17 May 2016

*** माझें नृसिंहत्व लेणें जयाचिये महिमे - ६ ***



* श्रीनृसिंह जयंती नवरात्र - पुष्प ६ वे *

भगवान श्रीनृसिंहांचा अवतार हा केवळ भक्त रक्षणासाठीच झालेला असल्याने भक्ताभिमान व भक्तवात्सल्य हे या अवताराचे मूळ वैशिष्ट्य आहे. भगवान श्रीराम व श्रीकृष्ण हे दोन प्रमुख पूर्णावतार सोडता इतर विष्णू अवतारांमध्ये आवेश अवतार असूनही श्रीनृसिंह अवतारच जनमानसात जास्त प्रसिद्धी पावलेला दिसतो. इतर देवतांच्या मानाने नृसिंह हे कुलदैवत असणा-या घराण्यांचीही संख्या खूप मोठी आहे. सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त करणारा असल्यानेच बहुदा श्रीनृसिंह अवताराची आज हजारो वर्षे उपासना होत राहिलेली आहे. संत व पंत कवींनी नृसिंह विषयक प्रचंड वाङ्मय रचलेले आहे. भारतभरात नृसिंह मंदिरांची संख्या देखील भरपूर आहे. तसेच विपुल प्रमाणात स्तोत्रमंत्रादी श्रीनृसिंह उपासना वाङ्मय सुद्धा उपलब्ध आहे. ( अशा सर्व वाङ्मयाचा व इतर प्रचंड माहितीचा एकूण साडेसोळाशे पृष्ठांचा तीन खंडात्मक " श्रीनृसिंह कोश " प्रकाशित झालेला आहे. हे अमूल्य शब्दधन सवलतीत केवळ तीनशे रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याविषयी सविस्तर माहिती उद्याच्या लेखात पाहू. )
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांची कथा तर सर्वश्रुत आहेच, पण अगदी तशीच कथा भगवान आद्य श्रीशंकराचार्यांच्या चरित्रात देखील घडलेली आहे. भगवान श्रीनृसिंहांनी पुन्हा एकदा आपले भक्तरक्षणाचे ब्रीद त्यांच्या बाबतीतही सार्थ ठरविलेले आहे. ही कथा विलक्षण असून आपलाही भक्तिभाव वाढवणारी आहे.
एकदा आद्य शंकराचार्यांचा श्रीशैल्याला मुक्काम असताना, अनेक वाईट धंदे जेथे चालत असत अशा त्या कर्दळीवनातील एक वामाचारी कापालिक तेथे आला. त्याने आचार्यांना पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की, हे सर्व उत्तम लक्षणांनी युक्त आहेत. अशा बत्तीस लक्षणी पुरुषाचा जर आपण आपल्या देवीला बळी दिला तर ती प्रसन्न होऊन इच्छित वर तत्काल देईल. म्हणून तो आचार्यांकडे आला व त्यांना सरळ म्हणाला की, " मला आपला बळी देण्याची इच्छा आहे. तुमचा बळी दिला की माझी इष्टदेवता प्रसन्न होऊन मला सिद्धी प्रदान करेल." त्याच्या इच्छेवर आचार्यांनी शांतपणे होकार दिला व परोपकारार्थ आयुष्य व्यतीत करणारे भगवान श्रीशंकराचार्य, त्याने सांगितलेल्या रात्री बळी जाण्यासाठी तयार राहिले.
आचार्यांनी ही गोष्ट आपल्या कोणाही शिष्यांना कळू दिलेली नव्हती. कापालिकाबरोबर ते जायला निघाले. इकडे आचार्यांचे प्रमुख शिष्य श्रीपद्मपादाचार्य यांना ध्यानात त्यांच्या इष्टदेवतेने अर्थात् भगवान श्रीनृसिंहांनी सांगितले की, " तुझ्या गुरूंवर मोठे संकट येऊ पाहते आहे. तू केवळ त्यांच्या मागे मागे जा, पुढचे आम्ही पाहून घेतो. देवांच्या आज्ञेनुसार श्रीपद्मपादाचार्य तडक निघाले. लपून छपून ते कापालिकाच्या मागोमाग त्याच्या कर्दळीवनातील अड्ड्यावर गेले. तेथे गेल्यावर त्या कापालिकाने आचार्यांची पूजा करून त्यांना बळी देण्यासाठी देवीसमोर ओणवे बसवले. एवढ्यात अचानकच पद्मपादाचार्यांच्या देहात भगवान नृसिंह प्रवेशले व त्यांनी भयंकर गर्जना करून त्या दुष्ट कापालिकाच्या हातातली तलवार घेऊन त्याचाच वध केला. कापालिक मेला तरी त्या उग्र रूपाच्या भयंकर गर्जना चालूच होत्या.
