31 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १६

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग

४. अर्थप्राप्तीसाठी मंत्र

विस्तारः स्थावरस्थाणु: प्रमाणं बीजमव्ययम् ।
अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः ॥५९॥

विस्तारः - सकल भुवनांचा विस्तार ज्यामध्ये आहे असा
स्थावरस्थाणुः - स्वतः स्थिर असून पृथ्वी आदींना स्थैर्य देणारा
प्रमाणम् - ज्ञानरूप असल्याने स्वयंप्रमाणरूपी
बीजमव्ययम् - संसाराचे एकमेव अविनाशी कारण
अर्थः -  सुखस्वरूप असल्याने सर्वजण ज्याची प्रार्थना करतात, तो
अनर्थः - कृतकृत्य असल्याने प्रयोजनरहित
महाकोशः - अन्नमय इत्यादी महाकोशांनी झाकलेला
महाभोग: - आनंदरूप श्रेष्ठ भोजन घेणारा
महाधनः - ज्याचे भोगाचे साधनस्वरूप महान धन आहे, असा.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


30 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् -१५

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
३. सर्वरोगनाशाकरिता मंत्र
अमृतांशूद्भवो भानु: शशबिन्दु: सुरेश्वर: I
औषधं जगत: सेतु: सत्यधर्मपराक्रम: II४४II अमृतांशूद्भव: - चंद्र ज्याच्या पासून उत्पन्न झाला, तो
भानु: - प्रकाशमान
शशबिन्दु: - चंद्राप्रमाणे प्राणिमात्रांचे पोषण करणारा
सुरेश्वर: - देवाधिदेव
औषधं: - संसाररोगावरचे औषध
जगत: सेतु: - भवसागर पार करण्याकरता सेतुरूप
सत्यधर्मपराक्रम: - धर्म आदी गुण व ज्याचा पराक्रम सत्य आहे, तो आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून दररोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

29 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १४


श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
२. कार्यसिद्धी होण्याकरिता मंत्र*
भूतभव्यभवन्नाथ: पवन: पावनोऽनल: I*
कामहा कामकृत्कान्त: काम: कामप्रद: प्रभु: II४५II*
भूतभव्यभवन्नाथ:* - त्रैकालिक सर्व प्राण्यांचा स्वामी
पवन: - वायुरूप
पावन: - चालक
अनल: - अनंत
कामहा - भक्तांच्या विषयवासना नष्ट करणारा
कामकृत् - भक्तांच्या कामना पूर्ण करणारा
कान्त: - अत्यंत रूपवान
काम: - पुरुषार्थाची आकांक्षा करणाऱ्यांकडून इच्छिलेला
कामप्रद: - भक्तांच्या कामना सर्वस्वी पूर्ण करणारा
प्रभु: - सर्वोत्कृष्ट.
आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


28 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १३

'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र' हा भक्तश्रेष्ठ श्री भीष्माचार्यांनी रचलेला अत्यंत अद्भुत असा एक मालामंत्र आहे. शिवाय यातील प्रत्येक श्लोक हाही स्वतंत्र मंत्र आहे. या विविध मंत्रांचे असंख्य अनुभूत प्रयोगही जुन्या जाणत्या महात्म्यांनी सांगून ठेवलेले आहेत. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या 'श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य' ग्रंथामध्ये त्यांच्या श्रीगुरुपरंपरेने आलेले अतिशय प्रभावी असे यातील एकवीस मंत्रांचे प्रयोग दिलेले आहेत. हे सर्व स्वानुभूत सिद्ध मंत्रप्रयोग आहेत. आजवर इतरत्र कुठेच यांचा उल्लेखही आलेला नाही. कोणीही श्रद्धेने यांचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतो. आजपासून आपण त्यातील काही मंत्रप्रयोग पाहू या.
१. इच्छापूर्ती होण्याकरिता मंत्र
असंख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्ट: शिष्टकृच्छुचि: I
सिद्धार्थ: सिद्धसंकल्प: सिद्धिद: सिद्धिसाधन: II४०II
अर्थ :-
असंख्येय: - ज्याच्यात नाम, रूप इत्यादी भेद नाहीत, असा;
अप्रमेयात्मा - ज्याच्या स्वरूपाचे मोजमाप होत नाही, असा;
विशिष्ट: - सर्वोत्कृष्ट;
शिष्टकृत् - शासन करणारा;
शुचि: - परम पवित्र;
सिद्धार्थ: - ज्याचे सर्व अर्थ सिद्ध झाले आहेत, असा
सिद्धसंकल्प: - सत्यसंकल्प असलेला;
सिद्धिदः - कर्माचे योग्य फल देणारा;
सिद्धिसाधन: - सिद्धींचा दाता.
या मंत्राचा आपली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईपर्यंत, शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


27 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १२


श्रीभगवंतांना त्यांचे भक्त अत्यंत प्रिय असतात. म्हणून ते त्यांच्या भक्तांना काही कमी पडू देत नाहीत. त्यांचा योगक्षेम तेच चालवतात. त्यांच्या भक्तांनी त्यांचे स्मरण करण्याचाच अवकाश; ते धावून त्यांचे सर्व काही करतात. भक्तांनी त्यांचे नाव घ्यायला जिभेला कष्ट द्यावेत किंवा त्यांना पाचारण्यासाठी तेवढा वेळ घालवावा एवढाही त्यांना धीर नसतो. त्यांचे नुसते स्मरण केले तरी ते भक्ताला त्याचे इच्छित द्यायला समर्थ असतात.
श्रीदत्त संप्रदायामध्ये भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंनाही 'स्मर्तृगामी' म्हणतात. सद्गुरुतत्त्व हेच स्मर्तृगामी असते. त्यांचे स्मरण झाल्याबरोबर ते त्याच क्षणी येतात, त्यासाठी त्यांना आळवत बसावे लागत नाही. त्यांना 'स्मरणमात्रसंतुष्टाय ।' म्हणजे स्मरणाने संतुष्ट होणारे आहेत, असेच म्हटले जाते. याचे कारण एकच, त्यांचा कनवाळुपणा, त्यांचा कृपाळुपणा. निष्कपट अशी लाभावीण प्रीती करणेच केवळ त्यांना माहीत आहे.
व्यवहारामध्ये मात्र लाभाशिवाय प्रीती होत नसते. अगदी सख्खी आई जरी असली तरी ती आपल्या मुलावर लाभाशिवाय प्रेम करीत नाही. हा आपल्याला पुढे सांभाळेल, याची आशा असतेच तिला. जेव्हा तिला कळते की, सुनेच्या नादाने मुलगा आपल्याकडे दुर्लक्ष करतो आहे, तेव्हा तिचे ते प्रेम नकळत कमी होतेच. जिथे आईच्या प्रेमाची ही कथा, तिथे बाकीच्या नात्यांचा तर विचारच करायला नको. म्हणूनच, व्यवहारात प्रेम कुठपर्यंत? तर, लाभ असेपर्यंतच ! लाभाशिवाय प्रेम व्यवहारात दिसत नाही. पण सद्गुरु आणि भगवंत मात्र वेगळे असतात, कारण ते कुठल्याही लाभाशिवाय, स्वार्थाशिवायच सर्वांवर प्रेम करीत असतात !
एखाद्या भक्ताने, "धावा, देवा, सद्गुरुराया ! तुमच्याशिवाय मला कोणी त्राता आहे?" असे ख-या कळवळ्याने म्हणायचाच अवकाश; की ते धावत येतात आणि त्या भक्ताला सर्वप्रकारे सांभाळतात. पण त्यासाठी तो भक्तही तेवढा अनन्यशरणागत असायला हवा.
अशी शरणागती येण्यासाठी आपणच प्रयत्नशील राहावे लागते. त्यासाठी श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र नक्कीच लाभदायक ठरणारे आहे. या स्तोत्राच्या नित्यपठणाने श्रीभगवंतांविषयी अशी अनन्यप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होते. या स्तोत्राच्या उपासनेेने त्यांचे प्रेम प्राप्त होते; जे अत्यंत दुर्मिळ मानले गेले आहे. हे श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र सिद्ध झाले असता, केवळ स्मरणानेही ते भक्ताला जन्मबंधनातून, संसारबंधनातून सोडवते. सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्त करते.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

