28 Nov 2018

शिवचिदंबर पाहि माम्

नमस्कार  !
आज कार्तिक कृष्ण षष्ठी, भगवान सद्गुरु श्री चिदंबर दीक्षित महास्वामींची जयंती !
श्री.मार्तंड व सौ.लक्ष्मीबाई या सत्शील दांपत्याने चिदंबरक्षेत्री केलेल्या तपाचरणाचे फलस्वरूप हे श्री चिदंबर महास्वामी त्यांच्या पोटी फार अलौकिक अवतारी विभूती म्हणून जन्माला आले. प्रत्यक्ष भगवान श्रीशिवशंकरांनीच त्यांच्या रूपाने बेळगांव जिल्ह्यातील मुरगोड या क्षेत्री अवतार धारण करून अत्यंत अलौकिक लीला केलेल्या आहेत. ते प्रत्यक्ष भगवान श्रीशिवशंकरच होते, हे दाखविण्यासाठीच जणू काही जन्मत: त्यांच्या डाव्या कानावर बिल्वपत्र व अक्षता होत्या. अगदी बालवयापासूनच या वेदशास्त्रसंपन्न विभूतीने विलक्षण चमत्कार केलेले आहेत. त्यांना सावित्रीमाता व सरस्वतीमाता नावाच्या दोन पत्नी होत्या व पुढे त्यांना सहा पुत्रही झाले.
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे त्यांच्यावर अतिशय प्रेम होते. महास्वामींनी त्या काळातला अतिभव्य असा सोमयाग केला होता. त्यावेळी त्यांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांना मन:पूर्वक विनंती केली की, "आपण सर्व कार्यास उपस्थित राहावे." श्रीस्वामींनी प्रसन्नतेने होकार दिला. श्रीस्वामी महाराज नुसते उपस्थितच राहिले नाहीत, तर त्यांनी स्वत: त्या यज्ञाच्या दररोजच्या हजारो माणसांच्या पंगतींमध्ये स्वहस्ते तूप देखील वाढले. धर्मराज युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ जसा भगवान श्रीकृष्णांच्या पावन उपस्थितीत परिपूर्ण झाला, तसाच हा सोमयाग श्रीस्वामींच्या उपस्थितीत परिपूर्ण झाला.
श्री चिदंबर महास्वामींचा व आपल्या वारकरी संप्रदायाचा एक अनोखा पण अप्रकट ऋणानुबंध आहे. भगवान श्रीमहाविष्णूंच्या अवतारांमध्ये त्यांचे निस्सीम भक्तही बरोबर येत असतात, भगवंत एकटे कधीच येत नाहीत, असा नियमच आहे. श्रीनृसिंहांच्या अवतारात भक्तश्रेष्ठ प्रल्हाद व पद्मिनी नावाची त्यांची एक दासी होती, तेच श्रीरामावतारात अंगद झाले तर ती दासी मंथरा झाली. पुढे श्रीकृष्णावतारात प्रल्हाद हेच कृष्णसखा उद्धव झाले व ती दासी भक्त कुब्जा झाली. पुढे कलियुगात भगवंत सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या रूपाने आले, प्रल्हादच नामदेव झाले तर तीच दासी जनाबाईंच्या रूपाने अवतरली. नंतर नामदेवरायच श्री तुकाराम महाराज म्हणून पुन्हा आले व जनाबाई या बहेणाबाई म्हणून अवतरल्या. पुढे अठराव्या शतकात श्री ज्ञानेश्वर माउलीच चिदंबर महास्वामींच्या रूपाने आले, नामदेवराय हे चिदंबरशिष्य श्री राजाराम महाराज म्हणून आले व जनाबाईच चिदंबर-राजारामशिष्या विठाबाई म्हणून जन्माला आल्या. असा हा श्री चिदंबर स्वामींचा व वारकरी संप्रदायाचा अनोखा ऋणानुबंध आहे. श्रीसंत नामदेव महाराजांनी केलेली शतकोटी अभंगांची प्रतिज्ञा त्यांनी पुढील सर्व अवतारांमध्ये मिळून पूर्ण केलेली आहे. श्री राजाराम महाराजांचे एक लाख पेक्षा जास्त अभंग आजही हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहेत.
( http://rohanupalekar.blogspot.in )
श्री राजाराम महाराजांनी आपल्या अभंगांमध्ये श्री चिदंबर महास्वामींचा वारंवार साक्षात् भगवान श्रीपांडुरंग म्हणूनच उल्लेख केलेला आहे. श्री चिदंबर महास्वामींनी देखील अनेक सद्भक्तांना भगवान श्रीपांडुरंगांच्या रूपात दर्शन दिल्याचे प्रसंग त्यांच्या चरित्रात वाचायला मिळतात. श्री राजाराम महाराजांनी स्थापलेली श्री चिदंबर महास्वामींची मूर्ती विठ्ठलरूपातच आहे. ( या पोस्ट सोबतच्या फोटोमध्ये त्या श्रीमूर्तीचे दर्शन होते. )
श्रीसंत विठाबाईंना आळंदीला दर्शनाला गेल्या असताना प्रत्यक्ष माउलींनी आपल्या संजीवन समाधिविवराच्या आत नेले होते. त्यांनी त्या विवरातील अद्भुत दर्शनाचे वर्णन करणारे अभंगही रचलेले आहेत. श्रीसंत राजाराम महाराज हयात होते तोवर दररोजच्या भजनानंतर त्यांनी रचलेली,
आरती ज्ञानराजा । ज्ञानी प्रकाश तुझा ।
विज्ञानपूर्णब्रह्म । तूचि होसी महाराजा ।।१।।

