18 Mar 2018

टाळी वाजवावी गुढी उभारावी

नमस्कार मंडळी !!
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढी पाडवा ! स्वस्तिश्रीमन्नृप शालिवाहन शके १९४०, विलंबीनाम संवत्सराची प्रसन्न सुरुवात. सर्व सुहृदांना हिंदू नूतन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा !!
वर्षप्रतिपदा हा काही आत्ता सुरू झालेला उत्सव नाही, हा तर प्राचीन आहे. या तिथीला युगादि म्हणतात, भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टिनिर्मिती याच तिथीला केली होती. आता काही भंपक लोक म्हणतात, हा उत्सव छत्रपती संभाजीराजांच्या मृत्युनंतर सुरू झाला, पण त्याला काहीही अर्थ नाही; आणि आपल्याला त्या तद्दन मूर्खांशी वादही घालायचा नाही.
आपल्या सर्वच्या सर्व संतांनी गुढीचा अभंगांमधून अनेकवेळा उल्लेख केलेला आहे. गुढी उभारणे हा पूर्वीच्या काळी आनंद व्यक्त करण्याचा एक भाग होता. त्यासाठी ठरावीक तिथीचा संबंध नाही. कोणत्याही तिथीला आपण गुढी उभारू शकतो. आजही भगवान श्री माउलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी अनेक गावांमध्ये घरावर गुढ्या उभारल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदेला भगवान श्रीरामराय रावणाचा वध करून अयोध्येत परतले, म्हणून तेथील लोकांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते. त्याची आठवण व नवीन वर्षाच्या सुरुवातीला हर्षोल्लास म्हणून आपल्याकडे पाडव्याला गुढी उभारायची पद्धत पडलेली आहे.
सद्गुरु श्री ज्ञानेश्वरमाउली श्रीभगवंतांच्या अवताराचे रहस्य सांगताना म्हणतात,
अधर्माची अवधी तोडीं ।
दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनाकरवीं गुढी ।
सुखाची उभवीं ॥ज्ञाने.४.८.५२॥
श्रीभगवंत जेव्हा अवतार धारण करून येतात तेव्हा ते सर्वत्र बोकाळलेला अधर्म आधी नष्ट करतात, दोषांनी बरबटलेल्या जनांना सन्मार्गाला लावून त्या दोषांचे निराकरण करतात व संतजनांकरवी जगात सुखाची गुढी उभारतात. सद्गुरु श्री माउली येथे स्पष्ट म्हणतात की, या जगात खरे सुख जर हवे असेल, तर त्यासाठी संतांनाच शरण जावे लागेल; कारण प्रत्यक्ष भगवंतही प्रकट झाले तरी ते शाश्वत सुखाचे दान मात्र संतांकरवीच करतात, स्वत: करीत नाहीत.
चैत्र महिना हा वसंतऋतूचा काळ. या काळात निसर्गात सर्वत्र नवसर्जनाची, नवोन्मेषाची सुरेख लगबग चाललेली असते. त्यामुळे प्रसन्नतेची, आल्हाददायक सकारात्मक ऊर्जेची लाट सर्व गोष्टींना या काळात व्यापून राहिलेली असते. म्हणूनही हा उत्सव आनंदाचा, सुखाचा द्योतक मानला जातो आणि सर्वांना कायम हवाहवासा वाटतो. या अंतर्बाह्य व्यापून राहिलेल्या सुखाचे प्रकटन आपण घरावर गुढी उभारून करीत असतो.
श्रीसंत चोखामेळा महाराज आपल्या एका नितांतसुंदर अभंगात म्हणतात,
टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट ही चालावी पंढरीची ॥१॥
पंढरीचा हाट कौलाची पेठ ।
मिळाले चतुष्ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार ।
होतो जयजयकार भीमातीरी ॥३॥
हरिनाम गर्जतां भय नाही चिंता ।
ऐसे बोले गीता भागवत ॥४॥
खट नट यावें शुध्द होउनी जावें ।
दवंडी पिटी भावे चोखामेळा ॥५॥
भगवान पंढरीनाथांच्या प्रेमरंगात न्हालेले श्री चोखोबाराय म्हणतात, "बाबांनो, हाताने टाळी वाजवा, गुढी उभारा व पंढरीची वाट नामगजरात चालू लागा. पंढरीच्या हाटात, बाजारात आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी असे चार प्रकारचे वारकरी जमलेले आहेत व हे सर्वच जण भगवंतांचा कृपाप्रसादरूप कौल मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत. त्या कृपाकौलामुळेच तर हे मायेत गुरफटलेल्या सामान्य जनांहून भगवंतांचे भक्त म्हणून वेगळे ठरलेले आहेत.
भीमातीरावर भगव्या पताकांचे असंख्य भार जमलेले असून मोठ्या प्रेमाने भगवान श्रीपंढरीनाथांचा जयजयकार सतत होत आहे. अखंड चालणा-या या नामगजराचे माहात्म्य गीता, भागवतात स्पष्ट केलेले की, या नामजपामुळे कसल्याही प्रकारचे भय, चिंता, दु:ख शिल्लकच राहात नाही. या नामप्रवाहात एवढी ताकद आहे की तो सर्व प्रकारचे दु:ख, दारिद्र्य, भय, चिंता इत्यादी क्षणात वाहून नेतो. म्हणून श्री चोखोबा निश्चयपूर्वक दवंडी पिटून सांगतात की, कोणीही म्हणजे खट, नट, सुष्ट, दुष्ट असे कोणीही या भक्ति-पंढरीत येऊन प्रेमादराने नाम घ्यावे व तत्काळ शुद्धच होऊन जावे.
गुढीच्या रूपकाचा विलक्षण योगार्थ विशद करताना संत वाङ्मयाचे थोर अभ्यासक प.पू.श्री.शिरीषदादा कवडे आपल्या 'साधनजिज्ञासा' या ग्रंथात सांगतात, "ही 'गुढी' सामान्यरूपाने आपल्या लिंगदेहाचे प्रतीक आहे. रामायणातली गुढीची कथा आपल्याला माहीत आहेच. त्यामागचा आध्यात्मिक संदर्भ असा आहे की, लिंगदेह ही लंका आहे; त्यातला 'अहंकार' हाच रावण आहे. ज्यावेळी प्रभुकृपेने त्या अहंकाररूपी रावणाचा नाश होऊन, लंका-लिंगदेह शुद्धी होते; आणि सीतेची म्हणजे आपल्या सद्बुद्धीची सोडवणूक होते; त्यानंतर विजयाचा परम-आनंद होतो. त्यालाच; त्या ब्रह्मानंदालाच 'गुढी उभारणे' असे म्हणतात. त्यासाठीच श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात की, 'रोमांच गुढिया डोलविती अंगें ।(तु.गा.२४३.६)'
संतांनी देखील याच अर्थाने हा शब्दप्रयोग केलेला आहे. ही गुढी आपल्या सप्तकोशांपैकी सगळ्यात आत असलेल्या 'आनंदमय कोशा'चे प्रतीक आहे. त्या आनंदमय कोशाचे जे आत्मस्वरूप मस्तकस्थान असते, ते दाखविण्यासाठीच गुढीवर कलश ठेवलेला असतो. आपल्या शरीरातले सगळेच कोश शरीराच्या आकृतीचे असतात. त्यांपैकी आनंदमय कोश दाखविणारी ही गुढी असते. तिच्या गळ्यात गोड माळ असते. हल्ली साखरेच्या गाठी घालतात. पण शास्त्र असे आहे की, तेथे कोणतीही गोडाची माळ चालते. याचे कारण असे की, ते आनंदमय कोशाचे भ्रूमध्यस्थान आहे, तेथे अमृततत्त्व असते; त्याचेच ही माळ प्रतीक असते."
आजच्या या पुण्यप्रद उत्सवाच्या निमित्ताने, हे विलंबीनाम संवत्सर सर्वांसाठी दु:ख, दोष, अवगुणादी गोष्टींबाबतीत विलंबदायकच ठरो; आणि भगवंतांचे प्रेमदान देण्यासाठी मात्र विलंब न लावणारे ठरून, या वर्षात सर्वांना हरिनामामृताची गोडी लागून, निरंतर आनंदाची गुढी मनोमंदिरावर उभारून सुखाच्या नवीन वर्षाची सुरुवात करण्याचे सौभाग्य लवकरात लवकर लाभो, हीच जगन्नियंत्या आनंदकंद भगवान श्रीपंढरीनाथांच्या व तदभिन्न सर्व संतांच्या, श्रीसद्गुरुभगवंतांच्या श्रीचरणी प्रेमादरपूर्वक प्रार्थना !!
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( http://rohanupalekar.blogspot.in )


12 comments:

  1. II जय जय श्री सदगुरवे नमः II 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. Happy PADVA ,best wishes

    ReplyDelete
  3. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा आणि अभिनंदन

    ReplyDelete
  4. अप्रतीम, गुढीचा गूढार्थ उत्तम विवेचन केलात आणि आमचा ज्ञानदीप उजळलात, आपणास विनम्र प्रणाम

    ReplyDelete
  5. Happy Gudhipadava
    Waiting for your writing on Gudhipadava
    Thanks a lot for very very informative writing
    Regards

    ReplyDelete
  6. खूप वेगळा आणि फारच सुंदर

    ReplyDelete
  7. हा लेख पुनः वाचून खुप आनंद झाला. प्रभू श्रीरामाना दंडवत व असपणास धन्यवाद
    रामाच्या आरतीतील पाहिले कडवे आठवलं
    उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी
    लिंगदेह लंकापुर विध्वंसोनी
    कामक्रोधादीक राक्षस मरदोनी
    देह अहंभाव रावण निवटोनी

    ReplyDelete
  8. अप्रतीम, गुढीचा गूढार्थ उत्तम विवेचन केलात आणि आमचा ज्ञानदीप उजळलात, आपणास विनम्र प्रणाम

    ReplyDelete
  9. फारच समाधान व आनंद झाला

    ReplyDelete