ते क्रोधाविष्ट पण भक्तवत्सल ' आवेशरूप ' पाहून श्रीशंकराचार्यांचे अष्टसात्त्विक भाव जागे झाले व त्यांनी नृसिंहरूपाचा तो अनावर क्रोध आवरावा म्हणून एक सुंदर स्तवन रचले. त्या भावभिजल्या स्तुतीने प्रसन्न होऊन श्रीपद्मपादाचार्यांच्या देहात प्रकटलेले नृसिंह भगवान आचार्यांना आशीर्वाद देऊन गुप्त झाले.
याशिवाय भगवान शंकराचार्यांनी रचलेली, " नृसिंह पंचरत्नम् " व " लक्ष्मीनृसिंह करावलम्बन स्तोत्र " ही दोन्हीही फार सुंदर स्तोत्रे आहेत. नृसिंहपंचरत्न स्तोत्रात श्रीआचार्य मनाला भ्रमराची उपमा देऊन, या वैराण मरुभूमीसारख्या जगातील नश्वर गोष्टींमध्ये सुखासाठी वेड्यासारखे फिरण्याऐवजी भगवान लक्ष्मीनृसिंहांच्या श्रीचरणकमलातील शाश्वत मकरंद ख-या आनंदासाठी तू सतत सेवन करावास, असे विविध उदाहरणे देऊन पटवून देतात. हे अवघ्या पाच श्लोकांचे स्तोत्र अतिशय लालित्यपूर्ण आणि मधुर आहे, सहज पाठ होऊन सारखे गुणगुणावेसे वाटते.
श्रीनृसिंह भगवंतांनी अशा प्रकारे पुन्हा एकदा आपले भक्तवात्सल्य दाखवीत भक्तरक्षणाचे ब्रीद पूर्ण केलेले आहे. भगवान श्रीनृसिंह ही वरकरणी जरी अत्यंत उग्र देवता असली तरी ती आपल्या भक्तांचा मातेप्रमाणे प्रेमानेच सांभाळ करीत असते. समर्थ श्रीरामदासस्वामी आपल्या अभंगात भगवंतांच्या याच दोन्ही वैशिष्ट्यांचा एकत्रित उल्लेख करून सांगतात की, " उग्र बहु नृसिंहोपासना । लोभे सांभाळी देव भक्तजना ॥ " सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त करणारे, भक्ताभिमानी भक्तवत्सल भगवान श्रीनृसिंह हे निजभक्तांचे लाडके दैवत न झाले तरच नवल !!
श्रीशंकराचार्य आपल्या करावलम्बन स्तोत्रात भक्तकरुणाकर श्रीनृसिंहरूपाचे सुंदर व अगदी चित्रदर्शी वर्णन करताना म्हणतात,
एकेन चक्रमपरेण करेण शङ्ख-
मन्येन सिन्धुतनयामवलम्ब्य तिष्ठन् ।
वामेतरेण वरदाभय-पद्मचिन्हं
लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलम्बम् ॥१४॥
आचार्य म्हणतात, " डावीकडील वरच्या एका हातात चक्र व दुस-या हातात शंख धरणा-या तर तिस-या हाताने सिन्धुतनया भगवती लक्ष्मीला आलिंगन दिलेल्या आणि उजवीकडील एका हाताने वर देणा-या, दुस-या हाताने अभयदान देणा-या व तिस-या हातात कमल धारण करणा-या हे नृसिंहप्रभो, आपण मला आपल्या हाताचा आधार द्या, माझा सर्वतोपरि सांभाळ करा ! "
मोजके आणि मार्मिक अनुप्रास साधून रचलेले हे संपूर्ण करावलंबन स्तोत्र फार मनोहर आहे. त्यातून भगवान आद्य शंकराचार्यांनी श्रीनृसिंहांची नेमक्या व भावपूर्ण शब्दांमध्ये महती गाऊन करुणा भाकलेली आहे. अनेक नृसिंहभक्तांच्या नित्यपाठात विसावलेली भगवान आद्य श्रीशंकराचार्यांची ही दोन्ही स्तोत्रे अप्रतिमच आहेत.
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!

लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

0 comments:

Post a Comment