25 Mar 2018

सूर्यवंशी उदेला सूर्य तो श्रीराम

नमस्कार,
आज श्रीराम नवमी !!
सूर्यकुलभूषण रघुकुलशिरोमणी मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची जयंती.
आपली देदीप्यमान भारतीय संस्कृती ही श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन महान आणि विलक्षण अवतारांच्या भोवतीच उभारली गेलेली आहे. हजारो वर्षे हीच दोन अद्भुत विभूतिमत्वे आपल्या जाणिवा, आपले संस्कार, आपल्या वृत्ती व पर्यायाने आपल्या संपूर्ण जीवनालाच व्यापून उरलेलीे आहेत. आम्हां भारतीयांच्या तना-मनात श्रीराम आणि श्रीकृष्ण हीच अस्मिता अंतर्बाह्य भरून राहिलेली आहे; आणि हेच आमच्या सर्वोत्तमत्वाचे, आमच्या उर्वरित जगाहून असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपणाचे द्योतक आहे !!
रामायण, महाभारत आणि भागवत हे महर्षी वाल्मीकी व महामती भगवान वेदव्यासांचे तीन वेदतुल्य दिव्य ग्रंथ आमच्या भारतीय संस्कृतीचे मूळ आधारस्तंभ आहेत. म्हणूनच आम्हां भारतीयांना स्वत:ला याच भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णांचे वंशज म्हणवून घेण्यात, त्यांचे अनन्य दास, निष्ठावंत पाईक म्हणवून घेण्यातच सार्थ अभिमान वाटतो व तो तसा वाटणेही सर्वार्थाने यथार्थच आहे !!
आजच्या परमपावन तिथीला त्रेतायुगात भगवान श्रीरामरायांच्या रूपाने भगवान श्रीमहाविष्णूंनी अयोध्येत राजा दशरथ व माता कौसल्येच्या पोटी अवतार धारण केला. सूर्यकुलाचे नाम जगन्मान्य करणारे हे विश्ववंद्य पूर्णपुरुषोत्तम प्रभू, सूर्य मध्यान्हीच्या आकाशात तेजाने तळपत असतानाच पुष्य नक्षत्रावर कर्कलग्नी प्रकटले. सद्गुरु श्री माउलींनी ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायात नेमकेपणे वर्णिलेल्या, शौर्य, तेज, धृती, दक्षत्व, अपलायन, दान, आणि ईश्वरभाव या क्षत्रियवर्णाच्या सातही गुणलक्षणांचे मूर्तिमंत आणि अद्वितीय आदर्श उदाहरण म्हणजे भगवान महाविष्णूंचे सातवे अवतार भगवान श्रीरामचंद्र प्रभू होत ! एकवचनी, एकबाणी व एकपत्नी ही वैशिष्ट्ये मिरवणा-या साधुमनविश्राम श्रीरामप्रभूंचे समग्र चरित्र फार विलक्षण असून नित्य चिंतन करण्यासारखेच आहे. वेदमर्यादेचा अभिनव विलास ज्यातून तेजोमय होऊन भव्य-दिव्य रूपात आपल्या समोर उभा ठाकतो, ते लोकाभिराम भगवान श्रीरामप्रभूंचे पावन चरित्र नुसते वाचनीय, चिंतनीयच नाहीतर निरंतर अनुकरणीयही आहे. भगवान श्रीराम हे ब्रह्मचर्य, गृहस्थ आणि वानप्रस्थ या तिन्ही आश्रमांच्या शास्त्रोचित अचूक वर्तनाचे, शास्त्रकथित मर्यादांचे परमआदर्श उदाहरण आहेत.
रघुकुलतिलक मुनिमनरंजन भगवान श्रीरामरायांचे चरित्र मोजक्या शब्दांत सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, 
जेणें सांकडलिया धर्माचे कैवारें ।
आपणपयां धनुष्य करूनि दुसरें ।
विजयलक्ष्मीये एक मोहरें ।
केलें त्रेती ॥ज्ञाने.१०.३१.२५२॥
जेणें देवांचा मान गिंवसिला ।
धर्मासि जीर्णोद्धार केला ।
सूर्यवंशी उदेला ।
सूर्य जो कां ॥ज्ञाने.१०.३१.२५४॥
