8 Sept 2019

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची

( समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेल्या सुप्रसिद्ध श्रीगणेश आरतीचे विवेचन. )

रोहन विजय उपळेकर
8888904481

आरती म्हणजे भक्तहृदयाचा प्रसन्न आविष्कार. आपल्या आराध्याची अतीव प्रेमादराने गायलेली स्तुती म्हणजे आरती. 'रती' म्हणजे तीव्र अनुराग, प्रेम. म्हणून, अतीव प्रेमादराने केलेली क्रिया ही 'आरती' होय. भक्ताच्या हृदयातील सघन प्रेम ज्या प्रक्रियेने तो आपल्या आराध्यदेवतेला अर्पण करतो त्याला आरती म्हणतात ! आपल्याकडील भक्तिउपचारांमध्ये म्हणूनच आरतीला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे.
भगवान श्रीगणपती ही सर्वादिपूज्य देवता. त्यामुळे आरतीही त्यांचीच प्रथम म्हटली जाते. मराठी संतकवींपैकी समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्याच सर्वात जास्त प्रचलित आहेत. आपल्या अंगभूत रसाळता, अर्थघनता, मार्मिकता आणि गेयता आदी गुणांमुळेच श्री समर्थांच्या आरत्या सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी रचलेली सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । ही सर्वच मराठी जनांच्या नित्यपठणात असणारी गणपतीची आरती अतीव सुंदर आहे. आपण रोजच म्हणत असलेल्या आरतीचा अर्थ नीट समजला तर म्हणताना अधिक आनंद लाभतो; म्हणूनच हा लेखनप्रपंच.
बुद्धी व ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असणाऱ्या भगवान श्रीगणेशांच्या देखण्या स्वरूपाचे अत्यंत सुरेख वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात,
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची ।
नुरवी पुरवी प्रेमकृपा जयाची ।
सर्वांगीं सुंदर उटी शेंदूराची ।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मनःकामना पुरती ॥ध्रु.॥

भगवान श्रीगणेश सुखकर्ते आणि दुःखहर्ते आहेत. आपल्या भक्तांची सर्व प्रकारची दुःखे, ते केवळ आपल्या एका कृपाकटाक्षाने दूर करतात आणि शाश्वत सुख त्याच्या आयुष्यात निर्माण करतात. ज्यांची प्रेमकृपा दुःखांची वार्ताही नि:शेष नष्ट करते; त्या भगवान श्रीगणपतींनी सर्वांगी भक्तवात्सल्याच्या शेंदराची उटी चर्चिलेली असून, भक्तप्रेमरूपी मोत्यांची तेजस्वी माळ गळ्यात घातलेली आहे. अशा अखिल विश्वाचे मंगल करणाऱ्या मंगलमूर्ती देवाधिदेव विघ्नहर श्रीगणपतींचा जयजयकार असो ! त्यांच्या नुसत्या दर्शनानेही भक्तांच्या अखिल मनोकामना पूर्ण होतात.
श्री समर्थांनी इथे भगवान श्रीगणेशांचे 'मंगलमूर्ती' हे विशेष नाम वापरलेले आहे. त्याचा विचार करायला हवा. पूजनीय सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराज आपल्या 'देवा तूंचि गणेश' या ग्रंथात म्हणतात, "वेदांतील प्रत्येक अक्षर म्हणजे श्रीभगवंतांची मूर्ती आहे. अक्षरेच मंगल करणारी आहेत म्हणून तीच मंगलमूर्ती आहे. भगवंतांचा जन्म होतो तो अक्षरातूनच होतो. भगवंतांचे मूळ स्वरूप हे शब्दब्रह्मानेच नटलेले आहे. म्हणून मंदिरातल्या मूर्तीपेक्षाही भगवंतांच्या या शब्दमूर्तीला, नामाने तयार होणा-या त्यांच्या 'अक्षरमूर्ती'लाच जास्त महत्त्व असते." या कारणानेच श्री माउलींनी देखील श्री ज्ञानेश्वरी ग्रंथारंभी भगवान श्रीकृष्णांच्या अक्षरमय ज्ञानरूप श्रीगणेशांना वंदन केले आहे.
सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराजही याच संदर्भाने मनाच्या श्लोकांच्या सुरुवातीला भगवान गणेशांचे वर्णन "मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।" असे करतात. निर्गुण निराकार परब्रह्म मूळ स्वरूपात प्रथमत: अक्षरांतूनच प्रकट होत असते. म्हणूनच समर्थ गणेशांना निर्गुणाचा मूळारंभ आरंभ म्हणतात. श्रीभगवंतांचे हे अक्षरमय सगुण रूप सर्वांसाठी मंगलकारक असल्याने त्यालाच 'मंगलमूर्ती' असे संबोधले जाते. श्री समर्थांनी या आरतीच्या ध्रुवपदात त्यामुळे मंगलमूर्ती हेच विशेषण वापरलेले दिसून येते. भगवान श्रीगणेश सर्वांचे मंगल करणारेच आहेत.
सर्व प्रकारची संकटे नष्ट झाल्याशिवाय खरे सुखही अनुभवाला येणार नाही. मुळात संकटांनी घेरलेल्या व्यक्तीला सुख उपभोगताच येत नाही. चित्ताला शांतपणा तर हवा ना ते सुख भोगायला ? म्हणूनच, भगवान श्रीगणेश आधी आपल्या भक्ताची संकटे नष्ट करतात. मगच त्याला सुख लाभते. यासाठीच श्री समर्थांनी श्रीगणेशांच्या सुखकर्ता व दु:खहर्ता ह्या दोन्ही विशेषणांचाही एकत्रित वापर या पहिल्या चरणात केलेला आहे.
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरें चरणीं घागरिया ॥२॥

