29 Mar 2019

श्रीज्ञानेश्‍वरीचे अपूर्व भाष्यकार - प.पू.सद्गुरु श्री.मामा



‘‘आई, श्री ज्ञानेश्‍वर माउली ‘पायाळू’ हा शब्द खूप वेळा वापरतात. ‘पायाळू’ चा नेमका अर्थ काय गं ?’’ त्यावर मातु:श्री म्हणतात, ‘‘सख्या, सांग बरे, आपण ‘मायाळू’ कोणाला म्हणतो ? तर ज्याच्या हृदयात सर्वांविषयी अपार माया असते, तो मायाळू. तसे ज्याच्या हृदयात सद्गुरूंचे पाय, श्रीचरण अखंड प्रतिष्ठापित असतात तोच पायाळू.’’ असा माउलींच्या दिव्य शब्दांचा विलक्षण आणि अपूर्व अर्थ सांगणार्‍या मातु:श्री म्हणजेच राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पूर्ण कृपांकित प.पू.सद्गुरु पार्वतीदेवी देशपांडे होत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजेच थोर स्वातंत्र्यसेनानी व विश्‍वविख्यात सत्पुरुष, प.पू.सद्गुरु श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे हे होत. आज फाल्गुन कृष्ण नवमी, २९ मार्च २०१९ रोजी पू.श्री.मामांची २९ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त या अलौकिक प्रतिभासंपन्न ज्ञानेश्‍वरी अभ्यासकाच्या कार्याचा हा अल्प परिचय.
प.पू.श्री.मामासाहेब हे भगवान श्री ज्ञानेश्‍वर माउलींचे निष्ठावंत भक्त व संतवाङ्मयाचे साक्षेपी, रसज्ञ अभ्यासक होते. ‘माउली’ हे त्यांचे हृदय अधिष्ठाते होते. माउलींच्या वाङ्मयाचा अखंड अभ्यास हा त्यांचा एकमात्र ध्यास होता. माउलींच्या वाङ्मयाच्या शब्दान् शब्दावर त्यांनी सखोल चिंतन केलेले होते. झोपेतून उठल्याक्षणीसुद्धा ते माउलींच्या ओव्यांचे चिंतन करू शकत असत. इतकी ज्ञानेश्‍वरी त्यांच्या आत मुरलेली होती. एवढा प्रचंड अधिकार असूनही हा थोर उपासक आजन्म स्वत:ला माउलींचा दासानुदास मानीत होता. स्वत:ची अभ्यासू वृत्ती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ताजी, टवटवीत ठेवलेली होती. म्हणूनच माउलींच्या कृपेने त्यांचा हृदयगाभारा अलौकिक ज्ञानतेजाने लखलखीत उजळलेला होता. 
प.पू.श्री.मामांचा जन्म प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांच्या आशीर्वादाने व त्यांच्याच अंशाने झाला. आषाढ शुद्ध द्वितीया, २५ जून १९१४ रोजी प.पू.दत्तोपंत व प.पू.सौ.पार्वतीदेवी देशपांडे या सत्त्वशील दांपत्याच्या पोटी पू.मामा जन्मले. त्यांना सद्गुरु मातु:श्री पार्वतीदेवींकडून श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेची शक्तिपातदीक्षा लाभली. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना भगवान श्रीपंढरीनाथांचा सगुणसाक्षात्कार झाला. पुढे योगिराज सद्गुरु श्री.गुळवणी महाराजांकडून शक्तिपातपूर्वक मंत्रदीक्षाही त्यांना लाभली. त्यांच्यावर श्री ज्ञानेश्वर माउलींचीही पूर्णकृपा होती. अशाप्रकारे प.पू.श्री.मामा हे नाथ-दत्त-भागवत या तिन्ही संप्रदायांचे थोर अध्वर्यू ठरले.
प.पू.श्री.मामांनी आजन्म पंढरीची वारी केली. संपूर्ण हयातीत लाखो प्रवचनांच्या माध्यमातून श्री माउलींचा ज्ञानसंदेश जनमानसात वितरित केला. १९७३ साली इंग्लंडमधील त्यांच्या प्रवचनांनी भारावून जाऊन अनेक परदेशी व्यक्तींनी देखील ज्ञानेश्‍वरीचा अभ्यास सुरू केला. संतविचारांच्या आधारे उपासनेला सुरुवात केली.
प.पू.मामा हे तरुणपणी उत्तम नाट्य दिग्दर्शक व नाट्य क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी माउलींच्या जीवनावर लिहिलेले ‘चैतन्य चक्रवर्ती’ हे चार अंकी संगीत नाटक अतिशय बहारीचे आहे. त्यांच्या संहितेवरूनच काही वर्षांपूर्वी ‘ज्ञानोबा माझा’ हे संगीत-नाटक रंगभूमीवर आले व हिंदुस्थानभर गाजले होते. 
