8 May 2016

*** नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम् ***



आज वैशाख शुद्ध तृतीया, भगवान महाविष्णूंचे सहावे अवतार महावीर चिरंजीव श्रीपरशुराम यांची जयंती. हे ऋषिवर्य जमदग्नी व भगवती श्रीरेणुकामातेचे चतुर्थ व सर्वात धाकटे सुपुत्र होत.
त्याकाळातील निर्दय व प्रजाहिताचा विचार न करणा-या, सत्तेमुळे माजलेल्या, अनाचारी अशा क्षत्रिय राजांच्या विनाशासाठी हा अवतार झाला होता. साक्षात् शिवावतार जमदग्नी ऋषी व जगदंबा रेणुकामातेच्या पोटी भगवंतांनी अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळी अवतार धारण केला.
महासिद्ध आणि श्रेष्ठ राजा कार्तवीर्यार्जुन यांनी प्रारब्धवशात् जमदग्नींचा अपमान करून त्यांची कामधेनू त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बरोबर नेली. त्या अयोग्य गोष्टीचा बदला घ्यायचा म्हणून परशुरामांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांचे हजार हात कापून टाकले व शेवटी महापराक्रमी सहस्रार्जुन राजाचा वधही केला.
खरेतर, सहस्रार्जुन हे भगवान श्रीदत्तप्रभूंचे शिष्य होते व त्यांनीच दत्तप्रभूंना वर मागितला होता की, माझा मृत्यू तुमच्यासारख्याच कोणा महापुरुषाच्या हातून व्हावा. देवांच्याच प्रेरणेने परशुरामांनी त्यांचा वध केला. पण सहस्रार्जुनाच्या मुलांनी सूडाच्या भावनेने परशुरामांना मारण्यासाठी आश्रमावर हल्ला केला. परशुराम तेथे नव्हते म्हणून त्या आततायी राजपुत्रांनी जमदग्नींचाच वध केला. त्यांच्या त्या मूर्खपणावर संतापून, भ्रष्ट राज्यकर्त्यांचा पूर्णच नायनाट करण्याच्या आपल्या जन्मकार्याला पुढे ठेवून, परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वीवरील सर्व अनाचारी क्षत्रिय राजांचा संपूर्ण वंशच नष्ट केला. त्यांच्या रक्ताने भरलेल्या पाच तळ्यांच्या काठी पितृतर्पण करून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.
याठिकाणी लोक खूप मोठी गल्लत करतात. परशुरामांनी हे अयोग्य केले, संपूर्ण पृथ्वीवरचे क्षत्रिय मारले तर मग पुढे निर्माण कसे झाले, वगैरे अनभ्यस्त प्रश्न निर्माण करतात. एक लक्षात ठेवायला पाहिजे की, भगवान श्रीपरशुराम हे साक्षात् भगवंतांचे अवतार होते, ते कधीच चुकीचे वागणार नाहीत. त्यांनी केवळ जे अनाचारी व दुष्ट राजे होते, त्यांचाच वध केला. तोही सलग २१ वेळा. त्यांनी चांगल्या वागणा-या राजांना मारलेले नाही.
पुढे मारलेल्या राजांच्या रक्ताचे पाच डोह भरल्यावर तेथे त्यांनी आपल्या वडलांचे क्रियाकर्म केले व त्या रक्ताने तर्पण केले. रेणुकामाता सती गेल्या. हा सगळा भाग माहूर येथे घडला. तेथे प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंनीच त्या क्रियाकर्माचे पौरोहित्य केले होते. नंतर श्रीदत्तप्रभूंनी परशुरामांना रेणुकामातेचे दर्शन करविले व जमदग्नी-रेणुका हे साक्षात् शिव-पार्वती असल्याची जाणीव करवून दिली. त्यावेळी जमिनीतून श्रीरेणुकामातेचे मुख बाहेर आले, ज्याची आजही माहूर येथे पूजा केली जाते.
भगवान परशुरामांनी नंतर भगवान श्रीदत्तप्रभूंच्या पावन उपस्थितीत मोठा यज्ञ करून हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त घेतले व महर्षी कश्यपांना सर्व पृथ्वीचे दान दिले. दिलेल्या दानाचा आपण उपभोग घ्यायचा नसतो. म्हणून आता राहायचे कोठे? या विचाराने त्यांनी पश्चिम सागराला काही जागा मागितली, तीच आजची कोकण भूमी होय. भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा सर्व भाग भगवान परशुरामांनी वसवलेला असून त्यांनीच तेथील जनतेला शिक्षण दिले, ज्ञानी केले. परशुराम हे धनुर्विद्येचे महान आचार्य मानले जातात. त्यांनी पुढे भीष्माचार्य, कर्ण आदी महावीरांना धनुर्विद्या शिकवली. रामावतारात त्यांचे भगवान श्रीरामरायांशी युद्ध झाले व त्यांच्या ठिकाणचे क्षत्रिय तेज भगवान रामरायांमध्ये सामावले. आता भगवान परशुराम ब्रह्मर्षी होऊन आजही कोकण प्रांतात वास्तव्य करून आहेत. चिपळूण जवळील परशुराम क्षेत्री त्यांचे मोठे स्थान आहे. ते चिरंजीव अवतार आहेत. भगवान परशुरामांना स्वत: भगवान श्रीशिवांनी धनुर्विद्या शिकवली होती. प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांनी त्यांच्या " श्रीदत्तमाहात्म्य " या अद्भुत ग्रंथात अध्याय अठरा ते चोवीस या सात अध्यायांमधून भगवान परशुरामांचे सविस्तर चरित्र फार बहारीने वर्णिलेले आहे.
भगवान परशुराम हे साक्षात् भगवान श्रीदत्तप्रभूंचे शिष्य होते. त्यांना भगवान श्रीदत्तप्रभूंनी त्रिपुराविद्या अर्थात् श्रीविद्येचा अनुग्रह केलेला होता. त्या दोघांचा संवाद असलेला ' त्रिपुरा रहस्य ' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पुढे भगवान परशुरामांनी ही त्रिपुराविद्या कोयनानगर जवळील श्रीक्षेत्र दत्तधाम या ठिकाणी भगवान श्रीगोरक्षनाथांना कृपापूर्वक प्रदान केली.
सप्त चिरंजीवांमधील थोर विष्णुअवतार व ब्राह्मणांचे तारणहार, श्रीदत्तशिष्य परशुरामांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीयेला, अक्षय्य तृतीयेला रात्रीच्या पहिल्या प्रहरात झाला. आज संध्याकाळी तृतीया लागलेली असल्याने आजच परशुराम जयंती साजरी केली जात आहे.
भृगू ऋषींच्या कुळात जन्मले म्हणून " भार्गवराम ", हातात परशु म्हणजे कु-हाड धारण करतात म्हणून " परशुराम ",  रेणुकामातेचे पुत्र म्हणून " रेणुकातनय " अशी त्यांची विविध नावे संतांनी गायलेली आहेत.
अधर्माचा संपूर्ण नि:पात करणा-या, परम तेजस्वी व वेदवेदांगे तसेच धनुर्विद्येचे महान आचार्य असणा-या भगवान श्रीपरशुरामांच्या श्रीचरणीं, सादर साष्टांग दंडवत प्रणाम !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
https://m.facebook.com/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar-139539956212450 )

0 comments:

Post a Comment