26 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ११

दिव्य अशा श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य आजवर असंख्य संत-महात्म्यांनी कथन केलेले आहे. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी आपल्या पुस्तकात श्रीसंत तुकाराम महाराजांच्या चरित्रातील एक सुंदर प्रसंग कथन केला आहे. ही कथा फारशी प्रचलित नसल्याने नवीनच वाटेल. आज या कथेद्वारे आपण श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य जाणून घेऊ या.
श्रीसंत तुकाराम महाराजांच्या चरित्रात एक बहारीची कथा आलेली आहे. ते नेहमी म्हणत की, “श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणजे भवरोगाचा नाश करण्याचे शस्त्र आहे; आणि कलीवर मात करण्यासाठीच आम्हांला श्रीभगवंतांनी ते दिलेले आहे !”
श्री तुकाराम महाराजांची ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’ वर अत्यंत प्रीती होती. ज्यावेळी त्यांच्या लेकीचे लग्न ठरले, त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. म्हणून त्यांनी नवऱ्या मुलाला सांगितले की; “मी तुम्हांला लौकिक असा हुंडा काही देऊ शकणार नाही. पण स्वेच्छेने, आनंदाने जो काही हुंडा देईन त्याने तुमचे जसे कल्याण होईल तसे जगात दुसरे कोणीही करू शकणार नाही. हे मान्य का ?” त्यावर नवरदेव म्हणाला; “ठीक आहे, मान्य आहे !”
श्रीमहाराजांनी मग लग्न लागल्यानंतर त्याच्या हातात स्वहस्ताक्षरातील ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’ची पोथी दिली. तो ‘हुंडा’ जावयाच्या हाती देताना ते म्हणाले; “हा घ्या हुंडा. याचे जर नियमाने पारायण केलेत, तर तुमचे कोटकल्याण होईल !” आणि त्यांच्या जावयानेही पुढे खरेच ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’ची पारायणे करून स्वतःचे कल्याण साधून घेतले.
पू.दादांनी सांगितलेली ही मार्मिक कथा नक्कीच विचार करण्यासारखी आहे. आपल्याकडेही अधिक महिन्यात काही ना काही वाण देण्याची प्रथा आहे. अनारसे, बत्तासे अशा नाशिवंत पदार्थांचे वाण देण्यापेक्षा, देणा-याचे व घेणा-याचेही कोटकल्याण करणारे असे विष्णुसहस्रनामासारखेच अलौकिक वाण आपणही दिले-घेतले तर? आपल्या व आपल्या संपर्कातील सर्वांच्या शाश्वत कल्याणाचाच आपण विचार करायला हवा आणि सतत त्यासाठीच मन:पूर्वक प्रयत्नशील राहायला हवे ! म्हणजे मग मोठ्या भाग्याने लाभलेल्या या मनुष्यजन्माचे सार्थक झाल्यासारखे ठरेल.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


25 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १०


श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्राची किती आवर्तने झाली असतील याची गणनाच आपण करू शकणार नाही. किंबहुना एवढी आवर्तने झालीत म्हणूनच हे स्तोत्र असे अलौकिक प्रभावी ठरलेले आहे.
आजवरच्या असंख्य महात्म्यांनी या स्तोत्राची स्वत: अनुभूती घेऊन लक्षावधी भक्तांना याची उपासना दिलेली आहे. अनेक संतांच्या चरित्रात या स्तोत्राशी संबंधित अद्भुत हकिकती वाचायला मिळतात. पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी त्यांच्या 'श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य' या पुस्तकात असे भरपूर प्रसंग कथन केले आहेत. त्यातील काही आपण मुद्दाम पाहूया.
शिर्डीत असताना एक रामदासी बुवा श्रीसंत साईबाबांच्या समोर 'अध्यात्म रामायण’ आणि ‘श्रीविष्णुसहस्रनाम’ यांची पारायणे करीत असे. एके दिवशी आपल्या पोटदुखीसाठी बाजारातून सोनामुखी आणून देण्यास बाबांनी त्याला सांगितले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो रामदासी आपल्या पोथ्या गुंडाळून ठेवून बाजारात गेला असता, बाबांनी त्याच्या दप्तरातील ‘विष्णुसहस्रनामा’ची पोथी काढून घेतली आणि ती परमभक्त शामाच्या हातात देऊन बाबा त्याला म्हणाले की, “एकदा माझे प्राण कासावीस झाले. त्या बिकट प्रसंगी मी हे पुस्तक माझ्या छातीवर घट्ट धरून त्याचे पारायण केले; आणि मला अलभ्य लाभ झाला; प्रत्यक्ष श्रीभगवंतांचे दर्शन झाले ! म्हणून तूही रोज हे वाचीत जा. किमान एक नाम वाचण्याचा प्रयत्न केलास तरी चालेल !” या प्रसंगावरून, श्री साईबाबांसारख्या अवतारी सत्पुरुषांचीही केवढी गाढ श्रद्धा या स्तोत्रावर होती, हे कळून येते.
श्रीसंत दासगणू महाराजांच्या चरित्रातही ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’च्या प्रभावाने त्यांच्यावरील करणी प्रयोग असफल झाल्याची कथा आली आहे. प.प.श्री.टेंब्ये स्वामी महाराजांनीही या स्तोत्राची उपासना सांगून अनेकांना दुःखमुक्त, बाधामुक्त केल्याचे दाखले त्यांच्या चरित्रात आहेत.
योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराज देखील त्यांचा या स्तोत्राच्या संबंधातला एक सुंदर प्रसंग नेहमी सांगत असत, श्री.मानवतकर महाराजांच्या घरी घडलेला. तो प्रसंग मोठा असल्याने पू.दादांच्या पुस्तकातून मुळातूनच वाचावा. त्याच्या शेवटी पू.श्री.गुळवणी महाराजांनी या स्तोत्राचे सांगितलेले माहात्म्य मात्र येथे आवर्जून देत आहे. श्री महाराज म्हणत, "श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या श्रवण-पठण-चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटांतून तरून जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो. या स्तोत्राच्या शब्दाशब्दांंतून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे !"
योगिराज श्री.गुळवणी महाराज आणि योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराज हे थोर गुरु-शिष्य नित्यनेमाने या स्तोत्राचे पठण करीत असत आणि आपल्या शिष्यांनाही आवर्जून करायला सांगत असत. म्हणूनच या अधिक महिन्याच्या निमित्ताने आता आपण सर्वांनी न चुकता दररोज हे स्तोत्र म्हणायचा किंवा ऐकायचा तरी नियम करू या आणि श्रीभगवंतांच्या दिव्य कृपेची साक्षात् अनुभूती घेऊ या !!
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

24 May 2018

ते त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पांडुसुता


आज गंगा दशहरा !
भगवती श्रीगंगेच्या अवतरणाचा दिवस. आजच्याच पावन दिनी हस्त नक्षत्र, व्यतिपात योग, मंगळवार अशा  योगावर माध्यान्ही भगवती श्रीगंगेचे पृथ्वीतलावर अवतरण झाले होते. म्हणून ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून आज दशमी पर्यंत "गंगा दशहरा" महोत्सव साजरा करून, आजच्या दिवशी गंगास्नान करून गंगापूजन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. गंगा दशहराच्या दहा दिवसांमध्ये गंगेचे स्नान, स्मरण, पूजन, वंदन आणि स्तुती केल्याने; चोरी, हिंसा व परदारागमन ही तीन कायिक; कठोर बोलणे, खोटे बोलणे, चहाड्या करणे व असंबद्ध बडबडणे ही चार वाचिक; आणि दुस-याच्या धनाची अभिलाषा बाळगणे, दुस-याचे अनिष्ट चिंतणे व खोटा अभिनिवेश धरणे ही तीन मानसिक मिळून एकूण दहा प्रकारांची सर्व पापे नष्ट होतात.म्हणूनच श्रीगंगेला 'दश-हरा' अर्थात् दहा गोष्टी (पापे) हरण करणारी, असे म्हणतात. तसेच या ज्येष्ठ शुद्ध दशमीलाही त्यामुळे 'दशहरा'च म्हणतात.
भगवती श्रीगंगेच्या स्नान, दर्शन, स्मरण, वंदन, पूजन, तीर्थपान आणि स्तवन या सात प्रकारच्या उपासनेने सुख-समाधान तर लाभतेच; पण दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. यास्तव भगवान श्री माउली म्हणतात,
जोडे अमृताची सुरसरी ।
तैं प्राणांतें अमर करी ।
स्नाने पाप ताप वारी ।
गोडीही दे ॥ज्ञाने.१७.१५.२१९ ॥

