18 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु - तुलसीपत्र पाचवे

तुलसीपत्र पाचवे - यमाष्टक

चौथ्या तुलसीपत्रात आपण श्रीभगवन्नामाचे अलौकिक माहात्म्य सांगणारी 'यमगीता' पाहिली. यमगीतेचा उपदेश केल्यानंतर आपल्या किंकरांना याच संदर्भात अधिक मार्गदर्शन करण्याचा विचार यमदेवांच्या मनात आला. तेवढ्यात त्यांनी हातात पाश घेऊन कोणत्यातरी जीवाचे प्राण हरण करायला निघालेले आपले दूत पाहिले. त्यांना उद्देशून श्री यमदेवांनी जो मौलिक उपदेश केला, त्याला 'यमाष्टक' म्हणतात. हे अष्टक श्रीनृसिंह पुराणाच्या नवव्या अध्यायात आले आहे. 
श्री यमदेव म्हणाले, "दूतांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, भगवान मधुसूदनांना शरण गेलेल्या जीवांना तुम्ही सोडून द्या. त्यांच्या पुण्यपापांचा हिशोब आपण करायची गरज नाही. कारण यम म्हणून माझी सत्ता केवळ सामान्य जीवांवरच चालते. वैष्णवांच्यावर माझा अधिकार चालत नाही. जे जीव श्रीभगवंत आणि श्रीगुरूंना विमुख आहेत, त्यांनाच मी शासन करू शकतो. या उलट वैष्णवांना, भगवद्भक्तांना मी वंदनच करतो. कारण मलाही माझी उत्तम गती व्हावी अशी इच्छा आहे. मी भगवान श्रीविष्णूंच्याच अधिपत्याखाली कार्य करत आहे. 
विष कधी अमृत होऊ शकत नाही, लोखंड शंभर वर्षे अग्नीत तापवले तरी ते सोने होऊ शकत नाही, परप्रकाशित चंद्र कधीच स्वयंप्रकाशित सूर्य होऊ शकत नाही, तसेच श्रीभगवंतांना विमुख असणारे जीव कधीच सिद्धी (मुक्ती) प्राप्त करून घेऊ शकत नाहीत.  परंतु श्रीभगवंतांच्या चिंतनात सतत रममाण झालेला मलिन शरीराचा सामान्य जीव देखील शोभायमान ठरतो. म्हणून ज्याला या संसारचक्रातून आपली सुटका व्हावी असे वाटते त्याने श्रीभगवंतांच्या श्रीचरणांचाच दृढ आश्रय घेतला पाहिजे ! 
अनंत पुण्ये गाठीशी असल्यामुळे भाग्याने मिळालेले हे मनुष्य शरीर मोक्षासाठी प्रयत्न न करता केवळ सुखोपभोगांमध्ये व्यर्थ घालवणे म्हणजे राखेसाठी मौल्यवान चंदनकाष्ठे जाळण्याचा मूर्खपणा करणे होय. तुम्ही आपला दुर्लभ मनुष्यजन्म वाया घालवू नका, वेळीच जागे व्हा !
महान देवदेवता ज्यांच्या श्रीचरणांना वारंवार वंदन करण्यात धन्यता मानतात त्या भवजन्मनाशक जगत्प्रभू सनातन पुरुष भगवान श्रीविष्णूंना मी पुन:पुन्हा नमस्कार करतो !"
भगवान श्रीव्यासदेव या 'यमाष्टका'चे माहात्म्य सांगतात की, "जो नित्यनियमाने या स्तोत्राचे पठण करतो तो सर्व पापांमधून मुक्त होऊन विष्णुलोकी जातो. त्याच्या हृदयात विष्णुभक्ती पैसावते !"
