1 Oct 2019

'वेडी केरसुणी' तथा श्रीसंत गजानन महाराज गुप्ते, नाशिक


आज आश्विन शुद्ध तृतीया, नाथ संप्रदायातील एक महान विभूतिमत्व, श्रीसंत गजानन महाराज गुप्ते यांची आज पुण्यतिथी.
विदर्भातील यवतमाळ येथे श्रीगोकुळाष्टमी, दि.१५ ऑगस्ट १८९२ रोजी जन्माला आलेले श्री.गजानन मुरलीधर गुप्ते तथा सद्गुरु श्री.गजानन महाराज गुप्ते तथा श्री गुप्तनाथ हे खरोखर अत्यंत अद्भुत असे जन्मसिद्ध महापुरुष होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रचंड देवी आल्याचे निमित्त होऊन लहानगा गजानन पांगळा झाला. बालवयातच आई-वडिलांचा वियोग त्याला सहन करावा लागला. त्याच्या बालविधवा मावशीने त्याचा सांभाळ केला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील रानअंत्री या क्षेत्री राहणाऱ्या श्री नारायण सरस्वती महाराजांकडे हे गुप्ते कुटुंब एकदा दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी गजानन दहा-बारा वर्षांचा होता. त्याच्या मावशीने डोळ्यांत पाणी आणून श्री.नारायण महाराजांसमोर पांगळ्या गजाननाची व्यथा सांगून त्याच्यावर कृपा करावी म्हणून प्रार्थना केली. त्याला पाहताच श्री.नारायण महाराज म्हणाले, "हा पूर्वजन्मीचा नाथपंथी योगी आहे. हा काही वर्षांनी मोठा साधू म्हणून खूप प्रसिद्धी पावेल, अध्यात्ममार्गातील पुष्कळ साधकांना मार्गदर्शन करेल. याच्या डोळ्यांतील बाहुल्यांवरून मी सांगतो की हा पूर्वजन्मी नाथयोगी होता. तुम्ही याची मुळीच काळजी करू नका !" श्री.नारायण महाराजांचे हे शब्द पुढे खरोखर सत्यात उतरलेले पाहायला मिळतात.
त्याच रात्री गजाननासह सर्व कुटुंबीय महाराजांच्या आश्रमातच राहिले. गजाननाला झोप येत नव्हती, म्हणून पहाटेच्या सुमारास आपल्या अंथरूणावर अर्धवट झोपेत उठून बसलेल्या गजाननाला एक अद्भुत दृश्य दिसले. त्याला समोर दिसले की, एक समाधी आहे. ती दुभंगून त्यातून एक दिव्य नाथसिद्ध प्रकट झाले. त्याचवेळी 'आदेश ॐ हंस: सोऽहं ब्रह्म' असा प्रचंड ध्वनी ऐकू आला. त्या सिद्धांच्या मुखातून 'हंस: सोऽहं' असे शब्द सतत निघत होते. तेच शब्द आपणही उच्चारत आहोत, असे गजाननाला स्पष्ट जाणवले. समोरच्या नाथसिद्धांनी सौम्य रूप धारण करून 'मच्छिंद्र आदेश' अशी गर्जना केली व हे सर्व दृश्य एका क्षणात हरपले. भान हरपलेला गजानन जेव्हा जागृतीत आला तेव्हा नुकताच सूर्योदय झालेला होता. त्याचे सर्व अंग घामाने डबडबलेले होते, कपडे भिजून चिंब झालेले होते. त्याच्या अंगातून सुगंध येत होता.
बरोबरच्या मंडळींनी त्याला श्री.नारायण महाराजांकडे नेले. त्यासरशी महाराज म्हणाले, "एवढ्या लहान वयात तुला श्रीमत्स्येंद्रनाथांचे दर्शन लाभले आहे. तुला जो मंत्र मिळाला तो मला म्हणून दाखवतोस का ?" त्या पूर्ण मंत्रातील केवळ 'सोऽहं' एवढेच लक्षात राहिलेले शब्द गजाननाने म्हणून दाखवले. प्रसन्न झालेल्या सद्गुरु श्री.नारायण महाराजांनी प्रेमाने गजाननाला अाशीर्वाद दिला, "जगात तुझी कीर्ती वाढेल. तू सदैव आत्मानंदात निमग्न राहशील. तुझ्या श्वासात तुला निरंतर माझे दर्शन होईल !" आणि अंगभर कुरवाळून वात्सल्यप्रेमाने निरोप दिला.
पुढे श्री.गजानन महाराज आपल्या वडीलबंधूंबरोबर, श्री.नारायणराव तथा कवी बी यांच्याबरोबर राहिले. अकोल्यात त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले. त्यांनी नंतर शिक्षण सोडून दिले. अकोल्यातल्या पडक्या किल्ल्यात जाऊन ते ध्यानाभ्यास करीत. ते सदैव सोऽहं भावातच वावरत असत. पुढे तरुणपणी सद्गुरुकृपेने त्यांना साधनेची पूर्णता अनुभवाला आली. त्यानंतर ते सदैव त्या आत्मानुसंधानातच वावरत असत.
