27 Nov 2016

बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित

कार्तिक कृष्ण त्रयोदशी !!
जशी आम्हांला श्रावण कृष्ण अष्टमी सर्वात महत्त्वाची तिथी वाटते, तशीच कार्तिक कृष्ण त्रयोदशी देखील आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रावणात अष्टमीला पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्रप्रभूंची, तसेच त्यांचे अभिन्न स्वरूप सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींची जयंती असते. म्हणून तो आमच्यासाठी सर्वात मोठा सण आहे. कार्तिक कृष्णपक्षात श्रीमाउलींनी आळंदीतील आपल्या पुरातन स्थानीच पुन्हा संजीवन समाधी घेतली. म्हणूनच श्रीसंत गुलाबराव महाराज आळंदीला ' नित्यतीर्थ ' असे म्हणतात. हेच त्यांचे समाधीचे युगानुयुगांचे जुनाट स्थान आहे. येथूनच ते पुन्हा पुन्हा अवतार धारण करून येतात व अवतार समाप्तीनंतर पुन्हा तेथेच परत जातात. आळंदी प्रमाणेच ' माउली ' हे पण ' नित्यतीर्थ ' आहेत, तेच सगुण साकार झालेले साक्षात् परिपूर्ण परब्रह्म आहेत !
परमकरुणार्णव श्री माउलींच्या कृपासाम्राज्यात अनेक संतरत्ने निर्माण झालेली आहेत. त्यांतील स्वतेजाने तळपणा-या काही थोर विभूतिमत्वांमध्ये, फलटणचे महान संत प. पू. श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज व पुण्याचे योगिराज प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज; यांचे नाव अग्रक्रमावर आहे. या दोन्ही निस्सीम माउलीभक्तांचे चरित्र व कार्य श्री माउलींनाही समाधान देईल, इतके वैशिष्ट्यपूर्ण आहे. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे उत्तराधिकारी, प्राचार्य प. पू. श्री. शिरीषदादा कवडे हेही फार विलक्षण माउलीभक्त आहेत.
दरवेळी आपण ज्यांचा उत्सव असेल त्या सत्पुरुषांचे जीवन व कार्याचे थोडक्यात सेवा म्हणून मनन करतो. पण यावेळी नेहमीच्या पद्धतीऐवजी आपण प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी रचलेल्या माउलींवरील नितांतसुंदर अभंगांच्या आधारे, संजीवन समाधिदिनी श्रीमाउलीचरणीं दंडवतपूर्वक पुष्पांजली समर्पूया !
आजवरचे सर्व संत श्रीमाउलींचे गुणगान गाण्यात, त्यांची सेवा-चाकरी करण्यात धन्यता मानत आलेले आहेत. तीच परंपरा पाळत प. पू. श्री. शिरीषदादा देखील भगवान माउलींच्या अलौकिक व अद्वितीय माहात्म्याचे सुरेख वर्णन करताना म्हणतात,
सागराची गाज शोभे तयापाशी ।
थेंबुटे आवेशी कोण काजा ॥१॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हांपुढे केवी ।
वाचाळी करावी लेकुराने ॥२॥
बोबड्या उत्तरे रिझे जरी तात ।
अज्ञानाची मात कवणासी ॥३॥
मी तो अज्ञ पोर, अंध पंगु मुके ।
उच्छिष्ट भातुके द्यावे माते ॥४॥
अमृतेसी काही ठावे नाही आन ।
मर्यादेचे मौन भले मानी ॥५॥
महासागराच्या किना-यावर उभे राहिलो असता, त्याची जी रौद्र-मोहक व विलक्षण गाज जाणवते, तिचा मन भरून आस्वादच घ्यायचा असतो. बारक्याशा थेंबुटाने कितीही आवेश आणला, तरी त्याला काही त्या गाजेचा आव आणता येणार नाही. अहो माउलीराया, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात, तुमच्यासमोर आम्ही सर्व त्या थेंबुटासारखेच आहोत. म्हणूनच, मायबापा ज्ञानेश्वरा ! तुमच्यापुढे आम्ही वाचाळी करावी तरी कोणत्या तोंडाने? आम्ही लेकुरवाचेने बोबडे बोलावे, हेच उत्तम. त्या बोबड्या बोलाने मायबाप रिझतात, कौतुकाने बाळाला कडेवर घेऊन लाड करतात; हे जरी खरे असले, तरी शेवटी अज्ञानाची गती आणखी ती काय असणार?
देवा, मी तर आपल्या घरचे अज्ञानी, अंध, पंगू व मुके पोर आहे. मला योग्य काय अयोग्य काय? याचे ज्ञान नाही; माझ्या चर्मनेत्रांना माझे हित कधी दिसतच नाही, म्हणून ते एका अर्थाने अंधच आहेत. मला माझ्या प्रारब्धानुसार, कर्मांचीच गती आहे, म्हणून मी पांगळाच आहे, मला स्वतंत्र चालताही येत नाही. जे बोलायला हवे ते, श्रीभगवंतांचे नाम, गुण, लीला मी कधीच बोलत नाही, पण बाकीचे सर्व अकारण बोलत बसतो, म्हणून मी खरेतर मुकाच आहे. पण अहो दयावंता, तुम्हांला माझी दया येऊ द्यावी. ती आली तर आपल्या कृपेच्या उच्छिष्ट प्रसादावर मी पोसला जाऊन, ख-या अर्थाने संपन्न होईन, धष्टपुष्ट होईन.
प्रेमसागरा माउली भगवंता, मला बाकी काहीही कळत नाही, पण मर्यादेचे मौन मात्र मी आपल्या कृपेने जाणतो व तेच सुयोग्य असे मौन धारण करून आता आपल्या समोर हात जोडून उभा आहे !
खरोखरीच भगवान श्री ज्ञानराज माउलींच्या समोर उभे राहताना साधकाची काय भावभूमिका असावी, याचे अप्रतिम वर्णन प. पू. श्री. दादांनी या अभंगात केलेले आहे.
भगवान श्री माउलींची प्रार्थना करताना प. पू. श्री. दादा म्हणतात,
आपुल्या दयेचा मज भरवंसा ।
जीव जाला पिसा ज्ञानदेवा ॥१॥
अज्ञ मी म्हणोनि करावा अव्हेर ।
व्हावे ना कठोर ऐसे ताता ॥२॥
मूर्ख मतिमंद दोषांचे आगर ।
खुळे जरी पोर आपुले ना ॥३॥
बापा ज्ञानेश्वरा तुम्हां ठावे हित ।
जाणता उचित लेकुराचे ॥४॥
रसरंगी मिठी घातलीसे पायी ।
दुजी आस नाही अमृतेसी ॥५॥
सद्गुरु श्री ज्ञानदेवा भगवंता, आपल्या निरंतर दयेचा मला भरवसा आहे. आपल्यासाठी माझा जीव वेडापिसा झालेला आहे. अहो कृपावंता ताता, आपण कठोर होऊन अज्ञानी म्हणून माझा अव्हेर करू नका. मी जरी मूर्ख, मतिमंद, अनेक दोषांचे आगर असलो, वेडा खुळा असलो तरी आपलेच पोर आहे ना !
मायबापा ज्ञानेश्वरा, आपणच माझे खरे हित कशात आहे ते जाणता, तेव्हा माझ्यासाठी जे काही उचित असेल तेच आपण कृपावंत होऊन मला प्रदान करावे. आपल्या श्रीचरणीं मी मिठी घालून निश्चल बसलेलो आहे, आता मला आपल्या स्मरणाशिवाय, आपल्या कृपेशिवाय दुसरी कसलीही आस उरलेली नाही. आपल्या या अजाण लेकरावर माय माउली भगवंता, आपण कृपावर्षाव करणार ना !
भगवान श्री माउली नुसते समाधिस्थ नाहीत, ते ' संजीवन समाधिस्थ ' आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत. ते आजही आळंदीत आहेत, त्यांच्या भक्तांच्या हृदयात प्रेमाचा आस्वाद घेत आहेत, त्यांच्या नामामध्ये आहेत, त्यांच्या चरित्रात आहेत. जो प्रेमादराने व कळवळून त्यांना हाक मारेल, त्याच्यासाठी ते सदैव त्या अनन्यभक्ताच्या समोरच आहेत !
आज भगवान सद्गुरु श्री ज्ञानराज माउली महाराजांच्या संजीवन समाधी दिनी, त्यांच्या सर्वार्थदायक श्रीचरणारविंदी वारंवार दंडवतपूर्वक नमन करून, प. पू. श्री. दादांच्याच शब्दांद्वारे कृपायाचना करूया आणि ' श्रीज्ञानदेव माउली ' या पुण्यपावन नामगजरात त्याच श्रीचरणीं विसावूया !!!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्सप, हाईक सारख्या माध्यमांद्वारे शेयर करून आणखी लोकांपर्यंत पोहोचवावी, ही नम्र विनंती. अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी खालील कम्युनिटी जरूर लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