गंगेच्या सेवेने हरिभक्तीची खरी गोडी, आवडही निर्माण होते, असा या ओवीत श्री माउलींचा गर्भित अभिप्राय आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे.
कविवर्य जगन्नाथ पंडितांची 'गंगालहरी' आणि आद्य शंकराचार्यांची दोन गंगास्तोत्रे फार सुंदर आणि सुप्रसिद्ध आहेत. या दशहरा महोत्सवात त्यांचे पठण करण्याची पूर्वापार पद्धत आहे. काही ठिकाणी रोज वाढत्या क्रमाने गंगास्तोत्राची आवर्तने करण्याचीही पद्धत आहे. आज मुद्दाम पठण करण्यासाठी भगवान श्री शंकराचार्यांचे एक गंगास्तोत्र लेखाच्या शेवटी दिलेले आहे.
भगवती गंगा ही अत्यंत परोपकारी आहे. भगवान माउली, "गंगा काजेवीण चाले" अर्थात् ती पूर्णपणे नि:स्वार्थपणे वाहते, असे म्हणतात. तिच्यात स्नान करणा-यांचे पाप-ताप ती नष्ट करते, पूजन करणा-यांना पुण्य प्रदान करते आणि समाधान देते. या तिच्या उपकारांमागे तिचा कोणताच स्वार्थ नाही की अन्य उद्देश नाही. म्हणूनच गंगेला आपण पूजनीय माता, देवता म्हणतो, गंगामैया म्हणतो. मातेसारखे तिला फक्त कल्याणच करणे माहीत आहे. केवळ स्नान, पूजनच नाही, तर तिचे नुसते स्मरण केले तरीही तेच फळ लाभते. यासाठीच आपल्याकडे अंघोळीचा पहिला तांब्या अंगावर घेतला की "हर गंगे भागीरथी" असे म्हणायला लहानपणापासूनच शिकवले जात असे. आजच्या पिढीलाही हे शिकवायलाच पाहिजे.
गंगा भारतीयांच्या मनी-मानसी अशी स्थिरावलेली आहे, आपले अंगांग व्यापून राहिलेली आहे. त्यामुळे आपल्या साध्या साध्या उपमांमध्येही गंगेचा संदर्भ येतोच. "झाले गेले गंगेला मिळाले" हे एक उदाहरण. गंगेला मिळाले म्हणजे साजरे झाले किंवा सार्थक झाले, वाया नाही गेले; अशी आपली त्यामागची भावना असते.
या परमपावनी पुण्यसरितेची स्तुती करताना भगवान श्री माउली म्हणतात,
कां फेडीत पाप ताप ।
पोखित तीरींचे पादप ।
समुद्रा जाय आप ।
गंगेचें जैसें ॥ज्ञाने.१६.३.१९९॥

लोकांचे पाप-ताप फेडीत, तीरावरच्या वृक्षांचे पोषण करीत गंगेचे पाणी समुद्राला जाऊन मिळते." म्हणूनच 'जगाच्या कल्याणा भगवंतांची गंगा विभूती', असे आपण आदराने, प्रेमाने म्हणून गंगामैयाच्या चरणीं नतमस्तक होऊया !!
भगवान महाविष्णूंनी बळीराजाच्या उद्धारासाठी श्रीवामन अवतार धारण केला. त्यावेळी बळीच्या यज्ञशाळेत प्रकट होताना त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने ब्रह्मांडाचे कवच भेदले गेले आणि ब्रह्मांडाच्या बाहेरची जलधारा त्यांच्या चरणांना स्नान घालून आत आली. त्यांच्या चरणांवर लावलेल्या केशरामुळे तिचा रंग लाल झाला. हीच ती त्रिलोकपावनी भगवती गंगा होय. त्यामुळे तिला 'भगवत्पदी' किंवा 'विष्णुपदी' देखील म्हणतात. या धारेचा नुसता स्पर्श जरी झाला तरी संसारातील सर्व पापे नष्ट होतात, अशी शास्त्रांची मान्यता आहे.
भगवती गंगा ही स्वर्गलोक, मृत्युलोक व पाताळलोक अशा तिन्ही लोकांमधून प्रवास करते म्हणून तिला 'त्रिपथगामिनी' म्हणतात. राजा भगीरथाने शापाने मृत झालेल्या आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी प्रचंड तपश्चर्या करून भगवान श्रीशिवांना प्रसन्न करून घेऊन गंगा पृथ्वीतलावर आणली. त्यामुळे तिला 'भागीरथी' असेही म्हणतात. पुढे एकदा जन्हू ऋषींचा यज्ञ गंगाप्रवाहात सापडला. त्यामुळे विघ्न होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या तपोबलाने हा गंगाप्रवाह संपूर्ण गिळून टाकला. नंतर त्यांची मांडी फाडून ती पुन्हा प्रकट झाली. तेव्हापासून जन्हूंची कन्या म्हणून तिचे नाव 'जान्हवी' असे पडले.थोर भगवद्भक्त भीष्माचार्य हे श्रीगंगेचेच पुत्र होत.
या भगवती गंगेच्या पावन जलाला, भक्तश्रेष्ठ ध्रुव, सप्तर्षी, सनकादिक महात्मे, 'तपश्चर्येची आत्यंतिक फलश्रुती' म्हणून मस्तकी धारण करतात. ही गंगानदी स्वर्गलोकातून मग हिमालयावर उतरून भारतवर्षाला पावन करीत समुद्राला जाऊन मिळते. सर्वश्रेष्ठ तपोनिधी भगवान शिवशंकर देखील, आपल्या आराध्यांचे, भगवान श्रीविष्णूंचे चरणोदक म्हणून या गंगामातेला नित्य आपल्या मस्तकावर धारण करतात. यासाठीच भगवान श्री माउली आदिनाथ भगवान शिवांचा गौरव करताना म्हणतात की,
करितां तापसांची कडसणी ।
कवण जवळां ठेविजे शूळपाणि ।
तोही अभिमान सांडूनि पायवणी ।
माथां वाहे ॥ज्ञाने.९.२५.३७२॥

तपश्चर्या म्हणावी तर शिवशंकरांच्या तोडीचा दुसरा कोणी नाही जगात, पण तेही अतीव प्रेमादराने आपल्या देवाचे चरणतीर्थ म्हणून गंगामैयाला मस्तकी धारण करतात. आपल्याकडे प्रत्येक जलस्रोताला गंगाच म्हणण्याचा प्रघात आहे.  आम्हां भारतीयांच्या हृदयी गंगेचे जे अनन्यसाधारण स्थान जन्मजात दृढ झालेले आहे, त्याचेच हे द्योतक आहे. आयुर्वेदात अंतरिक्षजलाला गंगाजलच म्हटले जाते. आम्हां भारतीयांसाठी गंगामैया ही केवळ नदी नाही; ती आमची पूजनीय देवता, आमची जीवनरेखा आहे ! तिच्या नुसत्या सप्रेम स्मरणानेही आमची सर्व पापे नष्ट होतात अशी आमची अढळ श्रद्धा आहे. म्हणूनच मृत्युसमयी तिच्या तीर्थाचा एक थेंब तरी पोटात जावा यासाठी आम्ही भारतीय धडपडतो.
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचेही गंगामैयावर नितांत प्रेम आहे. म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी गंगेसंबंधी अतिशय सुंदर उपमा दिलेल्या आहेत. आज आपण माउलींच्या काही निवडक मनोहर उपमांच्या माध्यमातून या लेखाद्वारे, भगवती श्रीगंगेची 'शब्दपूजा' बांधून, त्या हरिपदपाद्य गंगातीर्थाच्या स्मरणाने पुण्यपावन होत आहोत.
भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंनी गीतेच्या दहाव्या अध्यायात आपल्या पंच्चाहत्तर विभूती सांगितलेल्या आहेत. त्यात ते, सर्व वाहणा-या ओघांमध्ये गंगा ही माझी विभूती आहे; असे म्हणतात. भगवान श्री माउली त्यावर भाष्य करताना म्हणतात,
पैं समस्तांही वोघां - ।
मध्यें जे भगीरथें आणिली गंगा ।
जन्हूनें गिळिली मग जंघा - ।
फाडूनि दिधली ॥ज्ञाने.१०.३१.२५६॥
ते त्रिभुवनैकसरिता ।
जान्हवी मी पांडुसुता ।
जळप्रवाहा समस्तां - ।
माझारीं जाणें ॥ २५७ ॥