तत्कालीन अनेक थोर साधुसंतांशी त्यांचा संबंध आला. शेगावचे श्री गजानन महाराज, शिर्डीचे श्री साईबाबा, प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज, कल्याणचे श्री राममारुती महाराज, वाशीम येथील श्री नंगे महाराज व श्री हरिरहरस्वामी, यवतमाळचे खटिया महाराज अशा अनेक विभूतींशी त्यांचे हृद्य संबंध होते. उत्तरायुष्यात ते या साधुसंतांच्या भेटींच्या कथा नेहमी सांगत असत.
आपल्या शिष्यांच्या घरी धुळे, मालेगांव, येवला, नाशिक, मुंबई इत्यादी ठिकाणी त्यांचे वास्तव्य होई. त्यांनी कधीच प्रवचन वगैरे केले नाही. साधकाचा भाव व पूर्वऋणानुबंध जाणून ते अनुग्रह देत असत. त्यांच्या कृपेचे अत्यंत अलौकिक अनुभव साधकांना येत असत. त्यांच्या ठायी नाथ संप्रदायाचे शांभव कृपावैभव पूर्ण बहरलेले होते. आयुष्याची शेवटची पंचवीस वर्षे त्यांचे वास्तव्य नाशिक येथेच होते. आजच्या तिथीला, वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी, दि.२८ सप्टेंबर १९४६ रोजी रात्री ११ वाजता त्यांनी नश्वर देहाचा त्याग केला. नाशिक येथे गोदावरीच्या काठावर त्यांचे समाधी मंदिर आहे. आज त्यांची ७३ वी पुण्यतिथी आहे.
श्री.गजानन महाराज नाशकात 'बायकांचा राम' म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवळाजवळच्या बैठ्या घरातील खोलीत राहात. ते दिवसातून दोनदा चहा घेत व दोन-तीन दिवसांतून एकदा जेवण करीत, तेही अर्धी पोळी व बिनाफोडणीची भाजी एवढेच. त्यांना स्वच्छ पोशाखाची व सुगंधी वस्तूंची आवड होती. त्यांची राहणी टापटिपीची व नेटकी होती. त्यांची शरीरयष्टी कृश, रंग गोरा, तरतरीत चेहरा, सरळ व धारदार नाक, पाणिदार डोळे आणि एकदम भेदक नजर होती. त्यांचा स्वभाव मिश्कील व विनोदी होता, स्वभाव अत्यंत सरळ व बालवत् होता. मनोवृत्ती अतिशय प्रसन्न व समोरच्याला सहज आपलेसे करणारी होती.
महाराज नेहमी सिगारेट ओढत व कधी कधी मद्यपानही करीत असत. ते पाहून बऱ्याच जणांना त्यांच्या साधुत्वाविषयी शंका येई. मुळात शंका यावी हाच तर त्यांचा त्यामागचा उद्देश होता. पण जे नि:शंक मनाने व श्रद्धेने त्यांना शरण गेले त्या भाग्यवान जीवांवर त्यांनी आपल्या अमोघ कृपेचा वर्षाव करून त्यांना धन्य केले.
सद्गुरु श्री.गजानन महाराजांचे "आत्मसाक्षात्कार मार्गप्रदीप" या नावाचे सुंदर चरित्र, श्रीसंत बीडकर महाराजांचे चरित्र लिहिणारे पुण्याचे कै.श्री.ल.ग.बापट यांनीच लिहिलेले आहे. त्यात शेवटी श्री.महाराजांच्या अनेक शिष्यांचे अद्भुत अनुभवही ग्रथित केलेले आहेत. ते वाचताना आपण अक्षरश: चकितच होऊन जातो.
श्री.गजानन महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा व आजच्याही काळात प्रत्येक परमार्थ साधकाने अावर्जून अभ्यासावा असा ग्रंथ म्हणजे "आत्मप्रभा" हा होय. प्रस्तुत ग्रंथ गुरुशिष्य संवादात्मक अाहे. त्यात महाराज स्वत:चा उल्लेख अत्यंत विनम्रतेने "वेडी केरसुणी" असा करतात. श्रीसद्गुरूंच्या घरची मी केरसुणी आहे, अशी त्यांची भावना होती. आत्मप्रभा ग्रंथ श्रीसंत स्वरूपानंद स्वामी महाराजांना अतिशय आवडत असे. ते त्यांच्या प्रत्येक शिष्याला तो वाचायलाच सांगत. सध्या या ग्रंथाची आवृत्ती पावसच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाने प्रकाशित केलेली उपलब्ध आहे. प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे देखील नेहमी या ग्रंथाचा गौरवाने उल्लेख करतात. परमार्थ साधकांसाठी अत्यंत मोलाचे व मार्मिक असे उपदेशामृत या ग्रंथामधून श्री.