19 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग -  बाविसावा

जया मुखी स्वामीनाम ।
पवित्र तो पूर्णकाम ॥१॥
जया चित्ती स्वामीध्यान ।
शांती तया पायवण ॥२॥
स्वामीसेवा कुलधर्म ।
त्याचे वंशी संतजन्म ॥३॥
ज्याचा देह स्वामीपायीं ।
त्याची कीर्ति शेष गायी ॥४॥
स्वामीवेध जनी वनी ।
तया विश्व लोटांगणी ॥५॥
अमृतेसी स्वामीबोध ।
गेला अंतरीचा खेद ॥६॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ : ज्या भक्ताच्या मुखात निरंतर श्री स्वामीनाम असते, तोच भक्त पवित्र आणि नित्यतृप्त देखील होतो. ज्याच्या चित्तात स्वामीध्यान स्थिर होते, त्या भक्ताची शांती दासी होते, त्याच्या अंत:करणाची शांती कोणत्याही प्रसंगी ढळत नाही. श्री स्वामींची सर्वभावे सेवा हाच ज्या कुळाचा मुख्यधर्म असतो, त्या कुळाचे इतके पुण्य निर्माण होते की, त्या कुळात संत जन्माला येतात. जो आपला देह सर्वार्थाने श्री स्वामीचरणीं समर्पण करतो, त्या भाग्यवंताची कीर्ती प्रत्यक्ष भगवान शेष आपल्या हजार मुखांनी गातात, आनंदाने स्तुती करीत त्याचे गुणगान करतात. ज्या भक्ताला एकांतात, लोकांतात, सर्वत्र सद्गुरु श्री स्वामींचीच प्रचिती येते, स्वामीमहाराजांशिवाय क्षणभरही ज्याला इतर काहीच सुचत नाही, त्याच्या पायी सारे जग लोटांगण घालत येते. अमृतेला श्रीसद्गुरुकृपेने श्रीस्वामीस्वरूपाचे ज्ञान झाल्याने आता तिचा सर्व खेद, सर्व दु:खे  लयाला गेली आहेत. कारण श्री स्वामी महाराजांचे स्वरूप अखंड आनंदमय असल्यामुळे ज्याला त्यांचे ज्ञान होते, तोही अखंड आनंदमयच होऊन जातो.
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wSFl3QVd5RVJTSUU/view?usp=drivesdk सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

0 comments:

Post a Comment