21 Jun 2017

साठवणीतलीवारी२

लागला टकळा पंढरीचा
वारीच्या वाटेवरील गावात माझे बालपण गेले, हा माझ्यावरचा भगवान श्री माउलींचा खूप मोठा उपकारच आहे. कारण त्यामुळेच नकळत माउली व त्यांची वारी जीवनात आले व पुढे कायमचेच अविभाज्य घटक होऊन राहिले ! फलटण गावाच्या मध्यवर्ती भागात लक्ष्मीनगर वसलेले आहे. त्यात श्रीसंत उपळेकर महाराज पथावर आमचे घर आहे. घरासमोरच भगवान श्री माउलींचे मंदिर आहे आणि त्याला लागूनच प.पू.डॉ.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे समाधिमंदिर आहे. माझे सगळे बालपण याच दोन्ही मंदिरात गेलेले आहे. इतके की मी सकाळी उठल्यावर माउलींच्याच मंदिरात माझा फुटबॉल घेऊन एकटाच खेळायला जात असे. दोन्हीकडून पळत पळत जाऊन आपणच बॉल मारायचा,असा माझा खेळ चाले. माझा दिवसातला जास्तीतजास्त वेळ या दोन्ही मंदिरांमध्येच जात असे.
हे माउलींचे मंदिर प्रशस्त असून त्यात माउलींची खूप सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. अशी मूर्ती इतरत्र कुठेही नाही. फलटणच्या राणीसाहेब कै.श्रीमंत लक्ष्मीदेवी मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी हे मंदिर बांधले. त्याची हकिकतही मोठी गोड आहे.
राणीसाहेबांच्या पर्यंत जवळपास सात पिढ्या निंबाळकर राजघराण्यात औरसपुत्र कधी जगलाच नाही. सात आठ पिढ्या दत्तकपुत्रच राजगादीवर बसे. पुढे प.पू.श्री.काकांच्या प्रेरणेने कै.लक्ष्मीदेवी राणीसरकारांनी भगवान श्री माउलींची मनोभावे प्रार्थना करून उपासना केली. माउलींच्या कृपेने त्यांची संतती जगली. पण असे म्हणतात की, पूर्वीच्या कोणा महात्म्याचा तसा शाप होता. त्यामुळे महात्म्याचाच शाप तो, खोटा कसा ठरणार ? राणीसाहेबांची संतती जगली पण राज्य गेले; म्हणजे औरस पुत्र राजा झालाच नाही शेवटपर्यंत ! 
पुढे एकदा राणीसाहेब परदेशात असताना विमान अपघातात मरता मरता आश्चर्यकारकरित्या बचावल्या, तेही प.पू.काकांनी प्रवासापूर्वीच दिलेल्या मोलाच्या सूचनेमुळे आणि भगवान श्री माउलींच्याच कृपेने. तेव्हापासून राणीसाहेबांनी मात्र मनापासून माउलींची सेवा आरंभिली. स्वहस्ते पूर्ण ज्ञानेश्वरी लिहून काढली. आळंदी देवस्थानला त्या काळात लक्षावधी रुपयांची मदत केली. लक्ष्मीनगर भागात माउलींचे सुंदर मंदिर बांधले व त्या सर्व ऐषोआराम सोडून मंदिरातच अवघ्या एका खोलीत राहून सेवा करू लागल्या. त्यांनी सर्व राजवैभवाचा त्याग केला.
या मंदिरात भगवान श्री माउलींची लाईफ साईझची संगमरवरी मूर्ती आहे. माउलींचे हे ध्यान खूप वेगळे आहे. त्यांच्या डाव्या हातात ज्ञानेश्वरी असून ते ती सांगत आहेत. डोळे अगदी भावपूर्ण आहेत. मूर्तीसमोर माउलींच्या पादुका समाधीशिलेवर स्थापन केलेल्या आहेत.
या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज अचानक उठून तरातरा चालत पुणे रस्त्यावर पार गावाबाहेर पर्यंत गेले. तोंडाने 'गोळा आला गोळा आला' असे पुटपुटत होते. कोणाला काहीच कळेना. थोड्या वेळाने अंगावरच्या उपरण्यात काहीतरी झाकून धरल्यासारखे ते घेऊन आले व त्यांनी माउलींच्या नुकत्याच प्रतिष्ठापना झालेल्या पादुकांवर ते उपरणे रिकामे केले. या सर्व प्रकाराबद्दल त्यांना विचारल्यावर पू.श्री.काका उत्तरले, "तुम्ही माउलींचे आवाहन केलेत पण त्यांच्या स्वागतासाठी कोणी गेलाच नाहीत, म्हणून मग मी जाऊन त्यांचे स्वागत केले व त्यांचे तेज सन्मानाने घेऊन आलो." अशाप्रकारे फलटणच्या आमच्या श्री ज्ञानेश्वर मंदिरात भगवान माउलींची प्रतिष्ठापना प्रत्यक्ष प.पू.श्री.उपळेकर महाराजांनी केलेली आहे. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज दररोज या मंदिरात दर्शनाला येत व बराचवेळ श्री माउलींशी सुखसंवाद करीत असत. त्यांचा तो नित्याचा परिपाठच होता. 
लहानपणापासून याच माउलींच्या आणि प.पू.काकांच्या मंदिरात खेळताना माझ्या बालमनावर माउलींच्या प्रेमाचे जे संस्कार झाले ते माझ्यासाठी फार महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत.
आमच्या माउलींच्या मंदिरात रोज आरतीनंतर पंचपदी होई व दर गुरुवारी आरतीपूर्वी पादुकांची प्रदक्षिणा होई. मी दररोजच्या संध्याकाळच्या आरतीला उपस्थित असायचोच. आरतीची घंटा वाजायला लागली की खेळ सोडून धावत जायचो आम्ही तिथे. आरतीच्या वेळी तास किंवा मोठा घोळ वाजवायचे अप्रूप वाटायचे आम्हांला. कधी कधी गुरुजी नसतील तर मलाच गुरुवारच्या प्रदक्षिणेच्या वेळी माउलींच्या पादुका धरण्याचे भाग्य लाभत असे. त्यावेळी माझा मित्र कै.प्रसाद नेर्लेकर माउलींची पूजा करायचा. तो आणि मी एकत्रच रुद्र, पुरुषसूक्त वगैरे शिकलो होतो.
या माउलींच्या मंदिरात कै.सौ.भगीरथीबाई उडपीकर नावाच्या फार गोड आजी सेवेला होत्या. त्या कानडी वैष्णव ब्राह्मण होत्या. श्री राघवेंद्रस्वामी, भगवान तिरुपती बालाजी हे त्यांचे आराध्य दैवत. उडपीहून पंढरपूरला वारीसाठी आलेल्या असताना त्यांची व त्यांच्या नवऱ्याची चुकामूक झाली. बरोबर त्यांची लहान मुलगी गीता देखील होती. त्यावेळी राणीसरकार पंढरपुरातच होत्या. त्यांनी असहाय्य भगीरथीबाईंना आपल्या सोबत फलटणला आणले व माउलींच्या मंदिरात सेवेला ठेवले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची सोयही करून दिली. कै.ती.भगीरथीबाईंसाठी माझ्या मनात अतीव प्रेमादराची भावना आहे. त्यांनीच अगदी सुरवातीला माउलींच्या प्रेमाचे संस्कार माझ्यावर केले.
ती.भागीरथीबाई फार देखणे हार करीत. त्यांचे पाहूनच मी देखील रंगीबेरंगी व नजाकतीचे हार करायला आवडीने शिकलो. त्या माझ्या घरातील देवमूर्तींसाठी देखील हार करून देत असत. त्यांचे कानडीमिश्रित मराठी ऐकायला गोड वाटे. त्या मला 'रोहनबाबा' म्हणत. मला चपला विसरायची तेव्हा खूप सवय होती. दर्शनाला जाताना मी चप्पल घालून जायचो; पण परत येताना साफ विसरून जायचो की मी चप्पल घालून गेलो होतो ते. त्यामुळे माझ्या चपला कायम हरवायच्या. पण ती.भागीरथीबाईंचे बरोबर लक्ष असायचे. त्या माझी राहिलेली चप्पल उचलून त्यांच्या खोलीच्या दाराआड ठेवत व मी शोधायला आलो की मला हाक मारून बोलावत व चप्पल देत असत. सोबत भाजलेले शेंगदाणे किंवा अांब्याची वडी वगैरे खाऊ देखील मिळायचा. दुहेरी लाभच तो ! भागीरथीबाईंनी माझ्या अशा पंधरा-वीस वेळा तरी नक्की चपला जपून ठेवलेल्या मला आठवतात.
