपत्याच्या पोटी श्रीमहाराजांचा जन्म झाला. गुळवणी घराणे हे श्रीनृसिंहवाडीच्या प.प.श्री.नारायणस्वामींचे कृपांकित होते व त्यांच्याच कृपेने हा वंश चालला होता. शालेय शिक्षण कोल्हापूरला झाल्यानंतर श्रीमहाराजांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये प्रवेश घेऊन चित्रकलेत प्राविण्य मिळविले. आधी बार्शीला व त्यानंतर पुण्याच्या नू.म.वि. मध्ये त्यांनी चित्रकला शिक्षकाची नोकरी केली.
पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी, १९०९ साली पवनी मुक्कामी, अनंत चतुर्दशीच्या मंगल मुहूर्तावर श्रीगुळवणी महाराजांवर शक्तिपातपूर्वक मंत्रानुग्रह करून परंपरेचे उत्तराधिकारही प्रदान केले. श्रीमहाराजांनी आपले दैवी सद्गुण व विनम्र सेवा यांमुळे प.प.श्री.टेंब्येस्वामींची पूर्णकृपा संपादन केली. श्रीस्वामींनी त्यांना आपल्या स्वत:च्या हृदयात भगवान श्रीदत्तप्रभूंचे दर्शन करविले होते. श्रीमहाराज हे श्री. टेंब्येस्वामींचे पट्टशिष्यच होते. पुढे त्यांच्यावर बंगालमधील प.प.श्री. लोकनाथतीर्थ स्वामींचीही कृपा झाली.
श्रीमहाराज योगासनांमध्ये अत्यंत निष्णात होते. योगासनांचे व क्रेपची फुले बनविण्याचे ते वर्ग घेत असत. त्यांना क्रेप फुलांच्या स्पर्धा-प्रदर्शनांमध्ये भारतात व परदेशांतूनही अनेकवेळा प्रथम पुरस्कार, गोल्ड मेडल मिळालेले होते.
श्रीमहाराजांची राहणी अतिशय साधी होती. स्वच्छता, टापटीप व वक्तशीरपणा हे त्यांचे अंगभूत सद्गुण होते. त्यांनी आजन्म शास्त्र मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले. अपरंपार करुणा, ऋजुता, विनम्रता, प्रेमळपणा, प्रसिध्दिपराङ्मुखता, कमालीचे अमानित्व, शास्त्रपूत आचरण, कोणत्याही प्रसंगी न ढळणारी अद्भुत शांती, नैष्ठिक ब्रह्मचर्य, निस्पृहता, श्रीगुरुचरणी अात्यंतिक निष्ठा, विलक्षण योगसामर्थ्य, महायोग-शक्तिपात शास्त्रातील अलौकिक अधिकार इत्यादी शेकडो दैवी सद्गुणांचे ते साक्षात् भांडारच होते ! श्रीमहाराजांनी कधी प्रवचने केली नाहीत की पुस्तके लिहिली नाहीत. पण त्यांनी जगभरातील हजारो साधकांना आपल्या विलक्षण कृपेने परमार्थ मार्गावर अग्रेसर केले.
योगिराज श्री.गुळवणी महाराजांनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात अनेक अलौकिक कार्ये संपन्न केली. त्यांपैकी दोन फार महत्त्वपूर्ण कार्ये म्हणजे, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्रींच्या मंदिरासभोवतालचा गोलाकार देखणा सभामंडप बांधण्याचे व प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांचे समग्र वाङ्मय मोठ्या कष्टाने जमवून अचूक व शुद्ध स्वरूपात प्रकाशित करण्याचे महान कार्य होय. त्यांनी त्याकाळात प्रचंड भ्रमंती करून, जिथे जिथे थोरल्या महाराजांचे वास्तव्य झाले होते, तिथे समक्ष जाऊन त्यांचे वाङ्मय मिळवले व ते बारा खंडांमधून श्री. टेंब्येस्वामींच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून १९५१ ते १९५४ सालांदरम्यान प्रकाशित केले. हे त्यांचे श्रीदत्त सांप्रदायिकांवरचे कधीही न फिटणारे ऋण आहे.
प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांचे अपार स्नेहाचे अंतरंग संबंध होते. दोघेही एकमेकांचा अतीव प्रेमादर करीत असत. प.पू.काका श्रीमहाराजांना साक्षात् श्रीदत्तप्रभूच म्हणून वंदन करीत असत तर श्री.गुळवणी महाराज प.पू.काकांना ' एक थोर ब्रह्मनिष्ठ ' म्हणत असत. श्रीमहाराज फलटण येथे एकदा पू. काकांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी प.पू.काकांच्या घरासमोर, गळ्यात भरगच्च हार घातलेल्या व अत्यंत प्रसन्न भावमुद्रा असलेल्या या दोन संतश्रेष्ठांचा फोटो मुद्दाम काढण्यात आला होता. ९ जून १९७१ रोजी प.पू.काका पुण्यातील 'श्रीवासुदेव निवास ' या श्रीमहाराजांच्या आश्रमातही भेटीसाठी गेले होते. एरवी देखील भक्तगणांच्या मार्फत दोघांची नेहमीच निरोपा-निरोपी होत असे.
