16 Jan 2018

गोविंद गोविंद मना लागो हाचि छंद - 3

प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचा १३० वा जयंती उत्सव सुरू झालेला आहे. त्यानिमित्त आपण प.पू.श्री.काकांच्या काही अलौकिक आणि अद्भुत लीलांचा आस्वाद घेऊया. 
३. संकटी भक्तां रक्षी नानापरी
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे फलटण मधील काही कुटुंबांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या घरांमध्ये पू.काका नि:संकोच वावरत असत व त्या लोकांचेही पू.काकांवर आत्यंतिक श्रद्धा व प्रेम होते. यांपैकी वेलणकर कुटुंब फारच भाग्यवान म्हणायला हवे. या घराण्यातील श्री.पंत महाराज वेलणकरांवर भगवान श्रीदत्तप्रभूंची कृपा होती. देव त्यांच्याशी बोलत असत. त्यांना लाभलेल्या श्रीदत्त पादुकांचे मंदिर फलटणला बाणगंगा नदीकाठी आजही मोठ्या दिमाखाने उभे आहे. या वेलणकर घराण्याला आजवर अनेक सत्पुरुषांच्या सेवेचे भाग्य लाभलेले आहे. श्रीसंत हरिबाबा, लाटे गावाच्या श्रीसंत आईसाहेब, आष्ट्याचे श्रीदत्तमहाराज, प.प.श्री.टेंब्येस्वामींचे शिष्योत्तम प.प.श्री.नृसिंह सरस्वती (दीक्षित) स्वामी महाराज, पू.गोविंदकाका, पू.श्री.गुळवणी महाराज, पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अशा थोर थोर महात्म्यांची या घराण्याकडून निरलस सेवा घडलेली आहे. त्या पुण्याईमुळेच वेलणकरांकडून श्रीदत्तप्रभूंची सेवा अविरतपणे चार-पाच पिढ्या होत आहे आणि हे परमभाग्यच म्हणायला हवे.
पू.काकांचे पंत महाराज वेलणकरांवर प्रेम होते. पंतांनी पू.काकांचा अधिकार बालपणीच ओळखलेला होता. पंतांच्या रानातील विहिरीत पू.काका पाण्याखाली तास न् तास आपल्याच आनंदात बसून राहात असत. पंतांचे चिरंजीव कै.श्री.महादेवराव वेलणकर हे पू.काकांचे शाळासोबती होते. त्यांचीही श्रीदत्तोपासना उत्तमरित्या होत होती. त्यांच्यावर पू.काकांचीही प्रेमकृपा होती. श्री.पंतांचे चौथे चिरंजीव कै.श्री.जनार्दन वेलणकर हेही प.काकांना फार मानत असत. पू.काका त्यांना शंभू नावाने हाक मारीत. त्यांचे चिरंजीव श्री.पुरुषोत्तम वेलणकर यांनी सांगितलेल्या प.पू.काकांच्या काही अविस्मरणीय लीला आपण आज त्यांच्याच शब्दात पाहणार आहोत.
प.पू.सद्गुरु श्री.डॉ. गोविंदकाका उपळेकर महाराजांच्याविषयी माझ्या मनात खूप गोड आठवणी आहेत. त्यांची आठवण जरी झाली तरी ते गोड रूप डोळ्यासमोर उभे राहते. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात शर्ट व त्यावर कोट, कोटाच्या खिशाला अडकवलेली काठी, पायात बूट, गुडघ्यापर्यंत स्ट्रॅपिंग्स्, डोळे अर्धोन्मीलित आणि चेहऱ्यावर अतिशय गोड मोहक हास्य, कपाळाला बुक्का, डोक्यावर टोपी; खरोखरीच प्रत्यक्ष पांडुरंगच वाटत ते. त्यांचे नुसते दर्शनच इतके आश्वासक होते की बस.
आमच्या घरावर त्यांची वडिलांसारखी माया होती. आम्हां सर्वांची ते सतत पाठराखण करायचे. त्यांनी आम्हांला अनेक प्रसंगांमधून सुखरूप सांभाळलेले आहे व आजही सांभाळत आहेत. दररोज सकाळी पू.काकांची आमच्याकडे एक चक्कर तरी होत असे. ते श्री भैरवनाथाच्या दर्शनाला येत. तेथून परत जाताना आमच्या घरी येत. आमच्या वाड्याच्या आतल्या बाजूला एक मारुतीरायांची मूर्ती आहे. या दक्षिणमुखी मारुतीशी पू.काका आले की नेहमी गप्पा मारीत असत. ते म्हणायचे की हा मारुती बोलतो बरं का आमच्याशी. जागृत आहे हा. आमच्या घरावर लक्ष ठेवायला सांगायचे ते त्या मारुतीरायांना.
त्यावेळी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी बघणे चालू होते. वडलांचे  एका स्थळाकरता प्रयत्न चालू होते. सकाळी सकाळी पू.काकांची स्वारी घरी आली. वडलांना हाक मारून त्यांच्या हातावर त्यांनी तुरी ( तुरीचे दाणे ) ठेवल्या आणि काही न बोलताच ते निघून गेले.  दुपारच्या डाकेला त्या स्थळाकडून नकार आला. हातावर तुरी देऊन पू.काकांनी ही गोष्ट सकाळीच सुचवलेली होती.
असेच काही दिवस गेल्यावर महाबळ म्हणून एका स्थळाकरिता वडील प्रयत्न करत होते. एकेदिवशी पू.श्री.काकांची स्वारी आमच्या वाड्यासमोर उभी राहिली. बाहेरूनच वडलांना हाक मारून देवडीवरच्या गणपतीच्या चित्राकडे हात करून  म्हणाले, "शंभू, गणपतीने सही केली रे." आणि त्याच दिवशीच्या पहिल्या डाकेला श्री.महाबळांकडून होकाराचे पत्र आले.
पुढे रितसर लग्न झाल्यानंतर नूतन दांपत्य फलटणला आले होते. सकाळी ते दोघे फिरून येत असताना शंकर मार्केटमध्ये पू.श्री.काकांची गाठ पडली. तेव्हा माझी बहीण कै.सौ.माधुरी महाबळ हिने मंडईतच श्री.काकांना नमस्कार केला. त्याबरोबर काकांनी तेथील फुलवाल्याकडून २ गुलाबाची फुले घेऊन तिला दिली. पुढे तिला दोन सुपुत्रांची प्राप्ती झाली.
आठवणी खूप आहेत पण महत्त्वाची, माझ्याशी संबंधित एक सांगतो. लहानपणी मी खूप आजारी असायचो. त्यामुळे सतत अंथरुणालाच खिळलेलो असायचो. मी अगदी लहान असताना एकदा पू.काका घरी आले. त्यांना माझ्या वडलांनी सांगितले की मुलाचे नाव पुरुषोत्तम ठेवलेले आहे. त्यावर पू.काका म्हणाले, "अरे, याला पाणी आणि आगीपासून भय आहे, त्यामुळे याचे नाव ' अनिल ' ठेवा." तेव्हापासून मला घरातले सगळे लोक अनिल नावानेच हाक मारतात.
माझे वडील माझ्या सततच्या  आजारपणाला कंटाळले होते.
एके दिवशी आमच्या घरी एक ज्योतिषी आला. त्याने सगळ्यांचे भविष्य सांगण्यास सुरुवात केली. वडील नुकतेच कारखान्यातून आलेले होते. हात पाय धुवून चहा घेत होते. त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, त्यांनी माझी पत्रिका त्या ज्योतिषासमोर ठेवली. एकवार नजर टाकून ज्योतिषी म्हणाला, "ही मृत व्यक्तीची पत्रिका का दाखवत आहात ?" हे ऐकल्यावर वडील संतापले. त्यांनी त्याला माझ्याजवळ आणले व म्हणाले, "हा माझा मुलगा. याची पत्रिका आहे ही." त्यावर तो ज्योतिषी म्हणाला की, ग्रहमान तर स्पष्ट मृत्युयोग दाखवते. रागारागाने त्याला त्यांनी हाकलून दिले. वैतागून ते उठले व सरळ श्री.काकांच्या दर्शनाला गेले. तेथे गेल्यावर त्यांनी सर्व प्रसंग पू.काकांना सांगितला. तेव्हा पू.काकांनी माझ्या वडलांना पंढरपूरला जाऊन श्रीपांडुरंगाच्या देवळातील श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीला सर्व हकीकत सांगण्यास सांगितले.
