18 Oct 2018

श्रीसंत साईबाबा महाराज



आज दसरा, सद्गुरु श्री साईबाबा महाराजांची शंभरावी पुण्यतिथी. विजयादशमी, मंगळवार दि.१५ ऑक्टोबर १९१८ रोजी दुपारी विजयमुहूर्तावर त्यांनी शिर्डी येथे आपल्या नश्वर देहाची खोळ सांडली होती. आज त्यांच्या देहत्यागाला शंभर वर्षे पूर्ण झाली.
सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींनी श्रीमद् भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातील बत्तीसाव्या श्लोकाच्या विवरणात फारच बहारीची रचना केलेली आहे. त्यातील एका ओवीत एक विशेष सिद्धांत साक्षात् श्रीभगवंतांच्याच मुखाने सांगताना श्री माउली म्हणतात,
म्हणोनि कुळ जाति वर्ण ।
हें आघवेंचि गा अकारण । 
एथ अर्जुना माझेपण ।
सार्थक एक ॥ज्ञाने.९.३२.४५६॥
श्रीभगवंत सांगतात, "अर्जुना, एखादा छोटासा ओहोळ किंवा नाला जेव्हा गंगेला मिळतो तेव्हा तो आपले मूळचे अस्तित्व टाकून गंगारूपच होऊन ठाकतो. अग्नीत टाकलेली खैरचंदनादी वेगवेगळी लाकडे एकदा अग्निरूप झाली की त्यांचे स्वरूप हे केवळ अग्नी हेच आहे, भिन्नत्व संपले त्यांचे. त्याप्रमाणे एखादा भक्त; कोणत्याही का जातीचा, धर्माचा, वंशाचा, कुळाचा असेना, तो माझ्याशी एकरूप झाला की त्याचे ते मागील सर्व हारपून जाते व तो केवळ माझेच स्वरूप होऊन ठाकतो. त्याला माझ्याहून भिन्न अस्तित्वच नसते !"
भक्तिशास्त्राचा, प्रत्यक्ष श्रीभगवंतांच्या श्रीमुखातून आलेला हा महन्मंगल सिद्धांत जर आपल्याला नक्की पटत असेल तर श्री साईबाबा मुसलमान होते, हे चुकूनही आपल्या मनात यायला नको. आणि जर तसे ते येत असेल तर आपल्याला भक्तीची बाराखडी देखील अजून कळलेली नाही हाच त्याचा स्पष्ट अर्थ आहे. लय टाईम आहे अजून आपल्याला या प्रांतात शिरकाव व्हायला, हेच सत्य !
आजवरच्या इतिहासात पाहिले तर, प्रत्येक महात्म्याला जनांच्या, समाजाच्या विनाकारण त्रासाला सामोरे जावेच लागलेले आहे. किंबहुना ती कसोटीच आहे महात्मेपणाची, असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण काही महात्म्यांना देहत्यागानंतरही त्याच दिव्यातून हकनाक जावे लागते ; श्रीसंत साईबाबा, श्री रामदास स्वामी महाराज, श्री शिवछत्रपती ही काही त्याची उदाहरणे. अर्थात् देहात असतानाही असल्या भंपकपणाचे त्यांना काहीच देणे-घेणे नसते, तर देह ठेवून विश्वाकार झाल्यावर त्यांना काय घंटा फरक पडणार त्याचा ? रस्त्याने कुत्री भुंकली म्हणून हत्ती काय चाल बदलतो की त्यांना घाबरून रस्ताच सोडतो ? अरे हट् ! जे देहीच विदेहत्वाला आले, अंतर्बाह्य हरिरूप झाले, त्यांना देहाचाच विचार करणा-या असल्या तद्दन मूर्खांचा कसलाही त्रास कधीच होत नसतो. कर्म परीक्षा मांडते ते या मूर्खांचीच. त्यांच्या आयुष्याचे पार भंगार करूनच सोडते त्यांचे हे भयानक संतनिंदेचे कर्म. असो. माझी वाचा मी विटाळून घेत नाही आजच्या चांगल्या मुहूर्तावर.