प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच असणा-या योगिराज सद्गुरु श्री गुळवणी महाराजांनी हजारो शिष्यांना शक्तिपात दीक्षा देऊन कृतार्थ केले. त्यांचे समग्र चरित्र अलौकिक गुरुभक्ती व शास्त्रनिष्ठेचा आदर्श असून परमार्थ साधकांसाठी निरंतर मार्गदर्शक आहे. सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांच्या चरित्रलीला वाचताना, त्यात जाणवणारे त्यांचे सर्वच दैवी सद्गुण आपल्याला आश्चर्यचकित करतात. पण त्यांची करुणा व ऋजुता हे विशेषत्वाने जाणवतात. श्री महाराज म्हणजे अमानित्वाचे व अदंभित्वाचे मूर्तिमंत स्वरूप होते. साक्षात् श्रीदत्तप्रभूच असूनही त्यांनी कधीही चुकूनसुद्धा कोणाला त्याची कल्पना येऊ दिली नाही. कायम आपले माहात्म्य झाकूनच ठेवले. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज त्यांना प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभू म्हणूनच वंदन करीत असत.
श्री महाराज भक्तवत्सल होते. आपल्या भक्तांचा अपार कळवळा होता त्यांना. २६ डिसेंबर १९६९ ते २६ एप्रिल १९७० या चार महिन्यांच्या काळात त्यांनी एक पुरश्चरण केले होते. त्याकाळात ते कोणालाही भेटणार नाहीत, अशी सूचना लावलेली होती आश्रमात. त्यांच्या एका भक्ताने त्यांना प्रेमळपणे विनवले की, " या काळात तुम्हांला कोणीच भेटणार नाही का?" त्यावर महाराज म्हणाले, " दोन जण भेटतील, जेवणाचे ताट सरकवायला येतील तेव्हा." त्यावर ते भक्त म्हणाले, " मग आम्हीच काय पाप केले आहे? तुम्हांला बघायला काय हरकत आहे? तुम्ही ठरावीक वेळी तुमच्या सवडीने खाली येऊन देवघरात बसत जा. ग्रीलच्या बाहेरून आम्ही दर्शन घेऊन जात जाऊ." श्री महाराजांनी त्यांचे म्हणणे लगेच मान्य केले. त्याकाळात ते रोज सकाळी साडेनऊ ते दहा या वेळात खाली येऊन बसत व भक्त त्यांचे दर्शन घेऊन जात. " ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभावीण प्रीती ॥" हे श्री गुळवणी महाराजांचे यथार्थ स्वरूपवर्णनच आहे.
पू.श्री.महाराज म्हणजे करुणेची मूर्तीच होते. त्यांना कधीच कोणाहीबद्दल आपला-परका असा भेद जाणवला नाही, सर्वांवर त्यांचे समान प्रेम होते. महाराजांचे एक श्री.श्रीनिवास आचार्य नावाचे शिष्य होते. त्यांचे एक मित्र श्री.रायकर म्हणून होते. त्यांना एकदा सरकारी नोटीस आली, त्यात १ एप्रिल पूर्वी रु.७६८/- भरा असे म्हटले होते. त्यांच्यापाशी एवढी रक्कम नव्हती, शिवाय घरी पाच मुले, बायको, वृद्ध वडील. ते आचार्यांना म्हणाले की, " आता काय करणार? चल, तुमच्या महाराजांना विचारूया. तेच काहीतरी मार्ग सांगतील. " ते दोघे महाराजांकडे आले व सर्व हकीकत सांगितली. श्री महाराज म्हणाले, पैसे आहेत की नाहीत? रायकर म्हणाले, नाहीत. महाराजांनी लगेच श्री.नारायण भालेरावांना हाक मारली व कपाटातील टिनाच्या डब्यातील पैसे रायकरांना द्यायला सांगितले. गंमत म्हणजे त्या डब्यात नेमके ७६८ रुपयेच निघाले. महाराज रायकरांना म्हणाले, " बायको-पोरांना नीट सांभाळा, काळजी करू नका." यच्चयावत् सर्व जीवांविषयीचा असा आप-पररहित कळवळा, अशी निखळ आत्मीयता, प्रेमभावना श्रीमहाराजांच्या अंतरात ठासून भरलेली होती. म्हणूनच ओळखीच्याही नसलेल्या रायकरांना एवढी मोठी रक्कम द्यायला त्यांनी किंचितही वेळ घालवला नाही की विचार केला नाही. जणू ते त्यांचे आत्मीयच आहेत, या भावनेने त्यांनी तत्काळ त्यांचे हित केले. सद्गुरु श्री माउली म्हणतात, वाहणारे पाणी जसा वाटेत आलेला खड्डा भरून मगच पुढे जाते, तसे हरप्रयत्नाने समोरच्याचे दु:ख दूर करूनच महात्मे पुढे जातात. अशी अलौकिक करुणा श्री.गुळवणी महाराजांच्या ठायी विलसत होती. याच प्रकारचे शेकडो अद्भुत कथा-प्रसंग श्री महाराजांच्या चरित्रात पाहायला मिळतात.
आजच्या या पावन दिनी योगिराज सद्गुरु श्री वामनरावजी गुळवणी महाराजांच्या श्रीचरणी अनंतानंत दंडवत प्रणाम !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

