29 Mar 2017

अवतार समर्थ झाला असे

राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात् परिपूर्ण परब्रह्मच, बोलाबुद्धीच्या पलीकडले, अलौकिक, अद्भुत आणि विलक्षण !! श्रीभगवंतांचा हा अवतार म्हणजे अक्षरश: चमत्कारालाही चमत्कार वाटावा इतका वैशिष्ट्यपूर्ण आहे. सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवांनाही थांग लागणार नाही, असे हे परिपूर्ण परमात्मरूप श्रीस्वामीब्रह्म मात्र अत्यंत दयाळू, कनवाळू, मायाळू आहे, हेही तितकेच सत्य ! मायेहूनही मवाळ, अत्यंत दयाळ । स्वामीब्रह्म कृपाळ भक्तालागी ॥ म्हणूनच नुसते 'स्वामी महाराज' एवढे जरी कळवळून म्हटले, तरी ही स्वामीमाउली धावत येऊन आपल्याला कडेवर घेते, आपले लाड करते. त्यासाठी फक्त खरे लेकरुपण मात्र आपल्या अंगी असायला हवे.
जगद्गुरु भगवान श्रीदत्तात्रेय प्रभूंनीच जगावर कृपा करण्यासाठी हा करुणावरुणालय स्वामी अवतार धारण केलेला आहे. आजच्याच पावन तिथीला शके १०७१ म्हणजेच इ.स.११४९ साली, हस्तिनापूर जवळील छेली या खेडेगांवी सूर्योदयसमयी श्री स्वामी समर्थ महाराज प्रथम प्रकट झाले. आपल्या लाडक्या भक्तासाठी, लहानग्या विजयसिंग साठी ही आठ वर्षांची बटूमूर्ती धरणी दुभंगून प्रकट झाली व त्याच्याशी गोट्या खेळून पुन्हा अदृश्य झाली.
हेच विजयसिंग पुढच्या जन्मी हरिभाऊ तावडे नावाने जन्माला आले व मुंबई मध्ये व्यवसाय करू लागले. श्री स्वामी महाराजांच्या अमोघ कृपेने तेच पुढे श्री स्वामीसमर्थ महाराजांचे प्रधान लीलासहचर, श्री स्वामीसुत महाराज म्हणून विख्यात झाले. राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांप्रमाणे यांचेही चरित्र विलक्षण आहे. ते सर्वार्थाने श्री स्वामीराजांचे सुत शोभतात !
श्री स्वामीसुत महाराजांनी अत्यंत भावपूर्ण रचना केलेल्या आहेत. ते स्वत: भजनही सुंदर करीत. त्यांच्या भजनात श्री स्वामी महाराज प्रसन्नतेने डोलत असत. आज राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ८६८ व्या जयंती निमित्त आपण श्री स्वामीसुत महाराजांच्या एका बहारदार अभंगाचे चिंतन करून श्रीस्वामीचरणीं ही शब्दरूप भावपुष्पांजली समर्पूया !
राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवताराचे रहस्य, कारण सांगून त्यांच्या चरणीं शरण जाण्याचा अलौकिक लाभ सांगताना श्री स्वामीसुत महाराज म्हणतात,
तुमचा हा स्वार्थ करावा समर्थ ।
अवतार यथार्थ झाला असे ॥१॥
तुम्ही ध्यावे आता तया निरंतर ।
सुखाचे आगर तया पायी ॥२॥
घ्यावयासी जिम्मा कोणी नसे दुजा ।
तयां चरणरजां लीन व्हा हो ॥३॥
नाही तुम्हां भीती तयासी शरण ।
झाल्यावरी दीन काळ होतो ॥४॥
स्वामीसुत म्हणे अवतार स्वामींचा ।
दीन अनाथांचा पालक तो ॥५॥