मागचे लेख वाचून काही जणांना शंका आली असेल की, मार्कंडेयांचे आख्यान तर शिवपुराणात आहे. ते शिवभक्त होते, शिवपिंडीला घट्ट मिठी मारून बसल्याने त्यांना यमदूत स्पर्श करू शकले नाहीत, इत्यादी कथा आम्ही ऐकलेल्या आहेत. मार्कंडेय विष्णुभक्त असल्याची कथा आज पहिल्यांदाच वाचतो आहोत. 
ही शंका रास्त आहे. मुळात अशा पौराणिक कथा वाचताना आपण त्यांतील सारगर्भ उपदेशच लक्षात ठेवायचा असतो. कथेतील इतर लौकिक संदर्भ सोडून द्यायचे. ज्या देवतेचे पुराण असेल त्यांच्याच कथा प्राधान्याने त्यात येणार, हे उघडच आहे. गणेश पुराण वाचले की गणेश सर्वश्रेष्ठ वाटतात, शिव पुराण वाचले की शिव थोर जाणवतात. वास्तविक शिव-गणेश-विष्णू हा भेदच काल्पनिक आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे
ही सृष्टी आजवर हजारो वेळा निर्माण झाली व तितक्याच वेळा नष्टही झालेली आहे. प्रत्येक कल्पात हे सर्व अवतार झालेले आहेत. त्यातील एका कल्पात मार्कंडेय हे विष्णुभक्त होते तर दुसऱ्या कल्पात ते शिवभक्त होते. ज्या त्या कल्पातील प्रसंग महात्म्यांनी ध्यानावस्थेत जसा पाहिला तसा त्यांनी नोंदवून ठेवला. त्यामुळे या सर्व कथा कल्पभेदाने सत्यच आहेत, यात खोटे काहीही नाही. भगवान श्रीशिव आणि भगवान श्रीविष्णू ही रूपे जरी भिन्न असली तरी ते मूळचे परब्रह्माचेच अवतार आहेत; आणि त्यामुळेच ते पूर्णत: एकच आहेत, हे आपण विसरता कामा नये.
भगवान श्रीविष्णू, भगवान श्रीशिव, भगवान श्रीसूर्य, भगवान श्रीगणेश आणि भगवती श्रीजगदंबा हे पाच परब्रह्मस्वरूप पंचायतन आहे. भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी पंचायतनपूजेचा प्रचार करून या पाचांच्या अनुयायांमधला भेदभाव नष्ट केला. कारण मुळातच ही पाच रूपे परब्रह्मस्वरूपच आहेत, त्यामुळेच एकच आहेत. आपापल्या आवडीनुसार जो तो ज्या त्या देवाची उपासना करतो. सर्व भक्त शेवटी एकाच अफूट, अनंत परब्रह्मात जाऊन मिळतात. त्यामुळेच देवांमधील भेद खरा नाही; आणि तो भेद सत्य नाही हे ज्याला अनुभवाने पटते तोच खरा भक्तश्रेष्ठ मानला जातो !
भगवान श्रीनारायणांच्या, भगवान श्रीनृसिंहांच्या परमपावन नामाचे जो सदैव मनापासून स्मरण, चिंतन करतो, तो नि:संशय यमाच्या तावडीतून सुटतो. सद्गुरु श्री माउली हरिपाठात सांगतात तसे, "ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचें शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेलें ॥हरि.२०.४॥" प्रेमभावे हरिनामस्मरण करणाऱ्या सभाग्य भक्ताचे कुळगोत्रच उद्धरून जाते, यम त्यांच्या वाट्यालाही जात नाही !
( छायाचित्र संदर्भ : हिरण्यकश्यपू दैत्याचे विदारण करणारी भगवान श्रीनृसिंहांची श्रीमूर्ती. )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481

16 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु - तुलसीपत्र चौथे

तुलसीपत्र चौथे - यमगीता

श्री मार्कंडेय मुनींचा प्राण हरण करण्यासाठी गेलेले पण विष्णुदूतांच्या भीतीने पळून आलेले मृत्युदेव आणि यमदूत श्री यमदेवांपाशी जाऊन रडत रडत तक्रार करू लागले; "हे यमदेवा, आम्ही आपल्या आज्ञेने जीवांना त्यांच्या कर्मगतीनुसार येथे घेऊन येतो. नेहमीप्रमाणे त्या मार्कंडेय मुनींना घ्यायला गेलो तेव्हा ते एकाग्रचित्ताने कोणत्यातरी देवतेचे ध्यान करत होते. आम्ही त्यांचा प्राण हरण करण्यासाठी त्यांच्या जवळ गेल्याबरोबर महाकाय व तेजस्वी अशा पुरुषांनी आम्हांला मुसळाने मारले. मृत्युदेवांनाही त्यांचा मार खावा लागला. ते ब्राह्मण कोण आहेत ? ते कोणते असे तप करीत आहेत ? हे कृपया आपण आम्हांला सांगा !"
सूर्यपुत्र श्री यमदेवांनी क्षणभर ध्यान लावून सर्व जाणून घेतले व ते सांगू लागले, "माझ्या दूतांनो, लक्षपूर्वक ऐका. ते ब्राह्मण भृगुऋषींचे नातू मार्कंडेय आहेत. भृगूंच्या आज्ञेनुसार मृत्यूला जिंकण्यासाठीच ते भगवान श्रीविष्णूंची आराधना करीत आहेत. त्यांनी भगवान केशवांना हृदयात धारण केले आहे. वैष्णवी महादीक्षेमुळेच त्यांना हे बल प्राप्त झाले आहे. श्रीभगवंतांना सर्वस्वाने शरणागत झालेल्या भाग्यवंताला जगात कोणीही कसलाही अपाय करू शकत नाही, हे पक्के लक्षात ठेवा. त्यामुळेच तुम्ही त्यांना स्पर्शही करू शकला नाहीत. तुम्हांला ज्यांनी मार दिला ते महाकाय पुरुष पराक्रमी विष्णुदूत आहेत. ते दयाळू आहेत म्हणून तुम्ही जिवंत तरी राहिलात. विष्णुध्यानात तत्पर असणाऱ्या भक्ताचा प्राण हरण करायला जाणे हे तुमचेच महापाप आहे. आजपासून हे कायम लक्षात ठेवा की, भगवान श्रीनृसिंहांच्या, भगवान श्रीविष्णूंच्या प्रिय भक्तांच्या तुम्ही कधीही वाटेला सुद्धा जात जाऊ नका !"
श्रीविष्णुस्मरणाने भावुक झालेल्या यमदेवांचे लक्ष तेवढ्यात नरकात खितपत पडलेल्या पापी जीवांकडे गेले. त्यांची ती दुर्दशा पाहून कळवळ्याने यमदेव त्या दु:खी जीवांना म्हणाले, "हे पापी जीवांनो, जेव्हा खरोखर वेळ होती तेव्हाच तुम्ही क्लेशहारक भगवान श्रीकेशवांची भक्ती का केली नाहीत ? पूजेसाठी कोणतीही सामग्री जवळ नसताना सद्भावनेने केवळ सहज उपलब्ध असणारे पाणी अर्पण केले तरी ते भगवान श्रीविष्णू प्रसन्न होतात. अशा परमदयाळू भगवंतांची तुम्ही कधीही पूजा केली नाहीत. प्रेमाने नुसते स्मरण केले तरी समस्त पापांपासून, दु:खांपासून मुक्ती देणाऱ्या भगवान श्रीनृसिंहांचे तुम्ही कधीच स्मरण केले नाहीत, पूजाअर्चा केली नाहीत. त्याचेच हे भयंकर फळ आता भोगत आहात !"
(https://rohanupalekar.blogspot.com)
पुन्हा आपल्या किंकरांकडे वळून यमदेव म्हणाले, "भगवान श्रीविष्णूंनी पूर्वी देवर्षी नारदांना सांगितलेले उत्तम वचन मी तुम्हांला सांगतो. 
