4 May 2017

विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख चौथा

भक्त-भगवंत हे प्रेमनाते बोला-बुद्धीच्या पलीकडचे, अत्यंत विलक्षण असे असते. सर्वच नात्यांमध्ये प्रेम अनुस्यूत असतेच, पण या सगळ्या नात्यांमध्ये भक्त-भगवंत आणि गुरु-शिष्य ही दोन नाती फार वेगळेपण मिरवणारी व अपूर्व प्रेम व्यक्त करणारी अशी असतात. श्रीज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात भगवान श्रीमाउलींनी भगवंतांच्याच मुखाने हा समग्र भक्तियोग अप्रतिम शब्दांत वर्णन करून सांगितलेला आहे. त्यात एकेठिकाणी ते म्हणतात,
ऐसे अनन्ययोगें ।
विकले जिवें मनें आंगें ।
तयांचें कायि एक सांगें ।
जें मी न करीं ॥ज्ञाने.१२.६.८२॥

अरे अर्जुना, कायिक, वाचिक व मानसिक अशा सर्व भावांनी अखंड माझे (भगवंतांचे) अनुसंधान करणा-या, मलाच जीव, मन, शरीर व प्राणांनी पूर्ण विकल्या गेलेल्या माझ्या अनन्य भक्तांची अशी कोणती गोष्ट आहे की जी मी कधी करत नाही?
भगवंतच भक्तांच्या सर्व गोष्टी न सांगता सांभाळत असतात, त्यांची पडेल ती सेवा ते अत्यंत आनंदाने करीत असतात. म्हणून श्रीभगवंतच खरे 'भक्तश्रेष्ठ' म्हटले जातात. आजवरच्या असंख्य संतांच्या चरित्रातले अनंत प्रसंग याला साक्ष आहेत. याविषयी प्रत्यक्ष श्रीभगवंतांचेच हृद्गत सांगताना श्री माउली म्हणतात,
तैसें ते माझे ।
कलत्र हें जाणिजे ।
कायिसेनिही न लाजें ।
तयांचेनि मी ॥ज्ञाने.९.७.८६॥

भगवंत आपल्या भक्तांना लाडक्या पत्नीप्रमाणे जपत असतात. भक्तांच्या तसेच भक्तांसाठी कोणत्याही गोष्टी करताना त्यांना अजिबात लाज वाटत नाही. आपल्या अनन्य भक्तांसाठी अगदी हीन व अवघड गोष्टी देखील देव प्रेमानेच करतात.
भक्तश्रेष्ठ प्रल्हादांसाठी झालेला अगदीच आगळा-वेगळा, अभूतपूर्व श्रीनृसिंहावतार हा श्रीभगवंतांच्या याच भक्तवात्सल्य-ब्रीदाचा मनोहर आविष्कार नव्हे काय? दैत्यराज हिरण्यकश्यपूने मागितलेला तो कसला विचित्र वर, त्यावर पूर्ण विचारांती झालेला, अर्धा मानव व अर्धा सिंहरूप अवतार, खांबामधून प्रकटणे, नखांचे अभिनव अस्त्र, तिन्हीसांजेची वेळ, उंब-यासारखे मजेशीर ठिकाण; काय एकेक विलक्षण गोष्टी सांभाळून व दैत्याच्या वरामध्ये काहीही न्यून न येऊ देता केलेली अवतार लीला; सारेच न्यारे, अद्भुत आहे. पण भक्त प्रल्हादांसाठी असल्या विचित्र रूपाने प्रकट होऊन देवांनी आपले ब्रीद राखलेच शेवटी.  माउलींची वरील ओवी जणू श्रीभगवंतांनी नृसिंहरूप घेऊन खरी करून दाखवलेली आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.
भगवान श्री माउलींनी श्रीज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाच्या शेवटी एका ओवीत, अर्जुनावरील कृष्णकृपेचे महत्त्व सांगताना भगवान श्रीनृसिंहांचा मार्मिक उल्लेख केला आहे. ते म्हणतात,
जो प्रल्हादाचिया बोला ।
विषाही सकट आपणचि जाहाला ।
तो सद्गुरु असे जोडला ।
किरीटीसी ॥ज्ञाने.१०.४२.३३४॥

