20 Aug 2019

वन्दे आलन्दिवल्लभम् - ४

सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे नाम हे श्रीभगवंतांच्या नामासारखेच पुण्यपावन आहे. 'ज्ञानदेव' या चतुराक्षरी नामाचा मनोभावे जप करणारा परमार्थाचा अधिकारी होतो असे अनेक संतांनी म्हणूनच सांगून ठेवलेले आहे. प्रज्ञाचक्षू ज्ञानेश्वरकन्या श्रीसंत गुलाबराव महाराजांच्या श्रीज्ञानेश्वर मधुराद्वैत संप्रदायात 'ज्ञानेश्वरमाउली' या सप्ताक्षरी नामाचा सदैव जप करतात. वारकरी संप्रदायातही 'महाराज ज्ञानेश्वर माउली' आणि 'ज्ञानोबा तुकाराम' ही नामे महामंत्र असल्यासारखेच मानतात. आजवर होऊन गेलेल्या असंख्य महात्म्यांनी या नामाच्या जपाने ब्रह्मस्थिती मिळवलेली आहे.
श्रीसंत एकनाथ महाराज, श्रीसंत हैबतराव बाबा आरफळकर व श्रीसंत गुलाबराव महाराज या तीन महात्म्यांना प्रत्यक्ष सद्गुरु भगवान श्री माउलींच्या मुखातून त्यांच्याच नामाचा उपदेश लाभलेला होता. श्रीसद्गुरूंकडून स्वनामाचा उपदेश होणे हाच मुळात अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो. या तिन्ही महापुरुषांना साक्षात् श्री माउलींकडून असा स्वनामाचा उपदेश झाला होता. याचा अर्थ त्यांच्यावर सद्गुरु श्री माउलींचे अात्यंतिक प्रेम होते. केवढे महान भाग्य आहे हे !!
सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पावन नामाचे आणि आळंदी क्षेत्राच्या दर्शनाचे माहात्म्य सांगताना सद्गुरु श्री एकनाथ महाराज म्हणतात,
ज्ञानदेव ज्ञानदेव वदतां वाचे ।
नाहीं कळिकाळाचे भेव जीवां ॥१॥
जातां अलंकापुर गांवीं ।
मोक्ष मुक्ति दावी वाट त्यासी॥२॥
ब्रह्मज्ञान जोडोनी हात ।
म्हणे मी तुमचा अंकित ॥३॥
वाचे वदतां इंद्रायणी ।
यम वंदितो चरणीं ॥४॥
एका जनार्दनीं भावें ।
ज्ञानदेवा आठवावें ॥ए.गा.३५०९.५॥

"ज्ञानदेव ज्ञानदेव असे सतत वाचेने वदणाऱ्या जीवाला कळिकाळाचे कसलेही भय राहात नाही. तो कधीच कोणत्याही भयाने पीडला जात नाही. मनोभावे अलंकापुर क्षेत्री श्री माउलींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाग्यवान जीवाला प्रत्यक्ष मोक्षच वाटाड्या म्हणून लाभतो. अर्थात् त्याचा मोक्षापर्यंतचा सगळा प्रवास सुखावह होतो. श्री माउलींच्या कृपेने ब्रह्मज्ञानच हात जोडून त्याच्या समोर उभे ठाकते. ज्ञान त्याचे कायमचे अंकित होऊन राहते. कृपासलिला इंद्रायणीचे नाम घेतल्याबरोबर महामृत्यू यमच त्याचे चरणी वंदन करतो.  सद्गुरु श्री माउलींच्या प्रकट अस्तित्वामुळे आळंदी देखील अशाप्रकारे मोक्षदायिनी ठरलेली आहे. म्हणूनच, श्रीसंत एकनाथ महाराज कळकळीने विनवतात की, तुम्ही-आम्ही सदैव प्रेमाने, आदराने, मनापासून सद्गुरु श्री ज्ञानदेवांना आठवावे, त्यांचे भजन-पूजन करावे, त्यांचे नामस्मरण करावे ; आणि धन्य होऊन जावे !"
(सद्गुरु भगवान श्री माउलींच्या चरित्रावर प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी रचलेल्या "श्रीज्ञानदेव विजय" या ओवीबद्ध ग्रंथाची माहिती व त्याआधारे श्री माउलींच्या नामाचे माहात्म्य कथन करणारा लेख खालील लिंकवर वाचता येईल.)
वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् - ४
https://rohanupalekar.blogspot.com/2018/08/blog-post_30.html?m=1

0 comments:

Post a Comment