हे कृष्ण कृष्ण कृष्णेति यो मां स्मरति नित्यश: ।
जलं भित्त्वा यथा पद्मं नरकादुद्धराम्यहम् ॥२७॥
पुण्डरीकाक्ष देवेश नरसिंह त्रिविक्रम ।
त्वामहं शरणं प्राप्त इति यस्तं समुद्धरे ॥२८॥
त्वां प्रपन्नोऽस्मि शरणं देवदेव जनार्दन ।
इति य: शरणं प्राप्तस्तं क्लेशादुद्धराम्यहम् ॥२९॥
"हे नारदा, कृष्ण कृष्ण कृष्ण असे म्हणून जे माझे नित्य स्मरण करतात त्यांना मी, ज्याप्रमाणे अथांग जलाला भेदून कमळाचे फूल वर येतेच, तसाच घोर नरकातून बाहेर काढतो. 'पुण्डरीकाक्ष, नरसिंह, त्रिविक्रम' इत्यादी माझी नामे घेऊन मला सर्वभावे शरण येतात त्यांचा मी उद्धार करतोच. मी त्यांना सर्व क्लेशांपासून, सर्व दु:खांपासून मुक्त करतो !"
यमदेवांचे हे मधुर शब्द नरकातील पापी जीवांनी देखील ऐकले. त्यासरशी ते 'कृष्ण कृष्ण नरसिंह' असा भगवन्नामांचा जयघोष करू लागले. जसजसा ते नामघोष करू लागले तसतसा त्यांच्या हृदयात भक्तिप्रेमाचा आविर्भाव झाला. ते सद्गदित होऊन श्रीभगवंतांची स्तुती करू लागले, "ज्यांचे नामकीर्तन केले असता नरकातील भयंकर ज्वाला तत्काल शांत होतात, त्या आदिमूर्ती यज्ञपती भगवान श्रीविष्णूंना नमस्कार असो. वेदांनी ज्यांचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनन्त अप्रमेय शंखचक्रगदाधारी भगवान श्रीनृसिंहांना वारंवार नमस्कार असो. मत्स्यकूर्मादी दशावतार धारण करून दुष्टांचे निर्दालन व भक्तांचे पालन करणाऱ्या महान श्रीगोविंदांना नमस्कार असो. आमचा या नरकयातनांमधून उद्धार करा !"
नरकातील त्या अभागी जीवांनी अशी स्तुती करायला सुरुवात केल्याबरोबर चमत्कार घडावा तशी त्यांची नरकपीडा शमली. त्यांचे दुर्गंधीयुक्त शरीर सुगंधी झाले, त्यांच्या शरीरावरील व्रण नाहीसे झाले आणि उत्तमोत्तम वस्त्रालंकारांनी त्यांची शरीरे सुशोभित झाली. ते जीव कृष्णस्वरूप दिसू लागले. तेव्हा विष्णुदूतांनी येऊन त्यांना दिव्य विमानांमध्ये बसवून विष्णुलोकाला नेले. 
श्रीभगवन्नामोच्चाराने घडलेली ही अद्भुत लीला पाहून सद्गदित झालेले यमदेव हात जोडून पुन:पुन्हा वंदन करू लागले, "ज्यांच्या नामकीर्तनाने नरकात पडलेले जीवही विष्णुलोकी गेले, त्या गुरुदेव भगवान श्रीनृसिंहांना मी सदैव प्रणाम करतो. अमिततेजस्वी भगवान श्रीनृसिंहांना प्रेमाने नमस्कार करणाऱ्या भाग्यवान जीवांनाही मी यमदेव वारंवार वंदन करून धन्य होतो !"
श्रीनृसिंह पुराणाच्या आठव्या अध्यायातील या कथाभागाला 'यमगीता' असे म्हणतात. श्रीभगवंतांच्या परमपावन नामाचे महत्त्व आणि माहात्म्य यथार्थतेने सांगणाऱ्या  यमगीतेतील बोध आपण हृदयात धारण करून, सद्गुरु श्री माउली म्हणतात तसे, प्रेमादरपूर्वक झडझडून नामस्मरण करून आपला उद्धार करून घेतला पाहिजे !