15 comments:

  1. साष्टांग नमस्कार 🙏🙏

    ReplyDelete
  2. श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणी अनंतकोटी साष्टांग प्रणिपात.

    ReplyDelete
  3. श्री श्री गुरवे नम:

    ReplyDelete
  4. Shree Gurudev Datta.. .. . Khup sunder lekh ahe 🙏🙏🙏

    ReplyDelete
  5. या सन्तत्रयीला साष्टांग नमस्कार!

    ReplyDelete
  6. या विभूतीत्रयीला शतशः दंडवत

    ReplyDelete
  7. गुरुदेव दत्त

    ReplyDelete
  8. अप्रतिम लेख!

    ReplyDelete
  9. खूप छान माहिती,सर्व संत सद्गुरू ना माझा साष्टांग नमस्कार.

    ReplyDelete
  10. संत सोपानदेव महाराज , संत जगनाडे महाराज व संत श्री . गुळवणी महाराज या संत त्रयीना त्रिवार दंडवत ! 🙏🙏🙏👌🧡🌹🌿

    ReplyDelete
  11. गुरुदेव दत्त रोहन जी

    ReplyDelete
  12. या विभूत त्रयीला साष्टांग दंडवत

    ReplyDelete
  13. अप्रतिम लेख

    ReplyDelete