अनर्घ्य रत्नांनी जडवलेले सुंदर पदक गौरीकुमरा आपल्याला शोभा देत आहे. तुम्ही सर्वांगी ल्यालेली केशरयुक्त लालसर सुगंधी चंदनउटी मोहक दिसत आहे. तुमच्या मस्तकावरचा हिरेजडित मुकुट तेजाने तळपत असून पायातील घागऱ्या, पैंजण मधुर ध्वनी करीत भक्तांच्या हृदयात आल्हाद निर्माण करीत आहेत. तुमचे हे मनोहर रूप तुमच्या भक्तांच्या चित्तवृत्तींना अंतर्बाह्य वेध लावून, भुंग्याप्रमाणे त्यांना तुमच्या चरणकमलीच खिळवून ठेवत आहे.
या चरणात भगवान श्रीगणेशांच्या सगुण रूपाचे फारच मनमोहक वर्णन केलेले आहे.
आपण ज्यांची आरती करीत आहोत ते श्रीगणराय दिसतात कसे ? त्यांची रूपमाधुरी आहे तरी कशी ? याचे बहारदार वर्णन करताना श्री समर्थ आरतीच्या शेवटच्या चरणात म्हणतात,
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकष्टीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना ॥३॥

हे पीतांबर नेसलेल्या लंबोदरा, कंबरेला नागाचे बंधन धारण करणाऱ्या, सरळ सोंडेच्या व वाकड्या मुखाच्या गणराया, तीन नेत्र असलेल्या श्रीगजानना, हा रामाचा दास तुमची आपल्या घरी आतुरतेने वाट पाहात आहे. तुम्ही माझ्या या प्रेमप्रार्थनेचा स्वीकार करून माझ्या अंत:करणरूपी घरी लवकर प्रकट व्हावे आणि माझे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करून माझा आणि माझ्या श्रीरामभक्तीचा शेवटपर्यंत सांभाळ करावा. श्रेष्ठ देव-देवताही ज्यांना वंदन करतात अशा श्रीगणेशा, या रामदासाची प्रेमार्ती स्वीकारून तुम्ही आता भरभरून कृपा करावी !
भगवान श्रीगणेशांचे 'वक्रतुंड' हे नाम श्री समर्थांनी या चरणात योजलेले आहे. ह्या नामाचा उत्तम विचार सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. श्री ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाच्या नमनात माउली एका सुंदर ओवीत भगवान श्रीगणेशांचे मार्मिक गुणवर्णन करताना म्हणतात,
जो तुजविखी मूढ । तयालागी तूं वक्रतुंड ।
ज्ञानियांसी तरी अखंड । उजूची आहासी ॥ ज्ञाने.१७.०.४॥