वडलांची श्री.काकांवर अतूट श्रद्धा होती. त्यामुळे काही दिवसांनी आम्ही तिघे (मी आई-वडील) पंढरपूरला गेलो. पांडुरंगांचे दर्शन घेऊन नंतर त्यांच्या पाठीशी असलेल्या नवग्रहमंदिराच्या जवळच्या श्रीदत्तात्रेयांच्या मूर्तीपाशी आलो. तेथे माझी परिस्थिती मी स्वतःच श्रीदत्तात्रेयांना कथन केली. दर्शन घेऊन परत फलटणला आल्यावर आम्ही थेट पू.श्री.काकांच्या दर्शनाला गेलो. वडलांनी श्री.काकांना सर्व वृत्तांत सांगितला.
तेव्हा मी श्री.काकांच्या समोरच बसलो होतो. माझ्याकडे बघत ते  गोड हसले. त्यांनी आपले पाय पुढे केले. वडलांनी मला त्यांचे पाय चेपण्यास सांगितले. मी तसे करायला सुरुवात केली.
थोड्यावेळाने पू.काकांनी खिशातून एक रुपयाचे नाणे काढून माझ्या हातात दिले व म्हणाले, "जा, तुझे काम झाले." आणि त्यानंतरच माझ्या प्रकृतीमध्ये खूप आश्चर्यकारक फरक पडू लागला. पुढे एक चांगला बालरोगतज्ज्ञ डॉक्टर आम्हांला मिळाला. त्याची ट्रिटमेंटही सुरू झाली. तेव्हापासून माझे आजारपण कायमचे संपले. माझा जो मृत्युयोग आलेला होता, तो प.पू.सद्गुरु श्री.काकांच्या कृपेने टळला. मला पू.काकांनी अक्षरश: जीवनदान दिले. त्यांचे हे उपकार माझ्या कातड्याचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घातले तरी कमी होणार नाहीत. किंबहुना माझी तर इच्छा आहे की सतत त्यांच्या उपकाराखालीच राहावे.
प.पू.श्री.काका म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीपांडुरंगच. माझ्या मातु:श्रींना पू.काकांनी एका आषाढी एकादशीला खरोखरीच भगवान पंढरीनाथांच्या रूपात दर्शन करविले होते. या जन्मात अशा अवतारी सत्पुरुषांचे दर्शन होणे, त्यांचे कृपाछत्र लाभणे, असे अलौकिक अनुभव येणे हे पूर्वीच्या अनेक जन्मांमधील पुण्याईचे फलच म्हणायला हवे.
प.पू.श्री.काकांचे आपल्या भक्तांवर असे निरतिशय प्रेम होते. ते परोपरीने, न सांगता स्वत:हूनच भक्तांचे सर्व संकटांपासून रक्षण करीत असत व आजही करीत आहेत. श्रीसद्गुरूंच्या श्रीचरणी अनन्यभावाने शरण जाऊन, त्यांच्यावरच सर्व भार टाकून जो आपल्याला दिलेली साधना शांतपणे व मनापासून करतो, त्या भक्ताचे सर्वबाजूंनी ते कल्याण करतातच. तेच या महात्म्यांचे ब्रीद आहे व आवडते कार्य देखील !
लेखक  - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
[ प.पू.काकांचे पूर्वी पोस्ट केलेले संक्षिप्त चरित्र खालील लिंकवरून डाऊनलोड करून वाचावे.
https://drive.google.com/file/d/0B8iN9dD8jV3wbU1pd1AweW5zUms/view?usp=drivesdk ]

0 comments:

Post a Comment