समस्त जळप्रवाहांमध्ये, राजा भगीरथाने मोठी तपश्चर्या करून आणलेली आणि राजा जन्हूने गिळून आपली मांडी फाडून बाहेर काढलेली, स्वर्ग-मृत्यू-पाताळ अशा तिन्ही लोकांना पावन करणारी भगवती गंगा ही माझीच विभूती जाण, असे श्रीभगवंत अर्जुनाला सांगतात. देवी भागवतामध्ये मूलप्रकृती भगवती श्रीराधाजींच्या दहा विशेष विभूती सांगितलेल्या आहेत, त्यांमध्ये भगवती श्रीगंगेचा समावेश आहे.
आजच्या दशमीला होणारे "गंगावतरण" ही नुसती कथा नाही. त्यात गूढ योगार्थही आहे. त्यावर भाष्य करताना प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'साधनजिज्ञासा' या प्रश्नोत्तरांच्या अद्भुत ग्रंथात म्हणतात, "गंगेच्या अवतरणाचे जे हे प्रतीक आहे ते सद्गुरुतत्त्वाचेच कार्य-रूपक आहे.श्रीभगवंतांच्या चरणांतून निघालेली त्यांची कृपाशक्तिरूपी गंगा हीच ते शिवरूप सद्गुरुतत्त्व धारण करते; आणि तेथून मग ती लोकांच्या पापक्षालनासाठी प्रवाहित होते.
भगवान शिवांनी त्या मूळ कृपाशक्तीचा ओघ लीलया धारण केलेला असतो; व त्यासाठी ते सद्गुरूच केवळ समर्थ असतात. श्रीभगवंतांच्या चरणांपासून ती शक्ती भगवान शिवांपाशी येते. ती त्यांच्या जटेत जाऊन नंतर त्यांच्या हृदयात प्रकटते; आणि त्यांच्या हृदयातून निघून ती सर्व प्राणिमात्रांचे कल्याण करते. गंगावतरणाचे हे रूपक श्रीसद्गुरुतत्त्वाचे रहस्य आहे व हीच शक्तिपात दीक्षेचीही एक निगूढ पद्धत देखील आहे !"
आज रवि-हस्त अमृतसिद्धीयोग, व्यतिपात योग व दशमी या गंगा दशह-याच्या  पुण्यपावन पर्वावर श्रीगंगामैयाच्या पुण्यद स्मरणात तिच्या चरणीं नतमस्तक होऊया आणि मनानेच तिचे स्नान करूया. भगवान श्री शंकराचार्य आपल्या गंगास्तोत्रात प्रार्थना करतात की, "हे माते गंगे, हरिहराद्वैतात्मिका शाश्वत भक्ती आमच्या हृदयात, तुझ्या कृपेने प्रकट होऊन स्थिर होवो व तुझ्या तीरावरच आनंदाने हरिस्मरणात शेवटचा श्वास घेऊन माझा देहपात होवो !" हीच प्रार्थना आपणही मनोभावे व्यक्त करून, 'जयगंगे जय मातर्गंगे जय जय जान्हवी करुणापाङ्गे ।' असा तिचा नामगजर करून दहा प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळवून पावन होऊया !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

*******************
ll श्रीगंगास्तोत्रम् ll
देवि सुरेश्वरि भगवति गंगे
त्रिभुवनतारिणि तरलतरंगे ।
शंकरमौलिविहारिणि विमले
मम मतिरास्तां तव पदकमले॥१॥
जय गंगे जय मातर्गंगे ।
जय जय जान्हवी करुणापाङ्गे ॥ध्रु.॥
भागीरथि सुखदायिनि मात
स्तव जलमहिमा निगमे ख्यात: ।
नाहं जाने तव महिमानं
पाहि कृपामयि मामज्ञानम् ॥२॥
हरिपदपाद्यतरंगिणि गंगे हिमविधुमुक्ताधवलतरंगे ।
दूरीकुरु मम दुष्कृतिभारं
कुरु कृपया भवसागरपारम् ॥३॥
तव जलममलं येन निपीतं
परमपदं खलु तेन गृहीतम् ।
मातर्गंगे त्वयि यो भक्त:
किल तं द्रष्टुं न यम: शक्त: ॥४॥
पतितोद्धारिणि जान्हवि गंगे
खण्डितगिरिवरमण्डितभंगे ।
भीष्मजननि हे मुनिवरकन्ये
पतितनिवारिणि त्रिभुवनधन्ये ॥५॥
कल्पलतामिव फलदां लोके
प्रणमति यस्त्वां न पतति शोके ।
पारावारविहारिणि गंगे
विमुखयुवतिकृततरलापांगे ।।६।।
तव चेन्मात: स्रोत: स्नात:
पुनरपि जठरे सोsपि न जात: ।
नरकनिवारिणि जान्हवि गंगे
कलुषविनाशिनि महिमोत्तुंगे ॥७॥
पुनरसदंगे पुण्यतरंगे
जय जय जान्हवि करुणापाङ्गे ।
इन्द्रमुकुट मणिराजितचरणे
सुखदे शुभदे भृत्यशरण्ये ॥८॥
रोगं शोकं तापं पापं
हर मे भगवति कुमतिकलापम् ।
त्रिभुवनसारे वसुधाहारे
त्वमसि गतिर्मम खलु संसारे ॥९॥
अलकानन्दे परमानन्दे
कुरु करुणामयि कातरवन्द्ये ।
तव तटनिकटे यस्य निवास:
खलु वैकुण्ठे तस्य निवास: ॥१०॥
वरमिह: नीरे कमठो मीन:
कि वा तीरे शरट: क्षीण: ।
अथवा श्वपचो मलिनो दीन
स्तव न हि दूरे नृपतिकुलीन: ॥११॥
भो भुवनेश्वरि पुण्ये धन्ये
देवि द्रवमयि मुनिवरकन्ये ।
गंगास्तवमिमममलं नित्यं
पठति नरो य: स जयति सत्यम् ॥१२॥
येषां हृदये गंगाभक्ति
स्तेषां भवति सदा सुख मुक्ति:।
मधुराकान्तापञ्झटिकाभि:
परमानन्द कलितललिताभि: ॥१३॥
गंगास्तोत्रमिदं भवसारं
वांछितफलदं विमलं सारम् ।
शंकरसेवक शंकररचितं
पठति सुखी स्तव इति च समाप्त: ॥१४॥
जय गंगे जय मातर्गंगे।
जय जय जान्हवी करुणापाङ्गे ।।
॥ इति श्रीमदाद्य शंकराचार्य विरचितं श्रीगंगास्तोत्रम् ॥

(अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
या विषयी पूर्वी लिहिलेला एक लेख खालील लिंकवर आहे, तोही आवर्जून वाचावा ही विनंती ! 
https://rohanupalekar.blogspot.com/2016/06/blog-post_40.html?m=1

अधिकस्य अधिकं फलम् - ९


विष्णुतत्त्व हे जगताचे परिपालन करणारे तत्त्व आहे. म्हणूनच या सहस्रनाम स्तोत्रातील अधिकांश नामांमध्ये श्रीभगवंतांच्या संरक्षणाची, छत्राची भावना सामावलेली आहे. त्यामुळे या स्तोत्राच्या पाठाने आपण त्यांच्या छत्राखाली आहोत, त्यांच्या आधिपत्याखाली आहोत असा सुखद अनुभव साधकाला येतो.
हे मोठे विलक्षण स्तोत्र आहे. जो साधक मंत्रदेवता श्रीभगवंतांना शरण जाऊन या श्रीविष्णुसहस्रनाम मंत्राचे आवर्तन करतो, नित्यनेमाने वाचन करतो, अनुष्ठान करतो त्याचे भगवंत पुत्रवत् पालन करतात. त्याची त्यांना अत्यंत काळजी असते.
या स्तोत्राचे असे अद्भुत सामर्थ्य आहे की, कुठल्याही लौकिक कामासाठी का होईना; कुठल्याही निमित्ताने का होईना; या स्तोत्राचा मनःपूर्वक जप केला असता, त्या कार्याची पूर्तता झाल्याशिवाय राहात नाही. पारमार्थिकांसाठी तर हे स्तोत्र सर्वोत्कृष्ट फलदाते आहे. श्रीभगवंतांना लौकिकातले काही न मागता, केवळ त्यांची कृपा व्हावी, कृपादृष्टी असावी या भावनेने जर एखाद्याने याचा पाठ केला, तर त्याचा परमार्थ सर्वांगांनी सुफलित होतो.
एरव्ही आपण आपल्या परीने परमार्थ करतच असतो. त्यात आपल्याच प्रारब्धाने अनंत अडचणीही येत असतात. आपले प्रारब्ध परमार्थाला कधी आडवे येईल हे सांगता येत नसते. कधी आपल्याच रडणाऱ्या लहान मुलाच्या रूपाने ते आडवे येते; तर कधी दूधवाल्याच्या रूपाने; कधी निद्रेच्या, आळसाच्या रूपाने आणि कधी पाहुण्यांच्या रूपाने ! पण या प्रकारच्या सर्व प्रारब्धदोषांवर मात करण्याचे अप्रतिहत सामर्थ्य ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’त आहे.
योगसाधनेमध्ये शास्त्रांनी अंतरायही सांगितलेले असतात. ज्यायोगे आपण श्रीभगवंतांशी जोडले जातो ती साधना, तो योग. त्यामध्ये अंतराय म्हणजे अडचणी ह्या प्रारब्धामुळेच येत असतात. शास्त्रांनी त्याकरिता मार्मिक असा निर्णय दिला आहे की, “या सगळ्या अडचणी दूर होण्याचे एकच साधन आहे; सद्गुरुस्मरण करा, त्यांना शरण जा !” ‘सद्गुरुस्मरणा’सारखेच माहात्म्य ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’चेही आहे. म्हणूनच परमार्थामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणींवरचा रामबाण उपाय म्हणजे ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र’ !
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