16 comments:

  1. श्री चरणी साष्टांग नमन... 🙏

    ReplyDelete
  2. जगन्माउलीना साष्टांग दंडवत

    ReplyDelete
  3. गगन्माउलीस साष्टांग नमस्कार

    ReplyDelete
  4. 💐💐💐🙏🙏🙏
    Il श्री सदगुरवे नमः ll

    ReplyDelete
  5. ll श्रीगुरुदेव दत्त ll

    ReplyDelete
  6. Maulila maghe sastang dandvat

    ReplyDelete
  7. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत

    ReplyDelete
  8. मनापासून धन्यावाद

    ReplyDelete
  9. Parampoojya sadguru shree Dnyaneshwar mauli ani parampoojya sadguru shree Dadanche sukomal charani shirsashtang dandawat.

    ReplyDelete
  10. 🙏🏻🙏🏻श्री माऊली 🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  11. श्री सद्गुरू चरणी सिर साष्टांग दंडवत 🙏🏻

    ReplyDelete
  12. शतशः दंडवत, दादांचे दोन्ही अभंग अतिशय भक्तीरसप्रधान

    ReplyDelete
  13. भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींना साश्टांग दंडवत

    ReplyDelete
  14. दोन्ही अभंग मनाला खूप भावले. प्रणाम

    ReplyDelete