9 Aug 2018

नामा तयाचा किंकर तेणे केला हा विस्तार

आज आषाढ कृष्ण त्रयोदशी, भगवान श्रीपंढरीनाथांचे प्रेमभांडारी व अत्यंत लाडके भक्तश्रेष्ठ श्रीसंत नामदेव महाराज, त्यांचे बारा कुटुंबीय व त्यांच्या दासी श्रीसंत जनाबाई महाराज यांचा आज समाधिदिन !
जगाच्या आजवरच्या इतिहासात, एकाच कुटुंबात एवढे थोर भगवद्भक्त महात्मे एकाचवेळी अवतरल्याचे दुसरे उदाहरण नाही. श्रीसंत नामदेवराय, त्याच्या पत्नी राजाई, आई गोणाई, वडील दामाशेट्टी; नारा, विठा, महादा व गोंदा हे चार सुपुत्र; लाडाई, गोडाई, साखराई व येसाई या चार सुना; लिंबाई ही कन्या व आऊबाई ही बहीण, असे चौदा जण भगवद्भक्त होते. श्रीनामदेवरायांच्या स्वनामधन्य शिष्या श्रीसंत जनाबाई या त्यांच्याघरी दासी म्हणून राहात होत्या. त्यांना धरून हे पंधरा लोकांचे अलौकिक कुटुंब म्हणजे भक्तिप्रांतातील विलक्षण चमत्कारच आहे !
या सर्व हरिभक्तांच्या रसपूर्ण काव्यरचना आजही उपलब्ध आहेत. या विलक्षण कुटुंबाला फार मोठे भाग्य लाभले. श्री ज्ञानदेवादी भगवदवतारी संतांच्या पंढरीतील वास्तव्यात त्यांची हरप्रकारे सेवा करण्याची आणि त्यांच्या समाधिप्रसंगी उपस्थित राहून सर्व व्यवस्था करण्याची महान सेवासंधी श्री नामदेवांच्याच या भगवद्भक्त कुटुंबाला लाभलेली होती. हे खरोखर अपूर्वच म्हणायला हवे. हे सर्व कुटुंबीय आतून पूर्ण रंगलेले हरिभक्तच होते. त्यांचा परस्पर व्यवहार, त्यांचा घरातला वावर किती मोहक आणि रम्य असेल नाही? माउली म्हणतात तसे, शेजारची काठोकाठ भरलेली दोन सरोवरे परस्परात मिसळतात ना, अगदी तसाच पराभक्तीचा उत्स्फूर्त कल्लोळ श्री नामदेवांच्या घरात सदैव चालत असणार. म्हणूनच तर, साक्षात् भगवान श्रीपंढरीनाथही या पावन घरात अखंड विराजमान असत, या प्रेमळ हरिभक्तांच्या जगावेगळ्या भक्तिप्रेमाचा पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी !
सद्गुरु श्री माउलींच्या कृपापरंपरेतून अनुगृहीत असलेले, सद्गुरु श्री विसोबा खेचरांच्या कृपेने पूर्णत्वास गेलेले श्री नामदेवराय हे विठ्ठलभक्तांचे शिरोमणीच आहेत. प्रल्हाद - अंगद - उद्धव या क्रमाने श्रीभगवंतांच्या प्रत्येक अवतारात हरिभक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी प्रकटणारे हे थोर भक्तराज, श्री माउलींच्या अवतारकाळात श्री नामदेवराय म्हणून जन्मले. ऐंशी वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. त्यांनी भारतभर फिरून भक्तिप्रसार केला. त्यांची प्रसिद्धीच एवढी होती की, त्यानंतर निर्माण झालेल्या शिखांच्या श्री गुरुग्रंथसाहिब मध्ये देखील श्री नामदेवांची अभंगवाणी ग्रथित केलेली आढळते.
http://rohanupalekar.blogspot.in
श्रीसंत जनाबाई या देखील नामदेवांसोबत युगानुयुगे कार्यार्थ अवतरत होत्या. पद्मिनी - मंथरा - कुब्जा - जनाबाई असा अवतारक्रम त्यांनी स्वत:च सांगून ठेवलेला आहे. या सर्व अवतारांमध्ये त्यांनी अनन्य दासीचेच पद मोठ्या प्रेमाने भूषविले होते, हे विशेष. त्यांच्यावर श्रीभगवंतांचे एवढे प्रेम होते की, माझ्या जनीला कोणी नाही म्हणून प्रत्यक्ष विठाईच त्यांचे सर्वकाही करीत असे. जनीची वेणी-फणी करणे, न्हाऊ माखू घालणे, सोबत दळण कांडण करणे, रानात शेण्या वेचायला जाणे या सर्व गोष्टी प्रत्यक्ष जनीचा लाडका विठोबाच करीत असे. देव-भक्ताचे असे सर्वांगांनी बहरलेले, गहिरे आणि अलौकिक प्रेमनाते या ठिकाणी पाहायला मिळते.
देवांचे जनाबाईंवर एवढे प्रेम होते की, भगवान पंढरीनाथच स्वहस्ते त्यांना सुचणारे अभंग वेळोवेळी लिहून घेत असत. एकदा श्रीपांडुरंगांनी स्वत: श्री माउलींना विनंती केली, *'जनीचे अभंग जो कोणी वाचेल, त्यांचे मनन करेल, त्याच्या अंगणात पांडुरंग नाचेल, त्याच्यावर पूर्ण कृपा करेल', असा आशीर्वाद तुम्ही द्यावा.* माउलींनी देखील देवांची इच्छा पाहून अगदी तसाच आशीर्वाद आपल्या लाडक्या लेकीला, श्रीसंत जनाबाईंना दिला. देवांनी स्वत:ची इच्छा अशी सद्गुरुमुखाने इथे पूर्ण करवलेली आहे. हा प्रसंगच किती गोड आणि गोजिरा आहे पाहा. त्यातून प्रकटणारे भगवंतांचे जनाबाईंवरचे परमप्रेम फारच मधुर आहे, भावगहिरे आहे.
भगवान पंढरीरायांच्या समक्ष, आजच्याच तिथीला इ.स.१३५० मध्ये या कुटुंबातील चौदा जणांनी श्रीपंढरीनाथांच्या महाद्वारात एकाचवेळी समाधी घेतली. लाडाई ही त्यावेळी बाळंतपणासाठी माहेरी गेलेली असल्याने ती तेवढी मागे राहिली. तिला जेव्हा सर्वांच्या समाधीचे वृत्त कळले, तेव्हा तिने, "मी काय देवा तुला परकी वाटले की काय? मलाच फक्त सोडलेस नि बाकीच्यांना तेवढी समाधी दिलीस?" असे म्हणून प्रत्यक्ष श्रीपांडुरंगांशीच भांडण केले व पोटच्या पोराला योग्य हाती सोपवून तिनेही हरिस्मरणात ऊर्ध्व लावून योगमार्गाने देहत्याग केला. इतके हे अलौकिक होते सगळे महात्मे !
भगवान पंढरीनाथांच्या थोर भक्ताची पावन पायधुळी अखंड लाभावी म्हणूनच या सर्वांनी मंदिराच्या पहिल्या पायरीखालीच समाधी घेतली. म्हणूनच पंढरपूरच्या मंदिराच्या पहिल्या पायरीला "श्री नामदेव पायरी" असेच म्हणतात.
श्रीसंत नामदेवराय व त्यांच्या शिष्य श्रीसंत जनाबाई, हे फार गोड प्रेमनाते असणारे थोर गुरु-शिष्य होते. युगानुयुगे भक्तिप्रसाराच्या कार्यासाठी एकत्रच अवतरत असलेली ही जोडगोळी अंतर्बाह्य हरिरंगी रंगलेली होती, हरिरूपच झालेली होती. प्रत्यक्ष परब्रह्म श्रीपांडुरंग सदैव त्यांच्या सोबत, त्यांच्या अवतीभोवती, त्याच्या आत-बाहेर वावरत असत; त्यांच्या मधुरातिमधुर भक्तिप्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी अखंड आसुसलेले असत. केवढे हे अद्भुत भक्तिभाग्य !!
आजच्या पावन पुण्यदिनी श्रीसंत नामदेव, श्रीसंत जनाबाई व त्यांच्या परमभाग्यवान कुटुंबीयांच्या श्रीचरणीं सादर साष्टांग दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
http://rohanupalekar.blogspot.in ]


