2 Jan 2018

आळंदीचे स्वामी

राजाधिराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रभावळीतील, त्यांचे कृपांकित थोर सत्पुरुष म्हणजे आळंदीचे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे होत. त्यांचा जन्म व पूर्वायुष्य कोणालाच माहीत नाही. श्री चिदंबर दीक्षित महास्वामींच्या सोमयागात आळंदीचे स्वामी उपस्थित होते. श्री गोंदवलेकर महाराज गुरुशोधार्थ भ्रमंती करीत असताना नैमिष्यारण्यातील एका गुहेत गेले होते. त्यात सहा तपस्वी होते. त्यांपैकी एक आळंदीचे स्वामी देखील होते, असे मानले जाते. श्री स्वामींचे सांप्रदायिक मानतात की, द्वितीय दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजच पाचशे वर्षांनी पुढे आळंदीत प्रकटले व प्रचंड कार्य करून समाधिस्त झाले. अर्थात् या मताला कोणताच ठोस आधार देता येत नाही. तरीही आळंदीचे स्वामी भगवान श्रीदत्तप्रभूंचेच अंश होते यात मात्र शंका नाही !
इ.स. १८७४ च्या सुमारास स्वामी भरपूर ठिकाणी भ्रमंती करून आळंदीत आले. आळंदीच्या स्वामींवर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्णकृपा होती. दोनदा स्वामी अक्कलकोटी श्री समर्थांच्या दर्शनास गेल्याचा उल्लेख श्री गोपाळबुवांच्या बखरीत आहे. श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या केवळ दृष्टिक्षेपानेच त्यांची समाधी लागली व ते दोन अडीच तास त्या प्रगाढ समाधीतच होते. त्यामुळे आळंदीचे स्वामी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुस्थानीच मानत. श्री स्वामी समर्थ महाराजही आळंदीच्या स्वामींना सन्मानाने वागवत असत.
आळंदीच्या स्वामींचे चरित्र अतिशय मनोहर आहे. त्यांचा प्रसन्न चेहरा आणि मनमोहक हास्य पाहून आपणही आनंदित होतो. ते अतिशय प्रेमळ व भक्तवत्सल होते. त्यांच्या चरित्रातील अद्भुत लीला वाचताना खूप आनंद व समाधान लाभते. त्यांनी आळंदीत अनेक कार्ये केली. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा रथोत्सव त्यांनीच सुरू केला. माउलींच्या समाधी मंदिराच्या मागचा मुक्ताई मंडप बांधून श्री मुक्ताईंच्या श्रीमूर्तीची त्यांनीच स्थापना करवली. इंद्रायणीचा घाटही त्यांनीच बांधून घेतला.
आळंदीचे स्वामी भजनप्रिय होते. ते इतके तल्लीन होऊन भजन करीत की, त्या भजनानंदातच त्यांची समाधी लागत असे. भगवान माउलींच्या मंदिरात त्यांनी रात्रीच्या भजनाची पद्धत सुरु केली. भजनाला गर्दी व्हावी म्हणून भजनानंतर सुकामेवा इत्यादी प्रसाद ते वाटत असत. त्यांचीच एक मजेशीर लीला म्हणजे, त्यांना दरमहा रु.५/- ची एक मनिऑर्डर येई. कोण पाठवत असे देव जाणे. पण त्यातून ते प्रसादासाठी वस्तू आणत. त्यांच्या या युक्तीमुळे रात्रीच्या भजनाची गर्दी भरपूर वाढली हे मात्र खरे !
आळंदीचे स्वामी भक्तांची परीक्षा मात्र जोरदार बघत. एकदा एका भक्ताला त्यांनी सांगितले की, "वाघोलीच्या तळ्याजवळील शिवमंदिरात रात्री जाऊन पूजा करून ये. काहीही झाले तरी घाबरायचे नाही बरे का !" तो बरे म्हणून पूजेला गेला. ते मंदिर तसे जंगलातच होते. गाभाऱ्यात पणतीच्या प्रकाशात पूजा सुरू केल्यावर त्याला दिसले की, पिंडीच्या मागे एक मोठे अस्वल बसलेले आहे. तो इतका घाबरला की सगळे तिथेच सोडून धावत सुटला. तो जेव्हा आळंदीला स्वामींच्या दर्शनाला आला, तेव्हा त्याला पाहताच स्वामी पोट धरून हसले आणि म्हणाले, " अरे, घाबरू नकोस असे आम्ही सांगितले होते ना तुला आधीच. ते अस्वल म्हणून आम्हीच तर बसलो होतो तिथे. घाबरलास काय एवढा."
आळंदीच्या स्वामींचे एक भक्त होते. त्यांना  त्यांनी दररोज पार्थिव पूजा करण्याची आज्ञा केलेली होती. ते नियमाने व अतीव प्रेमाने पार्थिव शिवपूजा करीत असत. एके दिवशी त्यांनी हातावर पार्थिव करून पूजेला सुरुवात केली आणि अचानक एक काळा कभिन्न नाग त्यांच्या हातावर प्रकट झाला. त्याने त्या पार्थिवावर आपल्या फण्याची सावली केली होती. या भक्ताची कमाल पाहा, त्यांनी किंचितही न घाबरता आपली पूजा पूर्ण केली. आपल्याला हे नुसते वाचून सुद्धा धडकी भरते. पण ते अजिबात घाबरले नाहीत. तो नाग जसा प्रकट झाला होता तसाच पूजा झाल्यावर अदृश्य झाला. संध्याकाळी हे गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आले. त्यावेळी स्वामींनी सकाळचा प्रसंग जाणून त्यांना अक्षरश: उचलून घेतले व म्हणाले, "बाळा, जिंकलंस आज आम्हांला. काय हवे ते माग !" त्यावर त्या भक्ताने मागितले, "सद्गुरुराया, जन्मजन्मांतरी आपलीच सेवा घडू देत व आमच्या कुळाकडूनही आपली सेवा अविरत घडू दे !" स्वामी महाराजांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला. असे धैर्य केवळ अमोघ सद्गुरुकृपेने व अनन्य निष्ठा असल्यासच येऊ शकते. तशी तयारी त्या भक्ताची असल्याने स्वामींनी त्याच्यावर पूर्णकृपा केली, यात नवल नाही.
आळंदीचे स्वामी थोर योगाभ्यासी देखील होते. योगशास्त्रातील अनेक अवघड प्रक्रिया ते सहज करीत. आपले आतडे मुखावाटे बाहेर काढून स्वच्छ करताना त्यांना एकाने पाहिल्याचा उल्लेख आहे चरित्रात. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा करून त्यांना परमार्थाचे दान दिले.  लोकमान्य टिळक ज्यांना गुरुस्थानी मानत ते पुण्यातील प्रसिद्ध वैद्यराज  महर्षी अण्णासाहेब पटवर्धन हे त्यांचेच शिष्य. श्री नरसिंह सरस्वती स्वामी - महर्षी पटवर्धन - श्री गोडबोले महाराज - श्री अप्रबुद्ध अशी त्यांची शिष्यपरंपरा आहे. या शिवायही अनेक भक्तांवर कृपा करून स्वामींनी त्यांना मोक्षाधिकारी केलेले आहे. स्वामी ज्ञानेश्वरी, नाथभागवतावर उत्तम प्रवचने करीत. त्यांना संस्कृत रचना करण्याचीही आवड होती. त्यांनी रचलेले संस्कृत 'श्रीज्ञानदेवाष्टक' अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे. 'समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ।' असे त्याचे पालुपद आहे.
पौष पौर्णिमेला, इ.स. १८८६ साली त्यांनी आळंदीत जिवंत समाधी घेतली. त्यांचे समाधीमंदिर इंद्रायणीच्या काठावर, गोपाळपुऱ्याकडे जाताना आहे. समाधीवरील स्वामींचा गोड हसणारा मुखवटा पाहिला की, आनंदाचे भरते येते आणि मनही अगदी शांत होते. आज श्रीस्वामींच्या १३२ व्या पुण्यतिथीदिनी, त्यांच्या समाधीवर साकारलेल्या त्यांच्या मधुरातिमधुर रूपाचे दर्शन घेऊन आपण त्यांच्या श्रीचरणीं नतमस्तक होऊया !!
लेखक-रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष-8888904481

( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.
http://rohanupalekar.blogspot.in )


5 comments:

  1. शतशः धन्यवाद। मला तर माहीतच नव्हत। कधी संत वांग्मय वाचनात आल नाही। बहुतेक आज ही भेट तुम्च्या माध्यमातून व्हायची असेल।
    खरच, हे सुद्धा योगायोग म्हणा किंवा सिद्ध महात्मा ची कृपा। 🙏

    ReplyDelete
  2. सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची उद्बोधक छान माहिती आपण दिलीत त्याबाद्दल आपणास धन्यवाद.स्वामीमहाराजाना शतशः दंडवत🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. Respected Rohan Ji
    Thank you very much for very sweet information.
    In Dhule there is Samadhi mandir of Shri पद्मनाभ Swami. He was Disciple of Shri Narsinh Swami
    Every year from Dhule people come for Darshan to Alandi
    Thanks a Lot

    ReplyDelete
  4. सादर नमस्कार.... आपल्या या माहितीपूर्ण लेखामुळे काही अधिक माहिती प्राप्त झाली. चमत्कारांचे माझी श्रद्धा नसली तरी तरी सकारात्मक इच्छाशक्ती वरती आहे. आणि मंत्र जप साधनेने " ही शक्ती " लाभते यावर संपूर्ण विश्वास आहे. आपले मनःपूर्वक आभार.

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर माहिती दिली आहे या लेखात सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या विषयी. दरवर्षी प्रमाणे मी पण सहकुटुंब आळंदीला स्वामींच्या मठात जाऊन अभिषेक, दर्शन, प्रदक्षिणा व प्रसाद घेऊन आलोय. मठातील प्रसन्न वातावरण खूप आनंद व उर्जा देते. श्री महाराजांचा हसरा चेहरा व फुलांची गांधी कुटुंबीयांनी केलेली आरास सतत स्मरणात राहील अशी असते. ॐ श्री नृसिंह सद्गुरुभोनम:.

    ReplyDelete