27 Aug 2018

स्वामीसुत स्वामीपायी लोळे

आज श्री श्रावण कृष्ण प्रतिपदा, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे प्रधान लीलासहचर, स्वामींचे प्रत्यक्ष पुत्रच अशा श्रीसंत स्वामीसुत महाराजांची पुण्यतिथी ! श्रीस्वामी महाराजांची पूर्णकृपा लाभलेले व त्यांचे जन्मजन्मांतरीचे सेवक असणारे श्रीस्वामीसुत महाराज हे फार विलक्षण विभूतिमत्त्व होते.
श्री. हरिभाऊ तावडे ऊर्फ स्वामीसुत हे मुंबई म्युनिसिपालिटीमध्ये नोकरीला होते. त्यांनी एक व्यापार केला पण त्यात खूप नुकसान झाले. पण पुढे श्रीस्वामीकृपेने पंडित म्हणून एका गृहस्थांनी त्यांची हमी घेतली. त्यावेळी पंडितांनी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला. आश्चर्यकारकरित्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले. ही स्वामीकृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले.
श्रीस्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की, "तू कुळावर पाणी सोड व माझा सुत (पुत्र) हो !"
झालेल्या फायद्यातील तीनशे रुपये त्यांनी सोबत आणले होते, त्याच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या. त्या पादुका मोठ्या प्रेमाने त्यांनी सलग चौदा दिवस वापरल्या. अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात, अशी इच्छा होती, पण स्वामींनी प्रसन्नतेने आपल्या हात, पाय, तोंड वगैरे अवयवांस लावून त्या पादुका श्रीस्वामीसुतांना प्रसाद म्हणून दिल्या. स्वत: श्रीस्वामी महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत. त्यांनी स्वामीसुतांना तो प्रसाद देऊन, "तू तुझे घरदार, धंदा सोडून दर्याकिनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर !" अशी आज्ञा केली.
त्याच रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्रीस्वामींनी हरिभाऊंना अनुग्रह केला व उशाखालची छाटी व कफनी अंगावर फेकून कृपा व्यक्त केली.
श्रीस्वामीसुतांनी श्रीस्वामीआज्ञेचे तंतोतंत पालन करून आपला संपूर्ण संसार, घरदार लुटवले. बायकोचे दागिनेही ब्राह्मणांना दान करून टाकले. त्याकाळात ते दागिने जवळपास शंभर तोळ्यांचे होते. अंगावर मणी मंगळसूत्र देखील ठेवले नाही. स्वत: भगवी कफनी नेसले व बायको ताराबाईला पांढरे पातळ नेसायला लावून स्वामीसेवा सुरू केली. अत्यंत निस्पृहपणे व वैराग्याने त्यांनी खूप मोठे स्वामी सेवाकार्य केले. मुंबई व कोकणात त्यांनी अनेक ठिकाणी स्वामी महाराजांचे मठ उभारून सेवा सुरू करून दिली. हजारो लोकांना स्वामीभक्तीस लावले. सुरुवातीला त्यांचा मठ कामाठीपु-यात होता, नंतर तो मठ कांदेवाडीत स्थलांतरित झाला. (श्रीस्वामींच्या आत्मलिंग पादुका देखील सुरुवातीला याच कांदेवाडी मठात होत्या. कालांतराने त्या मुंबईतील चेंबूर येथील मठात नेण्यात आल्या.) स्वत: श्रीस्वामींनी अनेकांना दर्याकिनाऱ्यावर जाऊन स्वामीसुतांचे मार्गदर्शन घेण्याची आज्ञा केलेेली होती.
श्रीस्वामी महाराजांच्या प्रकटदिनाच्या चैत्र शुद्ध द्वितीयेच्या उत्सवाची परंपरा श्री स्वामीसुतांनीच प्रथम शके १७९२ म्हणजेच १८७० साली सुरू केली. अक्कलकोट येथे त्या पुढील वर्षीपासून स्वामींच्या समक्षच हा उत्सव होऊ लागला. महाराज अतीव प्रेमाने स्वामीसुतांना "चंदुलाल" म्हणत असत. अनेक भक्तांना ते मनोकामना पूर्तीसाठी दर्याकिनाऱ्यावर स्वामीसुतांकडे पाठवत असत.
http://rohanupalekar.blogspot.com]
श्रीस्वामींनी आपल्या पश्चात् स्वामीसुतांना आपले कार्य पाहण्यासाठी अक्कलकोटला पाचारण केले, पण श्रीगुरूंच्या नंतर आपण राहू शकणारच नाही, असा त्यांनी पवित्रा घेतला. अनेक लोकांना स्वामींनी मुंबईला पाठवले स्वामीसुतांना घेऊन येण्यासाठी. पण शेवटपर्यंत ते श्रीस्वामींसमोर आलेच नाहीत आणि त्यांनी मुंबईतच आजच्या तिथीला देहत्याग केला. त्यावेळी स्वामींनी अक्कलकोटात विपरीत लीला करून स्वामीसुतांवरील आपले परमप्रेम प्रकट केले. स्वत: श्रीस्वामी महाराजांनी स्वामीसुतांच्या मातु:श्री काकूबाईंचे हरप्रकारे सांत्वन केले. स्वामी महाराजांचे आपल्या या अनन्य सुतावर विलक्षण प्रेम होते.
श्री स्वामीसुत महाराज खूप छान भजन करीत असत. हाती चिपळ्या व तंबुरी घेऊन ते रंगून जाऊन स्वामीमहाराजांचे मनोभावे भजन करीत असत. त्यांच्या अभंगरचनाही उत्तम आहेत. ते ज्या ज्या लीलांचे वर्णन करीत त्या त्या लीला स्वामी महाराज प्रत्यक्ष करून दाखवीत असत. श्री स्वामीसुतांच्या या अभंगांचा गाथाही प्रकाशित झालेला आहे. मुंबईच्या आत्मस्वरूप प्रकाशनाने चेंबूर मठाच्या सचित्र माहितीसह हा गाथाही नुकताच प्रकाशित केला आहे
श्री स्वामीसुतांनी रचलेला ३१ अभंगांचा 'श्रीस्वामीपाठ' अत्यंत बहारीचा असून खूप प्रासादिक आहे. असंख्य भक्तांना त्याच्या पठणाचे अद्भुत अनुभव आजही येत असतात; ही स्वामीसुतांवरील श्रीस्वामीकृपेचीच अलौकिक प्रचिती आहे. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पंचदशाक्षरी महामंत्राचे व स्वामी महाराजांच्या परब्रह्मस्वरूपाचे अप्रतिम वर्णन श्री स्वामीसुत महाराजांनी श्रीस्वामीपाठात केलेले आहे.
आपल्या श्रीस्वामीपाठात स्वामीसुत महाराज म्हणतात,
सोडूनि संशय भजा स्वामीराय ।
जरी व्हावी सोय परमार्थाची ॥२३.१॥
"सर्व संशय सोडून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा,भजन करा, त्यातच खरा परमार्थ-लाभ आहे. कारण स्वामीराज साक्षात् परब्रह्मच आहेत."
स्वामीनामी गोडी घ्यावी ही आवडी ।
करा काही जोडी नामजपें ॥१॥
नामजपें कदा नसे ती आपदा ।
दुरिताची बाधा नसे अंती ॥२॥
नसे अंती कोण एका स्वामीवीण ।
म्हणूनि चिंतन करा त्याचें ॥१३.३॥
"मधुर अशा स्वामीनामाची गोडी एकदा चाखा बाबांनो, त्यातच रंगून जाल बघा ! स्वामीनामाचीच आवड बाळगा आणि स्वामीनामजप करून पुण्य जोडा. जो प्रेमाने नामजप करतो त्याला पापांची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण त्याला अंती सांभाळणारे स्वामीमहाराजच असतात. स्वामी महाराजांशिवाय कोणीही तुम्हांला अंतकाळी वाचवणार नाही, म्हणून आतापासूनच त्यांचे मनोभावे चिंतन करायची सवय लावून घ्यावी."
श्री स्वामीसुत महाराजांचा हा बहुमोल उपदेश आपण मनापासून पाळून परब्रह्म परमात्मा श्री स्वामीसमर्थ महाराजांची परमकृपा संपादन करण्यासाठीच सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे. हीच श्री स्वामीसुत महाराजांच्या श्रीचरणी वाहिलेली खरी श्रद्धा-सुमनांजली आहे.
आजच्याच पावन तिथीला हुबळीचे थोर सत्पुरुष श्रीसंत सिद्धारूढ स्वामी महाराजांचीही पुण्यतिथी असते. श्री सिद्धारूढ स्वामी हे शैवसांप्रदायिक महान संत होते. त्यांच्याच शिष्योत्तम, बेळगांवच्या श्रीसंत कलावती आई यांनी 'श्री सिद्धारूढ वैभव' या ग्रंथात स्वामींचे सुरेख चरित्र लिहिलेले आहे. श्री सिद्धारूढ स्वामींच्याही लीला अतीव मनोहर असून साधकांसाठी निरंतर मार्गदर्शक आहेत.
आजच्या या पावन दिनी, राजाधिराज सद्गुरु श्रीस्वामीसमर्थ महाराजांच्या या लाडक्या पुत्राच्या, श्री स्वामीसुत महाराजांच्या आणि श्रीसंत सिद्धारूढ स्वामींच्या श्रीचरणीं अनंत दंडवत प्रणाम !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481


16 comments:

  1. Khup chhan margdarshan v mahiti milate tumchya likhamule

    ReplyDelete
  2. Swamipaath che ankhi pade dya please

    ReplyDelete
  3. खुपच सुंदर लिखाण व उपयुक्त माहिती. साधनसाठी सहाय्यक, धन्यवाद!

    ReplyDelete
  4. अतिशय सुरेख आणि रसाळ !! 🙏🙏

    ReplyDelete
  5. श्री स्वामिसुत महाराज आणि श्री सिध्ढारूढ़ स्वामी महाराजांच्या चरणावर दंडवत!!

    ReplyDelete
  6. श्री स्वामी समर्थ🙏

    ReplyDelete
  7. डोळे भरून आले धन्य परमात्मा श्री स्वामी समर्थ महाराज आणि माझे सद्गुरु

    ReplyDelete
  8. श्री स्वामी समर्थ. छान पोस्ट.

    ReplyDelete
  9. खूपच छान लेख 👌👌👌💐

    ReplyDelete
  10. श्री स्वामी समर्थ

    ReplyDelete
  11. अगदी छान माहिती 👌🙏

    ReplyDelete
  12. दोन्ही विभूतींना शतशः दंडवत

    ReplyDelete
  13. Shri Swami Samarth

    ReplyDelete