27 Aug 2019

नमन संत त्रिमूर्तींना

नमस्कार !
आज श्रावण कृष्ण द्वादशी, श्रीसंत सेना न्हावी महाराज - पंढरपूर, श्रीसंत नारायण महाराज - बेटकेडगांव व स्वामी श्री स्वरूपानंद महाराज - पावस, अशा तिन्ही थोर सत्पुरुषांची पुण्यतिथी !
भगवान श्रीपंढरीनाथांचे अनन्य भक्त असलेल्या श्रीसंत सेना महाराजांच्या चरित्राबद्दल बरेच मतभेद आहेत. काहींच्या मते ते मूळचे महाराष्ट्रीय आहेत तर काहींच्या मते उत्तरभारतीय आहेत. चरित्रसंदर्भ काहीही असोत, पण ते भगवान श्री माउलींच्या काळातील थोर सत्पुरुष होते, श्री माउलींचे लीलासहचर होते यात मात्र काहीच शंका नाही. त्यांची अभंगरचना खूप छान आहे. "आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ॥"  हा त्यांचा रूपक-अभंग खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी सद्गुरु श्री माउलींवरही अप्रतिम अभंगरचना केलेल्या आहेत. ते त्यात श्री माउलींचा पूर्णब्रह्म म्हणूनच उल्लेख करतात. श्रीसंत सेना महाराजांच्या श्री माउलींवरील सर्व अभंगांच्या आधारे मी 'सेना म्हणे जगी पूर्णब्रह्म अवतरले' या शीर्षकाचा बापरखुमादेविवरु मासिकात एक लेखही पूर्वी लिहिलेला होता. त्यांचे अभंग पाहता हे स्पष्ट दिसून येते की, त्यांच्यावर प्रत्यक्ष श्री माउलींनीच अनुग्रहकृपा केलेली होती. त्यामुळे ते श्री माउलींचा 'आपले सद्गुरु' म्हणूनच सर्वत्र गौरव करताना दिसतात. उत्तरायुष्यात ते पंजाब, राजस्थान, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशात राहिले. त्या भागात आजही त्यांचा अनुयायी वर्ग आहे. त्यांची समाधी पंढरपुरात प्रदक्षिणा मार्गावर बेलीच्या महादेवासमोर आहे. संत सेना महाराजांच्या काही अभंगरचना शिखांच्या पवित्र श्रीगुरुग्रंथसाहिब मध्ये समाविष्ट आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरील चौफुल्या जवळील बेट केडगांव येथील थोर सत्पुरुष श्रीसंत नारायण महाराज हे महान राजयोगी होते. खूप राजेशाही थाटात ते राहात असत. सत्यनारायणाच्या पूजा करण्याची त्यांना आवड होती. ते एकाचवेळी एकशे आठ, एक हजार आठ अशा सामुदायिक सत्यनारायण पूजा करीत असत. बेटात यांनी बांधलेले श्रीदत्तमंदिर खूप छान असून तेथील श्रीदत्तमूर्ती ही शिवप्रधान आहे. म्हणजे या त्रिमूर्ती मध्ये मधले मुख हे श्रीविष्णूंच्या ऐवजी श्रीशिवांचे आहे. ( फोटो खाली दिलेला आहे. ) श्री नारायण महाराजांचे महानिर्वाण १९४५ साली बंगलोर येथे वयाच्या एकसष्टाव्या वर्षी झाले. त्यांचे समाधी मंदिर नंतर केडगांव येथे बांधण्यात आले. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या वडिलांकडे, प.पू.श्री.दत्तोपंत देशपांडे यांच्याकडे नसरापूरला पू.श्री.नारायण महाराज तरुण असल्यापासून येत असत. पू.मामाही बेटात त्यांच्याकडे बालपणापासून जात असत. प.पू.श्री.नारायण महाराजांच्या नित्यपूजेतील भगवान श्रीदत्तप्रभू आणि भगवान श्रीविष्णू यांच्या सोन्याच्या भरीव मूर्ती सध्या पुणे येथील महाराष्ट्र बँकेच्या विश्रामबाग वाड्यासमोरील शाखेच्या लॉकरमध्ये असतात. दरवर्षी श्रीदत्तजयंतीपूर्वी एक दिवस त्यांची पूजा होते व सर्वांना दर्शनही खुले असते. अतिशय सुबक व देखण्या आहेत या दोन्ही मूर्ती.
रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील आत्मरंगी रंगलेले थोर सत्पुरुष, स्वामी श्री स्वरूपानंद महाराज हे आमच्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे जवळचे स्नेही होते. स्वामी स्वरूपानंदांचे अभंग ज्ञानेश्वरी व इतर वाङ्मय खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या अभंगरचनाही अतिशय मार्मिक, अनुभूतिप्रचुर आणि रसाळ आहेत. प.पू.श्री.काकांनी आपल्या 'हरिपाठ सांगाती' ग्रंथामध्ये स्वामी स्वरूपानंदांच्या 'ज्ञानेश्वरी नित्यपाठा'च्या निवडक १०८ ओव्यांच्या लघुग्रंथाचा आवर्जून समावेश केलेला आहे.
आजच्या तिथीला, दि.१५ ऑगस्ट १९७४ रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास स्वामींनी पावस येथे देह ठेवला. नेमके त्याच दिवशी फलटण येथे कै.श्री.गोपाळराव फणसे व त्यांच्या पत्नी कै.सौ.अंबूताई प.पू.श्री.काकांच्या दर्शनाला गेले होते. त्यांनी प.पू.काकांना एक शाल अर्पण केली. त्यासरशी प.पू.काका उद्गारले, "आत्ताच तासाभरापूर्वी एका काळ्या माणसाने आम्हांला अशीच शाल घातली." कोणालाच त्यांच्या बोलण्याचा उलगडा झाला नाही. कारण असे कोणीच तत्पूर्वी तेथे आलेलेही नव्हते की कोणी शालही घातलेली नव्हती. सौ.अंबुताईंचे वडील स्वामी स्वरूपानंदांना मानणारे होते, त्याचा संदर्भ घेऊन, प.पू.काकांनी त्या वाक्यातून स्वामी स्वरूपानंदांच्या देहत्यागाचाच नेमका संकेत दिलेला होता. पण फणसेंना ही गोष्ट पुण्याला परत आल्यावर समजली.
यातून प.पू.काका व स्वामी स्वरूपानंद हे एकरूपच होते हे दिसून येते. श्री स्वामींच्या काही अनुगृहीतांनाही प.पू.काका व प.पू.स्वामींचे एकरूपत्व दृष्टांतांमधून अनुभवायला मिळाले होते. त्या अनोख्या लीला "सोनचाफ्याचा सुगंध" या पू.काकांच्या स्मृतिग्रंथाच्या भागांमध्ये छापलेल्या आहेत. पू.श्री.उपळेकर काका आपल्याच अवस्थेत असताना कधी कधी म्हणत की, "आम्ही इथूनच स्वरूपानंदांशी बोलतो !" स्वामी स्वरूपानंद आणि प.पू.योगिराज श्री.गुळवणी महाराज व त्यांचे शिष्योत्तम प.पू.योगिराज श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचेही अतिशय हृद्य स्नेहसंबंध होते. साधू दिसती वेगळाले । परि ते स्वरूपी मिळाले । हेच खरे आहे अंतिमत: !
या तीनही थोर सत्पुरुषांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग दंडवत !!
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )


7 comments:

  1. या तीनही अलौकिक सत्पुरुषाना सादर साष्टांग प्रणिपात!

    ReplyDelete
  2. सादर साष्टांग दंडवत...
    🙏🙏🙏💐💐💐

    ReplyDelete
  3. दत्तास्वरूप या त्रिमूर्तीला शतशः दंडवत

    ReplyDelete
  4. Namaste to all saints for their prabodhan

    ReplyDelete
  5. खुपच छान !

    ReplyDelete