श्रीगणेशांची सोंड हे काही त्यांचे तोंड नाही, ते तर नाक आहे, पण सोंड हेच जणू त्याचे तोंड वाटते. म्हणून त्यांना 'वक्रतुंड' म्हणतात. माउली म्हणतात, हे सदगुरुरूप गणराया, जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत, त्यांना तू वक्रतुंड दिसतोस, म्हणजे तू त्यांना रागावलेला, तिरस्कार करणारा वाटतोस ; पण जे तुझ्याविषयी प्रेम बाळगून आहेत, तुझ्या स्वरूपाचे ज्ञान ज्यांना झालेले आहे, त्यांच्यासाठी तू उजू म्हणजे सरळ सोंडेचाच आहेस. त्यांना तू कायम कृपामय, करुणाकरच वाटतोस.
सद्गुरु श्री माउलींनी गणेशांची सरळ सोंड ही सुविमल विवेकाचे प्रतीक मानलेली आहे. विवेक म्हणजे सारासार जाणण्याची क्षमता. आपल्या परमार्थासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार म्हणजे 'विवेक'. ज्यांना श्रीगणेशांविषयी प्रेम आहे व ज्यांच्यावर गणेशांनी अनुग्रह केलेला आहे, त्यांना कायमच या सुविमल अर्थात् शुद्ध विवेकाची प्राप्ती होते. असा हा विवेक निःसंशय सदगुरुकृपेनेच लाभतो. खरेतर हा विवेकच गुरुकृपा लाभल्याचे प्रथम द्योतक मानतात. प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या एका अभंगात म्हणूनच म्हणतात की, "विवेक तो मुख्य कृपेचे लक्षण । गर्भासी भूषण बुद्धीचिया ॥"
या विवेकाला इतके का बरे महत्त्व दिलेले आहे ? कारण; जेथे असा सुविमल विवेक असतो तिथेच साधनेने पुढे ज्ञान प्रकट होऊन परमानंदाची, महासुखाची प्राप्ती होत असते. श्रीगुरूंनी दाखवलेल्या मार्गानेच अत्यंत प्रेमाने व निष्ठेने साधना केल्यावर आपण विवेकरूपी तीर्थाच्या काठावर येऊन पोहोचतो. तिथे जन्मजन्मांतरी बुद्धीने साठवलेला कर्मांचा संस्काररूप मल स्वच्छ धुतला जाऊन बुद्धी शुद्ध होते. आणि त्यानंतरच खरेतर आपल्याला आत्मसुखाची प्राप्ती होते. म्हणून हा विवेक परमार्थात फार महत्त्वाचा मानला जातो.
सद्गुरु श्री समर्थांनी या आरतीच्या शेवटच्या चरणात योजलेल्या वक्रतुंड व सरळ सोंड ह्या दोन्ही शब्दांचा वरील श्री माउलींच्या विवेचनाच्या आधारे विचार केल्यावर आपल्याला आणखी सुंदर अर्थ लागतात. सद्गुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज अतिशय नेमकी शब्दयोजना करणारे तयारीचे कविश्रेष्ठ आणि विचक्षण शब्दप्रभू होते हे आपल्याला मनोमन पटते.
श्री समर्थ संप्रदायात यातील पहिले आणि तिसरे अशी दोनच कडवी म्हटली जातात. ‘रत्नखचित फरा..’ हे कडवे म्हणत नाहीत. ते प्रक्षिप्त मानले जाते. परंतु सर्वत्र ते प्रचलित असल्यामुळे मी या लेखात त्याचाही विचार केलेला आहे.
( http://rohanupalekar.blogspot.in )
