22 Sept 2018

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची

आरती म्हणजे भक्तहृदयाचा प्रसन्न आविष्कार. आपल्या आराध्याची अतीव प्रेमादराने गायलेली स्तुती म्हणजे आरती. 'रती' म्हणजे तीव्र अनुराग, प्रेम. म्हणून, अतीव प्रेमादराने केलेली क्रिया ही आरती होय. भक्ताच्या हृदयातील सघन प्रेम ज्या प्रक्रियेने तो आपल्या आराध्यदेवतेला अर्पण करतो त्याला आरती म्हणतात ! आपल्याकडील भक्तिउपचारांमध्ये म्हणूनच आरतीला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे.
भगवान श्रीगणपती ही सर्वादिपूज्य देवता. त्यामुळे आरतीही त्यांचीच प्रथम म्हटली जाते. मराठी संतकवींपैकी समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्याच सर्वात जास्त प्रचलित आहेत. आपल्या अंगभूत रसाळता, अर्थघनता, मार्मिकता आणि गेयता आदी गुणांमुळेच श्री समर्थांच्या आरत्या सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी रचलेली सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची । ही सर्वच मराठी जनांच्या नित्यपठणात असणारी गणपतीची आरती अतीव सुंदर आहे. आपण रोजच म्हणत असलेल्या आरतीचा अर्थ नीट समजला तर म्हणताना अधिक आनंद लाभतो; म्हणूनच हा लेखनप्रपंच.
बुद्धी व ज्ञानाची अधिष्ठात्री देवता असणाऱ्या भगवान श्रीगणेशांच्या देखण्या स्वरूपाचे अत्यंत सुरेख वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात,
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची ।
नुरवी पुरवी प्रेमकृपा जयाची ।
सर्वांगीं सुंदर उटी शेंदूराची ।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मनःकामना पुरती ॥ध्रु.॥
भगवान श्रीगणेश सुखकर्ते आणि दुःखहर्ते आहेत. आपल्या भक्तांची सर्व प्रकारची दुःखे, ते केवळ आपल्या एका कृपाकटाक्षाने दूर करतात आणि शाश्वत सुख त्याच्या आयुष्यात निर्माण करतात. ज्यांची प्रेमकृपा दुःखांची वार्ताही नि:शेष नष्ट करते; त्या भगवान श्रीगणपतींनी सर्वांगी भक्तवात्सल्याच्या शेंदराची उटी चर्चिलेली असून, भक्तप्रेमरूपी मोत्यांची तेजस्वी माळ गळ्यात घातलेली आहे. अशा अखिल विश्वाचे मंगल करणा-या मंगलमूर्ती देवाधिदेव विघ्नहर श्रीगणपतींचा जयजयकार असो ! त्यांच्या नुसत्या दर्शनानेही भक्तांच्या अखिल मनोकामना पूर्ण होतात.
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरें चरणीं घागरिया ॥२॥
अनर्घ्य रत्नांनी जडवलेले सुंदर पदक गौरीकुमरा आपल्याला शोभा देत आहे. तुम्ही सर्वांगी ल्यालेली केशरयुक्त लालसर सुगंधी चंदनउटी मोहक दिसत आहे. तुमच्या मस्तकावरचा हिरेजडित मुकुट तेजाने तळपत असून पायातील घागऱ्या, पैंजण मधुर ध्वनी करीत भक्तांच्या हृदयात आल्हाद निर्माण करीत आहेत. तुमचे हे मनोहर रूप तुमच्या भक्तांच्या चित्तवृत्तींना अंतर्बाह्य वेध लावून, भुंग्याप्रमाणे त्यांना तुमच्या चरणकमलीच खिळवून ठेवत आहे.
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकष्टीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना ॥३॥
