12 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग -  पंधरावा

स्वामी दयाघन, ब्रह्मरसखाण ।
निवारिती शीण, जन्मभाग ॥१॥
स्वामीनामे भुक्ती, स्वामीनामे मुक्ती ।
उपजे विरक्ती, नामपाठी ॥२॥
नामीं तळमळ, डोळां अश्रुजळ ।
ध्यान सर्वकाळ, जडे चित्ती ॥३॥
व्यथा हृदयासी, द्यावी कृपे ऐसी ।
अमृते मानसी, आन नाही ॥४॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ  :  भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे दयेचा अखंड वर्षाव करणारे अकारणकृपाळू महामेघ आहेत. ते अलौकिक ब्रह्मानंदाची, ब्रह्मरसाची खाणच आहेत. जीवांना कर्मांमुळे पुन्हा पुन्हा होणारा जन्म-मरणाचा त्रास दूर करणारेही तेच एकमेव आहेत. श्रीस्वामीनाम घेतल्याने प्रपंचातील सुखे तर मिळतातच, पण सहजासहजी न मिळणारी मुक्ती देखील मिळते. त्याच नामजपाने हळू हळू या निरस प्रपंचाचे यथार्थ रूप समजून येते व त्याची आसक्ती कमी होऊन वैराग्य देखील निर्माण होते.
श्रीस्वामीनामाने असा वैराग्यलाभ झाल्यावर, त्या नामजपातील तळमळ वाढून स्वामीदर्शनासाठी जीव कासावीस होऊ लागतो, श्री स्वामी महाराजांच्या नुसत्या स्मरणानेही डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागतात आणि अशा प्रेमभावातूनच मग सर्वकाळ स्वामीध्यान जडू लागते. त्या भक्ताला मग परमाराध्य सद्गुरु श्री स्वामींशिवाय दुसरे काही सुचतच नाही की गोड लागत नाही. श्रीस्वामीनामाने पावन झालेली अमृता दयाघन श्री स्वामी महाराजांना विनवते की, "देवाधिदेवा, आपल्या कृपेने अविरत आनंददायक अशी प्रेममय विरहव्यथा माझ्या चित्ताला निरंतर लागून राहावी, याशिवाय मला आणखी काही नको ! "
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.

1 comments: