1 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पहिला

आज वैशाख शुद्ध षष्ठी, भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्रीनरहरीरायांच्या जयंती नवरात्राचा आज प्रथम दिन. या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये, श्रीभगवंतांचे जास्तीतजास्त स्मरण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे, त्यासाठीच प्रस्तुत लेखमाला सुरू करीत आहे. आजपासून सुरू होणा-या या भक्तिमहोत्सवाचे सर्वांना सादर निमंत्रण व सर्वांचे प्रेमादरपूर्वक स्वागत देखील !!
भगवान श्रीनृसिंहांची अवतार लीला व भक्तश्रेष्ठ प्रल्हादांची गोष्ट आपण अगदी लहानपणापासूनच ऐकत-वाचत मोठे झालेलो आहोत. श्रीभगवंतांच्या "भक्तवात्सल्य" ब्रीदाचे अलौकिक उदाहरण म्हणून ही गोष्ट प्रसिद्धच आहे. या कथेतून भक्तिशास्त्रातील अनेक सिद्धांत स्पष्ट होतात. पण तेवढा काही विचार आपण कधी केलेलाच नाही या गोष्टीचा. म्हणूनच साधूसंतांच्या वाङ्मयामधून उलगडणारा श्रीनृसिंहकथेतील मार्मिक भक्तिविचार आता पुढील नऊ दिवस आपण त्यांच्याच कृपेने आस्वादणार आहोत. तसेच भगवान श्रीनृसिंहांशी संबंधित पण फारसे ज्ञात नसलेले काही अप्रचलित व अनवट माहितीचे संदर्भही आपण जाणून घेणार आहोत. हीच आपली या श्रीनृसिंह जयंती नवरात्रानिमित्त श्रींची गुणगायन-सेवा !
भगवान श्री माउलींनी ज्ञानेश्वरीत काही महत्त्वपूर्ण ओव्यांमधून श्रीनृसिंह लीलेचा उल्लेख केलेला आहे. एका ठिकाणी भक्तीचे श्रेष्ठत्व व सर्वसमावेशकत्व सांगताना माउली म्हणतात,
ते पापयोनीही होतु कां ।
ते श्रुताधीतही न होतु कां ।
परी मजसी तुकितां तुका ।
तुटी नाही ॥ ज्ञाने.९.३२.४९९॥
ज्या भक्तांनी आपले सर्व भाव केवळ मज एका भगवंतालाच समर्पित करून माझ्याच साठी जे जीवन जगत असतात, ते शरणागत भक्त राक्षसादी पाप योनीत जन्मलेले असले, त्यांनी वेदांचे अध्ययनही केलेले नसले, तरी माझ्याशी म्हणजे साक्षात् भगवंतांशी तुलना केली तर ते तसूभरही कमी ठरणार नाहीत. आधी कसेही असले तरी ते त्या परमभक्तीमुळे पूर्ण भगवत्स्वरूपच झालेले असतात. यासाठी एक चपखल उदाहरण देताना श्रीभगवंत अर्जुनाला सांगतात,
पाहें पां भक्तिचेनि आथिलेपणें ।
दैत्यीं देवां आणिलें उणें ।
माझें नृसिंहत्व लेणें ।
जयाचिये महिमे ॥ ज्ञाने.९.३३.४५० ॥
या थोर भक्तीच्या वैभवामुळे पूर्ण तमोगुणी अशा दैत्यांनी देखील सत्त्वगुणी अशा देवतांना उणेपण आणलेले आहे. एवढेच नाही तर, माझा नृसिंहावतार देखील या दैत्यराज प्रल्हादासाठीच तर झाला.
सद्गुरु श्री माउलींचे येथे स्पष्ट सांगणे आहे की, श्रीभगवंतांची पूर्ण प्राप्ती करून घेण्याचा भक्ती हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. निखळ प्रेमभक्ती ही अशी अलौकिक गोष्ट आहे की तिची भुरळ प्रत्यक्ष निष्काम, निर्मोही परमात्म्यालाही पडते. एरवी निरिच्छ, निस्पृह, निराकार, निर्विकार असणारा परमात्मा, या भक्तिसुखासाठीच सगुण-साकार होतो, अवतार धारण करून अनेक अद्भुत लीला करतो व भक्तांसह त्या परमभक्तीचा आनंद पुरेपूर लुटतो. केवळ विशुद्ध प्रेमाच्याच धाग्याने हा अपार परमात्मा समग्र बांधला जाऊ शकतो. ज्ञान, योग, याग, तप इत्यादी कोणत्याच गोष्टीत ते पूर्ण सामर्थ्य नाही. तेथे केवळ भक्तीच प्रमाण आहे. तसे स्वत: श्रीभगवंत भक्तराज अर्जुनाला सांगतात, "वांचूनि आमुचियालागीं निष्कळ । भक्तितत्त्व ॥ज्ञाने.९.२६.३९६॥"
योगयागादी कष्टप्रद साधनांपेक्षा सहज सोपा व सर्वांना आचरता येईल असा एकमेव भक्तिमार्गच आहे. शिवाय त्यात काही चुकण्याचा प्रश्नच येत नसल्याने तोच सर्वश्रेष्ठही ठरतो. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीत श्रीभगवंतांची भक्ती सोडता कामा नये ! श्रीभगवंतांचा श्रीनृसिंह अवतार हा या भक्तीचे अलौकिकत्व व सर्वश्रेष्ठत्व प्रतिपादित करण्यासाठीच झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. याच सिद्धांताचे विवरण आपण या नवरात्र महोत्सवात श्रीनरहरीरायांच्या कृपेने करणार आहोत.
भगवान श्रीनृसिंह हे भगवान श्रीमहाविष्णूंचे पूर्णावतार आहेत. ते केवळ हिरण्यकश्यपूला मारण्यासाठीच अवतरले होते, असे मानले जाते. पण खरेतर याही अवतार-लीलेत अनेक भक्तिसिद्धांत अनुस्यूत आहेतच. आज हजारो वर्षे भक्तप्रतिपालक भगवान श्रीनरहरीरायांची उपासना चढत्या वाढत्या प्रमाणात होत आहे, हेच त्यांच्या लोकप्रियतेचे व भक्तवात्सल्याचे निदर्शक नाही का?
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in

4 comments:

  1. Il जय श्री सदगुरवे नमः 'll
    🙏🙏🙏🌹🌹🌹

    ReplyDelete
  2. नरहरी शिवरामपंत कुलकर्णी.
    लेख खूप आवडला.रोज वाचू.

    ReplyDelete