अर्जुनाच्या सर्व इच्छा तत्काळ पूर्ण होत आहेत, कारण त्याला भगवान श्रीकृष्णांसारखे अलौकिक सद्गुरु लाभलेले आहेत; जे प्रल्हादांच्या सतत चालणा-या सप्रेम नामस्मरणासाठी स्वत:च विषरूपही झाले आणि त्याला सर्व संकटांमधून त्यांनी सुखरूप बाहेर काढले. इथे उपमेच्या माध्यमातून श्री माउली श्रीभगवंतांचे भक्तांवरील परमप्रेमच सांगत आहेत.
बाल प्रल्हादावर हिरण्यकश्यपूने अनंत अत्याचार केले; पण प्रत्येकवेळी त्यातून तो वाचला. कारण हे भगवंतच त्या त्या भयानक रूपात स्वत:च जाऊन प्रल्हादाचे रक्षण करीत होते. लहान बाळाला कडेवर घेऊन आईने निगुतीने सांभाळावे, तसे श्रीभगवंत प्रल्हादाला परोपरीने सांभाळीत होते. त्याचे लळे आनंदाने व अभिमानाने पुरवीत होते. हिरण्यकश्यपूने विष पाजले तर भगवंतच ते विष बनून राहिले. त्यामुळे ते प्यायल्याने मरायच्या ऐवजी प्रल्हादजी अजरामर झाले; इतके की आज अनेक युगे लोटली तरीही प्रल्हाद-श्रीनृसिंहांच्या भक्तिकथा आम्हांला हव्याहव्याशा वाटतात. त्या ऐकल्याने आमचे भक्त-हृदय आजही भगवंतांवरच्या प्रेमाने उचंबळून येते. आम्हां भारतीयांचे बालमन व बालपण आजी-आजोबांच्या तोंडून रसभरित प्रल्हादचरित्र ऐकून आजही निश्चिंततेचा अनुकार देते. आमच्याही मनात बालपणापासूनच त्या परमकनवाळू भगवंतांच्या भक्तवात्सल्याची जाणीव पुरेपूर भरून राहाते. संकटकाळी तेच एकमेव आधार आहेत, याचे यथार्थ भान या कथेमुळे आमच्या चित्तात ठसून राहाते. भक्तवर प्रल्हादांचे हे सर्वजनप्रियत्व, हेच त्यांच्या अनन्य हरि-निष्ठेचे व एकूणच भगवद् भक्तीचे अलौकिकत्व भरभरून सांगत नाही का?
भगवंतांचे भक्तराज प्रल्हादांवर किती प्रेम आहे? अहो, विभूतियोग सांगताना ते स्पष्ट सांगतात की, *'प्रल्हादश्चास्मि दैत्यानां'*, दैत्यांमध्ये मीच प्रल्हाद आहे ! यावर सद्गुरु श्री माउली अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतात की, प्रल्हाद दैत्यकुळात जन्मलेले असूनही, ते साक्षात् श्रीभगवंतांचीच विभूती असल्याने ते कधीच दैत्यभावांनी लिप्त झाले नाहीत. त्यांच्या शुद्ध सात्त्विक चित्तात रजतमादी दैत्यभाव कधीच कणभरही व्यक्त झाले नाहीत. म्हणूनही श्री प्रल्हाद हे परमवंदनीय, प्रात:स्मरणीय असे थोर भक्तश्रेष्ठ होत ! 
भगवंतांच्या या भक्तवात्सल्याचे नेमके वर्णन करताना श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात,
प्रल्हादाकारणे नरसिंह झालासी ।
त्याचिया बोलासी सत्य केले ॥१॥
राम कृष्ण गोविंद नारायण हरी ।
गर्जे राजद्वारी भक्तराज ॥२॥
विठ्ठल माधव मुकुंद केशव ।
तेणे दैत्यराव दचकला ॥३॥
तुका म्हणे त्याकारणे सगुण ।
भक्ताचे वचन सत्य केले ॥४॥
भगवान श्रीनरहरीरायांच्या श्रीचरणीं अनंतानंत दंडवत !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )

2 comments:

  1. 🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
    Il श्री नारसिन्हाय नमः ll

    ReplyDelete
  2. Om namo bhagwate Vasudevaya

    ReplyDelete