10 Jun 2016

* श्रीस्वामीकृपेचे खणखणीत नाणे : श्रीआनंदनाथ महाराज *



राजाधिराज श्रीअक्कलकोट स्वामीसमर्थ महाराजांच्या प्रभावळीत फार फार मौल्यवान रत्ने, श्रीस्वामीकृपेनेच लाभलेल्या अपार तेजाने तळपताना दिसतात. या अनर्घ्य रत्नांपैकी, एक अलौकिक विभूतिमत्व म्हणजेच, सद्गुरु श्रीआनंदनाथ महाराज हे होत.
श्रीआनंदनाथ महाराज हे तळकोकणातील वालावल गांवचे, म्हणून त्यांचे नाव पडले वालावलकर. पुढे ते वेंगुर्ले कॅम्प परिसरात स्वामी महाराजांचे मंदिर बांधून राहू लागले. तिथेच त्यांनी १९०३ साली आजच्याच तिथीला, ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला जिवंत समाधी घेतली. त्यांची आज ११३ वी पुण्यतिथी आहे.
श्रीस्वामी महाराजांची कीर्ती ऐकून श्रीआनंदनाथ महाराज अक्कलकोटी दर्शनासाठी निघाले. इकडे श्रीस्वामीमाउलीलाही आपले लाडके लेकरू कधी एकदा भेटते असे झाले होते. म्हणून श्रीस्वामीराज महाराज स्वत:च अक्कलकोटाबाहेर येऊन एका झाडावर वाट पाहात बसले होते. श्रीआनंदनाथ महाराज नेमके तेथेच येऊन जरा विसावले. झाडावरून उडी टाकून श्रीस्वामीराजांनी त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना खूण दाखवली. आपली साक्षात् परब्रह्ममाउली समोर उभी राहिलेली पाहून श्रीआनंदनाथांनी गहिवरून त्यांचे श्रीचरण हृदयी कवटाळले. श्रीस्वामीरायांनीही आपल्या जन्मजन्मांतरीच्या या लाडक्या निजदासाच्या मस्तकी कृपाहस्त ठेवून पूर्ण कृपादान केले. तसेच तोंडातून कफाचा बेडका काढून त्यांच्या ओंजळीत टाकला. त्या बेडक्यात इवल्याशा श्रीचरणपादुका स्पष्ट दिसत होत्या. हेच श्रीस्वामीमहाराजांनी श्रीआनंदनाथांना प्रसाद म्हणून दिलेले ' आत्मलिंग ' होय. आजही ते दिव्य आत्मलिंग वेंगुर्ले येथे नित्यपूजेत असून दर गुरुवारी भक्तांना त्याचे दर्शन मिळते.
श्रीआनंदनाथांनी जवळपास सहा वर्षे अक्कलकोटात श्रीस्वामीसेवेत व्यतीत केली व नंतर श्रीस्वामीआज्ञेने ते प्रचारार्थ बाहेर पडले. येवल्याजवळ सावरगांव येथेही त्यांनी आश्रम स्थापन केला. मात्र पुढे ते वेंगुर्ले येथेच स्थायिक झाले.
श्रीआनंदनाथ महाराज हे सिद्धहस्त लेखक व कवी होते. त्याच्या श्रीस्वामी महाराजांवरील अप्रतिम रचना ' स्तवनगाथा ' मधून प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे " श्रीगुरुस्तवन स्तोत्र " तर असंख्य स्वामीभक्तांच्या नित्यपठणात आहे. त्यांनी रचलेला श्रीस्वामीपाठ देखील प्रासादिक असून स्वामीभक्तांनी नित्यपठणात ठेवावा, इतका महत्त्वाचा आहे. श्रीआनंदनाथ महाराजांवर श्रीस्वामी समर्थ महाराजांची पूर्णकृपा असल्याने त्यांचे सर्व वाङ्मय प्रासादिक, महिमाशाली व अतीव मधुर आहे.
शिर्डीच्या श्रीसाईबाबांना सर्वप्रथम, जगासमोर आणण्याची श्रीस्वामीरायांची आज्ञा श्रीआनंदनाथांनी पूर्ण केली. साईबाबा हा साक्षात् हिरा आहे, हे त्यांनीच प्रथम लोकांना दाखवून दिले.