गजानन महाराजांनी उपलब्ध करून दिलेले आहे. साधनेची पथ्ये, साधकाची कर्तव्ये, साधनेतील Do's and Don'ts, खरे व खोटे साधुत्व ओळखण्याचे मार्ग, अाध्यात्मिक प्रगतीची लक्षणे, शिष्यकर्तव्ये आणि गुरूंची कर्तव्ये, परमार्थासाठी आवश्यक असणारे सद्गुण यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा सुंदर ऊहापोह त्यात श्री.महाराजांनी केलेला आहे. पाऊणशे वर्षांपूर्वीच त्यांनी जे मांडले आहे, तेच आजही पूर्णसत्य आहे. परमार्थाच्या नावाने बाजार मांडलेल्या तथाकथित गुरूंचा त्यात त्यांनी सुयोग्य समाचार घेतलेला आहे. आजमितीस अशा भंपक व भोंदू गुरूंचाच सर्वत्र सुळसुळाट आहे. श्री.गजानन महाराजांचे त्याबद्दलचे परखड बोल म्हणूनच साधकांनी अभ्यासपूर्वक जाणून घेऊन आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. अतिशय साध्या-सोप्या, सहज समजेल अशा भाषेत व चपखल उदाहरणे देऊन श्री.गजानन महाराजांनी आत्मप्रभा ग्रंथात अध्यात्माचे विविधांगी विवेचन केलेले आहे. हा ग्रंथ प्रत्येकाने आवर्जून वाचावाच, अशी मी आजच्या पावन दिनी सर्वांना प्रार्थनापूर्वक विनंती करतो.
सद्गुरु श्री.गजानन महाराजांचे फार अधिकारी असे शिष्य होऊन गेले. पुण्याचे प.पू.श्री.दादा महाराज आंबेकर, सोलापूरचे प.पू.श्री.नाना पाठक आणि वेळापूरचे प.पू.श्री.भाईनाथ महाराज कारखानीस हे तिन्ही श्री.गजानन महाराजांचे अधिकारी शिष्योत्तम होते. यांतील प.पू.श्री.नाना पाठक व प.पू.श्री.भाईनाथ महाराजांचा प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांशी चांगला संबंध आलेला होता. हे दोन्ही महात्मे फलटणला पू.श्री.काकांच्या दर्शनाला नेहमी येत असत. दोघांच्याही चरित्रात अशा भेटींचे उल्लेख आहेत. प.पू.श्री.भाईनाथ महाराज व प.पू.श्री.दादा महाराज आंबेकर यांचा प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांशीही हृद्य स्नेह होता. पू.भाई महाराज तर पू.श्री.मामांच्या श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन संस्थेचे विश्वस्तही होते. प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज लहानपणी आपल्या वडिलांबरोबर एकदा नाशिकला गेले असताना पू.श्री.गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. हे सर्व अतिशय रंगलेले महात्मे असल्याने सर्वांचा एकमेकांशी फारच गोड स्नेहबंध होता.
मी पहिल्यांदा जेव्हा श्रीसंत गजानन महाराजांचे चरित्र वाचले तेव्हा मी प्रचंड भारावूनच गेलो होतो. त्यात भरभरून नोंदवलेला, त्यांच्या शिष्यांना आलेल्या अत्यंत अलौकिक अनुभूतींचा खजिना फारच वेड लावणारा आहे. त्यानंतर एकदा नाशिकला गेलो असताना मी आवर्जून श्री.गजानन महाराजांच्या समाधिस्थानी जाऊन दर्शन घेऊन आलो होतो. सद्भाग्याने मला पू.श्री.गजानन महाराजांचे शिष्योत्तम प.पू.श्री.भाईनाथ महाराज कारखानीस यांचे दोन-तीनदा दर्शन लाभलेले आहे. पू.नाना पाठक यांचे 'सद्गुरुचरणाखाली' हे चरित्र व पू.दादा महाराज आंबेकर यांनी लिहिलेला ग्रंथ 'नाथपंथी ध्यानयोग' तसेच त्यांच्या चरित्रातील प्रसंग वाचतानाही फार आनंद लाभला होता, नेहमीच लाभतो. खरोखर ही सर्व फार फार महान विभूतिमत्वे होती.
आज प.पू.श्री.गजानन महाराजांच्या पुण्यतिथी दिनी, त्यांच्या आणि त्यांच्या अनन्य गुरुभक्त अशा सर्व शिष्यांच्या श्रीचरणीं सद्भावपूर्वक दंडवत घालतो व ही शब्दपूजा त्यांच्या श्रीचरणीं समर्पितो !
लेखक : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

( http://rohanupalekar.blogspot.com)



2 comments:

  1. Please arrange for a pdf of "आत्मसाक्षात्कार मार्गप्रदीप"
    Shridhar Alurkar, Bangalore Mobile 9689891693 alurkar.shridhar@gmail.com

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर, वेधक, वेचक माहिती

    ReplyDelete