( छायाचित्र संदर्भ : भगवान श्रीनृसिंहांचे 'निटिलाक्ष' असे एक नाम आहे. या नामाचा अर्थ 'मोठे टपोरे गोलाकार डोळे असणारे' असा होतो. आपल्या मोठाल्या आणि अखंड दयेचा वर्षाव करणाऱ्या डोळ्यांनी हे भगवान श्रीनृसिंहप्रभू समस्त ब्रह्मांडांमधील आपल्या भक्तांवर कृपाकटाक्ष टाकत असतात. श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील निटिलाक्ष भगवान श्रीनृसिंहांचे कृपावर्षाव करणारे असेच परमप्रेमळ नेत्रकमल या छायाचित्रात स्पष्ट दिसत आहेत ! )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष : 8888904481

15 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु - तुलसीपत्र तिसरे

तुलसीपत्र तिसरे - श्रीमार्कंडेयाख्यान

श्रीनृसिंह पुराणाच्या सातव्या अध्यायात श्रीमार्कंडेयांचे आख्यान आलेले आहे. भगवान श्रीब्रह्मदेवांनी अनुसर्गात सप्तर्षी, प्रचेता, भृगू आणि नारद यांना निर्माण केले. हे दहा विधात्याचे मानसपुत्र मानले जातात. 'भृगू' ऋषींचा विवाह 'ख्याती' नावाच्या दक्ष प्रजापतीच्या कन्येशी झाला. त्यांना 'मृकण्डू' नावाचा पुत्र झाला. मृकण्डू आणि त्यांची पत्नी  'सुमित्रा' यांना 'मार्कंडेय' नावाच्या पुत्र झाला. भृगुऋषींचे नातू मार्कंडेय हे जात्याच अत्यंत बुद्धिमान होते.
मार्कंडेय लहान असतानाच एका ज्योतिषाने सांगितले की, "हा मुलगा बारा वर्षे पूर्ण झाल्यावर मृत्यू पावेल !" हे ऐकून मार्कंडेयांच्या आईवडिलांना अतीव दु:ख झाले. ते सदैव त्याच दु:खात वावरू लागले. थोडे मोठे झाल्यावर गुरुगृही राहून गुरुसेवापूर्वक वेदाध्ययन पूर्ण करून मार्कंडेय घरी परत आले. त्यांनी आपल्या मातापित्यांना दु:खाचे कारण विचारले. आपल्याला बाराव्या वर्षी मृत्युयोग आहे हे जाणूनही मार्कंडेय शांतपणे म्हणाले, "तुम्ही निश्चिंत असा, मी तपश्चर्या करून माझा मृत्युयोग नक्कीच टाळीन !"
यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी मार्कंडेय वल्लीवट स्थानी आपल्या आजोबांकडे आले. ज्योतिषाची भविष्यवाणी सांगून त्यांनी त्यासाठी उपाय विचारला. महामती भृगू म्हणाले, "बाळा; अतिशय खडतर तपश्चर्या करून भगवान श्रीनारायणांची कृपा संपादन केल्याशिवाय मृत्यू टाळला जात नाही. म्हणून तू अजन्मा अविनाशी अशा भगवान श्रीनरसिंहांना शरण जाऊन मनोभावे त्यांचे पूजन करून 'ॐ नमो भगवते वासुदेवाय ।' या द्वादशाक्षरी महामंत्राचा जप कर. या मंत्राचा जप करणाऱ्यावर भगवान श्रीविष्णू त्वरित प्रसन्न होतात. त्यासाठी तू सह्यपर्वतात उगम पावणाऱ्या तुङ्गभद्रा नदीच्या तीरावरील 'भद्रवट' नावाच्या महान वटवृक्षाखाली भगवान श्रीकेशवांची मूर्ती स्थापून तेथेच या मंत्राची मी सांगितल्याप्रमाणे उपासना कर. तुझे कल्याण होईल !"