23 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ८

‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’च्या आवर्तनाने ‘नामस्मरण’ तर घडतेच; शिवाय ते नाममंत्रजपाचे शास्त्रोक्त फळ देणारेही ठरते. केवळ ‘शुचिर्भूतता’ एवढाच नियम या स्तोत्राच्या निष्काम-पाठाकरिता, आवर्तनाकरिता पुरेसा असतो. या स्तोत्राची लौकिक फलप्रचिती येण्याकरिता अथवा याच्या मंत्रमयतेची विशिष्ट अनुभूती घेण्याकरिता मात्र त्या त्या विशिष्ट विधानांचे मंत्रशास्त्राप्रमाणे काटेकोर अनुसरण करावे लागते.
नामस्मरणात ‘श्रीभगवंतांचे नाम घेणे’ आणि ‘श्रीभगवंतांचे रूप स्मरणे’ अशी दोन्ही उपासना-अंगे अंतर्भूत होतात. म्हणूनच ‘नामस्मरण’ म्हणजे ‘नाम+स्मरण’ अशी फोड प.पू.सद्गुरु श्री.मामा नेहमी करीत. प्रेम हा नामसाधनेचा पाया असल्याने; आणि ते भगवत्कृपेने, सद्गुरुकृपेनेच साधकाच्या अंतःकरणात आपोआप स्फुरणारे असल्याने; ‘सद्गुरुप्रदत्त शक्तियुक्त नामदीक्षा’ हीच साधकाला परमार्थाच्या मंदिरात प्रवेश करवून देणारी ठरते. अशा ‘सबीज’ नामस्मरणानेच परमार्थातील सर्वोत्कृष्ट स्थिती हळूहळू प्राप्त करून घेता येते.
नुसते नाम घेणे आणि कृपेसहित, शक्तिसहित आलेले नाम घेणे यात महदंतर असते. जेव्हा नुसतेच नाम घेतले जाते, तेव्हा त्या नामामधली शक्ती झाकलेली, सुप्त असते. पण सद्गुरूंच्या आज्ञेने नाम घेतले, त्यांनी दिल्यानंतर ते शक्तियुक्त नाम घेतले, तर त्यातली शक्ती देखील क्रियाशील होते व ती आपला अनुभव द्यायला सुरुवात करते.
नाम हे जरी एकच असते; पण त्यामध्ये ज्या प्रकारच्या शक्तीची जागृती झाली असेल त्याप्रमाणे ते नाम तसे तसे फळ देत असते. जर सद्गुरुसंकल्पाप्रमाणे त्या नामामधली आत्मप्राप्ती करवून देणारी शक्ती जागृत झालेली असेल, तरच ते नाम ‘आत्मप्राप्ती’ही करवून देते. कार्यशक्तीच्या भिन्नत्वामुळे एकाच नामाचे भिन्न भिन्न अनुभव येत असतात.
'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'त उपासकाच्या अंत:करणात आस्तिक्यभावना आणि श्रद्धा निर्माण करण्याचे जबरदस्त सामर्थ्य आहे. नित्यनेमाने त्याचे पाठ केले असता, उपासकाच्या वृत्तींमध्ये आमूलाग्रबदल घडत जातो. त्याची वृत्ती आपोआप परमार्थानुकूल होत जाते. म्हणूनच; दररोज श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणावे, असे श्रीमद् आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांपासून आजवरचे सर्व संत सांगत आले आहेत. या स्तोत्राची साधना साधकाला ऐहिक-पारमार्थिक असा उभयविध लाभ करवून देणारी आहे !
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

22 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ७

'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'तील 'अच्युत, अनन्त आणि गोविन्द' ही तीन नामे सर्व प्रकारचे रोग नष्ट करणारी म्हणून प्रख्यातच आहेत. प्रत्यक्ष भगवान श्रीधन्वंतरींनीच या संबंधात असे म्हटले आहे की;
अच्युतानन्तगोविन्दनामोच्चारणभेषजात् ।
नश्यन्ति सकला रोगा: सत्यं सत्यं वदाम्यहम् ॥
"अच्युत, अनन्त आणि गोविन्द या नामांच्या उच्चारणरूपी औषधाने सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. हे मी सत्य, सत्यच सांगत आहे !"
'पद्मपुराणा'च्या उत्तरखण्डातील दोनशे बत्तिसाव्या अध्यायात, याच संदर्भात भगवान श्रीशिवांचे अशाच अर्थाचे अभिवचन येते. भगवती पार्वतीमातेच्या विचारण्यावरून ते अगोदर मत्स्य, कूर्म आदी अवतारांचा सविस्तर वृत्तांत सांगतात; आणि तदनंतर समुद्रमंथनाचा प्रसंग कथन करतात. त्या प्रसंगी प्रकट झालेले भयंकर कालकूट विष त्यांनी श्रीभगवंतांच्या याच तीन नामांच्या जप-प्रभावाने पचवले होते, असे ते सांगतात. ते त्याचवेळी पुढे असेही सांगतात की; "अच्युत, अनन्त आणि गोविन्द ही श्रीहरींची तीन ( विशिष्ट सामर्थ्यशाली ) नामे आहेत. जो कुणी एकाग्र चित्ताने यांच्या आदी 'प्रणव' व अंती 'नमः' लावून भक्तिपूर्वक जप करतो, त्याला विष, रोग आणि अग्नीपासून मृत्यूचे भय राहत नाही. जो या तीन नामरूपी महामंत्रांचा एकाग्रतापूर्वक जप करतो, त्याला काल आणि मृत्यूचेही भय उरत नाही; मग इतर गोष्टींमुळे निर्माण होणारे भय तर सोडाच !" (पद्म.पु.उत्तर.२३२.१९-२१)
भगवान श्रीशिवांच्या कथनाप्रमाणे 'ॐ अच्युताय नमः, ॐ अनन्ताय नमः, ॐ गोविन्दाय नमः असे ते तीन नाममंत्र असून, याच विशिष्ट क्रमाने त्यांचा जप करावयाचा असतो.
'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'तील प्रत्येक नामाला चतुर्थी प्रत्यय लावून, आरंभी 'ॐ' व शेवटी 'नमः' म्हटल्याने त्यांचे नाममंत्र तयार होतात. सगळ्या हजार नामांचा या प्रकारे मंत्रस्वरूपात उच्चार करीत, भगवान श्रीविष्णूंच्या मूर्तीवर अथवा यंत्रावर तुलसीपत्रे वाहत गेल्यास, हजार यज्ञ केल्याचे श्रेय मिळते असे महात्मे सांगतात.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