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील एक अत्यंत अलौकिक व महान अवतारी विभूतिमत्त्व म्हणजे श्री साईबाबा होत. स्वत: श्रीस्वामी महाराजांनीच श्री आनंदनाथ महाराजांकरवी त्यांना प्रसिद्धीला आणले व अनेकांना त्यांच्या दर्शनाला जाण्यास प्रेरित केले होते. यातच त्यांचे अलौकिकत्व सिद्ध होते. ते श्रीदत्तपरंपेरतील एक विलक्षण अधिकारी असे अवतारच होते. आमच्या श्रीगुरुपरंपरेतील सर्व महात्म्यांनाही श्री साईबाबांचा नितांत प्रेमादर आहे. पंचम श्रीदत्तावतार प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराज त्यांना बंधुतुल्य मानत. श्रीसंत उपळेकर महाराजांनाही त्यांच्याबद्दल प्रेम होते. श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज नेहमी श्री बाबांचा उल्लेख करीत. त्यांच्या ठायी श्री साईबाबांचे दर्शनही काही भाग्यवान साधकांना झालेले आहे. पू.मामांच्या शेवटच्या काळात कल्याण रेल्वे स्टेशनवर श्री साईबाबा भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचा पू.मामांना निरोप द्यायला म्हणून प्रत्यक्ष प्रकटले होते. पू.शिरीषदादा व काही साधक त्या प्रसंगाचे साक्षीदार आहेत. अशा थोर महात्म्याविषयी काही लोक जेव्हा अनुदार उद्गार काढतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. स्वत:चे 'स्वरूप'ही न जाणणा-या, आत्मज्ञानाच्या नावाने 'आनंद'च असणा-या एखाद्याने, साक्षात् श्रीहरींचेच स्वरूप असणा-या श्री साईबाबांच्या विषयी आक्षेप घ्यावेत, याला त्या माणसाची दुस्तर कर्मगतीच म्हणतात दुसरे काही नाही. मोठ्या पदावर बसलेले हे लांडगेच जणू, लोकांची दिशाभूल करणारे. असो, त्यांना या पापाचे योग्य ते प्रायश्चित्त भोगावेच लागेल, कोणी सुटत नसते संतनिंदेच्या महापातकातून. श्रीभगवंत आपल्या भक्तांचे अभिमानी असतात, ते कधीच अशांना क्षमा करीत नाहीत. न मे भक्त: प्रणश्यति । हे काय गंमत म्हणून म्हटलेले नाही त्यांनी.
श्री साईबाबांनी लौकिक अर्थाने आज देह ठेवलेला असला तरी त्यांचे अस्तित्व आजही जाणवते. असंख्य भाविकांना त्यांच्या कृपेचे शेकडो अनुभव आजही येत असतात ; व त्यांच्या अनाठायी निंदेचे पातक मस्तकी घेणा-या या लोकांच्या नाकावर टिच्चून पुढेही येतच राहणार आहेत, यात मला अजिबात शंका नाही. लोकांना अनुभव येतात म्हणूनच तर गर्दी वाढते आहे ना शिर्डीची ? की वेळ जात नाही म्हणून लोक येतात ? एवढा साधा विचारही करत नाहीत हे लोक.
"शिरडीस ज्याचे लागतील पाय टळतील अपाय सर्व त्याचे", असे आपले भक्तवात्सल्य ब्रीद प्रेमाने जपणा-या, भगवान श्रीरामरायांचे निस्सीम भक्त असणा-या, राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपापरंपरेतील श्रीसंत साईबाबा या महान विभूतिमत्त्वाला शताब्दी पुण्यतिथी दिनी, मी श्रद्धाभक्तिपूर्वक मनोभावे दंडवत घालतो आणि त्यांच्या श्रीचरणीच तुलसीदल रूपाने विसावतो !!
( लेखासोबत श्रीसंत साईबाबांचे अस्सल छायाचित्र. )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

4 comments:

  1. ॐ साईनाथाय नमः

    ReplyDelete
  2. जे देहीच विदेहत्वाला आले, अंतर्बाह्य हरिरूप झाले, त्यांना देहाचाच विचार करणा-या असल्या तद्दन मूर्खांचा कसलाही त्रास कधीच होत नाही.
    एकदम सहि!👍

    ReplyDelete
  3. खूप छान झालाय लेख! श्री बाबांच्या लिलाप्रसंगांबद्दल तुझी एक लेखमाला होऊ शकेल!!

    ReplyDelete