25 Apr 2018

नरहरी तो माझा - श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पाचवा

श्रीनृसिंहपुराणातील यमगीतेचा कथाभाग आपण पाहात आहोत. ही कथा येथे मार्कंडेयऋषींच्या संदर्भाने येते. आता वाचकांना प्रश्न पडेल की, मार्कंडेयांचे आख्यान तर शिवपुराणातही आहे. शिवलीलामृतात देखील त्यावर सविस्तर लिहिलेले आहे. मार्कंडेयांनी त्यासमयी केलेले चंद्रशेखराष्टकही सुप्रसिद्ध आहे. मग आता तेच मार्कंडेय येथे विष्णुभक्त दाखवलेले आहेत. मग खरी कथा कोणती? साहजिकच आहे असे वाटणे. खरेतर मार्कंडेयमुनी आपल्या अनन्यभक्तीच्याच बळावर मृत्यूला पार करून गेले, हेच त्यातले सत्य आहे ! पुराणांमधून अशा एकच प्रकारच्या कथा वेगवेगळ्या दैवतांच्या संदर्भाने आलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे त्यातील तो लौकिक कथाभाग सोडून द्यावा व त्या कथेतून प्रकट होणारे अलौकिक भक्तिमर्मच आपण नीट समजून घेतले पाहिजे. शिवाय सर्व देवदेवता या मूळ परब्रह्माचेच अंश आहेत, त्या देवतांच्या रूपाने ते अव्यय, अविनाशी, अविकारी, निर्गुण-निराकार परब्रह्मच सगुणसाकार होऊन कार्यरत आहे. मग तुम्ही त्या तत्त्वाला शिव म्हणा किंवा विष्णू म्हणा, देवी म्हणा किंवा गणेश म्हणा; आहे ते एकमेव मूळ परब्रह्मच ! त्यामुळे अशा कथांचा विचार तात्त्विक भूमिकेनेच केला पाहिजे. ही एकत्वाची भूमिका एकदा पक्की ठसली की मग पुराणांमधील विसंगती किंवा अर्थवादरूप मांडणी किंवा पुनरुक्ती यांमुळे आपल्या मनात कसलीही शंका निर्माण होत नाही. असो.
यमधर्माने नरकातील जीवांना जो मौलिक उपदेश केला तोच "यमगीता" म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात, प्रत्यक्ष भगवान श्रीनारायणांनी स्वमुखाने अशी ग्वाही दिलेली आहे की, "जो मनुष्य कृष्ण कृष्ण केशव नृसिंह अशाप्रकारे माझे नित्य स्मरण करतो, त्याला सर्व कष्टांमधून, अगदी नरकातूनही, ज्याप्रमाणे कितीही खोल पाणी असले तरी ते भेदून कमळ वर येतेच, त्याप्रमाणे मी बाहेर काढतोच. 'हे पुंडरीकाक्षा, देवदेवेश्वरा, नरसिंहा, त्रिविक्रमा ! मी आपल्याला शरण आलो आहे, माझा उद्धार करा', असे जो मनापासून वारंवार म्हणतो, त्याचा मी उद्धार करतो. 'हे देवाधिदेवा, जनार्दना, मी आपल्या आश्रयाला आलो आहे', असे म्हणून जो मला शरण येतो, त्याला मी सर्व क्लेशांपासून मुक्त करतो !"
यमराजांचे हे बोल ऐकून नरकात पडलेल्या त्या पापी जीवांनी कृष्ण, केशव, गोविंद, नरसिंह, मधुसूदन, नारायण अशा नामांचा जयजयकार करायला सुरुवात केली. त्याबरोबर त्यांचे सर्व प्रकारचे दु:ख नष्ट झाले, नरकातील तीव्र अग्नीही त्यामुळे शांत झाला व ते जीव त्या नामस्मरणाच्या प्रभावाने कृष्णस्वरूपच होऊन ठाकले. तेवढ्यात विष्णुदूत तेथे आले व त्यांनी भगवान विष्णूंच्या कृपेने दिव्यदेही झालेल्या त्या पापमुक्त जीवांना दिव्य विमानांमधून विष्णुलोकाला नेले.