21 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ६


भगवान श्रीमहाविष्णूंच्या विविध लीलांचे संदर्भ सांगणारी, त्यांच्या अलौकिक गुणांचे वर्णन करणारी किंवा माहात्म्य सांगणारी एक हजार नामे एकत्र करून श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र रचलेले आहे. ही सर्वच नामे मूळचीच सिद्ध असली तरी यातील काही नामे अधिक प्रसिद्ध आहेत.
भगवान श्रीविष्णूंची बारा रूपे, बारा नामे मंत्रशास्त्रात विशेष प्रसिद्ध आहेत.
(१) केशव - लांब केस असलेले,
(२) नारायण - शेषशायी,
(३) माधव - मायापती, रमापती,
(४) गोविन्द - पृथ्वीचे रक्षक,
(५) विष्णु - सर्वव्यापक,
(६) जनार्दन - भक्तरक्षक,
(७) उपेन्द्र - इन्द्राचे बंधू,
(८) हरि - दुःख, दारिद्र्य, पाप आदि हरण करणारे,
(९) वासुदेव - अंतर्यामी,
(१०) कृष्ण - आकृष्ट करणारे,
(११) राम - रमणकर्ता,
(१२) नृसिंह - नर व सिंह उभयरूपी.
मंत्रशास्त्रातील भगवान श्रीविष्णूंचे असंख्य मंत्र मुख्यत्वे या बारा नामांवरच आधारलेले दिसतात. संध्या-वंदनाच्या वेळीही श्रीविष्णूंची अशीच निवडक चोवीस नामे विशिष्ट क्रमाने उच्चारण्याची शास्त्रीय पद्धत आहे. त्यायोगे संध्या-वंदन करणाऱ्या साधकाच्या पापांचा, विघ्नांचा आणि दुःखांचा नाश होत असतो.
वास्तुदोष निवारण होण्यासाठी प.पू.श्री.शिरीषदादा एक अद्भुत प्रयोग सांगतात. देवांपुढे समई लावून 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'चे रोज तीन पाठ याप्रमाणे आठवडाभर पाठ करावेत. याची सुरुवात 'बुधवारी'च करावी. आश्चर्यकारक अनुभव येतो. बाहेरचा, बाधेचा त्रास असल्यास अशा व्यक्तीला रोज सकाळ-संध्याकाळ या स्तोत्राचे पाठ ऐकवावेत. त्रास दूर होतो. श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या नित्य पठणाने शरीरातील नाना व्याधी दूर होऊन एक प्रकारचे दैवी संरक्षक कवच साधकाभोवती निर्माण होत असते.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


20 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ५


या अतीव प्रभावी अशा 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा'च्या फलश्रुतीत, या स्तोत्राच्या श्रवणपठणाची वेगवेगळी फले सांगितलेली आहेत. 'अशुभ टळणे, विजयी होणे, धर्मप्राप्ती होणे, अर्थप्राप्ती होणे, संतती लाभणे, यश लाभणे, मोठेपणा मिळणे, निर्भयता प्राप्त होणे, आरोग्याचा लाभ होणे, संकटनाश होणे'; इत्यादी लौकिक फले; आणि 'पापनाश होऊन ब्रह्मप्राप्ती होणे' हे अलौकिक फल; यांचे वर्णन त्यात येते. पण तेच जर साधकांकरिता थोडक्यात सांगायचे झाले तर, 'प्रेमाने घेतलेले नाम हे अंतःकरणातल्या प्रापंचिक वासना जाळून काढते आणि अंतःकरणात हळूहळू पूर्ण वैराग्य निर्माण करते;' असे सांगता येईल.
श्रीभगवन्नामांचे हे अजब सामर्थ्य जाणूनच पितामह भीष्माचार्य संकेताने सुचवितात की; *भवरोगासाठी श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे रामबाण, जालीम औषध आहे. पण हे केवळ एखादे सुट्टे औषध नाही; तर तेे औषधांचे संपूर्ण दुकानच आहे. म्हणूनच मनुष्याच्या कुठल्या दुःखावर त्या दुकानातले नेमके कुठले औषध द्यावे, ह्याचा विचार जाणत्यांना पृच्छा करूनच समजून घेतला पाहिजे; आणि नेमके तेच औषध रुग्णाने शास्त्रोक्त रितीने घेतले पाहिजे.*
श्री भीष्माचार्यांनी या स्तोत्राच्या रूपाने भवरोगाचे जालीम, रामबाण औषधच साधकांच्या हाती ठेवलेले आहे. ज्या औषधाने भवरोगासारखी महाव्याधी नाश पावते, त्या औषधाने; नव्हे त्या औषधाच्या अंशानेही; लौकिक रोग लीलया नष्ट होतात यात नवल ते काय ?
येथवर श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य थोडक्यात आपण जाणून घेतले आहे. आता पुढील लेखापासून प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी सांगितलेले श्रीविष्णुसहस्रनामातील विविध श्लोकमंत्र व त्यांचे उपयोग आपण एकेक करून पाहूया.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

19 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ४


भगवान श्रीमहाविष्णूंची पूर्वीपासूनच प्रचलित असलेली काही सुप्रसिद्ध व काही अप्रसिद्ध अशी आणि अनेक महात्म्यांच्या तपश्चर्येने सिद्ध झालेली एक हजार नावे मोठ्या खुबीने एकत्र गुंफून श्री भीष्मांनी हे पुण्यपावन स्तोत्र रचले. या स्तोत्रातील अनेक नामे समान अर्थांची वाटली किंवा पुनरुक्त वाटली तरी, त्यांमध्ये सूक्ष्म असे अर्थांचे भेद आहेतच. काही वेळा विशिष्ट मंत्रसामर्थ्य प्रकट करविण्याकरिता श्री भीष्मांनी नामक्रमात मुद्दामच एखादे पुनरुक्त नाम घातलेले दिसते.
'नामाचे माहात्म्य' हे श्रुति-स्मृति-पुराणोक्त असल्याने सर्वच संप्रदायांना निर्विवादपणे मान्य आहे. या बाबत कुणाचेच मतभेद नाहीत. एवढेच नव्हे तर, कुठल्याही मांगलिक कार्यातील त्रुटी भगवन्नामस्मरणानेच पूर्ण होत असते. म्हणूनच आपल्याकडे प्रत्येक कर्माच्या शेवटी विष्णवे नम:। असे त्रिवार म्हणायची पद्धत आहे. कर्माच्या शेवटी तीन वेळा घेतलेेल्या विष्णुनामामुळे, केलेल्या कर्मात कळत किंवा नकळत राहिलेल्या त्रुटी, झालेले दोष पूर्ण होतात व ते कर्म सांग संपूर्ण होते, सुफलदायी ठरते.
भगवन्नाम हे तीन प्रकारचे संस्कार साधकांवर करीत असते. एक म्हणजे ते त्याचे जीवनदोष, स्वभावदोष दूर करते; 'दोषापनयन' करते. दुसरे म्हणजे ते साधकाच्या ठायी सद्गुणांची वृद्धी करविते; 'गुणाधान' करते; आणि तिसरे म्हणजे परमार्थाकरिता त्याच्या ठिकाणी जे कमी असते त्याची पूर्तता करविते; 'हीनांगपूर्ती' करते. श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या पठणाने या तिन्ही गोष्टी आपल्याबाबतीत आपोआपच घडून येतात. म्हणूनच या स्तोत्राच्या नित्यपठणाचा आजवरच्या सर्वच्या सर्व भक्तिसंप्रदायातील संतांनी व महात्म्यांनी वारंवार उपदेश केलेला दिसून येतो.
या अद्भुत स्तोत्राची सर्वात विलक्षण गोष्ट अशी की, श्री भीष्मांनी युधिष्ठिरांना श्रीविष्णुसहस्रनामाचा उपदेशही श्रीभगवंतांच्या समोरच केला. श्रीकृष्ण भगवंतांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत, श्रीभगवंतांकडे बघत केलेला हा उपदेश असल्याने, याचे प्रामाण्य व माहात्म्यही फार मोठे आहे. असे अन्य कोणत्याच स्तोत्राच्या बाबतीत घडलेले नाही. यासाठीच श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र निर्विवादपणे सर्वत्र फार महत्त्वाचे मानून मनोभावे म्हटले जाते.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