"त्रेतायुगात जेव्हा धर्माला अधर्म ग्रासू लागला होता, तेव्हा त्या संकटात सापडलेल्या धर्माचा कैवार घेऊन स्वत:च धनुष्यरूप होऊन, ज्यांनी अधर्म ( रावण ) नष्ट करून  विजयलक्ष्मीला आपलेसे केले, ( आपल्या लक्ष्मीला, पत्नी सीतेला परत मिळवले ) ; ज्यांनी रावणाच्या पराक्रमाने मानहीन झालेल्या देवतांना त्यांचा उचित सन्मान पुन्हा प्राप्त करवून दिला आणि स्वत:च्या विशुद्ध आचरणाने धर्माची पुनर्स्थापना केली, सूर्यवंशाच्या पुण्याईचे फळ म्हणून उगवलेल्या त्या साक्षात् प्रतापसूर्याला, भगवान श्रीरामरायांना सादर वंदन असो !"
( http://rohanupalekar.blogspot.in )
आपल्या वारकरी संप्रदायानेही श्रीराम व श्रीकृष्ण याच दोन पूर्णावतारांना विशेष प्राधान्याने स्वीकारलेले आहे. कारण हीच दोन परम-आदर्श विभूतिमत्वे आम्हांला सर्वांगांनी सांभाळत, आमचे सर्व लळे पुरवीत आम्हांला मोक्षापर्यंत सहज नेतील, याची श्री ज्ञानोबारायादी वारकरी संतांना खात्री होती व तसा त्यांचा स्वानुभवही होता. म्हणून त्या प्रगल्भ ज्ञानभूमिकेतूनच श्री माउली आपल्याला उपदेश करतात की,
रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरीं ।
हृदयमंदिरीं स्मरा कां रे ॥१॥
आपुली आपण करा सोडवण ।
संसारबंधन तोडा वेगीं ॥२॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण माळा ।
हृदयीं जिव्हाळा श्रीमूर्ति रया ॥ज्ञा.गा.१०७.३॥
भगवान श्रीरामरायांचे दिव्य चरित्र आणि त्यांच्यासारखेच प्रभावशाली व ब्रह्मस्वरूप असे त्यांचे पावन 'राम'नाम हेच आमच्या जिव्हाळ्याचा विषय झाल्याशिवाय आमचा खरा उद्धार होणार नाही. रामचरित्राचे चिंतन हे पारमार्थिक लाभासोबत व्यावहारिक लाभ देणारेही आहेच. समर्थ श्री रामदास स्वामींनी म्हणूनच "रामकथा ब्रह्मांड भेदून पल्याड" नेण्याची आज्ञा आपल्या संप्रदायिकांना आवर्जून करून ठेवलेली आहे. श्रीरामचरित्र आणि श्रीकृष्णचरित्र हे " आयुष्यात कोणत्या परिस्थितीत आपण कसे वागावे? " याचे फार सुंदर आणि नेमके मार्गदर्शन करते. या दोन अक्षय चरित्र-रत्नदीपांच्या निखळ प्रकाशात जर आपण आपल्या जीवनाची वाट चोखाळत असू; तर नि:संशय आपण त्यांच्याचसारख्या नित्य आणि निरंतर आनंदाचे धनी होऊ, यात अजिबात शंका नाही. समर्थ श्री रामदास स्वामी, "दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥ दा.बो.११.६.१९॥" असे महंतलक्षण समासाच्या शेवटी सर्व विवेचनाचा मार्मिक सारांश म्हणून आपल्याला सांगतात, ते उगीच नाही ! अतुल-पराक्रम, लोकाभिराम भगवान श्रीरामरायांचा एक जरी दिव्य गुण आपल्याला अंगीकारता आला तरी जीवन धन्य होऊन जाईल, आपलेही व आपल्याबरोबर असंख्यांचेही !!
आजच्या श्रीरामनवमीच्या या पावन पर्वावरच राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामींचाही जन्म अगदी मध्यान्ही बारा वाजता, रामजन्माच्याच वेळी झाला ; हा काही नुसता योगायोग नव्हे. ही तर या थोर रामदासाच्या भावी कार्याची नांदीच होती !
भगवान श्रीरामही उत्तुंग आणि रामांचा हा दासही तेवढाच उत्तुंग आहे. दोघेही अगदी नगाधिराज हिमालयासारखे; अपार, अद्भुत, डोळ्यांच्या कवेत न मावणारे, लखलखीत सोन्यासारखे, तेजस्वी-ओजस्वी, अमानवी आणि अलौकिक; तरीही आम्हांला हवेहवेसे, अगदी 'आपले' वाटणारे, जवळचे !!
आमची फलटण नगरी ही भगवान श्रीरामरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. वनवासात असताना आपल्या वडलांचे श्राध्द त्यांनी फलटणला केले होते. त्यासाठी शुद्ध जल हवे म्हणून त्यांनी बाण मारून एक प्रवाह निर्माण केला, तोच 'बाणगंगा' नदीच्या रूपाने आजही वाहतो आहे.