ही माउलींचीच आरती म्हटली जात असे. हेच या दोन्ही अवतारांच्या एकरूपत्वाचे द्योतक नाही का ?
श्री चिदंबर चरित्रात एक सुंदर कथा येते, त्यातूनही माउली  व महास्वामींची एकरूपता दृग्गोचर होते. श्री माउली तीर्थयात्रा करीत काशीला गेलेले असताना, तेथील एका ब्राह्मणाच्या अयोग्य वर्तनावर ते प्रचंड चिडतात व त्याला, तू ब्रह्मराक्षस हो !  असा शाप देतात. त्याने खूप गयावया केल्यावर मग ते त्याला अभय देत सांगतात की, "६०० वर्षांनंतर आम्ही चिदंबर नावाने दक्षिणेत अवतार धारण करणार आहोत, तेव्हा तुझी या योनीतून सुटका करू." पुढे महास्वामींनी त्या ब्रह्मसमंधाचा उद्धार केल्याची गोष्ट त्यांच्या चरित्रात आलेली आहे. त्यावेळी त्या ब्रह्मसमंधानेच ही संपूर्ण कथा सांगितलेली आहे. अशा या श्रीभगवंतांच्या अवतारांच्या लीला फारच अलौकिक असतात. 
श्री चिदंबर महास्वामींच्या सर्वच लीला अत्यंत अद्भुत, भावपूर्ण आणि आश्चर्यकारक आहेत. ते श्रीस्वामी समर्थ महाराजांसारखे, साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच होते. महास्वामी अत्यंत प्रेमळ, कनवाळू व भक्तवत्सल होते. आपल्या भक्तांचा अतीव प्रेमाने व आईच्या मायेने ते सांभाळ करीत असत व आजही करीत आहेतच. त्यांच्या परमपावन चिदंबर-नामाचे या काळातही अत्यंत दिव्य अनुभव असंख्य भाविकांना नेहमीच येत असतात. कारण, माझा धाक मानी त्रिभुवनी लोक । यम कुंभीपाक धाक मानी ॥ अशा शब्दांत श्री चिदंबर महास्वामींनी आपल्या भक्तांना अभय दिलेले आहे. माझ्या भक्तांना मीच सर्वतोपरि सांभाळीन, असे ब्रीदवचनच महास्वामींनी उच्चारून ठेवलेले आहे व आजतागायत त्या ब्रीदाचे ते मोठ्या आनंदाने पालन करीत आहेत. म्हणूनच या अपूर्व-मनोहर श्री चिदंबर-अवताराच्या चरणीं जयंती निमित्त "शिवचिदंबर शिवचिदंबर" नामगजरात साष्टांग दंडवत घालू या !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

6 comments:

  1. खूप छान पोस्ट.

    ReplyDelete
  2. एका अपरिचित परमात्मा वीभुतीची आपण आम्हांस जाणीव करून दिलीत ! धन्यवाद आणि या विभूतिस साष्टांग दंडवत !

    ReplyDelete
  3. Khup surekh varnan. I had first time occasion to read about such a great saint

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर....नविन माहीती मिळाली...धन्यवाद रोहन दादा

    ReplyDelete
  5. खूप सुंदर पोस्ट 👌👌🙏🙏
    जय चिदंबर शिव चिदंबर 🙏🙏
    शिव शिव शिव शिव सांब चिदंबर हर हर हर हर सांब चिदंबर 🙏🙏

    ReplyDelete
  6. अप्रतीम, श्री चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत नमस्कार 🙏🙏🙏

    ReplyDelete