9 Apr 2017

श्रीस्वामी समर्थ नामपाठ - अभंग - बारावा

स्वामीलीला अपरंपार ।
ब्रह्मरसाचे भांडार ॥१॥
कुणा मुखी दिधला घास ।
कुणा मोक्ष अनायास ॥२॥
तारियेलें मूढ जन ।
अज्ञ, पापी, जातिहीन ॥३॥
सर्वांतरी स्वामीवास ।
चराचर स्वामीश्वास ॥४॥
शब्दातीत लीलाभाव ।
अमृतेसी अनुभव ॥५॥
॥ श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ ॥

अर्थ  :  सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अलौकिक लीला अपरंपार आहेत. त्या सर्व लीला प्रत्यक्ष ब्रह्मरसाचे भांडारच आहेत. म्हणून जे कोणी या लीला वाचतील-ऐकतील-सांगतील त्या सर्वांना तो ब्रह्मानंद प्राप्त होतो. ज्याला ऐहिक इच्छा असतात त्याच्या त्या इच्छा श्री स्वामीसमर्थ महाराज पूर्ण करतात आणि ज्याला केवळ मोक्षाची इच्छा असते त्याच्यावर पारमार्थिक कृपा करतात. त्यांच्या श्रीचरणी शुद्ध भावाने प्रेमादरपूर्वक प्रार्थना करायचा अवकाश, ही करुणाघन स्वामीमाउली दयार्द्र अंत:करणाने त्वरित कृपा करतेच करते. दयार्णव श्री स्वामी महाराजांनी त्यांच्या अवतारकालात शरण आलेल्या अनेक जड-मूढ, अज्ञानी, पापी, पतित अशा अनंत जीवांचा उद्धार केला. आजही त्यांचे हे कृपाकार्य चालूच आहे व अनंतकाळपर्यंत चालूच राहणार आहे.
राजाधिराज श्री स्वामी महाराजच सर्वांच्या अंतर्यामी वास करून आहेत, कारण तेच सर्वांचे आत्मरूप आहेत. अवघे चराचर विश्व हा त्यांचाच श्वास आहे. म्हणूनच त्यांच्या दिव्य लीलांचे वर्णन करणे कोणालाही निव्वळ अशक्य आहे. स्वामीकृपांकित अमृता म्हणते की, त्यांच्याच परमकृपेने मी मात्र त्यांच्या अतर्क्य लीला असंख्य वेळा प्रत्यक्ष अनुभवलेल्या आहेत.
[ नित्यपाठासाठी नामपाठाच्या केवळ मूळ अभंगांची पीडीएफ -
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wNUNEbzRHbUhrU1k/view?usp=drivesdk
सर्व स्वामीभक्तांना नम्र विनंती आहे की, कृपया दररोज नामपाठावरील पोस्ट आपापल्या फेसबुक वॉलवर, व्हॉटसप ग्रूप्सवर शेयर करून आणखी स्वामीभक्तांपर्यंत पोचवावी. याद्वारेही श्रीस्वामी महाराजांची सेवा संपन्न होईल. या पोस्टमध्ये कृपया कोणतेही बदल करू नयेत ही सूचनावजा विनंती. अशाप्रकारची चुकीची गोष्ट केल्यास श्रीस्वामी महाराजांना ते अजिबात आवडणार नाही व मग त्यांची कृपाही लाभणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे.]

0 comments:

Post a Comment