फलटणच्या थोर अधिकारी राणीसाहेब साध्वी सगुणामाता निंबाळकर यांनी निर्माण केलेले अडीचशे वर्षे जुने भव्य श्रीराम मंदिर फलटणचे ग्रामदैवत आणि भूषण मानले जाते. प.पू.सद्गुरु श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांचे आराध्यदैवत असणा-या श्रीरामप्रभूंच्या या मंदिरात पू.काका नित्य नियमाने संध्याकाळी श्रीरामरायाच्या दर्शनाला जात असत व आपल्याकडे आलेल्या सर्व भक्तांनाही आवर्जून दर्शनाला पाठवीत असत. श्रीरामराया, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती अतिशय सुबक, रेखीव आणि बोलक्या आहेत. प.पू.काका खूप वेळ श्रीरामरायासमोर उभे राहून हातवारे करीत दररोज त्यांच्याशी सुखसंवाद करीत असत. हे दिव्य दृश्य पाहिलेले अनेक भाग्यवंत भक्त आजही हयात आहेत.
आजचे हे भगवान श्रीराम-श्री रामदास जन्माचे पावन पर्व, आमच्या जाणिवेचे दैन्य दूर करणारे, आम्हांला पुनश्च स्वत्त्वाचे भान देणारे, आमचा देव-देश-धर्माचा अभिमान जागवून राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्यमग्न व अग्रेसर करणारे, आमच्या स्वकीय-परकीय शत्रूंचे खरे स्वरूप आम्हांला दाखवून सावध करणारे, त्या दुष्ट शत्रूंचा पूर्ण नि:पात करणारे आणि दिव्य-पावन रामनामात रंगवून टाकणारे ठरावे, हीच यानिमित्त जगज्जीवन भगवान श्रीरामरायांच्या श्रीचरणी सर्वांच्या वतीने सादर प्रार्थना करतो !!
भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्याच अद्भुत शब्दांमध्ये आपण, देवदेवोत्तमशिखामणी रघुवंशनाथ हनुमत्प्रभू भगवान श्रीरामरायांच्या चरणी मनोभावे वंदन करू या;
गंभीर तूं श्रीरामा ।
नानाभूतैकसमा ।
सकळ गुणीं अप्रतिमा ।
अद्वितीया ॥ज्ञाने.११.४३.५६३॥
म्हणोनि त्रिभुवनी तूं एक ।
तुजसारिखा नाहीं आणिक ।
तुझा महिमा अलौकिक ।
नेणिजे वानूं ॥ज्ञाने.११.४३.५६६॥
यच्चयावत् सर्व सद्गुणांचे एकमात्र अाश्रयस्थान असणा-या, परम-गंभीर, अद्वितीय-उत्तम, त्रिभुवनैक-अलौकिक, अप्रतिम-अद्भुत महामहिम भगवान श्रीरामरायांच्या श्रीचरणी अनंतकोटी दंडवत प्रणाम !!
सीयावर श्रीरामचंद्र की जय ।
जय जय रघुवीर समर्थ ।
(फोटो :  फलटण येथील ग्रामदैवत भगवान श्रीरामप्रभूंची सुंदर श्रीमूर्ती )
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( अशा सर्व पोस्ट्स नेहमी वाचण्यासाठी कृपया खालील कम्युनिटी लाईक करावी.

12 comments:

  1. दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. श्रीराम

    ReplyDelete
  2. Il श्रीराम जय राम ... जय जय राम 'll
    🌹🌹🌹🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर लेख....
    👏👏🙏

    ReplyDelete
  4. जय श्रीराम समर्थ

    ReplyDelete
  5. Apratim lekh. .. Khup khup sunder.. Jai Shree Ram 🙏P. P. Sadguru Shree Govind Kaka Upalekar Maharaj ki Jai 🙏🙏🙏

    ReplyDelete
  6. मुखी सदा असो द्यावे रामनाम!!💐💐

    ReplyDelete
  7. सकळ गुण श्रीरामाचे सुंदर चित्रण भावले

    ReplyDelete
  8. आपदामपहर्तारं दातारां सर्वसम्पदाम्। लोकाभिरामं श्रीरामं भूयो-भूयो नामाम्यहम्

    ReplyDelete
  9. 👌🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  10. श्री गुरुदेव दत्त

    ReplyDelete