श्रीआनंदनाथांचा स्तवनगाथा फार सुरेख, भावपूर्ण आणि स्वामीस्वरूपाचे यथार्थ वर्णन करणारा आहे. आज त्यांच्या पावनदिनी त्यातील काही रचना आपण मुद्दाम अभ्यासूया. आपल्या दोन हजारांहून जास्त अभंगरचनांमधून त्यांनी श्रीस्वामीस्वरूप व श्रीस्वामीनामाचे अलौकिक माहात्म्य सुरेख, भावपूर्ण आणि मार्मिक अशा शब्दांत स्पष्ट करून सांगितलेले आहे. त्यांच्या अपार प्रेमाने भारलेल्या या रचना वाचताना आपल्याही अंत:करणात स्वामीप्रेम दाटून येते व हेच त्यांना अपेक्षितही होते. " श्रीस्वामी पवाडा गाण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे, " हे ते वारंवार सांगतात. त्यांच्या दिव्य  रचना आज शतकापेक्षाही जास्त काळ झाला तरी स्वामीभक्तांच्या ओठी रंगलेल्या आहेत, हीच त्यांच्या अद्भुत स्वामीसेवेची पावती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
श्रीस्वामी महाराजांच्या विलक्षण अवताराचे माहात्म्य सांगताना ते म्हणतात,
अक्कलकोटीचा व्यवहारी ।
केली कलीवरी स्वारी ॥१॥
पायी खडाव गर्जती ।
भक्तवत्सल कृपामूर्ती ॥२॥
दंड कमंडलु करी ।
आला दासाचा कैवारी ॥३॥
कटी कौपीन मेखला ।
ज्याची अघटित हो लीला ॥४॥
करी दुरिताचा नाश ।
नामे तोडी माया पाश ॥५॥
आनंद म्हणे श्रीगुरुराणा ।
आला भक्ताच्या कारणा ॥११४.६॥
अक्कलकोटातील लीलावतारी श्रीस्वामीब्रह्म हे कलियुगावर स्वारी करण्यासाठी आलेले आहेत. पायी खडावा, हाती दंड कमंडलू घेणारी ही भक्तवत्सल कृपामूर्ती दासांचा कैवार घेण्यासाठीच आलेली आहे. कटी कौपीन धारण करणारे हे साक्षात् दत्तदिगंबर अत्यंत अघटित लीला करीत भक्तांचा सांभाळ करतात, त्यांचे भक्तिप्रेम आस्वादतात. श्रीस्वामीनामाच्या निरंतर उच्चाराने सर्व पापे नष्ट होतात व भक्तांवर मायेचा प्रभावच उरत नाही. आनंदनाथ म्हणतात की, आमचा हा परब्रह्मस्वरूप श्रीगुरुराणा भक्तांसाठीच अवतरलेला आहे. म्हणून जो यांची भक्ती करील, नाम घेईल, तो या कळिकाळातही सुखरूपच राहील.
श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पंचदशाक्षरी ब्रह्मनामाच्या प्रेमभावे केलेल्या जपाचे महत्त्व सांगताना श्रीआनंदनाथ महाराज म्हणतात,
स्वामीनाम गाता मग भय नाही ।
सांगतसे पाही निजछंदे ॥१॥
निजछंदे बोल माझे हे अमोल ।
तारक ते खोल जगालागी ॥२॥
आनंद म्हणे वाणी सुखाच्या कारणी ।
बोलिलो निधानी एकोत्तरशे हो ॥३.३॥
श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पावन नाम सतत गायले असता त्या भक्ताला जगात कसलेच भय शिल्लक राहात नाही, हे मी माझ्या स्वानुभवाने खात्रीशीर सांगू शकतो. म्हणून हे अमोल असे तारक स्वामीनाम अतीव प्रेमाने निरंतर जपा. ते खोलवर मुरते आणि मग सर्वत्र त्या परमानंदमय स्वामीरूपाचीच प्रचिती येत राहाते. असे हे बहुगुणी स्वामीनामच सुखाचे एकमात्र कारण आहे. म्हणून आपली वाणी दुस-या कशातही न गुंतवता फक्त श्रीस्वामीनामातच गुंतवावी, म्हणजे मग आपले साधनही निर्विघ्नपणे पूर्णत्वास जाते.