(https://rohanupalekar.blogspot.com)
मार्कंडेयांनी अतिशय निष्ठेने मंत्रजप केला. परिणामस्वरूप ते भगवान श्रीविष्णूंच्या स्वरूपात लीन झाले. बारा वर्षे पूर्ण झाल्यावर यमदूत त्यांचा प्राण न्यायला आले खरे, पण हरिस्वरूपात लीन झालेल्या मार्कंडेयांचे सर्व बाजूंनी संरक्षण करणाऱ्या विषणुदूतांनी त्या यमदूतांना पळवून लावले. दूतांना पळवून लावले म्हणून साक्षात् यमदेव तेथे आले. तेही विष्णुदूतांच्या भयाने मार्कंडेयांच्या जवळही जाऊ शकले नाहीत. त्याच वेळी भगवान श्रीविष्णूंनी मार्कंडेयांच्या कानात एक दिव्य स्तोत्र सांगितले. त्या स्तोत्रानेच मग मार्कंडेयांनी श्रीविष्णूंची स्तुती केली. 
या स्तोत्राला 'मृत्युञ्जय स्तोत्र' असे म्हणतात. हे आठ श्लोकांचे स्तोत्र अतिशय सुंदर, गेय व सहजसोपे असून त्याचे 'किं मे मृत्यु: करिष्यति ।' हे पालुपद आहे. प्रत्येक श्लोकाच्या उत्तरार्धात भगवान श्रीनारायणांच्या एका नामाचा उल्लेख असून, "मी त्यांना शरण गेलो आहे, आता मृत्यू मला काहीही करू शकत नाही !" असे मार्कंडेयजी छातीठोकपणे सांगत आहेत. 
या स्तोत्राचा पहिला श्लोक असा आहे, 
*नारायणं सहस्राक्षं पद्मनाभं पुरातनम् ।*
*प्रणतोऽस्मि हृषीकेशं किं मे मृत्यु: करिष्यति ॥१॥*
अत्यंत प्रभावी असे हे स्तोत्र व त्यातील गर्भितार्थ ऐकून घाबरलेल्या यमदेवांनी तेथून पळ काढला, पुन्हा कधीच ते मार्कंडेयांकडे आले नाहीत. भगवान श्रीनृसिंहांच्या कृपेने अशा प्रकारे मार्कंडेय मुनी अमर झाले. पुराण सांगते की, प्रलयातही मार्कंडेय मुनींना मृत्यू येत नाही. मार्कंडेय प्रलयकालातल्या त्या एकार्णवात एकटेच पोहत राहतात असे श्री माउलींनी देखील सांगितले आहे. "जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पोहे मार्कंडेय एकाकी । (ज्ञाने.११.९.१८७)" ही अमरत्वाची स्थिती त्यांना भगवान श्रीविष्णूंच्या कृपेने आणि तपश्चर्येने प्राप्त झालेली आहे. भगवन्नामातच केवळ मृत्यूलाही पार करण्याचे अचाट सामर्थ्य आहे, हाच सुबोध या कथेच्या माध्यमातून श्रीनृसिंहपुराण आपल्याला करवून देत आहे !
या 'मृत्युञ्जय स्तोत्रा'चे पवित्र चित्ताने दररोज प्रात:काली, मध्यान्ही व सायंकाली मनोभावे पठण केल्यास अकालमृत्यू पासून सुटका होते आणि भगवान श्रीनारायणांची कृपा लाभते, असे याचे माहात्म्य श्रीनृसिंह पुराणात कथन केलेले आहे.
( छायाचित्र संदर्भ : श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील भगवान श्रीनृसिंह ! )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष : 8888904481

