28 Jun 2016

*** लागला टकळा पंढरीचा *** ‪#‎साठवणीतीलवारी‬ - १

*** लागला टकळा पंढरीचा ***
उन्हाळ्याची आग ओकणारी झळ निसर्गचक्रानुसार जसजशी कमी होऊ लागते, तसतसे ज्येष्ठ महिन्यात आकाशात एक दोन चुकार ढगही दिसू लागतात. अगदी त्याच सुमारास एक हवीहवीशी वाटणारी भावपूर्ण आठवण मनात गर्दी करू लागते. होय, वारीचीच आठवण ती !
रिमझिमत्या पावसात माउलींसंगे होणारी पंढरीची वारी खरोखरीच अवर्णनीय आहे. शब्दांनी कधी तिचे वर्णनच होऊ शकत नाही. तो डोळे मिटून हृदयाच्या गाभ्याने अनुभवायचा विषय आहे. म्हणून तर संतश्रेष्ठ श्रीतुकोबाराय म्हणतात, " पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ॥ "
मोठ्या भाग्याने माझा जन्म भगवान श्रीमाउलींच्या वाटेवरच्या फलटण गावातील उपळेकरांच्या घरात झाला. पूजनीय डॉ. गोविंदकाका उपळेकर महाराजांचे कृपाशीर्वाद लाभून पावन झालेले हे घराणे, त्यात घरासमोरच श्रीमाउली आणि पू. काकांची मंदिरे, त्यामुळे सोन्याला सुगंधच म्हणायचा तो. वारीच्या वाटेवर गाव असल्याने नकळत वारीचा संस्कार मनात दृढावला, अगदी कळतंय तेव्हापासूनच. मला आठवतंय, आमच्या फलटणच्या घडसोली मैदानावरच माउलींच्या पालखीचा मुक्काम असे. त्यावरच आमची शाळा पण होती. मी आईबरोबर दर्शनाला जायचो. बुटका असल्याने पालखीपर्यंतही हात पोचत नसे. मग मला माउलींची पालखी ठेवलेल्या टेबलावर कोणीतरी उचलून ठेवी. मग मी बरोबर आणलेली घरच्या झाडांची तगरीची फुले, बेल व तुळशी मनसोक्त माउलींच्या श्रीचरणपादुकांवर वाहत असे आणि त्या पादुकांवर डोके टेकवून नमस्कार करीत असे. कसला अद्भुत आनंद दाटत असे मनात, काय सांगू? माउलींच्या पादुकांवर कितीही वेळा डोके ठेवले तरी मन आजही भरत नाही, कमीच वाटते ते. त्या लहान वयात, माउलींच्या फलटणमधील एक किंवा दोन दिवसांच्या मुक्कामात मला किती वेळा त्यांचे दर्शन घ्यायला मिळाले, हे फार अभिमानाने मी सगळ्यांना सांगत असे.
गंमत म्हणजे पालखी येण्याच्या दोनतीन दिवस आधीपासून मी तगरीच्या झाडाजवळ अनेकवेळा जाऊन किती कळ्या आल्यात ते पाही. झाडाला भरपूर फुले येऊ देत म्हणून सांगत पण असे. आज मागे वळून पाहताना जाणवतंय की, ते झाड तेव्हा नक्कीच माझ्या विनवणीला प्रतिसाद देऊन भरभरून फुलत असले पाहिजे. आज ते झाड नाही, पण वारी आली की त्याची आठवण हटकून होतेच मला. बहुदा या आठवणीद्वारे ते झाड आजही आपली फुले माउलीचरणीं अर्पून सुखी होत असावे. " वारी चुको नेदी हरि । " ही त्याचीही धारणा असेलच की !
वारीचे, दिंडीचे आणि भजनाचे एक आगळे प्रेम मला कायम वाटत आले आहे. वारीचे दिवस जवळ आले की बऱ्याचवेळा मला कुठूनतरी टाळमृदंगाचा आवाज ऐकू येतोय असा भास होई. असा आवाज आला की, मी हातातले सगळे सोडून त्या आवाजाच्या दिशेने धावत जात असे. आजही माझी ही आवड जशीच्या तशी टिकून आहे. दिंडीत रंगून भजन करणारे वारकरी पाहणे हा माझ्यासाठी फार मोठा स्वर्गीय आनंद असे. एकदा प्राथमिक शाळेतील दुसरीच्या वर्गात सर शिकवत असताना असा आवाज आला म्हणून मी धावत वर्गाबाहेर आलो होतो दिंडी पाहायला, हे मला आजही लख्ख आठवते.