श्रीआनंदनाथ महाराज अवघ्या बत्तीस ओव्यांच्या आपल्या श्रीस्वामीपाठात श्रीस्वामीनामाचे माहात्म्य फार चपखल शब्दांत सांगतात. या स्वामीपाठाला आशीर्वाद आहे की, जो याचा नित्य नियमाने पाठ करेल त्याच्यावर श्रीस्वामींची कृपा होईल व श्रीस्वामीमहाराज त्याच्या घरी निरंतर वास करतील. तो पाठ मुद्दामच येथे पूर्ण देत आहे, म्हणजे नित्यपठणासाठी सोपे जाईल.
ll श्रीस्वामीपाठ ll
श्रीगुरुनामाने तरती हे जन ll
वाचे नित्यनेम ठेविलीया ll१ll
ठेविल्याने खरे चुकती हे फेरे ll
गर्भवास तो रे नाही तया ll२ll
नाही तया काही आणिक उपाधी ll
दूर होय व्याधी दुरिताची ll३ll
दुरिताचा नाश तोडी भवपाश ll
जाहलिया दास समर्थाचा ll४ll
समर्थाचा दास भवाचा हा नाश ll
तोडी मायापाश नाम गातां ll५ll
नाम गातां जन तरतील जाण ll
वचन प्रमाण कलयुगी ll६ll
कलयुगी माझे तारक नेमाचे ll
बोलणे हे साचे माना तुम्ही ll७ll
माना तुम्ही जन सोडा अभिमान ll
दुरिता कारण करू नका ll८ll
करू नका तुम्ही फुका ही धुमाळी ll
आयुष्याची होळी होत असे ll९ll
होत असे खरी नरदेह हानी ll
तारक निशाणी देतो तुम्हा ll१०ll
देतो तुम्हा घ्या रे अमोल मोलाचे ll
भवालागी साचे कामा येत ll११ll
कामा येत तुम्हां जडासी तारील ll
दु:खासी हारील शरण गेल्या ll१२ll
शरण गेल्या प्राणी वाया नाही गेला ll
पुरातन दाखला पाहा तुम्ही ll१३ll
पहावे तुम्ही तरी आत्मा निर्मळ ll
साधू हा व्याकुळ तुम्हांलागी ll१४ll
तुम्हांलागी बा हे नेतो भवपार ll
दंभाचा संसार करू नका ll१५ll
संसारासी जाणा कारण त्या खुणा ll
वेद तो प्रमाणा बोलियेला ll१६ll
बोलियेल्या तरी श्रुती निर्धारी ll
मौन्य झाले चारी म्हणोनिया ll१७ll
म्हणोनिया तुम्हा सांगतसे वाचे ll
प्रेम ते जीवाचे सोडू नका ll१८ll
सोडू नका तुम्ही आत्मींचा हा राम ll
श्रीगुरु आराम करी तुम्हां ll१९ll
करी तुम्हां खरे ब्रह्म निर्मळ ll
मग तो व्याकुळ जीव कैचा ll२०ll
जीव कैचा उरे आत्म एक पहा रे ll
ब्रह्म ते गोजिरे देखियेले ll२१ll
देखियेले डोळा आपणा आपण ll
झाले समाधान तया लागी ll२२ll
तया लागी नाही नाही भवचिंता ll
हरियेली व्यथा भ्रममाया ll२३ll
भ्रममाया सरे श्रीगुरू उच्चारे ll
चुकतील फेरे गर्भवास ll२४ll
गर्भवास नाही तयांसी हा जाण ll
तारक प्रमाण जीवालागी ll२५ll
जीवालागी जाहला तोचि तारावया ll
सद्गुरू माया जोडीयेली ll२६ll
दयेचे कारण शांतीते प्रमाण ll
विवेक विज्ञान जोडे तेथे ll२७ll
जोडे तेथे जोड ब्रह्मींची ही खुूण ll
देतो आठवण जगालागी ll२८ll
जगालागी माझी हिताची सूचना ll
तारक प्रमाणा कलयुगी ll२९ll
कलयुगी खरी हीच भवतरी ll
भावासी उतरी प्रेमछंदे ll३०ll
प्रेमछंदे घ्या रे वाचुनिया पहा रे ll
कुळ त्याचे तरे भवालागी ll३१ll
आनंद म्हणे तरी नित्यपाठ करा ll
स्वामी त्याच्या घरा वसतसे ll३२ll
अशा एकाहून एक सुंदर आणि अपार प्रेमभावयुक्त रचना करून जगात श्रीस्वामीनामाचा, श्रीस्वामीकीर्तीचा डंका पिटून अवघा स्वामीभक्तिरंग उधळणा-या या स्वनामधन्य श्रीस्वामीशिष्य-शिरोमणी श्रीआनंदनाथ महाराजांच्या श्रीचरणीं पुण्यतिथी निमित्त सादर साष्टांग प्रणिपात.
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
(अशा सर्व माहितीपूर्ण पोस्ट्स साठी कृपया खालील पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/profile.php?id=139539956212450 )

0 comments:

Post a Comment