19 comments:

  1. फारच सुंदर...🙏🙏

    ReplyDelete
  2. 🙏🙏🙏💐💐💐
    खूपच सुंदर...

    ReplyDelete
  3. काय अलौकिक प्रसंग आहे हा की एकाच दिवशी हे दिव्यात्मे समाधिस्थ झाले,सगळेच जणू पांडुरंगाचे अंशावतार असावेत, त्यावेळीं उपस्थित प्रेक्षकवर्गही किती भाग्यवान
    या सर्व महातम्यांना शतशः दंडवत।

    ReplyDelete
  4. Nitin padmanabh Mayya7/18/2020 2:35 pm

    अद्भुत व माहितीपूर्ण लेख.

    ReplyDelete
  5. Adbhut aahe he sarva...thanks for sharing

    ReplyDelete
  6. खूप खूप सुंदर सेवा

    ReplyDelete
  7. khup sundar. Shri sant namdev and shri sant janabai hyancha charni shirsashtang dandwat 🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  8. भावपूर्ण नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏ओम नमः शिवाय

    ReplyDelete
    Replies
    1. भावपूर्ण नमस्कार पांडुरंग हरी

      भावपूर्ण नमस्कार पांडुरंग हरी

      Delete
  9. 🙏🙏🙏

    ReplyDelete
  10. खुप छान माहितीपुर्ण लेख आवडला .

    ReplyDelete
  11. अतिशय मनमोहक आपला लेख आहे खूप आवडला

    ReplyDelete
  12. रामकृष्ण हरी

    ReplyDelete
  13. खुपच छान

    ReplyDelete
  14. जय जय रामकृष्ण हरी

    ReplyDelete
  15. अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेख 👌🙏🙏

    ReplyDelete
  16. आमचाही शेवट हरी स्मरणात गोड होवो

    ReplyDelete