वारी हा माझ्या हृदयीचा चिरंतन आनंदठेवा आहे. त्याची नुसती आठवणही मला तत्काळ त्या वारीचा सुखद अनुभव देते, अगदी कुठेही असलो तरी. भगवान श्रीमाउलींच्या कृपेने सलग अकरा वर्षे वारीत मी अतिशय हृद्य आणि चिरस्मरणीय प्रसंग अनुभवलेले आहेत. सर्व प्रसंगांवर लिहायचे ठरवले तर नक्कीच पुस्तक तयार होईल. पण या वर्षी त्यातील काही भावपूर्ण स्मृतिचित्रांचे तुम्हां सुहृदांसाठी प्रदर्शन मांडण्याची व त्याद्वारे स्मृतिकुपीतले तेच आनंदप्रसंग पुन्हा पुन्हा भरभरून अनुभवण्याची मला मनापासून इच्छा होत आहे. माझ्या या कथनात वारंवार माझा ' मी ' येईल, पण तो अहंकाराने नाही, केवळ सांगणा-याच्या भूमिकेतून येईल, हे कृपया ध्यानात घ्यावे, ही नम्र विनंती.
१९८९ साली, मी आठ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी पशुखाद्य बनविण्याचा कारखाना तांबमाळावर सुरू केला. त्याच्या शेजारीच फलटण दूधसंघ होता. त्याचे चेयरमन श्री. सुभाषराव शिंदे होते. सद्गुरु श्रीमाउलींचा दिव्य पालखी सोहळा याच रस्त्यावरून फलटणकडे जात असल्याने, दूधसंघाच्या वतीने वारक-यांना मोफत सुगंधी दूध वाटप, माउलींच्या पालखीवर पुष्पवृष्टी व पूजा होत असे. बहुदा त्याच वर्षीपासून मी देखील दूधसंघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागलो. रथावर चढून पूजा देखील करीत असे मी त्यावेळी. मी वयाने बराच लहान असल्याने सर्वांना माझे तेव्हा खूप कौतुक वाटे व त्यामुळेच मलाही सगळीकडे फर्स्ट प्रेफरन्स मिळत असे, जो मला तेव्हा हवाच असे. अशाच एका वर्षी काढलेला फेटा वगैरे बांधलेला माझा बालपणीचा फोटो अमित मुजुमदार व जाई हुबळीकर या माझ्या बालमित्रांनी आवर्जून मला गेल्या वर्षी पाठवला. तो फोटो पाहिल्याबरोबर माझे मन पुन्हा त्या स्मृतिकक्षात जाऊन बसले आणि वारीचे शेकडो प्रसंग चित्रपटासारखे डोळ्यांसमोरून झरझर जाऊ लागले. त्यातलेच काही " #साठवणीतीलवारी " या लेखमालेतून तुम्हां सर्वांसाठी आणि खरेतर स्वांत:सुखाय मांडत आहे.
वारीची आठवण जरी झाली ना, तरी आपले मन, पावसाच्या आगमनाने हरखून गेलेला आणि भारदस्त पिसारा फुलवून मस्तीत नाचणारा मोरच होऊन जाते. ज्याने वारी केलेली आहे ना, त्यालाच यातला खरा आनंद कळणार. माउलींच्या छत्रछायेत पंढरीची वाट चालणे, हा फार फार अद्भुत सोहळा असतो. ज्ञानियांचा राजा, कैवल्यसाम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट ' माउली ' होऊन वारीच्या वाटेवर तुम्हां आम्हां सर्वसामान्य वारक-यांसोबत चालतो, आपले सुखदु:ख समजून घेऊन, मायेची फुंकर मारून आपल्याला गोंजारतो आणि भरभरून प्रेमकृपादान देऊन आपले अवघे जीवनच भारून टाकतो. हा दैवी सुखानुभव कोणत्या शब्दांत सांगता येईल बरे? शब्दांच्या कुबड्या, हो कुबड्याच त्या, त्यांचा काहीही लाभ होत नाही या वारीच्या वाटेवर. इथे फक्त नि:शब्द अनुभूतीच बोलते, ती देखील एका अगम्य वाणीत, जी फक्त वारीवर जीवापेक्षा जास्त प्रेम करणारा सच्चा वारकरीच समजून घेऊ शकतो !
आज मायमाउली जगज्जीवन सद्गुरु श्रीज्ञानोबारायांच्या पालखीचे प्रस्थान, म्हणजे वारीच्या अद्भुत, अलौकिक आणि अतुलनीय आनंदसोहळ्याची सुरुवात. चला तर, आपणही श्रीमाउलींच्या या प्रेमरसात चिंब चिंब भिजून अखंड आनंदमय होऊया !! ( क्रमश:)
- रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.in

0 comments:

Post a Comment