भगवान माउलींच्या संगमरवरी मूर्तीला ठरावीक दिवसांनी त्या रिठ्याने व गरम पाण्याने स्नान घालीत; व लहान बाळाला अंघोळ झाल्यावर गच्च बांधून ठेवतात तसे डोक्यावरून अंगभर शाल घालून ठेवत. मी विचारल्यावर त्या म्हणाल्या, "बाबा, माउलींना स्नान घातले आत्ता, मग थंडी भरेल ना उघडे ठेवले तर. लहान बाळाप्रमाणे नाजूक आहेत ते !" माउलींची ही मूर्ती नसून सुकुमार कोमल असे माउलीच प्रत्यक्ष समोर आहेत, अशा थोर भक्तिभावनेने त्या सेवा करीत. त्यांच्या त्या प्रेमसेवेचा न पुसला जाणारा संस्कार माझ्या मनात खोलवर रुजलेला आहे.  भगवंतांची भक्ती कशी करावी, याचे प्रात्यक्षिक ज्ञान लाभले म्हणून मी भगीरथीबाईंचा आजही ऋणी आहे.
एक गंमत म्हणजे मला लहानपणी नेहमीच दृष्ट लागायची. त्या न सांगता माझी दृष्ट काढत असत, ती देखील माउलींच्या निर्माल्यानेच. काही कार्यक्रम वगैरे असला की आमच्या घरी येताना त्या निर्माल्य सोबत घेऊनच येत. अशाप्रकारे माउलीच माझे संरक्षक कवचही झालेले होते व आजही आहेत. भगीरथीबाई अतिशय उत्तम आणि रुचकर स्वयंपाक करीत. त्यांचे ते उंचपुरे, काठापदराचे नऊवारी लुगडे नेसलेले, तोंडात एकही दात नसलेले सात्त्विक सोज्ज्वळ रूप आजही माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात जसेच्या तसे जिवंत आहे. डोक्यावर पदर घ्यायची त्यांची विशिष्ट लकब होती. मानेला एक झटका देऊन त्या पदर सारखा करीत. ती त्यांची  सवय पाहणा-याच्या नजरेत येत असे.
ती.भागीरथीबाई गोष्टीवेल्हाळ होत्या. त्यांच्या भागातल्या कानडी हकिकती, पू.काकांच्या आठवणी, त्यांच्या गावाच्या दुर्गादेवीच्या गोष्टी व भूतकाळातील अनेक प्रसंग त्या रंगवून रंगवून सांगत असत. मूळची संपन्नता अनुभवलेली असूनही, त्यावेळच्या त्यांच्या परस्वाधीन व काही प्रमाणात गरीबीच्या परिस्थितीचे त्यांना दु:ख नक्कीच वाटत असे, पण त्यांच्या रोजच्या वागण्यात त्या दु:खाचा मागमूस नसे. त्या नेहमी अतीव आनंदातच राहात असत. ती.भागीरथीबाई वारीच्याही अनेक गोष्टी नेहमी सांगत असत. त्यामुळेच आपणही वारी करायलाच हवी, अशी तीव्र इच्छा तेव्हापासूनच माझ्या मनात तयार झालेली होती. माउलींच्या कृपेने १९९६ साली, दहावीच्या सुट्टीत ती इच्छा पहिल्यांदा पूर्ण झाली.
भागीरथीबाईंना माउलींच्याच मंदिरात राहिल्याने अनेक संतांची दर्शने झाली व सेवाही करायला मिळाली. पू.श्री.गोविंदकाका, पू.श्री.गुळवणी महाराज, पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज, पू.धुंडा महाराज देगलूरकर, पू.मामासाहेब दांडेकर इत्यादी अनेक संतांच्या दर्शनाच्या हकिकती त्या सांगत असत. त्यांना मरणही खूप चांगले आले. जन्मभर माउलींची सेवा केलेली ही भागीरथी नावाची भक्तिगंगा आषाढी एकादशीच्या सकाळी माउलींची पूजा झाल्यावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने माउलीचरणीं कायमची विसावली. केवढे मोठे भाग्य म्हणायचे हे ! त्या रोज प.पू.काकांच्या समाधीलाही एक हार देत असत. अजून मंदिरात नेऊन द्यायचा राहिल्याने त्यादिवशी तो हार त्यांच्या खोलीतच ठेवलेला होता टेबलावर. त्याच्या शेजारीच कसेतरी वाटायला लागले म्हणून त्या जरा लवंडल्या व तेथेच त्यांचे देहावसान झाले. आश्चर्य म्हणजे, पू.काकांच्या समाधीसाठी एकादशी म्हणून करून ठेवलेला भरगच्च तुळशीचा हार नेमका त्या टेबलावरून कसा काय माहीत नाही, पण त्यांच्या निष्प्राण देहावर पडला. जन्मभर त्यांनी देवांना मनोभावे दररोज हार करून वाहिला, शेवटी स्वत: प.पू.काकांनीच त्या सेवेचा त्यांना अशाप्रकारे प्रसाद दिला असे म्हणायला हरकत नाही. मी त्या वर्षी, १९९६ साली पहिल्यांदाच वारीला गेलो होतो, त्यामुळे मला त्यांचे अंत्यदर्शन होऊ शकले नाही.