18 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ३


भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने धर्मराजाने भीष्मपितामहांना विविध प्रश्न विचारून ज्ञान मिळवले. सर्व दृष्टींनी पवित्र करणारे असे सारे धर्मज्ञान ऐकल्यानंतर, युधिष्ठिरांनी पुढे होऊन पितामह भीष्माचार्यांना पुन्हा असा प्रश्न केला की, "आपल्या मताने परम धर्म कुठला ?" त्याच वेळी ते आणखीही एक प्रश्न विचारतात की, "कशाचा जप केला असता प्राणिमात्रांची जन्म-मरणांच्या बंधनापासून सुटका होते ? या संसाराच्या पाशातून सुटका होते ?" याशिवाय; "सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले ?", "सर्वांचा आश्रय कोण ?", "कुणाची स्तुती करावी ?"; आणि "कुणाची पूजा करावी ?" असे आणखी चार; म्हणजे एकूण सहा प्रश्न; युधिष्ठिर पितामह भीष्मांना विचारतात. त्यावर उत्तर म्हणूनच श्री भीष्माचार्यांनी त्यांना हे 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र' सांगितलेले आहे.
हे स्तोत्र जरी महाभारत काळापासून प्रचलित झाले असले, तरी त्यातली नामेही त्याच काळातली आहेत असे नाही. श्रीभगवंतांची ही नामे अनादिकालापासून प्रचलित आहेत. त्या नामांवर नाना कल्पांमध्ये ऋषींनी तप केलेले आहे. केवळ श्री भीष्माचार्यांनी ही नामे एकत्र करून सांगितली म्हणून ती मंत्ररूप झालीत असे नव्हे, तर ते त्या नामांचे अंगभूत सामर्थ्यच आहे. ऋषींनी आपल्या तपाने ते सामर्थ्य प्रकट करविले; तर श्री भीष्मांनी मंत्रशास्त्रानुसार त्यांचे विशिष्ट गुण जाणून, त्यांना शास्त्रीय पद्धतीने आणि खुबीदारपणे काव्यरूप देत एकत्र गुंफले.
यातले प्रत्येक नाम श्रीभगवंतांचे कुठले ना कुठले तरी वैशिष्ट्य सांगणारेच आहे. कारण श्रीभगवंतांचे गुणही त्यांच्याप्रमाणेच अनंत आहेत. श्रीभगवंतांचे कुठलेही नाम त्यांचे गुण, त्यांच्या विभूती, त्यांचे अवतार, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे ऐश्वर्य इत्यादींचा महिमा सांगणारे, रहस्य सांगणारे असते. भीष्माचार्यांनी या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करून, मंत्रशास्त्राचे अनेक नियम पाळून त्यातून विशिष्ट, प्रभावी स्तोत्ररचना करीत ही सहस्र नामे एकत्र गुंफलेली आहेत. म्हणूनच या श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राला अनन्यसाधारण माहात्म्य लाभलेले आहे.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

17 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - २


श्रीमन्महाभारताच्या अनुशासनपर्वातील 'दानधर्मपर्व' नामक उपपर्वात येणा-या एकशे एकोणपन्नासाव्या अध्यायालाच 'श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र' नावाने ओळखले जाते. यात एकूण १४४ श्लोक आहेत. प्रस्तुत स्तोत्र हे सहस्रनाम आहे, म्हणजे यात भगवान श्रीविष्णूंची एक हजार नावे गुंफलेली आहेत. शिवाय ती अशा मार्मिक पद्धतीने रचलेली आहेत की, त्या श्लोकपदांच्या योगेही एक सबंध स्वतंत्र मंत्र तयार होतो. म्हणूनच यातला प्रत्येक श्लोक हा एक दिव्य-मंत्र आहे; आणि संपूर्ण स्तोत्र देखील एक माला-मंत्र आहे.
भगवान श्रीविष्णू हे करुणासागर, भक्तवत्सल असल्याने त्याचप्रमाणे तेच विश्वाचे सूत्र व निमित्त असल्याने आणि भक्तांच्या पातकांचा नाश करणारे असल्याने, त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्या स्मरणाने कल्मषांचा, पापांचा नाश होत असल्याने तोच मोक्षप्राप्तीचा सुलभ, सुगम उपायही आहे. ‘श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रा’चेही हेच उद्दिष्ट आहे. ‘श्रीविष्णूसहस्रनाम स्तोत्र’ हे उपासनेच्या प्रांतामध्ये एक अत्यंत दिव्य आणि प्रभावी स्तोत्र म्हणून जसे प्रसिद्ध आहे, तसेच ते मंत्रसाधनेच्या प्रांतात एक ‘दिव्य मंत्र’ म्हणूनही सुविख्यात आहे.
या पावन स्तोत्राचे अवतरण ज्या प्रसंगाने झाले, तो प्रसंगही मोठा विलक्षण आहे. पितामह भीष्म शरशय्येवर पडलेले असून, उत्तरायणाची वाट पाहात आहेत. ते इच्छामरणी असल्याने त्यांनी देहत्याग केलेला नाही. अशावेळी श्रीभगवंतांनी श्री युधिष्ठिरांना सांगितले की, "युधिष्ठिरा, या भीष्मांसारखा शास्त्रज्ञाता, धर्मज्ञ पुरुष दुसरा होणार नाही. ते अष्टवसूंपैकी एकाचे अवतार आहेत. त्यांच्याबरोबरच त्यांचे सगळे ज्ञान लोप पावेल. म्हणून आत्ताच त्यांना शरण जाऊन, त्यांच्याकडून धर्मासंबंधी जेवढे ज्ञान प्राप्त करून घेता येईल, तेवढे करून घ्यावे !" देवांच्या आज्ञेने धर्मराजाने भीष्मांना प्रार्थना केली. त्याच प्रसंगीच्या संवादामध्ये, श्री भीष्माचार्यांनी हे स्तोत्र कथन केलेले आहे. म्हणूनच हे स्तोत्र सर्व वैष्णव भक्तिसंप्रदायांमध्ये अत्यंत पूजनीय, प्रभावी व महत्त्वपूर्ण मानले जाते. या स्तोत्राची आणखी काही अलौकिक वैशिष्ट्ये उद्याच्या लेखात पाहू.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )

16 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - १


आजपासून विलंबीनाम संवत्सरातील अधिक ज्येष्ठ मास सुरू होत आहे. अधिकमासालाच मलमास असे म्हणतात. भगवान श्रीमहाविष्णूंनी या मलमासाला आशीर्वाद दिले की, "जे भक्त या महिन्यात माझे मनोभावे स्मरण करतील, माझी ज्याप्रकारे शक्य होईल त्याप्रकारे भक्ती करतील, माझ्या प्रीत्यर्थ दान-धर्म करतील, त्यांना मी त्याचे अक्षय फल प्रदान करीन, त्यांच्यावर भरभरून कृपा करीन." पुराणपुरुषोत्तम भगवान श्रीमहाविष्णूंच्या अशा वरदानामुळेच अधिक महिना " पुरुषोत्तम मास " म्हटला जातो. म्हणून आपणही या पावन महिन्यात जास्तीतजास्त भगवन्नाम घेऊ या, यथाशक्य उपासना, पूजा-अर्चना, दानधर्म करून श्रीभगवंतांची अमोघ कृपा संपादन करू या. अधिकस्य अधिकं फलम् । या न्यायाने त्याचे आपल्यालाही अधिकाधिक फल प्राप्त होईल. 

श्रीदत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्त्व प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांचा श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य या नावाचा एक अतिशय सुंदर व महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. या ग्रंथात श्रीविष्णुसहस्रनामातील श्रीभगवंतांच्या पहिल्या तीन नामांवरील दोन प्रवचने प्रसिद्ध झालेली आहेत. तसेच श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या सहस्रनाम भाष्यातील निवडक भाग, पूर्ण सहस्रनाम व त्याचा अर्थ आणि तुलसीअर्चनासाठी सहस्रनामावली देखील छापलेली आहे. एकप्रकारे विष्णुसहस्रनामाचा हा अत्यंत उपयुक्त असा देखणा संदर्भग्रंथच ठरलेला आहे. 
या ग्रंथात पू.दादांनी महान प्रभावी अशा श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य, अद्भुत चमत्कार व सत्यघटना सांगून फार नेमकेपणाने प्रतिपादित केलेले आहे. अतिशय वाचनीय व संग्रही ठेवावाच असा हा ग्रंथराज उपासकांसाठी अनेक अंगांनी विशेष ठरतो.
या ग्रंथात पू.दादांनी त्यांच्या गुरुपरंपरेने आलेले सहस्रनामातील श्लोकमंत्रांचे विविध आजार व अडचणींवरचे अद्भुत मंत्रप्रयोगही दिलेले आहेत. हे मंत्रप्रयोग यापूर्वी कधीच कुठेही प्रकाशित झालेले नाहीत. या महासिद्ध मंत्रांची ( आवश्यक ते साधे सोपे नियम पाळून ) उपासना करून कोणीही भाविक स्त्री-पुरुष त्यांचे अद्भुत अनुभव स्वत: घेऊ शकतात. आजवर हजारो भक्तांना या स्तोत्राच्या लक्षावधी अनुभूती आलेल्या आहेत व पुढेही येतीलच. 
या पुण्यपावन अधिक महिन्याच्या निमित्ताने, पू.दादांनी सांगितलेल्या त्या अलौकिक मंत्रांची दररोज एकेक करून माहिती घेऊ या. कृपया ही मौलिक माहिती अधिकाधिक भाविक भक्तांपर्यंत पोहोचवून पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने हरिसेवा साधावी ही सप्रेम प्रार्थना ! 
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )



14 May 2018

उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें

 उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें 

भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज  श्रीसद्गुरूंचे महिमान वर्णन करण्यातली आपली असमर्थता सांगताना म्हणतात, "सूर्याला उटणे लावून अजून तेजस्वी करावे किंवा क्षीरसागरालाच पाहुणेर करावा, त्याची सरबराई करावी किंवा चंदनालाच अाणखी कशाने तरी चर्चावे किंवा अमृताला अजून रांधावे; त्याप्रमाणेच सद्गुरूंचे महिमान गाणे होय. कारण, "तैसे श्रीगुरूंचे महिमान । आकळितें कें असे साधन । अहो, सद्गुरूंचे महिमान जाणण्याचे साधनच उपलब्ध नाही, मग ते गाणार तरी कसे बरे? तेथे केवळ दंडवतच घालता येतो व तेच त्यांचे यथार्थ आराधन होय ! हे जाणोनियां नमन । निवांत केलें ॥ज्ञाने.१०.०.१३॥ त्यांच्या श्रीचरणी उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें ॥ज्ञाने.१०.०.१५॥ असा दंडवत घालण्यातच खरोखर आपले भले आहे !"
आज वैशाख कृष्ण चतुर्दशी, आमचे भगवंत प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे व प.पू.सद्गुरु सौ.शकुंतलाताई आगटे या सद्गुरुद्वयींची पुण्यपावन जन्मतिथी होय. म्हणूनच, सद्गुरु माउलींच्या सांगण्यानुसार त्यांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
प.पू.श्री.दादा व प.पू.सौ.ताईंबद्दल काय आणि किती बोलणार? गेल्या चोवीस वर्षांतल्या त्यांच्या अनंत अनुभूती, माझ्या हृदयीच्या नित्यसुगंधित कोप-यात सतत आनंदाने दरवळत आहेत. त्या आठवणींचा सहवास हाच माझ्यासाठी धनाधिपती कुबेरालाही तुच्छ मानायला लावणारा अनर्घ्य खजिना आहे; कितीही वेळा त्यातून काढले तरी कधीच कमी न होणारा ! आज त्या खजिन्याच्या गाभेवनात मनसोक्त विहरण्याचाच दिवस आहे; आणि मी मनोमन त्याचा पुरेपूर आस्वाद घेतच आहे.
आमच्या या सद्गुरुद्वयीविषयी गेल्यावर्षी एक छोटा लेख लिहिला होता. तोच पुन्हा शेयर करीत आहे. खालील लिंकवरील तो लेख वाचून आपणही त्यांच्या स्मरणाच्या आनंदात सहभागी व्हावे हीच सादर प्रार्थना. संतांचे स्मरण हेच त्यांच्या कृपेचे अनुसंधान आहे, त्यांच्या कृपेच्या प्राप्तीचे साधन आहे. म्हणून तेच आपल्यासाठी सतत अनुष्ठेय देखील आहे.
आपल्या अभंगशतक संग्रहातील एका मधुर अभंगात, सद्गुरुकृपा झाल्याची, सद्गुरुचरण घरी आल्याची आपली विलक्षण अनुभूती फार गोड शब्दांत सांगताना पू.दादा म्हणतात,
कवण पुण्य सुखावले, घरा आली गुरुपाऊले ॥१॥
अवघा आनंदी आनंद, अंगी भिनला रसछंद ॥२॥
गुरुचरणा प्रेममिठी, संसाराची ताटातुटी ॥३॥
आता नाचावे स्वानंदे, नयनी नीर वाचा स्फुंदे ॥४॥
म्हणे अमृता डुल्लावे, दास्य सुख नित भोगावे ॥५॥
पू.सौ.ताईंच्या व पू.श्री.दादांच्या पावन जन्मदिनी, त्या दास्यसुखात आनंदाने डुलण्याचे, त्या स्वानंदातच रममाण होऊन अष्टसात्त्विकाने डंवरून येऊन त्या अलौकिक श्रीरसराजांचा अद्भुत रसछंद अंगभर लेण्याचे देवदुर्लभ सौभाग्य आम्हांलाही कृपापूर्वक द्यावे हीच कळकळीची प्रार्थना त्यांच्या श्रीचरणी करतो आणि त्यांच्या पावन नामगजरात तेथेच तुलसीदलरूपाने विसावतो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
जीव ऋणवंत होई त्यांचा 
https://rohanupalekar.blogspot.com/2017/05/blog-post_24.html?m=1

10 May 2018

मुक्ताई जैसी सणकांडी

 मुक्ताई जैसी सणकांडी 

नमस्कार !
आज वैशाख कृष्ण दशमी, श्रीज्ञानेश्वरभगिनी ब्रह्मचित्कला श्रीसंत मुक्ताबाई महाराजांचा ब्रह्मलीन दिन !
साक्षात् आदिशक्ती जगत्रयजननी भगवती श्रीजगदंबाच सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण व शिष्या म्हणून अवतरली होती. सद्गुरु माउलींची कूस धन्य करणारी ही भगवती आदिशक्ती मुक्ताबाई, अध्यात्म-आकाशात अद्भुत तेजाने तळपणारी परमोज्ज्वल विद्युल्लताच आहे. म्हणूनच की काय, ही ब्रह्मचित्कला आजच्या तिथीला पावन करीत त्या विद्युल्लतेतच सामावून स्वरूपाकार झाली. हा काही निव्वळ योगायोग नव्हे, ही तर साक्षात् त्या आदिजगदंबेची अलौकिक परब्रह्मप्रचितीच आहे !
सद्गुरु श्री माउलींनाही अभिमान वाटावा अशा त्यांच्या स्वनामधन्य शिष्या भगवती श्री मुक्ताई महाराजांच्या श्रीचरणी खालील लेखाच्या माध्यमातून शब्द-पुष्पांजलीच्या सादर समर्पितो !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
सर्वत्रीं वरिष्ठ आदिशक्ती 
http://rohanupalekar.blogspot.com/2016/05/blog-post_31.html?m=1

5 May 2018

चोखा चोखट निर्मळ अंतर्बाह्य गंगाजळ



नमस्कार !
आज वैशाख कृष्ण पंचमी, श्रीसंत चोखोबाराय महाराजांची पुण्यतिथी. त्यानिमित्त श्रीचोखोबारायांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत.
संतांचा आणि त्यांच्या प्रेममत्त, भावपूर्ण वाङ्मयाचा अभ्यास हा लौकिक मोजपट्ट्यांनी आणि अननुभूत काल्पनिक निकषांच्या कमकुवत आधारावर कधीच करायचा नसतो. किंबहुना तसा जर अभ्यास केला तर तो अभ्यास न होता केविलवाणा कल्पनाविलासच अधिक ठरतो; आणि ती शब्दांची वायफळ कसरत ' बोलाचीच कढी बोलाचाच भात ' होऊन शेवटी ख-या आनंदाची भूक अतृप्तच राहाते.
श्रीसंत चोखोबारायांच्या बाबतीत अनेक अभ्यासकांची हीच गफलत झालेली दिसून येते. ते हिरिरीने तत्कालीन विषम जातिव्यवस्थेचा चोखोबांना व त्यांच्या कुटुंबाला कसा त्रास झाला, याची त्यांच्या तसे वर्णन असणा-या एखाददुस-या अभंगाचा आधार घेऊन निरर्थक मांडणी करीत बसतात. पण त्या भानगडीत चोखोबांच्या चोख सोन्यासारख्या खणखणीत आत्मानुभूतीचा आस्वाद घ्यायचे, त्यांच्या अद्भुत अंतरंग प्रचिती-प्राजक्ताचा संपन्न फुलोरा पाहायचे, त्याचा तो स्वर्गीय सुगंध आतबाहेर अनुभवायचे साफ विसरूनच जातात. चोखोबारायांची ही जगावेगळी, विलक्षण आत्मप्रचितीच जर पाहायची राहिली तर मग बघितले तरी काय? वेळ वायाच घालवला नाही का? पंचपक्वान्नांचे ताट समोर वाढलेले असताना केवळ ताक पिऊन उठल्यासारखेच आहे हे. पण भगवंतांच्याच प्रेरणेने काही महाभागांच्या नशीबी तेच लिहिलेले असते. आपण मात्र या फालतू भानगडीत न पडता या अमृतपरगुण्याचे, या प्रसादभातुक्याचे भोजन भरपेट जेवावे, हेच बरे नाही का ! .........
( पुढील लेख लिंकवरून वाचावा..)
चोखा चोखट निर्मळ अंतर्बाह्य गंगाजळ -  लेख २०१८

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481