गेली काही वर्षे गणेशोत्सव जवळ आला की, "समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेली गणपतीची मूळ सात चरणांची आरती" म्हणून एक आरती व्हॉटस्अॅप व फेसबुक सारख्या समाज माध्यमांमधून फिरू लागते. वस्तुत: अशी कोणतीही सात चरणांची आरती सद्गुरु श्री समर्थांनी रचलेली नाही. त्यांनी केवळ दोन चरणे व एक ध्रुवपदाची आरतीच रचलेली आहे. उर्वरित पाच चरणे नंतरच्या कोणा कवींनी रचलेली असावीत, पण ती नक्कीच समर्थांची रचना नाही. आजवर मिळालेल्या श्री समर्थांच्या कोणत्याही हस्तलिखितात ही पाच चरणे आलेली नाहीत. तेव्हा व्हॉटसअॅपवर फिरणाऱ्या या सात चरणांच्या मूळ आरतीकडे काणाडोळा करणेच उत्तम ठरेल.
काही अभ्यासकांचा, शेवटच्या चरणात ‘संकष्टी का संकटी’ यावर मतभेद आहे. या दोन्ही पाठभेदांचा अर्थ एकच होतो. संकष्टी पावावें म्हणजे संकटांमध्ये पावावे. संकष्टी चतुर्थीचा याच्याशी काहीही संबंध नाही. जुन्या काळातील मराठी भाषेत संकष्ट असाही शब्दप्रयोग होता ; त्यामुळे संकटी पावावे आणि संकष्टी पावावे हे दोन्ही पाठ अर्थदृष्ट्या बरोबरच आहेत. संकष्ट म्हणजे तीव्र कष्ट, मोठी दु:खे. आणि अशा संकटांच्या वेळी तर विघ्नहर्ताच स्वाभाविकपणे आठवणार ना !
काही ठिकाणी ‘दर्शनमात्रे मन स्मरणेमात्रे मन:कामना पुरती’ आणि ...जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती असे म्हणतात. ते मात्र पूर्ण चूक आहे. कोणाच्याही मूळ रचनेत आपले पदरचे शब्द घालणे, हे साधुसंतांनी चुकीचे वर्तन म्हणूनच सांगितलेले आहे. त्यामुळे मूळची आरती जशी आहे तशीच, शुद्ध शब्दोच्चार करीत म्हणायला हवी ; स्वतःचे कोणतेही शब्द त्यात न घालता. संतांच्या शब्दांना जसे अंगभूत सामर्थ्य असते तसे आपल्या शब्दांना नक्कीच नसते ; आणि म्हणूनच संतांच्या वाङ्मयात जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने होणारी ही पदरची भर आपण सर्वांनी कायमच टाळली पाहिजे. समर्थांनी तर अशा प्रकारे पदरचे शब्द घालणाऱ्याला मूर्खच म्हटलेले आहे.
मनोभावे आणि प्रेमाने केलेली आरती, स्तुतिप्रिय अशा श्रीभगवंतांच्या मनात आपल्याविषयी करुणा उत्पन्न होण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणूनच, कसलीही घाईगडबड न करता प्रेमाने आणि मनापासून, आरतीतील शब्दांचा सुयोग्य अर्थ जाणून, त्यातील भावना आपल्या अंतःकरणात रुजवून आरती म्हटली पाहिजे. जर आपण या श्रीगणेशोत्सवातच नाही तर रोजच्या पूजेतही अशाच प्रकारे समजून-उमजून आरती म्हटली, तर त्यातून अधिक आनंद तर लाभेलच ; शिवाय भक्तांवर निरतिशय प्रेम करणारे श्रीभगवंत देखील प्रसन्न होऊन आपल्या सर्व दुःखांचा समूळ नाश करून आपले आयुष्य सुखसमाधानाने भरून टाकतील यात तिळमात्रही शंका नाही !
मंगलमूर्ती मोरया ।
 रोहन विजय उपळेकर.




0 comments:

Post a Comment