12 Dec 2017

हाचि सुबोध गुरूंचा

आज मार्गशीर्ष कृष्ण दशमी, साक्षात् श्रीमारुतीरायांचे अवतार, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची १०४ वी पुण्यतिथी  !!
जयाचा जनी जन्म नामार्थ झाला ।
जयाने सदा वास नामात केला ।
जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ।।
असे ज्यांचे सार्थ वर्णन केले जाते, त्या प्रत्यक्ष नामावतार सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अवघे चरित्र अलौकिक आणि बोधप्रद आहे.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपापरंपरेतील येहेळगांवच्या सद्गुरु श्री तुकामाई यांनी श्री गोंदवलेकर महाराजांना कृपानुग्रह करून सनाथ केले. श्रीमहाराजांच्या ठायी सद्गुुरु श्री माउलींचा नाथसंप्रदाय व सद्गुरु श्री समर्थांचा रामदासी संप्रदाय यांचा सुरेख समन्वय झालेला होता.
पूर्वी महाराजांनी बालवयातच गुरुशोधार्थ संपूर्ण भारत देश पालथा घातला होता. त्या भ्रमंतीमध्ये त्यांना राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे दर्शन व सान्निध्य लाभले. श्री स्वामींनी देखील या लहानग्या गणूला अतीव ममतेने स्वत:च्या मांडीवर बसवून त्याचे लाड केले. दोन दिवस स्वत:बरोबर ठेवून घेतले व नंतर आशीर्वाद देऊन रवानगी केली. त्यानंतर महाराजांना त्याकाळातील, श्री रामकृष्ण परमहंस, श्री त्रैलंगस्वामी, श्री माणिकप्रभू, श्री देव मामलेदार इत्यादी अनेक थोर संतांची दर्शने झाली. नंतर सद्गुरु श्री तुकामाईंची भेट होऊन, अत्यंत खडतर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पूर्णकृपा लाभली. लहानग्या गणुबुवांचे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज झाले.
महाराजांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथेच असे. पण रामनामाच्या प्रसारासाठी त्यांचा संचार सर्व भारतभर होई. त्यांनी आपल्या हयातीत हजारो लोकांना नाम देऊन सन्मार्गाला लावले. समाधी पश्चात् आजही त्यांच्या कृपेचे अनुभव अक्षरश: लाखो लोक घेत आहेत.
त्यांचे चरित्र परमार्थ साधकांसाठी विशेष बोधप्रद आहे. " भक्ताची श्रीरामरायाच्या चरणीं अनन्य निष्ठा कशी असायला हवी? " याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे श्री महाराज ! 'रामच कर्ता' या भावनेच्या बळावर अचाट कार्य करून दाखवण्यातली अलौकिक निस्पृहता म्हणजे श्री महाराज ! गुरुचरणीं अनन्य शरणागती म्हणजे श्री महाराज ! नि:शंक निर्भय निरहंकार आणि समर्थ साधुजीवन म्हणजे श्री महाराज ! जनांचा अपरंपार कळवळा म्हणजे श्री महाराज ! त्यांच्या दिव्य चरित्रलीला वाचताना, प्रेमाचे भरते येऊन कधी आपले नेत्र पाझरू लागतात हे आपल्याला समजत देखील नाही. खरोखरीच फार विलक्षण विभूतिमत्व होते ते  !!
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे परमगुरु, पलूसचे श्री धोंडीबुवा महाराज यांचा व श्री गोंदवलेकर महाराजांचा स्नेह होता. प.पू.काकांनाही श्री महाराजांविषयी अतीव प्रेमादर होता. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नसरापूरच्या घरी श्री महाराज येत असत. पू.मामांचे आई-वडील, पू.दत्तोपंत व पू.पार्वतीदेवी यांना श्री महाराजांबद्दल अतीव प्रेमादर होता. महाराजही त्यांना फार मानत असत. पू.दत्तोपंत व श्री महाराज समोर आल्यावर परस्परांना दंडवत घालून दृढ प्रेमालिंगन देत आणि मगच त्याची चर्चा सुरू होई. श्री महाराज एकदा त्यांना म्हणाले होते, " कृपायोगाचे साधनच सर्वश्रेष्ठ आहे. ज्यांना ते देणारे सामर्थ्यवान सद्गुरु लाभले ते धन्य होत. मलाही श्री तुकामाईंकडून हेच साधन मिळाले. पण हे सर्वांनाच देता येत नाही, म्हणून मी त्यांच्याच आदेशानुसार सर्वांना नाम घ्यायला सांगतो ! "
श्रीमहाराजांची प्रवचनेही अत्यंत सोपी व काळजाला हात घालणारी आहेत. रामनामाची व हरिभक्तीची महती त्यांनी फारच सोप्या आणि चटकन् हृदयाला भिडेल अशा समर्पक भाषेत, अधिकारवाणीने सांगितलेली आहे. त्या प्रवचनांचे दररोज नियमितपणे वाचन करून आपला परमार्थ सुकर करणारे लक्षावधी भक्त जगभर आहेत.
आज त्यांच्या १०४ व्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या चरणीं सादर वंदन करूया; व त्यांनी सर्वात शेवटी केलेला बोध, त्यांचा शेवटचा अभंग वाचून, त्यावर चिंतन-मनन करून, त्यांच्या कृपासावलीत आपणही आपला परमार्थमार्ग आनंदाने आक्रमूया !
भजनाचा शेवट आला ।
एक वेळ राम बोला ॥१॥ 
आज पुण्य पर्वकाळ ।
पुन्हा नाही ऐसी वेळ ॥२॥
राम नाम वाचे बोला ।
आत्मसुखा माजी डोला ॥३॥
दीन दास सांगे निका ।
रामनाम स्वामी शिक्का ॥४॥
" श्रीसद्गुरु मुखातून आलेले व परंपरेने लाभलेले 'दिव्यनाम' हेच जणू 'स्वामी शिक्का' आहे. हा शिक्का ज्याच्या चित्तावर श्रीगुरु उमटवतील, त्याचाच परमार्थात सहज प्रवेश होतो. ही नामरूपी निकी म्हणजेच श्रेष्ठ, शुद्ध कृपा-मोहोर लाभल्यावर मगच साधक ख-या अर्थाने पुनीत होतो. त्या कृपाप्रसादामुळे व आपल्या श्रीगुरूंचा 'दीनदास' बनून  झालेल्या त्या दास्ययुक्त साधनेने मग त्याला आत्मसुखात अखंड डोलण्याचे सौभाग्य लाभते ! त्याचे अवघे जीवनच मग एक अद्भुत पुण्य पर्वकाळ बनून जाते. त्याच्या पावन संगतीने मग जगाचाही उद्धार होतो. " श्री महाराजांच्या या अंतिम बोधामृतातून जणू त्यांचे आत्मचरित्रच थोडक्यात प्रकट झालेले आहे !
या लेखासोबत आज श्री महाराजांच्या प्रतिमेऐवजी त्यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश देत आहे. आपली साधना लवकर पूर्णत्वाला जावी, असे ज्याला मनापासून वाटते, त्या प्रत्येक साधकाने श्री महाराजांचा हा बोध मनाच्या गाभा-या सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावा व वारंवार आठवावा इतका महत्त्वपूर्ण आहे. साधकाचे अवघे विश्वच अमृतमय करणारे हे बोधवचन, अनन्यगुरुभक्त असणा-या सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराजांचे हृद्गतच आहे जणू !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in)



0 comments:

Post a Comment