श्री माउलींचे वाङ्मय हे बहुआयामी, प्रगल्भ आणि एकाच वेळी अनेक अर्थांनी प्रकटणारे आहे. त्यासाठी त्याचा अभ्यासकही तसाच अष्टावधानी, रसज्ञ, अभिजात सौंदर्यदृष्टी असणारा व भक्तिमानच असावा लागतो. तरच त्याच्या बुद्धीत माउलींच्या साहित्याचे बीज रुजते. पू.मामा हे माउलींच्या वाङ्मयाचे असेच आदर्श अभ्यासक होते. त्यांची दृष्टीदेखील माउलींसारखीच सूक्ष्म आणि शुद्ध होती. माउलींना नेमके काय म्हणायचे आहे? हे त्यांना अचूक समजत असे. ज्ञानेश्‍वरीच्या अतिशय कठीण समजल्या जाणार्‍या सहाव्या अध्यायातील अभ्यासयोगावर फारच थोड्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या विषयावरील पू.मामांचेच विवरण जगभर प्रमाण मानण्यात येते. त्यांना आजवरच्या सर्वच थोर महात्म्यांनी व विचारवंतांनी ‘ज्ञानेश्‍वरीचे अपूर्व भाष्यकार’ म्हणून एकमुखाने गौरविले आहे. आचार्य अत्रे देखील पू.मामांकडे येऊन आवर्जून ज्ञानेश्‍वरीचे मार्गदर्शन घेत असत.
 [  प.पू.मामांचे चरित्र पूर्वी एका स्वतंत्र लेखमालेद्वारे लिहिले गेले होते. त्या अल्पचरित्राची पीडीएफ खालील लिंकवर उपलब्ध आहे. ज्यांना वाचायची असेल त्यांनी डाऊनलोड करून घ्यावी. 
झळाळते अलौकिक श्रीदत्तब्रह्म
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wQTNHanAzM01KWHM/view ]
प.पू.मामा हे फार दूरदृष्टीचे महात्मे होते. प्रवचनांमधून सांगितलेले ज्ञान हे तेवढ्यापुरतेच राहते. त्यातले सगळे काही लोकांच्या लक्षात राहत नाही. पण त्याच उपदेशाचे संकलन जर पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर मात्र त्याचा लाभ अनंत काळपर्यंत होत राहतो. याच संपन्न जाणिवेतून पू. मामांनी ‘श्रीवामनराज प्रकाशन’ नावाने एक संस्था स्थापन करून माउलींच्या व इतर संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास पुस्तकांच्या माध्यमातून ना नफा तत्त्वावर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आजमितीस अडीचशे पुस्तके  प्रकाशित करून अल्पदरात विक्री करणारी ही एकमात्र आध्यात्मिक प्रकाशन संस्था म्हणून विख्यात आहे. माउलींचे वाङ्मय जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा पू.मामांचा एक महान संकल्पही हळूहळू पूर्ण होत आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये मराठी संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास होत आहे ही फार अभिमानाचीच बाब आहे. 
आजच्या या पुण्यतिथी-योगाचे औचित्य साधून ज्ञानेश्‍वरीच्या या अलौकिक आणि अपूर्व भाष्यकाराच्या, प.पू.सद्गुरु श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या श्रीचरणीं ही सप्रेम शब्दसुमनांजली अर्पण असो ! त्यांनी लावलेली ही ज्ञानज्योत आपण सर्वांनी अनुसरून हा अभ्यास-वसा जोपासणे, वाढवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज व प.पू.श्री.मामांचे अत्यंत दृढ प्रेमनाते होते. आषाढी वारीतील फलटण मुक्कामात व इतरही वेळी प.पू.मामा प.पू.काकांकडे येत असत. दोघांची ज्ञानेश्वरी या अत्यंत जिव्हाळ्याच्या  विषयावर सखोल चर्चा होत असे. प.पू.काकांनी एकदा प.पू.मामांच्या मनातील गोष्ट जाणून न विचारताच त्यांना अडलेल्या काही ओव्यांचे मार्गदर्शन आपणहून केले होते. प.पू.मामा नेहमीच प.पू.काकांविषयी अतीव प्रेमादराने बोलत असत. या दोन थोर ज्ञानेश्वरी-भक्तांची प्रत्येक भेट अवर्णनीयच होत असे.
फाल्गुन कृष्ण नवमी, दि.२१ मार्च १९९० रोजी पहाटे तीन वाजता पूर्वसूचना देऊन प.पू.श्री.मामा श्रीदत्तब्रह्मी लीन झाले. त्यांनी स्थापन केलेल्या श्रीपाद सेवा मंडळ या धर्मादाय विश्वस्त संस्थेद्वारे त्यांनीच घालून दिलेल्या आदर्शांनुसार महान कार्य संपन्न होत आहे. प.पू.श्री.मामांचे उत्तराधिकारी प.पू.सौ.शकाताई आगटे व प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी मंडळाचे कार्य जगभर पोचवलेले आहे. प.पू.सौ.शकाताई आगटे यांनी महिन्याभरापूर्वीच पूर्वसूचना देऊन देहत्याग केला. त्यांच्याही श्रीचरणीं सादर दंडवत.
आजच्या २९ व्या पुण्यतिथी दिनी प.पू.सद्गुरु श्री.मामांच्या श्रीचरणीं प्रेमादरपूर्वक साष्टांग नमस्कार  !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481

0 comments:

Post a Comment