माउलींनी ज्ञानेश्वरीत व समर्थांनी दासबोधात म्हटल्याप्रमाणे भागीरथीबाईंची सेवा होती. माउलींसाठी जे जे शक्य ते ते त्या अतीव प्रेमाने करत असत. त्यांना रोज भरपूर फुले लागत हार करायला. म्हणून त्यांनी स्वत: खपून छान बाग तयार केलेली होती मंदिराच्या आवारात. प्राजक्त, गुलाब, मोगरा, कुंद, शेवंती, गलांडा, झेंडू, बेल, तुळशी अशी अनेक फुलझाडे प्रेमाने वाढवलेली होती. त्यांचे नजाकतीने हार करणे चालायचे रोज रात्री. मी आईने जोरात हाक मारून बोलवेपर्यंत, शेजारतीनंतर त्यांच्या ओट्यावरच गप्पा मारत बसलेलो असायचो. आईची हाक ऐकली की त्या म्हणत, "रोहनबाबा, पळा लवकर, नाहीतर धम्मकलाडू मिळेल घरी गेल्यावर." मी लहान होतो तसेच वाटेत अंधार असायचा म्हणून मला त्या मंदिराच्या दारापर्यंत सोडायलाही येत. मी आमच्या घरात पोहोचेपर्यंत त्या दारातच थांबलेल्या असायच्या. माझ्यावर त्यांचे खूप प्रेम होते व त्यांना माझे कौतुकही होते.
ती.भागीरथीबाई गेल्यानंतर माउलींच्या मंदिरातले चैतन्यच उणावले यात शंका नाही. बहुदा त्यांच्या निर्मळ सेवेचा विरह माउलींनाही जाणवला असावा. त्यांच्यासारखे कोणीच प्रेमाने लक्ष न दिल्याने व दुर्दैवाने त्यांच्यासारख्या उत्कट प्रेमाची झाडांनाही सवय असल्यानेच बहुदा, त्या बागेतील झाडेही त्या गेल्यानंतर हळूहळू वाळून गेली. पण त्यांच्या बागेतली त्यांच्याच हाताने लावलेली मोग-याची काही झाडे मी मुद्दाम आणून माझ्या बागेत लावली होती. त्यांना जाऊन आता वीस वर्षे झाली, तरी ते मोगरे आजही भरपूर फुलत आहेत; आमच्या प्रेमळ भागीरथीबाईंची आठवण ताजी ठेवत आणि त्यांची सेवा आजही अविरत चालवत !
श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब स्वतः जातीने माउलींच्या पालखी प्रस्थानाला जात. आजही नाईक निंबाळकरांचा प्रतिनिधी उपस्थित असतोच. अंकलीचे शितोळे, ग्वाल्हेरचे शिंदे आणि फलटणचे निंबाळकर या तीन राजघराण्यांचे प्रतिनिधी प्रस्थानसमयी असतात. राणीसाहेब वारीलाही जात; पण गाडीने. चालत जाऊ शकत नव्हत्या त्या. ती.भागीरथीबाई त्यांच्याबरोबर जात असत. फलटणच्या मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी पहाटपूजेनंतर माउलींच्या पादुकांवर लक्ष तुलसीअर्चनाचा राणीसाहेबांचा नियम होता. तो आजही चालू आहे. वाखरी मुक्कामातही पहाटे निंबाळकरांना पूजेचा मान आहे. संपूर्ण सोहळ्यात फक्त एकाच ठिकाणी माउलींच्या पादुका पूजेसाठी मुक्कामाचा तळ सोडून बाहेर दिल्या जातात. माउलींची पालखी फलटणला मुक्कामाला असते त्या रात्री, पालखीसोबत दुसरा जो पूजेचा पादुकाजोड असतो तो आमच्या माउलींच्या मंदिरात आणून त्यांना पवमानाचा अभिषेक होत असतो. रात्रभर पादुका मंदिरातच असतात. या पूजेत मी लहानपणी प्रत्येकवर्षी सहभागी झालोय आणि स्वहस्ते माउलींची पूजा देखील केलेली आहे.