जनहो, साक्षात् समर्थ असा हा श्रीभगवंतांचा सर्वतंत्रस्वतंत्र अवतार झालेला आहे, तो तुम्ही आपलासा करून घ्या. यातच तुमचा खरा स्वार्थ आहे. या स्वामीसमर्थ रूपाचे तुम्ही सतत ध्यान करा, भक्ती करा. कारण त्यांचे श्रीचरण हेच सर्व सुखांचे आगर आहेत. जगातील यच्चयावत् सर्व सुखे, मग ती लौकिक असोत, पारलौकिक असोत अगर आध्यात्मिक असोत; त्यांचे मूळ स्थान हे माझ्या स्वामीरायाचे श्रीचरणच आहेत. तेथूनच सर्व सुखे उगम पावतात.
या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव हा कर्मांच्या दोरीने घट्ट बांधलेला असतो. आपणच पूर्वजन्मी केलेल्या त्या कर्मांचा फास आपल्या गळ्याभोवती आवळलेला असतो. त्या कर्मांच्या कचाट्यातून कोणाचीही सुटका होत नाही. स्वप्रयत्नाने जो जो त्यातून सुटायचा प्रयत्न करावा तेवढा तो फास जास्तच आवळला जातो. पण जर का सद्गुरु स्वामी महाराजांना दया आली व त्यांनी एखाद्याचा जिम्मा घेतला, कैवार घेतला, जबाबदारी घेतली, तर मात्र ती भयंकर कर्मे देखील क्षणात नष्ट होऊन जातात. म्हणूनच अशा समर्थ चरणीं तुम्ही लवकरात लवकर लीन व्हावे. एकदा का माझ्या मायबाप स्वामीरायाची तुमच्यावर कृपा झाली की तुमचे काम फत्तेच झाले.
त्यांच्या श्रीचरणीं शरण गेले की कशाचीच भीती उरत नाही. अहो, स्वामीकृपा झाली की दुर्लंघ्य असा काळही त्या भाग्यवान जीवाच्या पायी दीन होऊन लोळण घेतो, बाकीच्यांचे तर नावच सोडा !
श्री स्वामीसुत महाराज सांगतात की, आजच्या पुण्यपावन तिथीला झालेला हा स्वामी अवतार खास तुम्हां आम्हां दीन दुबळ्या लोकांसाठीच झालेला आहे. स्वामीराज माउली ही आम्हां  अनाथांसाठीच अवतरलेली आमची प्रेमळ माय आहे, बाप आहे, आमची कनवाळू पालक आहे. म्हणून ते तळमळीने विनवतात की, या राजाधिराज श्री स्वामीराज भगवंतांच्या श्रीचरणीं तातडीने शरण जाऊन त्यांच्या पंचदशाक्षरी नामाचे स्मरण करा, त्यांच्याच श्रीचरणांचा एकमात्र आधार माना व तेथेच पडून राहा. म्हणजे मग या भवसागरातील कोणत्याच गोष्टीचे तुम्हांला भय उरणार नाही. नि:शंक निर्भय होऊन तुम्ही स्वामीनाम गात आनंदात आयुष्य घालवून सदैव सुखी व्हाल !
आजच्या या पावन दिनी, श्री स्वामीसुत महाराजांचा हा दिव्य उपदेश आपण आपल्या ध्यानीमनी ठसवूया, रोजच्या जीवनात उतरवूया आणि समाधानी होऊया.
श्री स्वामीजयंतीच्या या पर्वकाली, श्रीस्वामीनाम उच्चरवाने गात गात, स्वामीकृपांकित सत्पुरुष प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांच्या सुंदर शब्दांत, मायबाप श्रीस्वामीचरणीं कळकळीची प्रार्थना करून तेथेच तुलसीदल रूपाने विसावूया !
पूर्णब्रह्म स्वामीराया, वटमूला अप्रमेया ।
प्रवर्तिले संप्रदाया, लीलावेगी ॥
काय वानू शब्दातीत, वारंवार दंडवत ।
राखावे जी सेवारत, जन्मोजन्मी ॥
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

17 comments:

  1. अद्भुत रहस्यमयी आणि बुद्धधीचया आवाक्याबाहेर असे अदभुत चरित्र आहे

    ReplyDelete
  2. || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || 🙏🙏 🌷🌷

    ReplyDelete
  3. श्री स्वामी समर्थ 🙏
    साक्षात स्वामी डोळ्यासमोर उभे राहिले.

    ReplyDelete
  4. दत्तात्रेयांच्या या कलियुगातील चवथ्या अद्भुत अवतारालासाष्टांग दंडवत💐🎂

    ReplyDelete
  5. आशा विठ्ठलराव कानडे... श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  6. SHREE SWAMI SAMARTHA JAY JAY SWAMI SAMARTHA!

    ReplyDelete
  7. श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!

    ReplyDelete
  8. छान लेख आहे. श्री स्वामींचे चरित्र अद्भुत आहे. "श्री स्वामी समर्थ "

    ReplyDelete
  9. Shri Swami Samarth.

    ReplyDelete
  10. ॐ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज नमो नमः ❤️🙏

    ReplyDelete
  11. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय ,पूर्ण दत्त अवतार व संपूर्ण जगाचे तारक असे हे स्वामी समर्थ

    ReplyDelete