हे पीतांबर नेसलेल्या लंबोदरा, कंबरेला नागाचे बंधन धारण करणाऱ्या, सरळ सोंड व वाकड्या मुखाच्या गणराया, तीन नेत्र असलेल्या श्रीगजानना, हा रामाचा दास तुमची आपल्या घरी आतुरतेने वाट पाहात आहे. तुम्ही त्याच्या प्रेमप्रार्थनेचा स्वीकार करून त्याच्या अंत:करणरूपी घरी लवकर प्रकट व्हावे आणि त्याचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करून त्याचा आणि त्याच्या रामभक्तीचा शेवटपर्यंत सांभाळ करावा. श्रेष्ठ देव-देवताही ज्यांना वंदन करतात अशा श्रीगणेशा, या रामदासाची प्रेमार्ती स्वीकारून तुम्ही आता भरभरून कृपा करावी !
श्री समर्थ संप्रदायात यातील पहिले आणि तिसरे अशी दोनच कडवी म्हटली जातात. ‘रत्नखचित फरा..’ हे कडवे म्हणत नाहीत. ते प्रक्षिप्त मानले जाते. परंतु सर्वत्र ते प्रचलित असल्यामुळे मी येथे त्याचाही अर्थ दिलेला आहे.
[ http://rohanupalekar.blogspot.in ]
काही अभ्यासकांचा, शेवटच्या चरणातील ‘संकष्टी का संकटी’ यावर मतभेद आहे. या दोन्ही पाठभेदांचा अर्थ एकच होतो. संकष्टी पावावें म्हणजे संकटांमध्ये पावावे. संकष्टी चतुर्थीचा याच्याशी काहीही संबंध नाही. जुन्या काळातील मराठीत संकष्ट असाही शब्दप्रयोग होता; त्यामुळे संकटी पावावे आणि संकष्टी पावावे हे दोन्ही पाठ अर्थदृष्ट्या बरोबरच आहेत. संकष्ट म्हणजे तीव्र कष्ट, मोठी दु:खे. आणि अशा संकटांच्या वेळी तर विघ्नहर्ताच स्वाभाविकपणे आठवणार ना !
काही ठिकाणी ‘दर्शनमात्रे मन स्मरणेमात्रे मन:कामना पुरती’ आणि ...जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती असे म्हणतात. ते मात्र पूर्ण चूक आहे. कोणाच्याही मूळ रचनेत पदरचे शब्द घालणे, हे साधुसंतांनी चुकीचे म्हणूनच सांगितलेले आहे. त्यामुळे मूळची आरती जशी आहे तशीच, शुद्ध शब्दोच्चार करीत म्हणायला हवी; स्वतःचे कोणतेही शब्द त्यात न घालता. संतांच्या शब्दांना जसे सामर्थ्य असते तसे आपल्या शब्दांना कधीच नसते; आणि म्हणूनच संतांच्या वाङ्मयात जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने होणारी ही पदरची भर आपण सर्वांनी कायमच टाळली पाहिजे.
मनोभावे आणि प्रेमाने केलेली आरती, स्तुतिप्रिय अशा श्रीभगवंतांच्या मनात आपल्याविषयी करुणा उत्पन्न होण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणूनच, कसलीही घाईगडबड न करता प्रेमाने आणि मनापासून, आरतीतील शब्दांचा सुयोग्य अर्थ जाणून, त्यातील भावना आपल्या अंतःकरणात रुजवून आरती म्हटली पाहिजे. जर आपण या गणेशोत्सवातच नाही तर रोजच्या पूजेतही अशाच प्रकारे आरती म्हटली, तर त्यातून अधिक आनंद तर लाभेलच; शिवाय भक्तांवर निरतिशय प्रेम करणारे भगवंत देखील प्रसन्न होऊन आपल्या सर्व दुःखांचा समूळ नाश करून आपले आयुष्य सुखसमाधानाने भरून टाकतील यात तिळमात्रही शंका नाही !
लेखक: रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष: 8888904481

4 comments:

  1. प्रभंजन8/25/2020 5:00 pm

    अतिशय सुंदर लेख!! नवीन माहिती मिळाली.आरती म्हणताना पदरचे शब्द घालणे खरंच चुकीचे आहे.

    ReplyDelete