19 May 2018

अधिकस्य अधिकं फलम् - ४


भगवान श्रीमहाविष्णूंची पूर्वीपासूनच प्रचलित असलेली काही सुप्रसिद्ध व काही अप्रसिद्ध अशी आणि अनेक महात्म्यांच्या तपश्चर्येने सिद्ध झालेली एक हजार नावे मोठ्या खुबीने एकत्र गुंफून श्री भीष्मांनी हे पुण्यपावन स्तोत्र रचले. या स्तोत्रातील अनेक नामे समान अर्थांची वाटली किंवा पुनरुक्त वाटली तरी, त्यांमध्ये सूक्ष्म असे अर्थांचे भेद आहेतच. काही वेळा विशिष्ट मंत्रसामर्थ्य प्रकट करविण्याकरिता श्री भीष्मांनी नामक्रमात मुद्दामच एखादे पुनरुक्त नाम घातलेले दिसते.
'नामाचे माहात्म्य' हे श्रुति-स्मृति-पुराणोक्त असल्याने सर्वच संप्रदायांना निर्विवादपणे मान्य आहे. या बाबत कुणाचेच मतभेद नाहीत. एवढेच नव्हे तर, कुठल्याही मांगलिक कार्यातील त्रुटी भगवन्नामस्मरणानेच पूर्ण होत असते. म्हणूनच आपल्याकडे प्रत्येक कर्माच्या शेवटी विष्णवे नम:। असे त्रिवार म्हणायची पद्धत आहे. कर्माच्या शेवटी तीन वेळा घेतलेेल्या विष्णुनामामुळे, केलेल्या कर्मात कळत किंवा नकळत राहिलेल्या त्रुटी, झालेले दोष पूर्ण होतात व ते कर्म सांग संपूर्ण होते, सुफलदायी ठरते.
भगवन्नाम हे तीन प्रकारचे संस्कार साधकांवर करीत असते. एक म्हणजे ते त्याचे जीवनदोष, स्वभावदोष दूर करते; 'दोषापनयन' करते. दुसरे म्हणजे ते साधकाच्या ठायी सद्गुणांची वृद्धी करविते; 'गुणाधान' करते; आणि तिसरे म्हणजे परमार्थाकरिता त्याच्या ठिकाणी जे कमी असते त्याची पूर्तता करविते; 'हीनांगपूर्ती' करते. श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या पठणाने या तिन्ही गोष्टी आपल्याबाबतीत आपोआपच घडून येतात. म्हणूनच या स्तोत्राच्या नित्यपठणाचा आजवरच्या सर्वच्या सर्व भक्तिसंप्रदायातील संतांनी व महात्म्यांनी वारंवार उपदेश केलेला दिसून येतो.
या अद्भुत स्तोत्राची सर्वात विलक्षण गोष्ट अशी की, श्री भीष्मांनी युधिष्ठिरांना श्रीविष्णुसहस्रनामाचा उपदेशही श्रीभगवंतांच्या समोरच केला. श्रीकृष्ण भगवंतांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत, श्रीभगवंतांकडे बघत केलेला हा उपदेश असल्याने, याचे प्रामाण्य व माहात्म्यही फार मोठे आहे. असे अन्य कोणत्याच स्तोत्राच्या बाबतीत घडलेले नाही. यासाठीच श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र निर्विवादपणे सर्वत्र फार महत्त्वाचे मानून मनोभावे म्हटले जाते.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )


0 comments:

Post a Comment