14 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु -तुलसीपत्र दुसरे

तुलसीपत्र दुसरे - श्रीनृसिंहपुराण परिचय

महर्षी वेदव्यास प्रणीत उपपुराण म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीनृसिंह पुराण हे भक्तिशास्त्रातील अतिशय मार्मिक सिद्धांत कथन करणारे महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण फारसे प्रचलित नसल्याने यावर अभ्यासकांनी त्या मानाने काम केलेले नाही. पण तरीही ह्या पुराणाचे माहात्म्य वादातीत आहे.
आज उपलब्ध असणारी श्रीनृसिंह पुराणाची संहिता ही महर्षी लोमहर्षण सूतमुनी आणि भरद्वाजादी ऋषी यांच्या संवादात्मक आहे. या पुराणात एकूण अडुसष्ट अध्याय आहेत. बाकीच्या पुराणग्रंथांप्रमाणेच यातही सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित या गोष्टींचा ऊहापोह केलेला दिसून येतो. हे पुराण प्रामुख्याने भगवान श्रीविष्णूंच्या अवतारांच्या लीलाकथांचे विवरण करते. श्रीनृसिंह सोडता इतर अवतारांपैकी प्राधान्याने भगवान श्रीरामरायांच्या लीलाचरित्राचे विवरण यात आलेले आहे. या पुराणात आलेली 'यमगीता', सहस्रानीक चरित्र, सावित्री-ब्रह्मचारी संवादातील पतिव्रता महिमा आणि मातृसेवेचे महत्त्व, 'ॐ नमो नारायणाय' या अष्टाक्षर मंत्राचे माहात्म्य, श्रीनृसिंह चरित्र आणि प्रल्हाद माहात्म्य तसेच हारीत स्मृती हे अतिशय महत्त्वाचे बोधप्रद भाग आहेत. 
श्री सूतमहर्षींनी सदुसष्टाव्या अध्यायात या पुराणाची परंपरा सांगितली आहे की, हे पुराण सर्व प्रथम भगवान ब्रह्मदेवांनी मरीचि आदि आपल्या मानसपुत्रांना, सप्तर्षींना कथन केले. त्यांतील भृगु ऋषींनी ते पुढे श्री मार्कंडेयांना सांगितले. मार्कंडेय मुनींनी ते सहस्रानीक नावाच्या भगवद्भक्त राजाला सविस्तर कथन केले. पुढे भगवान श्रीनृसिंहांच्या कृपेने या पुराणाची प्राप्ती महर्षी वेदव्यासांना झाली. व्यासजींनी ते लोमहर्षणांना कथन केले व लोमहर्षणांनी प्रयाग क्षेत्री ऋषिमुनींना त्याचे विवरण करून सांगितले. तीच आज उपलब्ध असलेली संहिता आहे. 
(https://rohanupalekar.blogspot.com)
श्रीमद् भागवत पुराणाप्रमाणेच याही पुराणात प्रसंगविशेषी फार सुंदर स्तोत्ररचना निर्माण झालेल्या आहेत. अकालमृत्युहारक 'मृत्युञ्जय स्तोत्र', 'यमगीता', 'यमाष्टक', तीर्थस्नानफलदायक विष्णुस्तोत्र, मार्कंडेय कृत विष्णुलोकप्रदायक 'शेषशायी भगवत्स्तुती', भगवान श्रीशिवांनी श्री नारदांना सांगितलेले 'विष्णुस्तवराज', विश्वकर्मा रचित 'सूर्याष्टोत्तरशतनाम', इक्ष्वाकू विरचित 'श्रीविनायक स्तोत्र', ध्रुव कृत 'विष्णुस्तुती', श्रीमहादेव रचित 'श्रीविष्णुशतनाम स्तोत्र', श्रीब्रह्मदेव कृत 'विष्णुस्तुती', श्रीब्रह्मदेव कृत 'श्रीकृष्णस्तुती', शुक्राचार्य कृत दृष्टिदायक 'विष्णुस्तुती', प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णूंनी सांगितलेले आपल्या अडुसष्ट नामांचे 'विष्णुवल्लभ स्तोत्र' इत्यादी अनेक उत्तमोत्तम आणि प्रभावी स्तोत्ररचना या पुराणात आलेल्या आहेत. हे श्रीनृसिंह पुराणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
श्रीनृसिंह पुराणाच्या वाचन-मनन-कथनाचे सुफल सांगताना लोमहर्षणजी म्हणतात, "या पुराणाचे प्रेमादराने श्रवण केल्यास माघमासात प्रयागस्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. जो हे पुराण साधुसज्जनांना, भगवद्भक्तांना कथन करतो त्याला सर्व तीर्थांच्या स्नानाचे फळ लाभून विष्णुलोकाची प्राप्ती होते. हे पुराण समस्त पापांचा तत्काल नाश करणारे असून भगवान श्रीनृसिंहांचा कृपाप्रसाद सहजतेने करविणारे आहे. रोज सकाळी या पुराणाचे वीस श्लोक जो पठण करेल त्याला ज्योतिष्टोम यज्ञाचे फळ लाभून अंती विष्णुलोकाची प्राप्ती होते. हे पुराण सर्व कामनासिद्धी करणारे, मोक्षदायक आणि मुख्यत: भक्तिप्रदायक मानलेले आहे. म्हणूनच भगवद्भक्तांनी प्रयत्नपूर्वक नित्यनियमाने या पुराणाचे श्रवण-मनन करावे !"
संतवाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि महायोग परंपरेतील थोर विभूतिमत्त्व प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली श्रीवामनराज प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेल्या श्रीनृसिंह कोशाच्या पहिल्या व दुसऱ्या खंडात ह्या पुराणाची संस्कृत संहिता तसेच मराठी भाषांतर प्रकाशित झाले होते. परंतु ते खंड आता उपलब्ध नाहीत. गोरखपूरच्या गीताप्रेसने हिंदी अनुवादासह प्रकाशित केलेले 'श्रीनरसिंहपुराण' (प्रकाशन क्र.१११३) आजमितीस उपलब्ध आहे. त्यातील भाषांतर अतिशय चांगले व अभ्यासपूर्ण असून अवश्य संग्रही ठेवावा असाच हा ग्रंथ आहे.
( छायाचित्र संदर्भ : श्रीक्षेत्र कोळे नृसिंहपूर येथील भगवान श्रीज्वालानृसिंह ! )
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर 
भ्रमणभाष : 8888904481