ह्या यमगीतेतून प्रत्यक्ष यमधर्मच आपल्याला सांगतात की, कितीही मोठे पाप घडलेले असले तरी केवळ मनापासून केलेल्या भगवंतांच्या नामस्मरणाने, त्या भयंकर पापाच्या कचाट्यातून जीव नि:संशय सुटतात. म्हणूनच भगवान श्रीशिवशंकर श्रीनृसिंहकवचाच्या उपसंहारात भगवान श्रीनृसिंहांच्या भक्तीचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
भयं नास्ति भयं नास्ति नृसिंहपदसेवनात् ।
सत्यं सत्यं वचो वच्मि शंकरोऽहं त्रिलोचन: ।
कुतो भीति: कुतो मृत्यु: कुतस्तस्य दरिद्रता ।
मृत्योर्मृत्यु: रमानाथो यस्य नाथो नृकेसरी ॥
"भगवान श्रीनृसिंहांच्या पदारविंदांची मनोभावे सेवा करणा-या भाग्यवान भक्ताला कसल्याही प्रकारचे भयच उरत नाही, हे सत्य मी शिव वारंवार कथन करीत आहे. त्या भक्ताला दैन्य, दारिद्र्य, मृत्यू यांचे कशाचेही भय राहात नाही, कारण मृत्यूचेही मृत्यू असणारे रमानायक भगवान श्रीनृसिंह त्याचे नाथ असतात, त्याचे पालक-मालक सर्वकाही तेच असतात."
म्हणूनच, अशा भक्ताभिमानी व परमभक्तवत्सल श्रीनरहरीरायांचे प्रेमभावे स्मरण, मुखावलोकन, वंदन, पूजन, गुणगायन, लीलाकथन करणे हेच आपल्यासाठी महापुण्यकारक असे सर्वात सुलभ साधन नाही का? त्यासाठीच त्या परमदयाळू भगवंतांच्या श्रीनृसिंह अवताराची पावन कथा आपण नवरात्राच्या निमित्ताने प्रेमभावे अभ्यासत आहोत.
श्रीभगवंतांच्या या पूर्णावताराचे सर्वकाही अलौकिक आणि अद्भुतच आहे. त्यांचे रूप अद्भुत, ते खांबातून प्रकट होणेही अद्भुत, त्यांचा क्रोधही अद्भुत नि त्यांचे भक्तवात्सल्यही अद्भुतच ! देवांच्या या रूपाचे योगशास्त्राच्या परिभाषेतही मोठे गोड रूपक म्हणून विवरण केले गेले आहे. श्रीनृसिंह अवताराचा तो विलक्षण व निगूढ असा योगार्थ प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी श्रीनृसिंहकोशात पहिल्यांदाच सविस्तर मांडलेला आहे. नृसिंहअवतारामागची परमपुण्यदायक कथा व त्यातील योगार्थ यांचे विवरण वरील लिंकमधील लेखात गेल्यावर्षी केलेले आहे, ते वाचून त्याचे मनन करावे व त्याद्वारे श्रीनृसिंह भगवंतांच्या स्मरणात त्यांच्या श्रीचरणी श्रद्धासुमने समर्पावीत ही प्रार्थना !
लेखक - रोहन विजय उपळेकर
भ्रमणभाष - 8888904481
( कृपया ही पोस्ट अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचवावी ही प्रेमळ विनंती.)
 विदारूनि महास्तंभ देव प्रकट स्वयंभ 
श्रीनृसिंह जयंती नवरात्र - लेख पाचवा 
http://rohanupalekar.blogspot.in/2017/05/blog-post_5.html?m=1

1 comments:

  1. यमगीता नव्याने माहीत झाली, आपणास धन्यवाद आणि भगवान नृसिंह यांना दंडवत

    ReplyDelete