फलटणचा मुक्काम संपवून पंढरपूरला जाताना दुसऱ्या दिवशी माउलींची पालखी पू.काका व श्री माउलींच्या मंदिरासमोरूनच जाते. त्यावेळी  निंबाळकर संस्थानातर्फे माउलींची पूजा होते व प्रत्येक दिंडीला नारळ-साखर दिली जाते. तेव्हा होणारी पूजा रथात चढून मीच करीत असे. त्या गर्दीत झटकन रथात चढण्याचा माझा सराव चांगला असल्याने, कायम माउलींची ही सेवा मला मिळाली हे माझे परमभाग्य. पूजा झाल्यावर माउलींच्या पादुकांवर मनसोक्त डोके टेकवून नमस्कार करण्याचे सुख काही औरच असते !
या आमच्या मंदिरात परतीच्या वारीला (म्हणजे पंढरपूर ते आळंदी प्रवासात) भगवान श्री माउलींची पालखी यायची. आरती होऊन शिरावाटप व्हायचे व मग पालखी नामदेव विठ्ठल मंदिरात रात्रीच्या मुक्कामाला जाई. ही प्रथा पुढे बंद झाली. पण लहानपणी काही वर्षे त्या आरतीला उपस्थित राहिल्याचे मला व्यवस्थित स्मरते आहे. ज्यावर्षी माउलींची पालखी मंदिरात आली नाही, त्यावर्षी ती.भागीरथीबाईंचे ते अस्वस्थपण व त्यांनी केलेला त्रागा मला आजही डोळ्यांसमोर येतो. त्या खूपच उद्विग्न झालेल्या त्यावेळी.
श्रीमंत राणीसाहेबांचे सर्वात धाकटे चिरंजीव कै.श्रीमंत विक्रमसिंह तथा बाळमहाराज हे माळकरी होते. त्यांनीच राणीसाहेबांचा माउलीसेवेचा वारसा पुढे चालवला. त्यांचा माझ्यावर खूप जीव होता. मी सर्वात पहिल्यांदा त्यांच्याबरोबरच माउलींच्या प्रस्थानाला आळंदीला गेलो होतो. बहुदा १९९१-९२ साल असेल. त्याआधी माझ्या आजीच्या, कै.मालतीबाई उपळेकरांच्या कॅन्सर ट्रीटमेंटच्या वेळी १९८९ साली आयुष्यात पहिल्यांदा मी आळंदीला जाऊन माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले होते. कै.आजीबरोबर मी ज्ञानेश्वरी वाचायचाही त्यासुमारास एकदा प्रयत्न केला होता. पण फारतर पहिला अध्यायच वाचून झाला, मग 'ये अपने बस की बात नही ।' हे पटल्याने, पुढे बालसुलभ कंटाळ्यामुळे ते राहूनच गेले.
आमच्या घरात प.पू.श्री.काकांमुळे माउलींच्या हरिपाठाची उपासना आहे. त्यामुळे जवळपास दहाव्या-बाराव्या वर्षापासूनच माझी दररोज हरिपाठ म्हणायला सुरुवात झाली होती. बरेच दिवस मी संध्याकाळी स्नान करून बरोबर सात वाजता, पू.काकांच्या हरिपाठाच्या खोलीत बसून हरिपाठ म्हणत असे. नंतर पाठ झाल्यावर मात्र एका जागी बसून म्हणणे जवळपास बंद पडले. आता येताजाताच हरिपाठ म्हटला जातो.
अशाप्रकारे सद्गुरु श्री माउलींनी माझ्या जीवनात अगदी बालपणीच प्रवेश करून, पुढे कायमचा निवास केलेला आहे, ही त्यांचीच माझ्यावरची असीम दयाकृपा म्हणायला हवी. आज, "माउलींशिवाय आपल्याला दुसरे काही विश्वच असू नये", यावर सद्गुरुकृपेने माझे मत पक्के होऊ लागलेले आहे आणि हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे !!
( छायाचित्र संदर्भ  : डावीकडे, भगवान श्री माउलींची संगमरवरी श्रीमूर्ती व उजवीकडे वर कै.श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसरकार व खाली कै.ती.भागीरथीबाई उडपीकर. )
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.in )

1 comments:

  1. आपला भावपूर्ण भक्तिमय लेख वाचला. खरोखरच आपण भाग्यवान आहात. ॐ श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम: श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम: राम कृष्ण हरी माऊली रोहनजी.

    ReplyDelete