13 May 2024

बापरखुमादेविवरु नरहरी अवतारु


तुलसीपत्र पहिले

आज वैशाख शुद्ध षष्ठी, भक्तवत्सल भक्ताभिमानी प्रल्हादवरद भगवान श्रीनृसिंहप्रभूंच्या नवरात्रीचा पहिला दिवस. या नवरात्रीच्या पावन पर्वकालात भगवान श्रीनरहरीरायांच्या स्तुतिगायनात काही क्षण व्यतीत करावेत, त्यांचे गुणवर्णन करून धन्यता अनुभवावी, त्यांचे परमप्रेमाने पूजन करून समाधान प्राप्त करावे अशी जाणत्या वैष्णवांची आज्ञा आहे. आपणही यथाशक्य ही सेवा साधू या ! 
गेली काही वर्षे भगवान श्रीनरहरीरायांच्या परमकृपेने नवरात्रात लेखनसेवा घडली. ते सगळे लेख माझ्या ब्लॉगस्पॉटवर उपलब्ध आहेत. मागे घडलेली सर्व लेखनसेवा परिवर्धित स्वरूपात श्रीसद्गुरुकृपेच्या बळावर गेल्या वर्षी 'विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंभ' या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशितही झाली. जाणत्या वाचकांनी या पुस्तकाचे भरभरून स्वागत केले. आनंदाची गोष्ट अशी की, वर्षभरातच 'विदारूनी महास्तंभ देव प्रकट स्वयंभ'ची प्रथमावृत्ती जवळपास संपली आहे. मोजक्या प्रतीच आता शिल्लक आहेत. ही नि:संशय श्रीसद्गुरुदेवांची करुणाकृपाच म्हणावी लागेल. 
गेल्या वर्षीच्या नवरात्रीत पुस्तकाच्या कामामुळे नवीन काही लेखनसेवा घडली नव्हती. याही वर्षी नवीन लेखनासंदर्भात कोणताच विचार केलेला नव्हता. परंतु श्रीभगवंतांचीच सेवा करवून घ्यायची इच्छा असावी. आज दुपारी सहज म्हणून एक संदर्भ पाहण्यासाठी श्रीनृसिंह पुराण हाती घेतले आणि वेळेकडे लक्ष न जाता वाचतच गेलो. श्रीनृसिंह पुराणाचे माहात्म्यच असे आहे की, त्यातून दर वेळी श्रीनृसिंहचरित्राचा काही ना काही नवीन आयाम नजरेसमोर येतो आणि अक्षरश: हरखून जायला होते. वाचता वाचता असे वाटले की श्रीनृसिंह पुराणावरच अल्पशी लेखनसेवा करावी. त्याद्वारे या पर्वकालात एकप्रकारे श्रीनृसिंह चरित्राची आणि पर्यायाने परमाराध्य भगवान श्रीनरहरीरायांचीच शब्दपूजा बांधली जाईल !
श्रीनृसिंह पुराण हे पुराणग्रंथांमधील एक उपपुराण म्हणून गणले जाते. पुराणांच्या कालाबद्दल विद्वान अभ्यासकांमध्ये अनेक मतवाद आहेत. आपल्याला त्याच्याशी काहीच देणेघेणे नाही; पण एवढे नक्की की श्रीनृसिंह पुराण बरेच प्राचीन आहे. भगवान श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी आपल्या श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या भाष्यात श्रीनृसिंहपुराणाचा नामोल्लेख करून त्यातील संदर्भ घेतलेला आहे. त्याअर्थी हे पुराण अडीच हजार वर्षांपूर्वी प्रसिद्ध होते यात शंका नाही. म्हणूनच प्रस्तुत पुराण प्राचीन आहे असा निर्वाळा देता येतो.
श्रीनृसिंह पुराण हे भगवान श्री वेदव्यास प्रणीत मानले जाते. एकदा गंगा-यमुना-सरस्वती या महान नद्यांच्या संगमावरील प्रयाग क्षेत्रात परमपावन अशा माघमासात हिमालयातील अनेक ऋषिमुनी तीर्थस्नानासाठी जमले होते. स्नान करून ते सर्व प्रयागक्षेत्रात राहणाऱ्या ऋषिवर भरद्वाजांच्या आश्रमात गेले. परस्परांचा सन्मान करून झाल्यावर त्यांची भगवच्चर्चा चालू असताना अचानकच परमज्ञानी महर्षी लोमहर्षण सूतमुनी तिथे उपस्थित झाले. अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान आणि पुराणांचे ज्ञाते असे श्री लोमहर्षण मुनी हे महर्षी वेदव्यासांचे शिष्य होते.
श्री लोमहर्षणमुनी आलेले पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला. त्यांचा यथायोग्य सन्मान करून भरद्वाजमुनी त्यांना म्हणाले, "मुनिवर, मागे शौनकांच्या यज्ञात आपण वाराहसंहिता कथन केली होती. आम्ही सर्व जण आता आपल्याकडून श्रीनृसिंह पुराण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. कृपया आपण आमची ही इच्छा पूर्ण करावी !"
सूतमुनी मुळातच परमवैष्णव होते. त्यामुळे त्यांना भगवत्कथा सांगण्याची मनस्वी आवड होतीच. आवडीचे कार्य करण्याची सुवर्णसंधी, प्रयागासारखे महाक्षेत्र आणि ऐकण्यासाठी समोर उपस्थित असलेले ज्ञानी, भक्तिमान श्रोते असा अभिनव त्रिवेणीसंगम झालेला पाहून प्रसन्नता पावलेल्या सूतजींनी सद्गुरुवंदन करून श्री वेदव्यासांकडून जाणून घेतलेली श्रीनृसिंहकथा सांगायला सुरुवात केली. 
भगवान श्रीनरहरीरायांच्या कृपाप्रसादाने आपण सर्वजणही 'श्रीनृसिंहपुराणा'च्या या परमपावन गंगौघात आजपासून नऊ दिवस दररोज क्रमाक्रमाने सुस्नात होऊ या आणि श्रीनृसिंहकृपा संपादन करून धन्य होऊ या !
(लेखासोबतचे छायाचित्र : भगवान श्रीनृसिंहराज प्रभूंचे आजचे दर्शन, श्रीक्षेत्र नीरानरसिंहपूर.)
लेखनसेवा : रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष : 8888904481
Page 1 of 435123»